Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग १)

क
क्लिंटन
Mon, 08/01/2022 - 07:13
🗣 177 प्रतिसाद
ऑगस्ट २०२२ हा महिना सुरू झाला असल्याने ताज्या घडामोडींचा नवा धागा काढत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. या निवडणुकीत भाजपकडून बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकड आणि तृणमूल काँग्रेस सोडून इतर सगळ्या विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा हे उमेदवार आहेत. मार्गारेट अल्वांची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही या कारणाने तृणमूल काँग्रेस हा एक प्रमुख विरोधी पक्ष मतदानात भाग घेणार नाही. तसेच बिजू जनता दलानेही जगदीप धनकड यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे ते देशाचे पुढचे उपराष्ट्रपती बनतील हे जवळपास नक्की आहे. राजकारणात (खरं तर कुठेही) कधी कोणाचे नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. जगदीप धनकड हे त्यातीलच एक. jagdeep त्याचे झाले असे की १९८९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना २५ सप्टेंबर १९८९ रोजी काँग्रेसविरोधी राजकारणातील एक महत्वाचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री देवीलाल यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत बोट क्लबवर विरोधी पक्षांची विराट सभा झाली होती. त्या सभेसाठी जगदीप धनकड यांनी राजस्थानातील त्यांच्या झुनझुनू या ठिकाणाहून ७५ ट्रकभरून लोक आणले होते. त्या सभेत ७ लाख लोक हजर होते असे मी अन्यत्र वाचले आहे. एका ट्रकमध्ये कितीसे लोक मावत असतील? मला नाही वाटत ५०-६० पेक्षा जास्त लोक एका ट्रकमध्ये मावत असतील. अगदी १०० लोक एका ट्रकमध्ये कोंबले असे धरले तरी एकूण सभेला उपस्थित असलेल्या लोकांच्या तुलनेत १% हून थोडे जास्त लोक धनकड यांनी आणले होते. खुद्द देवीलालांच्या लक्षात जगदीप धनकड यावेत असे त्यात काय होते कल्पना नाही. पण ते आले. त्यावेळी धनकड ३८ वर्षाचे होते. 'ये छोरा होनहार है' असे म्हणत देवीलालांनी त्यांना जनता दलाची झुनझुनूमधून उमेदवारी मिळवून दिली. त्यापूर्वीचे १० वर्षे ते जयपूरला राजस्थान उच्च न्यायालयात वकीली करत होते. ते झुनझूनूमधून जिंकून लोकसभेत गेले आणि मग वि.प्र.सिंग यांच्या सरकारांमध्ये उपमंत्री होते. पुढे १९९१ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या दोनेक महिन्यात त्यांनी राजीव गांधींचा विश्वास संपादन केला. त्यावेळेसही धनकड यांना झुनझुनूमधूनच उमेदवारी हवी होती पण १९८९ मध्ये स्वतः धनकड यांनी ज्यांना पराभूत केले ते काँग्रेस उमेदवार कॅप्टन अयुबखान यांची १९६५ च्या युध्दात वीरचक्र मिळाल्यामुळे असलेली ओळख आणि तसेच ते अल्पसंख्य समुदायातील असल्याने त्यांना उमेदवारी नाकारून धनकड यांना उमेदवार बनवायला राजीव गांधी तयार नव्हते. म्हणून शेवटी त्यांना अजमेरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासाठी राजीव गांधींनी स्वतः प्रचारसभा घेऊनही त्यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला. पुढे १९९३ ते १९९८ या काळात धनकड राजस्थान विधानसभेत काँग्रेस पक्षाकडून आमदार होते. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी परत एकदा झुनझुनूमधून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढवली. त्यावेळी त्यांच्यासमोर ज्येष्ठ नेते शीशराम ओला (तिवारी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला होता त्याचे ते उमेदवार होते) आणि भाजपचे मदनलाल सैनी होते. त्या निवडणुकीत धनकड यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. धनकड यांचे त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक गेहलोत यांच्याशी जमायचे नाही. १९९८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत ८-९ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही हा नियम काढून गेहलोत यांनी जगदीप धनकड यांचे तिकीट कापले. त्यानंतर धनकड १९९९ मध्ये काही महिने राष्ट्रवादीत आणि २००० मध्ये भाजपत सामील झाले. जवळपास २० वर्षे भाजपत काढूनही भाजपने त्यांना कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी दिली नाही की कोणते महत्वाचे पद दिले नाही. तरीही ते पक्षात राहिले आणि आपल्या वकिलीत रमले होते. २०१२ च्या सुमारास दोन वर्षांनी होणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप स्वतःच्या बहुमताने सत्तेत येईल याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. तरीही ते भाजपमध्येच राहिले. काँग्रेसमध्ये परत जायचा विचार त्यांनी केला नाही. अशोक गेहलोत यांच्याशी त्यांचे जमायचे नाही हे एक कारण असू शकेल. म्हणजे १९८९ मध्ये देवीलालांच्या नजरेत ते भरणे जसे त्यांच्या पथ्यावर पडले त्याप्रमाणेच अशोक गेहलोत यांच्याशी न जमणेही त्यांच्या पथ्यावर पडले असे दिसते. हा त्यांच्या नशीबाचाच भाग म्हणायला हवा. मधल्या वर्षांमध्ये जगदीप धनकड हे नाव विसरायलाच झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींच्या वेळेस विकीपीडीया की अन्यत्र कुठे झुनझुनू लोकसभा मतदारसंघाविषयी वाचत असताना तिथे पूर्वी जिंकलेल्यांची नावे होती त्यात ते नाव वाचल्यावर 'अरे हे पण होते' हे आठवले. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे पक्षात कोणतेही पद न मिळता कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी न मिळताही जगदीप धनकड टिकून राहिले. गेल्या २० वर्षात रा.स्व.संघाशी त्यांनी जुळवून घेतले. लॉकडाऊनपूर्वी राजस्थानातील संघ पदाधिकार्‍यांची बैठक होती त्यासाठी मोहन भागवत राजस्थानात आले होते तेव्हा ते जगदीप धनकड यांच्या फार्महाऊसवरही आवर्जून गेले होते.वास्तविकपणे सर्वोच्च न्यायालयातील आघाडीचे वकील आहेत त्यांच्यात त्यांच्या नावाची गणना होते. पण कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, प्रशांत भूषण हे इतर त्याच लीगमधले वकील कोणत्या ना कोणत्या उचापात्या मधून मधून करत असतात. असे कशातही नाव धनकड यांचे सहसा येत नाही. तरी नाही म्हणायला त्यांच्या नावावर एक बट्टा म्हणजे काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानखानचे वकीलपत्र घेतले होते ही एक वादग्रस्त केस त्यांच्या नावावर आहे. पण ती केस वगळता बातम्यांमध्ये यावी अशी कोणतीही केस त्यांनी लढवलेली नाही. अशा जगदीप धनकड यांची निवड जुलै २०१९ मध्ये अचानक बंगालच्या राज्यपालपदावर झाली. नियमावर बोट ठेऊन ममता सरकारला ते व्यवस्थित नडले. फेब्रुवारी २०२२ मध्ये ममता सरकारने बंगाल विधानसभेचे अधिवेशन ७ मार्चला बोलावायची शिफारस राज्यपालांकडे केली. पण राज्यपालांकडे शिफारस गेली त्यात एक घोळ होता. नेहमी सभागृहाची बैठक सकाळी ११ ला भरते (११ ए.एम) त्याऐवजी काही कारणांनी ती दुपारी २ ला भरवावी (२ पी.एम) अशी शिफारस ममता सरकारला करायची होती. पण ए.एम आणि पी.एम मध्ये घोळ झाला आणि राज्यपालांना गेलेल्या शिफारसीत विधानसभेची बैठक ७ मार्चला रात्री २ वाजता (२ ए.एम) बोलवावी अशी शिफारस गेली. ती शिफारस बघून राज्यपालांनी सरकारच्या मुख्य सचिवांना राजभवनावर बोलावून घेतले. पण ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नसल्याने मुख्य सचिव तिथे गेलेच नाहीत. मग राज्यपालांनी सरकारने केलेल्या शिफारशीप्रमाणे ७ मार्चला रात्री २ वाजता विधानसभेची बैठक बोलावली. राज्यपाल मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारशीला बांधील असतात आणि मला विधानसभेचे सत्र रात्री दोनला बोलवायची शिफारस आली त्याला मी काय करू असे त्यांनी म्हटले. मग पळापळ झाली. मुख्य सचिव राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी पी.एम च्या ऐवजी ए.एम लिहिणे ही चूक आहे हे राज्यपालांना सांगितले. त्यावर मग नियमावर बोट ठेऊन मंत्रीमंडळाच्या शिफारसीला आय.ए.एस अधिकारी कोणत्या आधारात चूक म्हणत आहेत हा प्रश्न विचारला. मग परत मंत्रीमंडळाने सुधारीत शिफारस राज्यपालांकडे पाठवली आणि विधानसभेची बैठक दुपारी २ ला बोलावण्यात आली. कलकत्त्याजवळचे जादवपूर विद्यापीठ हे दिल्लीतील जे.एन.युची कनिष्ठ आवृत्ती शोभावी असे आहे. तिथे तत्कालीन केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो गेलेले असताना सी.ए.ए च्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी त्यांना घेरले. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती आली. हे कळल्यावर राज्यपाल जगदीप धनकड स्वतः तिथे गेले आणि आपल्या सुरक्षारक्षकांचा वापर करून त्यांनी बाबूल सुप्रियोंची सुटका केली. भाजपने आतापर्यंत भैरोसिंग शेखावत आणि वैंकय्या नायडू या वरीष्ठ नेत्यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली आहे. शेखावत तर पक्षाचे खूपच मोठे नेते होते- वाजपेयी- अडवाणींच्या बरोबरचे. वैंकय्या नायडू तितके ज्येष्ठ नसले तरी बर्‍यापैकी वरीष्ठ होते. त्यामानाने जगदीप धनकड हे नाव एकदम किरकोळ दिसते. असे म्हटले जात आहे की शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने जाट समाज भाजपपासून दुरावला आहे त्याला एका जाटाला उपराष्ट्रपती करून परत जवळ करायचा प्रयत्न आहे. तसेच जगदीप धनकड हे सुध्दा शेतकरी कुटुंबातील आहेत. पण शेतकरी आंदोलनाचा राजस्थानात फारसा प्रभाव नव्हता. जो काही होता तो पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात. तसेच हरियाणा-पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट राजस्थानातील जाटांना आपल्या बरोबरचे मानतात का हा एक प्रश्न आहे. त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे असे कोणाला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनवून त्याचा निवडणुकांच्या राजकारणावर किती फरक पडतो? फार नसावा. नाहीतर प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती केल्यावर काँग्रेसने बंगालमध्ये मोठे यश मिळवायला हवे होते. तसे झाले नव्हते. असो. जगदीप धनकड यांना शुभेच्छा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 34862 views

🗣 चर्चा (177)
व
विजुभाऊ Mon, 08/01/2022 - 07:45 नवीन
आज सकाळी राऊत यांना ईडी ने ताब्यात घेतल्याची बातमी ऐकली. शिवसेने ने त्या बाबत सरकारवर आरोपांची राळ उडवणे हे साहजीकच आहे. पण राउतांच्या उर्मटपणाबद्दल उद्दामपणाबद्दल , महिलांनाही शिव्या देन्याबद्दल शिवसेने ने कधीच नाराजी ही व्यक्त केली नाही. आता प्रश्न आहे की राऊत हे शिवसेनेच्या बुद्धीबळाच्या पटावरचे वजीर होते. राजाला सुरक्षा देत होते. " उठा" हे राउतंप्रमाणे वाचाळ नाहीत पण ते राउतांचा वारसा चालवणारा वाचाळ स्पोक्स्मन सेने ला कोण मिळणार हा प्रश्नच आहे. दिपाली सय्यद किंवा माजी पहापौरताई होऊ शकतात. पण त्यांचे राजकीय संदर्भ तोकडे आहेत
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 08/01/2022 - 08:43 नवीन
" उठा" हे राउतंप्रमाणे वाचाळ नाहीत
खरं सांगायचं तर उठाही राऊतांइतकेच बेताल बडबड करू शकतात/ करतात. फक्त फाटक्या तोंडाचे म्हणून राऊतांचा चेहरा पुढे दिसतो. स्वतः ठाकरेही तसलेच आहेत. २०२१ मध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर विधानसभेत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री म्हणून उठांनी दिलेले उत्तर म्हणजे कोणाही मुख्यमंत्र्याने कोणत्याही विधानसभेत केलेले सगळ्यात अशोभनीय भाषण असेल. त्या भाषणात राज्याची एकूण स्थिती, सरकार पुढे काय करणार आहे, आतापर्यंत काय केले आहे वगैरे बोलणे अपेक्षित असते. त्याचा दुरूनदुरून पर्यंत संबंध उठांच्या भाषणात नव्हता. आणि 'शेतकर्‍यांना खिळे आणि चीनपुढे पळे' असले विधान त्यांनी केले होते. ते कितपत बरोबर होते चूक होते यात मी जातच नाही पण या दोन्ही गोष्टींचा महाराष्ट्राच्या स्थितीशी आणि सरकारशी काहीही संबंध नव्हता. सैनिक बिचारे सीमेवर लढत होते आणि शेतकरी आंदोलन का म्हणतात ते जे काही चालू होते ते उत्तर भारतात. मग महाराष्ट्र सरकार काय करणार याविषयी अवाक्षर न बोलता नुसता विरोधी पक्ष कसा वाईट, महाराष्ट्राचा अपमान वगैरे नेहमीची गंजकी टेप आणि असली विधाने करणे मुख्यमंत्र्यांना शोभणारे नक्कीच नव्हते. तेव्हा स्वतः ठाकरे जरी शिवसेनेचे प्रवक्ते झाले तरी आता जे काही चालू आहे त्यात कसलाही फरक पडणार नाही. तशीच निरर्थक आणि शिवराळ बडबड चालू राहिल.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 08/01/2022 - 17:27 नवीन
तेव्हा स्वतः ठाकरे जरी शिवसेनेचे प्रवक्ते झाले तरी आता जे काही चालू आहे त्यात कसलाही फरक पडणार नाही. तशीच निरर्थक आणि शिवराळ बडबड चालू राहिल.
एक फरक राहिल. संजय राऊत कितीही नाही म्हटले तरी तळागाळातुन आपल्या हिंमतीवर व कुवतीवर वर आलेले आहेत व लिखाणावर हुकुमत आहे. उध्द्वजी सोन्याचा चमचा तोंडात धरुन आलेले राजकारणी आहे. अजुनपर्यंत तरी त्यांच्या वकृत्वाचा अथवा लेखनाचा कस लागण्याचा कधी प्रसंग आला नाही. जे काही चार दोन मुलाखती होत्या त्यात टोमणे मारण्यपेक्षा जास्त काही करु शकलेले नाहीत.राऊतांच्या अनुपस्थितीत उध्द्वजींचा खरा कस लागेल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/01/2022 - 17:42 नवीन
राऊतांच्या अनुपस्थितीत उध्द्वजींचा खरा कस लागेल.
कस लागेल असे वाटत नाही. त्यासाठी व्यक्तिमत्वात खमकेपणा असावा लागतो. लोकांशी नाळ जोडलेली असावी लागते. पाठीशी कोणत्याही वेळेस उभे रहाणारी कार्यकर्त्यांची फौज मॅनेज करायची तयारी असावी लागते.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 08/01/2022 - 07:51 नवीन
जगदीप धनकड आणि ममता बॅनर्जी यांची जुगलबंदी ट्रॅक करत होतो पण धनकड यांचा हा इतिहास माहित नव्हता. मला वाटायचे की त्यांची संघाची पार्श्वभूमी आहे. --- हेमंत बिस्वा यांच्याशी समांतर वाटचाल दिसते.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 08/01/2022 - 08:36 नवीन
हेमंत बिस्वा यांच्याशी समांतर वाटचाल दिसते.
हेमंत बिस्व सर्मा कधीकाळी कॉंग्रेसमध्ये होते हे खरे वाटणार नाही इतके भाजपत एकरूप झाले आहेत. जगदीप धनकड यांचे वर म्हटल्याप्रमाणे नशीब चांगले दिसतेच. त्यांच्या नशीबाने अजून एक घटक त्यांना अनुकूल दिसतो तो म्हणजे सध्याचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू बर्‍यापैकी सौम्य आहेत. ते समोरच्याला नडू शकत नाहीत. धनकड यांनी बंगालमध्ये राज्यपालपदावर असताना नियमावर बोट ठेऊन समोरच्याला चांगलेच नडायची क्षमता दाखवून दिली आहे. राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून तो गुण म्हणा की अवगुण म्हणा की जे काही असेल ते चांगलेच उपयोगी पडू शकेल. बहुतेक म्हणून नायडूंना दुसरी टर्म न देता धनकड यांना उपराष्ट्रपती बनविले जात आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/02/2022 - 00:34 नवीन
ते समोरच्याला नडू शकत नाहीत.
आप च्या गुप्तानी एका स्विस एन जि ओ चा भारतात कसे वाईट चालले आहे असा काहीतरी अहवाल संसदेच्या पटलावर ठेवायची विनंती केली तेव्हा उपराष्ट्रपती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी गुप्ताला अक्षरश: हाकलून दिले होते. ते हाकलून देणे भारी होते आणि गुप्ताला याची अपेक्षाच नव्हती. आव्वाक होऊन तो तिथेच उभा राहिला. मग तर त्यालाच सुनावले की त्या देशाने आपल्या देशात आणि युरोपात कसे चालले आहे ते पहावे भारताच्या बाबतीत नाक खुपसू नये. गुप्ताची हवाच गेली होती! त्यामुळे आवश्यक तेथे तेथे कडक भूमिका घेणारे व्यंकय्या नायडू आवडून गेले होते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Mon, 08/01/2022 - 08:51 नवीन
बंगालमधील विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेतील ए. एम. आणि पी. एम. मधील गोंधळाचा किस्सा गंमतीशीर! :-) चर्चेच्या धाग्यात अशी गंमतही हवी थोडीशी, कधीतरी! धन्यवाद क्लिंटन _/\_
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 08/01/2022 - 10:03 नवीन
https://www.esakal.com/amp/saptarang/nitin-sonawane-writes-mexico-mahatma-gandhi-statue-pjp78 (खरे तर लिंका देणे, ते हि आपल्याला हव्या त्या हे मला जास्त योग्य वाटत नाही...पण यातील एक पॅरेग्राफ खरेच भारी आहे तो देताना तो या वरील लिंक मधून घेतला आहे ) --- नरसंहार कसा घडतो व त्याचे १० टप्पे सांगितले आहेत, त्यात पहिला आहे लोकांमध्ये गट पाडणे. ‘आपण’ आणि ‘ते’ म्हणजे माणूस माणसापासून तोडणे. यानंतर त्याला वेगळं दाखवणे, विशिष्ट प्रतीक लावणे. तिसऱ्या टप्प्यावर त्याच्यावर भेदभाव करणे, नागरी अधिकार नाकारणे, नंतर त्यांचे मानवी हक्क नाकारणे आणि जसं हुतू जमात तुत्सी जमातीतील लोकांना झुरळ म्हणू लागले म्हणजे अमानवीकरण.पाचवा टप्पा हा टोळीला संघटित करणे, अपराध करायला लावणे. नंतर पेपर, रेडिओ आणि आता टीव्हीच्या माध्यमातून तिरस्कार आणि राग निर्माण करणे. सातवा टप्पा तयारी करणे आणि अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करणे. आठव्या टप्प्यात जाती-धर्मावरून वेगवेगळं करणे आणि त्यांचा छळ करणे. नवव्या टप्प्यावर संपूर्ण नाश करणे आणि शेवटी जे केलं ते नाकारणे. अशा टप्प्यांमध्ये नरसंहार घडतो, यामुळे नरसंहाराचा वास आधी येतो, जर आपण नजर ठेवली तर. या नरसंहारावर उत्तर म्हणून त्या संग्रहालयात चार व्यक्तीचं जीवन आणि काम दाखवलं आहे. त्यात दोन भारतीय - एक महात्मा गांधी आणि मदर तेरेसा व महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेणारे मार्टिन लुथर किंग ज्यु. आणि नेल्सन मंडेला.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 08/01/2022 - 10:22 नवीन
सातवा टप्पा तयारी करणे आणि अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करणे अल्पसंख्याक लैच घाबरलेत साध्याला, नुपूर शर्मा केस नंतर चालू झालेल्या हत्या अजून थांबायला तयार नाहीत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 08/01/2022 - 15:55 नवीन
यातले कित्तेक गोष्टी जाणूनबुजून होऊ लागल्यात आणि जाणूनबुजून त्याकडे आपल्या म्हणण्याने दुर्लक्ष हि केले जाते आहे.. अधोगती होण्याची हि नांदी असणार... द्वेष, जातीय तेढ, तिरस्कार, भेदभाव माणसाला कधीच प्रगती पथावर न्हेवू शकणार नाहित..देशाची अधोगती होण्यास हे कारणीभूत होईलच.. पण आपण आपल्याला हवे ते आपल्याला पाहिजे तसे अर्थ घेऊन बोलू लागलो, आणि जे चाललंय ते कसे योग्य यातच पाठ थोपठुन घेत राहिलो तर नक्कीच अवघड आहे.. येणारा काळ हाच याचे उत्तर आहे.. असो...
  • Log in or register to post comments
स
सुखी Mon, 08/01/2022 - 16:55 नवीन
६ टप्पा missing आहे की
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 08/01/2022 - 20:59 नवीन
नंतर पेपर, रेडिओ आणि आता टीव्हीच्या माध्यमातून तिरस्कार आणि राग निर्माण करणे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 08/02/2022 - 06:05 नवीन
आपल्या देशात 1947 पासून तथाकथित धर्मनिरपेक्ष दल कोंग्रेस ते आप अल्पसंख्यकांच्या मनात भीतीच निर्माण करत आले आहेत. याशिवाय ते बहुसंख्यकांपासून वेगळे आहेत आणि त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जात आहे. त्यांच्या साथी वेगळे, मुंबई गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न. इत्यादि. इत्यादि. दंग्यांच्या गुन्हेगारांना वाचविणे, दाऊदच्या हस्तकला जेल मध्ये गेला तरी मंत्री मंडळात ठेवणे. दिल्लीत तर एका मस्जिद चार लोकांना पगार. लिहू लागलो तर पाने भारतील.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/01/2022 - 17:25 नवीन
यातील कोणकोणते टप्पे २०१४ पूर्वी किंवा त्यानंतर साध्य झाले आहेत?
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/02/2022 - 00:42 नवीन
माध्यमातून तिरस्कार आणि राग निर्माण करणे. सातवा टप्पा तयारी करणे आणि अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करणे. आठव्या टप्प्यात जाती-धर्मावरून वेगवेगळं करणे आणि त्यांचा छळ करणे. नवव्या टप्प्यावर संपूर्ण नाश करणे आणि शेवटी जे केलं ते नाकारणे. त्या काळात महात्मा गांधी यांनी हे सगळे कसे साध्य केले याचा अचंबा वाटतो. अगदी पद्धतशीरपणे आताच्या पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण केली. त्यांना त्यांच्या देशातच वेगळे पाडले. सिंध चा तर संपूर्ण नाश केला. आणि इतकेच नाही तर आणि शेवटी जे केलं ते म्हणजे फाळणी नाकारणे पण! खरोखर महान लोक होते हे. बाकी तेरेसा विषयी बोलावे तितके कमी. व्यवस्थितपणे धर्मात फूट पाडली. ही बाई वेदनेने तळमळणार्‍या लहान मुलांना सुद्धा वेदनाशामके देत नसे का? तर वेदनेतून ख्र्इस्ताच्या जवळ जातो - हे ऐकून आहे. संदर्भ मागू नये!
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 08/02/2022 - 04:49 नवीन
संदर्भ बहुतेक येथे आहे. The Missionary Position: Mother Teresa in Theory and Practice https://en.wikipedia.org/wiki/The_Missionary_Position:_Mother_Teresa_in_Theory_and_Practice
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 08/02/2022 - 05:44 नवीन
हिच द ग्रेट.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 08/01/2022 - 11:28 नवीन
पण आजकाल राजकारण म्हणलं का काहीही बघण्या ऐकण्याची तयारी असावी हेच खरे. असलम शेख, टिपू सुलतान मैदान फेम देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला रात्री सोबतीला मुंबई भाजपमध्ये एक मोठं नाव असणारे श्री मोहित कंबोज, दोघेही एकाच गाडीत भेटीला आले होते सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीस. भेट एकंदरीत बऱ्याच खेळीमेळीच्या वातावरणात झाली असावी असा वाव देणारे एक बोलके चित्र अन् ट्विट. Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/01/2022 - 11:37 नवीन
पाठिंबा घेण्यासाठी फडणवीस या व्यक्तीला कोणीही वर्ज्य नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 08/01/2022 - 11:52 नवीन
नेमकं काय सुचवता आहात ते १. फडणवीस बेभरवशाचे आहेत ? २. का फडणवीस ruthless राजकारणी आहेत ? ३. का फडणवीसांच्या खेळींचे काही फारसे बरे मत नाही तुमचे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/02/2022 - 06:30 नवीन
१. फडणवीस बेभरवशाचे आहेत ? हो आणि नाही. हो यासाठी की ते कोणाचाही (अगदी आपल्या कट्टर समर्थकांचा सुद्धा) आणि केव्हाही विश्वासघात करू शकतात आणि केलेला आहे. नाही यासाठी की ते कोणत्या प्रसंगात कसे वागतील हे नक्की सांगता येते. खुर्चीसाठी ते कोणत्या तडजोडी करतील, कोणाशी तडजोडी करतील या गोष्टी छातीठोकपणे सांगता येतात. २. का फडणवीस ruthless राजकारणी आहेत ? होय व त्यापेक्षा ते जास्त विश्वासघातकी आहेत. मोदी सुद्धा रूथलेस आहेत, पण ते आपल्या खुर्चीसाठी सर्व तत्वे बासनात गुंडाळून समर्थकांचा विश्वासघात करीत नाहीत व खुर्चीसाठी देशाचे नुकसान करीत नाहीत. तसेच ते दिवसाचे २४ तास फक्त आपली खुर्ची व बाकी इतर गोष्टी गेल्या खड्ड्यात एवढाच विचार करीत नाहीत. ३. का फडणवीसांच्या खेळींचे काही फारसे बरे मत नाही तुमचे ? या व्यक्तीने राज्याचे, पक्षाचे व माझ्यासारख्या कट्टर भाजप समर्थकांचे अतोनात नुकसान केले आहे. अश्या व्यक्तीविषयी काय मत असणार?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/02/2022 - 07:14 नवीन
+१ पण इतके असता भाजप श्रेष्ठी पक्षी अमितभाई शहा आणि आदरणीय नरेंद्र मोदींनी यांच्यासारख्या तुलनेने तरुण अन् बऱ्यापैकी बेताल नेत्याच्या नाकात वेसण का घातली नसेल ?? महाराष्ट्रात तरी भाजपची दिल्ली हायकमांड फडणवीसांच्या ओंजळीने पाणी पित असल्याचे चित्र कायम दिसत असे, हल्लीच फक्त उपमुख्यमंत्री पद अतिशय शेवटच्या क्षणी दिल्लीकरांनी त्यांना दाबल्याचे लोक बोलतात, पण एकंदरीत भाजप केंद्र लेव्हल वरून असल्या माणसावर भरवसा का ठेवतात ?
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 08/02/2022 - 08:30 नवीन
ह्याचे एक कारण हे असावे कि महाराष्ट्रामध्ये फडणवीसांसारखा कार्यक्षम नेता दुसरा कुणी नसावा. चंद्रकांत पाटील तर स्वत;च्याच मतदारसंघातुन पळालेले नेते आहे. पंकजाताई पराभूत झाल्यात. आणि तसेही शरद पवारांच्या समोर उभा राहायला तसाच धूर्त व प्रसंगी कपटी नेता हवा . गडकरी सज्जन नेते आहेत. हे गुण फडणवीसांमध्ये असल्याने दिल्ली हायकमांडने त्यांच्यावर जबाबदारी दिली असावी.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/02/2022 - 18:26 नवीन
ह्याचे एक कारण हे असावे कि महाराष्ट्रामध्ये फडणवीसांसारखा कार्यक्षम नेता दुसरा कुणी नसावा.
किंवा किमान तसे भासवणारा, पण असे म्हणल्यास मोदी शहांना महाराष्ट्रातील राजकारणाची चाड अन् जाण नाही म्हणावे लागेल ते मला वाटते फारच साहसी विधान असेल. पहिल्या पाळीत महाराष्ट्रात जलयुक्त शिवार सारख्या योजना राबविणारे फडणवीस मराठा आरक्षणावर इतके ठाम होते की बोलता सोय नाही. मराठे मागास आहेत का नाहीत ह्यावर माझे मत राजकीय वाटेल म्हणून इथे टाळतो देणे, पण त्यांना आरक्षण देण्यात फडणवीसांना काय राजकीय फायदा दिसला ते अनाकलनीय आहे.
चंद्रकांत पाटील तर स्वत;च्याच मतदारसंघातुन पळालेले नेते आहे. पंकजाताई पराभूत झाल्यात. आणि तसेही शरद पवारांच्या समोर उभा राहायला तसाच धूर्त व प्रसंगी कपटी नेता हवा .
चंद्रकांत पाटील पळून गेल्यावर त्यांचे कोथरूड सारख्या ब्राह्मण आमदार असणाऱ्या मतदारसंघात पुनर्वसन भाजप पक्षश्रेष्ठींच्या आज्ञेशिवाय अन् त्यांच्या नॉलेजमध्ये असल्याशिवाय होईल का ? पंकजा तसेही रेसमध्ये टिकणार नव्हत्या मागील पराक्रम पाहता फडणवीसांनी एखाद ओबीसी नेता आयात पण केला असता, उरता उरला तो शरद पवारांना टक्कर देणारा नेता वगैरे वगैरे तर हे विशफुल थिंकिंग झाले, पण फडणवीस हे पवारांच्या समोर उभे राहण्यापेक्षा पवारांच्या सोबत उभे राहण्यास उत्सुक असल्याचे कायमच दिसून आले आहे. राजकारणात सोयीच्या सगळ्या युती कायम दिसून येतीलच असे नाही.
गडकरी सज्जन नेते आहेत. हे गुण फडणवीसांमध्ये असल्याने दिल्ली हायकमांडने त्यांच्यावर जबाबदारी दिली असावी.
माफ करा पण इथे तुमचे गडकरींचे असेसमेंट पूर्णतः चुकले आहे जरी नाही तरी ऑफ द मार्क असल्याचे नमूद करू इच्छितो. हे त्याचे लेटेस्ट उदाहरण
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/02/2022 - 19:54 नवीन
बऱ्याच मुद्द्यांशी सहमत. फडणवीस मराठा आरक्षणावर इतके ठाम होते की बोलता सोय नाही. मराठे मागास आहेत का नाहीत ह्यावर माझे मत राजकीय वाटेल म्हणून इथे टाळतो देणे, पण त्यांना आरक्षण देण्यात फडणवीसांना काय राजकीय फायदा दिसला ते अनाकलनीय आहे. २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा देण्याचा अध्यादेश काढला होता. त्याचे कायद्यात रूपांतर करताना फेब्रुवारी २०१५ मध्ये फडणवीसांनी फक्त मराठ्यांना १६% राखीव जागा देण्याचा कायदा दोन्ही सभागृहात मान्य करून घेतला. या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केला. अश्या वेळी सर्वोत्तम राजकीय निर्णय म्हणजे या निर्णयाविरूद्ध फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते. २-३ वर्षे खटला चालून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हा कायदा नाकारला असता. त्यामुळे आपल्या ब्राह्मण समर्थकांना न दुखावता फडणवीस त्यातून सुखरूप सुटले असते. आपण काहीही केलं तरी ब्राह्मण मतदार आपल्या विरोधात जाणारच नाहीत (हे गृहीतक बरेचसे बरोबर आहे कारण अराखीव जागांचे प्रमाण कमी झाल्याने आपले नुकसान झाले आहे हेच बऱ्याच ब्राह्मणांना अजून समजलेच नाही. मिपावरील बहुसंख्य ब्राह्मणांचे मत पहा.), समजा विरोधात गेले तरी त्यांच्या ३-४ टक्के मतांनी जे काही थोडे नुकसान होईल व ते नुकसान अधिकच्या मराठा मतातून भरून निघेल, जे पृथ्वीराज चव्हाण, पवार यांना उभ्या हयातीत जमले नाही ते मी करून दाखविणार जेणेकरून मराठ्यांची बहुसंख्य मते मला मिळतील या समजूतीतून फडणवीसांनी काहीही करून पुढील निवडणुकीपूर्वी मराठ्यांना राखीव जागा देण्यासाठी कंबर कसली. मराठ्यांना कायदेशीर मार्गाने मागास ठरविण्यासाठी एक मागासवर्गीय आयोग नेमला ज्यात बहुसंख्य मराठा सदस्य होते व अध्यक्षही मराठा होते. आधीच ठरविल्याप्रमाणे या आयोगाने सर्वेक्षण वगैरे करण्याचा देखावा करून मराठे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वगैरे सर्व क्षेत्रात अत्यंत मागास आहेत वगैरे निष्कर्ष काढलेला अहवाल तयार करून दिला. त्या अहवालाआधारे फडणवीसांनी मराठ्यांना शैक्षणिक संस्थां मध्ये व सरकारी नोकऱ्यात तब्बल १६% टक्के राखीव जागा देण्याचा कायदा दोन्ही विधीमंडळात कोणतीही चर्चा न करता अवघ्या काही सेकंदात मान्य करून घेतला. त्यामुळे राखीव जागांचे प्रमाण ७८% झाले व राऊडिंगमुळे हेच प्रमाण ८५-९०% तर काही ठिकाणी १००% झाले. परंतु त्यामुळे अराखीव वर्गातून प्रवेश मिळणाऱ्या ब्राह्मण विद्यार्थ्यांची संधी खूप कमी होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले. हा कायदा होण्यापूर्वी फडणवीसांनी सारथी नावाची संस्था स्थापन करून त्या संस्थेद्वारे मराठा विद्यार्थ्यांवर अनेक प्रकारच्या सवलतींचा व शिष्यवृत्तींचा वर्षाव केला. दुर्दैवाने फडणवीसांचे सर्व अंदाज चुकले. काही ब्राह्मण मते विरोधात गेलीच, परंतु सर्व सवलती व राखीव जागा मिळूनही अधिकची मराठा मते न मिळता २०१४ पेक्षा कमी मराठा मते भाजपला मिळून जागा कमी होऊन सत्ता गेली. मराठा मते कमी होण्याचे कारण उघड आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे २०२१ मध्ये हा राखीव जागांचा कायदा रद्द केला आहे. ते करताना मराठा मागास आहेत हा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सुद्धा अस्वीकृत करून नाकारला आहे. फडणवीस परंतु मुख्यमंत्री झाले तर पुन्हा एकदा अश्याच काहीतरी लांड्यालबाड्या करून मराठ्यांना राखीव जागा द्यायचा प्रयत्न करतील. चंद्रकांत पाटील तर स्वत;च्याच मतदारसंघातुन पळालेले नेते आहे. पंकजाताई पराभूत झाल्यात. आणि तसेही शरद पवारांच्या समोर उभा राहायला तसाच धूर्त व प्रसंगी कपटी नेता हवा . चंद्रकांत पाटील पळून गेल्यावर त्यांचे कोथरूड सारख्या ब्राह्मण आमदार असणाऱ्या मतदारसंघात पुनर्वसन भाजप पक्षश्रेष्ठींच्या आज्ञेशिवाय अन् त्यांच्या नॉलेजमध्ये असल्याशिवाय होईल का ? पंकजा तसेही रेसमध्ये टिकणार नव्हत्या मागील पराक्रम पाहता फडणवीसांनी एखाद ओबीसी नेता आयात पण केला असता, उरता उरला तो शरद पवारांना टक्कर देणारा नेता वगैरे वगैरे तर हे विशफुल थिंकिंग झाले, पण फडणवीस हे पवारांच्या समोर उभे राहण्यापेक्षा पवारांच्या सोबत उभे राहण्यास उत्सुक असल्याचे कायमच दिसून आले आहे. राजकारणात सोयीच्या सगळ्या युती कायम दिसून येतीलच असे नाही. पाटलांनी लबाडी करून सर्वात सुरक्षित मतदारसंघावर डल्ला मारला. पंकजा मुंडे व खडसेंच्या सुनेला फडणवीसांनीच पाडले. बावनकुळेंना व तावडेंना उमेदवारी नाकारली कारण हे सर्वजण आपले प्रतिस्पर्धी आहेत असे फडणवीसांना वाटते. यातील तावडे वगळता उरलेले इतर मागासवर्गीय समाजातील असल्याने काही इतर मागासवर्गीय मते सुद्धा भाजप विरोधात गेली. परिणामी भाजपला विदर्मात १५ व एकूण १९ जागांचा फटका बसला. खरं तर जवळपास ४० जागांचा फटका होता, परंतु आयारामांमुळे २० जागा वाढल्या. फडणवीस भविष्यात पवार, शिंदे, उद्धव अश्या कोणाबरोबरही युती करू शकतात.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 08/03/2022 - 08:39 नवीन
पण फडणवीस हे पवारांच्या समोर उभे राहण्यापेक्षा पवारांच्या सोबत उभे राहण्यास उत्सुक असल्याचे कायमच दिसून आले आहे.
काय वाट्टेल त्या तडजोडी करून, आपल्या विचारसरणीशी पूर्णपणे विरोधी पक्षाशी संगनमत करून, घरे फोडून, अगदी काहिही करून सत्तेत वा सत्तेच्या परिघात रहायचे. आपल्या पाळीव संपादकांकडून त्याला बेरजेचे राजकारण असे नाव द्यायचे, ही महाराष्ट्राची पुलोद परंपरा. आणि आता हीच राजकिय संस्कृति. ती लवकरात लवकर विलयाला जावो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/03/2022 - 08:53 नवीन
काहीही फडणवीस एकदम म्हणजे एकदम वाईट्ट! सगळ्या चांगल्यांचे पाय ओढणारे! सत्तालोलूप वगैरे! बाकी सगळे कसे छान छान! सर्वगुणसंपन्न!!!! :))))
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/03/2022 - 10:11 नवीन
बाकी सगळे छान असं कोण म्हणतंय? जे जे वाईट आहेत त्यातील सर्वाधिक वाईट जो आहे त्यालाच सर्वाधिक विरोध होणार.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/03/2022 - 12:22 नवीन
तुम्ही जर व्यक्तीपुजक प्रामाणिकता पाळणारे असलात तर माझी काहीच हरकत नाही, पण फडणवीसांचा महाराष्ट्र राजकारणातील उदय, त्यांचे निर्णय अन् एकंदरीत त्यांची धाव पाहता सकारात्मक पेक्षा माझ्या दृष्टीने नकारात्मक कार्य जास्त आहे, त्या सगळ्यांची जंत्री वर दिलेली आहे, तुम्हाला पटत नसल्यास आमचा आक्षेप नाही, पण उगाच आमच्या तोंडी तुमच्या सात्विक संतापाने प्रसवलेले शब्दभांडार टाकू नयेत ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/03/2022 - 13:03 नवीन
आपले स्पष्ट मत मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्या बद्दल काहीएक मत बनवले व ते इथे मांडले याबद्दलही धन्यवाद. 👌 मी फक्त २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मांडलेले मत परत एकदा इथे खाली 👇 मांडतो आहे. कारण त्यात आजही बदल झालेला नाही. "मला स्वत:साठी पैसे न खाणारा मुख्यमंत्री हवा होता. सगेसोयऱ्यांची संपत्ती न वाढवणारा मुख्यमंत्री हवा होता. त्यासाठी फडणवीस पाहिजे होते. दुसरा नंबर होता पृथ्विराज चव्हाणांचा. ते पण सुसंस्कृत व स्वच्छ होते. उध्दव ठाकरेही तसेच असतील तर मग माझा त्यांनाही पाठिंबा असेल. कोणिही येवो. त्याने महाराष्ट्राचे भले केले पाहिजे." अगदी याच पध्दतीने विचार करत मी मोदींना पाठिंबा देत असतो. @गुरूजी माझे श्रम कारणी लागले. पण खूप पेशन्स ठेवावा लागला. 😀
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/03/2022 - 13:14 नवीन
आपले श्रम कारणी लागल्याबद्दल व त्यासाठी खूप पेशन्स ठेवावा लागल्याबद्दल अभिनंदन! आपल्याप्रमाणे मलाही स्वत:साठी पैसे खाणारा मुख्यमंत्री मान्य नाही. त्याचबरोबर स्वासनासाठी प्रचंड पैसे खाणाऱ्यांना डोक्यावर घेऊन त्यांना संरक्षण देणारा, अत्यंत जातीयवादी व गुन्हेगारांना डोक्यावर घेऊन संरक्षण देणारा, जनतेची वारंवार फसवणूक करणारा मुख्यमंत्री सुद्धा मान्य नाही. असो.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 08/03/2022 - 15:12 नवीन
पैसे न खाणारा मंत्री योग्यच निर्णय घेईलच ह्याची शाश्वती काय? बहुतेकांचा फडणवीसांवर असणारा राग हा अपेक्षाभंगातुन आला आहे. आणि त्यांनी तो बर्याचदा केला आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/03/2022 - 15:24 नवीन
+ १ मी अपेक्षाभंग हा शब्द न वापरता विश्वासघात हा शब्द वापरतो. फडणवीसांनी कदाचित पैसे खाल्ले नसतील, पण खुर्ची टिकविण्यासाठी नाणार व जैतापूर सारखे प्रकल्प रद्द करणे, खोटे अहवाल बनवून घेऊन अराखीव जागांचे प्रमाण खूप कमी करून एका जातीचे नुकसान करणे, अत्यंत भ्रष्ट व जातीयवादी नेत्यांची भरताड भाजपत करून त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्यांना उच्चपदावर बसविणे, पक्ष शिवसेनेच्या दावणीला बांधणे असे अनेक निर्णय योग्य होते का?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 08/03/2022 - 16:34 नवीन
मध्यमवर्ग किंवा उच्चमध्यमवर्ग राजकारणाकडे कसे पाहतो हे मिपावर मस्त कळते. पॉलिसी लेव्हलवर कोण काय करते ह्याबद्दल ममव मतदारवर्गाला ना फारशी माहिती असते ना फिकीर. आपले काही चार प्रिंशीपल फॉलो होताना दिसले कि ते खुश असतात. मग त्याने इतर काहीही का होईना. कोणत्याही पॉलिसी निर्णयाचा मध्यम/उच्चमध्यम लोकांवर अतिशय कमी परिणाम होत असतो, आणि झाला तरी क्षणिक त्रास/कपाळावर आठी/ सात्विक संताप/ त्रागा या पलीकडे जात नाही. आणि ते राजकारणाकडे WWE च्या खेळाप्रमाणे बघतात असे हल्ली मला वाटू लागले आहे. ह्या मध्ये मी सुद्धा आहे हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 08/03/2022 - 17:06 नवीन
आपले काही चार प्रिंशीपल फॉलो होताना दिसले कि ते खुश असतात असं नाही केलं तर नेहमी दुःखतच राहावं लागेल, 100% perfetct सरकार कुठून आणणार?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/03/2022 - 17:15 नवीन
मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्ग कोणत्याही सरकारवर, नेत्यावर किंवा पक्षावर अजिबात अवलंबून नाहीत. त्यामुळे कोणत्याही सवलती, अनुदान, राखीव जागा, पुतळे, नामांतर, स्मारके अश्यांमुळे ते हुरळून जात नाहीत. ते आपल्या तत्वांशी साधर्म्य असणाऱ्या पक्षाच्या मागे जातात. परंतु आपल्यावर ठरवून अन्याय केला जात आहे किंवा आपल्याला गृहीत धरून आपले नुकसान करणारे चुकीचे निर्णय घेतले जात आहेत, असे लक्षात आले तर ते त्या सरकारच्या विरोधात जाऊ शकतात.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/03/2022 - 18:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 08/03/2022 - 18:54 नवीन
प्रतिसादातील मुद्द्याबाबत सहमत.
पॉलिसी लेव्हलवर कोण काय करते ह्याबद्दल ममव मतदारवर्गाला ना फारशी माहिती असते ना फिकीर.
पॉलिसी मेकर्स नेता मिळणे ही मुश्किल आहे. इन फॅक्ट बर्याच बाजारबुणग्यांच्या भाऊ गर्दीत एखादाच नेता अशी धमक दाखवतो. त्यामुळे सत्तेवर जो आला आहे /येणार आहे तो स्वतःची तुंबडी आधी भरणार हे माहीती असताना ह्या मध्यम वा उच्च मध्यम वर्गीयाने देखील त्या त्या वर्गाचे अनुनय करणार्या पक्षाला प्राथमिकता दिली तर बिघडले कुठे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 08/03/2022 - 14:02 नवीन
काहीही म्हणण्यासारखे काय बोललो? काय वाट्टेल ते करून सत्तेच्या परिघात रहायचे, आणि त्याला बेरजेचे राजकारण हे गोंडस नाव द्यायचे. हे सुरु झाले पुलोद पासून. आज महाराष्ट्रात जे दोन मुख्य राजकिय तंबू आहेत त्यांचे नेते जर एकमेकांविरोधात राजकारण करण्यापेक्षा, एकत्र राजकारण करू इच्छितील तर ते चुक आहे. त्यात खरा विरोधी पक्ष राहत नाही. माझा काही फडणवीसांवर राग नाही पण आज पवारांचे ते मुख्य विरोधक आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/03/2022 - 18:57 नवीन
ते तुमच्यासाठी नव्हते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/02/2022 - 10:18 नवीन
भाजपचे काही निर्णय माझ्या दृष्टीने पूर्ण अनाकलनीय आहेत.. त्यातून नुकसान झाले, होत आहे व पुढेही होणार हे यांच्या का लक्षात येत नाही, हे मला समजत नाही. कदाचित मीच पूर्ण अडाणी असणार. जेमतेम १ आमदार, अर्धा पाऊण टक्के मते, मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर जवळपास शून्य अस्तित्व व पक्षचिन्ह सुद्धा नसलेल्या महापालिका पातळीवर पक्षाला आपल्यापेक्षा जास्त मोठेपणा देऊन, आपल्या तुलनेत जवळपास पावणेदोनपट जागा देऊन संपूर्ण राज्यभर युती करणे व स्वपक्षाची वाढ २५ वर्षे खुंटवून ठेवणे हा १९८९ मधील भाजपचा निर्णय माझ्यासाठी अनाकलनीय होता व ती माझ्या मते गंभीर घोडचूक होती. त्यानंतरही २५ वर्षे स्वपक्षाची वाढ होऊ न देता सेना वाढायला मदत करणे, स्वतः मोठा पक्ष असूनही सेनेची मुजोरी व अपमान सहन करणे यामागे भाजपची नक्की कोणती अपरिहार्यता होती हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. २०१४ मध्ये युती तोडण्याचा भाजपने घेतलेला निर्णय हा अत्यंत अचूक होता. परंतु पुन्हा एकदा २०१९ मध्ये स्वपक्षाकडे कमीपणा घेऊन स्वपक्षाचे नुकसान करून सेनेच्या अटींवर सेनेशी युती करणे हा निर्णय सुद्धा अनाकलनीय होता. फडणवीस भाजपतील जुने नेते संपवून पक्ष दुर्बल करीत असताना, बाहेरील घाण भाजपत भरताना पक्षाचे कट्टर समर्थक नाराज हैत असताना, अराखीव जागा कमी करून भाजपपासून समर्थक अराखीव वर्गाची मते दूर होत असताना, सेनेशी अनावश्यक युती करून भाजप सत्तेवर येणार नाही याची व्यवस्था करीत असताना मोदी-शहा का गप्प राहिले भहे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. भाजप स्वबळावर महाराष्ट्रात उभा असतानाही कधी सेनेच्या तर आता शिंदे गटाच्या कुबड्या भाजप का घेतो हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. कदाचित मला यामागील धूर्त चाली अजिबात समजत नसाव्या. परंतु भाजपचा महाराष्ट्रात एकदाच मुख्यमंत्री झाला जेव्हा भाजप स्वबळावर लढला. जेव्हा जेव्हा भाजपने कुबड्या घेतल्या तेव्हा तेव्हा भाजपचे नुकसानच झाले आहे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 08/01/2022 - 12:41 नवीन
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला श्रीलंका किंवा पाकिस्तानप्रमाणे आर्थिक संकटाची भिती नाही- आपल्याकडे पुरेसा परकीय चलनाचा साठा आहे आणि देशावरील कर्जही खूप जास्त नाही असे म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/india-doesnt-have-issues-like-pak-sri-lanka-says-former-rbi-governor-raghuram-rajan/articleshow/93260867.cms . पण रायपूरमध्ये काँग्रेस पक्षाशी संबंधित 'All India Professionals Congress' च्या कार्यक्रमात बोलताना अल्पसंख्याकांना दुय्यम नागरिक बनविल्यास देशाचे तुकडे पडतील हा पण इशारा देऊन टाकला. https://www.ndtv.com/india-news/turning-minority-into-2nd-class-citizens-will-divide-india-raghuram-rajan-3209792 रघुराम राजन यांचे २००८ च्या आर्थिक संकटाचे आधीच भाकित केले म्हणून खूप कौतुक झाले होते खरे. पण Has Financial Development Made The World Riskier? या बहुचर्चित पेपरमध्ये त्यांनी हे भाकित केले आहे त्यात शेवटच्या परीच्छेदात ते म्हणतात- Risk can never be reduced to zero, nor should it be. We should be prepared for the low probability but highly costly downturn. म्हणजे जे संकट २००८ मध्ये आले ते यायची शक्यता खूप कमी आहे (low probability) असेच ते म्हणत नाहीत का? मग राजननी त्या संकटाचे भाकित आधीच केले हे कसे म्हणता येईल? low probability म्हणजे भाकित की असे काही व्हायची थोडीफार शक्यता आहे असे त्यांनी म्हटले होते? बरं राजननी केलेल्या खरोखरच्या भाकितांचे काय झाले? २०१३ पासून जवळपास दरवर्षी ते २००८ सारखे संकट परत येणार असे इशारे देत सुटले. पण कुठचे काय? काहीही झाले नाही. मग २००८ चे त्यांचे तथाकथित भाकित 'लांडगा आला रे आला' पध्दतीचे होते फक्त फरक इतकाच की गोष्टीत लांडगा नंतर येतो पण राजन यांचा लांडगा पहिल्यांदाच आला आणि नंतर आलाच नाही असे का म्हणू नये? राजनची भाकिते-- १. २२ सप्टेंबर २०१३: The economist who predicted the financial crisis just sounded another alarm—it would be wise to listen this time २. ८ ऑगस्ट २०१४: Raghuram Rajan warns of another global financial crisis ३. २७ जून २०१५: World economy may be slipping into 1930s Great Depression problems: RBI's Raghuram Rajan ४. ७ एप्रिल २०१७: The Fundamental Problems of the Financial Crisis Are Still with Us ५. ३० जून २०१८: Does The Flat Yield Curve Point To A Looming Recession? ६. १९ ऑगस्ट २०१९: Is a recession round the corner? Hear it from Raghuram Rajan, the man who predicted 2008 correctly या सगळ्या भाकितांचे काय झाले? एकीकडे म्हणायचे की भारतीय अर्थव्यवस्था कोविडपूर्व काळात डिसेंबर २०२२ च्या आधी जाऊ शकणार नाही (हे म्हटले जानेवारी २०२१ मध्ये)-- India's economy to get back to pre-COVID levels only in late 2022: Raghuram Rajan आणि मग व्ही-शेपमधील रिकव्हरी आल्यावर म्हणायचे- त्यात काय मोठे? मोठी मंदी आणल्यावर (जसे काही कोविड काळातील मंदी सरकारने ठरवूनच आणली होती) रिकव्हरी नेहमी व्ही-शेपमध्येच असते. India's V-shape economic recovery is not anything to crow about: Raghuram Rajan | Exclusive सप्टेंबर २०२० मध्ये म्हणायचे की काही सरकारी बँकांचे खाजगीकरण करायची गरज आहे. Privatise select PSU banks: Raghuram Rajan आणि मार्च २०२१ मध्ये म्हणायचे की सरकारी बँका (म्हणजे त्या बँकांचे शेअर्स) कॉर्पोरेटना विकणे ही घोडचूक ठरेल. Selling PSU banks to corporates ‘colossal mistake’, says Raghuram​ Rajan as workers plan strike आता जर सरकारी बँकांचे बाजारमूल्य लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त असेल तर मग त्या बँकांचे नाव घेण्याइतके घसघशीत शेअर्स कंपन्या विकत घेणार नाहीत तर कोण तुमच्याआमच्यासारखे सामान्य लोक विकत घेणार का? या माणसाने अगदी पुरता भ्रमनिरास केला. एकेकाळी मी याच माणसाचा खूप मोठा चाहता होतो. सप्टेंबर २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नियुक्ती झाल्यावर त्यांच्याविषयी मीच मिपावर लेख लिहिला होता. २०१६-१७ पर्यंत रघुराम राजननी 'परत एकदा २००८ सारखे संकट येणार' असा इशारा दिला की 'आता कोणते आभाळ कोसळणार' अशी भिती मला पण वाटायची. पण नंतरच्या काळात हळूहळू राजन ही नक्की काय चीज आहे हे समजायला लागले. या असल्या बुध्दीमंतांचा नक्की समाजाला उपयोग काय असतो तेच समजत नाही. यांना अर्थकारणातले खूप काही कळते म्हणून त्यांनी भविष्याबद्दलचे आडाखे बांधले तर त्यापैकी बरेचसे गंडतात. बरं भूतकाळातील एखादी घटना का घडली याची कारणमिमांसा असल्या १० तज्ञांना विचारावी तर १० वेगळी कारणे पुढे येतील. म्हणजे भविष्य सोडाच भूतकाळाविषयीही या लोकांचे आकलन अर्थकारणाविषयी फारसे न समजणार्‍या सामान्य माणसापेक्षा खूप जास्त वेगळे असते का हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 08/01/2022 - 16:31 नवीन
रघुराम राजन यांनी स्वतःचे हसु करुन घेतले आहे. तसे पाहता या प्रकांडपंडीत अर्थ शास्त्री लोकांचे योगदान नक्की काय असते हाच मला नेहेमी पडलेला प्रश्न आहे. हे लोक फक्त यांव करायला पाहिजे त्यांव करायला पाहिजे वगेरे वर भरभक्कम मानधन घेउन लेक्चर देतात. नंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही. मागे मी म्हटल्याप्रमाणे राजन यांनी श्रीलंकेला उभे रहायला मदत करायला हवी. आपले अर्थशास्त्रीय ज्ञान वापरावे. तसे झाल्यास श्रीलंकेवर उपकार होतील.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 08/01/2022 - 18:34 नवीन
क्लिंटन ह्यांचा प्रतिसाद आवडला, अभ्यासू होता, आता मुळातच एक घाव दोन तुकडे करून राजन ह्यांच्या अकलेवरच प्रश्नचिन्ह उभे करायचे म्हणल्यास त्यावर "चर्चा" कसली होणार ? एकतर हो म्हणावे लागेल किंवा नाही, अन् अर्थशास्त्र, राजकारण - राज्यशास्त्र इत्यादी विषयांत इतकं बायनरी असून चालत नाही, जीवाचा काँग्रेस होतो, असो !.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 08/01/2022 - 19:00 नवीन
श्री क्लिंटन यांचे आम्ही त्यांच्या मिपा वरच्या पुर्वजन्मापासुनचे फॅन आहोत. त्यांच्या प्रतीसादाला आम्ही शेपुट तेव्हडे लावले. आसो. राहीला प्रश्न राजन ह्यांच्या अकलेवरच प्रश्नचिन्ह उभे करायचा. तो मी केला नाहीच. ते प्रथितयश प्राध्यापक आहेत. एका नावाजलेल्या संस्थेत विद्या दानाचे काम करतात. त्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा जास्तच अक्कल आहे यात वाद नाही. प्रश्न आहे तो चड्डीत राहण्याचा. हे महाशय सदा सर्वकाळ काहीतरी सन्सनाटी बोलतात. मग गायब होतात. मग पुन्हा उगवतात पुन्हा काहीतरी सन्सनाटी बोलतात पुन्हा गायब. बरं मागे आपण काय बोललो ते खरे होते का? ते का चुकले वगेरे वगेरे कधीच नाही. उगा आपले ज्ञान पाजळणे याउपर काही नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 08/01/2022 - 19:05 नवीन
प्रश्न आहे तो चड्डीत राहण्याचा
असं लोकांच्या चड्डीची मापं अन् त्यांनी त्यात राहावं अशी अपेक्षा आम्ही तरी ठेवत नाही, किंवा इतक्या दिव्य सणसणीत लेव्हलला जाऊन चर्चाही करू शकत नाही, त्यामुळे विषयानुरूप अन् नीट भाषेत प्रतिसाद असल्यासच काहीतरी बोलता येईल, इतके म्हणून खाली बसतो सरजी. - (नाडा चड्डी अन् इज्जत घट्ट आवळून घाबराघुबरा बसलेला) वांडो
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 08/01/2022 - 19:28 नवीन
मी तरी राजनच्या अकलेवर प्रश्नचिन्ह उभे केलेले नाही. एम.आय. टी मधून पी.एच. डी मिळविणे हे अक्कल नसल्याचे लक्षण नक्कीच नाही. प्रश्न असा आहे की असे तज्ञ लोक थियरी अगदी उत्तम रित्या मांडतात पण भविष्याविषयी त्यांनी केलेले बरेचसे अंदाज गंडतात. हे फक्त राजन यांच्याविषयी लागू होते असे नाही तर अनेक तज्ञांविषयी लागू होते. जोसेफ स्टिग्लिझ (२००१ चे नोबेल पारितोषिक विजेते - म्हणजे अक्कलशून्य नक्कीच नाहीत - नसावेत) २००७ मध्ये व्हेनेझुएला ला गेले होते आणि hugo Chavez ने कसे तिथे नंदनवन फुलवले आहे अशी स्तुतीसुमने उधळली होती. त्यानंतर चार पाच वर्षात काय झाले हे पूर्ण जगासमोर आहे. मग डोक्यात इतका सगळा मसाला भरला असला तरीही या लोकांचे अंदाज इतके कसे गंडतात हा प्रश्न आहे. आणि वारंवार असे अंदाज गंडत असतील तर त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण का करू नये? आणि इतक्या वेळा अंदाज चुकूनही परत मोठे विद्वान म्हणून हेच लोक जगाला तत्वज्ञान शिकवत असतात. यात काहीही खटकण्यासारखे नाही? बायनरी असू नये हे ठीक आहे पण वरच राजनची फसलेली अनेक भाकिते दिली आहेत ते पाहता राजन काही नवे भाकीत करायला लागले तर ते गांभीर्याने घेण्यायोग्य त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का हे तुम्हीच सांगा. एम.आय. टी ची पदवी, आय.एम. एफ मधील अनुभव वगैरे सगळे ठीक आहे. पण नुसत्या त्या आधारावर राजन यांचा शब्द मानण्याचे दिवस माझ्यासाठी तरी बरेच मागे पडले आहेत. २०१३ मध्ये मी तसे करत होतो पण त्यांचा colossal record of failure पाहता आता तरी ते शक्य नाही. बाकी एक थियरी म्हणून त्यांनी सबप्राइम क्रायसिस, १९९७ चे पूर्व आशियाई संकट वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांच्या Faultlines य पुस्तकात अगदी उत्तम समजावून सांगितल्या आहेत त्याबद्दल त्यांच्याविषयी मलाही आदर आहे. प्रश्न तो नाही. प्रश्न आहे भाकितांचा. त्यात त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तितकासा चांगला नाही हे समोर दिसतच आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 08/01/2022 - 20:03 नवीन
तुम्ही अक्कल काढली असे सुचवत नाहीये, तर माझाच एक प्रतिप्रश्न आहे, "प्रश्न चड्डीत राहण्याचा आहे" ह्यावर आपण काय म्हणाल ? तुम्ही ही माणसे हुशार असल्याचे मान्य करता, त्यांचे आडाखे चुकतात हे मी मान्य करतो, पण म्हणून त्यांनी चड्डीत राहावे हे विधान समर्थनीय कसे होईल ? असल्यास ते objectify कसे करता येईल ? Markets Behave Irrationally हे मूलतत्व तर आजही स्टँड करते न ? मग कोणाला असे थेट चड्डी शिवणे आगाऊ वाटले ते चुकले ते काय ? हे समजल्यास मी माझे पण म्हणणे करेक्ट करायला तयार आहेच :)
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 08/01/2022 - 21:47 नवीन
ओके. बहुदा मी वापरलेला "चड्डीत राहणे" ह्या वाक्प्रचारावर तुमचा आक्षेप आहे. कदाचित तो या ठिकाणी अस्थायी असेल. किंवा जास्त हार्श असेल. माझ्या माहीतीनुसार ह्या वाक्प्रचाराचा अर्थ "आपला वकुब ओळखुन वागावे" असा आहे. रघुराम राजन यांच्या विद्वत्ते विषयी मी कुठेही प्रश्नचिन्ह उभे केलेले नाही. माझ्या मतानुसार राजन यांचे बोलणे / त्यांचे आखाडे चुकत आहेत किंवा ते जे बोलतात त्याला ग्राउंड लेव्हल ला जास्त फरक पडत नाही. असे असताना ते पुन्हा पुन्हा चर्चेत राहण्यासाठी असे भाकीते किंवा उघड्पणे भारत सरकार च्या वित्तीय धोरणावर टीका करणे का थांबवत नाहीत? मागे त्यांनी "भारतीय लोकांचा देशाच्या ईकॉनॉमिक फ्युचर वरचा विश्वास उडत चालला आहे. बरेच मिडल क्लास लोक गरीब होत चालले आहेत" असे उगाच क्लिक बायटी विधान केले होते ज्याची काही गरज नव्हती. त्यांनी (किंवा कुठल्याही अर्थशास्त्री व्यक्तीने) आपल्या विषयाला अनुरुप असे सल्ले दिलेत तर ते जास्त संयुक्तीक नाही काय? मायनोरीटी / सेकंड क्लास सिटीझन याची काहीही गरज नव्हती .. असो. माझा ह्या विषयावर शेवटचा प्रतीसाद. अजुन काही आक्षेप असेल तर ख.व.त बोलु.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा