Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

म
मार्गी
Tue, 04/29/2025 - 17:18
💬 8 प्रतिसाद

नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे. पण नाही, ते "तसे करोडपती" नाहीत! त्यांची संपत्ती ही त्यांच्या गावाची वनसंपत्ती आहे आणि तिचं पैशातलं मूल्य कित्येक करोड असलं तरी त्यांच्यासाठी ती अनमोल आहे.

बारीपाडा! मांगी- तुंगी शिखरांच्या परिसरात असलेला आणि महाराष्ट्र- गुजरातच्या सीमा भागामध्ये असलेला एक आदिवासी पाडा! आज बारीपाडा हेसुद्धा मांगी- तुंगीसारखंच एक आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलं गेलेलं शिखर आहे. पण ज्या दरीतून आणि अंध:काराच्या वाटचालीतून बारीपाड्याने हा प्रवास केला तो खूप प्रेरणादायी आहे. आणि त्याचे नायक चैतराम दादा आहेत. चैतराम पवार हे इथले पहिल्या पिढीचे उच्चशिक्षित. त्या काळामध्ये खूप कष्टाने व संघर्ष करून शिकत राहिले. शाळेतही शिकत राहिले आणि वर्गाबाहेरही शिकत राहिले. एम. कॉम. झाल्यावर १९९० च्या सुमारास वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी बारीपाडा गावासाठी काम सुरू केलं. त्यांना जिथून कुठून काही चांगल्या गोष्टी मिळाल्या त्या त्यांनी गावामध्ये करून बघितल्या. सुधारित शेती, वन संवर्धन, जल संवर्धन, ग्राम विकासाचे प्रयोग आणि इतर सर्व. भारत सरकारने संयुक्त वन व्यवस्थापन अधिनियम २००५ मध्ये आणला, पण त्याच्याही अनेक वर्षं आधी इथे गाव मिळून वन व्यवस्थापन करत होतं. वन म्हणजे जंगल, जमीन, जनावर (पशुधन), जल आणि जन असं 5 J वर त्यांचं काम सुरू वाढत गेलं.

हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल.

थोडा विचार करून पाहा! ज्या गावात कोणीच शिकलं नव्हतं अशा गावात उच्चशिक्षण घेऊन आणि मोठी नोकरी मिळालेली असतानाही त्यांनी ती नाकारली! आणि तिथून पुढे विकासाची वाट धरली. त्यांना वनवासी कल्याण आश्रम, शेती व संवर्धन विषयातले इतर तज्ज्ञ, मार्गदर्शक अशी मंडळी मिळत गेली. चैतरामजी व बारीपाडा ग्रामस्थांनी अखंड प्रयोगशील राहून सगळे प्रयोग सुरू केले. दिवस, महिने वर्षं सरत गेली! काम पुढे सरकत गेलं. पूर्वीचं वन क्षेत्र तोडण्यापासून तर वाचलंच पण वाढलं. त्याचे चांगले परिणामही मिळाले. कालांतराने तर घनदाट जंगल झालं, पूर्वीच्या पिढीने बघितलेले वन्य प्राणी परत तिथे वस्तीला आले. गरजेपुरतं इंधन घेऊन संवर्धन काम सुरू राहिलं. सुधारित चूल, बायोगॅस, चार सूत्री भात शेती असं ग्राम विकासामध्ये येणारं सगळं गावाने केलं. सगळेच प्रयोग काही लगेच सफल ठरले नाहीत. अडथळेही अनेक आलेच. विरोधही झाला. पण दृढनिश्चय त्यांच्याकडे होता. त्यामुळे वाटचाल पुढे पुढे होत राहिली.

२००३ मध्ये IFAD (International Fund for Agricultural Development) ह्या आंतराष्ट्रीय पुरस्कारामुळे बारीपाडा अचानक प्रसिद्धी झोतात आलं. कालांतराने राज्यातल्या व देशातल्या पुरस्कारांची मालिका सुरू राहिली. पारंपारिक बीज संवर्धनासाठी वन भाजी स्पर्धा इथे सुरू झाली. ४५० हेक्टर वन क्षेत्रामुळे गाव सुजलाम् सुफलाम् झालं. महिला आरोग्य, महिला शिक्षण, बचत गट अशा विषयांवरही काम झालं. आणि आज तर बारीपाडा एका खूप वेगळ्या अर्थाने विकासाचा ब्रँड व ब्रँड एम्बेसेडर बनला आहे. शाश्वत विकासाचे बहुतांश निकष हे गाव पूर्ण करतं. गावात आज कोणीही भूमिहीन नाहीत. निसर्गाचा कृपावर्षाव बारीपाड्यावर होतोय. संत कबीर म्हणाले होते, "ज्यों की त्यों धरि दीनी चदरिया" (त्यांना निसर्गाने जे शुद्ध रूप दिलं ते त्यांनी तसंच परत केलं, कोणताच डाग पडू दिला नाही). अगदी त्याच प्रकारे बारीपाड्यानेही आपल्याला मिळालेलं निसर्गाचं वैभव टिकवलं. आणि पुढे वाढवलंसुद्धा.

चैतराम दादाही कालांतराने इतर अनेक गावांचे मार्गदर्शक झाले. वनवासी कल्याण आश्रमाचे संघटक आणि पुढे सरकारच्या विविध समित्यांवर संसाधन व्यक्ती असा त्यांचा पुढे प्रवास झाला. बारीपाडामध्ये झालेल्या कामाकडून अनेक गावांनी व कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेतली. चैतराम दादा व इतर कार्यकर्त्यांनीही त्या दिशेने प्रयत्न केले. केवळ एका गावात वन संवर्धन होऊन किंवा जल संवर्धन होऊन प्रश्न मिटत नाहीत. पूर्ण जिल्हात व पूर्ण प्रदेशात ते व्हावं लागतं तर दुष्काळ कमी होतो व पर्यावरणाचं शाश्वत संवर्धन होतं, असं‌ चैतराम दादा सांगतात. बारीपाडा आज एक विकासाचं शिखर म्हणून उभं आहे; पण हे शिखर न राहता त्याचा एक महाखंड व्हावा ही त्यांची धडपड आहे. बारीपाडा ही विकेंद्रित विकासाची एक आडवाट न राहता वहिवाट व्हावी ह्या दिशेने परिसरातल्या व राज्याबाहेरच्या गावांमध्येही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

काही वर्षांपूर्वी जैव विविधतेच्या एका सर्वेक्षणामध्ये गावाच्या परिसरातील वन संपत्ती, फळ वृक्ष, पशुधन ह्यांचं मूल्यमापन केलं गेलं! ऑक्सीजन देण्याचं प्रमाण, उत्पादने, मृदा संधारण ह्या अनेक निकषांवर हे मूल्यमापन केलं गेलं. त्यामध्ये समोर आलं की, बारीपाडा परिसरातील वन संपत्तीचं मूल्य करोडोंमध्ये आहे. पण हे गावच वेगळं आहे. निसर्गाला इथे देव मानलं जातं. वृक्षांना- पशुंना आपला भाग मानलं जातं. त्यामुळे बाहेरच्या प्रभावापासून हे गाव पूर्ण मुक्त आहे. वस्तुत: इथल्या एक एक गोष्टी "बाजारात" आणल्या तर सर्व जण सहजपणे पैशांनी श्रीमंत होऊ शकतील. पण त्यापेक्षा त्यांना निसर्गाच्या श्रीमंतीला जपण्याची ओढ जास्त आहे! हे सगळं मी केलं असं चैतराम दादा कधीच म्हणत नाहीत. सगळे ग्रामस्थ आणि त्याहीपलीकडे बारीपाडा गावात आलेल्या सगळ्यांनी मिळून हे केलंय, "हे आपण केलंय", असंच ते म्हणतात.

चैतराम दादांना पद्म श्री पुरस्कार मिळाला, ह्यामध्ये खरं तर भारत सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे! आणि चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे. बारीपाड्याबद्दल "मुक्काम बारीपाडा" हे प्रकाश कामत ह्यांनी लिहीलेलं पुस्तक उपलब्ध आहे. शिवाय चैतराम पवार + बारीपाडा असं इंटरनेटवर शोधता येऊ शकतं. त्यांच्या मुलाखती व बरीच माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.

(वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 29 एप्रिल 2025)


  • Log in or register to post comments
  • 2152 views


वाचनखूण लावा
| 2152 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (8)
स
सुक्या Tue, 04/29/2025 - 20:54 नवीन
छान! चैतराम दादांचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 04/29/2025 - 21:05 नवीन
नतमस्तक _/\_
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/30/2025 - 05:38 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 04/30/2025 - 07:26 नवीन
चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे.
हे असे लिहिले असल्याने , ह्या लेखनावर शुभेच्छा द्याव्यात की न द्याव्यात असा यक्ष प्रश्न पडलेला आहे. असो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/30/2025 - 13:50 नवीन
त्यांना शुभेच्छा द्या आणि आपण जमेल तशी मदत , वनवासी कल्याण आश्रम, ह्या संस्थेला करू शकता....
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Wed, 04/30/2025 - 11:20 नवीन
उत्तम माहिती... त्यांच्या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती इथेच डकवली तर बरे पडेल
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/30/2025 - 13:53 नवीन
तिथल्या कार्यवाहकांना प्रत्यक्ष भेटा... https://vanvasi.org/
  • Log in or register to post comments
म
मार्गी गुरुवार, 05/01/2025 - 11:46 नवीन
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!! :) त्यांची एक मुलाखत इथे बघता येईल: https://www.youtube.com/watch?v=mT7pMoWLUuM मुलाखतीत त्यांनी संक्षिप्त स्वरूपात त्यांचा प्रवास सांगितला आहे. शिवाय इंटरनेटवर बरेच लेख- बातम्या सुद्धा आहेतच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा