विद्या बाळ यांचे अखेरचे आवाहन
विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती.
-------------------------------------------------------------------------
अखेरच आवाहन...
मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या.
मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड
ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे.
मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.
आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे.
माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं.
विद्या बाळ २९ जानेवारी २०२०
संध्या. ७.३०
नैसर्गिक मृत्यू चे प्रमाणपत्र कसे लिहायचे याचा अभ्यास करून उत्तर दिलेत
तर पुढे चर्चा होऊ शकेल अन्यथा दीड शहाण्याची अवास्तव बडबड म्हणून तुम्हाला फाट्यावर मारण्यात येत आहे