चालू घडामोडी : ऑगस्ट २०१९
राजकीय वार्ता :
राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणवर सुरु झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिल की काय असे वाटू लागले आहे. या निवडणूकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे भवितव्य काय असेल याची स्थिती स्पष्ट होईल. भाजपात आता आनंदाचे वातावरण असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला काय घालायचे यावरुन भविष्यात संकटे उभी राहू शकतील असे वाटते. शिवाय पोटच्या पोरांच्या तोंडचा घास काढून घेऊन दत्तक घेतलेल्या पोरांचे पोट भरावे लागणार आहे की देवाने चोच दिली आहे तर चाराही तोच देईल याचाही निकाल काय लागतो ते बघणे रोचक ठरेल. भाजप मधे आता जागा फुल झाली आहे, आता भरती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले तरी माझी त्यांना विनंती आहे की थोडं थोडं सरकून घ्यायला सांगा नेत्यांना. अजून थोडी जागा होऊ शकते गाडीत. फक्त येणार्या काळात कार्यकर्ते व्यासपीठावर बसतील आणि नेते समोरच्या खुर्च्यांवर बसतील एवढे होणार नाही याची काळजी घ्या.
शिवसेनेचे आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात उतरले आहेत, बहुतेक वरळी मधून निवडणूक लढवतील अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर ठाकरे घराण्यात निवडणूक लढविणारा पहिली व्यक्ती म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. किंगमेकर ते किंग असा प्रवास होणार काय हे तर आनेवाला वक्त ही बतायेगा ! भाजपाच्या वाढीचा शिवसेनेवर काय परिणाम होईल हे पाहणे देखील रोचक ठरेल. साहेबांच्या आवाजसरशी रस्त्यावर उतरणार्या कार्यकर्त्यांची पिढी आता अस्तंगत होत चालली आहे.
आदित्य ठाकरेंच्या काळात बहुतेक अफजलखानाचा कोथळा, पाठीत खंजीर खुपसणे, लखोबा लोखंडे सारखे वाक्प्रचार अस्तंगत होतील अशी चिन्हे आहे.
दलित मंडळींच्या वेगळ्या चुली एकत्र येऊन काही चमत्कार घडेल हे बहुधा येत्या ५० वर्षात तरी शक्य दिसत नाही.
काँग्रेस मधे आता महाराष्ट्रात कोणता मोठा नेता राहिला आहे काय हे आठवून पाहण्यासाठी मेंदूला खुप चालना द्यावी लागेल.
तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम मते कशी व्यक्त होतात हे देखील या निवडणूकीत पहायला मिळेल.
भाजपा वाढली तर शिवसेना या निवडणूकीत तर बरोबर राहिल मात्र भविष्यात हेच दोन एकमेकांचे विरोधी पक्ष म्हणून समोर येतील काय ?
अर्थात राजकारणात काहीही शक्य असते, एखादी मोठी घटना होत्याचे नव्हते करते आणि कोणाच्या खिजगणतीत नसलेला पक्ष पुन्हा वर चढू लागतो असेही अनुभवास येऊ शकते. पिढ्यान पिढ्या जनतेची सेवा करणार्या घराण्यांना रिकाम्या हाताने बसणे शक्य होत नाही त्यामुळे ते एका पक्षातून दुसर्या पक्षात जातच राहणार. नोकरी मधे जसे आजकाल लोक २-३ वर्षात नोकरी बदलतात तसेच समजायचे हे !
दिल्ली मधे महिलांना मेट्रोत फुकट प्रवास या घोषणेनंतर (ही योजना प्रत्यक्षात आली की अजून अभ्यास चालू आहे ?) आज केजरीवाल सरांनी २०० युनिट पर्यंत वीजबिल नाही अशी एक अफलातून योजना काढली आहे. आता महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहयला गेले तर बरे पडेल की काय याचा विचार करतोय :)
फक्त भविष्यात रोज ऑक्सीजनचा सिलींडर विकत घ्यावा लागेल श्वसनासाठी. तोही बहुतेक सरकार फुकट देऊ शकेल.
धाग्याचे नाव चालू घडामोडी आहे आणि मजकूर सगळा राजकारणाविषयी आहे त्याबद्द्ल माफी मागतो. वाचक / प्रतिसादक हळूहळू इतर गोष्टींची भर घालतीलच.
भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प यांच्याशी सहमत.हे वाचले आणि, 'राष्ट्राध्यक्ष ट्रंप चक्क इथेही पचकले की काय?' असा विचार मनात चमकला. प्रतिसाद पूर्ण वाचल्यावर तो गैरसमज दूर झाला. :)