Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

डिंक म्हणजे DINK (double income no kids)

स
सुबोध खरे
Fri, 08/19/2022 - 09:06
🗣 136 प्रतिसाद
डिंक डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे. हा एक चर्चेचा विषय आहे आणि याबद्दल मिपावर धागा काढण्याबद्दल चर्चा झाली होती. ते वाचूनच मी हि सुरुवात करतो आहे. सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे. पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या. आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे. या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण मूल हवे हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते. कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो. अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो. ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते. येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही. परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत. (अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही) लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत. बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो. बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते. परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे. कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती. परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे. आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली १) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला. २) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही ३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते. ४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते. ५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे. ६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती. हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले. त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले. तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले. एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते. परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले. काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले. हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही. तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32089 views

🗣 चर्चा (136)
ट
टर्मीनेटर Fri, 08/19/2022 - 11:01 नवीन
सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार 🙏 आत्ता रुमाल टाकून ठेवतोय, वेळोवेळी चर्चेत सहभागी होईनच!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 08/19/2022 - 11:20 नवीन
छान धागा. सध्याच्या काळात एका मध्यम - उच्च मध्यमवर्गीय मुलाचा / मुलीचा खर्च जन्मापासून ते आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंत (२०-२१ वर्षांपर्यंत) हा २५-४० लाख असेल. ईतक्या पैशात जग फिरु, नविन अनुभव घेऊ, हा पैसा शिल्लक ठेऊन लवकर निवृत्ती घेऊन छंद जोपासू अशी पण मते ऐकली आहेत. अशीच काहीशी मते लग्न न करणार्‍या मित्रांची पण आहेत. जर्मनी सारख्या देशात जन्मदर कमी झाला होता (सध्या माहित नाही) त्यात फिअर ऑफ ओल्ड एज पोवर्टी हे एक कारण वाचले होते. एका कुटुंबापुरता विचार केला तर ठिक आहे पण राष्ट्र, मोठा भौगोलिक भाग (उदा. मोठ्या शहरातील बहुतांशी पांढरपेशे लोक) असा विचार करायला लागले तर भविष्यात परिस्थिती बिकट होईल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/19/2022 - 13:17 नवीन
एका कुटुंबापुरता विचार केला तर ठिक आहे पण राष्ट्र, मोठा भौगोलिक भाग...
>>> +११
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 08/21/2022 - 16:18 नवीन
मुल नको हा निर्णय जाणीवपूर्वक घेणारे सध्या तरी संख्येने अल्प दिसतायत. आपल्याकडील (भारतातील) परिस्थिती बघता या निर्णयाने बिकट परिस्थिती निर्माण व्हायला बराच काळ जाऊ शकेल. परंतु धाग्याच्या मुळ उद्देशापासून थोडसं भरकटण्याचा धोका पत्करून लिहावसं वाटतं की आज ज्या वेगाने मुस्लीम पिलावळ वाढतेय ते बघता हिंदू जोडप्यांनी मुल नको हा निर्णय घेणे राष्ट्र म्हणून धोक्याचं ठरू शकेल. पतीपत्नीच्या सामायिक इच्छेने मुल जन्माला घालण्यास सक्षम असताना मुल नको हा निर्णय घेणे हे त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. वेगाने बदलती जीवनशैली, वैयक्तिक कारकिर्दीचे भान, स्त्रियांना आज असणारे निर्णय स्वातंत्र्य या अनेक घटकांमुळे मुल नको हा निर्णय जोडपी घेताना दिसतात. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुमारे एक शतकापूर्वी हा निर्णय घेतल्याचे ठाऊक असेल.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 08/21/2022 - 18:39 नवीन
आज ज्या वेगाने मुस्लीम पिलावळ वाढतेय ते बघता हिंदू जोडप्यांनी मुल नको हा निर्णय घेणे राष्ट्र म्हणून धोक्याचं ठरू शकेल.
कृपया इथे हिंदू मुस्लिम करु नका. चर्चा भरकटवायची नाहीच. पण एकच उदाहरण देतो. माझ्या आई-वडिलांना (स्थायिक - पिंपरी चिंचवड) दोनच अपत्य आहेत तर माझ्या पत्नीला पाच भावंडे म्हणजे माझ्या सासरे बुवांना (तेव्हा स्थायिक - गोंदिया जिल्हा) एकूण सहा अपत्ये त्यामुळे किती अपत्य हे फक्त धर्मावर अवलंबून नसते. तरी अधिक चर्चा करायचीच असेल तर कृपया वेगळा धागा काढावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/22/2022 - 02:25 नवीन
तरी अधिक चर्चा करायचीच असेल तर कृपया वेगळा धागा काढावा ही विनंती. सहमत
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 08/19/2022 - 11:23 नवीन
धागा काढल्याबद्दल डॉ.खरेसाहेबांना धन्यवाद. चांगली चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. डींक ह्या निर्णयाचा दुसरा पैलु अथवा साईड ईफेक्ट म्हणजे मूल न होऊ देणे हे ठरवल्यानंतर अचानकच काही काळानंतर मुल असायला हवे होते असे वाटु शकते अथवा अगदी उशीरा तिशीतच पूर्ण करण्याजोग्या काही जबाबदार्या न राहिल्यामुळे मिडलाईफ क्रायसिस ने ग्रासले जाते. काही काळापूर्वी एका सुविद्य आणि सधन दांपत्याने करण्यासारखे काहीच न राहिल्यामुळे अगदी तिशीतच आत्महत्या केली होती. हे प्रकरण मिडियामध्ये बरेच हायलाईट केले होते. बर्याच वेळेला जगण्यासाठी सोयींपेक्षा समस्यांचीच जास्त गरज असते असे वाटुन जाते. मूले झाली कि जो पर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाहीत तो पर्यंत तरी पालकांना जबाबदारीतुन मुक्त झाल्यासारखे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 08/19/2022 - 13:31 नवीन
माझ्या पिढीत ( सध्या चाळिशीच्या उंबरठ्यावर ) अशी उदाहरणे जवळून पाहिली आहेत. परदेशी राहणाऱ्या मित्रांनी असे निर्णय घेऊन अंमलात आणले आहेत. काही जणांनी मूल नकोच असे निर्णय घेऊन चाळिशीत निर्णय फिरवलेले पाहिलं आहे. त्याचे उदाहरण म्हणजे नवरा बायको दोघेही आपापल्या करियर मध्ये उत्तम प्रगती करत असून मूल झाले तर ब्रेक घ्यावा लागेल , वेळ देता येणार नाही याचं कारणाने मूल नको म्हणत होते पण चाळिशीत आता करियर मध्ये म्हणावी तितकी मज्जा येत नाही किंवा प्रगती झाली नाही , आयुष्यात तोचतोचपणा आलाय म्हणून मग मुलासाठी प्रयत्न केला .
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 15:13 नवीन
डॉ खरे साहेब सर्वप्रथम आपले आभार दुसर्‍या एका धाग्यावर मी याबाबत माझा मानस बोलून दाखवला होता. पण पुढे नित्याचा आळशीपणा आड आला. आणि इकडे आपला धागा आला देखील. त्यामुळे हा महत्वाचा विषय चर्चेला आणल्याबद्दल धन्यवाद. धाग्यात तुम्ही अनेक महत्वपुर्ण मुद्दे मांडले आहेतच. या जीवनशैलीला पुर्वी DINK असेच फक्त म्हंटले जायचे पण नंतर यात संज्ञेत दुहेरी उत्पन्नाच्या मुद्द्याला अधिक महत्व दिल्यासारखे वाटते. पण दुहेरी उत्पन्न हा तितकासा महत्वाचा मुद्दा नसून अपत्य संगोपनाची आवड नसल्याने वा इच्छा नसल्याने विनापत्य जीवनशैली अवलंबणार्‍या काही लोकांनी (स्वेच्छेने) विनापत्य जीवनशैली - किंवा चाईल्डफ्री लाईफस्टाईल ही संज्ञा प्रचलित केली. मलाही हीच संज्ञा जास्त आवडते. वैयक्तिक माहिती या विषयावरचे प्रत्येकाचे अनुभव व विचार अगदी भिन्न असल्याने मला व्यक्तिगत माहिती आधी संक्षिप्तपणे सांगावीशी वाटते मी इंजिनियर असून सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी करतो. आता मी वयाची चाळिशी ओलांडलेली आहे. मी याबद्दलचा निर्णय साधारणपणे वयाच्या पंचविशीच्या आधीच घेतला. त्यावेळी माझा विवाह झालेला/ ठरलेला नव्हता. माझा निर्णय मी आई-वडीलांना सांगितला तेव्हा त्यांनी अर्थातच विरोध केला. हा निर्णय अतिशय अयोग्य आहे पासून ते असा निर्णय घेतल्यावर कोण मुलगी माझ्याशी लग्नाला तयार होईल इथवर बरेच मुद्दे वारंवार चर्चेत राहिलेत. बाकी प्रेमाबिमाचं कधीच न जमल्याने अ‍ॅरेंज्ड मॅरेजचा पर्याय अवलंबला होता. त्यातही पारंपारिक पध्दतीने मध्यस्थांमार्फत आलेली स्थळे व इंटरनेटवरील वधूवरसूचक साईट्स (मॅट्रिमोनियल) अशा दोन्ही प्रकारे प्रयत्न सुरु होते. या निर्णयामुळे लग्न जुळण्यास काहीसा विलंब झाला हे खरे, पण इतरही काही कारणे होती. माझी पत्नीशी माझा संपर्क एका मॅट्रिमोनियल संस्थळाच्या माध्यमातून झाला. आधी काही वेळा फोनवर बोलणे झाल्यावर आम्ही भेटलो. एक दोन भेटीनंतर आणि एकमेकांची पहिल्या पायरीवरची पसंती झाल्यावर मी तिला माझ्या या निर्णयाबद्दल सांगितले. तिचे विचार असे अजिबात नव्हते उलट तिला मुलांची खूप आवड होती. पण माझा स्वभाव, व्यक्तीमत्व तिला आवडले असल्याने तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढे जावून माझे विचार कदाचित बदलतील अशी तिला आशा होती. आमचे लग्न झाले तेव्हा आम्ही तिशी ओलांडली होती आणि आता लग्नाला अकरा वर्षे होवून गेलेत पण माझे विचार काही बदलले नाहीत. आणि सुरुवातीच्या काहीशा नाराजी नंतर पत्नीनेही माझे विचार व माझा निर्णय समजून स्वीकारला. माझी आई पुर्वी म्हणायची की "लोक विचारतात , नातू कधी वगैरे" पण नंतर माझ्या आईलाही वाटू लागले की "दोघे आनंदी आहेत तर मग काय फरक पडतो". त्यामुळे मला ह्या निर्णयावर ठाम राहण्यास फारशा अडचणी आल्या नाहीत. निर्णयाचे फायदे
  • या निर्णयामुळे आम्हा दोघांना आपल्या मर्जीनुसार आवडीच्या अनेक गोष्टी करता येतात, वेळ घालवता येतो.
  • माझी पत्नी व्यावसायिक वकील आहे. तिला तिच्या व्यवसायाकरिता बराच वेळ देता येतो, घरी यायला उशीर झाला , अचानक कुठे दूर जावे लागले तरी काही दडपण नसते.
  • अर्थिक नियोजन सोपे होते. आम्ही लवकर निवृत्ती घेवू शकतो.
  • घर बहुतांशी नीट नेटके राहते.
  • मला जरी बालसंगोपन करायचे नव्हते तरी मुले आवडत नाहीत वा मुलांसोबत वेळ घालवायला आवडत नाही असे अजिबात नव्हते. पत्नीला तर मुलांची आवड होतीच. त्यामुळे आम्ही जमेल तसे मित्रमंडळींच्या मुलांसोबत अनेकदा वेळ घालवतो. यामुळे एक /दोन नाहीतर अनेक मुलांच्या सहवासाचा आम्हाला आनंद मिळतो. सगळ्या मुलांचे स्वभाव व सवयी भिन्न असल्याने या सहवासात खूप वैविध्य आहे.
निर्णयाचे तोटे तोटे तसे नाहीत. फक्त काही वेळा एखादे कुटूंब सोबत वेळ घालविण्याकरिता आमच्यापेक्षा ज्यांना मुले आहेत अशा दुसर्‍या जोडप्याला अधिक प्राधान्य देते. ते साहजिकच आहे कारण त्यामुळे त्या कुटूंबातील मुलाला/ मुलीला समवयस्क मित्र/मैत्रीण मिळणार असते. इतरांच्या प्रतिक्रिया जेव्हा मला नव्याने भेटणार्‍या परिचित जेव्हा थोडीफार मैत्रीबद्दल अपत्याबद्दल विचारतात तेव्हा मी त्यांना माझ्या निर्णयाबद्दल स्पष्टपणेच सांगून मोकळा होतो. सुरुवातीचा आश्चर्याचा धक्का ओसरल्यानंतर त्यांना याबद्दल फार काही वाटत नाही. किंवा मुलांमुळे ताणलेल्या वेळापत्रकाच्या व्यथा अनुभवणार्‍या काहीजणांना तर चक्क माझ्या या निर्णयाचा हेवा वाटतो. परिचयातली इतर विनापत्य जोडपी माझ्या प्रत्यक्ष परिचयात दोन जोडपी विनापत्य होती. पण त्यापैकी एका जोडप्यातील स्त्रीला (जी माझी मैत्रीण आहे) नेहमीच मूल हवेसे वाटत होते तर तिच्या पतीला नको होते. पुढे काही वर्षांनी त्यांना मूल झाले - माझ्या मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे ती चुकून झालेली गर्भधारणा होती. पण तिचा नवरा आनंदी नाही आणि माझे तिच्याशी शेवटचे बोलणे झाले त्याप्रमाणे तिचा नवरा तिला घटस्फोट देण्याच्या विचारात होता. आतापर्यंत घटस्फोट झाला किंवा कसे हे मला माहिती नाही. याव्यतिरिक्त फेसबूकवरुन ओळख झालेल्या एका मुलीशी माझी भेट झाली जिचा निर्णय विनापत्य राहण्याचा आहे आणि त्याकरिता तिने आपल्या प्रियकराचे मन वळवले आहे. पण अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही. समाजमाध्यमांवरील गट फेसबूकवर विनापत्य व्यक्तींचे विविध गट आहेत. यापैकी "चाईल्डफ्री इंडियन्स ओरिजिनल" या गटाचा मी सदस्य आहेत. या गटात आता २५० सदस्य आहेत. पण या गटातील पोस्ट्स अनेकदा टोकाच्या व एकांगी वाटतात.. म्हणजे विनापत्य असणे हे "कूल असणे" तर अपत्यांना जन्म देणे म्हणजे "फूल असणे" वगैरे आशयाच्या. पण मलातरी असा आशय पटत नाही. माझा दृष्टीकोन एक वा अधिक अपत्यांना जन्म देणे (त्यातही खासकरुन ते जोडपे अपत्यांना चांगले जीवन देवू शकणार असतील तर) किंवा विनापत्य राहण्याचा निर्णय घेणे ह्या दोन्ही व्यक्तिगत निवडी आहे. कुणाला चूक वा कुणाला बरोबर ठरवणे हे योग्य नाही. दोन्ही गटांनी एकमेकांच्या निर्णयाचा आदरही केला पाहिजे व त्या निर्णयाबद्दल एकमेकांचे आभारही मानायला हरकत नाही. विनापत्य जोडप्यांमुळे इतर जोडप्यांच्या अपत्यांच्या जीवनात येणारी प्रचंड स्पर्धा काही प्रमाणात तरी कमी होणार आहे, नैसर्गिक स्त्रोंतावर येणारा ताण , निर्माण होणार कचरा या सगळ्यात काही प्रमाणात तरी घट होईल त्यामुळे सापत्य (शब्दप्रयोग बरोबर आहे का ?) जोडप्यांनी विनापत्य जोडप्याचे आभार मानायला हरकत नाही. तर विनापत्य लोकही जगत आहेत.. त्यांना जगण्याकरिता विविध सेवा व उत्पादने रोजच हवी आहेत. ती पुरवण्याकरिता - त्यासाठी काम करण्याकरिता नवीन पिढी असणे गरजेचे आहेच. मग जी जोडपी कष्ट करुन, यातना सोसून अपत्यांना जन्म देत आहेत त्यांना विनापत्य लोकांनी हसण्याचे कारण नाही उलट त्यांचे आभार मानायला हवेत. मला स्वतःला परिचयातल्या इतर पालकांच्या बालसंगोपनाच्या जबाबदारीत जमेल तशी जमेल तेव्हा मदत करुन त्यांचा भार काहीसा हलका करणे हे सामाजिकदृष्ट्या परिपक्वतेचे वाटते. भारतातील प्रसिद्ध विनापत्य जोडपी १)रघुनाथ धोंडो कर्वे आणि मालती कर्वे - या दोघांनाही "मूल हवे" अशी कोणतीही नैसर्गिक उर्मी नव्हती. मालतीजींना स्वतःच्या या भावनेबद्दल आश्चर्य वाटत होते पण रघुनाथ यांनी त्यांना समजावले की प्रत्येक स्त्री मध्ये अशी उर्मी असतेच असे नाही. अशी उर्मी नसणे हे देखील नैसर्गिकच असू शकते. (संदर्भः चित्रपट - ध्यासपर्व) २) अभिनेते अतुल कुलकर्णी - गीतांजली कुलकर्णी आणखी कुणी जोडपी माहित असल्यास जाणकारांनी भर घालावी भारतीय चित्रपटात हाताळलेला हा विषय १) ध्यासपर्व - रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावरील मराठी चरित्रपट (दिग्दर्शक : अमोल पालेकर) २) पाँडिचेरी - सचिन कुंडलकर दिग्दर्शित मराठी चित्रपट याशिवाय काही हिंदी चित्रपट असावेत पण आता आठवत नाहीये. विनापत्य जीवनशैली आणि निरिश्वरवाद माझ्या मते विनापत्य जीवनशैली अगदी स्वेच्छेने स्वीकारणारे किंवा त्याकडे ओढा असणारे लोक बहुधा निरिश्वरवादी आहेत, किंवा धार्मिक व सामाजिक पातळीवर डाव्या विचारांकडे झुकणारे आहेत. अर्थात असे माझे केवळ निरीक्षण आहे. याबाबत काही सांख्यिकी सर्वेक्षण वा संशोधन झाले आहे किंवा कसे याबद्दल मला माहिती नाही. असो. मंडळी , सध्या पुरते इतकेच. चर्चा पुढे सरकेल तशी अधिक भर घालेनच. अवांतर : डॉक्टर खरे साहेब, अध्याहृत हा शब्द बरेच दिवसांनी वाचायला मिळाला. छान वाटले. मी हा शब्द बोलतानाही कधी वापरतो , पण असे अवघड शब्द वापरलेत की पत्नी वैतागते :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 15:27 नवीन
डिंक मध्ये जर स्त्री गृहिणी असेल तर तिला अपत्य नको याचे स्वतःलाच किंवा समाजाला समर्थन करणे फार कठीण जाते. कारण दिवसभर काय करतेस तू घरीच तर असतेस मग मूल नको कशाला? इतका आळशीपणा? अशासारखे असंख्य टोमणे ऐकायला लागतात. यामुळेच या गटात अर्थार्जन न करणाऱ्या स्त्रिया फार कमी आढळतात. आपण काही तरी भरीव करत असलो पाहिजे हि माणसाची नैसर्गिक उर्मी आहे त्यात अर्थार्जन येतेच असे नाही. पण समाजसेवा हा पिंड असावा लागतो. त्यामुळे प्रत्येकास समाजसेवा करता येतेच असे नाही मग काही तरी काम करायचे तर ते फुकट का करायचे? या विचारातून मग नोकरी किंवा व्यवसाय केला जातो यामुळे आपोआप दुसरे उत्पन्न होत जाते. दुसऱ्या उत्पन्नाला महत्व देणे हा विचार नाही पण व्याख्येप्रमाणे DOUBLE INCOME आहे म्हणून लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 21:39 नवीन
भारतीय चित्रपटात हाताळलेला हा विषय
३) एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी - या चित्रपटात डॉक्टर खरे साहेबांनी धाग्यात सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणेच एक डॉक्टर स्त्री दाखवली आहे जिला मूल नको व ते ही लग्नानंतर आपल्या पतीला (तो ही डॉक्टर) सांगते. पुढे घटस्फोट होतो. नायक दुसरे लग्न करतो. पण इकडे या पहिल्या नायिकेचे आई-वडील अपघातात दगावतात. त्यामुळे एकाकी झालेल्या तिला अचानक आपले मूल ते ही घटस्फोटित पतीपासूनच हवेसे वाटते.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 08/21/2022 - 16:29 नवीन
पु. ल. देशपांडे - सुनिता देशपांडे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/25/2022 - 14:38 नवीन
पु. ल. देशपांडे - सुनिता देशपांडे .. आणि अपत्य ("आहे मनोहर तरी")
सुनीताबाई ह्यांनी अत्यंत प्रामाणीकपणाने आपल्या आयुष्याचा पट उलगडला आहे. लग्नापूर्वी एका रात्री त्या एका मुस्लीम कार्यकर्त्याच्या घरी झोपल्या असतांना त्याने आपल्याशी प्रेम करावं, आपल्याला जवळ घ्यावं अशी त्यांना इच्छा झाल्याचं अगदी न बिचकता सांगितलं आहे. बरं हे सांगण्यात काहीतरी खळबळजनक सांगावं असा अभिनिवेश मुळीसुद्धा नाही. फक्त प्रामाणीकपणा तेवढा प्रकट होतो.
तीच बाब त्यांच्या गर्भार असतानाचा प्रसंग सांगतांना. त्यांना जेवण जात नसल्याने त्यांनी स्वत:साठी फळे आणून ठेवली. ती भाईंनी आणि आलेल्या पाहुण्यांनी खाऊन टाकली. हा प्रसंग म्हटल्यास अगदी साधा. पण त्यांनी त्याचा इतका इशू केला की बस. बहुदा त्यांनी गर्भ पाडून टाकला आणि पुन्हा कधीही गर्भधारणा होवू दिली नाही असा समज तो प्रसंग वाचल्यावर होतो. पुलंना मुलांची इतकी आवड असूनही सुनीताबाईंनी त्यांना शिक्षा म्हणून अपत्यसुखापासून वंचित ठेवले की काय, असंही वाटायला लागतं. हे वाचल्यावर वाचकाला त्यांच्याबद्दल अत्यंत घृणा वाटू शकते. पण त्यांनी त्याची पर्वा न करता सारं काही सांगून टाकलेलं आहे. (मी हे पुस्तक सुमारे वीस पंचवीस वर्षांपूर्वी वाचलेलं असल्याने तपशीलात काही चुका होण्याची शक्यता आहे हे कृपया लक्षात घ्या.)
मास्त्रो / संदर्भ : आंजा डिस्क्लेमर : मी "आहे मनोहर तरी" वाचले नसल्याने खातरजमा केलेली नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 08/25/2022 - 19:48 नवीन
श्री सुनिता देशपांडे यांच्याबद्दलचा आदर कमी झाला.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 08/26/2022 - 05:57 नवीन
केवळ एवढ्यामुळे आदर कमी झाला? आहे मनोहर तरी यात मानवी स्वभावांचे चित्रण आहे. कुणीही सदा आदर्श वा सदा आदरणीय नसतो.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 08/26/2022 - 06:59 नवीन
सहमत. पुस्तक वाचून पानापानाला सुनीताबाईंबद्दल मत बदलत जाते. कधी चीड, कधी कौतुक, कधी हेवा आणि सर्व वाचून संपल्यावर एक मोठ्या उंचीची व्यक्ती म्हणून अत्यंत आदर हा रिझल्ट येतो. खरं बोलणे याबाबत तर हात जोडावेत (गृहीतक: रंजकतेसाठी काही वाढीव घातले नसावे. गरजही नसावी त्यांना.)
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 08/26/2022 - 12:51 नवीन
पुस्तक वाचून पानापानाला सुनीताबाईंबद्दल मत बदलत जाते.
अरे वा.. तुम्ही पुस्तक वाचले आहे तर. मग वरचा किस्सा (गर्भधारणे संदर्भातला) खरंच आहे का त्या पुस्तकात ? ते वाचून खरंच खूप विचित्र वाटत आहे. इतक्याशा कारणाने कुणी इतकं टोकाचं कसं वागू शकतो ?
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 08/26/2022 - 14:46 नवीन
विचित्र तर बरंच काही वाटतं. किंबहुना सर्वच. कितीतरी प्रसंग. तपशील वाचून जास्त वाईट मत बनायचंच असेल तर उलट या दोन्हीतल्या पहिल्या प्रसंगाने बनेल. त्यात केवळ आकर्षण नाहीये. उलट समोरुन तसा प्रतिसाद न मिळाल्याने चवताळून उठणे, आतली मादी दुखावली जाणे, आणि उलट स्वत:वर येऊ नये म्हणून त्या सज्जन पुरुषावरच उलट हल्लाबोल की मी विश्वासाने आलेली असताना असा गैरफायदा घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे वगैरे. हे सर्व त्यांनी तिथे तटस्थपणे लिहिलेय. आधी मत वाईट होते. एकेक प्रसंग वेगळे पैलू समोर आणतो. खूप प्रसंग आहेत. सर्वांतून एक संपूर्ण मनुष्यत्व पुढे येतं. असे धाडस आपल्यात येणे कठीण. बाकी गर्भधारणेबाबतच्या प्रसंगात भाई मोठ्ठं डाळिंब घेऊन आला. मग सर्वांनी ते संपवून टाकलं. आणि नवीन जन्माला येणार्या जिवाविषयी आधीच इतकी बेपर्वाई/ अनास्था असेल तर नकोच ते असं आम्ही ठरवलं असा स्थूलमानाने उल्लेख आहे. हा अतिरेक वाटू शकेल लॉजिकली. पण बाई अत्यंत मनस्वी होत्या. डाळिंब हे तात्कालिक निमित्त असेल,त्या उंटावरली शेवटची काडी असेल. आसपास खूप काही न सांगितलेलं असेल. टू बी फेअर विथ सुनीताबाई, अँड टू बी फेअर विथ एव्हरी लेडी इन द वर्ल्ड.. गर्भ ठेवणे, न ठेवणे हा १००% तिचा एकटीचा निर्णय हक्क आहे असे मी मानतो. मला त्यात नैतिक निवाडा देण्याची लायकी किंवा हक्क नाही. नन ऑफ़ एनिवन एल्सेस बिझनेस. नो कंडिशन्स अप्लाय. नो जजमेंट्स पॉसिबल. हे वैयक्तिक मत अर्थात. __/\__
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 08/27/2022 - 10:38 नवीन
अगदी सहमत
टू बी फेअर विथ सुनीताबाई, अँड टू बी फेअर विथ एव्हरी लेडी इन द वर्ल्ड.. गर्भ ठेवणे, न ठेवणे हा १००% तिचा एकटीचा निर्णय हक्क आहे असे मी मानतो
मूल दोघांच असत. केवळ निसर्गाने स्त्रीला मूल जन्म देण्याची यंत्रणा शरिरात ठेवली आहे म्हणून केवळ तिचाच १०० टक्के हक्क हे लॉजिक पतिपत्नी संबंधांना लावणे पटत नाही. जर तसा त्यांचा अंतर्गत करार असेल तर गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 08/27/2022 - 10:56 नवीन
मूल दोघांच असत. केवळ निसर्गाने स्त्रीला मूल जन्म देण्याची यंत्रणा शरिरात ठेवली आहे म्हणून केवळ तिचाच १०० टक्के हक्क हे लॉजिक पतिपत्नी संबंधांना लावणे पटत नाही. जर तसा त्यांचा अंतर्गत करार असेल तर गोष्ट वेगळी.
+१
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 08/27/2022 - 10:55 नवीन
टू बी फेअर विथ सुनीताबाई, अँड टू बी फेअर विथ एव्हरी लेडी इन द वर्ल्ड.. गर्भ ठेवणे, न ठेवणे हा १००% तिचा एकटीचा निर्णय हक्क आहे असे मी मानतो. मला त्यात नैतिक निवाडा देण्याची लायकी किंवा हक्क नाही. नन ऑफ़ एनिवन एल्सेस बिझनेस. नो कंडिशन्स अप्लाय. नो जजमेंट्स पॉसिबल.
असे नाही. अगदी टोकाचे स्त्रीमुक्तावादी असे मत व्यक्त करु शकतात. जर ती स्त्री जर एकटी , विनालग्नाची , परित्यक्ता किंवा तत्सम असेल तर ठिक आहे, इतर बाबतीच हे योग्य नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 08/27/2022 - 12:19 नवीन
जन्माला घालण्यातील (जन्माला येईपर्यंतचा भाग, पालन पोषण नव्हे) स्त्री आणि पुरुष यांच्यातील contribution आणि risk या दोन्हीची वाटणी अत्यंत टोकाची असामान आहे. म्हणून तसे वाटते. शिवाय इतर घटकांचा तिच्यावर असलेला दबाव. स्त्रीला केवळ कोण्या स्त्रीवादातून जनरल मोठेपणा देणे असा उद्देश मुळीच नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 08/27/2022 - 15:03 नवीन
जन्माला घालण्यातील (जन्माला येईपर्यंतचा भाग, पालन पोषण नव्हे) स्त्री आणि पुरुष यांच्यातील contribution आणि risk या दोन्हीची वाटणी अत्यंत टोकाची असामान आहे. म्हणून तसे वाटते. शिवाय इतर घटकांचा तिच्यावर असलेला दबाव.
अयोग्य समर्थन. जरी स्त्री मुल जन्माला घालत असली तरी सर्वसामान्य घरात आजी, आजोबा, भाऊ, दिर, भावजय व इतर नातेवाईक आपल्या आपल्या परीने मदत करत असतात. त्यामुळे स्त्रीला १००% हक्क असणे चुकीचे नव्हे, ओरबाडुन खाण्याच्या प्रवृत्तीचे द्योतक आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 08/28/2022 - 17:25 नवीन
जन्माला घालण्यातील (जन्माला येईपर्यंतचा भाग, पालन पोषण नव्हे) स्त्री आणि पुरुष यांच्यातील contribution आणि risk या दोन्हीची वाटणी अत्यंत टोकाची असामान आहे. म्हणून तसे वाटते. शिवाय इतर घटकांचा तिच्यावर असलेला दबाव.
सहमत. १) गर्भधारणेपुर्वी "मूल हवे" हा निर्णय हे जोडीदार स्त्री-पुरुष (सध्या फक्त पती-पत्नी म्हणूयात) यापैकी दोघांचा होकार असेल तरच होवू शकतो. कुणा एकट्याला हवे म्हणून मूल जन्माला घातले जावू नये. २) गर्भधारणेनंतर "मूल नको" किंवा गर्भपात करायचा असेल तर ते ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी स्त्रीचा असेल यात दोन शक्यता संभवतात - २ अ) गर्भधारणे नंतर पतीला मूल नकोय व पत्नीला हवेय म्हणून पती पत्नीला गर्भपाताबद्दल आग्रह कर असेल. अंतिम निर्णय पत्नीचा असावा. पण बालसंगोपनात पतीची साथ मिळणार नाही, कदाचित घटस्फोटही होवू शकतो या शक्यतांचा विचार करुन , त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवून तिने अंतिम निर्णय घ्यायला हवा. २ ब) गर्भधारणे नंतर पत्नीला मूल नकोय व पतीला हवेय म्हणून पत्नी गर्भपाताचा विचार करतेय. इथेही अंतिम निर्णय पत्नीचा असावा. पण पतीने मूल असण्याबद्दल आग्रही राहताना पत्नीला ते का नकोय हे नेमके समजून घेणे गरजेचे आहे. जर तिच्या प्रकृतीला धोका संभवत असेल किंवा तिची मानसिकता "मूल नको , बालसंगोपन नको " अशी असेल तर त्या गोष्टींचा विचार करुन आपला आग्रह पुढे किती रेटायचा हे ठरवायला हवे. जर पतीच्या आग्रहामुळे पत्नी मूल जन्माला घालायला तयार झाली पण मूलाच्या जन्मानंतरची सुरुवातीची नैसर्गिक गरज (मातेचे दूध) वगळता ती बालसंगोपनात सहभागी होणार नसेल तर त्या सर्व गोष्टीचा विचार पतीला करायला लागेल. पण अर्थातच या सर्व बाबतीत मतभेद असल्यास पती-पत्नी दोघांनी चर्चा करुन, एकमेकांना समजून घेत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. पण तरी सहमती नाहीच झाली आणि दोघे आपापल्या मतावर ठाम असलेच तर घटस्फोटाचा निर्णय घेता येवू शकतो. पुल-सुनीताबाईंपुरतं म्हणायचं झाल्यास त्या दोघांनी पुढेही संसार केला, ते वेगळे झाले नाहीत. पुल दुखावले गेले असते तर त्यांना वेगळे होणे अशक्य (मानसिक दृष्ट्या वा सामाजिक दृष्ट्या ही) नक्कीच नव्हते .. ते काही जुनाट धार्मिक विचारांनी लग्नसंस्स्थेला बांधलेलेही नव्हते. आणि वेगळे होवून त्यांना दुसरी जोडीदारही मिळाली असती, पण असे असून ते दोघे एकत्रच होते याचा अर्थ त्यांची सहमती झाली असणार .. तेव्हा आपल्याला तो किस्सा वाचायला कितीही विचित्र वाटला तरी मिया बिबी राजी ...
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 08/26/2022 - 07:55 नवीन
पहील्या प्रसंग त्यांच्या लग्नाआधी घडल्याने आणि रात्रीच्या वेळी माणसाची मति योग्य प्रकारे काम नाही, त्यामुळे फारसे काही वाटत नाही. -- दुसरा प्रसंग निव्वळ बालिशपणा, खुनशीपणा आणि निसर्गदत्त अधिकार एकत्र आल्याने एक होऊ शकते याचा उत्तम नमुना आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/26/2022 - 15:15 नवीन
पुस्तक मीही वाचलं आहे. असं काही एक झालं नाही. डाळींब संपवून टाकलं याबद्दलचा राग त्यांनी व्यक्त केला हि वस्तुस्थिती आहे पण त्यांनी गर्भ पाडून टाकला हे सत्य नाही तर त्यांचा दुर्दैवाने गर्भपात झाला आणि नंतर परत गर्भ राहिलाच नाही. हे त्यानी एकदा मॅजेस्टिक गप्पांमध्ये सांगितले होते. पुस्तकात शब्दशः काय लिहिलेले आहे ते मला आता नक्की आठवत नाही. पण काही बाबी ज्या केवळ आणि केवळ नवरा बायकोमध्ये असायला हव्या त्यासुद्धा त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत. हे मला खटकले तसे प्रत्येकाला खटकेलच असे नाही. आणि तसे त्यांनी लिहावे कि नाही हे सांगण्याचा मला कोणताही अधिकार नाही. त्यांचा स्वभाव थोडा पुरुषी म्हणतो तसा होता. सडेतोड पणा बाणेदारपणा हाही नको तेवढा होता. श्री पु ल हे नको तितके मनमिळाऊ होते आणि व्यवहाराला चोख नव्हते. याचा लोक भरपूर गैरफायदा घेत असत. यामुळे त्या( सुनीता बाई) अशा गैरफायदा घेणाऱ्या लोकांशी जेवढ्यास तेवढे वागत असत. यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज सुद्धा तितकेच पसरलेले होते. एक किस्सा असाही आहे. कि पुलंचे एक पुस्तक याची मुद्रणपूर्व कॉपी सुनीताबाईंनी वाचली. त्यात शुद्ध लेखनाच्या इतक्या चुका होत्या कि त्यांनी प्रकाशकाला फोनकरून विचारले कि इतक्या भयंकर चुका कशा काय झाल्या? त्यावर प्रकाशकाच्या माणसाने सांगितले कि प्रूफ रिडींग साहेबांनी स्वतः केलंय? यावर सुनीता बाईंचा विश्वास बसेना म्हणून त्या मुद्रणालयात स्वतः गेल्या. तेथे प्रूफ रिडींग केलेलं पुस्तक हातात घेतले तर त्यात पहिल्याच पानात इतक्या भयंकर चुका होत्या कि पुलं यांनी वैतागून मुद्रकाचे नाव वाघ होते ते खोडून डुक्कर असे लिहिले होते आणि ती कॉपी तेथेच ठेवून ते परतले होते. एक वस्तुस्थिती हि पण आहे कि त्या पुलंची पत्नी म्हणूनच प्रसिद्ध होत्या आणि म्हणून लोकांनी त्यांचे पुस्तक वाचले किंवा त्यांना प्रसिद्धी मिळाली हेही तितकेच सत्य आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 08/26/2022 - 15:40 नवीन
असं काही एक झालं नाही. डाळींब संपवून टाकलं याबद्दलचा राग त्यांनी व्यक्त केला हि वस्तुस्थिती आहे पण त्यांनी गर्भ पाडून टाकला हे सत्य नाही तर त्यांचा दुर्दैवाने गर्भपात झाला आणि नंतर परत गर्भ राहिलाच नाही. हे त्यानी एकदा मॅजेस्टिक गप्पांमध्ये सांगितले होते.
तसंही असेल. मजेस्टीक गप्पा संदर्भ मला माहीत नव्हता. पण पुस्तकात बियॉन्ड एनी डाउट त्यानी लिहिलंय की असं असेल तर नकोच ते, आम्ही दोघांनी नीट विचार करुन/ ठरवून हा निर्णय घेतला.. असा नीट उल्लेख त्याच क्रमात आला आहे. प्रत्यक्ष खाजगी आयुष्य खूपच तपशिलात जाऊन मांडलेय हे खरं आहे. शेवटी त्यांची मर्जी. पण केवळ बारीक घटनेने राग धरुन तातडीने भावनेच्या भरात गर्भपात केला अशी जी प्रतिमा होतेय ती दूर करण्याचा तो प्रयत्न होता.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/26/2022 - 16:32 नवीन
मिसळपाव धोरणाप्रमाणे आपण इथे पानाचे/ उताऱ्यांचे फोटोज् देऊ शकत नाही गवि, वैयक्तिक एनेकडॉट्स हे सहमतीला सहाय्यक टूल कधीच नसेल, त्यामुळे माझा आपणांस एक अनाहुत सल्ला असेल, just burry the issue. फुकट आहे take it or leave it, पण एकंदरीत तुमचे प्रतिसाद अन् विचार पाहून द्यावा वाटला. अगदी मातृत्वाबद्दल माझे विचार जरासे वेगळे असूनही ! (वेगळे म्हणजे स्त्रीला पोरे देण्याची मशीन समजणे नाही, तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही तरी सांगून ठेवतोय आपलं).
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 08/26/2022 - 16:36 नवीन
हे पुस्तक मी ही पंचवीस किंवा त्याही पेक्षा अधिक वर्षांपूर्वी वाचले आहे. 'बहुदा त्यांनी गर्भ पाडून टाकला आणि पुन्हा कधीही गर्भधारणा होवू दिली नाही असा समज तो प्रसंग वाचल्यावर होतो'. असा माझा तरी समज झाला नव्हता. किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक गर्भपात करवून घेतल्याचे वाचल्यासारखे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/19/2022 - 15:34 नवीन
घरचे प्रश्न चौकात सुटत नसतात. आणखी काय सांगू.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 15:43 नवीन
हा प्रश्न नाहीच. जाणीवपूर्वक मूल नको हे म्हणणाऱ्या जनांच्या विचारसरणीचि चर्चा आहे. तसे पाहिले तर राजकारणाचीच काय इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा इथे करून कोणाला काय फायदा होणार आहे. साहित्य वाचून किंवा चित्र काढून काय फायदा होतो? असे म्हणण्यासारखे आहे
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 08/19/2022 - 16:44 नवीन
+१००० हेच लिहायला आलो होतो. हा कोणाच्या घरातला प्रश्न किंवा समस्या नाहीच. मूल नको हे म्हणणाऱ्या जनांच्या विचारसरणीची, अनुभवांची, फायद्या - तोट्यांची (तोटे नाहीतच हा भाग वेगळा) आयुर्वेदिक* चर्चा अपेक्षित आहे. * ह्या चर्चेचा कोणाला फायदा होवो न होवो निदान नुकसान तरी होणार नाही 😀
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 08/19/2022 - 17:35 नवीन
दुसरं काय. ती जोडपी या विचारांच्या पलिकडे गेलेली असतात. मग आपण चर्चा करून काय उपयोग? पण १) आम्हा दोघांना मूल नको आहे पण दोघाचे आईवडील मागे लागले आहेत तर काय? २)एका पालकास मूल हवंय पण दुसऱ्याला नकोय तर काय? ३)दोघांनी मूल नको होतं पण आता हवंय पण होत नाही तर काय? असे निरनिराळे सामाजिक, वैयक्तिक, शारिरिक, मानसिक प्रश्न आहे असू शकतात. तर ते सोडवणे जोडप्यांच्याच हातात. आपण काय करणार? गंमत म्हणजे बऱ्याच प्रसिद्धीच्या झोतातल्या स्त्रिया सध्या मूल होणे,मुलं होणे,लवकर होणे, करिअर को मारो गोली अमलात आणत आहेत. फोटोबिटो इन्स्टाग्रामवर टाकून दणकून मिरवत आहेत. काही तर अशा स्थित्यंतरासाठी व्यायाम,कपडे,पर्यटन भलामणी याच्या सुपाऱ्या घेत आहेत. तर त्यांचे अनुकरण करून विचार बदलणाऱ्या येऊ शकतात. कारण आमच्याकडे कसल्याही गोष्टी कालमान्य किंवा कालबाह्य होऊ शकतात. उदाहरण मोठ्या छत्रीचं घेता येईल. फोल्डींगची छोटी छत्री बाळगणे कमी प्रतिष्ठेचे ठरले आहे. मोठी छत्री बाळगणे आणि मिरवणे सध्या फ्याशनेत आहे. मूल होऊ न देण्याची फ्याशन मागे पडली आहे. मूल वेळच्या वेळी होऊ देणे म्हणजे आर्थिक स्थिरता आणि भक्कमपणा दाखवते. पैसे मिळवण्याच्या ध्येयापायी/ गरजेपायी मूल लांबवणे हे गरीबी दाखवते .
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 08/19/2022 - 18:33 नवीन
वैयक्तिक आवडी निवडिंच्या जोडीला कौटुंबिक पार्श्वभूमी आणि जीवनशैली अशा गोष्टीही विचारात घेउनच परस्पर सामंजस्याने असे निर्णय घेतले जातात रादर घेतले गेले पाहिजेत म्हणजे तुम्ही सांगितलेले खालील तीन मुद्दे उपस्थित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. १) आम्हा दोघांना मूल नको आहे पण दोघाचे आईवडील मागे लागले आहेत तर काय? २)एका पालकास मूल हवंय पण दुसऱ्याला नकोय तर काय? ३)दोघांनी मूल नको होतं पण आता हवंय पण होत नाही तर काय? DINK किंवा चाईल्डफ्री लाईफस्टाईल ही फॅशन म्हणून नाही तर अत्यंत विचरपूर्वक स्वीकारली गेली असली पाहिजे. त्यावर ठाम राहणे शक्य नसेल तर असे निर्णय घेऊच नयेत. वेळप्रसंगी अगदी गर्भपात करण्याची परिस्थिती उद्भवली तरी कटू का असेना पण तो निर्णय घेण्याची मानसिक तयारी ठेवणेही गरजेचे असते. वर तर्कवादी साहेबांनी त्यांच्या अनुभवावर आधारित सविस्तर प्रतिसाद दिलाच आहे त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे, या जीवनशैलीला पुर्वी DINK असेच फक्त म्हंटले जायचे पण नंतर यात संज्ञेत दुहेरी उत्पन्नाच्या मुद्द्याला अधिक महत्व दिल्यासारखे वाटते. पण दुहेरी उत्पन्न हा तितकासा महत्वाचा मुद्दा नसून अपत्य संगोपनाची आवड नसल्याने वा इच्छा नसल्याने विनापत्य जीवनशैली अवलंबणार्‍या काही लोकांनी (स्वेच्छेने) विनापत्य जीवनशैली - किंवा चाईल्डफ्री लाईफस्टाईल ही संज्ञा प्रचलित केली. मलाही हीच संज्ञा जास्त आवडते. ह्या विचाराकडे/जीवनशैलीकडे आर्थिक दृष्टिकोनातून बघणे मुळातच चुकीचे आहे, ह्यात दुहेरी उत्पन्न किंवा पैसा हा मुद्दा गौण आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा समाजात चाईल्डफ्री जीवनशैली अंगिकरलेल्या लोकांची हेटाळणी केली जायची तेव्हा बोलणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी बेधडक आम्ही dink आहोत असे सांगितले जायचे, हे उत्तर थोडे उद्धटपणाचे वाटले तरी त्यातून समोरच्याला न्यूनगंड येऊन विषय बंद व्हायचा. पण डिंक पेक्षा चाईल्डफ्री जीवनशैली हीच संज्ञा योग्य आहे. असो... आम्हीही एकमताने चाईल्डफ्री जीवनशैली अंगिकारली असल्याने स्वानुभवावरून लिहिण्यासारखे बरेच काही आहे, टप्प्या टप्प्याने प्रतिसादातून लिहितो.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/21/2022 - 08:05 नवीन
DINK किंवा चाईल्डफ्री लाईफस्टाईल ही फॅशन म्हणून नाही तर अत्यंत विचरपूर्वक स्वीकारली गेली असली पाहिजे. त्यावर ठाम राहणे शक्य नसेल तर असे निर्णय घेऊच नयेत. वेळप्रसंगी अगदी गर्भपात करण्याची परिस्थिती उद्भवली तरी कटू का असेना पण तो निर्णय घेण्याची मानसिक तयारी ठेवणेही गरजेचे असते.
अंनिसतील एका मित्राचा प्रेम विवाह झाला. शिवाय तो विचारपूर्वक केलेला विवाह होता. आदर्श विवाह म्हणून मिळून सार्‍या जणीमधे लेख ही आला होता. मूल नको ही भूमिका होतीच. १५ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. नक्की कारण माहित नाही. नंतर त्याने तिच्याच एका बहिणीशी लग्न केले. तिला अगोदरच एक मुलगा होता. नंतर त्याने उशीरा का होईना स्वत;चे असे एक मूल होउ दिले. त्याला खरं तर मुलांची आवड होती. बुद्धीप्रामाण्य विचारश्रेणीत ती हरवली असावी. मुद्दा असा की विचारात नंतर बदल होउ शकतो.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 08/21/2022 - 12:36 नवीन
मुद्दा असा की विचारात नंतर बदल होउ शकतो.
विचारांत बदल होऊ शकतो पण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयात बदल होऊ नये असे वाटते. 'DINK' किंवा 'चाईल्ड फ्री जीवनशैली प्रत्यक्षात अंगीकारणे' हा एकतर्फी विचार नसून उभयतांनी विचारपूर्वक आणि एकमताने घेतलेला 'निर्णय' असतो! उगाच नाही, "Think Thousand times before taking a decision But - After taking decison never turn back even if you get Thousand difficulties" Adolf Hitler असे विसाव्या शतकात एक थोर (निदान माझ्यालेखी तरी 'थोरच') पुरुष म्हणुन गेलेत. (पुढे हे Quote शब्दांची फेरफार करून मोहम्मद अली जीनांनी स्वतःच्या नावावरही खपवले तो भाग वेगळा) थोडं अवांतर : मुसोलिनी, हिटलर आणि स्टॅलिन ह्यांची क्रूरकर्मा अशी ओळख असली आणि आजही ती केवळ तशीच करून देण्यात येत असली तरी त्यांनी केलेले किंवा त्यांच्या संमतीने केले गेलेले अत्याचार, नरसंहार/वंशविच्छेदाचे प्रयत्न ह्या त्यांच्या कारकिर्दीतील काळ्याकुट्ट बाजू बाजूला ठेऊन, भुकेकंगाल/विपन्नावस्थेतील आपली राष्ट्रे अल्पवाधित प्रगतीपथावर आणण्याचे त्यांचे कर्तृत्व बघितले तर हे लोकं खलनायक न वाटता राष्ट्र नायक वाटतात असे माझे वैयक्तिक मत! पण ते असो... तर सांगायचा मुद्दा हा की असे महत्वाचे निर्णय घेताना ते अतिशय विचारपूर्वक घेतले गेले नसतील किंवा त्यावर ठाम राहणे शक्य नसेल तर असे निर्णय घेऊच नयेत ह्या माझ्या ठळक अक्षरातील विधानाचा मी पुनरूच्चार करतो.
अंनिसतील एका मित्राचा प्रेम विवाह झाला. शिवाय तो विचारपूर्वक केलेला विवाह होता. आदर्श विवाह म्हणून मिळून सार्‍या जणीमधे लेख ही आला होता. मूल नको ही भूमिका होतीच. १५ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. नक्की कारण माहित नाही. नंतर त्याने तिच्याच एका बहिणीशी लग्न केले.
अंनिस/मानवाधिकार कार्यकर्ते अशा लोकांबद्दल बद्दल माझे मत अजिबात चांगले नाही हे आधीच स्पष्ट करतो, त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात असा स्वानुभव. अर्थात त्याला आपल्यासारखे काही एक ध्येय वा विचार घेऊन त्यात सहभागी झालेले सन्माननीय अपवाद आहेत हे देखील मान्यच! तर ह्या 'तथाकथित' विचारपूर्वक केलेल्या विवाहामागचा हेतू इको सिस्टीमचा वापर करून थोडीफार प्रसिद्धी मिळवण्याचा आणि 'मूल नको ही भूमिका' पुढे रेटण्याचा असू शकतो असा संशय 'आदर्श विवाह म्हणून मिळून साऱ्या जणी*मधे लेख ही आला होता' हे वाक्य वाचल्यावर आला. * 'मिळून साऱ्या जणी' मासिकाच्या संस्थापक संपादक कोण होत्या हे लक्षात घेतले की इको सिस्टीम समजायला अजिबात कठीण नाही 😀 अर्थात प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश (असल्यास) तो कितपत सफल झाला असेल ह्याविषयी साशंक आहे कारण 'सामना' हे शिवसेनेचे मुखपत्र, 'सनातन प्रभात' प्रमाणेच 'मिळून साऱ्या जणी' ह्या मासिकाचा वाचकवर्ग हा त्या त्या संघटना, समिती/चळवळीशी संबंधित, कार्यकर्ते आणि सहानुभूतीदार मंडळींपुरता मर्यादित आहे. पण ते पण असोच... घटस्फोटाचे कारण पुढच्या नंतर त्याने तिच्याच एका बहिणीशी लग्न केले ह्या वाक्यातच आले आहे की 😀 एकतर हा मनुष्य त्याच्या बायकोशी कधीच एकनिष्ठ नसावा किंवा चंचल विचारांचा/भ्रमरवृत्तीचा असावा आणि मेहुणीशी सूत जमल्यावर बायकोला घटसफोट दिला असावा किंवा तिला ह्या 'लफड्या' बद्दल समजल्यावर तीने ह्याला दिला असावा असा एक अंदाज.
नंतर त्याने उशीरा का होईना स्वत;चे असे एक मूल होउ दिले. त्याला खरं तर मुलांची आवड होती. बुद्धीप्रामाण्य विचारश्रेणीत ती हरवली असावी.
एकतर त्याच्या विचारांत/आपल्याआवडी-निवडिंविषयी क्लॅरिटी नसावी किंवा ज्या तथाकथित 'बुद्धीप्रामाण्य विचारश्रेणी' च्या आहारी तो गेला होता त्यातला फोलपणा लक्षात आल्यावर त्याला उपरती झाली असावी. असो, हे झाले माझे त्या व्यक्ती आणि घटनां विषयीचे प्राथमिक अंदाज, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असू शकते, मानवी मनाचा आणि मनोव्यापाराचा अचूक थांग लागणे महाकाठीण!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/22/2022 - 07:46 नवीन
विचारांत बदल होऊ शकतो पण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयात बदल होऊ नये असे वाटते. 'DINK' किंवा 'चाईल्ड फ्री जीवनशैली प्रत्यक्षात अंगीकारणे' हा एकतर्फी विचार नसून उभयतांनी विचारपूर्वक आणि एकमताने घेतलेला 'निर्णय' असतो! After taking decison never turn back even if you get Thousand difficulties" सगळ्यांनीच असे असावे असे नाही. आपल्या निर्णयात बदल करावासा वाटलं तर त्यात काय चूक आहे? उगाच समाजाला काय वाटेल म्हणून स्वतःच्या इच्छांना मुरड घालायची काय गरज आहे. अगदी निर्णय संपूर्ण विचारांती असला म्हणजे भोवतालची परिस्थिती बदलली तरी आपला निर्णय बदलायचाच नाही हे चूक वाटते. तुम्ही विशीत कम्युनिस्ट असलात म्हणजे आयुष्यभर कम्युनिस्ट च राहिले पाहिजे असे आहे का? पंचविशीत आपल्याला असे वाटत असेल कि लग्न करायची काय गरज आहे? म्हणून पन्नाशीत आपण हा निर्णय बदलूच नये असे का? नंतर जर असे वाटले कि आपण तेंव्हा गाढव होतो म्हणून आयुष्यभर स्वतःला गाढव समजत जगात राहणे आवश्यक नाही. उलट आपण तेंव्हा गाढव होतो असे प्रांजळ पणे कबुल करून चूक सुधारून पुढे जाणे शहाणपणाचे आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 08/22/2022 - 12:13 नवीन
आपल्या निर्णयात बदल करावासा वाटलं तर त्यात काय चूक आहे?
सहमत. माणसाच्या भावना, विचार , बदलू शकतात. "एक बार मैने कमिट कर लिया .." अशी भूमिका घेण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/22/2022 - 14:23 नवीन
सगळ्यांनीच असे असावे असे नाही.
असा काही नियम, कायदा किंवा सक्ती नाही. त्याकडे पुढे उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठीची पूर्वतयारी किंवा एक मार्गदर्शक तत्व म्हणुन पाहता येईल फारतर! कुठल्याही परीक्षेला जाताना त्यात उत्तीर्ण होण्यासाठी पूर्वतयारी म्हणुन अभ्यास करून जाणे अपेक्षित असते किंवा तशी प्रथा आहे. पण तसा काही नियम, कायदा किंवा सक्ती नाही. ज्याला यश मिळवायचे असते ते बिचारे करतात अभ्यास पण एखाद्याने अर्धवट किंवा अजिबात नाही अभ्यास केला तरी फार काही बिघडत नाही. जास्तीत जास्त काय होईल? परीक्षार्थी नापास होईल अजून काय! अभ्यास करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण यश मिळवायचे असल्यास तो करणे भाग आहे.
आपल्या निर्णयात बदल करावासा वाटलं तर त्यात काय चूक आहे?
चूक काहीच नाही, तो गुन्हा किंवा अपराधही नाही ! म्हणुन तर प्रतिसादातील पहिल्याच वाक्यात लिहिलंय "विचारांत बदल होऊ शकतो पण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयात बदल होऊ नये असे वाटते." इथे 'होऊ नये असे वाटते' हे महत्वाचे! जर तसा काही नियम किंवा कायदा असता तर तिथे वेगळे शब्दप्रयोग/वाक्यरचना केली असती 😀
उगाच समाजाला काय वाटेल म्हणून स्वतःच्या इच्छांना मुरड घालायची काय गरज आहे.
कशाला घालायची? समाजाला काय वाटेल किंवा लोक काय म्हणतील ह्याची पर्वा करायची काय गरज? काय समाजाची परवानगी घेऊन, समाजात चर्चा करून घेतला होता का हा निर्णय? उगाच काही च्या काही!
अगदी निर्णय संपूर्ण विचारांती असला म्हणजे भोवतालची परिस्थिती बदलली तरी आपला निर्णय बदलायचाच नाही हे चूक वाटते.
पुन्हा तेच सांगतो तसा काही नियम, कायदा किंवा सक्ती नाही पण
'DINK' किंवा 'चाईल्ड फ्री जीवनशैली प्रत्यक्षात अंगीकारणे' हा एकतर्फी विचार नसून उभयतांनी विचारपूर्वक आणि एकमताने घेतलेला 'निर्णय' असतो!
त्यामुळे जर दोन्ही पार्टी त्यासाठी तयार असतील तर ती आदर्श परिस्थिती असेल, पण जर नवरा किंवा बायको पैकी एकाचा विचार बदलला आणि दुसऱ्याची त्यासाठी तयारी नसेल तर त्या परिस्थितीत काय काय समस्या उद्भवतील ह्याचा अंदाज लावता येईल का? बरं भोवतालची परिस्थिती बदलली म्हणजे नक्की काय बदल झाले असतील? अगणित शक्यता आहेत, एखादी नमुन्यादाखल दिलीत तर बरं पडेल त्या अनुषंगाने मत मांडायला!
तुम्ही विशीत कम्युनिस्ट असलात म्हणजे आयुष्यभर कम्युनिस्ट च राहिले पाहिजे असे आहे का?
छे छे... जर माझी राजकीय/सामाजिक विचारसरणी बदलल्याने संसारिक आयुष्यात उलथापालथ होऊन आमची 'चाईल्ड फ्री जीवनशैली' बदलावी लागणार नसेल तर कम्युनिस्टच काय मी नाझी, फॅसिस्ट असा काहीही झालो तरी काहीच फरक पडणार नाही 😀
पंचविशीत आपल्याला असे वाटत असेल कि लग्न करायची काय गरज आहे? म्हणून पन्नाशीत आपण हा निर्णय बदलूच नये असे का? नंतर जर असे वाटले कि आपण तेंव्हा गाढव होतो म्हणून आयुष्यभर स्वतःला गाढव समजत जगात राहणे आवश्यक नाही. उलट आपण तेंव्हा गाढव होतो असे प्रांजळ पणे कबुल करून चूक सुधारून पुढे जाणे शहाणपणाचे आहे.
बदलावा की, जरूर बदलावा. लग्न करण्याची कमाल वयोमर्यादा अशी काही निश्चित नाही. पन्नाशीत अगदी १८ वर्षाची वधू मिळत असेल तरी बेधडक लग्न करावे! कोणी अडवलंय? पंचविशीत आपण तेंव्हा गाढव होतो म्हणून आयुष्यभर स्वतःला गाढव समजत जगत राहणे आवश्यक नाही. उलट आता पन्नाशीत आपण घोडा झालोय असे प्रांजळ पणे कबुल करून चूक सुधारून लग्न करणे नक्कीच शहाणपणाचे आहे. आता हाच प्रश्न मी त्यात धागाविषयक फेरफार करून तुम्हाला विचारतो,
पंचविशीत आपल्याला असे वाटत असेल कि मुल जन्माला घालायची काय गरज आहे? म्हणून पन्नाशीत आपण हा निर्णय बदलूच नये का? नंतर जर असे वाटले कि आपण तेंव्हा गाढव होतो म्हणून आयुष्यभर स्वतःला गाढव समजत जगत राहणे आवश्यक नाही. उलट आपण तेंव्हा इतरांना खांदा देत होतो. आता लोकांनी आपल्याला खांदा द्यायची वेळ आली आहे तरी चूक सुधारून पन्नाशीत मूल जन्माला घालून पुढे जाणे शहाणपणाचे आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/21/2022 - 08:32 नवीन
डिंक वर एक आक्षेप असतो तो म्हणजे तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे. मुलाची जबाबदारी नको.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 08/21/2022 - 13:47 नवीन
डिंक वर एक आक्षेप असतो तो म्हणजे तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे. मुलाची जबाबदारी नको.
हो, हा तर अगदी 'टॉप थ्री' मधला एक आक्षेप असतो आणि डॉक्टर कुमार१ ह्यांच्या 'थॅलसिमीया' वरील लेखावर दिलेल्या एका प्रतिसादात मी ह्याचा ओझरता उल्लेख केला होता. सदर लेखाच्या सुरुवातीला खरे साहेबांनी मिपावरील ज्या चर्चेचा उल्लेख केला आहे ती ह्याच 'थॅलसिमीया' विषयक धाग्यावर झाली होती 😀. पण "तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे. मुलाची जबाबदारी नको" असा आक्षेप घरची आणि अगदी जवळची मित्र मंडळी सहसा कधी घेत नाहीत. कारण आपण कसे आहोत; काय आहोत; आपले आचार, विचार, सवयी, आवडी निवडी, एकंदरीत आपल्या जीवनशैलीची इत्यंभूत माहिती त्यांना असते. हा आक्षेप काही नातेवाईक, शेजार-पाजारी आणि हितचिंतक म्हणवले जाणारे परिचित असे लोकं घेतात. अर्थात 'लोक काय म्हणतील' ह्याची पर्वा करणाऱ्यांना अशा गोष्टी विचलित करू शकतात आमच्या सारख्या कुमारवयातच हा दबाव झुगारून दिलेल्यांना नाही! "तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे" म्हणणाऱ्यांना, हो आम्ही आहोत 'चंगळवादी' आम्हाला फक्त मौज मजाच करायला आवडते असे तोंडावर बोलले की काम होते! त्यावरही कोणी 'पण हे चांगलं नाही' वगैरे म्हणुन बौद्धिक घ्यायच्या मूड मध्ये आलाच तर "कोणी गांधीवादी असतात, कोणी समाजवादी असतात, कोणी पर्यावरणवादी असतात तर कोणी मानवतावादी असतात त्यात जर काही गैर नाही तर आमच्या 'चंगळवादी' असण्यात काय गैर आहे?" असा प्रश्न त्यांना विचारला की काहीजण गप्प होतात तर काही नाराज होऊन 'तुम्हाला काही चांगलं सांगण्यात अर्थ नाही', 'तुम्हाला जास्तच शिंग फुटली आहेत' किंवा तत्सम काहीतरी बडबडून विषय संपवतात. अशा तत्वज्ञानी लोकांच्या नाराजीने आपल्या आयुष्यात काडीमात्र फरक पडणार नसल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नसते 😀
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 08/21/2022 - 20:20 नवीन
डिंक वर एक आक्षेप असतो तो म्हणजे तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे. मुलाची जबाबदारी नको.
मुलांची जबाबदारी नको हे खरंच आहे .. त्यामुळे मी तरी हा आक्षेप अमान्य करणार नाही... बाकी मज्जा म्हणजे काय याची काही ठोस व्याख्या नाही. "मज्जा न करता" अपत्य जन्माला घालताही येणार नाहीत :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 08/22/2022 - 06:25 नवीन
मज्जा नव्हे, "नुसती मज्जा"
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/22/2022 - 07:49 नवीन
डिंक वर एक आक्षेप असतो तो म्हणजे तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे असे लोक म्हणजे एक मनोवृत्ती आहे. हि केवळ उथळ विचारसरणी आहे. सगळेच डॉक्टर/ वकील /सी ए / सरकारी नोकर चोरच असतात असे समजणारी माणसे यांच्याहून वेगळी नाहीत.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 08/22/2022 - 08:31 नवीन
डिंक वर एक आक्षेप असतो तो म्हणजे तुम्हाला नुसती मज्जा करायला पाहिजे. मुलाची जबाबदारी नको.
इतरांच्या खाजगी गोष्टींमध्ये असे विनाकारण नाक खुपसायला जाणे हे सर्वसाधारणपणे भारतीय समाजाचे आणि त्यातही विशेषतः 'इतरांचे भले व्हावे या कळकळीने बोलणार्‍या' मोठ्या माणसांचे व्यवच्छेदक की काय म्हणतात ते लक्षण आहे. दुसरा माणूस नोकरी कुठे करणार, त्याला पगार किती असणार, लग्न कधी करणार, लग्न झाल्यावर मुले कधी होणार, मुले झाल्यावर त्याने मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे, काय करायला हवे, काय करायला नको असल्या अनंत भानगडींमध्ये आपण नाक खुपसायलाच हवे असे या मोठ्या माणसांना वाटत असते. असल्या लोकांना अजिबात मुलाहिजा न बाळगता फाट्यावर मारावे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 08/19/2022 - 21:31 नवीन
मूल होऊ न देण्याची फ्याशन मागे पडली आहे
ही काही फॅशनची गोष्ट नसते. वैयक्तिक निवड असते. प्रत्येक व्यक्ती आयुष्याबद्दल काय विचार करतो, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे यात भिन्नता असते. भिन्न विचार, भिन्न व्यक्तिमत्व यामुळे निर्णयात भिन्नता येते.
पैसे मिळवण्याच्या ध्येयापायी/ गरजेपायी मूल लांबवणे हे गरीबी दाखवते .
गरीब मूल लांबवतात असे काही निरीक्षण नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 08/21/2022 - 09:29 नवीन
Basic instinct फार उबळ मारते कधीकधी.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 08/21/2022 - 18:49 नवीन
Basic instinct फार उबळ मारते कधीकधी.
तुमचा मुद्दा नेमका समजला नाही. पण तरीही इतकं खात्रीने म्हणेन की "मला मूल नको.. किंवा मला पालक व्हायचं नाही" ही देखील अगदी Basic instinct असते काही जणांच्या बाबतीत. जसे सहज शक्य असूनही लग्नच न करणारे लोक असतात त्यांच्या बाबतीत "लग्न नको - वा कुणी जोडीदार नको आहे" ही भावना अगदी नैसर्गिकच असते तसंच काहीसं हे. निसर्गाचे काही नियम असतात हे मान्य पण निसर्गातच विचलन (व्हेरिएशन) सुद्धा बघायला मिळते ते सुद्धा तितकेच नैसर्गिक असते
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/20/2022 - 07:59 नवीन
मूल वेळच्या वेळी होऊ देणे म्हणजे आर्थिक स्थिरता आणि भक्कमपणा दाखवते. खायला अन्न नाही राहायला घर नाही झोपडीत राहत आहेत. ज्याला धड बाथरूम संडास सुद्धा नाही पण २१/२२ व्या वर्षी दोन मुले आहेत अशा अनेक स्त्रिया माझ्याकडे (रुग्ण) येतात. त्यांच्याकडे कसली आहे आर्थिक स्थिरता आणि भक्कमपणा. पैसे मिळवण्याच्या ध्येयापायी/ गरजेपायी मूल लांबवणे हे गरीबी दाखवते. उगाच काहींच्या काही? पूर्वी (सत्तरच्या दशकाच्या अगोदर) मध्यमवर्गातील माणूस कष्ट करत वर येत असे. बापाला पाच सहा मुले एकाच्या उत्पन्नात काहीही भागत नसे. मग मुलगा जेमतेम पदवीधर झाला कि मिळेल त्या नोकरीत चिकटत असे. नोकरी सुरु झाली कि वर्ष दोन वर्षात लग्न आणि लगेच मुलं. गिरगावातील अन गिरणगावातील अशा असंख्य चाळी अशा खुरटलेल्या कनिष्ठ आणि मध्य मध्यमवर्गीय मराठी माणसांनी भरलेल्या असत. दीड खोलीच्या चाळीच्या घरात आई बाप आणि त्यांचे दोन मुलगे आणि दोन सुना आणि दोन तीन पोरं असत. नवरा बायको ला एकांत (privacy) सोडून द्या. सेक्स सुद्धा कशीतरी घाईघाईने आटपून घ्यायची गोष्ट असे. पंचविशीचा मुलगा आणि पन्नाशीचा बाप दोघांची सेक्स बद्दल कुचंबणा चालूच असे. अशा परिस्थितीतून ज्यांनी आपली स्थिती थोडी सुधारली त्यांनी पार्ले गोरेगाव बोरिवली मुलुंड ठाणे येथे एक बेडरूमचे फ्लॅट घेतले. ज्यांची तेवढीही परिस्थिती नव्हती त्यांनी कल्याण डोंबिवली बदलापूर कडे फ्लॅट घेतले. ज्यांना तेही परवडत नव्हते ती एका खोलीत दोन तीन जोडपी अजूनही लालबाग परळ मध्ये तशीच कुचंबणा सहन करत राहत आहेत या सर्वाना पंचविशी तिशीतच मुले झाली. यांची श्रीमंती कुठे वाया चालली आहे?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 08/20/2022 - 02:41 नवीन
आहेच. ज्या गोष्टींचा अधुनमधून स्वतःला किंवा अगदी जवळच्यांना विचार पडतो ते सर्व प्रश्नच असतात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा