Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

संगीत देवबाभळी : एक हृदयस्पर्शी नाटक

जनातलं, मनातलं

संगीत देवबाभळी : एक हृदयस्पर्शी नाटक

सदस्य
— लेखन
— प्रतिक्रिया
2026 पासून
📅
सदस्य झाले
13 March 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/19/2025 - 05:53

काल संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा प्रयोग होता. नाट्यगृह संपूर्ण भरलेलं. अनेकांना वेळेवर तिकीट मिळेल या अपेक्षेनेआलेल्या अनेक रसिकांचा हिरमोड झालेला दिसला. गर्दी तुडुंब. २०१८ पासून यानाटकाचे प्रयोग होत आहेत. जवळ जवळ सहाशेच्या आसपासचा हा प्रयोग होता. एकाच दिवशी दोन प्रयोग आमच्या शहरात होते.

sangeet-devbabhali-marathi-natak-coverv2-1536x864
संगीत देवबाभळी

दोन स्त्रियांची ही कथा आणि दोनच पात्रांचं हे सांगीतिक नाटक. यातल्या दोन्ही स्त्रिया विशेष आहेत. एक संत तुकारामाची पत्नी आवली आणि दुसरी विठ्ठलाची पत्नी रखुमाई. या दोन स्त्रियांच्या मनातला परस्पर संवाद म्हणजे हे नाटक. आपापल्या आयुष्यात मनामनाचं ओझं घेऊन वावरणा-या ही केवळ त्या दोन स्त्रियांची कथा नाही. समस्त् स्त्रियांचीच ही कथा वाटायला लागते. एक साक्षात विठ्ठलाची पत्नी आणि दुसरी एक कजाग म्हणून नावारूपास असलेली पण तितकीच प्रेमळ संत तुकारामाची पत्नी आवली.

नाटक सुरू होतं ते ‘अंधाराला दिशा नाही' या गायनाने आणि मग, भंडारद-याच्या डोंगरात नव-याला शोधायला निघालेल्या आवलीच्या प्रवासाने. आपल्या नवऱ्याला शोधत रानोमाळ फिरणाऱ्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो, तो काढण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाला अशा या कथेच्या कल्पनेचा विलास सुरु होतो. आवलीच्या पायात काटा रुततो आणि तिची शुद्ध हरपून जाते. आवली जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तीस्वत:च्या घरात असते. रखुमाई उर्फ लखुबाय तिच्या घरात स्वयंपाक करत असते. आवलीच्या स्वचा शोध सुरु होतो. आपल्या घरात ही कोण आहे. मी इथे कशी आली. संवाद होता होता, दोघीही भांडण करता करता बहिणीप्रमाणे कधी प्रेम व्यक्त करायला लागतात ते आपल्या लक्षातही येत नाही. दोघीही आपल्या मनातली सल व्यक्त करायला लागतात.

आपल्याला हे दोघेही पुरुष कसे दुर्लक्ष करतात असे वाटून दोघीही त्रागा करतात. विठ्ठलाने एका सामान्य स्त्री असलेल्या आवलीच्या पायात रुतलेला काटा काढण्यासाठी यावं ? या गोष्टीची मनावर झालेली जखम आवलीच्या पायात रुतलेल्या काट्यापेक्षा मोठी रखुमाईला वाटायला लागते. पोटूशी असलेल्या आवलीच्या घरात रुखुमाई तिची सेवा करते. आवलीच्या पायाची जखम त्रास असल्यामुळे संपूर्ण नाटकभर आवली तिरपा पाय करत लंगडत चालते. भक्तांच्या प्रेमात पडलेला 'विठ्ठल' आणि विठ्ठलाच्या नादात पडलेला 'तुकाराम' या दोघांचाही शोध 'आवली' आणि 'रखुमाई' घेतात. नाटक हळूहळू मनाची पकड घेत पुढे सरकत जाते.

लखुबाई आणि आवली या दोघामध्ये रंगमंचावर संवाद सरू असतात. संवाद, गायन, संगीत, अभंगाचा आनंद घेणं ही यानाटकातली एक गोड पर्वणीच आहे. सर्वसामान्य स्त्रीया ज्या भावना व्यक्त करत असतात त्याच आवली आणि प्रत्यक्ष रखुमाई यांच्या आहेत. सर्वसामान्य महिला यांच्या मुखातून अधून-मधून एक प्रसिद्ध वाक्य येत असते. 'माझ्यामुळे चाललंय हे सगळं' दुसरीकोणी असती तर आतापर्यंत सोडून गेली असती' अशी तक्रार रखुमाई सुद्धा करते. रखुमाईच्या तोंडी हे वाक्य जेव्हा येते तेव्हा नाट्यग्रुहात प्रेक्षकांच्या गाली हलकी खसखस पिकते आणि टाळ्यांचा कडकडाटही होतो. सामान्य स्त्रीचं जे दु;ख आहे, त्या दु⁚खाचं चित्रण इथे यायला लागतं. दिवसरात्र 'पांडुरंग पांडुरंग' करणारा नवरा आणि संसारात त्यामुळेच ही दशा आलेली आहे, तसा असूनही त्याची काळजी करणारी सामान्य स्त्री आवली. तिच्या दुःखाला, मनातल्या भावनेला, वाचा फोडते. स्त्रीच्या दुःखाला पारावर नसतो. स्त्रीच्या मनाचा विचार दोघेही करीत नाही अशी एक सल दोघींच्या मनात उमटते. साहित्यातील स्त्रीवादाची जाणीव येथे होते ( हे राम )

कृष्णाने द्वारकेत आल्यानंतर राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रुक्मिणी रुसून दिंडीरवनात आली. कृष्णावर रुसून दिंडीरवनात आलेली रुक्मिणी म्हणजेच रखुमाई उर्फ लखूबाई जी आवलीच्या घरात येते. विठ्ठलावर रागावून वेगळी आणि एकटी असलेली लखूबाईचं दुःख आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि अभंग लेखनात घर दार विसरून दिवस रात्र विठ्ठल नामात रंगलेल्या तुकारामांमुळे घरात एकटीच असलेली आवली दोघींची व्यथा एकच. आपल्या नवऱ्याला दुसरीने नावं ठेवली की दोघीही एकमेकांवर खवळून उठतात. आवलीची सेवा करताना, सतत तिच्या मुखातूनआपल्या नवऱ्याला मिळणाऱ्या शिव्या ऐकण्याची दुहेरी कसरत लखुबाईला करावी लागते त्यावेळीचे हावभाव अप्रतिम आहेत.

एकदा तर, लखूबाई आवलीला विचारते, ‘’सुखवस्तू माहेर असताना या अठरविश्र्व दारिद्र्य असलेल्याघरात, तू का पडून राहिलीस ? का नाही सोडून गेलीस हे घर ? त्यावरचं आवली लखुबाईला म्हणते, ‘’रागावून निघून जायला मी रखुमाई थोडीच आहे. आणि मी निघून गेल्यावर यांची काळजी कोण घेणार ? निघून गेल्यावर पुन्हा परतावं असं वाटलं आणि आपलं घरच हरवून गेलेलं असलं, तर काय करायचं बाई ? अतिशय मार्मिकआणि आजच्या काळातही लागू व्हावा असा प्रश्न आणि असे उत्तर. तर, युगायुगाचा अबोला आहे, असं रखुमाई बोलते तेव्हा आवली तिला म्हणते. ‘’असं रुसल्यावरसोडून जायचं असतं व्हय बये ? घरावर रुसून निघून गेले, आनी परत यायची इच्छा झाली तेव्हा घर जागेवर नसलं तर.? मानूस इसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई ”

तुकारामाची आवली ही कडकड करणारी, विठ्ठलाला लटक्या रागाने शिव्या देणारी आणी तितकीच प्रेमळ. तुकोबांनी रखुमाईला‘आई’ म्हटल्याने रिलॅक्स झालेली आवली. आणि काटा काढायचं निमित्त करून विठ्ठलाकडे संशयाने पाहणारी रखुमाई. स्त्री सुलभ भावनांच्या छटा या नाटकातही अतिशय सुंदर आल्या आहेत. पांडुरंग भक्तांवर इतका आणि का असा कसा प्रेम करतो ते बघायला आलेली लखुमाय. आयुष्यातली सगळी ओझी टाकून मनसोक्त पावसात भिजले पाहिजे. 'तू पहिल्यांदा पावसात केव्हा भिजली होती' असे आवलीला विचारणारी रखुमाई. आणि आता पुन्हा एकदा पावसात भिजूया हा प्रसंग सुंदर उभा केला आहे. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी डोळ्यांची कड ओलावून नाट्यगृह भिजून जाते.

लेखक दिग्दर्शक, प्राजक्त देशमुख आहेत. प्रसाद कांबळी निर्मीत 'संगीत देवबाभळी' यात आवलीची भूमिका शुभांगी सदावर्ते यांनी तर, रखुमाई उर्फ लखुमाय मानसी जोशी यांनी केली आहे. अप्रतिम अभिनय, प्रकाश, नेपथ्य, गायन, संगीत यांचं एक उत्तम नाटक बघायला मिळतं. तुकाराम प्रत्यक्ष रंगमंचावर न येता केवळ 'पांडुरंग पांडुरंग' या ध्वनीने येणारा तुकाराम, इंद्रायणीचा काठ, स्वयंपाकघर, नेटकं अप्रतिम नेपथ्य आणि तितकीच उत्तम प्रकाशयोजना.

नाटक संपल्यानंतर संपूर्ण नाटकभर आम्ही दोघींनी सर्वच गायन केलं आहे, हे सांगितल्यावर पुन्हा टाळ्यांचा कडडाट होतो. आवली रखुमाईला ओळखते का ? आणि रखुमाईला विठ्ठल इतकी भक्तांची का काळजी करतो त्याची उत्तर मिळतात का ? त्यासाठी नाटक बघितले पाहिजे. एकाच दिवशी दोन प्रयोग. नाटकही करायचं. नाटक संपल्यानंतर दोन्हीही कलाकार प्रेक्षकांना भेटतात, संवाद करतात. सर्वांना तितक्याच उत्साहाने बोलतात. आम्हीही भेटून घेतलं, फोटोही काढला. दोघींच्या कामाचं कौतुक केलं. अशी कौतुकं कितीदा तरी त्यांनी ऐकली असतील पण त्यांचं आवर्जून भेटणं, बोलणं रसिक म्हणून आनंद देऊन जातो ‘’ ये गा ये गा विठ्ठला ये गा येई गा विठ्ठला | प्राण हा फुटला आळविता || ये गा येई गा विठ्ठला’’ पडदा.

  • Log in or register to post comments
  • 5129 views
💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा