यातून मार्ग काय?
ही पोस्ट फेसबुकवरुन घेतली आहे.पोस्ट लिहिणारे लेखक व्यवसायानं पत्रकार आहेत.त्यांनी खेडेगावे,छोटी शहरे इथे कामानिमित्त फिरताना आलेला अनुभव मांडला आहे.
तो एमकॉम झाला.मोठ्या मुश्किलीनं नोकरीला लागला.एका पतसंस्थेत महिना सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या.
दुसरा ...तो एम.ए.बी.एड्.झाला.दहा वर्षांपूर्वी एका संस्थाचालकाला दहा लाख रूपये देऊन तो शिक्षक बनला.दहा वर्षे झाली खिशातनं पेट्रोल घालून त्यानं शाळा केली.उरलेल्या वेळेत पानपट्टी चालवली म्हणून त्याचं घर भागलं.आता त्यांची शाळा २५ टक्के अनुदानात आलीय.त्याच्या आयुष्यातला उमेदीचा काळ फुकट नोकरी करण्यात गेला.तरीही तो खूष आहे.पंधराव्या वर्षी का होईना,त्याला पूर्ण पगार मिळेल...
अशी उदाहरणं आजुबाजूला कितीतरी आहेत.
तोंडावर कसलीच रया नसलेले पण आपण कोणीतरी आहोत असा समज करून जगणारे तरूण सगळीकडे दिसतात.तोंडात काहीतरी मचमच चालू असलेले...
कोणी एम.ए.,कोणी बी.ए.,बी.एड.,डी.एड.तर कोणी पॉलिटेक्निक तर कोणी बी.ई.झालेले.असे तरूण गावोगाव शेकड्यांनी आहेत.अपवाद वगळले तर, सगळेच व्यसनाच्या आधिन.तंबाखु, गुटखा,सिगारेट,गांजा,दारू यातच यांचा दिवस जातो.ज्यांच्या बापांची आर्थिक स्थिती चांगली आहे,ती पोरं बापाच्या जीवावर मजा करताहेत...
मजा म्हणजे काय तर हेच गुटखा,गांजा,दारू....
ही पोरं काहीच काम करीत नाहीत.या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यचं नाही.शेतीकडं यावं अशी स्थिती नाही.शिवाय इथं ढोर मेहनत करावी लागते.
त्यामुळं ही पोरं आयुष्यभर अशीच जगतील...बेकार हा शिक्का कपाळी घेऊन मरतील.माझ्या समोर गावात तिशीच्या आतील सात-आठ तरूण दारू पिऊन मेली...
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला.
ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय.ती चिंता विसरायला गांजा आणि दारू हेच औषध.
ग्रामीण भागात शारीरिक कष्टाची कामं सोडली तर,दुसरी कुठलीच कामं नाहीत.या पोरांची अशी कामं करण्याची क्षमता नाही, इच्छाशक्तीही नाही.ही पोरं म्हणजे बापांसाठी ब्याद आहेत.धरलं की चावतयं,सोडलं की पळतयं,अशी बापांची अवस्था आहे.सगळे बाप कदरून गेलेत.माझ्या एका मित्रानं, व्यसनी पोराच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी,त्याच्या खुनाचा घाट घातला होता.ऐनवेळी रिक्षावाला तयार झाला नाही म्हणून तो प्लान अंमलात आला नाही.मित्रानं स्वत: हा किस्सा सांगितला,तेव्हा मी हादरून गेलो.परिस्थितीनं गांजून गेला की, माणूस किती टोकाला जाऊ शकतो,यांचं हे उदाहरण.
सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ...
तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे.
तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी, पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण.
निर्माण होतो तो अहंगंड....आपण कोणीतरी आहोत...यात रमायला आहे मोबाईल डाटा आणि दारू,गांजा.तो यांना वास्तवाची कधीच जाणीव करून देत नाही.आपलं भवितव्य काय? यांचं कोणाकडंच उत्तर नाही.तरीही समाजात सगळं काही सुरळीत सुरू आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर,मी परवा पतसंस्थेतल्या त्या एम.कॉम.मित्राला सहज भेटलो.तो बोलला,बाकी काही असो बघा, देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय...
मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही....
देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं...
सध्या फक्त वाट बघायची...
लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची..
महारुद्र मंगनाळे
------------------------------------------------------
------------------------------------------------------
आता यातल्या काही मुद्दयावर माझी मतं मांडतो.ती १००% बरोबरच आहेत असा दावा नाहीये.
सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या.
एम कॉम होऊनही सात हजाराच्या वर पगार देऊ नये इतपत सदर इसमाची पात्रता असेल तर याला किती गोष्टी जबाबदार आहेत पहा.
आपला कल कॉमर्सकडे नाही हे याला स्वत:लाही समजलं नाहीये.किंवा याला एम कॉम होईपर्यंत कुणी सांगितलेलंही दिसत नाही.किंवा सांगितलं असलं तरी याने दुर्लक्ष केलं.आता ते दुर्लक्ष का केलं? तर आपला कल नेमका कुठं आहे हे सांगणारी सक्षम यंत्रणा,सोय सदर व्यक्ती इयत्ता १० वी पास झाल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहचली नसावी किंवा हा त्या सुविधेपर्यंत पोहचला नसावा.खेडेगावातला १० वी झालेला मुलगा किंवा त्याचे पालक आपण पुढील करियरचा निर्णय कलचाचणी देऊन घ्यायला पाहिजे इतके जागृत असतात का? बरं कलचाचण्या तरी कितपत विश्वासार्ह असतात ते खालील लिंकमधे वाचा.त्यामुळे त्यावर किती अवलंबून रहावं हा ही प्रश्न आहेच.
https://www.loksatta.com/chaturang-news/aptitude-test-180674/lite/
या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यच नाही.
मान्य! सरकारी नोकरी सगळ्यांना मिळणारंच नाही.पण सरकारी नोकरीत 'असं काहीतरी' नक्की असावं ज्यामुळे ही अपेक्षा होत असावी.नाही का? सरकारी नोकरी असली की लग्न पटकन होतं.(अपवाद क्षमस्व!)
शासकीय नोकरीमुळे स्थिरता,आर्थिक सुरक्षितता त्या अनुषंगाने येणारं चांगलं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा फायदे आहेतच की! ते कसे नाकारणार? की चांगलं मानसिक स्वास्थ्य ही गोष्ट तितकी महत्त्वाची नाहीये?
खाजगी नोकरीत इतकं मानसिक स्वास्थ्य असतं का? सरकारी नोकरीइतकी सुरक्षितता,स्थिरता असते का?कधीही निरोप दिला जाण्याची शक्यता खाजगी नोकरीत अधिक नाही का? किमान वेजेसचा नियम कारखान्यांमधे पाळला जातो का?
स्वत:चा व्यवसाय हा सुद्धा मार्ग आहे पण सुरु केलेला प्रत्येक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो का? व्यवसाय करणं इतकं सोपं असतं का? शिवाय लग्न हा मुद्दा लक्षात घेता छोट्या व्यवसायिकाच्या तुलनेत वरच्या पदावरचा सरकारी नोकरदार मुलीच्या आईवडिलांना जास्त भावला तर ते चूक कसं?
खाजगी नोकरीतही किरकोळ पगाराच्या नोकर्या भरपूर उपलब्ध आहेत.पण चांगल्या किंवा जास्त पगाराची अपेक्षा ठेवणं हे चूक कसं? तितका पगार देण्याइतपत घेतलेल्या उच्च शिक्षणात 'दम' नसेल तर असे अभ्यासक्रम सुधारणं किंवा बंद करणं ही शासनाची जबाबदारी नाही का?
हेच अभ्यासक्रम मोठ्या शहरातल्या टॉपच्या संस्थेतून पूर्ण केल्याने चांगल्या नोकरीची हमी मिळते.पण अशा संस्थांनाही विद्यार्थी संख्येचे बंधन असतेच.सगळेच तिथे शिकायला जाऊ शकत नाहीत.शिवाय काही धनदांडगे लोक पैशाच्या जोरावर आपल्या 'सुमार बुद्धीच्या' पाल्यासाठी सीटस विकत घेण्याची शक्यताही आहेच.सर्वांना हे शक्यही नाही आणि समाजविघातकही आहेच.
मग यातून बोध काय घ्यावा? खेड्यातल्या,छोट्या शहरातल्या लोकांनी,गरीबांनी अशा दर्जेदार,नामांकित संस्थामधून शिक्षण घेण्याचा विचार सोडून द्यावा का?पण महागाई मात्र सगळ्यांना समान आहे.त्याचं काय करणार?महागाईला तोंड देऊन चार पैसे खिशात शिल्लक राहणं गरजेचं आहे.समाजाच्या दृष्टीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब या कॅटॅगिरीत गेलात की लग्नाबिग्नाचा विचार मनातून काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.किंबहूना हेच वास्तव आहे.
यावरुन नोकरी सरकारी असली तर चांगलीच पण खाजगी असली तरी ती भरपूर पगारवाली असणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल.
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला.
ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय.
लग्न होणं हीच आयुष्याची 'इतिकर्तव्यता' आहे का? तर हो! बर्याचजणांबाबत ती निदान गरज तरी आहे हे तरीे नाकारता येणार नाही.शिवाय यात गैर असं काहीच नाही.
सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ...
तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे.
हे वाचल्यावर केवळ कष्टाची मनापासून तयारी असणं हे सुद्धा तितकं पुरेसं नाहीये हे नीट ध्यानात येईल.बाजारात कामही हवं.
तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी,पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण.
निर्माण होतो तो अहंगंड...
शिक्षण घेणारे सगळे असेच होतात का स्वभावानं,वृत्तीनं?
यात रमायला आहे मोबाईल डाटा.
सध्या म्हणे युट्युब हा एक चांगला गुरु आहे.वापर कसा करायचा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे.
देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय...
मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही....
देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं...
सध्या फक्त वाट बघायची...
लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची..
यात लेखकानं आपला राजकीय द्वेष व्यक्त केलाय असं मला तरी वाटलं.सध्याच्या अवस्थेला केवळ ५ वर्षांपूर्वी आलेलं सरकारंच तेवढं जबाबदार कसं? हे काही समजलं नाही.
शेवटचा राजकीय विद्वेष वगळला तरी परिस्थितीचं वर्णन बर्यापैकी वास्तव दर्शवणारं आहे.व्यसंनांचं समर्थन कदापि नाही.तो यातून बाहेर पडायचा मार्ग खचितच नव्हे.
प्रत्येकाला पुणे-मुंबई-ठाणे गाठणं शक्य नाही.तिथल्या राहण्याच्या ठिकाणांची भाडी,घरांच्या किंमती पाहता ते कितपत 'परवडेल' हा प्रश्नच आहे.कारण मिळालेला सगळा पैसा घरावरच खर्च होणार असेल तर मुंपुठात येऊन फायदा काय?
पण मग यातून मार्ग काय? तिढा सुटावा कसा? मांडा आपापले विचार,आपले अनुभव. _/\_
कोणत्याही अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा भाग अधिक असणे हे ती अर्थव्यवस्था कधीही धोक्यात येऊ शकते याचे द्योतक आहे . भारताची अर्थव्य वस्था अशीच आहे ! ती फुगलेली आहे. कारण सेवा क्षेत्र माणसाची सोय वाढविते साधन संपत्ती नाही.खाजगी सेवा आपण तेव्हाच स्विकारतो, जेव्हा आपल्याकडे तिच्यासाठी मोजायचे पैसे असतात आणि/किंवा ते काम करायची आपली इच्छा नसते किंवा ते काम आपण स्वतः करू शकत नाही. सरकारी सेवा बहुदा आवश्यक सेवा असतात आणि त्या जनतेच्या भल्याकडे पाहून निर्माण केल्या जातात. त्याविरुद्ध, सर्व खाजगी सेवा मागणी-आणि-पुरवठा तत्वावरच निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे, खाजगी सेवा क्षेत्र आपणहून लहान-मोठे होत नाही किंवा करता येत नाही. ते विकास-समृद्धीच्या (पक्षी : जनतेच्या हाती खेळणार्या पैश्याचा) बरोबरीने लहान-मोठे होत जाते. उदाहरणार्थ, अमेरिकेतिल "खाजगी सेवाक्षेत्राची" उलाढाल सुमारे युएस$१० ट्रिलियन आहे. हे प्रमाण तेथिल "सकल (उत्पादन + सेवा) खाजगी क्षेत्र उलाढालीच्या (खाजगी जीडीपी)" सुमारे ८०% आहे. (संदर्भ : THE SERVICES SECTOR: HOW BEST TO MEASURE IT?) हाच प्रकार सर्व लहान मोठ्या विकसित देशांत दिसून येईल. त्या मानाने, भारतिय सेवाक्षेत्राचा जीडीपीतिल हिस्सा केवळ ७.३९% आहे (http://statisticstimes.com/economy/sectorwise-gdp-contribution-of-india.php). जसजशी भारतिय अर्थव्यवस्था (आणि दर माणशी उत्पन्न) वाढत जाईल , तसतसा सेवा क्षेत्राचा टक्का वाढत जाईल. इथे हे ल़षात घ्यायला पाहिजे की, अर्थव्यवस्था कितीही वाढली आणि लोकांच्या हाती कितीही जास्त पैसा खेळू लागला तरी, सर्वसामान्य माणसाच्या उत्पादन (घर, गाडी, एसी, फ्रिज, इ) विकत घेण्यावर मर्यादा असते व बहुतेक उत्पादने अनेक वर्षे काम देत राहतात. सेवा क्षेत्राच्या बाबतीत असे होत नाही... दर दिवशी अथवा वर्षातून अनेकदा दर वेळेस नवीन सेवा घेता येते... उदा : रेस्तराँमध्ये जाणे, सहलीला जाणे, मोबाईल सेवा, घरपोच वाणसामान/वस्तू/जेवण मागवणे, घरकाम, देखभाल, इ. त्यामुळे, उत्पादन क्षेत्राला एका ठराविक मुदतीनंतर स्थिरतेला (स्टॅग्नेशन) तोंड द्यावे लागते. ती समस्या सेवा क्षेत्रात लवकर येत नाही.प्रथम उत्पादन क्षेत्रात संपृक्तता येऊन तेथील रोजगार कमी होईलहे दर वेळेस आणि आता वाटते तेवढ्या तीव्रतेने होईलच असे नाही... इतिहास असे सांगतो कि तसे फार तीव्रतेने आणि किंवा फार काळ होत नाही. अश्या प्रत्येक क्रांतिकारी बदलामुळे, उत्पादन व्यवस्थेवर आणि त्यातील मानवी संसाधनावर परिणाम झालेले आहेत. परंतू, नवीन व्यवस्था नवीन संधी निर्माण करते आणि मानवी कल्पनाशक्ती त्यातून तगून जाण्याचे अनेक (बर्याचदा अधिक चांगले) यशस्वी मार्ग काढते असा अनुभव आहे. हे इतिहातात बर्याचदा घडलेले आहेत. त्यातील काही महत्वाचे बदल असे म्हणता येतील... १. शिकारी आणि नैसर्गिक स्त्रोतांपासून अन्न गोळा करण्याची (हंटर-गॅदरर) जीवनशैली ---> शेतीव्यवस्थेवर आधारलेली जीवनशैली २. केवळ मानवी आणि/किंवा प्राण्यांची क्रयशक्ती वापरून काम करणे ---> यंत्रे वापरून कामे करणे ३. यांत्रिक क्रांती ---> संगणकिय क्रांती एक क्रमांकाच्या बदलामध्ये झालेल्या विरोध आणि/किंवा काळजीबद्दल लिखित-ऐकीव पुरावे नाहीत. पण, इतर दोन बदलांमध्ये, "आता जुनी कौशल्ये असलेल्या माणसांचे काय? त्यांच्या जीवनाची साधने नाहीशी झाल्यामुले ते बेरोजगार होऊन भुके मरतील अशी मोठी हाकाटी झाली... वेळप्रसंगी ते बदल होऊ नयेत यासाठी जोराचे प्रयत्नही झाले. हा विरोध बहुतांशी, 'अज्ञात भविष्याची काळजी' आणि/किंवा 'जुन्या व्यवस्थेत पक्के झालेल्या हितसंबंधाना बाधा', या कारणांनी होता. नवीन बदलांमुळे होणार्या मानवी जीवनाचा विकासामुळे मिळणार्या फायद्यांच्या रेटा, त्या विरोधावर नेहमीच मात करत राहीला आहे. तसे झाले आणि ते फायदे दिसू लागले की विरोध करणारे लोकही त्या फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करण्यामागे लागतात ! :) हे एक प्रकारे, निसर्गाच्या निवडीचा (Survival of the fittest) भाग आहे... त्यामध्ये फरक इतकाच की, आता फक्त 'नैसर्गिक बदल' हाच एक घटक न राहता, त्यात 'मानवी बुद्धीने घडवलेले बदल' हा एक घटक सामील झाला आहे... आणि तो दिवसे दिवस जास्त, जास्त सबळ बनत चालला आहे. थोडक्यात, भविष्याबद्दल निराश/नकारात्मक होण्याइतके मानवी बुद्धीला कमी लेखायला नको. तिच्यातल्या लोभ-लालचेमुळे तिने मानवाला अनेकदा अडचणीत आणण्यात आले आहे. मात्र, स्वतःच्या जीवनाबद्दलच्या त्याच लोभ-लालचेने (ज्याला आपण स्वसंरक्षण किंवा self preservation म्हणतो) मानवाला दर वेळेस त्या अडचणींतून बाहेर काढले आहे... किंबहुना, पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या अवस्थेत आणून सोडलेले आहे.