रस्त्यावरील अपघात --चूक कोणाची?
नमस्कार मंडळी सध्या बरेच दिवस पुण्यातील (किंवा इतरत्रही) रस्त्यावरील अपघातांचा विषय चर्चेत आहे. एकुणातच अपघातांचे प्रमाण आणि चालकांची मग्रुरी किंवा बेपर्वाई वाढली आहे असा एक सार्वत्रिक निष्कर्ष त्यातून काढला जातो. बहुतेक वेळा अपघात झाला की चूक चालकाचीच असे समजून त्याला चोप दिला जातो. पोलीस केस होते वगैरे वगैरे. पण याची दुसरी बाजू कोणी बघतो का?
मी चालकांच्या बाजूने मुळीच बोलत नाहीये, अपराध्याला शासन हे झालेच पाहिजे पण नेहमी चूक फक्त चालकाचीच असते का? मला खटकणारे काही मुद्दे इथे मांडतो आहे
--रस्त्यावरील अतिक्रमणे - आजकाल अनेक मुख्य रस्ते आणि गल्ल्या अतिक्रमणाने व्यापल्या आहेत. बघता बघता एखाद्या कोपऱ्यावर एक टपरी लागते, कालांतराने तिथे पत्रे, मग कच्चे बांधकाम ,मग पक्के बांधकाम असे होत जाते. बहुतेकदा या सगळ्याला स्थानिक गुंडपुंड नगरसेवक यांची मान्यता असते. त्यामुळे कोणी बोलत नाही. या टपरीच्या आजूबाजूने मग अजून टपऱ्या उभ्या राहतात. तिथे येऊन खाणारे पिणारे तिथेच आडव्या तिडव्या गाड्या लावून खातात. त्यामुळे मूळ २ गाड्या जाऊ शकतील असा रस्ता जेमतेम एक गाडी जाईल इतकाच राहतो. इथे अपघात झाला तर जबाबदार कोण ? चालक, की टपरीवाला की तिथे कशाही गाड्या लावणारी गिऱ्हाइके किती हप्ता घेणारे गुंडपुंड?
- बेशिस्त वाहतूक- सिग्नल न देता गाड्या वळवणे, अचानक यु टर्न घेणे, दुचाकी कशाही दामटणे, उलट साईडने येणे , ट्रिपल सीट , अरुंद रस्त्यावर पार्किंग करणे यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार?
-अवजड वाहने- शहरात बरेच ठिकाणी जुनी बांधकामे पडून नवीन केली जातात. जुनी इमारत ३-४ मजली असते तर नवीन १५-२० मजली. अर्थातच ती लवकर पूर्ण व्हावी म्हणून पाडकामाला जेसीबी पोकलेन , सिमेंट साठी मिक्सर ट्रक , राडारोडा वाहायला डंपर लागतात. छोट्या गल्ल्यांमध्ये ही वाहने वळवायला जागा नसते. त्यामुळे जिथे दुचाकी, तिचाकी जात होत्या तिथे अचानक ही राक्षसी वाहने धावू लागतात. यासाठी काही नियम आहेत की नाही? इथे अपघात झाल्यास कोण जबाबदार?
- रस्त्यावर तुंबणारे पाणी आणि गटारे- आत्ताच पुण्यात पाऊस पडून गेला आणि ठिकठिकाणी पाणी साठले. नाले सफाईत भ्रश्टाचार चालतो हे आता सगळ्यनांच माहिती आहे. शिवाय रस्त्यावरचे चुकीच्या पद्धतीने बुजवले खड्डे , नको तिथे बसवलेले पेव्हर ब्लॉक या पाणी तुंबण्यात भर घालतात. सगळीकडे चांगले फुटपाथ नसल्याने चालणारे रस्त्यामधून चालून हे सांडपाणी टाळायला बघतात. मग दुचाकी अजून रस्त्यामधून जातात आणि चारचाकीला जायला जागाच राहत नाही किंवा जेमतेम दुभाजकाजवळ एक लेन राहते. इथे अपघात झाल्यास कोण जबाबदार?
-बेशिस्त पार्किंग - बहुतेक जुन्या सोसायट्यांमध्ये पार्किंग उपलब्ध नसते आणि रहिवासी त्यांच्या चारचाकी रस्त्यावर लावतात. ही जागा माझीच अशी त्या जागांवरून भांडणेही होतात. छोटी गल्ली असेल तर सम विषम पार्किंगचा नियमही पाळला जात नाही. इथे अरुंद रस्त्यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार?
असे काही मुद्दे बरेच दिवस मनात घोळत होते म्हणुन मांडले ईतकेच.