Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०२१

श
श्रीगुरुजी
Tue, 03/09/2021 - 05:41
🗣 167 प्रतिसाद
केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम व बंगाल या ५ राज्यांची विधानसभा निवडणुक एप्रिल २०२१ मध्ये होत आहे. निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर होतील. याच राज्यांच्या २०१६ मधील निवडणुकीनिमित्त काढलेला हा धागा. ५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०१६ या राज्यातील प्रमुख पक्षांची माहिती वरील धाग्यात सविस्तर दिली असल्याने पुनरावृत्ती करीत नाही. २०१६ च्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्यांमध्ये काही बदल झालेत. २०१६ मध्ये भाजपबरोबर आघाडीत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने आता कॉंग्रेसबरोबर घरोबा केलाय. तामिळनाडूतही नवीन आघाड्या होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ३० वर्षे प्रभाव असलेले जयललिता व करूणानिधी नसलेली ही पहिलीच निवडणुक आहे. आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या मतपूर्व सर्वेक्षणांनुसार तामिळनाडूत यावेळी द्रमुक आघाडीला मोठे बहुमत मिळून करूणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील १० वर्षे सत्तेत असणाऱ्या अद्रमुकची सत्ता जाणार आहे. पुदुच्चेरी या अत्यंत लहान असलेल्या केंद्रशासित प्रदेशातही सत्तांतर होण्याची शक्यता असून कॉंग्रेस ऐवजी भाजप आघाडीत असलेले सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मागील अनेक दशकांची परंपरा खंडीत होऊन विद्यमान डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत असून विद्यमान तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. परंतु तृणमूलला किमान ५७ जागा गमावून १५७ जागा व भाजपला ३ वरून १००+ जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात डावे पक्ष व कॉंग्रेसची वाट लागण्याची शक्यता आहे. आसाममध्ये विद्यमान भाजप आघाडीचे सरकार काही जागा गमावून १२६ पैकी ६७ जागा मिळवून सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. एकंदरीत भाजप बऱ्यापैकी फायद्यात दिसतो. कॉंग्रेसला तामिळनाडू वगळता कोठेही भवितव्य दिसत नाही. ममता सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून राष्ट्रीय स्तरावर मोदींना पर्याय म्हणून प्रथम क्रमांकावर पोहोचेल. हे काल प्रसिद्ध झालेल्या सी-व्होटर मतपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज - https://maharashtratimes.com/india-news/assembly-election-2021-west-bengal-bjp-mamata-banerjee-tamil-nadu-assam-kerala-and-puducherry/articleshow/81397589.cms तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते. दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे. आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे. केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते. आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय. तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही. आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे. सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52972 views

🗣 चर्चा (167)
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/13/2021 - 09:46 नवीन
भारतात लोकशाही टिकवायची असेल तर ममतांना पाठिंबा देणे गरजेचे आहे असे म्हणत यशवंत सिन्हा तृणमूलमध्ये सामील झाले आणि आयरनी शंभर नाही हजार मरणे मेली. ममता सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच त्यांच्यावर व्यंगचित्र काढणार्‍याला ममता सरकारने अटक केली होती. कलकत्त्यातील उच्चभ्रू भाग- पार्क स्ट्रीटमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला होता त्यावेळी हा बलात्कार म्हणजे आपल्या सरकारला बदनाम करायला रचलेले कुभांड आहे असे वक्तव्य ममतांनी केले होते. असल्या गोष्टींचा यशवंत सिन्हांना विसर पडला का? यशवंत सिन्हांनी आणखी एका गोष्टीचा गौप्यस्फोट केला. कंदाहार विमान अपहरणप्रकरणी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात चर्चा चालू असताना मी कंदाहारला ओलिस म्हणून जायला तयार आहे पण त्या बदल्यात अपहरणकर्त्यांनी विमान प्रवाशांना सोडावे अशी अट घालावी असे ममता म्हणाल्या होत्या. ममतांची (किंवा इतर कोणाचीही) अशी ऑफर कोणता पंतप्रधान मान्य करेल? यशवंत सिन्हांनी हे ममतांच्या निर्भयतेचे उदाहरण असे म्हटले पण तो 'न खात्या देवाला नेवैद्य' होता का? ममता दणदणीत बहुमत घेऊन जिंकतील असेही भाकित यशवंत सिन्हांनी केले. पण त्याप्रमाणेच ते २००४ मध्ये वाजपेयी सरकार परत निवडून येणार आणि २०१९ मध्ये मोदी हरणार अशी भाकितेही त्यांनी केलीच होती. यशवंत सिन्हांचे खरोखरच वाईट वाटते. इतका चांगला माणूस पदाच्या मोहापायी कुठे जाऊन पडला. या वयाच्या लोकांनी राजकारणातून निवृत्त व्हावेच असे नाही पण सत्तास्थान मिळाले तर ती लॉटरी आणि नाही मिळाले तरी हरकत नाही असा दृष्टीकोन ते का ठेवत नाहीत हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/13/2021 - 10:05 नवीन
भारतात लोकशाही नाही, हे वक्तव्य, फक्त कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, हेच का करतात? नोटाबंदीचा त्रास जसा सामान्य माणसाला झाला नाही, तसेच हे आहे का?
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sat, 03/13/2021 - 12:01 नवीन
काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे माहीत नाही, पण नोटबंदी चा सामान्य जनतेला काहीच त्रास झाला नाही हे साफ चुकीचे आहे, खूप लोकांना त्रास झाला आणि तो अतिशय चुकीचा निर्णय होता
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/13/2021 - 17:45 नवीन
त्यांना अजिबात त्रास झाला नाही... मला आणि माझ्या कुटुंबातील, किमान 300-400 लोकांना त्रास झाला नाही... मी प्रवास करतो, तेंव्हा हा प्रश्र्न माझ्या सहप्रवासी लोकांना विचारतो, त्यापैकी फक्त एकालाच त्रास झाला, कारण त्याचा दोन नंबरचा धंदा होता. तो बिल्डर होता. ------------- तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना काय त्रास झाला?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 10:30 नवीन
यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरूण शौरी, सुशीलकुमार शिंदे, मनमोहन सिंग, मुलायमसिंग यादव, लालू, राबडी इ. नेते राजकारणातून संपले आहेत. दुर्दैवाने त्यांना हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/13/2021 - 09:12 नवीन
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची वाताहत झाली त्याला इंदिरा गांधी जबाबदार आहेत याचा अनेकांना विसर पडतो. त्याविषयी थोडे लिहितो. त्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की काँग्रेसने तामिळनाडूत शेवटची निवडणुक स्वबळावर जिंकली होती १९६२ मध्ये म्हणजे जवळपास ६० वर्षांपूर्वी. इतर कोणत्याही राज्यापेक्षा तामिळनाडूमध्ये काँग्रेसची पडझड आधी सुरू झाली आणि त्याला इंदिरा गांधींचे धोरण बर्‍याच अंशी कारणीभूत ठरले. तामिळनाडूमध्ये १९५२-१९५४ या काळात राजगोपालाचारी आणि १९५४ ते १९६३ या काळात कामराज मुख्यमंत्री होते. कामराज यांची १९५४ ते १९६३ या काळातील मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द म्हणजे तामिळनाडूसाठी खूप चांगला काळ होता. कामराज स्वतः अतिशय स्वच्छ चारित्र्याचे आणि धोरणी होते. त्यामुळे शेती, उद्योग, शिक्षण वगैरे सगळ्या क्षेत्रात राज्याने प्रगती केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेत दुपारी जेवण द्यायची म्हणजे ज्याला सध्या मिड-डे मील म्हणतात त्याची सुरवात कामराज यांच्या सरकारने केली होती. पण कामराज यांनी त्यांच्या बहुचर्चित कामराज प्लॅनप्रमाणे संघटनेसाठी काम करायला वेळ मिळावा म्हणून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जयंती नटराजन यांचे आजोबा एम.भक्तवत्सलम मुख्यमंत्री झाले. त्यांना परिस्थिती व्यवस्थित सांभाळता आली नाही. कामराज यांच्या गरीबांना रेशन स्वस्तात देण्यासारख्या योजनेला त्यांनी मुरड घातली तसेच १९६५ च्या हिंदीविरोधी आंदोलनात त्यांनी उघडपणे हिंदीची बाजू घेतली. इतकेच नव्हे तर हिंदीविरोधी आंदोलनात निदर्शने करणार्‍यांवर गोळीबार करायचा आदेश दिला. राज्यात द्रमुकचे अस्तित्व पहिल्यापासूनच होते आणि द्रमुकने हिंदीच्या सक्तीला विरोध केला. हा आयताच मुद्दा भक्तवत्सलम यांनी द्रमुकला उपलब्ध करून दिला. तसेच कामराज यांच्या काळातच राज्यातील गावातही बर्‍यापैकी वीज पोहोचली होती. मुळातच चित्रपटसृष्टीमुळे लोकप्रिय असलेले नायक एम.जी.रामचंद्रन आणि पटकथालेखक एम.करूणानिधी घरोघरी माहित होतेच. गावागावात वीज पोचल्यामुळे तिथल्या लोकांना रेडिओवर त्या चित्रपटांमधील गाणी ऐकायला मिळून हेच नायक द्रमुक पक्षाबरोबर आहेत हा आयताच प्रचार झाला. त्यातून १९६७ मध्ये द्रमुकने काँग्रेसचा पराभव केला आणि पहिल्यांदा सी.एन.अण्णादुराई आणि त्यांचे १९६९ मध्ये निधन झाल्यावर एम.करूणानिधी मुख्यमंत्री झाले. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर कामराज इंदिराविरोधी काँग्रेस(ओ) मध्ये गेले. तसेच काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर इंदिरांच्या बाजूला काँग्रेस(आर) मध्ये २२९ खासदार राहिले होते. तेव्हा इंदिरांच्या सरकारला भाकप (उजवे कम्युनिस्ट) आणि द्रमुकने पाठिंबा देऊन इंदिरांचे सरकार तारले होते. इंदिरांनी १९७० च्या शेवटी लोकसभा बरखास्त करून १९७१ च्या मार्चमध्ये मध्यावधी निवडणुक घेतली तेव्हा करूणानिधींनी तामिळनाडूमध्येही मध्यावधी विधानसभा निवडणुक घेतली. त्यावेळी कामराजांना धडा शिकवायला म्हणून इंदिरांच्या काँग्रेसने द्रमुक आणि भाकपबरोबर युती केली हे ठिक आहे. पण तेव्हा करूणानिधींनी काँग्रेसला अट घातली होती की लोकसभेच्या ३९ पैकी ९ जागा लढवायला मिळतील पण विधानसभेची एकही जागा लढवायला मिळायची नाही. पण कामराजांना धडा शिकवायच्या या हट्टामुळे इंदिरांनी ती अट मान्य केली. तिथेच काँग्रेस संघटनेचे मोठे नुकसान झाले. १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीला करूणानिधींनी समर्थन दिले नाही तरी जाहीर विरोध न केल्यास त्यांचे सरकार टिकेल अन्यथा ते सरकार बरखास्त करू असा निरोप इंदिरांनी करूणानिधींना पाठवला. ते मान्य करण्यास करूणानिधींनी नकार दिला. ३० जानेवारी १९७६ रोजी मद्रासमधील मरीना बीचवर करूणानिधींनी आणीबाणीविरोधात सभा घेतली आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधींनी द्रमुकच्या अनेक नेत्यांना अटक केली होती. त्यात करूणानिधी पुत्र एम.के.स्टॅलिन यांचाही समावेश होता. इतर राजकीय राजबंद्यांना (जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी वगैरे) पोलिसांनी मारहाण केली नव्हती. पण द्रमुक नेत्यांबरोबर वेगळी वर्तणूक ठेवण्यात आली होती. पोलिसांकडून एम.के.स्टॅलिन यांना मारहाण चालू असताना द्रमुक खासदार सी.चिट्टीबाबू यांनी त्यांना आडोसा द्यायचा प्रयत्न केला. या प्रकारात चिट्टीबाबूंना भरपूर मार पडला आणि काही दिवसांनी त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. पोलिसांच्या मारहाणीमुळे द्रमुकचे ज्येष्ठ नेते आर्कोट वीरास्वामी यांना अंशतः बहिरेपण आले तर मुरासोली मारन यांना कायमचे पाठीचे दुखणे जडले. दरम्यान १९७२ मध्ये एम.जी.रामचंद्रन द्रमुकमधून बाहेर पडले आणि त्यांनी अण्णा द्रमुक या नव्या पक्षाची स्थापना केली. १९७७ मध्ये काँग्रेसने या पक्षाशी युती केली. पण एम.जी.रामचंद्रन यांनी निवडणुक जिंकल्यावर जनता सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे १९८० मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरांनी द्रमुकशी युती केली. सत्तेत आल्यानंतर इंदिरांनी विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त केली त्यात एम.जी.रामचंद्रन यांचे सरकारही गेले. पण जून १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये रामचंद्रन स्वतःच्या लोकप्रियतेवर निवडून आले आणि परत मुख्यमंत्री झाले. रामचंद्रन यांची लोकप्रियता लक्षात घेता इंदिरांनी परत अण्णा द्रमुकशी संबंध सुधारले आणि १९८४ मध्ये परत एकदा काँग्रेस-अण्णा द्रमुक युती झाली. अर्थात ती निवडणुक इंदिरांचा मृत्यू झाल्यानंतर झाली ही गोष्ट वेगळी. तेव्हा लक्षात येईल की इंदिरांनी तामिळनाडूमध्ये भरपूर धरसोड केली. रामचंद्रन आणि करूणानिधींची लोकप्रियता असलेला एकही नेता काँग्रेसकडे नव्हता. कधी द्रमुकबरोबर तर कधी अण्णा द्रमुकबरोबर जाऊन इंदिरांनी राज्यातील काँग्रेस संघटनेचे मात्र नक्कीच नुकसान केले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/13/2021 - 09:18 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 10:23 नवीन
अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या वळचणीला गेले की फायदा फक्त प्रादेशिक पक्षाला होतो व नुकसान फक्त राष्ट्रीय पक्षाचे होते. तसेच प्रादेशिक पक्षांची निष्ठा दोलायमान असल्याने राष्ट्रीय पक्ष त्यांना गृहीत धरू शकत नाही. १९८० मध्ये जनता पक्ष फुटुन त्यातील पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी भाजपची स्थापना एप्रिल १९८० मध्ये केली. नंतर दीड महिन्यातच महाराष्ट्र व इतर ८ राज्यांच्या विधानसभेची मुदतपूर्व निवडणुक झाली. त्यात भाजपने महाराष्ट्रात २८८ पैकी १४, मध्य प्रदेशात ३२० पैकी ६०, राजस्थानात २०० पैकी ३२, गुजरातमध्ये १८२ पैकी ९, बिहारमध्ये ३२४ पैकी २१ अशी कामगिरी केली होती. हिमालय प्रदेशात १९८२ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला ६८ पैकी २९ तर कॉंग्रेसला ३१ जागा होत्या. नंतर १९८५ मधील विधानसभा निवडणुकीत राजीव लाटेमुळे सर्व विरोधी पक्षांची कामगिरी खालावली. तरीसुद्धा भाजपने महाराष्ट्रात १६, मध्यप्रदेशात ३२% मते मिळवून ५८, राजस्थानात ३९, गुजरातमध्ये ११ अशी कामगिरी सुधारली होती. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून भाजपचे २-३ आमदार निवडून आले होते. १९८५ - १९९० या काळात भाजपने श्रीरामजन्मभूमी आंदोलन व बोफोर्सविरोधी आंदोलनातून आपला मताधार अजून वाढविला. परिणामी १९९० भाजपला मध्यप्रदेश व हिमालय प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळाले होते. गुजरातमध्ये ६७ तर १९९१ मध्ये उत्तर प्रदेशातही स्पष्ट बहुमत होते. राजस्थानातही ८५ जागा जिंकून भाजपने सरकार स्थापन केले होते. बिहारमध्ये सुद्धा ३९ आमदार होते. या राज्यात गुजरात वगळता भाजपने स्वबळावर निवडणुक लढली होती. महाराष्ट्रातही मुंडे, खडसे, महाजन अशा नेत्यांमुळे भाजपचा जनाधार वाढला होता. जर १९९० ची विधानसभा निवडणुक भाजपने स्वबळावर लढविली असती तर किमान ६०-७० जागा मिळून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला असता व भविष्यात कॉंग्रेसचा एकमेव पर्याय झाला असता. त्यावेळी शिवसेना हा फक्त मुंबई महापालिका पातळीचा पक्ष होता. मुंबईतील काही मराठीबहुल प्रभागांच्या बाहेर महाराष्ट्रात कोठेही सेनेला ओळख नव्हती. १९७८ मध्ये ३५ जागा लढवूनही सेनेचा एकही आमदार जिंकला नव्हता. १९८० मध्ये कॉंग्रेसशी युती असूनही, कॉंग्रेसची प्रचंड लाट असूनही व सेना मुंबईत म्हणजे आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात लढत असूनही सेनेचे दोन्ही लोकसभा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. १९८५ मध्ये सेनेचा फक्त १ आमदार मुंबईतून निवडून आला होता. अशा नगण्य पक्षाला मोठे स्थान देऊन त्यापेक्षा कितीतरी मोठ्या असलेल्या भाजपने १९९० मध्ये युती करून स्वत:ची वाढ का खुंटवून ठेवली हे एक गूढ आहे. २० वर्षात १ आमदार असणाऱ्या पक्षाला १८३ जागा व १९६७ मध्ये ४, १९७२ मध्ये ५, १९८० मध्ये १४ आणि १९८५ मध्ये १६ आमदार असणाऱ्या पक्षाने फक्त १०५ जागा लढविणे हा शेखचिल्ली निर्णय होता. युती करताना भाजपने आपले १६ पैकी ३ मतदारसंघ सेनेला देणे हा अव्यवहारी निर्णय होता. पुढील २५ वर्षे भाजपने दुय्यम भूमिकेतून युती सुरू ठेवून सेना वाढण्यास मदत केली. सुदैवाने २०१४ मध्ये युती तोडल्यानंतर भाजप स्वबळावर १२३ पर्यंत गेला होता. परंतु २०१९ मध्ये फडणवीसांना पुन्हा एकदा दुर्बुद्धी सुचली व पुन्हा एकदा सेनेशी युती करण्याची चूक करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांशी युती करून स्वत:ची वाढ खुंटवून प्रादेशिक पक्षांना वाढवू नये. अगदीच युती करायची असल्यास स्वत:कडे बहुसंख्य जागा ठेवून युती करावी.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/13/2021 - 10:39 नवीन
फडणवीसांना दुर्बुद्धी सुचली तेव्हा केंद्रीय नेतृत्वालाही दुर्बुद्धी सुचली होती की कसे?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 10:42 नवीन
त्यांनासुद्धा दुर्बुद्धी सुचली होती.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/13/2021 - 12:37 नवीन
मला वाटते की २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इतके मोठे यश मिळेल अशी खुद्द भाजप नेतृत्वाची अपेक्षा नसावी. त्यामुळे बिहारमध्ये नितीश आणि महाराष्ट्रात शिवसेनेला धरून ठेवले. २०१४ मध्ये बिहारमध्ये स्वबळावर २२ जागा जिंकूनही २०१९ मध्ये १७ जागा लढायची तयारी भाजपने दाखवली यातच बरेच काही आले. एकदा लोकसभेत युती केल्यानंतर विधानसभेत युती मोडली असती तर तो मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही युती कायम ठेवणे भाजपला भाग पडले. त्यापूर्वी पाच वर्षांत शिवसेनेने इतके माकडचाळे केले होते की त्यामुळे फडणवीस आणि भाजप पक्ष या दोघांनाही शिवसेना नकोच होती. त्यामुळे मग विधानसभा निवडणुकांमध्ये आपले १२५-१३० उमेदवार निवडून आणायचे आणि मग उरलेले १५-२० आमदार कुठूनही जुगाडता येतील तेव्हा मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेपुढे त्यांना मंजूर न होणार्‍या अटी ठेऊन त्यांना युती मोडायला लावायची असा डाव असावा. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत आणखी किमान ८-१० जागा जास्त निवडून आणणे भाग होते. पण झाले असे की मुख्यतः विदर्भात गडकरी आणि बावनकुळे नाराज असल्यामुळे नागपूर जिल्ह्यात ५, अमरावती जिल्ह्यात ३, भंडारा जिल्ह्यात ३, चंद्रपूर जिल्ह्यात २, गोंदिया जिल्ह्यात १ आणि गडचिरोली जिल्ह्यात १ अशा जागा कमी झाल्या. तर केवळ वर्धा जिल्ह्यात एक जागा वाढली. तेव्हा विदर्भात भाजपचे १४ जागांचे नुकसान झाले. इतर भागातही मुंबईत १ जागा वाढली तर ठाणे-पालघर जिल्ह्यात मिळून १ जागा कमी झाली त्यामुळे एकूण एकच झाले. तेव्हा २०१४ पेक्षा किमान ८-१० जागा जास्त निवडून आणायच्या असतील हे ध्येय असेल तर विदर्भात बसलेला फटका महागात पडला. त्यातही २०१४ पेक्षा २०१९ मध्ये कमी जागा लढवत असल्याने स्ट्राईक रेट खूपच चांगला ठेवणे गरजेचे होते. पण केंद्रातील मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा राज्यात तसाही होईलच त्यामुळे मग शिवसेनेचे उमेदवार पाडा, आपले पक्षांतर्गत विरोधक गारद करा याकडे फडणवीसांचे लक्ष गेले. थोडक्यात अतीआत्मविश्वास नडला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 12:50 नवीन
पुण्यातही २ जागा गेल्या. धुळ्यातील २०१४ मध्ये अनिल गोटे निवडून आलेली जागा हरली. खडसे व पंकजा मुंडेंचे मतदारसंघही हरले. म्हणजे २०१४ च्या तुलनेत सुमारे ३० मतदारसंघात भाजपचा युती करूनही पराभव झाला. परंतु आयारामांमुळे नुकसान मर्यादित राहिले.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/13/2021 - 15:46 नवीन
तुमच्याशी बऱ्यापैकी सहमत आहे. फक्त माझे मत असे आहे की भाजपला अतिआत्मविश्वास नडला नाही, तर अनपेक्षित 10-12 जागा गेल्यामुळे त्यांचे गणित चुकले. परळी (मंत्री), कर्जत-जामखेड(मंत्री), हडपसर, वडगाव-शेरी, इंदापूर, मुक्ताईनगर, मावळ(मंत्री), बीड, मोर्शी(मंत्री), साकोली(मंत्री), मोरगाव(मंत्री), विक्रमगड(मंत्री) ह्या त्यापैकी काही जागा. ******** भाजपची अपेक्षा अपक्ष-मित्रपक्षांसाह १३० ची असावी, जी वरच्या जागा हरल्या नसत्या तर पूर्ण झाली असती. महाआघाडी स्थापन होण्याआधी भाजपने अपक्ष-मित्रपक्ष मिळून ११९ चा दावा केला होता. तेव्हा, राज्यात सरकार नसल्याचा राग फडणविसांवर काढणे चुकीचे वाटते. ज्या पक्षांतर्गत विरोधकांना त्यांनी गारद केल्याच्या बाता केल्या जातात, ते स्वतःचे मतदारसंघसुद्धा राखू न शकणारे नेते होते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून फडणवीसांनी ५ वर्षे ज्या कुशलतेने कुठल्याही वादात न सापडता, विरोधकांनी केलेले अनेक प्रयत्न हाणून पाडले हे वाखाणण्याजोगे होते. आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील ज्या प्रमाणे, सरकार ऐवजी विरोधकांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडणारा त्यांचा आवेश पाहिल्यानंतर मला तरी नक्की वाटते की महाराष्ट्र भाजप ला फडणवीसांशीवाय पर्याय नाही. ******** भाजप ने लोकसभेकडे नाही, तर अनेक विधेयके रांगेत असल्याने राज्यसभेकडे पाहून प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेतले असावे अशी शक्यता नाहीये का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 18:15 नवीन
पहिल्यांदाच मंत्रिमंडळात असून फडणवीसांनी ५ वर्षे ज्या कुशलतेने कुठल्याही वादात न सापडता, विरोधकांनी केलेले अनेक प्रयत्न हाणून पाडले हे वाखाणण्याजोगे होते. भ्रष्ट विरोधकांशी तडजोड करणे, स्वपद टिकविण्यासाठी उद्धव ठाकरेंना खुश ठेवून त्यांची प्रत्येक मागणी मान्य करणे व ते करताना राज्यहिताचा व पक्षहिताचा बळी देणे, मताधार वाढविण्यासाठी लांड्यालबाड्या करून पारंपरिक समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांचे नुकसान करणे, पक्षस्थापनेपासून पक्षाबरोबर असलेल्या व पक्ष वाढविलेल्या सहकाऱ्यांना खोट्या प्रकरणात गु़ंंतवून त्यांचा काटा काढणे अशा मार्गांनी त्यांनी सत्ता टिकविली होती. परंतु शेरास सव्वाशेर भेटतोच. तसा त्यांनाही भेटला. म्हणूनच चिडचिड सुरू आहे. आताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील ज्या प्रमाणे, सरकार ऐवजी विरोधकांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडणारा त्यांचा आवेश पाहिल्यानंतर मला तरी नक्की वाटते की महाराष्ट्र भाजप ला फडणवीसांशीवाय पर्याय नाही. यांचा आवेव पाहून हसू आवरत नव्हते. "नाही, नाही, नाही. भाजप कधीही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणार नाही. एकदा नाही, त्रिवार नाही." असे त्यांनीच २०१४ मध्ये आवेशात सांगितले होते. "आम्ही सत्तेत आलो की अजितदादा तुरुंगात चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग" हे सुध्दा सांगताना जोरदार आवेश होता. पण मग २०१९ मध्ये ती आश्वासने, तो आवेश कोठे गेला होता? ____________________ हे कायप्पावर आलेले ढकलपत्र . . . फडणवीसांनी काल विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असं भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती. याच सभागृहात ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं. त्यानंतर काय झालं? - गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले. याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते. त्यानंतर काय झालं? - स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं. अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल. त्यानंतर काय झालं? - हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला. याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँक मध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी करायचे. त्यानंतर काय झालं ? - २०१४ मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेतले, विधानपरीषदेतून आमदार केले आणि आता ते विधानपरीषदेत भाजपचे विरोधी पक्षनेता आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री असतांना मामुनीं शिक्षकांची वेतन बँक खाती मुंबई बँकेत वळवली. नंतर आधी हाय कोर्ट मग सुप्रीम कोर्ट ने फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली. - याच सभागृहात कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल पण अनेक आरोप केले. त्यानंतर काय झालं ? - विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकर च्या घोटाळ्याची कागद नाचवली. पण स्वता मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाहीये अस प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं आणि त्याला निर्दोष सिद्ध केला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण(?) भाषण केलं, त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं (जसे की दादा, तटकरे, कृपाशंकर) त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. २०१४ पूर्वी ठीक होतं. पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे दरवेळी प्रत्येक विषयात फडणवीस मी मी करत आकांडतांडव करत आहेत. ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये. उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केला. मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गुस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपने केलेला आकांडतांडव पाहता, मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे तर विरोधीपक्ष नेता म्हणून पुन्हा येण्याची संधी मिळाली आहे याचं जास्तच नैराश्य आलेलं दिसत आहे. असो, अनेक भक्तांना फडणवीस अजूनही अभ्यासू नेते वाटत असले तरी त्यांचा अभ्यास दिवसेंदिवस उघडा पडून त्यांची चिडचिडच जास्त होतांना दिसत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/13/2021 - 18:25 नवीन
तुम्ही चक्क तुमचा विरोध दर्शवण्यासाठी (किंबहुना त्याला कुरवाळण्यासाठी) कायप्पावरील बिनबुडाचे मेसेजेस पुढे ढकलत आहात यातच बोलणे खुंटले. **********
भ्रष्ट विरोधकांशी तडजोड करणे, स्वपद टिकविण्यासाठी उद्धव ठाकरेंना खुश ठेवून त्यांची प्रत्येक मागणी मान्य करणे व ते करताना राज्यहिताचा व पक्षहिताचा बळी देणे, मताधार वाढविण्यासाठी लांड्यालबाड्या करून पारंपरिक समर्थक मतदारांचा विश्वासघात करून त्यांचे नुकसान करणे, पक्षस्थापनेपासून पक्षाबरोबर असलेल्या व पक्ष वाढविलेल्या सहकाऱ्यांना खोट्या प्रकरणात गु़ंंतवून त्यांचा काटा काढणे अशा मार्गांनी त्यांनी सत्ता टिकविली होती. परंतु शेरास सव्वाशेर भेटतोच. तसा त्यांनाही भेटला. म्हणूनच चिडचिड सुरू आहे.
कसलाही आधार नसलेली ही वाक्ये, तुमचा फडणवीस विरोध हा साधारणपणे, मोदींविरोधकांच्या अंधविरोधाच्या लेवल ला पोहोचला आहे असे प्रामाणिक मत नोंदवतो आणि खाली बसतो. तुमच्यासारखा अभ्यासू व्यक्तित्व याचा शांतपणाने विचार करेल अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 18:42 नवीन
तुम्ही चक्क तुमचा विरोध दर्शवण्यासाठी (किंबहुना त्याला कुरवाळण्यासाठी) कायप्पावरील बिनबुडाचे मेसेजेस पुढे ढकलत आहात यातच बोलणे खुंटले. वरील कायप्पा संदेशातील कोणते आरोप बिनबुडाचे आहेत ते सांगा. कसलाही आधार नसलेली ही वाक्ये, तुमचा फडणवीस विरोध हा साधारणपणे, मोदींविरोधकांच्या अंधविरोधाच्या लेवल ला पोहोचला आहे असे प्रामाणिक मत नोंदवतो आणि खाली बसतो. तुमच्यासारखा अभ्यासू व्यक्तित्व याचा शांतपणाने विचार करेल अशी अपेक्षा करतो. ही सर्व वाक्ये वस्तुस्थिती आधारीत आहेत. यातील कोणत्या वाक्याला आधार नाही ते सांगा. मी कायमच भाजपसमर्थक होतो व आहे. मी फडणवीसांचा २०१६ पर्यंत कट्टर समर्थक होतो. परंतु त्यांनी २०१७ पासून घेतलेल्या निर्णयांमुळे चीड येत गेली व व पर्यवसान विरोधात झाले. मी कोणाचाही अंधभक्त नाही किंवा अंधविरोधक नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/13/2021 - 20:09 नवीन
उलटी गंगा नही बहेगी. तुम्ही वर वापरलेली वाक्ये तथ्यावर आधारित माहितीसह टंका म्हणजे मग त्यावर काही चर्चा संभावित आहे. नाहीतर तुमची मते तुमच्यापाशी माझी माझ्यापाशी राहिली तरी काहीही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 04/30/2021 - 11:26 नवीन
पहाटेचा तो अगत्म्य सोहळा पाहिला आणि पोटात ढवळलं होत आणि त्यावेळेस फडणवीसांबद्दल चा आदर कमी झाला... पण एक प्रश्न पडला आहे कि ज्याचे उत्तर कधी जन्मात मिळेल असे वाटत नाही तो म्हणजे हे घडलेच कसे आणि राष्ट्रीय नेतृत्व काय झोपले होते का? पवार काकांचा याला पाठिंबा आहे कि नाही हे कसे काय त्यांनी आधी स्पष्ट करून घेतले नाही ? आणि दुसरे माझे स्पष्ट मत आहे कि फडणवीसांना जो विरोध मुळात झाला त्यांच्य्या जातीमुळेच...( ताकाला जाऊन भांड लपवण्यात काही अर्थ नाही) .. हे विरोधाचे कारण दुर्दवी आहे .. असहिष्णुता वादि महात्म्याच्या अनुयायांना हे मात्र दिसले नाही कि त्या माहात्म्यचे राजकीय गुरु गोखले , पट्ट शिष्य भावे होते! त्यांना फक्त मारेकरी गोडसे होत एवढेच दिसते ! असो , आधीच काँग्रेस इतर सत्तेवसर आपले हे ज्यांना पचले नाही जखमेवर मीठ म्हणजे आधीजोशी आणि नंतर फडणवीस ... असो मी पाठिंबा देतो ते पक्षाच्या धोरणांना... व्यक्तीला नाही त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सबळ राहावा असे मनोमन वाटते .. मग फडणवीस असोत नाहीतर चंद्रकांत पाटील
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/30/2021 - 13:32 नवीन
हे कधीच समजणार नाही ...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/30/2021 - 14:45 नवीन
नक्की समजेल. पण काही वर्षांनी समजेल. आत्ता बोलून पक्षश्रेष्ठींना अडचणीत आणण्यापेक्षा, स्वतः गप्प राहून शिव्या खाणे काही लोकं पसंत करतात. कारण त्यांचा नजरेचा टप्पा खूप लांबचा असतो. असो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/30/2021 - 15:10 नवीन
टप्पा अजिबात लांबचा नव्हता. तात्पुरता फायदा करून घ्यायचा होता. काहीही करून, कोणतीही किंमत देऊन पुन्हा एकदा सत्ता मिळविणे हेच एकमेव उद्दिष्ट होते. त्यामुळेच आधीच्या सर्व भूमिका विसरून १८० अंशात वळण घेणे, लाळघोटेपणा, समर्थक मतदारांचा व सहकाऱ्यांचा विश्वासघात, भ्रष्टांंना अभय देऊन त्यांच्याशी हातमिळवणी, रोज अर्वाच्य शिवीगाळ करून लाथा घालणाऱ्यांचे निर्लज्जपणे पाय चाटणे, स्वपक्षाचे नुकसान करून युती या सर्व गोष्टी पुन्हा खुर्ची मिळवण्यासाठी केल्या. अत्यंत लघुदृष्टी असल्याशिवाय असे करणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/30/2021 - 17:12 नवीन
तुम्हाला जर असे वाटत असेल की, हा निर्णय फडणवीस यांचा एकट्याच होता, तर ,ते जसे झालेले नाही ....
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/30/2021 - 18:01 नवीन
जाऊ द्या हो. बोलू द्या त्यांना. बोला गुरूजी बोला. 🙏
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/30/2021 - 18:20 नवीन
राष्ट्रवादी कांग्रेस, तृणमुल कॉंग्रेस आणि शिवसेने सारखे, भाजप मध्ये राज्य पातळीवर, मुख्यमंत्री निवडला जात नाही... मुख्यमंत्री कुणी व्हायचे? हा निर्णय भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळी घेतात ..... योगी हे एक उदाहरण आणि खडस्यांसारखे वरिष्ठ नेते डावलून फडणवीस यांना मुख्यमंत्री केले, हे दुसरे उदाहरण .... पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध होत असतांनाही, फडणवीस यांनी कार्यकाल पुर्ण केला, हेच कौतुकास्पद आहे... येणारा काळ हा फडणवीस यांची परिक्षा बघणणाराच आहे आणि तो त्यांना केंद्रीय पातळीवर घेऊन जाणार.....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/30/2021 - 19:23 नवीन
पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध होत असतांनाही, फडणवीस यांनी कार्यकाल पुर्ण केला, हेच कौतुकास्पद आहे... कसला विरोध? कोणीही मुख्यमंत्री असता तरी पक्षाबाहेर विरोध होतोच. त्याचे कसले कौतुक? पक्षांतर्गत कोणी विरोध केला होता? पक्षांतर्गत विरोध असता तर ५ वर्षे टिकले असते का? पक्षातील सर्वांनीच सहकार्य केले होते. खडसे, पंकजा मुंडे आणि तावडे यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करण्याचा घोर अपराध केला म्हणून त्यांना अनेक खोट्या खटल्यात अडकविणे योग्य होते का? हे करताना महाराष्ट्रात पक्ष दुर्बल केला नाही का? त्यामुळे इतर पक्षातील भ्रष्ट, नालायक गणंगांची भाजपत भरताड केली नाही का? आणि कार्यकाल पूर्ण केला यात काय कौतुकास्पद आहे? राष्ट्रवादीतील भ्रष्टांना अभय देऊन, ठाकरेंची ५ वर्षे अर्वाच्य शिवीगाळ सहन करीत चाटुगिरी करणे हे कौतुकास्पद नसून ही लाळघोटेपणाची परीसीमा आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 05/01/2021 - 02:10 नवीन
तुम्हाला कोण हवेत? फडणवीस नको असं नुस्त कसं म्हणून चालेल?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 05:03 नवीन
फडणवीस व चंपा अजिबात नको. उर्वरीतांपैकी आयाराम नसलेला, वरीष्ठ व स्वच्छ नेता हवा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 05/01/2021 - 10:46 नवीन
कोण आहे असा?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/01/2021 - 04:23 नवीन
राष्ट्रवादी बरोबर का हातमिळवणी केली? मुळांत, भाजपमध्ये कुणीही एकहाती निर्णय घेत नाही, ही वस्तुस्थिति आहे. फडणवीसांवर काबू ठेवता येत नाही, हे समजताच, काही नेत्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली ... कुठल्या पक्षाबरोबर युती करायची आणि कुठल्या पक्षाबरोबर युती करायची नाही, हे निर्णय भाजपची कार्यकारिणी घेते. त्या कार्यकारिणीत जो निर्णय ठरेल, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम, त्या त्या नेत्यांकडे असते. शिवसेनेची आणि भाजपची युती, आज नाही तर उद्या तुटणारच होती. नेमकी ती वेळ, फडणवीस यांच्या कारकिर्दीत आली... दोष द्यायचाच असेल तर, भाजपच्या कार्यकारिणीला द्या....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 05/01/2021 - 05:17 नवीन
फडणवीसांवर काबू ठेवता येत नाही, हे समजताच, काही नेत्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली ... फडणवीसांनीच पक्षातील इतर नेत्यांना त्रास दिला का त्यांना इतरांनी त्रास दिला? तसे असेल तर कोणत्या नेत्यांनी काम त्रास दिला? कुठल्या पक्षाबरोबर युती करायची आणि कुठल्या पक्षाबरोबर युती करायची नाही, हे निर्णय भाजपची कार्यकारिणी घेते. त्या कार्यकारिणीत जो निर्णय ठरेल, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम, त्या त्या नेत्यांकडे असते. कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही असे ठाकरेंनी अनेकदा सांगूनही सेनेबरोबर युती करण्यासाठी कोणता नेता कासावीस झाला होता? सेनेला खुश ठेवण्यासाठी कोणता नेता ठाकरेंची चाटुगिरी करीत होता? सेनेला खुश ठेवण्यासाठी कोणत्या नेत्याने राज्याचे व पक्षाचे नुकसान होत असूनही ठाकरेंची प्रत्येक मागणी मान्य केली होती? शिवसेनेची आणि भाजपची युती, आज नाही तर उद्या तुटणारच होती. भाजपच्या सुदैवाने २०१४ मध्येच ती युती तुटली होती. फडणवीसांच्या अत्याग्रहामुळे २०१९ मध्ये स्वतःचे नुकसान होत असतानाही भाजपने पुन्हा युती करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. अजूनही फडणवीसांनी आशा सोडलेली नाही. आम्ही सेनेला पाठिंबा देण्यास तयार आहोत ही चंपाची ऑफर, फडणवीस-राऊत २ तासांची भेट, फडणवीस-ठाकरेंची पुढील काही दिवसात होणारी भेट यातून हे स्पष्ट आहे. उद्या ठाकरेंनी एखादे सूचक विधान केले तर फडणवीस धावत धावत मातोश्रीवर जातील हे नक्की.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/01/2021 - 07:15 नवीन
फडणवीस म्हणजे, महाराष्ट्र भाजप नाही... ही एक बाजू आणि फडणवीस म्हणजेच, महाराष्ट्र भाजप, ही दुसरी बाजू ... ---------- क्रिकेटचेच उदाहरण देतो, संघ निवडायचे काम कॅप्टन करत नाही संघ निवडायचे काम, समिती करते ... ----------- फडणवीस म्हणजे, महाराष्ट्र भाजप नाही, कारण, भाजपमध्ये एकाच खुर्चीवर, एकाच माणसाला बसवत नाहीत... गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी ही उदाहरणे बघा ... फडणवीस केंद्रीय मंत्रीमंडळात, आज नाही तर उद्या, नक्कीच जाणार.... आणि त्यांना अर्थमंत्री किंवा संरक्षण दल, ह्यापैकी एक खाते नक्कीच मिळेल... काही नेत्यांचा जळफळाट इथेच आहे... ------------- भाजप कार्यकारिणी, वकील म्हणून सध्या, फडणवीस यांची परिक्षा बघत आहे... ----------- काही नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री पदावर नको आहेत आणि त्यासाठी फडणवीस हे सत्तेसाठी कसे हपापलेले आहेत, हे चित्र रंगवण्यात आले आहे.... ----------- एक निरीक्षण नोंदवतो, सगळी आंदोलने थांबलेली आहेत ... प्रश्र्न आहेत तिथेच आहेत .... जनता रस्त्यावर येऊ शकत नाही, पण लेखी निषेध किंवा पाठिंबा तर नक्कीच नोंदवू शकतात ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/13/2021 - 10:57 नवीन
हिंदी बेल्ट सोडला तर राष्ट्रीय पक्षांना स्वतःचे अस्तित्व नाही. प्रादेशिक पक्षांच्या ओळचानीला उभे राहणे हाच एकमेव पर्याय आहे. प्रादेशिक पक्षांशी जुळवून नाही घेतले तर राष्ट्रीय म्हणून जे पक्ष आहेत ते फक्त हिंदी बेल्ट मध्येच थोडेफार अस्तित्वात असतील. भाषिक अस्मिता ही राष्ट्रीय अस्मिता पेक्षा खूप जास्त तीव्र आहे आणि पुढे पण तीव्र च राहील. जरा रिअल दुनियेत येवून मत मांडत जा. स्वप्नांचे इमले बांधायची तुमची नवीन पद्धत आहे. कबूल आहे . पण ते इमले फक्त स्वप्नातच.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 03/13/2021 - 13:19 नवीन
जसा गुजराती बेल्टने राष्ट्रीय हिंदी राजकारणाचा ताबा घेतलाय तसं मराठी बेल्टबाबत पुढेमागे घडू शकेल का ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/13/2021 - 13:34 नवीन
गृह मंत्री गुजराती,प्रधान मंत्री गुजराती,रेल्वे मंत्री गुजराती(मारवाडी पण असेल) ,सचिव वैगेरे गुजरात कॅडर चे,आणि सर्वात जास्त जागा जिंकून दिलेल्या राज्यातील लोकांना एकच महत्वाचे मंत्री पद संरक्षण. ही किमया बाकी कोणालाच जमणार नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 14:01 नवीन
१९९१ मध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री व सभापती मराठी होते. पंतप्रधान नरसिंहराव उत्तम मराठी बोलू व समजू शकत होते. नंतर राष्ट्रपती झालेले शंकरदयाळ शर्मा सुद्धा मराठीचे उत्तम जाणकार होते. तरीसुद्धा मराठे राष्ट्रीय राजकारणात प्रभुत्व निर्माण करू शकले नव्हते.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 03/13/2021 - 14:04 नवीन
कलमाडी पण त्याच वेळी रेल्वे मंत्री होते ना?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 14:52 नवीन
नाही. २१ जून १९९१ ते ऑक्टोबर १९९५ पर्यंत सी के जाफर शरीफ रेल्वेमंत्री होते. नंतर मे १९९६ मधील निवडणुकीपर्यंत कलमाडी होते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 03/13/2021 - 11:55 नवीन
गुरूजी तुम्ही फक्त फडणविसांना दोष देत आहात. ते आणि तेच फक्त महामूर्ख असल्याबद्दल तुमचेकडे काही आतली विश्वसनीय माहिती आहे का? मला वाटते बर्‍याच चुका केंद्रातील नेत्यांनी केल्या आहेत. फडणवीसांनी तो निर्णय शिरोधार्य मानला आहे. तसेच फडणवीस आपले मन मोठे करून आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या चुका सांगत नाही आहेत. साधारणतः अशा वेळेस, ते फक्त योग्य वेळ आली की सांगेन असं म्हणून विषय संपवतात. पण आपल्या वरिष्ठ नेत्यांना गुंतवत नाहीत. पण तुम्हाला ब्राह्मण मुमं नको असेल म्हणून तुम्ही काही करत असाल तर माझा पास. तो संपूर्णपणे वेगळ विषय आहे व त्यात मला रस नाही. असो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 03/13/2021 - 12:08 नवीन
पण ते मदन बान ह्यांना रुचले नाही सरळ माझा आयडी ब्लॉक करा अशी विनंती केली. फडणवीस ना केंद्रातील bjp चे नेते च कमजोर करत आहेत हे सत्य च असावे. पंकजा ताई चा पराभव कोणी केला,खडसे कसे गेले, आता फडणवीस,चंद्रकांत पाटील ह्यांची किंमत कमी केली केंद्रीय नेतृत्व त्यांना हवा तो नवीन (आयात केलेला पण असू शकतो) मर्जी मधला नेता महाराष्ट्र bjp मध्ये आणणार.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 12:09 नवीन
फडणवीस का नको याची अनेक सविस्तर कारणे मी अनेकदा वेगवेगळ्या धाग्यात लिहिली आहेत. ते ब्राह्मण आहेत म्हणून नको असण्याचे कारणच नाही. ते ब्राह्मण असल्याने नको असे मी कधीही लिहिले नव्हते. बऱ्याच काळानंतर एक ब्राह्मण मुख्यमंत्रीपदावर आला या एकमेव कारणासाठी माझ्या माहितीतील काही ब्राह्मणांचा त्यांना अजूनही पाठिंबा आहे. फडणवीसांची इतर (गैर)कृत्ये त्यांच्यासाठी अदखलपात्र आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 03/13/2021 - 14:06 नवीन
गुरूजी, जातीचा काहीही संबंध नाही हा एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट झाला. खूप बरे वाटले. धन्यवाद. मला एवढेच म्हणायचे आहे की, नको त्या तडजोडी केंद्रिय नेतृत्वाने केलेल्या आहेत. मला याबाबत जास्त काही बोलायचे नाही. फडणवीस यांना बर्‍याच गोष्टी पटत नसूनही त्यांना त्या पक्षशिस्त म्हणून मान्य करायला लागल्या आहेत. आता त्यांच्या डोक्यावर खापर फोडले जात आहे. तेही योग्य वेळी बोलेन असे म्हणून तो विषय टाळत आहेत. हे केंद्रिय नेत्यांना कळतंय. त्यांचा पूर्ण पाठिंबा फडणवीसांना आहे. किंबहुना तो अजून वाढलेला जाणवतोय. सद्या जे काही घडतंय त्यानुसार पुढच्या निवडणूकीत मतदान खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल अशी माझी समजूत आहे. त्यात तुम्ही मांडत असलेले अनेक मुद्दे निरर्थक ठरण्याची शक्यता असल्याने मी तोपर्यंत थांबायचे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 15:02 नवीन
फडणवीसांचा युतीसाठी अत्याग्रह व कदाचित मोदी-शहांना बहुमतासाठी पूरेशी खात्री नसल्याने युती केली होती. मोदी-शहा युतीसाठी फारसे उत्सुक नव्हते. युती केलीच तर ती लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित असावी, विधानसभेसाठी नंतर ठरविता येईल असे त्यांची भूमिका असल्याचे मी काही ठिकाणी वाचले होते. ब्राह्मण व इतर मागासवर्गीयांना दुखविल्यामुळे आणि पक्षांतर्गत विरोधकांच्या खच्चीकरणामुळे आपल्याला ही निवडणुक सोपी नाही हे ओळखूनच फडणवीसांनी घाऊक प्रमाणात आयाराम पक्षात आणून युतीचा अत्याग्रह धरला होता. बाकी पुढील निवडणुकीनंतर समजेलच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 12:11 नवीन
बादवे, दुर्बुद्धी सुचणे म्हणजेच महामुर्ख असणे का?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 03/13/2021 - 14:02 नवीन
अन्वयार्थ जवळपास तसाच. असो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 15:04 नवीन
फडणवीस अत्यंत धूर्त व पाताळयंत्री आहेत. असा माणूस महामुर्ख नसतो.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 03/13/2021 - 15:25 नवीन
तसे नसावे हो. एखादा सेट झालेला फलंदाज कधी कधी चुकीच्या चेंडुच्या मोहात पडुन आऊट होतो तेव्हा त्याला महामूर्ख थोडेच म्हणता येईल. कदाचित मोहात पडल्यामुळे केलेली चूक असे म्हणणे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 03/13/2021 - 15:54 नवीन
मूळात अशी कुठली 'चूक' त्यांनी किंवा नेतृत्वाने केली यालाच काही आधार नाहाये. समोर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होऊ घातलेली असताना, शिवसेना आणि भाजप समोर युती शिवाय पर्याय नव्हता असे मला वाटते. कमीत कमी आकडे आणि मतांची टक्केवारी तरी हेच दर्शवतेय की अनपेक्षितपणे हरलेल्या 10-12 जागांनी भाजपचे गणित बिघडले आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली असावी.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 03/13/2021 - 16:27 नवीन
१. राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने निवडणूकीच्या अगोदरच ठरवलेले असावे. मतदान टक्केवारीवरून तसं मला जाणवलं. त्यासाठी मी एक धागाही काढला होता. २. २०१४ प्रमाणे यावेळीही आपल्याला तिकीट मिळेल असे अनेक जणांना वाटले होते. अनेकांनी त्याप्रमाणे मतदारसंघ बांधणीही केली होती. खर्चही केला होता. पण त्या सगळ्यावर पाणि पडले. भाजपामधे खूप मोठा निरूत्साह होता. त्यामुळे मतदान खूप कमी झाले. ३. बंडखोरी नडली. हे तिन्ही घटक पुढच्या निवडणुकीत अनुकूल होणार आहेत.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/13/2021 - 17:17 नवीन
राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने निवडणूकीच्या अगोदरच ठरवलेले असावे.
२०१४ च्या निवडणुकांनंतरच शिवसेनेने अशी ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये महाभकास आघाडी स्थापन झाल्यानंतर केला. शिवसेनेचे बेत कधीच शुध्द नव्हते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय झाल्यानंतर मोदी-शहा विधानसभा निवडणुकांसाठी युती करताना खूपच हार्ड बार्गेन करतील आणि पूर्वी वाजपेयी-अडवाणी तसेच मुंडे-महाजन यांची थोड्या जागा देऊ करून बोळवण करत होतो हे यापुढे चालणार नाही हे लक्षात आल्यानंतर जून-जुलै २०१४ पासूनच सामनामधून गरळ ओकली जायला सुरवात झाली होती. असल्या विश्वासघातकी पक्षाचा खरा चेहरा लक्षात न घेता त्यांना त्यांची जागा न दाखवता भाजपवाले खूप साधेपणाने वागले. त्याची फळे त्यांना भोगायला लागणारच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 18:27 नवीन
शिवसेनेने स्थापनेपासून प्रजा समाजवादी पक्ष, मुस्लिम लीग, इंदिरा कॉंग्रेस, भाजप, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, स्वतंत्र भारत पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व डाव्या उजव्या पक्षांशी युती केली आहे. २००९ मध्ये सेना-राष्ट्रवादी युतीची बोलणी सुरू होती व त्यावेळी गडकरींनी सेनेला अल्टिमेटमही दिला होता. अशा पक्षाला ३० वर्षांनतरही भाजप ओळखू शकला नाही हे दुर्दैव. सेनेला महाराष्ट्राच्या डोक्यावर बसविण्याची कठोर शिक्षा भाजपला मिळाली पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा