Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

च
चित्रगुप्त
Mon, 08/28/2023 - 01:10
🗣 195 प्रतिसाद
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली. -- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ? ३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ? ४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता? ५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ? ६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? ७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ? ---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50356 views

🗣 चर्चा (195)
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/28/2023 - 20:28 नवीन
अनेकांचे वेगवेगळ्या परिप्रोक्ष्यातुन आलेले प्रतिसाद पाहुन छान वाटले. मी माझ्या अल्प अभ्यासाने अन आकलनानुसार बनवलेली काही मते मांडतो : कृष्ण देव होता हे गृहीतक क्षणभर बाजुला केलं तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. ५-७ खलनायकांना मारणे अगदीच सहज सोप्पे होते अशातला भाग नाही. मुळात जरासंधाला मारयच्यावेळेस कृष्णाला पुर्ण कल्पना होती की आपण ह्याला एकट्याने संपवू शकत नाही म्हणुनच त्याने भीमार्जुनाला सोबत घेऊन त्याचा नाश करवला. बाकी नरकासुर, कंस, शिशुपाल वगैरे जसे क्लियर इव्हिल होते तसे काही हस्तिनापुरातील लोकं नव्हते. दु:शासन वगैरे ९९ भावांना कृष्ण एकेहाती मारु शकला असता पण दुर्योधन हा अवघड मामला होता, तो काही ऐरागैरा नव्हता , इव्हन भीमाला त्याने घाम फोडला होता. त्याला मारणे , न्य्याय्य पध्दतीने मारणे कृष्णाला अवघडच गेले असते. भीष्म ही तर शतप्रतिशत अजिंक्य होते , त्यांन्ना मारणे कृष्णाला जमले नसते , एकवेळ प्रयत्नांची पराकाष्ठा करुन हरवु शकला असता पण मारु शकला नसता . तसेच सेम द्रोणांच्या बाबतीत ही आहे. कर्ण यःकश्चित क्षुद्र होता त्याला कृष्णाने अगदी सहज मारले असते पण तसे अश्वथाम्याच्या बाबतीत करता येणे शक्य नव्हते. अश्वत्थामा द्रोणांचा वध होई पर्यंत जवळपास अलिप्त राहिल्यासारखाच होता उगाच कोणातरी थातुरमातूर लोकांना मार वगैरे करत होता , पण त्याच्या सारखा सनकी माणूस , द्रोणांसारखा चेव खाऊन पहिल्या दिवसापासुन युध्दात उतरला असता तर कौरवांचे पारडे बरेच जड होते . सेम बाब कृतवर्म्याच्या बाबतीतही आहे. त्याला कृष्ण मारु शकला नसता. तस्मात ह्या लोकांना न्यायाने मारणे कृष्णाला शक्यच नव्हते. ज्यांना मारता येणे शक्य होते त्यांना कृष्णाने मारलेच होते . बर्‍याच लोकांना माहीत नाही पण कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे . " बाकी ह्याबाजुचेही बरेच लोकं काही अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्च्छ नव्हतेच , द्रुपद , द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न वगैरे तर सरळ सरळ नीच लोकंच होते. घटोत्कच अर्थात भीमाचा हिडिंबेपासुन हा तर सरळ सरळ राक्षसच होता, तो मेल्यावर कृष्णाने आनंदही साजरा केला आहे. ( ते पाहुन अर्जुन चकित झाला अन म्हणाला की अरे काय , आपल्या बाजुची व्यक्ती मेली आहे, तेव्हा कृष्ण सरळ सरळ म्हणाला आहे की बरे झाले कर्णाच्या हातुन मेला नाहीतर नंतर मला ह्याला मारावे लागले असते अन भीमाचा रोष पत्करावा लागला असता. ) थोडक्यात काय तर ही लोकं ही अवघड जागेच्या दुखण्यासारखी होती. तस्मात एक जोरदार युध्द होऊन ह्यांचा नाश होणे हेच ऑप्टिमल सोल्युशन होते. मला कायम वाटतं की माणासं काय जन्माला येत असतात मरत असतात , पण मानवी मुल्ये , तत्वज्ञान, मॉरल फिलॉसॉफी हे चिरंतन असते. अन्यायाच्या समुळ निर्दालना करिता युध्द हे अनिवार्यच होते. आणि तसेही तुम्ही १८ वा अध्याय पाहिलात तर लक्षात येते की क्षत्रियांना युध्द हेच एकमेव कर्म सांगितले होते, कृषी गौरक्ष्य वाणिज्यं ही वैश्याची कर्मे होते , क्षत्रियांची नाही . (अन ब्राह्मणाची तर नाहीच नाही.) युध्दाने एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागला हे एक बरेच झाले . त्या निमित्ताने आम्हाला भगवद्गीतेसारखे अमौलिक रत्न लाभले ! मी उपनिषदांचे वरवर वाचन केले आहे , आणि ब्रह्मसुत्रेही वाचायचा प्रयत्न केला आहे, दोन्हीही टोटल बाऊन्सर आहेत , बिलिव्ह मी , भगवद्गीते इतके सहज सोप्पे अन सुलभ तत्वज्ञान कोठेच नाही ! अर्थात त्यावर श्रीमदाद्य शंकराचार्यांनी , माऊलींनी आणि आपल्या टिळकांनी इतके सुंदर लिहुन ठेवले आहे की त्यावर आपल्याला काही अजुन लिहायची गरजच नाही. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।। ________/\________
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/29/2023 - 10:48 नवीन
प्रतिसादातील तुमचे सगळे मुद्दे मननीय आहेत.
बर्‍याच लोकांना माहीत नाही पण कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे.
-- याबद्दल जास्त माहिती/संदर्भ देता येईल का ? म्हणजे हा उल्लेख कुठे आहे वगैरे ? श्रीभागवतात आहे का ? अनेक आभार.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/29/2023 - 11:22 नवीन
महाभारतातील द्रोणपर्वात आहे. जरासन्धश्चेदिराजो महात्मा; महाबलश्चैकलव्यो निषादः | एकैकशो निहताः सर्व एव; योगैस्तैस्तैस्त्वद्धितार्थं मयैव || अथापरे निहता राक्षसेन्द्रा; हिडिम्बकिर्मीरबकप्रधानाः | अलायुधः परसैन्यावमर्दी; घटोत्कचश्चोग्रकर्मा तरस्वी || तुझ्या हिताकरिता मी निरनिराळे उपाय योजून जरासंध, चेदिराज शिशुपाल, महाबलवान निषाद एकलव्य यांना मी एकेक करुन मारुन टाकले आहे. त्याच प्रमाणे हिडिंब किर्मिर, बकासुर वगैरे प्रमुख राक्षस, तसेच अलायुध, उग्रकर्मा घटोत्कच यांनाही मी मारुन टाकले आहे. ये हि धर्मस्य लोप्तारो वध्यास्ते मम पाण्डव | धर्मसंस्थापनार्थं हि प्रतिज्ञैषा ममाव्यया || ब्रह्म सत्यं दमः शौचं धर्मो ह्रीः श्रीर्धृतिः क्षमा | यत्र तत्र रमे नित्यमहं सत्येन ते शपे || जे कोणी धर्माचा लोप करणारे असतील ते सर्व मला वध्य होत, धर्मसंस्थापनेसाठीच मी ही प्रतिज्ञा केली आहे. जेथे ब्रह्म, सत्य, दम, शुचिता, धर्म, र्ही, क्षमा हे वसतात तेथेच मी सदैव रममाण होत असतो हे मी सत्यपूर्वक तुला सांगतो.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 08/29/2023 - 12:23 नवीन
आपण वर लिहिले आहे: कृष्ण स्वतःच म्हणाला आहे की " मी आधीच एकलव्याला मारुन टाकले आहे. जे सनातन धर्माला विरुध्द आहेत त्यांचा येन केन प्रकारेण नाश करणे ही माझी प्रतिज्ञाच आहे." मला खरोखरच खूप उत्सुकता आहे, की एकलव्याने कोणता अधर्म केला होता. आत्तापर्यंत एकलव्य हा केवळ वंश/ वर्ण यामुळे विद्या नाकारला गेलेला एक अन्यायग्रस्त म्हणूनच समोर आलेला आहे. असा कोणता अधर्म त्याने केला होता, की कृष्णाने त्याला मारून टाकले? सनातन धर्माच्या दृष्टीने कोणता गुन्हा एकलव्याने केला होता? कृष्णाने त्याला धर्माने मारले का?
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 08/30/2023 - 11:01 नवीन
आपल्या उत्तराची वाट पहात आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 08/30/2023 - 15:06 नवीन
कोणता अधर्म त्याने केला होता, की कृष्णाने त्याला मारून टाकले? सनातन धर्माच्या दृष्टीने कोणता गुन्हा एकलव्याने केला होता? कृष्णाने त्याला धर्माने मारले का?
मी महाभारतात जे वाचले त्यात केवळ प्रचेतस ह्यांन्नी उधृत केलेला श्लोकच सापडला , अर्थात मी स्वतः एकलव्याला मारले असे कृष्ण स्वतःहुन आनंदाने कबुली देत आहे असे बस्स. बाकी त्याने धर्मविरुध्द असे काय केले होते हे किमान त्या अध्यायात तरी नमुद नाहीये. आपण फक्त आपले अंदाज बांधु शकतो : धनुर्विद्येचा शस्त्रास्त्र विद्येचा अधिकार केवळ क्षत्रियांन्ना होता. हे त्याचे सोप्पे उत्तर आहे. तसे पाहिले तर ब्राह्मणांनाही तो अधिकार नव्हताच , पण परशुरामाच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्यांन्ना तो अधिकार मिळाला, अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात. अगदी परशुरामापासुन ते माधवराव पेशव्यांपर्यंत! मग सनातन धर्मबाह्य वर्तन केले म्हणुन ब्राह्मणांना कृष्णाने शासन का केले नसावे , तर ह्याचे उत्तर म्हणजे ब्राह्मण अवध्य होते, त्यांना मारता येणे शक्य नव्हते अन दुसरे म्हणजे परशुराम , द्रोणाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा वगैरे लोकं लोकोत्तर होती त्यांना मारणे तसेही फार मुश्कील बाब होती. इत्यलम.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 08/30/2023 - 15:30 नवीन
महाभारतात एकलव्याविषयी इतकाच उल्लेख आहे, मात्र एकलव्याचा वृत्तांत हरिवंशात विस्ताराने येतो. पौंड्रक वासुदेवाचा साथीदार म्हणजे निषादराज एकलव्य. हा पौंड्रक वासुदेव श्रीकृष्णाचा हाडवैरी होता, पौंड्रकाबरोवर कृष्ण बलरामाशी झालेल्या युद्धात एकलव्याची निषादसेना पौंड्रकासोबत लढली. त्या युद्धाचे विस्तारपूर्वक वर्णन हरिवंशात वाचायला मिळते. भागवतातही एकलव्य आणि कृष्णाच्या युद्धाचा उल्लेख असावा मात्र मी भागवत पुराण वाचलेले नसल्याने ह्याविषयी निश्चयाने सांगू शकत नाही
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 08/30/2023 - 16:19 नवीन
>>>अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात अपवाद बहुधा बाजीराव पेशवा (पहिला) आणि स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 08/31/2023 - 17:30 नवीन
मार्कस ओरिलियस, आपण उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद! आपली वेगवेगळ्या प्रतिसादातील वाक्ये खालीलप्रमाणे आहेत: >> कर्ण यःकश्चित क्षुद्र होता त्याला कृष्णाने अगदी सहज मारले असते पण तसे अश्वथाम्याच्या बाबतीत करता येणे शक्य नव्हते.  तुम्ही १८ वा अध्याय पाहिलात तर लक्षात येते की क्षत्रियांना युध्द हेच एकमेव कर्म सांगितले होते, कृषी गौरक्ष्य वाणिज्यं ही वैश्याची कर्मे होते , क्षत्रियांची नाही . (अन ब्राह्मणाची तर नाहीच नाही.) >> बाकी त्याने (एकलव्याने) धर्मविरुध्द असे काय केले होते हे किमान त्या अध्यायात तरी नमुद नाहीये. आपण फक्त आपले अंदाज बांधु शकतो :
धनुर्विद्येचा शस्त्रास्त्र विद्येचा अधिकार केवळ क्षत्रियांन्ना होता. हे त्याचे सोप्पे उत्तर आहे. तसे पाहिले तर ब्राह्मणांनाही तो अधिकार नव्हताच , पण परशुरामाच्या लोकोत्तर पराक्रमामुळे त्यांन्ना तो अधिकार मिळाला, अर्थात तरीही जे जे ब्राह्मण शस्त्रे हाती घेऊन लढलेत ते ते शेवट पर्यंत "देवाधर्माचे काम सोडुन मी हे काय करतोय ?" ह्या मानसिक टोचणीने व्यथित झालेले सर्वत्र दिसुन येतात. अगदी परशुरामापासुन ते माधवराव पेशव्यांपर्यंत! >> मग सनातन धर्मबाह्य वर्तन केले म्हणुन ब्राह्मणांना कृष्णाने शासन का केले नसावे , तर ह्याचे उत्तर म्हणजे ब्राह्मण अवध्य होते, त्यांना मारता येणे शक्य नव्हते अन दुसरे म्हणजे परशुराम , द्रोणाचार्य , अश्वत्थामा, कृतवर्मा वगैरे लोकं लोकोत्तर होती त्यांना मारणे तसेही फार मुश्कील बाब होती. (कर्णाच्या बाबत क्षुद्र लिहिले आहे, पण शूद्र म्हणायचे होते असे मानतो.) कर्णाला शूद्र असल्याने य़कश्चित म्हटले आहे. पण ब्राम्हणांना युध्दाचा अधिकार नसला तरी, त्यांच्या अलौकिक पराक्रमामुळे तो त्यांना मिळणे काहीच गैर नाही. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा घेणे हे सनातन धर्माच्या दृष्टीने योग्य आणि कृष्णाने त्याला मारले, तेही योग्यच. पण ब्राम्हणांना ते वर्णधर्माप्रमाण वागले नाहीत, सनातन धर्माचे पालन केले नाही म्हणून शासन केले नाही, कारण ते अवध्य होते. आपली वरील वाक्ये पाहता, त्याकाळचा सनातन धर्म व कृष्णाचे वर्तन (जो स्वत:च वर्णधर्माप्रमाणे वागला की नाही ते अलाहिदा) आपल्याला न्याय्य वाटत असावे. आपण ‘चातुर्वण्य व्यवस्था’ चांगली होती असे मानत असाल असे वाटते. विनोबांच्या गीताईतही चातुर्वर्ण्य व्यवस्था मला गोड वाटते असे वाक्य आहे. आश्चर्य याचे वाटते, की आजही असे लोक आहेत, ज्यांना हे जे घडलं, त्यात काही अन्याय दिसत नाही. भारतीय राज्यघटनेचे राज्य असलेल्या काळात जन्माला आलो, आणि त्यातच मरणार याचा केवढा तरी दिलासा वाटतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/31/2023 - 19:33 नवीन
मला वाटलंच होतं तुम्ही असा काहीतरी अर्थाचा अनर्थ करणार ते ! आणि हो मला क्षुद्र असेच म्हणायचे होते , पळपुटा विराटापर्वात एकट्या अर्जुनाकडून समस्त कौरवांनी मार खाला त्यात हा चक्क पाठीला पाय लाऊन भर युध्दातुन पळुन गेला होता =)))) बाकी आम्ही काहीही बोलले तरी कोणीही उठुन अर्थाचा अनर्थ करणार ! त्यामुळे आता गप्प बसतो. एकुणच संपुर्ण संवाद अन बोलणेच थांबवले पाहिजे , आम्ही आमच्यापुरते लिहावे हेच उत्तम ! #स्वान्तःसुखाय ! =))))
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 09/01/2023 - 11:02 नवीन
जर माझ्याकडून अर्थाचा अनर्थ झाला असेल तर, तर त्रागा करण्यापेक्षा नीट अर्थ सांगा की. मी केवळ तुंम्ही जे उल्लेख ज्या प्रकारे केले त्यावरून कोणता दृष्टिकोन समोर येतो, ते मांडले आहे. आणि केवळ तुमचाच नव्हे, तर या चर्चेत अनेकांचा तसा दृष्टिकोन समोर आला आहे. न पेक्षा होय, वरील गोष्टी अन्यायकारकच होत्या, पण त्यावेळच्या मूल्यव्यवस्थेनुसार तसे घडत गेले, ती मूल्ये व व्यवस्था (चातुर्वण्य) आज न्याय्य मानता येणार नाही, असे म्हणणेही शक्य आहे. प्रांजळपणे कबूल करायला कसली अडचण आहे? पण ते केवळ समदृष्टी असलेल्या ऑबजेक्टीव्ह माणसाला! कर्णाच्या बाबत तो शूद्र नसून क्षुद्र असेल तर, झाडून सगळ्यांनी त्याला द्रौपदी स्वयंवरातून ‘शुद्र’ असल्यामुळे बाहेर का काढले बरे? द्रौपदीनेही त्याच्या कथित वर्णामुळेच त्याचा सहभाग नाकारला होता ना? क्षुद्र असता तर तो हरला असताच की. तिथेच त्याला दुर्योधनाने राजा बनवले व त्यामुळे पुढे त्याचा पक्ष ठरून गेला. शिवाय युध्दाच्या आधल्या रात्री म्हणे कृष्ण त्याला भेटायला गेला होता व त्याने युध्द करू नये असा त्याचा प्रयत्न होता. जर तो पराक्रमाच्या बाबत क्षुद्र होता, तर हे कशासाठी?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/01/2023 - 20:33 नवीन
२
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/01/2023 - 20:49 नवीन
(प्रतिसाद पूर्ण लिहायच्या आधीच प्रकाशित करा वर क्लिक केले गेले.) संपूर्ण प्रतिसाद पुढील प्रमाणे - समस्त महाभारत च काय तर यच्चयावत सनातन वैदिक हिंदु धर्म आणि त्यातील साहित्य हे बामणांचे कारस्थान, कसब आहे, असे महात्मा फुले ह्यांनी सांगून ठेवले आहे. त्यापेक्षा जास्त अजून काही स्पष्टीकरण देण्याची माझी बौद्धिक कुवत नाही. समस्त गट क्रमांक २ मधील जनांनी असा भेदभावाचा धिक्कार करत हिंदु धर्माचा त्याग करावा, बामणी मनुवादी साहित्य भटांच्या मनोरंजन करिता सोडून द्यावे आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौध्द धर्माचा अंगिकार करावा हेच उत्तम ! त्याच त्या गोष्टींवर वाढीव स्पष्टीकरण मागून आणि देऊन काय साध्य होणार ? नकोच ते. इत्यलम तळटीप : ह्या प्रतिसादाचा आणि त्यातील भावार्थाचा शॉर्टhand "२" असा नियोजित करण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 09/01/2023 - 22:58 नवीन
दा कशाला १ १ प्रतीसाद देता , जरा बघत जावा
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Sun, 09/03/2023 - 23:42 नवीन
ऑरेलियस, मूळ नुद्दा सोडून महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्याबद्दलची मळमळ इथे काढण्याचे प्रयोजन कळले नाही. त्यांनी ग्रंथ वाचून स्वांतसुखाय विचारांचा कापूस पिंजण्यापेक्षा फार मोठी कामं केली आहेत. तुंम्हाला जे महान वाटते, त्यानुसार लोकांना दोन गटात विभाजित करणे आणि दुसर्यांना कोणत्यातरी गटात टाकणे हे मुद्दे संपल्याचे लक्षण आहे. चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती हा साधा मुद्दा मान्य करण्याचे औदार्य असायला हरकात नसावी. आता जे तथाकथित उच्च समजल्या जाणार्या वर्णात जन्मले त्यांनी मुळीच अपराधी वाटून घ्यायची गरज नाही कारण कोणी कुठे जन्माला यावे यात त्या माणसाचे काहीही कर्तृत्व नाही, हे पुरेसे स्वयंस्पष्ट आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Mon, 09/04/2023 - 18:32 नवीन
'चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती' हे चूक पण चातुर्वर्ण्याचा वापर करुन जी समाजव्यवस्था निर्माण झाली त्यात कालांतराने अन्याय आणि शोषण हे दोष निर्माण झाले असं म्हणायला हवं. 'कारण कोणी कुठे जन्माला यावे यात त्या माणसाचे काहीही कर्तृत्व नाही' - कर्म सिद्धान्तानुसार आधीच्या जन्मांतील कर्मफलांच्या संचितानुसार जन्म कोठे होणार हे ठरते.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 09/05/2023 - 12:33 नवीन
>>’ चातुर्वर्ण्य ही अत्यंत अन्यायकारक व्यवस्था होती' हे चूक पण चातुर्वर्ण्याचा वापर करुन जी समाजव्यवस्था निर्माण झाली त्यात कालांतराने अन्याय आणि शोषण हे दोष निर्माण झाले असं म्हणायला हवं. - चातुर्वर्ण्य हीच मुळी समाजव्यवस्था होती. काही समाजगट कायम प्रस्थापित असतील अन काही शोषित असतील अशीच ती रचना होती. असे म्हणायला काय अडचण आहे? >> कर्म सिद्धान्तानुसार आधीच्या जन्मांतील कर्मफलांच्या संचितानुसार जन्म कोठे होणार हे ठरते. - फक्त आजवर ते कोणालाही पडताळता आलेले नाही, त्यामुळे यात सत्य किती ते सांगता येत नाही. या unverifiable समजुतीवरच सगळा वेदांताचा डोलारा उभा आहे. एकदा का आपल्या शोचनीय अवस्थेला पूर्वजन्माचे कर्म कारणीभूत आहे असे शोषिताला पटवता आले, की तो या जगात आत्ता जबाबदार असणार्या शोषणकर्त्यांना प्रश्न विचारायचे बंद करतो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 09/05/2023 - 15:17 नवीन
सहमत !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/05/2023 - 06:52 नवीन
बरं केला तुमचा मुद्दा मान्य. ओके ? झालं समाधान ? मला खरेच तुम्हाला काहीही पटवून द्यायची गरज नाही. अन् तुम्हालाही हे जे तुमचे मत ठरले आहे त्यावर तुम्हाला कोणाही कडून validation घ्यायची गरज नाही. तरीही तुम्हाला validation होईल म्हणून फुले, आंबेडकर ह्यांची उदाहरणे दीले. बौध्द धर्मात धर्मांतर करणे हा अत्यंत सहज सोप्पा उपाय आहे ह्या चातुर्वर्ण्य संस्थेला झिडकरण्याचा. बाकी तुम्ही म्हणालात आवर्जून प्रतिसादाची वाट पाहत आहे म्हणून मी बोललो , नाहीतर मला तुम्हाला काहीही पटवून देण्याची इच्छा नाही गरज तर नाहीच नाही. मला आता संवादी स्वर कोणते अन् विसंवादी कोणते हे कळते. कोणाशी सिरीयसली बोलयाचे अन् कोणाशी थट्टा मस्करी करायची ह्याचे व्यवस्थित १ आणि २ असे वर्गीकरण केलेलं आहे . स्वंतसुखाय लिहितो, मजा येत असेल तिथं प्रतिसादात काड्या सारत बसतो. अन् कंटाळा आला की २ म्हणून रिकामा होतो. कोणाला काहीही पटवून द्यायचे सव्यापसव्य मी कशाला करत बसू . मला आता कापूस पिंजन्यात च मजा येत असेल, तर त्याला तुम्ही तरी काय करणार ! इत्यलम २
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 09/05/2023 - 10:19 नवीन
मला खरेच तुम्हाला काहीही पटवून द्यायची गरज नाही. अन् तुम्हालाही हे जे तुमचे मत ठरले आहे त्यावर तुम्हाला कोणाही कडून validation घ्यायची गरज नाही.
-- हे फक्त इथल्या लेखनाबद्दलच नव्हे, तर जीवतल्या बहुतांश बाबतीत खरे आहे. उदाहरणार्थ, फेसबुकावर काहीतरी फोटो वगैरे टाकायचे, मग त्याच्यावर किती लाईक्स आले ते तपासत बसायचे, कमेंट केलेल्यांना धन्यवाद द्यायचे, घेणं नस्ती देणं नस्ती अश्या कुठल्याकुठल्या तथाकथित फ्रेंडांना ह्याप्पी बड्डे द्यायचे, न दिल्यास त्यांची नाराजी, आपल्याला कोण कोण लाईक मारतो हे लक्षात ठेवत बसून त्यांच्या हागर्‍यापादल्याला 'अहो रूपम अहो ध्वनि' ची दाद द्यायची... हा सगळा फालतूपणा काही काळ केल्यावर वेळीच अक्कल येऊन ती वाटच मी बंद करून टाकली. आता मी जी नवीन चित्रं रंगवतो, त्यांचे फोटो फक्त बालपणीचे मोजके मित्र- ज्यांना खरोखरीच कौतुक आणि आनंद वाटतो - त्यांनाच कायप्पावर पाठवतो. गंमत म्हणजे ते मित्र फेसबुक इन्स्टा वगैरेंच्या वाटेवर मुळातच कधी गेलेले नाहीत.
स्वंतसुखाय लिहितो, मजा येत असेल तिथं प्रतिसादात काड्या सारत बसतो. अन् कंटाळा आला की २ म्हणून रिकामा होतो. कोणाला काहीही पटवून द्यायचे सव्यापसव्य मी कशाला करत बसू .
-- हे उत्तम. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 09/05/2023 - 13:04 नवीन
>> नाहीतर मला तुम्हाला काहीही पटवून देण्याची इच्छा नाही गरज तर नाहीच नाही. असं म्हणता? पण त्याआधी… >> बिलिव्ह मी , भगवद्गीते इतके सहज सोप्पे अन सुलभ तत्वज्ञान कोठेच नाही !  असे म्हणून तुंम्ही इतरांना विश्वास ठेवायला सांगितले. शिवाय त्याच प्रतिसादात एकलव्याला सनातन धर्माला विरोध करणारा म्हणून मारल्याचा उल्लेख होता. मी गीता वाचली आहे (महाभारत नाही) पण या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. म्हणून मी सत्य जाणून घेण्यासाठी पहिला प्रतिसाद दिला. - सगळं केवळ बौध्दिक मनोरंजन असेल, आणि खर्या धर्म, सत्य याविषयी कळकळ नसेल, तर प्रश्न टाळून आपआपल्या समजूती कवटाळून आपण जगू शकतोच.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/05/2023 - 13:25 नवीन
तो भगवदगीता संदर्भातील प्रतिसाद १ समजून लिहिला होता , मला २ ला अजिबात तसे काही सांगायचे नाही... तुम्हाला तसे वाटल्यास दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो . अगदी स्पष्टपणे. ह्याबद्दल तुम्ही मला माफीविर म्हणालात तरी माझी हरकत नाही. आणि परत एकदा माझे २ स्पष्ट मत मांडतो की - गीताचं काय तर समस्त सनातन वैदिक हिंदु धर्म हा बामनांचे कसब आहे, बहुजनांना गुलामगिरी मध्ये गुंतवून ठेवण्याचे कारस्थान आहे. त्यामुळे समस्त बहुजनांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समानतेची शिकवण देणाऱ्या बौध्द धर्माचा स्वीकार करावा हे उत्तम. हे सगळे बामणी साहित्य भटूर्ड्यांच्या मनोरंजन साठी सोडून द्यावे. येस, हे सारे भटूर्ड्यांचे बौध्दिक मनोरंजन च आहे. त्यात धूर्त देशस्थ आळंदीकर ज्ञानोबा आला, चलाख कावेबाज रामदास आला, ढेरपोट्या गणू आला, लंपट व्यभिचारी कृष्णाजी आला.... सगळेच आले. तुम्ही कशाला ह्यात वेळ वाया घालवता ! ज्याला खऱ्या सत्यधर्माचा शोध घ्यायचा आहे त्याने महात्मा फुलेंचे समग्र साहित्य वाचावे हे उत्तम. १ वाल्यांना १ मध्ये खेळू द्या . २ वाल्यांना २ मध्ये. हुश्श . आता बास . कंटाळा आला तेच ते लिहून. आता इथे प्रतिसाद बंद. ~
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 09/05/2023 - 16:04 नवीन
गु्रुदेव, आपण चातुर्वर्ण्याऐवजी आता द्विवर्ण पध्दती आणली आहे आणि मला माझ्या योग्यतेनुसाार गट क्र. २ मध्ये टाकले आहे. तसेच दुसर्या गटातील लोकांनी कोणाच्या शिकवणुकीचा अवलंब करावा, कोणी दाखवलेल्या मार्गावर चालावे, कोणाचे ग्रंथ वाचावेत, तसेच कोणत्या धर्माचा स्विकार करावा इ. बहुमूल्य उपदेश केला आहे. त्याचबरोबर दुसर्या वर्णातील लोकांनी कोणत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये याचेही मार्गदर्शन केले आहे. याबद्दल आपले मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. लोभ असावा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 09/02/2023 - 06:10 नवीन
कर्ण (जन्माने नव्हे तर अधिरथाच्या घरात वाढला असल्याने) शूद्र नव्हता तर सूत होता. ब्राह्मण स्त्रीपासून क्षत्रियास झालेली संतती म्हणजे सूत. ह्यांचे काम राजांची स्तुती करणे, पुराण कथा सांगणे आणि सारथ्यकर्म करणे. महाभारताची कथा स्वतः लौमहर्षणि सूताने अर्थाने सौतीने सांगितली आहे. महाभारतात कर्णाच्या अवगुणांसोबत कर्णाच्या गुणांचेही वर्णन केले आहे. कर्ण पळपुटा होता हे खरेच. चित्ररथ गंधर्वाने घोषयात्रेच्या प्रसंगी कर्णाचा पराभव केला होता आणि नंतर त्याला पांडवांनी सोडवले, उत्तर गोग्रहण प्रसंगी एकट्या अर्जुनाने सर्व कौरवांना पराभूत करुन त्यांची वस्त्रे उत्तराला फेडण्यास सांगितले. खुद्द भीमाकडून कर्णाचा सलग चार वेळा पराभव झाला होता. कर्णवध करताना कृष्णाने कर्णाचे अपराध वर्णिले आहेत जे मूळातून वाचण्यासारखे आहेत. मात्र कर्ण उदार होता, ज्ञानी होता, वेदांचा घोष करणारा होता. मित्रासाठी जीवन देणारा होता, नव्हे त्याने ते दिलेही. त्या काळातल्या वर्णपद्धतीला तत्कालीन काळाच्या परिप्रे़क्ष्यातूनच पाहिले पाहिजे, आजच्या काळात हे संदर्भ जरी कालबाह्य झालेले असले तरी तेव्हा ते प्रचलित होतेच यात काहीच शंका नाही. तत्कालीन वर्णपद्धती आणि संकर जाती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी अनुशासनपर्वातील ४७ (रिक्थविभागः) आणि ४८ (वर्णसंकरः)हे अध्याय वाचून काढावेत. येथे उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 09/01/2023 - 23:16 नवीन
ब्राह्मणांमधे ब्रह्मक्षत्रीय होते, क्षत्रीयांमधे सूत होते. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार चालत. प्रसंगी ते युद्धात देखील भाग घेत. शूद्रांमधे देखील categories होत्या. अगदी रावणापासुन उदाहरणं सापडतील. महाभारतात कीचक वगैरे मंडळी सूत होती. एकलव्याचे वडील सेनापती होते. दुर्योधनाकडुन लढणारा अलंबुष राक्षसराज होता. मद्रराजाला आपण एका सूताचे सारथी झाल्याचं शल्य, तर कर्णाला त्याच मद्रदेशातल्या कुळांवर हीन आक्षेप होते. यादवांना तर सगळेच हीन समजायचे, आणि त्यांच्याशीच सोयरीक पण करायचे वर्णपटावरच्या या मंडळींचे अधिकार, कर्तव्य, सामाजीक स्थान, ते govern करणार्‍या संहीता, त्यावर काळानुरुप घेण्यात येणारे आक्षेप आणि त्यांच्या तत्कालीन court cases.. हा फार complex मामला होता. त्यापैकी कोण कोणाला कुठल्या कारणाने हीन समजायचा, आणि ते किती न्याय्य होतं, हे आज कळणं कठीण आहे. यंत्रयुगापूर्वी हजारो वर्षे मनुष्य समाज श्रमाधारीत व्यवस्थेत जगत आला आहे. कुठल्या न कुठल्या प्रकारे division of labor ची एक व्यवस्था असायचीच. यंत्रशक्तीने तिला पर्याय निर्माण झाला आणि श्रमजीवीकांना मोकळा श्वास घेता आला. त्यांचं बुद्धीजीवी वर्गात transition शक्य झालं. पण तत्पूर्वी चातुर्वण्याप्रमाणे मानवी व्यवहारांना represent करणारे blocks असलेली व्यवस्था, किंवा मालक आणि गुलाम असे blocks असलेली व्यवस्था अशीच comparison होती. म्हणुन गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींना चातुर्वर्ण्य व्यवस्था बरी वाटायची. आज जसं आपण म्हणतो कि लोकशाही आदर्श व्यवस्था नाहि, पण उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम आहे.. तसंच काहिसं...
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Sat, 09/02/2023 - 00:00 नवीन
चातुर्वर्णाचा उद्देश फक्त सांगा, बघू जमतंय का.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 09/02/2023 - 04:53 नवीन
श्री अर्धवटराव यांचे प्रतिसाद बर्‍यापैकी व्यवहाराला धरुन आहेत. कोठेही जन्माधारीत वर्णव्यवस्थेचा / जातीव्यवस्थेचे समर्थन नाही. ओव्याचा आणि श्लोकांचा आधार घेऊन, आपण कसे निरपराध असुन, त्यात कोणतेच कसब नाही असे रडगाणे गाणार्‍या लोकांबद्दल काय बोलायचे!!!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 09/02/2023 - 07:07 नवीन
अरा छान प्रतिसाद. लकी इट इज कलियुग. म्हणुन गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींना चातुर्वर्ण्य व्यवस्था बरी वाटायची. हे जरा विस्ताराने सांगाल काय?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 09/03/2023 - 04:37 नवीन
गांधीजी, विनोबा वगैरे मंडळींच्या मनाला अध्यात्माची बैठक होती, भगवद्गीतेचा अभ्यास होता. प्राप्त कर्तव्य निष्काम वृत्तीने करुन आत्मोन्नती साधावी हि तर गीतेची एक प्रमुख शिकवण. गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गुण-कर्माधारीत चार वर्णांचे विभाग रचले, तर त्यावर आधारीत system समाजाच्या कल्याणाची आहे, असा विचार त्यांनी केला असल्यास ते स्वाभावीक आहे. आता या system मध्ये जे loop holes निर्माण झाले, व त्यातुन जी बजबजपूरी माजली, त्याकडे या मंडळींनी डोळेझाक मात्र केली नाहि. आपापल्या परिने त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न केला. पण तत्वतः त्यांना हि system पटत असेल तर त्यात नवल नाहि.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 09/02/2023 - 08:11 नवीन
नाही पटलं. चातुर्वर्ण्य ही कोणत्याही काळात समाज विभागण्याची बेस्ट अवेलेबल पद्धत होती हे बिलकुल नाही पटलं.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 09/03/2023 - 04:52 नवीन
श्री कॉमी, तुमचा प्रतिसाद समजुन घेण्याची इच्छा आहे. -- समाजाचे विभागीकरण जरी अपेक्षित नसले तरी होतेच. त्यामुळे कर्माधारीत, जेथे रोटी-बेटी व्यवहार चालतो अशी वर्णव्यवस्था/जातीव्यवस्था एक निरुपद्रवी अंग म्हणुन स्वीकारायला काय हरकत आहे???
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 09/03/2023 - 06:43 नवीन
व्यवसाय बदलणे अवघड होते. का करावे ? केंद्रीकरण - ज्ञानाचे केंद्रीकरण अमुक लोकांकडे, व्यवसायाचे तमुक लोकांकडे, शक्तीचे ढमुक लोकांकडे. असे का ? मुक्त का ठेऊ नये ? तुम्ही ज्याला निरुपद्रवी म्हणता ते वर दिल्या प्रमाणे अत्यंत उपद्रवी आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Mon, 09/04/2023 - 18:39 नवीन
आधुनिक जगात व्यवसाय मुक्त झालेत पण बर्याचदा कल चाचणी घेतली जाते आणि त्यावरुन जसा कल असेल त्यानुसार शिक्षण-व्यवसाय करावा असेही आहेच.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 09/03/2023 - 05:08 नवीन
काळ कुठलाही असो, समाजात उतरंड हि राहाणारच. त्यातल्या प्रत्येक पायरीला खालच्या पायर्‍यांबाबत आपल्या कर्तव्याची जाणीव आहे का, त्यांच्या कल्याणाची तत्परता आहे का, उतरंडीमधे चढ-उतार न्याय्य पद्धतीने होतात का, हे सर्व नियमन करणारी एखादी नि:पक्ष यंत्रणा आहे का, या सर्व बाबींवर त्या व्यवस्थेचं स्वाथ्य अवलंबुन असतं. चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः मनुष्य स्वभावाला धरुन दिसत असली, तरी त्यातली गुण-कर्माचा आधार हि तात्वीक बाब व्यवहारात मात्र जन्माच्या आधारावर घसरली. आणि ति बंदीस्त झाली. त्याची सुरुवात कधी झाली असेल कल्पना नाहि. पण डोळसपणे त्यात सुधारणा झाली नाहि हे खरं. त्या व्यवस्थेची शुद्धी करण्याचे प्रयत्न नक्कीच झाले असणार. या सगळ्या गुणावगुणांना सांभाळत हि व्यवस्था राबत आलि. वैदिकेतर जीवन पद्धतीत हे सगळे गुणावगुण कसे सांभाळले गेले याचा तौलनीक अभ्यास असेल तर हि पद्धत बेस्ट अवेलेबल होती किंवा कसे हे बघता येईल. जैन, बुद्ध, चार्वाक दर्शन वगैरे जीवन पद्धतीतले गुणविषेश हजाराने दाखवता येईल. पण व्यवहारात त्यात देखील चातुर्वण्य व्यवस्थेप्रमाणे दोष निर्माण झालेच नाहित, किंवा त्यांचं नियमन खरच नि:पक्ष होतं याला काय आधार? आज जसं चीन मधला साम्यवाद, दुबई मधली राजेशाही हि फार सुखकारक वगैरे वाटते. लोकशाही त्यांच्यापेक्षा दुय्यम आहे असंही दावा करतात काहि जण. पण त्या व्यवस्थांमधे दोष निर्माण व्हायचा scope नाहि, किंवा झाले तरी त्यावर नि:पक्ष उतारा त्या व्यवस्थांगर्तच आहे याची हमी काय? इथे लोकशाहीला चतुर्वण व्यवस्थेशी तुलना करण्याचा हेतु नाहि. आपण व्यवस्था compare करायला काय criteria वापरतो हाच प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 09/03/2023 - 06:27 नवीन
पूर्णतः कर्माच्या आधारावर असलेली वर्ण व्यवस्था सुद्धा मला मूल्यवर्धल वाटत नाही. इतके रिजिड वर्गीकरण करून वेगवेगळ्या प्रकारच्या काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळे ठेवण्याचे काय प्रयोजन आहे, किंवा कोणत्याही काळी काय प्रयोजन होते ? एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याची मोबिलीटी नाकारण्याचे काय प्रयोजन आहे किंवा कोणत्याही काळात काय प्रयोजन होते ? कोणत्याही काळी उतरंड होती आणि असते हे ठीकच. पण ती उतरंड काही सर्व समाज कल्याणासाठी बसवलेली असे नव्हे आणि त्या उतरंडीला धर्माने अधिष्ठान द्यावे हे ही ठीक नव्हे. युरोपात सामंतशाही होती ती त्या काळाची बेस्ट अवेलेबल पद्धत होती असे कोणीही म्हणणार नाही. कारण सामंतशाही पूर्णतः बळी तो कान पिळी ह्या तत्वाने अस्तित्वात आली होती. त्यात समग्र समाजाच्या भल्याचा कोणताही विषय नव्हता.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 09/03/2023 - 14:55 नवीन
धर्माने मनुष्य स्वभावाचं वर्गीकरण सांगीतलं. व्यवसायांचं वर्गीकरण इव्हॉल्व्ह झालं. एका पिढीकडुन दुसर्‍या पिढीकडे स्कील सेट शिकवणं सोपं असल्यामुळे असेल, किंवा एकदा गावगाडा वसला कि तिथेच पिढ्यानपिढ्या रहायची मानसीकता असेल... कारणं अनेक असतील, पण स्नो बॉल इफेक्ट प्रमाणे हे वर्गीकरण रिजीड होत गेलं असावं. एकाच वर्णात व्यवसाय बदल करणं त्यातल्यात्यात सोपं असेल. पण धर्म व्यवस्थेत एकदम वर्ण ट्रान्झीशन अशक्य नसलं तरी फक्त कठीण मात्र होतं. 'सुपूष्पं दु:कुलातपि' वगैरे सोयी वापरुन प्रथम वर्णसंकर, आणि पुढे या संकरातुन निपजलेल्या पिढ्यांची एका वर्णात सोय लावणे अशी ति प्रोसेस. समजा महाभारत युद्धात बाकी सर्व राजपरिवार नष्ट झाले असते आणि एक कर्णाचंच कुटुंब उरलं असतं तर पुढे मागे ते फॉर्मल क्षत्रीय झाले असते... कर्णाचं कुंतीपूत्र असणं लपवुन सुद्धा. व्यवसाय मोबीलीटी, वा वर्ण मोबिलीटी का नाकारली गेली असेल याचं जनरल उत्तर म्हणजे हितसंबंधांची जपणुक. पिढीजात अधिकार मान्य झाले तर त्यातल्या हितसंबंधांची साखळी मोडणं आज देखील फार कठीण आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 09/03/2023 - 16:58 नवीन
धर्माने केवळ वर्गीकरण सांगितले हे कितपत खरे आहे ? जग कसे आहे हे सांगणे वेगळे, आणि जग कसे असावे हे सांगणे वेगळे. (Objective आणि normative) धर्माने वर्णव्यवस्था हा नॉर्म म्हणून सांगितला आहे असे माझे अत्यल्पवाचनातून बनलेले मत आहे. (महाभारतात, उदा, चांगले राज्य म्हणजे सगळे लोक आपापल्या वर्णाचे काम करत आहेत असे वर्णन असते. म्हणजे, हे केवळ सामाजिक उतरंडी चे तटस्थ निरीक्षण वाटत नाही. तर ही उतरंड असावी ती तशीच ठेवावी असे प्रयत्न दिसतात.)
एकाच वर्णात व्यवसाय बदल करणं त्यातल्यात्यात सोपं असेल. पण धर्म व्यवस्थेत एकदम वर्ण ट्रान्झीशन अशक्य नसलं तरी फक्त कठीण मात्र होतं. 'सुपूष्पं दु:कुलातपि' वगैरे सोयी वापरुन प्रथम वर्णसंकर, आणि पुढे या संकरातुन निपजलेल्या पिढ्यांची एका वर्णात सोय लावणे अशी ति प्रोसेस.
पण इथे तर ही जन्माधारित वर्णव्यवस्था झाली. हे माणसाला पूर्णपणे त्याच्या वंशाचा वाहक म्हणून बघणे नाही का ? त्याच्या पुढच्या पिढ्या एका वर्णातून दुसऱ्या वर्णात काही टेक्निकल मुद्दा काढून जातील, पण खुद्द त्या माणसाचे काय ?
व्यवसाय मोबीलीटी, वा वर्ण मोबिलीटी का नाकारली गेली असेल याचं जनरल उत्तर म्हणजे हितसंबंधांची जपणुक. पिढीजात अधिकार मान्य झाले तर त्यातल्या हितसंबंधांची साखळी मोडणं आज देखील फार कठीण आहे.
हितसंबंधांची जपणूक नक्कीच. म्हणूनच, मला वर्णव्यवस्था जनरल समाजाच्या हितासाठी बेस्ट उपलब्ध पर्याय होता हे मान्य नाही. पुढे, तुम्ही म्हणता की आजही ही हितसंबंधांची साखळी मोडणे कठीण आहे - शंभर टक्के खरे आहे. तुम्ही नोंदवले आहे ते तुम्ही निरीक्षण म्हणून मांडले आहे. वर्णव्यवस्था ही हितसंबंधांची साखळी एक नॉर्म म्हणून, एक जपण्याचे सामाजिक अंग म्हणून देते. इथे प्रॉब्लेम आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 09/03/2023 - 21:09 नवीन
धर्माची तत्व आणि तत्वानुसार राबवलेली व्यवस्था म्हटलं तर वेगवेगळ्या म्हटलं तर एकच. धर्माने वर्ण वर्गवारी एक नॉर्म म्हणून सांगितली. त्याला गुण-कर्माचा आधार सांगितला. पण हे गुण कर्म जोखणारी एक नि:पक्स फॉर्मल व्यवस्था का घडली नाही याचं उत्तर नाही. कदाचित त्याकाळी जीवन फारच डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम ने ऑपरेट होत असावे म्हणून असेल. जसं, आज सर्टिफिकेत देणारी विद्यापीठं आहेत. ते जन्माचा आधार मानत नाहीत. परीक्षा पास, तर सर्टिफिकेट हातात. वर्ण ठरवायला अशी व्यवस्था का निर्माण झाली नसेल ? कल्पना नाही. गुण ठरवायला 'कोणाचं रक्त' हा एक आधार होता. कर्म ठरवायला पण मायबापाकडून कुठली विद्या शिकली याचा आधार होता. वरचे तीन वर्ण जास्त अधिकार बाळगून होते पण ते संख्येने कमी असणार. ते तर आपले अधिकार परत परत सिद्ध करायला प्रत्येक पिढीला परीक्षा द्यायला लावणार नाही. चौथ्या वर्णाने तशी डिमांड केली तर त्याला वरच्या तिघांशी एकत्रित लढा द्यावा लागेल. शिवाय त्याची गरज वाटायला हवी. जन्माधारित व्यवस्था का स्थिरावली याची अनेक मार्गाने उपपत्ती देता येईल. शिवाय मुख्य मुद्दा असा की या व्यवस्थेला कुठला पर्याय निर्माण झाला होता, जेणेकरून ती दुसरी व्यवस्था वर्ण व्यवस्थेपेक्षा उजवी होती ?
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Mon, 09/04/2023 - 18:40 नवीन
छान प्रतिसाद! आवडला...
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 09/05/2023 - 15:27 नवीन
धर्माधिष्ठित वर्ण अस्तित्वात असलेल्या समाजरचनेतून वगळले तरी त्यापेक्षा चांगली सिस्टीम बनवू आपण. वरच्या लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी बनवलेली ही पद्धत आहे. तीस सामंतशाही सारखे बळी तो कान पिळी ह्याच नजरेने बघितले पाहिजे, ज्यास बहुदा आपण सहमत आहोतच.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 09/11/2023 - 23:19 नवीन
आजघडीला माणसाचे स्वतःची उन्नती करण्याचे स्वातंत्र्य त्याच्या वर्णावर अवलंबुन नाहिच. त्यादृष्टीने धर्माधिष्टीत वर्ण at least आर्थीक प्रगतीच्या रचनेतुन वगळले गेले आहेत, निदान technically. राहिला मुद्दा हितसंबंधांचा.. व्यवस्थाच मुळी हितसंबंध जपायला उभारली गेली, कि व्यवस्थेचा उपयोग हितसंबंध जोपासायला केला गेला, हा सनातन प्रश्न आहे. मला तरी हि एक सरमिसळ वाटते. आणि कुठल्याही व्यवस्थेत हि सरमिसळ असतेच. ५०० वर्षाने माणसाने अगदी मंगळावर जरी वसाहत केली तरी तिथेही हि सरमिसळ राहिलच. कुठल्याही व्यवस्थेत समष्टीचं कल्याण साधणं हे तत्व म्हणुनच बघितल्या जातं. व्यवहारात ते किती practice केल्या जातं हा फार subjective विषय आहे.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 01/10/2024 - 20:27 नवीन
चातुर्वण्य व्यवस्था तत्वतः मनुष्य स्वभावाला धरुन दिसत असली, तरी त्यातली गुण-कर्माचा आधार हि तात्वीक बाब...
होय, हे बरोबर आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। मूळ श्लोक कोणत्या आधारावर चातुर्वर्ण्य समाज निर्मिलेला आहे ते सांगतो. "गुण आणि कर्म यावर आधारित सर्व चातुर्वर्ण्य व्यवस्था ही माझीच निर्मिती आहे". सोबत पुढची ओळ खूप विचार करण्याजोगी आहे! "पण हे सर्व निर्माण करणारा कर्ता जरी मी असलो तरीही कर्मफलात न बांधल्यामुळे मी अकर्ता राहतो. त्याप्रमाणेच जो मला जाणतो तोही कर्मफलाच्या बंधनात अडकत नाही."
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 01/11/2024 - 10:01 नवीन
चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित होता हे दाखवणारी सुद्धा अनेक वचनं उद्धृत करता येतील, अनेक रामायण महाभारतातल्या पात्रांच्या कृती उद्धृत करता येतील. पण सध्या गीतेकडे बघू. १. वर्ण संकर ही अर्जुनाची प्रमुख चिंता होती. जर कोणत्याही वंशातून कोणताही वर्ण असलेला माणूस निपजू शकतो तर वर्ण संकर इतका भीतीदायक विषय ठरला नसता. ही भीती जन्मानुसार लोकांचे गट पडलेल्या समाजातच येऊ शकते. आज शेतकऱ्याने शिक्षकाशी विवाह केला, तर कोणालाही वर्ण संकर म्हणून भीती वाटणार नाही, कारण आजचा समाज जन्मानुसार लोकांना विशिष्ठ काम करण्यास भाग पाडत नाही. त्यामुळे वर्ण संकर इत्यादी भीती आजच्या समाजात अस्तित्वात (फारशा) नाहीत. पण, रेशियल लाईन वर विभागलेल्या समाजात बघा, अजूनही रेस संकर हा बागुलबोवा दाखवणारे रेसिस्ट लोक अस्तित्वात आहेत. अर्जुन त्याच प्रकारातला म्हणावा. २. गुण कर्मावरून ठरणारा वर्ण - ह्यातले गुण म्हणजे काय माहीत नाही. पण कर्म - हा कर्म मागील जन्माचा आहे. मागील जन्माचा कर्म ह्या जन्मीचा वर्ण ठरवतो. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: | स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् || ह्यावर आदी शंकर काय भाष्य करतात ?
मां हि यस्मात् व्यपाश्रित्य माम् आश्रयत्वेन गृहित्वा ये अपि स्यु: भवेयु: पापयोनय: पापा योनि: येषां ते पापयोन: पापजन्मान: । के ते इति आह स्त्रियो वैश्या: तथा शूद्रा: ते अपि यान्ति गच्छन्ति परां गतिं प्रकृष्टां गतिम् ।
अर्थ - कारण, हे पार्था, जे पापयोनीचे आहेत, अर्थात ज्यांचा जन्म पापामुळे होतो - हे असे कोण आहेत ? ते आहेत - स्त्री, वैश्य आणि शूद्र. ते सुध्दा माझ्याकडे शरण येऊन, माझ्यावर अवलंबून परम गति - उत्कृष्ट गति प्राप्त करू शकतात. त्याच्याच पुढील श्लोकात ब्राम्हणांना पुण्ययोनी म्हणले आहे. आदी शंकराचार्यांचे भाष्य आज उपलब्ध असलेल्या भाष्यांपैकी गीतेवरील सर्वात जुने भाष्य आहे असा माझा समज आहे. त्यामुळे इथे मागील जन्माचे कर्म - या जनमीचा वर्ण हे गीतेत पुरेसे स्पष्ट आहे. तरीही गुण - ह्या जन्मीचे कर्म हेच वर्णाचे कारण असे कसे म्हणले जाते ?
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/12/2024 - 08:00 नवीन
इथे दोन गोष्टी एकत्र होऊन उपयोगाचे नाही. हेतू बघीतला पाहिजे. कोणतीही चिंता भगवंत कशाला करेल? जीवाच्या समूळ उत्थानाची इच्छा भगवंताची. त्यासाठी काय करायला हवं या दृष्टीकोनातून या भाष्यांकडे बघायला हवे. आपण सृष्टीला कसं बघू हा आपला दृष्टीकोन झाला. वर्णसंकराची चिंता आपण करतो, भगवंत नाही. त्यातून पुढचे भेद तयार होतात. ते किती चूक/बरोबर हा वेगळा विषय झाला. अगदी दुष्टांचं निर्दालन हे सुद्धा सुष्टांना जीवन नीट जगता यावं यासाठी आहे. दुष्टांना त्यांच्या वागणुकीची शिक्षा देणे हा बायप्रॉडक्ट आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 08/29/2023 - 14:43 नवीन
पण कृष्ण गोरक्ष्य करायचाच की क्षत्रिय असूनही...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 08/30/2023 - 15:12 नवीन
नाही. गोरक्ष्य अर्थात गुर पाळणे हा नंदराजाचा व्यवसाय होता, यादवांचा नव्हे , कृष्ण योगायोगाने त्यांचा घरी पोहचला म्हणुन गुरे राखत होता. शिशुपालाने कृष्णाचे जे अपमान केले आहेत त्यातील हाही एक होता - तो कृष्णाला हेच म्हणाला होता की हां तर गवळी , गायींचे शेण गोमुत्र वगैरे साफ करणे ह्याचे काम ह्याला कसले प्रथम पुजेचा मान देताय ? तेव्हां कृष्णाने दाखवुन दिले होते की तो किती क्षत्रिय आहे ते.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Mon, 08/28/2023 - 21:30 नवीन
गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः । या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।। >> आणखी एक पोपटपंची आली ज्याचा दुसर्याला घंटा उपयोग नाही !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/29/2023 - 04:23 नवीन
धन्यवाद संक्षी! तुम्ही म्हणता की तुम्ही संक्षी नाही पण तुमची वृत्ती तर एक्झॅक्टली सेम आहे =)))) त्यामुळे आम्ही तुम्हाला संक्षी म्हणुनच संबोधु. त्याने तुम्हाला फार कौतुक केल्यासारखे वाटते असे तुम्ही म्हणता , चला काहीतरी उपयोग आहे . शिवाय मिपाकरांनाही तुम्ही काय आहात हे कळते , हाही उपयोग काही कमी नाही =)))) आताअजुन जास्त काही लिहित नाही , आमच्याच एका जुन्या लेखनाची लिन्क देतो , आणि हीं , उगाच हे तुमच्या उपयोगासाठी वगैरे लिहिलेल आहे असला गैरसमज करुन घेऊ नका. =))))
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? http://www.misalpav.com/node/47033
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 08/29/2023 - 08:31 नवीन
तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ माहीती आहे का ? एक हिंट देतो, पोपटपंची नव्हे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/29/2023 - 19:10 नवीन
तुम्हाला सर्वज्ञ चा अर्थ माहीती आहे का ? >> हे काय विचारणं झालं का ? अख्ख्या तमाम दुनियेला ठाऊक आहे : मिसळपाव वर एकमेव अद्वितीय सर्वज्ञ म्हणजे साक्षात गुर्देव निराकार गाढव Image removed. बाकी तुमच्या पुनरागमनाने मजा आली राव =))))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 50 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा