Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

प
प्रकाश घाटपांडे
Wed, 07/17/2019 - 06:03
🗣 119 प्रतिसाद
एक जुना किस्सा आठवतो. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले १) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे २) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही. ३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय? ४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर? परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे. वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते. कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात. अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 56876 views

🗣 चर्चा (119)
R
Rajesh188 Fri, 07/19/2019 - 10:52 नवीन
भारतात तथा कथित पुरोगामी,नास्तिक,पर धर्मीय हे फक्त हिंदू धर्मात ज्या काही अंध श्रद्धा आहेत त्या वरच चर्चा करत असतात .बाकी धर्माच्या अंध श्रधेवर कधीच चर्चा होवून देत नाहीत . काय अंध श्रद्धा फक्त हिंदू धर्मात च आहेत ? हिंदू धर्म हाच खरा विज्ञान वादी धर्म आहे . विमानाची कल्पना हिंदू धर्मातच आहे . ब्रह्मास्त्र ची कल्पना हिंदू धर्मातच आहे काम शास्त्र वरचा ग्रंथ फक्त हिंदू धर्मात च आहे . आरोग्य वर ग्रंथ फक्त हिंदू धर्मात च आहे . कसे जीवन जगावे ह्याचे उत्तम मार्ग दर्शन हिंदू धर्मच करतो ( गीता आणि महाभारत) हे सर्व प्रकारचे विचार दुसरा कोणताच धर्म करत नाही तरी काही . हिंदू व्यतिरिक्त बाकी कोणत्याच धर्मातील अंध श्रद्धा न वर हे तथाकथित पुरोगामी टीका करताना कधीच दिसणार नाहीत
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 07/19/2019 - 11:06 नवीन
https://youtu.be/e5bCVPlXP3Y या व्हिडिओत कदाचित काही उत्तरे मिळतील.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/20/2019 - 11:26 नवीन
पांडुला हा धागा फारफार आवडेल.. ;) ये रे पांडू,घेऊन तुझा श्रद्धेचा दांडू! Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 07/21/2019 - 09:02 नवीन
जॉनविक्क, पण सदरील pdf हि तक्रारीची pdf आहे यावर न्यायालय व अनिसचे काय म्हणने/निकाल/स्पष्टीकरण आहे ते कुठे आहे ? न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक). कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही. अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 07/21/2019 - 10:16 नवीन
न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक). (बहुतेक) आपणही जनहित याचिका दाखल करू शकता. कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही. सर्व कायदे सरकारीच असतात, खाजगी कायदा हा प्रकारही सरकारच्या कायद्याशिवाय बेकायदेशीरच. सबब आपण हे करू शकता. अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाही त्यांना स्टॅन्ड तर घ्यावाच लागेल. बाकी तज्ञ बोलतीलच तो पर्यंत आरोप ठेवले जाणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं न्हवे असं समजून सत्य जनते समोर येईलच व आलेच पाहिजे याची खात्री बाळगूया.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 07/21/2019 - 22:19 नवीन
जॉनविक्क, संजीव पुन्हाळेकरांनी तड लावायचा प्रयत्न केला तर त्यांनाच उलट फालतू कारण सांगून अटक केली. अर्थात न्यायालयाकडनं जामीन लगेच मिळाला. सरकार कोणाचं आहे हे कळून येतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sun, 07/21/2019 - 22:32 नवीन
चर्चेतून काहीच नवीन काहीच साध्य नाही, विषय आता इथेच सोडून देऊ. - सश्रध्द जॉनविक्क
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 07/22/2019 - 07:25 नवीन
हि मोठी कामाची गोष्ट केली तुमी नं जानराव
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 07/22/2019 - 12:40 नवीन
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 07/22/2019 - 07:07 नवीन
श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.
ह्या वाक्याला आधार काय? कदाचित ती मानवी जिवाला घातक असल्याने भविष्यात नष्ट होणार असेल. उत्क्रांती ही लक्षावधी वर्षे चालणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापित धर्म व अनुषंगिक श्रद्धा यांचे आयुष्य केवळ काही हजार वर्षांचे आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 07/22/2019 - 07:50 नवीन
श्रद्धा या गोष्टीचा संबंध काय फक्त धर्माशी आहे का? http://www.misalpav.com/node/42850
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/25/2019 - 06:08 नवीन
सर्वोच्च न्यायालयात माझा सरकार विरुद्ध खटला चालू असताना मी पुण्याच्या कमांड रुग्णालयात कामाला होतो. तेथे दिल्लीवरून एक सांध्याच्या रोगांचे तज्ज्ञ कर्नल चतुर्वेदी हे आले होते. त्यांच्या बरोबर भोजन करत असताना ते म्हणाले कि तु न्यायालयात कशाला गेलास? मी त्यांना म्हणालो न्यायालयात न्याय मिळेल अशी माझी (faith) श्रद्धा आहे. विश्वास( belief) आणि श्रद्धा(faith) यात सूक्ष्म फरक आहे त्यावर ते म्हणाले कि श्रद्धा असल्याने कोणताही फायदा होत नाही. मी त्यांना शांत पणे म्हणालो सर तुमची बायको तुमच्याशी एकनिष्ठ आहे हि तुमची श्रद्धा/ विश्वास आहे. म्हणून तुम्ही माझ्याबरोबर सुखाने जेवत आहात. जर आता तुम्हाला कळलं कि दिल्लीत तुमच्या बायकोचं लफडं आहे तर तुम्हाला हेच जेवण गोड लागणार नाही. ते दोन मिनिटं विचार करून म्हणाले तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण लोकांचं भलं करतो आहोत त्यामुळे आपलंही चांगलंच होईल हि सामान्य माणसाची श्रद्धा (/विश्वास) असते. अशा श्रद्धेला खोटं ठरवून नक्की काय निष्पन्न होतं ? पराकोटीचे नास्तिक बुद्धिप्रामाण्यवादी स्वतःच्या खाजगी जीवनात अनेक श्रद्धा बाळगून असतात. पण ती केवळ धर्मावर आधारित नसल्याने तिला श्रद्धा म्हणायचे नाही. कम्युनिस्ट माओवादी इ लोकांनी केलेले अमानुष शिरकाण हे कोणत्या विचारसरणीने होते? ती बुडत चाललेल्या कम्युनिस्ट विचारसरणीवर असलेल्या (अंध) श्रद्धेवरच आधारित असते. मानवी मन हे अत्यंत जटील अशी प्रणाली आहे आणि ती जोवर ती पूर्णपणे समजत नाही तोवर दुसऱ्याच्या मानसिक जडणघडणीवर कठोर टीका करणे चूक आहे असे मी मानतो. श्रद्धा हि घड्याळासारखी असते आणि प्रत्येकाला आपलेच घड्याळ बरोबर आहे अशी ठाम श्रद्धा असते
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/25/2019 - 08:22 नवीन
खरे डॉक्टर, घड्याळाचं उदाहरण एकदम चपखल आहे. मुंबईत बरीच वर्षं काढल्याने आयुष्य घड्याळाला बांधलेलं असणं चांगलंच अनुभवलंय. माझं घड्याळ मी नेहमीच बरोबर धरायलाच पाहिजे. भले ते इतरांशी जुळंत नसलं तरीही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/25/2019 - 08:29 नवीन
मानवी मन हे अत्यंत जटील अशी प्रणाली आहे आणि ती जोवर ती पूर्णपणे समजत नाही तोवर दुसऱ्याच्या मानसिक जडणघडणीवर कठोर टीका करणे चूक आहे असे मी मानतो.>>>>>>म्हणून मवाळ भुमिका मला आवडते
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 07/25/2019 - 10:04 नवीन
माई साहेब मोड ऑन "सगळ्यात सुंदर श्रद्धा हि कपूरांची, बाकी सब झूठ असे आमच्या ह्यांचे ठाम मत आह !" माई साहेब मोड ऑफ
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/25/2019 - 10:13 नवीन
"सगळ्यात सुंदर श्रद्धा हि कपूरांची, बाकी सब झूठ असे आमच्या ह्यांचे ठाम मत आह !" हे मत म्हणजे, ही माई मोडमध्ये गेल्यावर असणारी, तुमची श्रद्धाच आहे. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/25/2019 - 10:18 नवीन
हे पटले. कुठ श्रद्धा अंधश्रद्धाच्या भानगडीत पडता. आपल्याला मनाला आनंद देईल ते करावे.मग त्याला कुणी श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा किंवा अश्रद्धा म्हणा.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 07/27/2019 - 04:40 नवीन
तिसरी गोष्ट म्हणजे आमच्याच कॉलेजमधला एक शिपाई , त्याची गोष्ट : आपल्याला भूत - पिशाच्च या प्रकारात गती आहे असं तो म्हणे . गावाबाहेर बारा बावड्यांची , दगडांत बांधलेली एक अप्रतिम विहीर आहे . तिथं नेमक्या दिवशी , नेमक्या वेळी , विहीरभर पणत्या पेटल्याची गोष्ट तो सांगे . त्या नेमक्या वेळी मीही एकदा त्याच्या बरोबर गेलो . पण पणत्या राइच द्या , एखादा काजवाही चमकला नाही . शेजारच्या घरात एक बाई बाळंत झाली होती . तिचा नवरा माझ्या परिचयाचा होता . काही दिवसांत बाळंतिणीच्या तक्रारी येऊ लागल्या : तिला बाजेवरून सारखं उचलून कोणी खाली ठेवतंय असं वाटे : बाळंतपणात अशक्तपणा आला तर डोकं हलकं होतं , त्यातला हा प्रकार असावा , असं तिच्या नव-याला प्रथम वाटलं . औषधोपचारानं बरं वाटेना . तक्रारी वाढतच गेल्या . तसं पाहता ती बाळंतीण एरवी व्यवस्थित वागे . वेडाचं वारं लागलं असंही दिसेना . अचानक एक दिवस कॉलेजातील तो शिपाई माझ्या घरी आला . त्याला पाहताच मला एक कल्पना सुचली : जर काही बाधा वगैरे असली तर , हा नेहमी म्हणतो ते खरं आहे की नाही ते कळेल . दुसरं , असलंच तर ती गरीब स्त्री यातून मुक्त होईल . तिसरं , या जगात खरंच अदृश्य शक्ती आहेत की नाहीत याची मीमांसा , माझ्यापुरती , होईल . मी त्याला तिथं सहज घेऊन गेलो . घराच्या पाय - या चढून जाईपर्यंत त्याला कल्पना नव्हती की आपण कुठं , कुणाला भेटायला जात आहोत , पाय-या चढून गेल्यावर लागणाच्या पडवीला बांबूच्या काठ्यांचा एक झापा , ऊनवार्यासाठी लावलेला होता . तिथंच एक बाकडं ठेवलेलं होतं . शिपाई मला म्हणाला , ' या घरात काही बाधा आहे . ' मी आश्चर्यानं बघतच राहिलो . तो म्हणाला , “ ह्या घरमालकाला बोलवा . ' तो आल्यावर शिपायानं विचारलं , “ हा झापा कोणाकडून करवून घेतला ? 'कोणी बुरूड नदीपाशी राहतो , त्याने केला . पण का ? ' त्यातली आधाराची एक पांढरी काठी त्यानं उपसली आणि म्हणाला , “ ही काठी स्मशानातून आली आहे . म्हणून घरात त्रास सुरू झालाय , ती परत स्मशानात गेली पाहिजे." मला परत आश्चर्य वाटलं . पण खात्रीसाठी बुरुडाला बोलावून घेतलं . त्यानंही सा-यांसमोर कबूल केलं की , काठी त्यानं स्मशानातूनच आणली होती . शिपाई काठी घेऊन गेला आणि बाळंतिणीचा त्रासही हळूहळू संपला . मला प्रश्न पडले : या शिपायाला या घरात त्रास आहे हे कसं कळलं ? मी त्याला तिथं नेईपर्यंत त्यांचा काहीही परिचय नव्हता . दुसरं म्हणजे काठी स्मशानातून आणली हे समजणं . ते बुरुडानं कबूल करणं . आणि त्यानंतर त्या बाईचा त्रास कमी होणं . बाईचा त्रास मानसिक असेल असं म्हटलं तरी पहिल्या दोन्ही गोष्टींची उत्तरं मिळत नाहीत . " मी जीएंना विचारले , " तुमचा विश्वास आहे काय ? " काही गुंते सुटत नाहीत . त्यात अंधविश्वासापेक्षा , मला त्यांचं आकर्षण मात्र जास्त वाटतं ! ” ते म्हणाले . जी ए : एक पोट्रेट या सुभाष अवचट यांच्या पुस्तकातून
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 07/27/2019 - 05:05 नवीन
म्हणजे यातला मी हा जीए आहे का? जीएंना गुढाविषयी आकर्षण होते. खर तर जीए हेच एक गूढ आहे. पण अशा कथेत पूर्ण चिकित्सा केली तर बर्‍याचदा त्यातल वास्तव काही वेगळच निघत.गुढाविषयी आकर्षणातून अंधश्रद्धा निर्माण होतात हे मात्र खर.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा