महाराष्ट्रीय सण आणि होत असलेली भेसळ ( ? )
आज कोजागिरी पौर्णिमा.
लहानपणापासून मी पहात आलोय की आजच्या दिवशी मातीच्या किँवा इतर कोणत्याही भांड्यात दूध तापवून ते उकळवले जाते, आकाशातील पूर्ण चंद्र दिसत असतो. त्याची प्रतिबिंब दुधात पडेल अश्या ठिकाणी ते उकळवून नंतर घरातील सर्व जण ते दुध पितात.. परंतु आजकाल अश्या पद्धतीने सण साजरा न करता आमच्या इथे दांड्या खेळल्या जातायत. सर्व अरेंजमेंट मारवाडी फॅमिली ( संख्या फक्त २) आहे त्यांनी केलेली आहे... गाणी पण बहुतांश मारवाडी आहेत. नाचणारे ९८ टक्के मराठी आहेत. अर्थातच असं करायला विरोध नाही पण हे करताना आपण आपले सण साजरा करण्याची पद्धत विसरत चाललोय का ??
दसऱ्याच्या दिवशी घरी सोने ( अपट्याची पाने ) द्यायला लहान मुले आले होती ( मराठी ७-८ आणि ईतर भाषिक १-२ ). परंतु सर्व जण " हॅप्पी दसरा " असं म्हणतं होती. सोन घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणण्याची पद्धत कुठे गेली ते समजेना. मकर संक्रातीच्या दिवशी पण " तिळगूळ घ्या गोड बोला " मागे पडून हॅपी मकर संक्रांती आणि पतंगबजी वाढत चाललीय.
आम्हीं लहान असताना नवरात्रीत दांडिया खळण्यासाठी जायचो तेव्हा सर्व मराठी आणि हिंदी गाणी वाजवली जायची. कृष्णाचे गवळणी, गणपतीची गाणी , अंबेमातेची आणि इतर हिंदी गाणी वाजायची ( हे नाम रे .. सबसे बडा तेरा नाम हे गाणे तोंडपाठ होते. ) पण आमच्या गल्लीत मारवाडी , गुजराती गाणी वाजत होती... आणि विशेष म्हणजे त्यावर नाचणारे ९० टक्के मराठी होते. त्यामुळें मराठी लोकांना मराठी गाणी वाजवायला "लाज " वाटते का असा विचार मनात येऊन गेला.
नवरात्रीत जे काही दांडिया कार्यक्रम होतात तेथे मराठी लोक साड्याऐवजी किंवा मराठी पेहरावा ऐवजी गुजराती ड्रेस का घालतात ?
हीच गोष्ट लग्नात देखील.. मराठी मुलं आणि मुली विदेशी किंवा इतर धर्मीय पेहराव का करतात. उदा. मुली साडी सोडुन वेडिंग ड्रेस ( ख्रिश्चन लोकामध्ये घातला जातो तसा) किंवा घागरा घालतात..
याउलट कोणत्याही ख्रिश्चन मुलीने किंवा गुजराथी मुलीने लग्नात नऊवारी साडी घातलेली मी आजवर पहिली नाही..
पूर्वी हत्ती नक्षत्रात भोंडला/ हतका /हादगा हा खेळ / सण साजरा केला जायचा. पण बहुतेक आता नामशेष झाला. मी गेल्या ५-६ वर्षात कोणत्याही मुला मुलींनी हा प्रकार साजरा केल्याचे पाहिलेले नाही. ही पद्धत नष्ट झाली का ?? एलामा पैलामा.. आज कोन वार बाई आज कोन वार.. अशी अनेक गाणी आजही मला पाठ आहेत. पण आजकाल बहुतांश मराठी मुलांना किंवा मुलींना हे महिती आहे?? आणि ईथे ( महाराष्ट्रात) आल्यावर इथले पाहून किती मारवाडी गुजराथी लोकांनां ही गाणी महिती आहेत??
आमच्या वेळी रंगपंचमी आणि होळी हे दोन वेगवेगळे सण होते.
आजही कोणतेही कॅलेंडर उघडुन पहा दोन्ही सण वेगवेगळे दाखवलेले आहेत. होळीच्या दिवशी आम्ही होळी पेटवायचो. पुरण पोळी खायचो. आणि रंगपंचमीला रंग खेळायचो. पण आता रंगपंचमी हा सण राहिलेला नाही... आणि होळीच्या दिवशी होळी कोणी पेटवत नाही ( पर्यावरण ह्या विषयावर ईथे चर्चा नको ). याउलट होळीच्या दिवशी रंग खेळले जातात.. आणि "हॅपी होली " च्या मेसेज ने इनबॉक्स फुल होतो.
ज्या पद्धतीने आपण मारवाडी , गुजराती इ लोकांना सामावून घेउन त्यांच्या कलाने आपले सण साजरे करतोय त्या पद्धतीने ते लोक आपले सण साजरे करताना दिसत नाहीत. मी आजवर कोणी इतर भाषिक व्यक्तिने किंवा फॅमिली ने गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला असं पाहिलेले नाही. किंवा हद्ग्याची गाणी म्हणत फेर धरलेले आठवत नाही.
पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत...
दिवाळीच्या सणाच्या वेळी पण पारंपरिक फराळ नामशेष होऊन सोनपापडी, बिस्किटे, चॉकलेट इ प्रकार वाढत चाललीय आहेत. कोणी इतर भाषिक इथे येऊन इथल्या लोकांप्रमाणे चकल्या, लाडू, करांजिर करताना दिसत नाहीत. पण इथले लोक त्यांचं पाहून सोनपापडी कडे वळले.
तर.. चर्चेचा मुद्दा हा की आपण आपले सण साजरे करायची पद्धत बदलत चाललोय का. ? ईतर भाषिक लोकं यांनी इथे आल्यावर इथल्या संस्कृतीत मिक्स होण्याऐवजी अल्पसंख्य असुन सुध्दा संस्कृतीक आक्रमण करत आहेत का?? की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? याचे दूरगामी परिणाम काय होतील??
मी जे काही वर लिहिलय ते माझा गैरसमज आहे का ?? इतर मिपाकर या बाबतीत काय विचार करतात ??
टीप - हा धागा राजकीय हेतूने किंवा इतर भाषिक लोकांच्या द्वेष करण्यासाठी काढलेला नसुन आपल्या सण आणि परंपरा यामध्ये भेसळ होतेय की नाहीं या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी काढला आहे. मी माझी मते मांडली आहेत.. ती बरोबरच आहेत असं माझं म्हणणं नाही. मी कदाचित चुकीचा असू शकेल.
धाग्याला मोदी ,.bjp , मनसे इ राजकीय संघटना कडे नेऊ नये.
😓