तो पाऊस निराळा असतो..!
पावसाकडे बघून आलेले हे विचार.. शेवटी आपण सर्व अनुभव मनानेच जगतो.
हा मनातला पाऊस कितीतरी वेगवेगळ्या रुपांत जाणवतो. रुपं अनेक आहेत, त्यातली काही मांडण्याचा एक प्रयत्न. :-)
रखरखत्या रेताड धरेचा येतो वर्षाकाळ..
मुरमाड मनाच्या मशागतीला मायेचा फाळ..
तो रुततो, खुपतो, नांगरट धरतो, आनंदे वर्षतो..
तो पाऊस निराळा असतो..
मनामनांतील भाव-धारणा जेणे अंगारती..
स्वराज्य विचारे उभ्या ठाकती, लक्ष-लक्ष ज्योती..
राष्ट्रभावना जागृत धरतो, मनगटांत वळतो..
तो पाऊस निराळा असतो..
राष्ट्र उभारावया प्रकटते पुरुषार्थाला साद..
कोटी-कोटी आहुती, गर्जती, प्रणवाचा नाद..
तो त्याग वर्षतो, सिंचतो, घडवतो.. राष्ट्र उद्धारतो..
तो पाऊस निराळा असतो..
----
उरातले ते शर काटेरी.. मुरवते जे पाणी,
त्या पाण्याची कावड निर्मळ, प्रेमार्द्राची वाणी..
मायेच्या अभ्रातून झरतो, रुजतो, ओथंबतो!
तो पाऊस निराळा असतो..
राघव