धुक्यात हरवलेला तैलबैला
धुक्यात हरवलेला तैलबैला

पावसाळ्यातला एकही विकएन्ड घरी बसायचे नाही असा विडाच उचलला असल्याने येत्या शनिवार-रविवार तैलबैल-घनगड असा बेत आखला होता. कमी जास्त होत होत अखेरीस ९ शिलेदार तयार झाले. आमच्या कुठल्या ट्रेकमधे व्यत्यय आला नाही, असे झाले तर शपथ !! ५ जुलैच्या भारत बंदचा वचपा आमच्या कंपनीने शनिवारी "वर्कींग" ठेऊन काढला होता. माझ्या मॅनेजरशी आधीच बोलून मी अर्धी रजा मिळवली. लाल डब्याच्या वेळापत्रकात आम्ही बसू शकणार नव्हतो म्हणून स्वता:च्या कारने जायचे असे मी आणि लकीने ठरवून टाकले. लकी आणि रिंपल आपापल्या कार आणणार होते.
सगळ्यांनी दुपारी २.३० ला चांदणी चौकात भेटायचे नक्की केले. मी आणि अश्विनी दुपारी १.३० ला माझ्या ऑफीसवरून निघालो खरं पण कदाचित मुहूर्त वाईट असावा, आमची बाईक आपटे रस्त्यावरच पंक्चर झाली. रिंपल आणि तिची बहीण विशाखा आमची वाट पहात म्हात्रे पुलाजवळ थांबल्या होत्या. त्यांना परिस्थितीचा अंदाज आला आणि त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हॉटेल निसर्ग कडे मोर्चा वळवला. तिकडे श्री. व सौ. लकी बाकीच्या तिघा नगांना (प्रशांत, निलम आणि प्रियांका) घेऊन केव्हाच चांदणी चौकात पोहोचले होते. त्याचे सारखे फोन येत होते.
अखेरीस बर्याचश्या शिव्या खाऊन मी, अश्विनी आमची सारथी रिंपल आणि विशाखा ३ वाजता चांदणी चौकात पोहोचलो. मघाचच्या राहीलेल्या काही फुल्या फुल्या गुमान पदरात घेत आम्ही लोणावळ्याकडे कूच केले. रिंपलच्या काही (तिच्या मते नॉर्मल) ओव्हरटेकींगमूळे मला जवळपास घेरी आली होती, पण मी दर मिनीटाने "सावकाश" म्हणण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. आमच्या कार मधल्या प्रत्येक जण तिला जमेल तसे ड्रायव्हींगचे धडे देत होता. पुण्याहून निघाल्यापासून हुलकावणी देणार्या पावसाला अखेरीस आम्ही कामशेत जवळ गाठलं. रिंपल आता बर्यापैकी सरावली होती.

लोणावळ्यात थोडे ट्रॅफिक जाम होते. तिथे अडकलो असताना काही लोकांचा (?) गाडीतून उतरून चिक्की घेण्याचा हेतू मी हाणून पाडला आणि भूशी डॅमकडे वळालो. आय.एन्.एस. शिवाजीचा डॅम दिसताक्षणी दोन्ही गाड्यांना मी न सांगता ब्रेक लागले आणि खाली उतरण्या आधीच "मला भुट्टा... मला चहा..." अश्या आरोळ्या येऊ लागल्या. महीला मंडळाने तर चक्कं तिथे असलेल्या "टोराटोरा" मधे बसण्याचाच हट्ट धरला (लकीसुध्दा त्यांना सामील झाला होता), पण तिकिट "इतकं महाग का ??" याविषयी थोडा वाद घालून मंडळी भुट्टयाच्या गाडीजवळ स्थिरावली. खानपान झाल्यावर गाड्या लायन्स पॉईंट्च्या दिशेने हाकल्या. घाट चढून थोडं वर येताच आम्हाला धुक्याने चांगलंच घेरलं, इतकं की समोरचं १० फुटांपलीकडलं काहीच दिसत नव्हतं. या वेळेस मात्र अगदी मुंगीनेही रिंपलला ओव्हरटेक केलं असतं. मी दर दोन मिनीटांनी गाडीची काच आतून, बाहेर हात काढून पुसत होतो.
घुसळखांब सोडल्यावर धुकं थोडं कमी झालं. मी फोटोसाठी गाडी थांबवताच बरीचशी मंडळी आपापल्या लघूशंका दूर करण्यासाठी झाडीत पळाली. धुक्याने भरलेल्या त्या पोकळीस दुभंगत जाणारी ती डांबरी सडक फारच मोहक दिसत होती. कोरिगड आणि अॅम्बी व्हॅली डाव्या हाताला ठेऊन आम्ही साळतर कडे निघालो. ज्या रस्त्याला मघाशी नावाजत होतो त्यालाच शिव्या घालण्या इतका तो खराब होता, पण आजूबाजूचा निसर्ग अजूनच खुलत चालला होता. पण माझं लक्ष तिकडे नव्हतंच. ७.३० झाले होते आणि अंधार पडायच्या आत साळतर खिंड पार करुन तैलबैल ला पोहचायचे होते.

तैलबैलला पोहोचलो तेव्हा अंधार झालाच होता. गावतल्या मारूतीच्या मंदिरासमोर गाडया लावल्या आणि पाऊस सुरु झाला. मंदिराच्या चाव्या आणण्यासाठी बाजूच्याच घरात शिरलो. तिथल्या मावशींनी चाव्यांसोबत हंडाभर प्यायचे पाणीसुध्दा दिले. मंदिर अगदी स्वच्छ आणि ऐसपैस होते. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्नेहा आणि लकीने घेतली होती. त्यांनी पुलाव करण्यासाठी स्टोव्ह पेटवला आणि इकडे आमचा गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. थोड्या वेळाने पुलावाच्या सुगंधाने मंदिर भरून गेलं आणि आम्ही सगळे न सांगता आपापल्या ताटल्या काढण्यासाठी सॅककडे पळालो. मग काय !! सगळीकडे एकदम शांतता !! प्रत्येकजण त्या पुलावात गुंतला होता. थोड्या वेळाने मग "व्वा", "छान", "झक्कास जमला आहे हां पुलाव" वैगरे शब्द फुटू लागले. एकदाची क्षुधाशांती झाल्यावर सगळे अंथरूणावर पडल्या पडल्या मागील ट्रेकमधल्या गमतीजमती आठवून हसत होते. पुन्हा एक गाण्यांचा राऊंड मारून निद्रादेवीच्या आधीन झालो.
पहाटे सहाच्या आसपास मंदिराच्या पुजा-याने घंटा वाजवून आम्हाला जागे केले. डोळे किलकिले करुन बाहेर पाहिलं तर सगळीकडे धुकं पसरलं होतं. आळोखे पिळोखे देऊन थोडं अंग मोकळं केलं आणि बाहेर येऊन त्या धुक्याच्या दुलईत शिरलो. हवेत बराच गारवा होता. चालत चालत गावाबाहेर ओढ्यावर पोहोचलो आणि सहज मागे वळून पाहीले तर तैलबैल्याची ती कातळभिंतसुध्दा आमच्याकडे डोकं वर करून पहात होती, आम्हाला खुणावत होती. ट्रेकमधल्या त्याच्या पहिल्याच दर्शनाने आम्ही सुखावून गेलो. प्रातर्विधी उरकून मी आणि प्रशांत चहाच्या तयारीला लागलो.
कधी नव्हे ते महिला मंडळाने तोपर्यंत सगळं मंदिर स्वच्छ करुन ठेवलं होतं. चहा आणि न्याहारी उरकून बाहेर आलो तोच मंदिराच्या अंगणातच गावातल्या बच्चेकंपनींची फ़ुटबॉलची मॅच सुरू होती. झालं~~ !! मग काय आम्हा पुणेकरांची एक टिम आणि गावातल्या मुलांची एक टिम. तास दोन तास आम्ही सगळे जसे जमेल तसे त्या फ़ुटबॉलवर पाय साफ़ करत होतो. ठराविक अंतराने कोण ना कोण घसरून पडत होता. विशाखाने तर ऎन्ट्री मारल्या मारल्या जणू काही आपण स्केटीग खेळत असल्याच्या आविर्भावात त्या बॉलला अशी काही किक हाणली की तिचे दोन्ही पाय हवेत गेले आणि धापकन जमिनीवर आपटली.त्या बालचमूंसोबत आम्हीही आमचे हसू दाबून खेळ सुरू ठेवला. दुसरीकडे अश्विनी कुठल्यातरी दाक्षिणात्य गाण्याला शोभेल असा काहीसा नाच करित त्या फ़ुटबॉल मागे धावत होती. ही सगळी मजा पहायला हळूहळू गर्दी वाढू लागली तसे आम्ही जरा आवरते घेतले.
त्या फ़ुटबॉलच्या नादात बराच वेळ गेल्याने मी आणि लकीने घनगड पुढच्यावेळी करू म्हणून राखून ठेवला. आता आम्हाला अगदी निवांत वेळ होता. सगळं सामान गाड्यांमधे भरुन पाण्याच्या बाटल्या, थोडा खाऊ आणि प्रथमोपचाराची पेटी एका बॅगेत टाकून आम्ही तैलबैल्याच्या त्या मोहक कातळभिंतीकडे कूच केले. सोबत तैलबैल फ़ुटबॉल टिमचा कॅप्टन अविनाश हा सुध्दा आम्हाला येऊन मिळाला. तो आम्हाला वाट दाखवणार होता.



कातळभिंतीचा आणि धुक्याचा लपाछपीचा खेळ सुरूच होता, मधे एकदा दोनदा थोडं धुकं हटलं आणि मला सुरेख फोटो(?) मिळाले. भिंतीच्या थोडंअलिकडे एक अगदी छोटा असा उंचवटा आहे. अविनाशच्या मते त्याचं नाव "ब्राम्हण" आहे. (त्याने सांगितलेलं कारण न सांगणे मला जास्त योग्य वाटते !! ) मग त्या ब्राम्हणावर चढून मी आणि अविनाशने एक झक्कास फ़ोटो काढून घेतला आणि भिंत उजव्या हाताला ठेऊन खिंडीकडे मोर्चा वळविला.



खिंडीत पोहोचताच जोरदार पावसाला सुरूवात झाली. वाराही बेफ़ाम होऊन मनोसक्त पावसाच्या सरी उधळत होता. मला माझ्याच कवितेतलं एक कडवं आठवलं.
"भन्नाट पाऊस
भन्नाट वारा ...
भन्नाट जगण्याला
त्यांचा भन्नाटच सहारा ..."
त्याक्षणी या ओळी ख-या अर्थाने आम्ही जगत होतो.

थोडे फ़ोटो काढून झाल्यावर तिथल्याच मोकळ्या जागेत चक्क कब्बडीचा डाव सुरू झाला. मी तर अगदी जोशात आलो होतो, इतका की प्रशांतला पकडीत घेताना त्याच्या टी-शर्टची एक बाही पार फ़ाडून टाकली. सामना अतिशय रंगात आला असताना प्रियांकाने केलेल्या चिटींगमुळे त्यांचा संघ बाद झाला आणि आम्हाला निर्विवाद विजय मिळाला.
(विजयी संघ : अमोल, रिंपल, नीलम अश्विनी) वि.वि. (पराभूत संघ : प्रशांत, स्नेहा, विशाखा, प्रियांका).

परत येताना वाटेत पुण्याचाच एक ग्रुप भेटला मग "तुम्ही कुठून आलात ?? तुमचा ग्रुप कोणता ?? ..." सारख्या ठरलेल्या प्रश्नांची देवाण-घेवाण उरकून आम्ही गावात परतलो.
तिथला हिरवागार निसर्ग, मोहवणारं धुकं आणि मनाला भुरळ पाडणारी ती अफ़लातून भिंत या सगळ्यांना मागे सोडून परत यायला मन तयारच होत नव्हतं. शेवटी मुळशी मार्गे पुण्याला जायच्या आमिषावर तयार होऊन आम्ही तैलबैला सोडलं ते याच पावसाळ्यात परत यायच्या बोलीवर !!!
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments