Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा

व
विवेकपटाईत
Tue, 03/03/2026 - 07:17
🗣 162 प्रतिसाद
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा. इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो. इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9360 views

🗣 चर्चा (162)
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 03/03/2026 - 14:13 नवीन
ईराण अजुन तरी अमेरिकन सैन्य तळांवर किवा तेल प्रकल्पावर हल्ले करत आहे. पण अमेरिका/ईस्त्रएल मात्र ईराणच्या शाळा/घरांवर हल्ले करताहेत. एका शाळेवरील हल्यात १६० का कायतरी मुली मारल्या गेल्या. शाळॅच्या आवारातच त्यांना पुरण्यासाठी खड्डे खणलेत. त्यामुळे कोणाला टेररीस्ट म्हणावे? असा प्रश्न पडलाय. अमेरिकेला कायमच जगाच्या तेलावर हक्क सांगायचा असतो. आतापावेतो हे वेळोवेळी दिसुन आलेय. ईराक असो, सिरिया , व्हेनेझुएला किवा आता ईराण. त्यामुळे नॅरेटिव्ह काहीही असो, मूळ मुद्दा तेलच आहे. दुसरे म्हणजे लॉकहीड मार्टीन सारख्या शस्त्र उत्पादक कंपन्यांच्या फंडींगवर अमेरिकी सरकार चालत असल्याने (किवा त्या लॉबीमुळे म्हणा) जगात कुठे न कुठे युद्ध चालु राहणे अमेरिकेला हवे असते. नाहीतर धंदा कसा होणार? तिसरे म्हणजे दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने मध्य आशियात ईस्त्राएल निर्माण करुन अरब राष्ट्र्रांना कायमची डोकेदुखी करुन ठेवली आहे. आणि त्यांचा ईस्त्राएल ला कायमच पाठिंबा असतो. आताही ईस्त्राएल चा लाँच पॅड म्हणुन वापर होत आहे. चौथा मुद्दा- हळूहळू २ न्ही बाजु अक्रमक होत आहेत. ईराणने सौदी अराम्कोवर हल्ला करुन तेल उत्पादन बंद पाडलेय आणि होर्मुझ खाडी बंद केली आहे. अमेरिकेत एरिआ ५२ प्रदेशात भुकंप सद्रुश धक्के बसलेत आणि अणू चाचणी झाल्याचा संशय आहे. ईराण शियाबहुल असल्याने अजुन तरी कोणीही मुस्लिम देश त्यांच्या बाजुने बोलत नाहीये का? माहीत नाही. पण अमेरिकेच्या भ्याड हल्ल्याने खामेनी हुतात्मा बनला त्याचे सॉफ्ट बेनिफिट ईराण उचलणार असे वाटतेय. अजुन काय काय होणार माहीत नाही.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 03/03/2026 - 21:47 नवीन
सामान्य जनतेला आणि विशेषतः लहान मुलांना आणि संपूर्ण कुटुंबाला टार्गेट करणे हे इस्राएल चे खूप जुने धोरण आहे. त्यामुळे ह्यांत आश्चर्य काहीच नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 03/03/2026 - 14:38 नवीन
खाडी देशांपासून दूर असणारे तेल उत्पादक देश श्रीमंत होणार.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 03/03/2026 - 14:39 नवीन
ह्या युद्धच्या काही दिवस आगोदर इराण मध्ये खेमेणी आणि हिजाबच्या विरोधात मोठं आंदोलन झालं होत. त्यात पाच ते तीस हजार इराणी नागरिक मेल्याच्या बातम्या आहेत. तर आत्ताही खेमेणी मेल्या नंतर नागरिकांनी जल्लोष केल्याच्या रील्स फिरत आहेत. युद्धनंतर खेमेणी समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष होऊन यादवी माजाण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 03/03/2026 - 14:59 नवीन
खामेनी धुतल्या तांदळासारखा होता असे म्हणायचे नाहीये, पण तसा तर ट्र्म्प किवा नेतन्याहु पण नाहीयेत. मात्र खामेनीला असा मारल्याने आणि तो शियांचा धर्मगुरु असल्याने त्याला अचानक जगभरच्या शियांकडुन सहानुभुती मिळाली. शियांचे स्लीपर सेल्स जागे झाल्यास लोन वुल्फ सारखे हल्ले होण्याची शक्यता आहे का? म्हणजे कमी श्रमात जास्त नुकसान? या युद्धात गायडेड मिसाईल सोबतच ड्रोनचाही लक्षणीय वापर होतोय हे ही एक निरीक्षण. काहीही असो आणि कोणही जिंको किवा हरो , तेल आणि गॅस महागणार आणि भारतीय जनतेचे कंबरडे मोडणार असे दिसत आहे. मध्यपूर्वेची निर्यातही ठप्प झाली आहे त्यामुळे होणारे नुकसान वेगळेच. अजुनतरी रशिया आणि चीनने प्रतिक्रिया देणे सोडल्यास फार काही केलेले नाही. कदाचित पाठीमागे ईराण ला मदत करत असतील. ते थेट युद्धात आले तर मात्र भयंकर परीस्थिती ओढवेल.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/04/2026 - 06:22 नवीन
अजुनतरी रशिया आणि चीनने प्रतिक्रिया देणे सोडल्यास फार काही केलेले नाही. कदाचित पाठीमागे ईराण ला मदत करत असतील. ते थेट युद्धात आले तर मात्र भयंकर परीस्थिती ओढवेल.
रशिया आणि/किंवा चीन युध्दात पडल्यास ते तिसरे महायुध्दच होईल. त्यासाठी दोन्ही बाजूंची तयारी असेल असे वाटत नाही. कालपरवा तात्यांनी म्हटले की गरज पडल्यास अमेरिका इराणमध्ये सैनिक उतरवेल. कदाचित रशिया त्याची वाट बघत असावे. अमेरिकेचे अफगाणिस्तान आणि इराकमध्ये तोंड पोळलेले असताना त्या उपर इराणमध्येही सैनिक उतरवण्याचा विचार असेल तर ते धक्कादायक असेल. तसे खरोखरच झाल्यास अमेरिकाविरोधी तत्वांना सर्व प्रकारची मदत रशियाकडून होईल आणि ४० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात झालेल्या मानहानीचा प्रतिशोध घेण्यासाठी रशिया प्रयत्न करेल असे वाटते. तसे व्हावे असे फार वाटते. एकदा त्या अमेरिकेची जोरदार जिरावी असे फार वाटते. जिथे जातील तिथे नाक खुपसून सगळीकडे घाण करून ठेवली आहे अमेरिकनांनी. त्यांची दादागिरी करायची क्षमता कमी व्हावी असे फार वाटते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 03/03/2026 - 15:53 नवीन
अमेरिका जिथे जिथे नाक खुपसायला जाते तिथेतिथे घाण होते. खुद्द इराणमध्ये तसे पूर्वी झाले होते. १९५१-५२ मध्ये मोहंमद मोसादेघ यांच्या सरकारचे ब्रिटिश पेट्रोलिअम कंपनीबरोबर इराणमधील तेलविहिरींमधून बाहेर काढल्या जाणार्‍या तेलाबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यावी यावरून वाजले. त्यानंतर मोसादेघ यांनी ब्रिटिश पेट्रोलिअमला इराणमधून हाकलून दिले. त्यानंतर ब्रिटिश-अमेरिकनांनी मोसादेघांना सत्तेवरून खाली खेचायचा चंग बांधला. मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा प्रचार सुरू झाला. वास्तविकपणे इराणमध्ये कम्युनिस्टांचा दुसरा गट होता. मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण सांगू तसे न करणार्‍या राज्यकर्त्यांना कम्युनिस्ट हे लेबल लावणे अमेरिकनांना सोयीचे होते. मग भारतात शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने 'मॅन्युफॅक्चर्ड विरोध' निर्माण केला गेला आणि त्याला परदेशातून फंडिंग आले तसेच त्यावेळेस इराणमध्ये केले गेले. दुर्दैवाने त्याला यश आले आणि मोसादेघ यांचे सरकार बदलून अमेरिकेला अनुकूल राजा पेहलवींकडे सत्ता दिली गेली. असे दिसते की इराणमधील विविध गटांमध्ये मोसादेघ हे एक बॅलन्सिंग घटक होते. तेच सत्तेतून गेल्यावर आणि अमेरिकेचा उघड हस्तक्षेप झाल्यानंतर हळूहळू कट्टर इस्लामी शक्तींना हातपाय पसरायला संधी मिळाली. त्यातून अयातुल्ला खोमेनी हा क्रूरकर्मा सत्तेत आला. त्यातून कोणाचे भले झाले? इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलिअमचे रॉयल्टीच्या प्रश्नावरून सरकारशी फाटले तसेच साधारण त्याच काळात ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रूट कंपनीचे केळीच्या बागांच्या प्रश्नावरून फाटले. तिथेही 'रेजिम चेंज' करण्यात आला. इराक-लिबियामध्येही सद्दाम आणि गद्दाफी यांना सत्तेतून घालविले, सिरीयात असाद रशियाच्या मदतीमुळे बराच काळ- अगदी मागच्या वर्षीपर्यंत सत्तेत राहिले होते पण तिथे पण अमेरिकेने घाण केली होतीच. सगळीकडे आताचे सत्ताधारी घालविले तरी त्यापुढे काय करायचे याचा काहीही विचार केला गेला होता असे वाटत नाही. त्यातूनच मग आयसिसला हातपाय पसरायची संधी मिळाली. त्यातूनही नक्की कोणाचे भले झाले? ग्वातेमालात रेजिम चेंज केला आणि त्यानंतर अनेक वर्षे ग्वातेमाला हा देश अस्थिर होता. आताही इराणचे सरकार अमेरिका आणि इस्राएलच्या संयुक्त सामर्थ्यापुढे फार काळ टिकेल असे वाटत नाही. फक्त प्रश्न आहे की पुढे काय होणार? इराणमध्ये आधी खोमेनी आणि मग खामेनी यांनी बंदुकीच्या धाकावर आपली सत्ता चालवली. पण त्यांना सुध्दा भरपूर अंतर्गत विरोध होता/आहे. त्यातही सगळे विरोधी लोक एकाच कळपातले आहेत असेही वाटत नाही. त्यातून ही सत्ता आता गेल्यावर नंतर वेगवेगळे गट एकमेकांशी भांडून इराण हा दुसरा अफगाणिस्तान नाही झाला म्हणजे मिळवली. जिथे जाऊ तिथे घाण घालायची अमेरिकेची जुनी सवय आहे ते पाहता इराणमध्येही काही फार वेगळे होईल असे वाटत नाही. त्यातून सगळ्या मध्यपूर्वेला धोका उद्भवतो. दुसरे म्हणजे अलीकडच्या काळात इराणमध्ये खामेनीविरोधात आवाज उठत होताच. मध्यंतरी इराणी स्त्रियांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. इराणमध्ये मूळच्या पर्शिअन संस्कृतीकडे परत जाऊ आणि इस्लामचा प्रभाव कमी करू अशा प्रकारच्याही चळवळी हळूहळू पुढे येत होत्या. अशा तत्वांना पाठबळ देऊनही खामेनींची राजवट खाली खेचता आली नसती का? त्यातून इराणमध्ये सौम्य तत्वे सत्तेत यायला मदत झाली नसती का? आता धोका असा आहे की समजा खामेनी तिथल्या लोकांना आवडत नसतील पण अमेरिकेने बाहेरून येऊन त्यांना असे ठार मारल्याने निदान काही घटक तरी अमेरिका विरोधी झाले असतील. अशा घटकांना समजा योग्य नेतृत्व नसेल तर ते परत कट्टरपंथीयांच्याच कळपात जातील ही भिती आहे. अफगाणिस्तानात झाले त्याप्रमाणे पहिली काही वर्षे सगळे काही आलबेल झाले असे वाटेल पण आतून कट्टरपंथी बलिष्ठ होत गेले आणि परत नव्या जोमाने परत आले तर आणखी मोठी डोकेदुखी निर्माण होईल. भारताचे आणि इराणचे व्यापारीक संबंध नक्कीच चांगले होते. पण राजकीय संबंधांविषयी तसे म्हणता येणार नाही. मार्च १९९४ मध्ये पाकिस्तानला यु.एन मानवाधिकार आयोगात भारताविरोधात काश्मीर प्रश्नावर ठराव आणायचा होता. त्यावेळेस भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयींनी केले होते. त्यावेळेस आयत्या वेळेला इराणने पाकिस्तानला समर्थन द्यायचे नाकारले. पाकिस्तानने शेवटी तो ठराव मतदानाला मांडलाच नाही त्यामागे इराण हे एक मोठे कारण होते. तो एक अपवाद वगळला तर इराणने भारत-पाकिस्तान प्रश्नावर कधीही भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. तेव्हा खामेनी या धर्मांध म्हातार्‍याला हाकलले आणि मारले म्हणून आपल्याला फार वाईट वाटायची गरज नसावी. त्यातूनही जे काही नवे सरकार इराणमध्ये येईल त्यांच्याशी संधान बांधून पाकिस्तानला अफगाणिस्तान सीमेवर कटकट निर्माण झाली आहे तशी इराण सीमेवरही निर्माण झाली तर अती उत्तम. अर्थात त्यात बलुच हा अ‍ॅंगल कटकटा आहे कारण बलुच लोक पाकिस्तानात आहेत तसेच इराणमध्येही आहेत. त्यामुळे आपण बलुच लोकांना आतून सगळी मदत करत असलो तरी उघडपणे त्यांच्याशी डील करणे टाळले आहे- जसे पाकिस्तानचे शासक उघडपणे काश्मीरातील फुटिरतावादी हुर्रियत कॉन्फरन्स वगैरेंना भेटायचे त्याप्रमाणे भारताचा कोणीही उच्चपदस्थ बलुच नेत्यांना उघडपणे भेटलेला नाही. त्याचे कारण त्यातून इराणमधील बलुचींनाही उचल मिळाली तर ती डोकेदुखी इराणलाही होईल आणि मग त्यातून आपले व्यापारी संबंध बिघडू शकतील. यातून आपण कसा मार्ग काढणार ते बघायचे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 03/03/2026 - 16:23 नवीन
खामेनी या धर्मांध म्हातार्‍याला अशा पध्दतीने मारल्याने पूर्वी त्याच्या विरोधात असलेली तत्वे अमेरिकेच्या विरोधात जातील आणि त्यातून आणखी गुंतागुंत वाढेल ही भिती वाटते. अमेरिकेने वापरा आणि फेकून द्या या नितीमुळे जगात विविध ठिकाणी शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. अमेरिकेने ग्वातेमालात घाण घातली हे वर लिहिलेच आहे. त्याप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडात इतर अनेक देशांमध्येही घाण घातली. त्यातून मग वेगवेगळ्या देशांमध्ये अमेरिका विरोधी अर्थात बर्‍याच अंशी रशियाच्या बाजूची सरकारे सत्तेत आली. तसेच निकाराग्वामध्ये झाले. मग त्या सरकारविरोधात लढणार्‍या 'कॉन्ट्रा' बंडखोरांना रॉनाल्ड रेगन प्रशासनाला मदत करायची होती. पण त्यात एक अडचण होती- अमेरिकन संसदेने कॉन्ट्रा बंडखोरांना कोणतीही मदत द्यायला रेगन प्रशासनाला बंदी केली होती. ही गोष्ट होती १९८५-८६ ची. १९७९ मध्ये खोमेनी सत्तेत आल्यानंतर इराणला काळ्या यादीत टाकून इराणशीही काही घेणेदेणे ठेवायचे नाही हा पण दंडक ठरलेलाच होता. मग काय करा?तर रॉनाल्ड रेगननी एक शक्कल लढवली. तर इस्राएलला मदत म्हणून दिलेली शस्त्रे होती इराणसाठी दिलेली. अमेरिकेकेडून मिळालेली ती शस्त्रे इस्राएलने आपला शत्रू इराणला दिली आणि त्याबद्दल मिळालेले पैसे निकाराग्वातील कॉन्ट्रा बंडखोरांना दिले गेले. म्हणजे निकाराग्वामधील कॉन्ट्रा बंडखोर आणि इराण या दोघांशीही काही घेणेदेणे ठेवायचे नाही या अमेरिकन संसदेच्या दंडकाला असे बायपास केले गेले. ही टाईमलाईन होती १९८५-८६ मधील म्हणजे इराक-इराण युध्द चालू असताना. काही काळ अमेरिका एकाच वेळेस इराक आणि इराण या दोन्ही देशांना शस्त्रे पुरवत होती. असे केल्यावर सगळीकडे शत्रू निर्माण होणार नाहीत का आणि सगळीकडे घाण होणार नाही का? इराणमध्ये परत असलाच काहीतरी गेम खेळला जात असेल तर तात्कालिक फायदा पण दीर्घकालीन तोटा असे व्हायला नको.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 03/04/2026 - 04:35 नवीन
अमेरिकेचे सैन्य धोरण नेहमीच थोडे खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बारा आणा ह्या धाटणीचे राहिले आहे. पण मर्कटस्य सुरापानं न्यायाने ट्रम्प सरकारची आत्ममुग्धता, सभोवताली एकत्रित केले चाटुकार पण अकार्यक्षम लोक, एपिस्टिन संचिका आणि त्यातून बहुतांशी होणारे भयोपादान (ब्लॅकमेल) ह्यांच्या मिश्रणाने सध्या अमेरिकन सैन्य धोरण आणि परराष्ट्र धोरण एके वेगळ्याच दिशेने भरकटत गेलेले आहे. सध्या ट्रम्प ऍडमिन मध्ये जे लोक कॆमेरावर दिसतात ते सर्व उत्सव मूर्ती असून प्रत्यक्ष निर्णय हे बीबी आणि ट्रम्प ह्यांचे खास "स्टीफन मिलर" सर्व निर्णय घेत आहेत. जुनी निर्णय प्रक्रिया ज्यांत सर्व सरकारी निर्णय भेटी ह्या ठराविक कार्यक्रमानुसार होत, त्यांत अनुभवी लोकांचा समावेश असे, त्यानंतर प्रत्येक भेटीचे "minutes" (सार) हे प्रकाशित होत असे आणि इतर लोकांना उपलब्ध होते असे. ते सर्व जाऊन त्या जागी DoJ, DoS ह्यांचे निर्णय स्टीफन मिलर हे तोंडी बैठक घेऊन करतात. ह्या निर्णयाचा काहीही पेपर ट्रेल ठेवला जात नाही. इस्राएल ने गाझा मध्ये अत्यंत अमानुषता दाखवली आहे किमान ५०,००० लहान मुले ठार किंवा गंभीर जखमी झाली आहेत. जे भाग आणि ज्यांचा काहीही संबंध युद्धाशी नव्हता त्यांची घरे आणि सर्वस्व नष्ट केले आहे. सार्वजनिक रित्या अनेक देशांनी ह्यावर मौन पाळले असले तरी खाजगीत बराच असंतोष आहे. इंग्लंड पासून, सौदी पर्यंत आणि चीन पासून नॉर्वे पर्यंत इस्राएल ची अमानुषता सर्वांना ठाऊक झाली आहे. पण त्याच वेळी इस्रायली हस्तकांनी अमेरिकन सरकारच्या सर्व स्तरांत घुसखोरी करून आपले बस्तान सुद्धा बनवले आहे हे सुद्धा सर्वश्रुत आहे. इस्राएल विरोध सगळीकडे वाढत आहे. कधी नाही ते अमेरिकन पंडित इस्राएल च्या विरोधांत थेट बोलत आहेत. MGT, थॉमस मेसी सारखे रिपब्लिकन थेट इस्राएल वर टीका करत आहेत. हे सर्व काही वर्षे मागे होत नव्हते. टकर कार्लसन, निक फुयेन्ट्स हि मंडळी तर १००% इस्राएल विरोधी बनली आहेत. एकूणच इस्राएल साठी अमेरिकन मुलांनी आपला जीव धोक्यांत घालावा, अब्जावधी डॉलर्स व्यर्थ करावेत, राष्ट्रीय व्यापार मोडकळीस आणावा, तेलाच्या किमती गगनाला भिडाव्यात, सर्व अमेरिकन मित्रांच्या मनात अमेरिकेविषयी साशंकता निर्माण व्हावी ह्याला अमेरिकेत कुठल्याच राजकीय भागांत जास्त सपोर्ट असलेला दिसत नाही त्यामुळे ट्रम्प साहेबांसाठी येणारे मध्य निवडणुका सुपडा साफ करणारे असतील. ट्रम्प ह्यांना विशेष फरक पडत नाही, तरी सुद्धा मला वाटते ट्रम्प चे चाटुकार हे स्वतःची सत्ता ठेवण्यासाठी मध्य निवडणुका कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतील. एकूणच हे पराभव नाम संवत्सर खरोखर पराभवाचे असणार आहे !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/04/2026 - 04:58 नवीन
मर्कटस्य सुरापानं न्यायाने ट्रम्प सरकारची आत्ममुग्धता, सभोवताली एकत्रित केले चाटुकार पण अकार्यक्षम लोक, एपिस्टिन संचिका आणि त्यातून बहुतांशी होणारे भयोपादान (ब्लॅकमेल) ह्यांच्या मिश्रणाने सध्या अमेरिकन सैन्य धोरण आणि परराष्ट्र धोरण एके वेगळ्याच दिशेने भरकटत गेलेले आहे.
सध्या जगभर प्रमुख देशांच्या नेतृत्वामधे 'आत्ममुग्धतेचा' आजार पसरत चाललेला दिसत आहे. काहीही झालं तरी, पालख्या उचलणा-यांचा वाढता फाफटपसारा हे तर, त्यांचं तर खास गुणवैशिष्ट्य आहे. चाटूकार हे या जगताचं विशेष आहे. आपण या सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहोत 'गंभीर चिंताअ' व्यक्त केली आहे. बाय द वे, ब्लॅकमेलसाठी भयोपदान शब्द आवडला. मराठी भाषेत भर घातल्याबद्दल आभार. मराठी भाषेच्या संवर्धनसाठी शब्द सातत्याने वापरण्यात येईल. धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 03/03/2026 - 16:32 नवीन
रजा पहेलवी सुद्धा क्रूर शासकच होता. त्यानेही अनेक आंदोलकांना ठार केले होते. एकूण मोसादेघ सरकार पाडणे हे दुर्दैवी होते. ह्यावर फॉल ऑफ हेवन नामक पुस्तक आहे पण ते जास्तच पेहलवी धार्जिणे आहे. तरी वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 03/04/2026 - 04:48 नवीन
> अशा तत्वांना पाठबळ देऊनही खामेनींची राजवट खाली खेचता आली नसती का? त्यातून इराणमध्ये सौम्य तत्वे सत्तेत यायला मदत झाली नसती का? प्रगत, शांत आणि समृद्ध इराण हा इस्राएल च्या हिताचा आहे कि नाही हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर नाही असे आहे. मध्यपूर्वेंत तुर्की, इजिप्त आणि इराण हि तीनच राष्ट्रे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी आहेत. त्यांत तुर्की आणि इराण ह्या दोन्ही देशांत अत्याधुनिक अस्त्रे निर्माण करण्याची शक्यता आहे. इराण मधील अभियंते, वैज्ञानिक अनेकदा विदेशांत जाऊन नाव कमावतात. समृद्धी आणि शांती आल्यास ह्या देशात जास्त प्रगती होईल आणि पेलेस्टिन लोकांची बाजू घेणारा एक प्रमुख देश म्हणून इराण पुढे येऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या देशांत अराजकता माजवून आपली व्याप्ती वाढवणे हे इस्राएल चे धोरण आहे. त्यांत इराण मध्ये अराजकता माजवणे हेच इस्राएल ला हवे आहे. इस्राएल ने फक्त खोमेनी ह्यांची हत्या नाही केली तर इतर प्रमुख नेते जे देशाला नेतृत्व देऊ शकत होते त्यांची सुद्धा हत्या केली आहे. अमेरिका सध्या कर्डीश लोकांना हत्यारे पुरवत आहे त्यातून फक्त गृहयुद्ध होणार आहे आणि इराण चा इराक होण्याची भीती आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 03/03/2026 - 18:09 नवीन
हे ट्रंप आणि नेतान्याहू यांचं खाजगी युद्ध आहे. ट्रंपने काँग्रेसची परवानगी न घेताच युद्ध सुरू केलं आहे. ट्रंपच्या गळ्याशी आलेल्या एपस्टीन धारिका आणि नेतान्याहू यांच्या गळ्याशी आलेला भ्रष्टाचार यांच्यावरनं लोकांचं लक्ष उडवण्यासाठी या दोघांनी इराणवर हल्ला केला आहे. आता लवकरंच रशिया-युक्रेन युद्ध थंड पडेल. इराण म्हणजे इराक नव्हे. इराक हा कृत्रिम रीत्या सीमा आखून निर्माण केला गेलेला देश आहे. इराणचं तसं नाही. हा प्राचीन काळापासून एकसंध संस्कृती असलेला देश आहे. अरबी मुस्लिमांनी फारसी साम्राज्याशी लढाया करून ते कोसळवलं. त्यातनं पुढे प्रथम सरदारांचं व कालांतराने हळूहळू जनतेचं पंथपरिवर्तन झालं. या काळांत ( इ.स. ६५० ते इ.स. १५वे शतक ) मध्यवर्ती इराणी सत्ता नव्हती. अनेक छोटीछोटी राज्ये नांदंत होती. त्यांना सफावींनी एकत्रित करून इराणी साम्राज्य पुनरपि उभारलं. त्यामुळे इराणमध्ये राजधानी ( म्हणजे मध्यवर्ती सत्तेचं स्थान ) सतत बदलंत आलेली आहे. इराकमध्ये अमेरिकेने काहीही लक्ष्य प्राप्त केलं नाही. इराणच्या बाबतीत त्याहून वेगळं काहीही होणार नाहीये. उलट अमेरिकेचं नुकसान जास्त होईल. छोट्याश्या व्हियेतनामात अमेरिकेस नामुष्कीने मोहीम सोडावी लागली होती. इथे आकाराने आणि लोकसंख्येने प्रचंड मोठा इराण आहे. बघूया किती दिवस उत्साह टिकतो ते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 03/03/2026 - 20:04 नवीन
या युद्धामुळे दुबईत अडकलोय. कधी परतणार सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 03/03/2026 - 21:25 नवीन
श्रीगुरुजी, तुम्ही सुरक्षित असोत व सुखरूप परतोत, ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/04/2026 - 04:11 नवीन
रविवारी रात्री पासून महाराष्ट्रातील दुबई, अरब अमिरातीत अडकलेल्यांची सुटका सरकार करीत आहे. महाराष्ट्रात ही जवाबदारी गिरीष महाजन यांच्याकडे दिलेली आहे, ट्वीट करा किंवा आपणास हवा असल्यास गिरीष महाजनांशी संपर्क करता येईल अशा साधन व्यक्तींकडून फोन क्रमांक मिळवून देईन. आवश्यकता असल्यास व्य.नी करा. काळजी घ्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Wed, 03/04/2026 - 04:21 नवीन
सुरक्षित रहा व लवकर परत या ही ईश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/04/2026 - 06:16 नवीन
का़ळजी घ्या. सुरक्षित राहा. तुम्ही लवकरात लवकर तिथून सुटून परत याल ही अपेक्षा आणि तशी सदिच्छा.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 03/03/2026 - 21:44 नवीन
इराणी नेतृत्व हे कट्टरवादी असले तरी इस्रायली नेतृत्व सुद्धा अत्यंत भ्रष्ट, अनैतिक आणि हिंसक आहे. इराण मध्ये यादवी माजवून आपल्या सीमा वाढवणे, गाझा पट्टीतील आपली अमानुष हिंसा लपवून जागी नजर इतर ठिकाणी वळवणे. अमेरिकन राजकारण्यांना ब्लॅकमेल करून आणखीन पैसे आणि हत्यारे उकळणे हे बीबी ह्यांचे कारस्थान आहे. इराणी युद्ध लवकर संपणार नाही. बहुसंख्य इराणी हे इस्लामी असले तरी आपल्या "दक्षिण आशियाई" इस्लामिक समाजाप्रमाणे धर्मांध नाहीत. त्यांचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे पण बीबी आणि ट्रम्प हे इराणी उद्धारक नाहीत. इराण हे शिया राष्ट्र आहे., काश्मीर मध्ये शिया मुस्लिमांचे प्रमाण जास्त असल्याने नेहमीच त्यांनी काश्मिरी फुटीरता वादाला प्रोत्साहन दिले आहे. हे प्रोत्साहन खरोखरीचे होते कि फक्त दिखाव्याचे होते हे ठाऊक नाही. इराण मधील राज्यकर्ते बदलले आणि त्या ठिकाणी ट्रम्प हे सांगकामे आले तर त्याची काश्मीर विषयी जी भूमिका आहे त्याला आपोआप ट्रम्प चे सामर्थ्य सुद्धा मिळू शकते. इराण मध्ये यादवी माजली तर रशिया चीन आणि अमेरिका तिन्ही राष्ट्रें विविध बाजूनी तिथे हत्यारे ओततील. त्यातील काही पाकिस्तान मध्ये पोचतील किंवा अमेरिका पाकिस्तान मधील बेस मधून त्यांचा पुरवठा करेल. अमेरिकन सैन्य पाकिस्तानी बेस वर राहील तर तिथे हल्ला करणे भारताला जड जाईल. त्यामुळे भारतांत विविध आतंकवादी हल्ले होण्याची शक्यता जास्त आहे. इराण आण्विक अस्त्रें निर्माण कण्याच्या जवळपास सुद्धा नाही. इराण ने कुणावरही विशेष हल्ला करण्यात रस दाखवलं नाही. ऑपेरेशन Midnight हॅमर नंतर सुद्धा इराण ने काहीही हालचाल केली नव्हती. विश्व शांतीला इराण पासून धोका होता हे व्यक्तव्य इराक युद्धाच्या कारणांच्या इतकेच मूर्खपणाचे वाटते. ये युद्ध तात्काळ संपो हि प्रार्थना !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/04/2026 - 02:35 नवीन
आपल्याला जागतिक दादागिरीचं राजकारण कळत नाही. पण, कोणत्याही देशाचे पंतप्रधान -राष्ट्रप्रमुख अन्याय करणारे असतील किंवा त्यांचे इतर काही दोष असतील. एकीकडे चर्चा करायची आणि युद्धाची कल्पना न देता राष्ट्रप्रमुखांना मारणे काही योग्य वाटले नाही. उद्या आपलं धोरण आणि अनुषांगिक गोष्टीमुळे अमेरिकेशी पटलं नाही तर....? जागतिक राजकारणात एक अत्यंत धोकादायक पायंडा पडला आहे. जर आज महासत्तांनी राष्ट्रप्रमुखांना मारणे सामान्य केले, तर भविष्यात इतर देशही त्यांच्या सोयीनुसार याचे अनुकरण करू शकतील असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 03/04/2026 - 05:24 नवीन
"कोणत्याही देशाचे पंतप्रधान -राष्ट्रप्रमुख अन्याय करणारे असतील किंवा त्यांचे इतर काही दोष असतील. एकीकडे चर्चा करायची आणि युद्धाची कल्पना न देता राष्ट्रप्रमुखांना मारणे काही योग्य वाटले नाही" सहमत. नेत्यान्याहु हा एक नंबर भ्रष्टाचारी आहे. ईस्रायल म्हंटले की 'हुशार पण बिचारे ज्यु' अशी प्रतिमा तयार होते. २००६ पासुन हा म्हातारा "ईराण दोन आठवड्यात अणुबाँब बनवणार आहे" असे सांगत फिरत होता.जगात आजवर अनेक युद्धे झाली. पण देशप्रमुख आणि त्याच्या कुटुंबालाच टार्गेट करण्याचे हे पहिले उदाहरण.भारत-पाकिस्तान युद्धे झाली पण ना भारताने शरीफ ह्यांना मारले ना पाकिस्तानने वाजपेयी ह्यांना. खेमेनी ह्यांच्या हत्येवर भारत मौन पाळणार ही अपेक्षा होतीच. प्रतिक्रिया दिली तर ईस्राय्ल्/अमेरिका रागावतील असे नाही पण प्रतिक्रिया न देण्यामागे काहीतरी वेगळे कारण आहे. भारत अमेरिका/ईस्रायलच्या मागे फरफट्त जात आहे असे चित्र तयार झाले आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 03/04/2026 - 05:28 नवीन
तात्विक दृष्टीने मान्य आहेच पण उपयोगितावादी दृष्टिकोनातून सुद्धा चुकीचे वाटते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/05/2026 - 01:01 नवीन
अध्यक्ष ट्रंपच्या कृतीचे समर्थन कॉन्ग्रेसकडून अजून झालेलं नाही. पुढच्या आठवड्यात. देशाचा आणि आंतरराष्ट्रीय कायदे मोडणारे युद्ध आहे असे कायदेपंडीत व्यक्त करत आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/04/2026 - 03:33 नवीन
काही लोक द्वेष उभे करण्यात पटाईत असतात. कायम हिंदू-मूस्लीम यज्ञकुंडात आहुत्या ओतत असतात. इराण हा कट्टर मुस्लीम देश आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अशा देशांचा कडकडून विरोध करुन असे देश मातीत घातले पाहिजे अशी मांडणी असते या चर्चाप्रस्तावाचे प्रास्ताविक वाटले. प्रत्येक देशाची आपली धोरणे आहेत. स्त्री-पुरुष समानतेपासून ते अभिव्यक्ती, शिक्षण, राष्ट्राची धोरणे ही अधिक सर्वसमावेशक प्रगतीची असली पाहिजेत यात काही वाद नाही, तसे असलेच पाहिजेत. एक मुद्दा प्रास्ताविकात दिसला की, काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी वगैरे.......भारताचे इराणशी दीर्घकाळापासून संबंध निव्वळ धोरणात्मक नसून ते सांस्क्रुतिक देखील आहेत. काश्मीरबाबत १९९४ मधे संयुक्त राष्ट्र्राच्या मानवाधिकार आयोगात भारताविरुद्ध ठराव मांडण्यात आला तेव्हा तेहरानने या प्रयत्नांना रोखले होते. या नाजूक प्रश्नाचं अधिक आंतरराष्ट्रीयकरण होण्यापासून रोखले होते. इराणने चाबहार बंदर उभारण्यास सहकार्य केले. दहावर्षीय करार केला. आपल्याला इराणकडून काय काय फायदे होते वगैरे इत्यादि. ( दुवा ) एप्रिल २००१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या इराण दौऱ्यात भारत आणि इराणमध्ये ऐतिहासिक 'तेहरान घोषणा' करण्यात आली. या अंतर्गत, चाबहार बंदर विकासासह, ऊर्जा, व्यापारातील सहकार्य आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्यासाठी संयुक्त धोरण आखण्याबाबत सहमती दर्शवली वगैरे. इस्त्रायलीशीही आपले शेती, संरक्षण, तंत्रज्ञान इतर असे संबंध आहेत वगैरे. सारांश असा की, आपले दोन्ही देशाशी राजनैतिक संबंध आहेत, अशा वेळी आपल्या देशाचं 'मौन' आपल्या आंतरराष्ट्रीय छबीला सर्वांपासून अलिप्त करणारी आहे, असे वाटायला लागते. जाणकारांनी माहितीत भर घालावी. सोनिया गांधी (राज्यसभा सदस्य ) यांनी आजच्या लोकसत्तात 'नैतिक वारसा जपू या..संसदेत बोलू या' सविस्तर लेख लिहिला आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/04/2026 - 05:24 नवीन
लोकसत्तामध्ये आलेले लेख लिंक मधून पूर्ण उघडत नाहीत. असो. पण विषय समजला. खोमेनी हत्येचा निषेध पंप्रधानांनी शेवटी काल केला असं समजलं. बाकी राहुलबाबा अमेरिकेत जाऊन भारत सरकारविरोधी भाषणं ठोकतात याबद्दलही सोनिया गांधींनी समर्थन द्यावे. त्यांचे सरकारही तीन वर्षांनी सत्तेत येणार आहे तर जनमत तयार करणे, भूमिका स्पष्ट करणे हेसुद्धा कामच आहे. अमेरिकेविरोधी आहे तर अशी भाषणे अमेरिकन जनतेला कशाला ऐकवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/04/2026 - 08:55 नवीन
लोकसत्ता पेड़ व्हर्जन असल्यामुळे मला लिंक उघड़तात. पुढील वेळी काळजी घेईन.. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 03/04/2026 - 05:16 नवीन
काही भारतीयांना जगात कुठेही युद्ध सुरु झाले की भारताचा स्टँड काय आहे हे लगेच जाहिर करायची फार उत्सुकता लागून राहते. सध्याचे जिओपॉलीटीक्स कधी नव्हे ते गुंतागुंतीचे झाले आहे. यात काळे पांढरे भाग कमी आहे राखाडी भाग जास्त प्रमाणात आहे. घरात आईचे आणि बायकोचे भांडण झाले की एक नवरा म्हणून आणि एक मुलगा म्हणून कोणाची बाजू घ्यायची असा प्रश्न उभा राहतो तेव्हा आपले तोंड बंद ठेवणे हेच जास्त फायद्याचे असते असे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. एवढे करुनही बायकोचा बैल आणि आईच्या ताटाखालचं मांजर ह्या उपाध्या मिळतातच. अशा भांडणात शादीशुदा बंदा ना घर का ना घाटका ही अवस्था न टाळता येण्याजोगी आहे. मला वाटते एवढा कॉमन सेन्स प्रत्येक लग्न झालेल्या भारतीय पुरुषाचे ठायी असावा(च). कधी कधी कोणतीही भुमिका न घेणे हीच सर्वोत्तम भुमिका असते असे पी.व्ही. नरसिंह राव यांनी म्हटल्याचे कोणीतरी दुसर्‍या धाग्यावर लिहिले होते. रावांबद्द्ल आदर होताच, हे वाक्य वाचून तो दुणावला. चीन आणी रशिया डिंगा हाकतील पण प्रत्यक्ष युद्धात कधीही उतरणार नाहीत. पडद्यामागे मदत जरुर करतील. इस्त्रायलने पुन्हा इराणमधे 'प्रेअर' अ‍ॅप हॅक करुन आपले संदेश योग्य जागी कसे पोहोचविले याच्या सुरस कहाण्या जालावर वाचता येतील. उद्या भारतात व्हॉटसअ‍ॅप सारखे अ‍ॅप हॅक करुन अनागोंदी माजणार नाही याची खात्री देता येत नाही. उद्या देव न करो पण अमेरिका आणि भारत यांचे युद्ध झाले (शक्यता अशक्य कोटीतील असली तरी नाकारण्यासारखी नक्कीच नाही ) तर इस्त्रायल मदतीला येऊ शकणार नाही. त्यामुळे भारताने आतापासूनच धडा घेऊन संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या बजेटमधे मागील कित्येक वर्षांपेक्षा जास्त भरघोस तरतुद केली आहे पण संथ गतीने चालणारी R&D ची कासवचाल बदलावी लागेल. चीनच्या HQ-9 या भरवश्याच्या म्हशीला इराणमधे पुन्हा एकदा टोणगा झालेला आहे. त्यामुळे जगात अमेरीका, चीन सोडून शस्त्रांसाठी तिसरा पर्याय नक्कीच शोधला जात आहे. भारताने ही संधी साधली पाहिजे. अमेरीकेच्या कुरापती पाहून लवकरच चीन तैवान ला घशात घालेल असे वाटते. बलोच योद्यांनी / अफगाणांनी पाकीस्तानला भंडावून सोडले आहे. त्यांना पडद्यामागून योग्य मदत मिळाली तर पाकीस्तानचा इलाज होऊ शकतो कारण दोन मांजरांचे भांडण अगोदरच चालू आहे. बोक्याने लोण्याचा गोळा पळवता आला तर बघावा. पाकीस्तानमधे अमेरीकी दुतवासावर हल्ला झाला आणी अमेरीकी सैन्याने पाकड्यांनाच गोळ्या घातल्या. शाहबाज शरीफ आणी आसिफ मुनीरची काय प्रतिक्रिया आली ? सगळ्यात जास्त वाईट ज्यूं बद्द्ल वाटते. जर्मन, ब्रिटीश आणि युरोपने ज्यूंवर केलेल्या अत्याचारांतून आपली मान अलगद सोडवून घेतली आणि धर्मवेड्या ज्यूंना पवित्र भूमी चे गाजर देऊन त्याबरोबर मुस्लिम शत्रु कायमचे गळ्यात बांधले. तुमच्याकडे कितीही सुबत्ता असू द्या, रात्री जर सुखाने झोप येणार नसेल तर त्या पवित्र भुमीचा काय फायदा ? ट्रंप कदाचित निवडणूकीत पराभूत होईल देखील पण जे नुकसान व्हायचे ते होऊन गेलेले असेल. शेवटी जिसकी लाठी उसकी भैस हेच खरे ! देवाच्या दुनियेत न्याय नाही हेच खरे ! स्वर्ग आणि नरक खोट्या कल्पना आहेत झालं !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/04/2026 - 05:26 नवीन
हो पटतंय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/06/2026 - 07:42 नवीन
@ धर्मराज मुटके कधी कधी कोणतीही भुमिका न घेणे हीच सर्वोत्तम भुमिका असते बऱ्याच भंपक प्रतिसादात तुमचा प्रतिसाद सर्वात समतोल आहे असं जाणवतं. ट्रम्प तात्यांनी टेरीफ लावल्यावर सुद्धा हीच माणसं असाच भुभु : कर करत होती बाकी इस्रायल आणि ज्यू द्वेषाने भरलेले प्रतिसाद आणि त्याला मोदीद्वेशाची फोडणी पाहून त्यांच्या वाचनाबद्दल कल्पना येते. त्याचा सहज प्रतिवाद करता येईल पण आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही या वचनाची आठवण झाली. असो
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 03/04/2026 - 05:17 नवीन
इराणच्या सर्वोच्च पदी मोजतबा खामेनी? अयातुल्ला खामेनींच्या निधनानंतर मुलाकडे देशाची सूत्रे आली आहेत यातच इराण कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट झाले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/04/2026 - 07:58 नवीन
मिपाकर कुंदन चौधरी दुबईत भेटले. त्यांची खूप मदत होतेय. दुबईत तसे सर्व काही सुरळीत आहे. रविवारी आम्ही रहात असलेल्या हॉटेलसमोर ५०० मीटर अंतरावर एक इंटरसेप्ट केलेले ड्रोन पडले. पडल्यानंतर खूप काळा धूर बराच वेळ दिसत होता. रात्री दोन वेळा फोनवर क्षेपणास्त्र हल्ल्याचे सरकारी ॲलर्ट कॉल आले. कालच येथील अमेरिकेच्या दुतावासावर रॉकेट/ड्रोन आदळून इमारतीला मोठी आग लागली. अमेरिकने तेथील सर्वजण आधीच बाहेर काढल्याने काही हानी झाली नाही. परंतु त्यामुळे परत जाणाऱ्या विमानसेवेवर परीणाम झालाय जी प्रायोगिक तत्वावर अत्यल्प प्रमाणात सुरू केली होती. काही जण चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करताहेत, परंतु त्याचे परतीचे तिकीट ९५,००० - १,२०,००० सांगितले आहे. एकंदरीत अत्यंत अनिश्चितता आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 03/04/2026 - 13:53 नवीन
कोल्हापूरची काही मंडळी अडकली आहेत तिकडे. त्याना प्रत्येकी १५०० दिराम्स देण्यात आले अशी बातमी ऐकली.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 03/04/2026 - 14:11 नवीन
तेल ही काळी लक्ष्मी आहे. लक्ष्मी सांभाळायची असेल तर सुदर्शन चक्रधारी विष्णू बनावे लागते. तसे नसेल तर शक्तिशाली विष्णूला फल पुष्प अर्पित करावे लागते. ज्यांना दास्यभक्ती आवडत नाही आणि स्वतःही शक्तिशाली नाही अशांचा विनाश हा होतोच. हीच जगाची रीत आहे. ज्या घटकेला सर्वात प्रसन्न रशिया असेल. वाढत्या तेलाच्या किमती रशियाच्या युक्रेन विरुद्ध युद्धाचा खर्च भरून काढेल. युक्रेनला मदत मिळणे आता कठीण झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनही प्रसन्न असेल. इराणचे जेवढे नुकसान होईल ते दुरुस्त करण्याचे कॉन्ट्रॅक्ट चायनीज कंपन्यांनाच मिळेल. दोन्ही देश कधीही प्रत्यक्ष मदत इराणला करणार नाही. पण युद्ध सुरू राहिले पाहिजे त्यासाठी अप्रत्यक्ष शस्त्रांची मदत करत राहतील. अमेरिका ही महाग तेल विकून युद्धाचा खर्च काढेल. भारताला रोज 40 ते 50 लक्ष बॅरल तेल लागते. युद्ध अधिक काळ लांबले तर युरोपियन देशांप्रमाणे भारतातील तेलाच्या किमती दीडशेच्या वर जातील. भारतीय शस्त्रांची मागणी ही जगभरात वाढेल. बहुतेक पुढील वर्षातच लक्ष कोटी पेक्षा जास्त शस्त्रांचा निर्यात भारत करेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/05/2026 - 17:53 नवीन
भारतीय शस्त्रांची मागणी ही जगभरात वाढेल. बहुतेक पुढील वर्षातच लक्ष कोटी पेक्षा जास्त शस्त्रांचा निर्यात भारत करेल.
अरे हो काका, ते एक सांगा ना. आता २३ हजार कोटीची शस्त्रे निर्यात एक लक्ष कोटीपेक्षा जास्त होईल सोबतच आत्ता ४० हजार कोटीची बीफ निर्यात दोन लक्ष कोटीपर्यंत जाईलच ना. . ती शस्त्रे चालवायला सैनिकांना ताकद नको का? शिवाय अमेरिका ही महाग तेल विकून युद्धाचा खर्च काढेल. भारताला रोज 40 ते 50 लक्ष बॅरल तेल लागते. युद्ध अधिक काळ लांबले तर युरोपियन देशांप्रमाणे भारतातील तेलाच्या किमती दीडशेच्या वर जातील. मग आपल्यालाही खर्च काढावाच लागेल हा लाखभर कोटीचा. . "अमूल दूध पिता है इंडीया" सोबतच हे पण "इंडीया की बीफ खाती है दुनिया".
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 03/04/2026 - 22:02 नवीन
इराणने तेल अविव मधील हाकिरीया विभागातील इस्रायलच्या संरक्षण खात्याच्या इमारतीच्या आसपास क्षेपणास्त्र डागले आहे : https://www.ndtv.com/world-news/video-moment-iranian-missile-breaches-israels-iron-dome-hits-tel-aviv-8664536 ही बातमी खरी आहे का? -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/05/2026 - 06:59 नवीन
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने वेनेझ्युएलाचे अध्यक्ष मादुरोंना राजधानी कॅराकासमधून उचलून अमेरिकेला नेले. त्यावेळेस भारत सरकारने त्या घटनेचा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा नाही ते सोनिया गांधींनी पेपरात भारत सरकारचे परराष्ट्रधोरण कसे चुकते आहे यावर लेख नाही लिहिला. आता इराणमध्ये खामेनी या अत्यंत धर्मांध म्हातार्‍याला अमेरिका-इस्राएलने ठार मारल्यावर आणि मुख्य म्हणजे भारतात त्याविरोधात शांतीदूतांनी निदर्शने केल्यानंतर मात्र सोनियांना लेख लिहायचे सुचले. एका देशाच्या प्रमुखाला दुसर्‍या देशाने असे ठार मारणे निषेधार्ह असेल तर मग एका देशाच्या प्रमुखाला दुसर्‍या देशाने असे उचलून नेणे समर्थनार्ह आहे का?की भारतात शांतीदूतांनी निदर्शने केल्यानंतर आपली व्होटबँक वाचवायला म्हणून सोनिया पुढे आल्या आहेत?आणि इराणमध्ये तो धर्मांध म्हातारा मेल्यावर इराणी स्त्रियांनी जाहीरपणे आनंद व्यक्त केला त्याचे काय? तरीही तो म्हातारा मेल्याचा निषेध सोनिया करणार? मग इतर वेळेस स्त्रियांचे अधिकार, स्त्रियांचा सन्मान वगैरे बडबड चालू असते ती आता कुठे गेली? सगळ्यात आश्चर्य वाटते भारतातील डापु गँगमधील लोकांचे. सोनिया काहीही म्हटले तरी राजकारणी आहेत आणि त्यांना आपल्या मतांची फिकीर असणारच. पण या डापु गँगच्या लोकांचे काय? मागे अफगाणिस्तानचा परराष्ट्रमंत्री भारतात आल्यावर आणि त्याच्या पत्रकार परिषदेला स्त्री पत्रकार नकोत म्हटल्यावर त्या लोकांनी किती आकांडतांडव केले होते. मग इतकी वर्षे इराणी स्त्रियांना बंधनात जखडून ठेवलेला मेला म्हटल्यावर त्या लोकांना पण आनंद व्हायला होता ना? पण कुठचे काय. ही विसंगती कशी समजावून घ्यायची? अर्थात त्या लोकांचा अजेंडा एकच आहे- हिंदूद्वेष आणि शांतीदूतांचे लांगूलचालन. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी भारतात विधवा स्त्रियांचे केशवपन केले जायचे म्हणून हिंदू कित्ती कित्ती बुरसटलेले असे म्हणणारे लोक आता अगदी २०२६ मध्ये स्त्रियांना बुरखा आणि हिजाबमध्ये कोंडणार्‍या आणि निकाह हलाला सारख्या प्रथा राबविणार्‍या लोकांविरूध्द ब्र ही काढत नाहीत. माणसाने कित्ती कित्ती ढोंगी असावे याचे हे डापु गँगवाले अगदी मूर्तीमंत उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/05/2026 - 07:17 नवीन
त्या पेक्षा एपस्टिन फाईल्सच्या भीतीने अमेरिका इस्राईलचा निषेधही न करणाऱ्या मोदींविरुद्ध काहीही न बोलणाऱ्या अंधभक्तांचा निषेध केला पाहिजे. माणसाने कित्ती कित्ती ढोंगी असावे याचे डापू गँगपेक्षा मोठे उदाहरण म्हणजे हे भाजपचे अंधभक्त आहेत. भाजपेयीना नीतिमत्ता नसते हेच खरे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 03/05/2026 - 07:39 नवीन
एपस्टिन फाईल्स मध्ये असं कांय लिहिलं आहे म्हणून भाजपा घाबरत आहे? कांय माहिती असेल तर लिहा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/05/2026 - 07:46 नवीन
:) उघडा डोळे, बघा नीट!
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 03/05/2026 - 07:51 नवीन
मला वाटलं होत खरंच काहीतरी लिहिलं असेल म्हणून भाजप घाबरतेय.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 03/05/2026 - 15:05 नवीन
खरोखरच काहीतरी आहे अन्यथा भारत एवढा झुकणार नाही ईस्रायल/अमेरिकेपुढे. आपण एवढे अगतिक नाही की देशप्रमुखाच्या हत्येवरही प्रतिक्रिया देण्याची आपणास भीती वाटावी. आता खूपच टीका होउ लागल्यावर लोकलज्जेस्तव प्रतिक्रिया दिली.(परराष्ट्र खात्याने.. पंतप्रधानांनी नाही)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/05/2026 - 15:13 नवीन
माई अमेरिका नाक दाबून तोंड. उघडत आहे भारताचे!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/06/2026 - 07:45 नवीन
माजलेल्या सांडाशी टक्कर घेण्याची आपली क्षमता आहे का? आणि असली तरी ते शहाणपणाचे ठरेल का ? इतका मूलभूत विचार मोदिरुग्ण करू शकत नाहीत?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/06/2026 - 09:20 नवीन
ते ठिकाय हो, माजलेल्या सांडाशी पंगा घ्यायचं नाहीये. पण एपस्टिन फेल मधले आपले काळे कारनामे उघडू नये म्हणून अख्खा देश माजलेल्या सांडाच्या मागे फरपटवत नेण्यात काय अर्थ? इतका साधा विचार गोबरभक्त उर्फ अंधभक्त का करू शकत नाहीत?
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Fri, 03/06/2026 - 10:37 नवीन
AI ला सगळं विचारता तर एकदा त्या फाईल मध्ये नाव आहे का जेपण एकदा विचायच ना.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/06/2026 - 11:22 नवीन
ब्लॅकमेलिंग करणारा गोष्टी लपवून ठेवत असतो म्हणूनच ब्लॅकमेलिंग होत असते, उघड करून a i ला सांगून मग ब्लॅकमेलिंग शक्य आहे का? थोडा विचार करा!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/05/2026 - 13:54 नवीन
राष्ट्राध्यक्ष खामेनीच्या हत्त्येने इकडच्या गोबरपंथीय जमातीत सध्या आनंद आहे, या आनंदाचं पहिलं कारण असतं की मूस्लीम कट्टरवाधी धर्मांध मरण पावला. गोबरपंथीयांना ट्रंम्प आपला वाटतो आणि त्या अँगलने यांचं गुलाबजामून खाणं चालू असतं. डोक्याचा पत्ताच नाही, त्यामुळे यांच्या लॉजीकपुढे जगातले सगळे तर्कशास्त्र थकलेलं असतं. एखादा धार्मिक 'बुवाच्या' डोक्यावर जर जगात कुठे क्षेपणास्त्र पडलं असतं तर, परदेशात आमच्या धर्माला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे, अशी कोल्हेकुई सुरु झाली असती. इकडे, धार्मिक अजेंड्याचे मुद्दे कायदेशीर आणि संसदीय प्रक्रियेतूनच मार्गी लावले जात आहेत, ही अशावेळी 'धर्मांधता' नसते. कायदेशीर आम्ही धर्मांध देवभोळ्या आणि गोबर लोकांचे प्रतिनिधी आहोत, हे स्पष्ट सांगता येत नाही पण ते ठासविण्यासाठी सद्य सरकारला काय काय करावे लागते ते देशभर माहिती आहे. देश संसदीय मार्गाने चालतो नाही तर, 'धर्मशाही' नावाच्या एखादी व्यवस्था यांनी चालवली असते. आणि एखादा धर्मग्रंथ आदर्श मानून ही व्यवस्था चालवायला तयार झाले असते. कोणत्याही धर्माची कट्टरता आणि धार्मिक आंधळेपणा विनाशाकडे घेऊन जातो. आज महत्वाकांक्षी जागतीक दादागिरी करीत असलेल्या राष्ट्राचं क्षेपणास्त्र तिकडे पडल्याचं आनंद असेल पण त्या क्षेपणास्त्राचं तोंड कुठेही वळु शकतं हे भक्तांना कळले असे म्हणत असाल तर आनंद आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 03/05/2026 - 14:16 नवीन
त्यात त्या यु-ट्युबी पत्रकारांबद्दल बोलायलाच नको. ते भाउ तोरसेकर आणी त्यांच्या पत्नी स्वाती तोरसेकर. ! "ईराणने जगाला युद्धात ढकलले" ह्या असल्या त्यांच्या विधानावर हसायचे की रडायचे कळत नाही. ५/६ वर्षपुर्वी गिरीश कुबेरांनी भाऊ तोरसेकरांचा उल्लेख 'juvenile journalist" अल्पवयीन पत्रकार केला होता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/05/2026 - 14:29 नवीन
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराण विरोधात युद्ध पुकारले. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्य झाला. आज लाजे-काजे सहा दिवसानंतर भारताने आज त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सरकारच्या वतीने नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी खामेनी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या पुस्तकावर स्वाक्षरी केली. आता सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 03/05/2026 - 15:15 नवीन
आता सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं. का?? मला खामेनीचा प्रचंड राग होता. त्याच्या धर्मान्धपणाचा पहिल्या बळी इराणी स्त्रियाच होत्या. जरा जरी बुरखा हलला की थेट फाशी दिली जायची. तो अमेरिकाविरूद्ध लढत राहिला असा समज करत एका धर्मान्ध नेत्याला मोठं पाहण्याची अजिबात इच्छा नाही. हल्लेखोर इस्त्राइलचा निषेध!!
इराणच्या दक्षिण भागात असलेल्या होर्मोजगानमधील मिनाब शहरात २८ फेब्रुवारी रोजी एका शाळेवर हल्ला झाला. या हल्ल्यात १६५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला
सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 53 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा