इव्हीएमचे अभिनंदन !!!
राम राम मंडळी
तर एकंदरीत आता २०२४च्या निवडणुकांची रणधुमाळी, धुळफेक, चर्चा, उपचर्चा, मारामा-या, हाणामा-या वगैरे जे काही लोकशाही तत्वांना धरुन, अनुसरुन, लोकशाही सुदढ होण्यासाठी आवश्यक असते ते सर्व काही झालेले आहे. यथावकाश कुणीतरी कधीतरी कोणाच्या तरी पाठींब्याने, आशीर्वादाने, प्रेरणेने वगैरे जे काही योग्य असेल त्याच्या सहाय्याने शपथविधी घेऊन कामाला लागतील. देशाची जी काही प्रगती ते असो नसो होईलच त्याचे श्रेय ते घेतील, अपश्रेय विरोधकांना देतील. थोडक्यात काय पहिल्यासारखे नीट सुरळीत रुटीन चालू होईल. हुश्श.
या भानगडीत इव्हीएम बदनाम झाले नाही, इव्हीएमला कुणीही नावे ठेवली नाही, इव्हीएम मुळे आमचे तळपट झाले असे कुणी म्हणाले नाही. थोडक्यात, इव्हीएमचा या निकालामधे काहीही सहभाग नाही. त्याने फक्त प्रामाणिकपणे मते नोंदवली आणि नंतर ती जाहीर केली. जे काम त्याने करायला हवे होते तेच त्याने केले. भलते उद्योग कुणाच्या सांगण्याने, प्रेरणेने, स्वेच्छेने वा अनिच्छेने केले नाहीत.
या सर्वांबद्दल इव्हीएमचे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन !! अभिनंदन !! अभिनंदन !!
त्याचबरोबर संविधान बदलले जाणार नाही याची खात्री मिळाल्यामुळे संविधान सुद्धा आनंदात असेल. त्यामुळे आम्ही पण आनंदात आहोते. तुम्ही सुद्धा आनंदी झालात तर आमची काहीही हरकत नाही. कुणाचीही नसावी.