डिंक म्हणजे DINK (double income no kids)
डिंक
डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे.
हा एक चर्चेचा विषय आहे आणि याबद्दल मिपावर धागा काढण्याबद्दल चर्चा झाली होती. ते वाचूनच मी हि सुरुवात करतो आहे.
सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे.
पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या.
आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे.
या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण मूल हवे हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते.
कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो.
अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो.
ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते.
येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही.
परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत.
(अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही)
लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत.
बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो.
बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते.
परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे.
कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती.
परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे.
आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली
१) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला.
२) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही
३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते.
४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते.
५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे.
६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती.
हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले.
त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का?
असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले.
तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले.
एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते.
परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले.
काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले.
हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही.
तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल
- या निर्णयामुळे आम्हा दोघांना आपल्या मर्जीनुसार आवडीच्या अनेक गोष्टी करता येतात, वेळ घालवता येतो.
- माझी पत्नी व्यावसायिक वकील आहे. तिला तिच्या व्यवसायाकरिता बराच वेळ देता येतो, घरी यायला उशीर झाला , अचानक कुठे दूर जावे लागले तरी काही दडपण नसते.
- अर्थिक नियोजन सोपे होते. आम्ही लवकर निवृत्ती घेवू शकतो.
- घर बहुतांशी नीट नेटके राहते.
- मला जरी बालसंगोपन करायचे नव्हते तरी मुले आवडत नाहीत वा मुलांसोबत वेळ घालवायला आवडत नाही असे अजिबात नव्हते. पत्नीला तर मुलांची आवड होतीच. त्यामुळे आम्ही जमेल तसे मित्रमंडळींच्या मुलांसोबत अनेकदा वेळ घालवतो. यामुळे एक /दोन नाहीतर अनेक मुलांच्या सहवासाचा आम्हाला आनंद मिळतो. सगळ्या मुलांचे स्वभाव व सवयी भिन्न असल्याने या सहवासात खूप वैविध्य आहे.
निर्णयाचे तोटे तोटे तसे नाहीत. फक्त काही वेळा एखादे कुटूंब सोबत वेळ घालविण्याकरिता आमच्यापेक्षा ज्यांना मुले आहेत अशा दुसर्या जोडप्याला अधिक प्राधान्य देते. ते साहजिकच आहे कारण त्यामुळे त्या कुटूंबातील मुलाला/ मुलीला समवयस्क मित्र/मैत्रीण मिळणार असते. इतरांच्या प्रतिक्रिया जेव्हा मला नव्याने भेटणार्या परिचित जेव्हा थोडीफार मैत्रीबद्दल अपत्याबद्दल विचारतात तेव्हा मी त्यांना माझ्या निर्णयाबद्दल स्पष्टपणेच सांगून मोकळा होतो. सुरुवातीचा आश्चर्याचा धक्का ओसरल्यानंतर त्यांना याबद्दल फार काही वाटत नाही. किंवा मुलांमुळे ताणलेल्या वेळापत्रकाच्या व्यथा अनुभवणार्या काहीजणांना तर चक्क माझ्या या निर्णयाचा हेवा वाटतो. परिचयातली इतर विनापत्य जोडपी माझ्या प्रत्यक्ष परिचयात दोन जोडपी विनापत्य होती. पण त्यापैकी एका जोडप्यातील स्त्रीला (जी माझी मैत्रीण आहे) नेहमीच मूल हवेसे वाटत होते तर तिच्या पतीला नको होते. पुढे काही वर्षांनी त्यांना मूल झाले - माझ्या मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे ती चुकून झालेली गर्भधारणा होती. पण तिचा नवरा आनंदी नाही आणि माझे तिच्याशी शेवटचे बोलणे झाले त्याप्रमाणे तिचा नवरा तिला घटस्फोट देण्याच्या विचारात होता. आतापर्यंत घटस्फोट झाला किंवा कसे हे मला माहिती नाही. याव्यतिरिक्त फेसबूकवरुन ओळख झालेल्या एका मुलीशी माझी भेट झाली जिचा निर्णय विनापत्य राहण्याचा आहे आणि त्याकरिता तिने आपल्या प्रियकराचे मन वळवले आहे. पण अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही. समाजमाध्यमांवरील गट फेसबूकवर विनापत्य व्यक्तींचे विविध गट आहेत. यापैकी "चाईल्डफ्री इंडियन्स ओरिजिनल" या गटाचा मी सदस्य आहेत. या गटात आता २५० सदस्य आहेत. पण या गटातील पोस्ट्स अनेकदा टोकाच्या व एकांगी वाटतात.. म्हणजे विनापत्य असणे हे "कूल असणे" तर अपत्यांना जन्म देणे म्हणजे "फूल असणे" वगैरे आशयाच्या. पण मलातरी असा आशय पटत नाही. माझा दृष्टीकोन एक वा अधिक अपत्यांना जन्म देणे (त्यातही खासकरुन ते जोडपे अपत्यांना चांगले जीवन देवू शकणार असतील तर) किंवा विनापत्य राहण्याचा निर्णय घेणे ह्या दोन्ही व्यक्तिगत निवडी आहे. कुणाला चूक वा कुणाला बरोबर ठरवणे हे योग्य नाही. दोन्ही गटांनी एकमेकांच्या निर्णयाचा आदरही केला पाहिजे व त्या निर्णयाबद्दल एकमेकांचे आभारही मानायला हरकत नाही. विनापत्य जोडप्यांमुळे इतर जोडप्यांच्या अपत्यांच्या जीवनात येणारी प्रचंड स्पर्धा काही प्रमाणात तरी कमी होणार आहे, नैसर्गिक स्त्रोंतावर येणारा ताण , निर्माण होणार कचरा या सगळ्यात काही प्रमाणात तरी घट होईल त्यामुळे सापत्य (शब्दप्रयोग बरोबर आहे का ?) जोडप्यांनी विनापत्य जोडप्याचे आभार मानायला हरकत नाही. तर विनापत्य लोकही जगत आहेत.. त्यांना जगण्याकरिता विविध सेवा व उत्पादने रोजच हवी आहेत. ती पुरवण्याकरिता - त्यासाठी काम करण्याकरिता नवीन पिढी असणे गरजेचे आहेच. मग जी जोडपी कष्ट करुन, यातना सोसून अपत्यांना जन्म देत आहेत त्यांना विनापत्य लोकांनी हसण्याचे कारण नाही उलट त्यांचे आभार मानायला हवेत. मला स्वतःला परिचयातल्या इतर पालकांच्या बालसंगोपनाच्या जबाबदारीत जमेल तशी जमेल तेव्हा मदत करुन त्यांचा भार काहीसा हलका करणे हे सामाजिकदृष्ट्या परिपक्वतेचे वाटते. भारतातील प्रसिद्ध विनापत्य जोडपी १)रघुनाथ धोंडो कर्वे आणि मालती कर्वे - या दोघांनाही "मूल हवे" अशी कोणतीही नैसर्गिक उर्मी नव्हती. मालतीजींना स्वतःच्या या भावनेबद्दल आश्चर्य वाटत होते पण रघुनाथ यांनी त्यांना समजावले की प्रत्येक स्त्री मध्ये अशी उर्मी असतेच असे नाही. अशी उर्मी नसणे हे देखील नैसर्गिकच असू शकते. (संदर्भः चित्रपट - ध्यासपर्व) २) अभिनेते अतुल कुलकर्णी - गीतांजली कुलकर्णी आणखी कुणी जोडपी माहित असल्यास जाणकारांनी भर घालावी भारतीय चित्रपटात हाताळलेला हा विषय १) ध्यासपर्व - रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावरील मराठी चरित्रपट (दिग्दर्शक : अमोल पालेकर) २) पाँडिचेरी - सचिन कुंडलकर दिग्दर्शित मराठी चित्रपट याशिवाय काही हिंदी चित्रपट असावेत पण आता आठवत नाहीये. विनापत्य जीवनशैली आणि निरिश्वरवाद माझ्या मते विनापत्य जीवनशैली अगदी स्वेच्छेने स्वीकारणारे किंवा त्याकडे ओढा असणारे लोक बहुधा निरिश्वरवादी आहेत, किंवा धार्मिक व सामाजिक पातळीवर डाव्या विचारांकडे झुकणारे आहेत. अर्थात असे माझे केवळ निरीक्षण आहे. याबाबत काही सांख्यिकी सर्वेक्षण वा संशोधन झाले आहे किंवा कसे याबद्दल मला माहिती नाही. असो. मंडळी , सध्या पुरते इतकेच. चर्चा पुढे सरकेल तशी अधिक भर घालेनच. अवांतर : डॉक्टर खरे साहेब, अध्याहृत हा शब्द बरेच दिवसांनी वाचायला मिळाला. छान वाटले. मी हा शब्द बोलतानाही कधी वापरतो , पण असे अवघड शब्द वापरलेत की पत्नी वैतागते :)