Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

चार आर्यसत्ये - एक चिंतन

प
प्रसाद गोडबोले
Sat, 02/15/2025 - 07:57
💬 91 प्रतिसाद
प्रस्तावना : १. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही. २. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती ! ३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते ! माझे मत हे अंतिम विचार आहे , अंतिम सत्य आहे असा माझा दावा नाही , कधीच नव्हता. ४. निसर्ग परिवर्तनशील आहे, धर्म परिवर्तनशील आहे आणि मीही परिवर्तनशील आहे. त्यामुळे ही मते भविष्यात बदलुही शकतात. स्थलकालातीत अशा सुसंगतता , सातत्यता वगैरे मुल्यांचा मी आदर करीत असलो तरी मला त्यांचे बंधन नाही! ________________________________________ काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो . मुळात हिंदू असा धर्मच नव्हता. धर्माचे परंपरेचे नाव होते सनातन धर्म. जो की वेदोक्त श्रुती स्मृती पुराणोक्त वर्णाश्रम धर्माधारित मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग आहे. पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत. त्यांचे आचरण करणे जवळपास अशक्यप्राय च आहे आजच्या काळात . शुध्द बौध्द धर्माच्या तत्वांनी जगणारी अगदी मोजकी माणसे मी पाहिली आहेत तीही लडाख मध्ये फक्त. तसेच जैन धर्माचे वस्त्रांचा त्याग केलेले कोणत्याही छानछौकी आयुष्यापासुन दुर राहणारे अत्यंत मोजके जैन मुनीच मला दिसले आहेत , तेही पवई, मुंबई ह्या इथे ! आणि सनातन वैदिक धर्मातील अग्निहोत्रादि यज्ञ कर्मे करणारे , श्रुती स्मृतींच्या अनुसार आयुष्य जगणारे लोकं जे मला भेटले आहेत तेही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच ! बाकी बहुतांश समाज ह्या तिन्ही धर्मातील अर्धी मुर्धी तत्वे आपापल्या सोयी नुसार स्विकारुन जमेल तितके आपल्या धर्माच्या नितीमत्तांचे पालन करताना दिसतो . माझे कित्येक असे ब्राह्मण मित्र आहेत जे उघडपणे अमेरिकेत जाऊन स्टेक खाल्याचे कबुल करतात अन वरुन अमेरिकेतील गायी गायीच नाहीत असा प्रतिवादही करतात. काही जैन मित्र आहेत जे मटण रस्स्यातुन पीस बाजुला काढुन फक्त रस्सा ओरपतात ! आणि काही बौध्द मित्र आहेत की जे तंबाखु मद्य आदी निशिध्द व्यसने करतात ! जो तो आपापल्या क्षमतेनुसार , आपापल्या सोयी नुसार जमते तेवढे धर्माचे आरचरण करतो ! हे उत्तम आहे ! मुद्दा इतकाच की बहुतांश लोकातील कोणीही , शुध्द सनातनी , शुध्द बौध्द , शुध्द जैन नाही, लोकं आपापल्या परीने ह्या तीन्ही धर्मातील तत्वे स्विकारुन सम्यक पणे जगतात. ह्या समुच्चयवादी , सम्यक जीवनशैलीचे नाव हिंदु असे आहे ! आणि हे अगदी आधुनिक आहे अशातला भाग नाही . महावीरांना किंवा तथागतांना कोणीही येशु ख्रिस्तासारखे सुळावर चढवलेले नाही , हाच ह्या विधानाचा निर्विवाद पुरावा आहे ! उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो. तस्मात् बौध्द धर्म तत्वज्ञान हे हिंदुधर्माला मारक असे नसुन आधारभुतच आहे. विशेषतः वेदांताच्या , अद्वैताच्या आकलनात फार म्हणजे फार मदत होते बौध्द मताची. कारण बौध्द मत बस एक पायरी अलिकडे अद्वैताच्या अनुभुतीच्या ! ___________________________ हां तर बॅक टू मेन टॉपिक : बुध्दाने चार आर्य सत्य सांगितली - १. जगात दुःख आहे. २. त्या दुःखाला कारण आहे. ३. हे कारण म्हणजे तृष्णा (इच्छा आणि हव्यासा) होय. ४ . इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग आहे. आणि ह्यासाठी पुढे अष्टांगिक मार्ग सांगितला : सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी ____________________________________ हां तर झालं असं की - नोकरी काम धंद्याच्या निमित्ताने मला जवळपास दररोज पुणे दर्शन करावे लागते. त्यामुळे जवळपास १-२ तास अशा विषयांवर चिंतन करायला मोकळा वेळ मिळतो . हां तर अशाच एका चौकात ट्रॅफिक सिग्नलला थांबलो असताना एक दृष्य दिसले - एल लहान मुलगी - अगदी २-३ वर्षाची असेल . भुरकट केस . मळकट कपडे , अनवाणी पायाने सिग्नल पाशी उभी. सोबत तिची आई - तीही तशीच उन्हाने रापलेला काळा वर्ण , शरीराचा कृशपणा गरीबी , दारिद्र भक्कपणे दाखवुन देणारा ! तिच्याही पायात चप्पल वगैरे नाही. ट्रॅफिकसिग्नलवर थांबलेल्या काहीतरी थातुरमातुर खेळणी वगैरे विकत असणारी तिची अजुन काही मुले , तिही तशीच . पण ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . तिथेच पलिकडे दुसर्‍या सिग्नलच्या दुसर्‍या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ? मोठ्ठा सिग्नल असल्याने सगळं शांतपणे न्याहाळत होतो अन मनात विचार आला - जगात दु:ख आहे , त्या दु:खाला कारणही आहे , पण ते कारण म्हणजे तृष्णा ? ह्या लहान लेकरांना कसली आलीय तृष्णा ? त्या दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? ह्याला तृष्णा म्हणायच ? त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले तर त्याला तृष्णा म्हणायच ? नाही नाही . काही तरी चुकतंय ! दु:खाचं कारण तृष्णा नाही . आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ? मला कसली आलीय तृष्णा ? माणसाला माणसासारखं जगायला मिळावं ही अपेक्षा म्हणजे तृष्णा ? आणि मग - का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ? नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ? पण मग साध्या न्यायाची अपेक्षा करणं ह्याला तृष्णा म्हणायच का ? असो . सिग्नल सुटतो . आपण पुढे निघुन जातो. पण मनात विचारांची चक्रे मात्रे काही केल्या थांबत नाहीत ! _____________________________________ तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? अर्थात तृष्णेच्या उदयाच्या आधीच काहीतरी आहे जे तुमची सुखं आणि दु:खेही आधीच निर्धारित करत आहे. आणि मग झक मारत आपल्याला पुर्वजन्म , सुकृत , प्रारब्ध , संचित कर्माची संकल्पना मान्य करावी लागते. पण मग पुर्व जन्म सुकृत संचित कोणाला ? कारण आत्मतत्वाला मृत्यु नाही कारण मुळातच जन्मच नाही -
न जायते म्रियते वा कदाचि-न्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो-न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥
मग लोकं हे असं सञ्चित घेऊन का जन्माला येतात अन का ही दु:खे (आणि फॉर दॅट मॅटर सुखेही) भोगतात ? तर हे सगळं हे लिंगदेहाला आहे. लिंग देह अर्थात हा पंचभुतीक इंद्रियांचा समुच्चय असलेला देह म्हणजे मी , अशी जी धारणा आहे आणि ह्याचा उपयोग करुन मी निरनिराळे भोग भोगेन अशी जी वासना आहे , हे ह्या पुनर्जन्मादि गोष्टींचे कारण आहे ! मी देह आहे हे अज्ञान हेच मुळ आहे ह्या सार्‍या दु:खाचे ! दुखाचे , वाईट वाटुन घेण्याचे काही कारणाच नाही ! आणी हे भगवंताने पहिल्याच वाक्यात सुस्पस्ष्टपणे सांगितलं आहे आधीच !
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
तस्मात् दु:खाचे कारण तृष्णा हे नसुन हा लिंगदेह म्हणजे मी असे जे देहबुध्दीचे अज्ञान आहे हे दु:खाचे खरे कारण आहे ! अरे पण मग आत्ता आहेत ह्या दु:खांचे काय करायचं ! ही दु:खे तुला ह्या उपरोल्लिखित विचाराची जाणीव व्हावी म्हणुन दिलेली भेट आहे ! आणि हे तुच मागुन घेतलेलं आहेस - कुंती कृष्णाला काय म्हणाली आठवतंय ना ?
विपद: सन्तु ता: शश्वत्तत्र तत्र जग्गुरो । भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् ॥ २५ ॥
ठीक आहे . पण मग ह्या दु:खाच्या निवृत्तीचा उपाय काय ? सोप्पं आहे की - मी देह नाही . स नित्योपलब्धि: स्वरूपोऽहमात्मा। हे एकदा कळलं की तुझ्या लक्षात येईल की आत्म्याला दःख असं काहीच नाही . हे जे काही आहे ते हे सगळं अन्नमय कोष मनोमय कोषाच्या पातळीवर आहे . आनंदमय कोषाच्या पातळीवर केवळ आनंदच आहे ! पण हे कळतंय पण वळतंय कुठं ? मार्ग काय ? साधना काय ? तेही भंगवंताने सांगुन ठेवले आहे आधीच - ज्ञानयोग ( सांख्य योग) , राजयोग , भक्तीयोग त्यात ज्ञानयोगात कपिलमुनींचे सांख्य दर्शन जसेच्या तसे - ही समस्त प्रकृती पंचमहाभुते आणि त्रिगुणांच्या समुच्चयातुन बनली आहे, त्यात तुमचा देह आला , तुमचे मन आले आणि दःखाचे आकलन करणारी बुध्दी ही आली . हे कळण्यासाठी पंचीकरण नावाचा एक स्वतंत्र विषय आहे ! ह्या विषयावर श्रीधरस्वामींनी लिहिले आहे, समर्थांनी लिहिले आहे , ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिले आहे आणि खुद्द श्रीमदाद्य शंकाराचार्यांनीही लिहिले आहे ! इतके पुरेसे आहे ह्याचे महत्व कथन करायला ! राजयोग एवढं तत्वज्ञान नाही कळत तर साक्षात भग्वद्स्वरुप असलेल्या पतंजलींनीं अष्टांग योगाचा प्रशस्त राजमार्ग दाखवलेला आहेच ! यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी ! पण हा मार्ग एकदम टेक्निकल झाला , हे सगळं गुरुगम्य आहे . प्रत्यक्ष गुरु शेजारी नसतील तर साधा अंतर्कुंभक करणे देखील जीवावर बेतु शकते ! मग त्याहुन सोप्पा म्हणजे भक्ती मार्ग - समर्थ म्हणाले - नवविधाभक्तिराजमार्ग - ते काही उगीच नाही ! श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥ मस्त आनंदाने एकेक पायरी चढत वर जायचे , काही गडाबड नाही , काही कष्ट नाही, काही रिस्क नाही, की काही त्रास नाही , बस आनंद ! पण सगळ्यात सोपा कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे खुद्द भगवान म्हणाले तो - कर्मयोग !
सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥
कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा साधण्यास सुगम असल्यामुळे श्रेष्ठ आहे. इतकं निर्विवादपणे स्पष्ट सांगुन ठेवलं आहे . आपल्याला बस इतकंच करायचे आहे की -
नैव किञ्चित्कत्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यञ्श्रुण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ॥ ५-८ ॥ प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ५-९ ॥
बस इतकेच लक्षात ठेव की -
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि । योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥
आता एकदा हे कळलं ना , मग तु सुटलेला आहेस ! आता काहीही बंधन नाही. तु ऑलरेडी सुटलेलाच आहेस ! काहीही दु:ख नाहीच !! , "बंधन आहे , दु:ख आहे , त्यातुन बाहेर पडण्यासाठी साधना उपसना असलं काही कारायचे आहे" असे जे काही तुला वाटत आहे , तो तुझ्या मनाचा देहात्म बुध्दीचा भास आहे . हे म्हणजे लोखंडावर लागलेल्या गंजासारखे आहे . आणि लोखंड जसे तापत्या भट्टीत लाल भडक करुन नंतर ठोकुन ठोकुन शुध्द करतात तसे काहीसे ह्या प्रपंचाचा उद्देश आहे . आणि शुध्द लोखंडाला परीसपर्ष झाला की लागलीच सोने होते तसे ! पण इथे तर मुळात परीसस्पर्ष आधीच झालेला आहे, आता फक्त इम्प्युरिटीज जाळुन नष्ट करायच्या आहेत. रादर ह्या इम्प्युरिटीज , अशुध्दता ही नाहीतच , आहे तो केवळ त्यांचा भास आहे , तो जाळुन नष्ट करायचा आहे बस्स ! सो - Burn , baby Burn .
श्रेयो हि ज्ञानं अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते । ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिः अनन्तरम् ॥
हे वर लिहिलेलें जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अभ्यास कर , पण ह्या अभ्यासापेक्षाही कळणे अर्थात ज्ञान हे श्रेष्ठ आहे , आणि मग हे कळलं आहे त्याचे ध्यान हे त्या कळण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे . आणि मग नुसतेच ज्ञान का ? सर्व कर्मात रत रहात , ध्यानाने कर्मफलांचा त्याग करणे हे त्याहीहुन जास्त बेस्ट ! एकदा हे जमलं की मग शांतीच शांती आहे सतत ! तिथं दु:ख असं काही नाहीच ! एकदा ब्रह्मीभुत झाला त्याला कसलं आलंय दु:ख बिख्ख ! _______________________________ तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत १. दु:ख असं काही नाहीयेच , जो आहे तो दु:खाचा भास आहे , तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे. २. हे दु:ख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे . ३. ते कारण म्हणजे देहात्मभाव . आणि त्या दु:खाला , त्या भासाला उद्देशही आहे - तो म्हणजे तुम्हाला देहात्मबुध्दीच्या पलीकडे पहायला शिकवणे. ४. ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत , ज्ञानयोग , राजयोग , भक्तीयोग , कर्मयोग ! तुम्हाला जो मार्ग सुलभ वाटतो तो स्विकारायला तुम्ही स्वतंत्र आहात , शिवाय केवळ एकच मार्ग स्विकारला पाहिजे असाही कोणाचा दुराग्रह , अभिनिवेष नाही, तुम्हाला जे काही सुलभ वाटते , ते स्विकारा ! तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात ! _______________________________ हुश्श. फायनली ! I see you ! rm ______________________________ || ॐ शांति: शांति: शांति: ||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13581 views

💬 प्रतिसाद (91)
आ
आंद्रे वडापाव Sat, 02/15/2025 - 12:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 02/15/2025 - 13:14 नवीन
<तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? > या वरील विधानात जन्माच्या अगोदर आपण कोणत्या तरी स्वरूपात अस्तित्वात आहोत हे गृहित धरले आहे. कारण हे अस्तित्व म्ह० कदाचित आत्मा ज्याचे अस्तित्व बुद्धाने नाकारले आणि आधुनिक विज्ञान पण नाकारते. आपला जन्म हा एक जैविक अपघात आहे, हे स्वीकारले की बाकीचे सर्व डोलारे पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून पडतात. यातल्या पूर्वसंचिताला विज्ञानाची (म्ह० अधिजनुक शास्त्राची) थोडीफार मान्यता आहे. विज्ञानाची ॲलर्जी नसेल अधिक माहिती साठी हे पुस्तक वाचावे. Image removed.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 02/15/2025 - 16:28 नवीन
ओह,आंतरजालावर चटकफू आहे.धन्यवाद ! नक्कीच वाचणार https://www.xpressitall.in/_files/ugd/67f555_26dfc9db711b4dfe8baa945c3bc150a1.pdf?index=true
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 02/18/2025 - 10:08 नवीन
मग युयुस्थु जी महापरिनिर्वाण म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 02/15/2025 - 16:26 नवीन
छान लिहिले आहे.मी आजच गीतारहस्याचे आठवे प्रकरण 'विश्वाची उभारणी आणि संहार' हे वाचले.यात हे पंचीकरण विषयी सांगितले आहेच.शिवाय यात सांख्य आणि वेदांताचे या प्रकृति/सृष्टीची उभारणी व संहाराचे साम्य व भेद खुप छान सांगितले आहे.आता कधी गीतारहस्य वाचून पूर्ण करते इतकी उत्सुकता ताणली आहे 😇 Image removed. राजयोग,कर्मयोग या विषयी विवेकानंदाचे खुप सुंदर पॉडकास्ट व्हिडिओ युट्यूबवर आहेत.भक्तीयोग,ज्ञानयोग मिळाले की ऐकेन. बाकी माझे बरेचसे दुःख मी कर्मयोगाचे मोडीत काढले आहेत. You don’t invite suffering into your life but when it comes you work with it and transform it.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 02/15/2025 - 19:02 नवीन
लेखात सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातल्या गरीबांच्या दु:खाचे कारण त्यांची स्वतःचीच 'तृष्णा' असली पाहिजे, असे आहे का ? समाजातील अन्य श्रीमंत, सत्ताधारी, बलवान, असंवेदनशील, स्वार्थी वगैरे प्रभावशाली लोकांची 'तृष्णा' त्या दु:खाला कारणीभूत नाहीच, असा त्याचा अर्थ आहे का, हे समजले नाही. कृपया उलगडून सांगावे ही णम्र इनंती. -- त्या अन्य प्रभावशाली लोकांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग नाही काय ? -- आणि त्यासाठी त्या अन्य लोकांनी: सम्यक दृष्टी - सम्यक संकल्प - सम्यक वाणी - सम्यक कर्म - सम्यक उपजीविका - सम्यक व्यायाम - सम्यक स्मृती - सम्यक समाधी .... हा मार्ग अवलंबिला पाहिजे, हा खरा उपाय. -- काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 02/15/2025 - 19:15 नवीन
नाही नाही. तसे निश्चित च नाही. तसा विचार बुध्दाने केला असता तर तो बुद्ध न राहता अशोक झाला असता ना ! बुध्दाच्या दुःखाच्या शोधाचा फोकस आता मध्ये आहे, बाहेर नाही. बहिस्थ कारणांकडे बुध्द दुःखाचे कारण म्हणून पाहताच नाही, तो म्हणतो की त्या बाह्य कृतींमुळे तुमच्या मनाची स्थिती का बिघडत आहे ? त्याचे मूळ शोधा. कारण तुमच्या मनात आहे , बाहेर नाही. "आपल्या दुःखाची कारणे आत नाहीत , बाहेर आहेत, प्रस्थापितांनी केलेली शोषक अर्थव्यवस्था हेच ते कारण" . असा विचार करायला लागला की तो बुद्ध रहात नाही , तो कार्ल मार्क्स होतो Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 02/16/2025 - 00:10 नवीन
१. "दुःख असं काही नाहीयेच, जो आहे तो दुःखाचा भास आहे."
→ हा दावा अतिशय उच्च अध्यात्मिक पातळीवरच ग्राह्य धरता येईल. प्रत्यक्ष जगात दुःख ही एक अनुभूती आहे. शारीरिक वेदना, मानसिक यातना, सामाजिक अन्याय हे भास नसून प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आहेत. जर कोणाला गरिबी, भूक, आजार, छळवाद किंवा अपघातातून होणाऱ्या यातना भास वाटत असतील, तर तो भास नव्हे, तर वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न आहे.
२. "हे दुःख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे."
→ जर दुःखच अस्तित्वात नाही, तर त्याला कारण कसे असू शकते? हा स्वतःलाच विरोध करणारा युक्तिवाद आहे. दुसरं म्हणजे, जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो, याचं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे.
३. "ते कारण म्हणजे देहात्मभाव."
→ हा दावा फार सरसकट आहे. दुःखाची कारणे फक्त देहात्मभावाशी जोडणं चुकीचं आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती, मानवी संबंधातील गुंतागुंत, पर्यावरणीय आपत्ती यांसारख्या अनेक गोष्टी दुःख निर्माण करतात. मानवी दुःख केवळ "मी हा देह आहे" या भावनेतूनच येतं, हा एकांगी विचार आहे.
४. "ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत..."
→ जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय? जर ते अस्तित्वातच नाही, तर ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग यांची गरजच भासू नये. शिवाय, हे मार्ग व्यक्तिगत निवडीवर अवलंबून आहेत; एका व्यक्तीसाठी योग्य असलेला मार्ग दुसऱ्यासाठी तितकासा उपयुक्त नसेल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 02/16/2025 - 02:11 नवीन
प्रचेतस यांनी मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 02/16/2025 - 02:53 नवीन
सुंदर विवेचन!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/16/2025 - 05:26 नवीन
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर ! आपल्या प्रतिसादामुळे, परत एकदा चिंतन करताना मला असे काहीसे फीलींग येत आहे ! =)) Image removed.
वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न
होय , बरेच लोकं अध्यात्माला - वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न, अर्थात स्पिरिच्युअल एस्केपिझम असे म्हणतात. ठीक आहे आता , काय बोलणार , कोणाला काहीही समजाऊन सांगण्याच्या भानगडीत कशाला पडा ! मुळात खुद्द भगवंत अर्जुनाला गीता सांगितल्या नंतर म्हणाला की तुला पाहिजे तसं कर ! तसं काहीसं मला वाटायला लागलं आहे ! इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्‌गुह्यतरं मया । विमृश्यैतद् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु ॥ १८-६३ ॥ पण अर्जुन युध्दभूमी सोडुन पळुन गेला नाही , हाच फरक आहे कळणे आणि न कळणे ह्यातील.
जर "भास" असं काही असेल, तर तो का आणि कसा निर्माण होतो
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं . पण मुळात मुळात ह्या भासाच्या ब्रमाची सुरुवात कुठे आहे तर ह्याचे उत्तर छान्दोग्योपनिषद मध्ये दिलेले आहे - एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे ! पण तुम्ही विचाराल की ही प्रेरणा तरी कशी आणि का निर्माण होते - तर "मी एक आहे" हा विचार हे त्याचे खरे कारण आहे. (त्याला महाकारण असे म्हणातत. ) तस्मात मी एक आहे, अहं ब्रह्मास्मि ह्या विचाराचाही लय होतो तिथे भासाचा , दु:खाचा लय होतो.
एकांगी विचार
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं ! तुका म्हणे रक्षा झाली आपोआप | उजळला दीप गुरुकृपा ||
जर दुःख फक्त भास असेल, तर त्यावर मार्ग शोधण्याची गरजच काय?
मान्यच ! हेच अष्टावक्र म्हणतो ! ( बहुतेक जे. कृष्णमुर्तीही हेच म्हणतात ! ) एकदा का हे कळलं की बाकी काही योगबिग वगैरे धडपड करावयाची आवश्यकताच नाहीये . जसं एकदा दिवा लावला की अंधार नष्ट व्हायला किती वेळ लागतो ? तसं काहीसे आहे ! तुम्हाला एकदा कळलं असेल की हे दु:ख केवळ द्वैताच्या भासाचे लक्षण आहे , मुळात द्वैत असे काही नाहीच , तत्क्षणी तुम्ही सुटलेले आहात . अंधाराचा नाश झालेला आहे , तुम्हाला अधिक काही करावयाची आवश्यकताच नाही !
एको विशुद्ध बोधव्योऽहमिति निश्चयवह्निना । प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ॥ ९ ॥ अनुवाद - 'मी एक विशुद्ध बोध आहे' या श्रद्धायुक्त अग्निने स्वतःचे घोर अज्ञान जाळून तू शोकरहित व सुखी हो !
पण बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील नाहीत , म्हणुनच भगवंताने भगवद्गीता लिहुन हे चार सुलभ मार्ग दाखवुन दिलेले आहेत !
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ १८-६६ ॥
इत्यलम ! :) अजुन काही लिहायची इच्छा होत नाही , आता बस अर्जुन जे म्हणाला ते बोलुन थांबतो :
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/17/2025 - 14:52 नवीन
जिथं द्वैत निर्माण होतं तिथं हा भास निर्माण होतो, आईच्या पोटातुन बाहेर पडल्यावर पहिल्यांदा आपण ट्यॅ करतो तिथं .
तुम्ही अद्वैताकडे जाताय असे वाटते पण द्वैत ही निसर्गाची मूलभूत रचना आहे. आई आणि बाळ एकाच नसून वेगळे आहेत आणि हा भास नसून सत्य आहे.
एकोहम बहुस्यामः . मी एक आहे , आता अनेक होईन ह्या प्रथम प्रेरणेचा उदय हाच ह्या भासाचा उदय आहे !
मुळात ब्रह्म एक असेल आणि सर्व काही त्याच्यापासून निर्माण झाले असेल, अनेक झाले असेल तर भिन्नता वास्तव आहे, भास नाही. निर्मिली गेलेली सृष्टी तर वास्तव आहे.
एकांगीच आहे !! पण एकदा तो विचार झाला की संपलं सगळं !
जर एखादा विचार एकांगी असेल, तर तो संपूर्ण सत्य सांगत नाही आणि जर तो एकदा विचार झाला की सगळं संपतं असं म्हणायचं असेल, तर तेच अपूर्णत्व दर्शवतं. एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं.
बहुतांश लोकं हे अष्टावक्र गीता समजण्याचा जवळपास देखील ना
अष्टावक्र गीता मी अजून वाचलेली नाहीये मात्र महाभारतात वनपर्वात जनक अष्टावक्र संवाद काहीसा संक्षिप्त स्वरूपात येतो जो मूळच्या उपनिषदातील अद्वैताला थोड्या निराळ्या स्वरूपात प्रतिपादित करतो. नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत् प्रसादात् मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 02/17/2025 - 15:02 नवीन
आई आणि बाळ एकाच नसून वेगळे आहेत आणि हा भास नसून सत्य आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2025 - 01:06 नवीन
वाखुसा... दर शनिवारी संध्याकाळी आमची बैठक असते. आठवड्यातील सर्व श्रम परिहार त्या दोन तासात नाहीसा होतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/16/2025 - 04:43 नवीन
नमस्कार मुवि, आपण बहुतेक दारू पिणे ह्या अर्थाने श्रमपरिहार हा शब्द वापरला आहे , मागील प्रतिसादात म्हणाला होतात तसेच. ह्या इथे, ह्या विषयी तुकोबांचा एक चपखल अभंग स्मरत आहे, पण आपल्याला दुखावण्याची इच्छा नाही म्हणून उद्धृत करण्याचे टाळत आहे. लोभ असू द्यावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2025 - 17:40 नवीन
योग्य ओळखले... इथे, श्रम परिहार हा वैचारीक आहे.... तुम्ही विचार मंथन करतांना ध्यान करून मन एकाग्र करत असाल , असे वाटते. मी मदिरेचा आस्वाद घेता घेता वैचारीक मंथन करतो. जे प्रश्न तुम्हाला पडतात ते प्रश्न मलाही पडले होते. पण एक सुंदर वाक्य वाचनात आले..... स्वतःच स्वतःला मार्ग दाखवायचा. एक उदाहरण देतो.... बॅरोमीटरचा उपयोग करून एखाद्या उंच इमारतीची उंची मोजायची असेल तर, त्याची किमान ४ उत्तरे आहेत आणि कुणी कुठला मार्ग वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. तुम्ही तुमच्या मार्गावर बरोबर आहात आणि मी माझ्या.... तुमच्या मार्गाला माझा अजिबात विरोध नाही उलट तो मार्ग अतिशय तरल आणि उत्तम आणि सफाचट आहे.भल्या भल्या व्यक्तींना जमत नाही.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 02/16/2025 - 03:06 नवीन
अवांतर
काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो .
समाजात ना ना विकरी जण भरले आहेत.कोणा कोणाचा विचार करायचा.आपला मार्ग शोधत राहायचा.मी दु:स्वास वग्रै नाही.पण या तीन धर्मांचे दिसणाऱ्या साम्यावर कायम आश्चर्यचकित व्हायचे.ज्ञानयोगाने म्हणजे पुस्तकी अभ्यासाने ;) याचे गुपित जाणले.आणि कर्मयोगाने म्हणजे प्रत्यक्ष या हिंदू बौद्ध जैन पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत हे जाणले,अनुभवले....ते वेरूळच्या माध्यमाने.लेणी १-१२ बौद्ध,१३-२९ हिंदू,३०-३४ जैन यांचा अभूतपूर्व संगम, प्रत्यक्ष स्वर्गानुभव आहे.त्यातील जैन लेणी जरा नीट पाहायच्या राहिल्या तर स्वप्नात येतात ,परत ये म्हणतात ;) लवकर परत जाणार आहे:) Image removed. ॐ तारे तुत्तारे तुरे सोहा'
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 02/16/2025 - 06:16 नवीन
ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . तिथेच पलिकडे दुसर्‍या सिग्नलच्या दुसर्‍या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा
हे दु:ख नाही, ही झाली परिस्थीती.
दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले
ही तृष्णा नाही. हे त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे झाले, कर्मयोग, जे अटळ आहे. प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ?
तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे त्यांच्याविषयीची, करुणा म्हणणार होतो पण लेखातलंच पुढचं वाक्य ती करूणा नाही हे जस्टीफाय करतंय.
का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ?
लेखात उल्लेखलेली चार आर्यसत्य ह्यांचा संदर्भ मराठी विकीपीडीया दिसतोय. त्याचा मूळ संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, लेखक - भंते डॉ. सी. फॅंगचॅंम (थायलंड) हा दिसतोय विकिपेजवर. डॉ. सी. फॅंगचॅंम यांनी त्या ग्रंथात नेमकं काय लिहिले आहे हे माहिती नाही, पण विकीपेजवरची चार आर्यसत्ये चुकीचं भाषांतर आणि चुकीचा भावार्थ आहेत. त्रिपिटकातील सुत्त पिटकानुसार चार आर्यसत्ये अशी आहेत: 1. दुःखसत्य (Dukkha Sacca) – जीवनात दुःख आहे. 2. दुःखसमुदय सत्य (Samudaya Sacca) – दुःखाची कारणे आहेत. 3. दुःखनिरोध सत्य (Nirodha Sacca) – दुःखाचे निरसन शक्य आहे. 4. दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा (Magga Sacca) – अष्टांगिक मार्गाने दुःख संपुष्टात आणता येते. त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/16/2025 - 06:26 नवीन
त्रिपिटकातील संदर्भ: धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11) ह्या संदर्भाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद सोत्रि !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/16/2025 - 06:39 नवीन
तुम्हाला जो कळवळा आलाय ते दु:ख नाही. ती कणव आहे.
उद्या जाणार आहे ऑफिसला, तेव्हा दिसतीलच ते ! तेव्हा मी माझ्या मनाला हेच समजाऊन सांगणार आहे ! अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
प्राप्त परिस्थितीला सम-भावनेने (equanimity) सामोरे न जाता, जे नाहीयेय त्याचा हव्यास आणि जे नकोय ते होणं ह्याचा तिरस्कार ही झाली तृष्णा, त्यामुळे येणारी व्याकुळता हे दु:ख.
हेही संगुन पाहतो मनाला - हा ज्याचा त्याचा कर्मयोग आहे , जो की अटळ आहे. ते पोरं ती परिस्थिती , ते कर्म घेऊन जन्माला आली आहेत , तो त्यांचा कर्मयोग आहे. अन आपल्याला कणव वाटणे ,पण नाथांसारखी करुणा न वाटणे, हा आपला कर्मयोग आहे . मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ __/\__
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sun, 02/16/2025 - 13:16 नवीन
स्वगतः अध्यात्माला भ्रमानुभुतीचे विज्ञान म्हणणे योग्य होईल का?. रिप्रोड्युसिबिलीटीला बेदखल केलं सगळा आनंदी आनंद! (पन इण्टेण्डेड)
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 02/16/2025 - 07:21 नवीन
उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो.
हे फारच रोचक आहे, केवळ उत्सुकता एक प्रश्न पडला, म्हणून हा प्रतिसाद. पण हा प्रश्नही स्वांतसुखायच आहे. अवतार घेण्याची कारणे गीतेत कृष्णाने खालील श्लोकात (४.८) सांगीतली आहेत: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे म्हणजे सृजाम्यहम् - अवतार घेण्यासाठी खालील ३ कारणे असतात:
  1. परित्राणाय साधूनाम्
  2. विनाशाय च दुष्कृताम्,
  3. धर्मसंस्थापनार्थाय
असं असेल तर त्यावेळी सनातन धर्मात सज्जन लोकं धर्ममार्गावरून च्युत झाले असावेत, त्यामुळे खूप दुष्ट लोक झाले असावेत आणि धर्मस्थापना करण्याची गरज म्हणूंन नवावा अवतार (बुद्ध) घ्यावा लागला असावा का? - (अभ्यासू ) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/17/2025 - 07:57 नवीन
माझा तत्त्वज्ञानाचा इतिहास ह्या विषयाचा जास्त अभ्यास नाही. खालील उत्तर माझ्या मर्यादित वाचन आकलनावरून देत आहे - बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते. त्यामुळे तत्कालीन समाज यज्ञ प्रधान होता. त्यामध्ये तत्त्वज्ञानापेक्षा अधिक भर कर्मकांडांवर होता. म्हणूनच चार्वाक जैन बुध्द वगैरे नास्तिक अर्थात वेद प्रामाण्य नाकारणाऱ्या मतांचा उदय झाला. पण त्यातही प्रकर्षाने पाहिले तर चार्वाकचे खंडन करायला जैन आणि बुद्ध मत हेच पुरेसे होते. जैन धर्माचे संस्थापक ऋषभ देव स्वतः इक्ष्वाकु वंशातील अर्थात श्रीरामाच्या वंशातील होते, त्यानंही विष्णूचा अवतार मानण्यात येते. पण बुध्दाच्या मताने केवळ कर्मकांड व नव्हे तर समस्त वेद उपनिषदोक्त तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आणि त्याचे उत्तर शोधता शोधता लोकं उपनिषदोक्त धर्माकडे परतले. अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला. ह्या तर्काला अतिशय उत्तम समर्थक उदाहरण म्हणजे चाणक्य ! बुध्द इ.सु.पू 6 व शतक आणि चाणक्य इस पू 3 ते शतक. आणि महाभारत भगवद गीता लिहिली गेली ते इस 3 ते शतक आणि आचार्य म्हणजे इस 7वे शतक. म्हणजे बौद्ध मत खंडन व्हायच्या कित्येक वर्षे आधी चाणक्य झाला होता , आणि तरीही त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथात कर्मयोग च दिसून येतो. अर्थात आचार्यांच्या आधीपासूनच लोकं मूळ सनातन धर्माकडे कर्मयोगशास्त्र कडे वळले होते . (ह्या साऱ्या कालगणनेत कुमारील भट्ट नावाचे अत्यंत रोचक पात्र आहे ज्यांनी आचार्यांच्या आधीच बौद्ध मताचे खंडन करून मीमांसा मताचे पुनर्स्थापना केलेली दिसून येते. पण त्यावर सविस्तर चर्चा कधीतरी निवांत!) ह्या विषयाचा सखोल अभ्यास नसल्याने उत्तरदायित्वास नकार लागू. चूक भूल देणे घेणे
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 02/17/2025 - 14:38 नवीन
बुध्द काळात, म्हणजे साधारणपणे इ .सु . पूर्व सहावे शतक, तत्कालीन सनातन धर्म हा पूर्व मीमांसा अर्थात कर्म मीमांसा ह्या मताला मानणारा होता. ह्या मतानुसार केवळ कर्म करणे हे मोक्षाचे साधन होते.
अर्थात विष्णूनेच लोकांना परत उपनिषदे आणि त्यांचे सार गीता आणि त्यातील धर्म अर्थात कर्मयोगशास्त्र ह्याकडे प्रवृत्त करण्यासाठी , धर्माची संस्थापना करण्यासाठी बुध्द अवतार घेतला.
प्रचंड घोळ आहे. त्यापुढेही बराच आहे. पण उत्तरदायित्वास नकार लागू असल्याने इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/17/2025 - 17:11 नवीन
पूर्व मीमांसा जरी यज्ञयागादी कर्मकांडाचे मूलाधार असली तरीही त्या काळी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, वेदांत अशी विविध तत्वज्ञाने प्रचलित होती. बुद्धानंतर यज्ञाचे स्तोम जरी कमी झाले असले तरीही ते प्रचलित होतेच मात्र भक्तीवादी असलेला भागवत संप्रदाय हळूहळू वाढू लागला होता. रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे). कौटिल्य आणि बुद्धाच्या काळात साधारणत: ३५० वर्षांचे अंतर असले तरी बौद्धमताचा प्रसार प्रामुख्याने अशोकाच्या काळात वेगाने झाला. त्यामुळे त्याच्या काळात बौद्धमताचे खंडन फारसे नसावे. बुद्ध हा विष्णूचा अवतार किंबहुना राम कृष्णालाही विष्णूचा अवतार समजणे खूप उशिरा सुरू झाले, अन्यथा सुरुवातीच्या ब्राह्मणी लेण्यात ह्याचे प्रतिबिंब नक्कीच पडले असते.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 02/17/2025 - 23:01 नवीन
रामायण, महाभारतात आलेले बौद्ध मताचे खंडन (हे महाभारतात फारच विशेषाने आले आहे).
म्हणजे रामायण, महाभारत गौतम बुद्धाच्या नंतरच्या काळात घडले कि लिहीले गेले? - (कालखंड समजून घेण्यास उत्सुक असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/18/2025 - 01:33 नवीन
रामकथा आणि पांडवांची कथा प्राचीन काळात घडल्या, वाल्मिकी रामायण मात्र सरळसरळ इसवी सनाच्या आसपास दोन तीन शतक इकडे तिकडे लिहिलं गेलं तर महाभारतात इसवी सनाच्या आसपास पर्यंत भर पडत गेली इतकेच. व्यास, वैशंपायन, सौती असे ते वेगवेगळे कालखंड इतकेच.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 02/18/2025 - 02:22 नवीन
म्हणजे महाभारतात गीता नेमकी कोणत्या काळात लिहीली गेली हे नक्की सांगता येणार नाही? आणि मूळ गीतेतही भर पडली असल्याचे शक्यता नाकारता येत नाही, बरोबर? - (अतिउत्सुक) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/18/2025 - 03:11 नवीन
गीतेचा काळ नेमका कुठला हे नक्की सांगता येणार नाही, कदाचित पहिले तीन अध्याय व्यासप्रणित असावेत. मात्र ही शक्यता कमी आहे असे माझे मत आहे कारण गीतेच्या आधी असलेला एक अध्याय सोडून त्याआधीच्या अध्यायात खुद्द युधिष्ठिराला विषाद झालेला दाखवला आहे. बृहतीं धार्तराष्ट्राणां दृष्ट्वा सेनां समुद्यताम् | विषादमगमद्राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः || तेव्हा खुद्द अर्जुन युधिष्ठिराच्या विषादाचे निवारण करतो. त्यक्त्वाधर्मं च लोभं च मोहं चोद्यममास्थिताः | युध्यध्वमनहङ्कारा यतो धर्मस्ततो जयः || तेव्हा युधिष्ठिर युद्धास सिद्ध झाला असता अर्जुनासही लगोलग खेद व्हावा हे असंभाव्य वाटते. शिवाय गीतेतील श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्लोकांची सुरवात ही 'श्री भगवान उवाच' अशी होते. हा तर भागवत संप्रदायाचा मुख्य आधारच म्हटला पाहिजे. अर्थात गीता जरी नंतरची असली असे माझे मत असले तरी ती अलीकडचीही नव्हे. कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 02/18/2025 - 06:07 नवीन
कदाचित बुद्धपूर्वकालीन असू शकते कारण गीतेत येणारी सांख्य, योग, कर्म, ब्रम्ह या संकल्पना प्राचीन आहेत. मात्र काही ठिकाणी ती वेदांना छेद देतात.
हे रोचक आहे! माझ्या काही इंटर्प्रीटेशनला हे पुष्टी देतंय. व्यनी करतो, व्यनितून बोलूयात. - (उत्साहित) सोकाजी
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 02/18/2025 - 08:08 नवीन
+१ चांगली माहिती!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Wed, 02/26/2025 - 14:34 नवीन
बुद्धाच्या अवताराबद्दल रोचक मत ऐकायला मिळाले. https://www.youtube.com/watch?v=ND_i9IihuZ8 व्हिडीओ एम्बेड करायचा प्रयत्न केला पण होत नाहीयेय. संपादक मंडळ काही मदत करू शकेल का? - (अभ्यासू ) सोकाजी
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 02/16/2025 - 07:41 नवीन
यथा हि चोर: स‌ तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिकमत्र विद्धि। तस्माद्धि य: श‌ङ्क्यतमः प्रजानाम् न नास्तिकेनाभिमुखो बुध: स्यात्।।2.109.34।। एक अवतार दुसऱ्या अवताराबाबत असे का बोलेल?
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sun, 02/16/2025 - 08:21 नवीन
इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही .. त्यामुळे तुमच्या ह्या प्रश्नाचे "सयुक्तिक" उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही ...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/17/2025 - 02:28 नवीन
इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या, "अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट" बेस्ड मॉडेल वरील मेंदूकडून, जास्त अपेक्षा करणे योग्य नाही
>>> Thank you so much !!! This is such a huge compliment. राम राम राम
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/17/2025 - 03:04 नवीन
अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट फायनली ! https://youtu.be/c0yTIaNeEfw?si=xDdIyOKarHwqpaVL मन हें राम जालें मन हें राम जालें । प्रवृत्ति ग्रासुनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥ श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केलें ॥२॥ यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले ॥३॥ बोधीं बोधलें बोधितां नये ऐसें जालें । बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥४॥
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Mon, 02/17/2025 - 10:24 नवीन
ह्म्म ... तो णळस्टॉप चा "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर ..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/17/2025 - 11:40 नवीन
काहीही कळलं नाही. अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा आहे , माझा नाही. सिंगल डेटा पॉईंट वर न्यूरल नेटवर्क ट्रेन झाल्यावर त्यांनी लिहिलेला अभंग ! मन हेच राम झाले !! राम
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Mon, 02/17/2025 - 12:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/17/2025 - 14:15 नवीन
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/17/2025 - 14:15 नवीन
फोटो दिसत नाही. काही का असेन, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ह्या न्यूरल नेटवर्क चे आऊटपुट काय असणार आहे ! राम
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/18/2025 - 03:40 नवीन
>>>>>>> "गिरीजा" आश्रम फ्लायओव्हरमुळे झाकला गेल्या असल्याने, अशी अवकळा पसरलीये तर .. गिरिजा काकू अनाहिता आश्रमात डोकावून जायच्या म्हणे...=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 02/18/2025 - 05:09 नवीन
अरे व्वा. सर, आपण आलात, आनंद झाला ! आपले प्रतिसाद फार मोलाचे आहेत आमचे न्यूरल नेटवर्क ट्रेन करायला ! असाच लोभ असू द्या. राम
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/17/2025 - 08:07 नवीन
अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती च अव+ तर अर्थात खाली उतरणे अशी आहे . शुद्ध ब्रह्म अनुभवातून खाली अर्थात ह्या जगाच्या रंगमंचावर उतरलेले लोक . ते काहीही बोलत असतात हो. खुद्द रामाला नावे ठेवणारा परीट काय रामा पेक्षा भिन्न होता का ? लक्ष्मणाने परशुरामाची मस्करी केलेली आहे, ते काय भिन्न होते का ? कृष्ण साक्षात भगवान आहे हे माहीत असताना ही गांधारी ने त्याला शाप दिलेला आहे . हे असं सगळं चालूच असतं हो ! ही सगळी लीला असते. तुमचे आकलन जेव्हा परिपक्व होते तेव्हा कळायला लागतं!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/17/2025 - 18:26 नवीन
एकदा तुम्ही द्वैत असे काही नाहीच असं मांडलं की मग पुढं बोलणंच खुंटलं. >>> बोलणं खुंटलंच आहे !! मला आत्ता कळलंय, माउलींनी तर स्पष्टच म्हणालं आहे की या शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु। हे तव कैसेनि गमें। परें ही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनी सांगे।। बोलणं खुंटलेलेच आहे ! मी जितकं शब्दात पकडायचा प्रयत्न करतो तितका तो हातातून निसटतो ! गोरोबा काकांना - मातीत तो दिसतो, सावता माळी ह्यांना कांदा मुळा भाजी मध्ये तो दिसतो, नरहरी सोनार ह्यांना सोन्यात तो दिसतो, तोच मला न्यूरल नेटवर्क मधून दिसतोय, सिंग्युलारिटी मधून दिसतोय, फोरीये सीरिज मधून दिसतोय, सुपरपोझिशन मध्ये दिसतोय. आणि नाहीच शब्दात मांडता येत आहे. काय बोलू ? कसं सांगू ? सुचतंय तसं खरडत जाऊ... बाकी काय करू अजून !! राम पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभा ची स्वयंभू असे समोर की पाठीमोरा न कळे थक ची पडिले कैसे !!
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 02/19/2025 - 03:30 नवीन
खूप काही बोलण्यासारखे आहे. तात्विक खीस देखील पाडण्यासारखा आहे. पण. . राम.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 02/19/2025 - 04:49 नवीन
राम :)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 02/19/2025 - 16:43 नवीन
सर, ते बुध्ड, वेदांत, आर्यसत्त्ये वगॅरे कूटप्रश्न आहेत. तुमच्या बुध्दाच्या विचारांविषयीची शंका पण रास्त आहे. तरी... >> ... रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . आणि >> ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ? या समाजातल्या भयाण वास्तव दु:खावर आपल्यापॅकी ९९% लोक काही करत नाहीत, करू शकत नाहीत, हे मान्य करतो. पण 'मी' काही करणार नाही, कारण... >>... नाथांचा गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . हे उदात्त वेदांत तत्वञानानुसार आहे का? मुळात ही दोन्हीही अन्याय आणि दु:खेच जरी असली, तरी त्यांची तुलना कदापी होऊ शकत नाही, हे तुंम्हाला तरी लक्षात यायला हवं होतं.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 02/19/2025 - 17:46 नवीन
माफ करा . माझे मराठी व्याकरण थोडे कच्चे आहे. एकापेक्षा दुसरे मोठे किंवा समान किंवा लहान असे काहीसे लिहिले असल्यास त्याला तुलना करणे असे म्हणतात असा माझा समज आहे. आणि माझ्या ह्या समजा नुसार मी कोणतीही तुलना केलेली नाही. माझ्यासाठी दुःख हे दुःख आहे ! तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही , पण त्याची मदत खूप झाली, त्याच्या निमित्ताने मला माझे उत्तर सापडले आहे. आणि मी ते वर लेखात स्पष्टपणे लिहिलेही आहे ! तुम्हाला ते पटते की नाही ह्याच्याशी मला घेणे देणे नाही. इथे अनेक ठिकाणी माझ्या आधीच्या लेखाचा रेफरन्स घेऊन कॉमेंट्स आहे ते च पुनरेकावर म्हणतो. जे जे दुःख म्हणून मला भासत आहे त्या त्या ठिकाणी "राम" पाहणे हाच माझ्यासाठी एकमेव दुःख निर्मुलनाचा उपाय आहे ! राम खरेतर हेही प्रतिसाद देणार नव्हतो , पण तुम्ही प्रतिसाद नीट पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की काही ठरावीक मोजक्या लोकांचे प्रतिसाद लेखन केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहेत ! आणि म्हणूनच ह्या अशा प्रतिसादात "राम" पाहणे हा ही माझ्या उपायचाच एक भाग आहे ! म्हणूनच आपल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा ही नम्र विनंती ! राम
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 02/20/2025 - 17:22 नवीन
तुम्ही उर्वरित लेख नीट वाचलात तर तुम्हाला कळेल की मी बुध्दाच्या मार्गावरून चालत दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध घेत होतो. बुद्धाचं काही मला पटलं नाही
१. लेखात नेमकं कुठे बुध्दाच्या मार्गावरून चालत गेल्याचा उल्लेख आला हे मिळालं नाही. कोणता मार्ग आणि कसा वापरला हे ही लेखात नाही. २. लेखाचा गाभाच विकिपीडीया वरच्या चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे त्यामुळे बुध्दाच्या चुकीच्या मार्गावरून चालत जाणे झाले असावे आणि दुःख आणि दुःखाच्या निर्मूलन करण्याच्या उपायांचा शोध लागला नसावा. ३. ज्या बुद्धाला नववा अवतार मानलं आहे त्या अवतरी पुरुषाचे काहीच पटलं नाही हे अतर्क्य आहे. एकतर तो अवतरी नसवा किंवा त्याच्या अवताराचे आकलन नीट करून घेतल्याचे दिसत नाहीयेय. - ('हे राम' म्हणावेसे वाटणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा