चिन्यांचा उपद्व्याप (भाग दोन)
राम राम मंडळी. चिन्यांच्या उपद्याप या विषयावर मिपावर दोन हजार तेराला चर्चा सुरु होती. आताही तोच प्रश्न नव्याने समोर आला आहे. आपण अगोदरच कोरोनाने परेशान आहोत. रुग्ण वाढत आहेत बरे होत आहेत. आपण आपल्या जींदगीशी व्यक्तीगत पातळीवर समझोता करुन जरा हळुहळु आपलं मार्गक्रमण सुरु करत होतो की चिन्यांनी सीमेवर कुरापती सुरु केल्या. एलएसीवर चीनने जे कृत्य केलं त्यामुळे देशभर संताप उमटला आहे. अशा परिस्थितीत काल पंतप्रधानांची काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात चिन्यांनी घुसखोरी केलीच नाही अशी सर्वांना माहिती दिली आहे. (बातमी मटा) परंतु भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता यात भारताचे २० जवान शहीद झाले त्याच वेळी चिन्यांचेही ४३ पेक्षा अधिक सैन्य ठार झाल्याचे म्हटल्या जाते. खिळे असलेले दंडु़क्यांचे चित्र माध्यमात फिरत आहेत. अतिशय संताप यावा असे हे चिन्यांचे कृत्य आहे. मात्र ग्लोबल टाइम्समधे किंवा चिन्यांकडून अशी काही बातमी येत नाही, असे झाले असेल तर चीन्यांना धडा शिकवणे गरजेचेच आहे. चिन्यांना धडा शिकवलाच पाहिजे. काल सर्वपक्षीय बैठकीत अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि मा. पंतप्रधानांनी ”भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील”’ असे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आणि अन्य काही कारणांमुळे असेल सर्वच गोष्टी जाहीर सांगता येत नसतील तरीही चिन्यांचा हा किडा ठेचला पाहिजे ही भारतीयांच्या मनातली इच्छा आहे, असे करतांना अनेक गोष्टी असतील येत्या काळात आपण कदाचित काही कार्यवाही करणारही असू पण चिन्यांचं आता पुरे झालं.
मंडळी, चिन्यांच्या एकूणच कोणत्याही गोष्टींवर आपण विश्वास ठेवणार नाही. चिन्यांच्या कुरापतीला वेगवेगळे कंगोरे असतील. गलवान क्षेत्रातील पुलाच्या कामामुळे चीनी भडकले असतील. गलवान खो-यातील काही वादग्रस्त क्षेत्र असेल ते आपल्या परत मिळालेच पाहिजेत असे एक भारतीय म्हणून वाटते. जगाचं लक्ष कोरोनावरुन हटवून अन्यत्र वळवणे असेल किंवा जे काही असेल त्या विषयांची चर्चा धाग्यात अपेक्षित आहेत. उत्तम संदर्भ, लिंका आणि व्हीडीयो टाळत असलेल्या व्हीडीयो-बातम्यांचा मजकूर टंकून एकूण्च चर्चा अपेक्षित आहे. देशातून चिन्यांचे विविध कामांचे कंत्राट, वस्तूंच्या ऑर्डर्स रद्द होत आहेत एका दृष्टीने आता चिन्यांची कोंडी करण्याचा थोडाफार प्रयत्नही होतांना दिसत आहे.
आत्ताच एक जूनला ग्लोबल टाइम्समधे चीनच्या वतीने म्हटलं गेलं होतं की अमेरिका आणि आमच्या वादापासून भारताने दूर राहावे. चीन अमेरिकावादात भारताने फायदा उठवू नये. आणि दोन राष्ट्राच्या (चीन-अमेरिका) वादात भारत पडल्यास भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले होते त्याच बरोबर भारतात सध्या चीन विरोधात आवाज उठविण्यात येत आहे, मोदी सरकारने देशात चीन विरोधात उठवला जाणारा आवाज कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवे असे चीनने म्हटले होते. (बातमी- ग्लोबल टाइम्स आणि सकाळ )आणि म्हणून त्यांनी कालचं कृत्य केलं असावं का ?
''भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे'' असे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. चिन्यांच्या या कृत्याला आता आपण देश एकत्र होऊन चिन्यांंचा योग्य बंदोबस्त झालाच पाहिजे या मतावर येऊन ठेपलो आहोत.
मंडळी, कोमल यांच्या पहिल्या धाग्यातील प्रतिसाद लांबत गेले, दुसर्या पानावार जातांना प्रतिसाद लिहितांना अडचणी येत होत होत्या, सर्वाअर्थाने चीन्यांच्या कुरापती, आपले सीमा प्रश्न आणि त्यांच्या बंदोबस्तावर चर्चा व्हावी यासाठी हा धाग्याचा प्रपंच. आपण योग्य अशी माहितीची देवान-घेवाण व्यक्तीगत पातळीवर न जाता तटस्थपणे चर्चा कराल अशी अपेक्षा.
”घुसखोरी झाली नाही” असे म्हणायचे आणि चीनी सैन्याने आपल्या काही भूभाग बळकून टाकावा, असे होऊ नये असे एक भारतीय म्हणून वाट्ते. आम्हाला आमच्या भूमीचा एक इंचही भाग गमवायचा नाही.नाही नाही, असे काही होणार नाही. आपल्यातलेच काहीजण डोळ्यात तेल घालून लक्ष पुरवत आहेत. ;)