भारताच्या तुलनेत
मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?
अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?
बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?
पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?
मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_
संपादित. व्यक्तिगत टीका टाळावी.
-व्यवस्थापन