दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली.
-- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
- अगदी हाच प्रश्न युद्धानंतर युधिष्ठीर कृष्णाला विचारतो. जेत्याची अपराधभावना असे म्हणता येईल. कृष्ण जास्त समजावत बसत नाही. उलट अश्वमेध यज्ञ करायला लावतो, म्हणजे पुन्हा युद्ध (जर अश्व अडवला तर). त्याचं कारण देतांना तो म्हणतो, युद्धानं खलनिर्दालनाची एक गरज पूर्ण केली.. आता दुसरी गरज धर्म संस्थापनेची आहे. तात्पर्यः हीच वेळ आहे जेव्हा संपूर्ण आर्यावर्त हस्तिनापूरचं राज्य मान्य करेल आणि सख्यत्व/मांडलिकत्वात राहील. एकछत्री अंमलाचा हा प्रकार झाला. अर्थात् यातही अडचणी आल्याच.. जसं बभ्रूवाहनानं अश्व अडवला अन् अर्जुनाचा पराभव केला.२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
- याबद्दल जनमेजयापर्यंतचा उल्लेख माहितीये आणि तोवर तरी नीट चाललेलं आढळतं. परिक्षितापासून युग परिवर्तन झालंय, कलियुग आलंय. त्यामुळे असं म्हणता येईल की महाभारत युद्धा आधी कृष्णानं मारलेले राजे आणि युद्धात संपवलेले राजे, यातले खल प्रवृत्तीचे राजे जर युगपरिवर्तनाच्या वेळेस जिवंत असते तर काय झालं असतं. ते सगळं त्यानं आधीच निस्तरून ठेवलं म्हणायचं.३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
- हेच सर्व प्रश्न गांधारी कृष्णाला दोष देतांना विचारते आणि मग त्याला श्राप देते. कृष्ण अचळ आहे. तो प्रत्येकाचं माप त्याच्या पदरात व्याजासकट टाकतो. त्यानं पांडवांना निवडण्याचं कारणही सत्प्रवृत्ती अन् बल यांचा मिलाफ असंच सांगीतलंय. युद्ध घडवणं आणि त्याला जस्टीफाय करणं हे फार क्लिष्ट आहे. त्याला पांडवांमधे हवे असलेले गुणही दिसले आणि युद्धाला जस्टीफाय करण्यासाठी सबळ कारणही. नाहीतर आलं त्याच्या अर्धं सैन्यही पांडवांकडं नसतं.४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
- हे युद्ध मर्यादित नाहीये.. किंबहुना ते तसं राहिलं नाही. कौरवांकडून सहभागी झालेल्या राजांना युद्धकलेत दुर्योधनापेक्षा भीष्म, द्रोण, कर्ण यांचा भरवसा जास्त वाटला. अन् हस्तिनापुराचं द्रव्य भांडार दुर्योधनाच्याच हातात होतं. तसंही कृष्णाबद्दलची हीन मान्यता आणि द्रौपदी स्वयंवरानंतर अन् जरासंध वधानंतर दुखावलेले राजे यांची गणना भरपूर होतीच. तीही दुर्योधनाच्या पथ्यावर पडली. पांडवांनी त्यांचं युद्ध जस्टीफाय केलं अन् सर्व मित्रनरेशांना साद घातली, जे आले ते आले.५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
- माझ्यामते दुर्योधन हा सगळ्या विलन्स मधे सर्वोच्च स्थान घेईल. आधीही खूप होऊन गेलेत पण त्यांना याची सर नाही. कृष्ण नसता तर केवळ राजकारणाच्या जोरावर पांडवांना त्यानं सत्तेपासून जन्मभर दूर ठेवलं असतं. त्यालाही हे समजत असणार की असं आव्हान दिलं तर त्याला ते झुगारता येणार नाही. तो सेनापतित्व भीष्मांना देतो , कर्णाला नाही त्यामागे बरीच कारणं आहेत ज्यातलं हे एक श्रेष्ठ कारण. भीष्म स्वतः असेतोवर असं होऊ देणार नाहीत हे त्याला कळतच होतं. अन् कृष्णाला तर युद्ध पेटवायचंच होतं.. त्याचे युद्ध थांबवण्याचे सर्व प्रयत्न करून झालेले होते. मग तो कशाला ऐन युद्धाच्या वेळेस दुसरे मार्ग शोधेल? त्याला निर्णायक युद्धच हवं होतं.६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
- तांत्रिकदृष्ट्या कृष्ण दूत असल्यानं तसा वागत नाही. तसंही पांडवांना त्यांचा अधिकार असं झाल्यानंतर देखील सहजासहजी मिळाला नसताच. उलट पांडवांनी घात केला असंच गृहित धरून युद्ध झालं असतं अन् तेव्हा ते जस्टीफाय पण करणं कठीण झालं असतं.७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
याबद्दल माझं वाचन पुरेसं नाही, त्यामुळे विशेष कल्पना नाही. पण साधारण गुरुकुल पद्धती असेतोवर तरी जनजीवनाची पद्धत समानच होती असं म्हणायला हरकत नाही. फरक राज्यकर्त्यांच्या मानसिकतेत पडला असायला हवा.