Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

यातून मार्ग काय?

उ
उपयोजक
Tue, 06/25/2019 - 19:11
🗣 111 प्रतिसाद
ही पोस्ट फेसबुकवरुन घेतली आहे.पोस्ट लिहिणारे लेखक व्यवसायानं पत्रकार आहेत.त्यांनी खेडेगावे,छोटी शहरे इथे कामानिमित्त फिरताना आलेला अनुभव मांडला आहे. तो एमकॉम झाला.मोठ्या मुश्किलीनं नोकरीला लागला.एका पतसंस्थेत महिना सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. दुसरा ...तो एम.ए.बी.एड्.झाला.दहा वर्षांपूर्वी एका संस्थाचालकाला दहा लाख रूपये देऊन तो शिक्षक बनला.दहा वर्षे झाली खिशातनं पेट्रोल घालून त्यानं शाळा केली.उरलेल्या वेळेत पानपट्टी चालवली म्हणून त्याचं घर भागलं.आता त्यांची शाळा २५ टक्के अनुदानात आलीय.त्याच्या आयुष्यातला उमेदीचा काळ फुकट नोकरी करण्यात गेला.तरीही तो खूष आहे.पंधराव्या वर्षी का होईना,त्याला पूर्ण पगार मिळेल... अशी उदाहरणं आजुबाजूला कितीतरी आहेत. तोंडावर कसलीच रया नसलेले पण आपण कोणीतरी आहोत असा समज करून जगणारे तरूण सगळीकडे दिसतात.तोंडात काहीतरी मचमच चालू असलेले... कोणी एम.ए.,कोणी बी.ए.,बी.एड.,डी.एड.तर कोणी पॉलिटेक्निक तर कोणी बी.ई.झालेले.असे तरूण गावोगाव शेकड्यांनी आहेत.अपवाद वगळले तर, सगळेच व्यसनाच्या आधिन.तंबाखु, गुटखा,सिगारेट,गांजा,दारू यातच यांचा दिवस जातो.ज्यांच्या बापांची आर्थिक स्थिती चांगली आहे,ती पोरं बापाच्या जीवावर मजा करताहेत... मजा म्हणजे काय तर हेच गुटखा,गांजा,दारू.... ही पोरं काहीच काम करीत नाहीत.या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यचं नाही.शेतीकडं यावं अशी स्थिती नाही.शिवाय इथं ढोर मेहनत करावी लागते. त्यामुळं ही पोरं आयुष्यभर अशीच जगतील...बेकार हा शिक्का कपाळी घेऊन मरतील.माझ्या समोर गावात तिशीच्या आतील सात-आठ तरूण दारू पिऊन मेली... ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय.ती चिंता विसरायला गांजा आणि दारू हेच औषध. ग्रामीण भागात शारीरिक कष्टाची कामं सोडली तर,दुसरी कुठलीच कामं नाहीत.या पोरांची अशी कामं करण्याची क्षमता नाही, इच्छाशक्तीही नाही.ही पोरं म्हणजे बापांसाठी ब्याद आहेत.धरलं की चावतयं,सोडलं की पळतयं,अशी बापांची अवस्था आहे.सगळे बाप कदरून गेलेत.माझ्या एका मित्रानं, व्यसनी पोराच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी,त्याच्या खुनाचा घाट घातला होता.ऐनवेळी रिक्षावाला तयार झाला नाही म्हणून तो प्लान अंमलात आला नाही.मित्रानं स्वत: हा किस्सा सांगितला,तेव्हा मी हादरून गेलो.परिस्थितीनं गांजून गेला की, माणूस किती टोकाला जाऊ शकतो,यांचं हे उदाहरण. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ... तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे. तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी, पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड....आपण कोणीतरी आहोत...यात रमायला आहे मोबाईल डाटा आणि दारू,गांजा.तो यांना वास्तवाची कधीच जाणीव करून देत नाही.आपलं भवितव्य काय? यांचं कोणाकडंच उत्तर नाही.तरीही समाजात सगळं काही सुरळीत सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर,मी परवा पतसंस्थेतल्या त्या एम.कॉम.मित्राला सहज भेटलो.तो बोलला,बाकी काही असो बघा, देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय... मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही.... देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं... सध्या फक्त वाट बघायची... लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची.. महारुद्र मंगनाळे ------------------------------------------------------ ------------------------------------------------------ आता यातल्या काही मुद्दयावर माझी मतं मांडतो.ती १००% बरोबरच आहेत असा दावा नाहीये. सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. एम कॉम होऊनही सात हजाराच्या वर पगार देऊ नये इतपत सदर इसमाची पात्रता असेल तर याला किती गोष्टी जबाबदार आहेत पहा. आपला कल कॉमर्सकडे नाही हे याला स्वत:लाही समजलं नाहीये.किंवा याला एम कॉम होईपर्यंत कुणी सांगितलेलंही दिसत नाही.किंवा सांगितलं असलं तरी याने दुर्लक्ष केलं.आता ते दुर्लक्ष का केलं? तर आपला कल नेमका कुठं आहे हे सांगणारी सक्षम यंत्रणा,सोय सदर व्यक्ती इयत्ता १० वी पास झाल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहचली नसावी किंवा हा त्या सुविधेपर्यंत पोहचला नसावा.खेडेगावातला १० वी झालेला मुलगा किंवा त्याचे पालक आपण पुढील करियरचा निर्णय कलचाचणी देऊन घ्यायला पाहिजे इतके जागृत असतात का? बरं कलचाचण्या तरी कितपत विश्वासार्ह असतात ते खालील लिंकमधे वाचा.त्यामुळे त्यावर किती अवलंबून रहावं हा ही प्रश्न आहेच. https://www.loksatta.com/chaturang-news/aptitude-test-180674/lite/ या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यच नाही. मान्य! सरकारी नोकरी सगळ्यांना मिळणारंच नाही.पण सरकारी नोकरीत 'असं काहीतरी' नक्की असावं ज्यामुळे ही अपेक्षा होत असावी.नाही का? सरकारी नोकरी असली की लग्न पटकन होतं.(अपवाद क्षमस्व!) शासकीय नोकरीमुळे स्थिरता,आर्थिक सुरक्षितता त्या अनुषंगाने येणारं चांगलं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा फायदे आहेतच की! ते कसे नाकारणार? की चांगलं मानसिक स्वास्थ्य ही गोष्ट तितकी महत्त्वाची नाहीये? खाजगी नोकरीत इतकं मानसिक स्वास्थ्य असतं का? सरकारी नोकरीइतकी सुरक्षितता,स्थिरता असते का?कधीही निरोप दिला जाण्याची शक्यता खाजगी नोकरीत अधिक नाही का? किमान वेजेसचा नियम कारखान्यांमधे पाळला जातो का? स्वत:चा व्यवसाय हा सुद्धा मार्ग आहे पण सुरु केलेला प्रत्येक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो का? व्यवसाय करणं इतकं सोपं असतं का? शिवाय लग्न हा मुद्दा लक्षात घेता छोट्या व्यवसायिकाच्या तुलनेत वरच्या पदावरचा सरकारी नोकरदार मुलीच्या आईवडिलांना जास्त भावला तर ते चूक कसं? खाजगी नोकरीतही किरकोळ पगाराच्या नोकर्‍या भरपूर उपलब्ध आहेत.पण चांगल्या किंवा जास्त पगाराची अपेक्षा ठेवणं हे चूक कसं? तितका पगार देण्याइतपत घेतलेल्या उच्च शिक्षणात 'दम' नसेल तर असे अभ्यासक्रम सुधारणं किंवा बंद करणं ही शासनाची जबाबदारी नाही का? हेच अभ्यासक्रम मोठ्या शहरातल्या टॉपच्या संस्थेतून पूर्ण केल्याने चांगल्या नोकरीची हमी मिळते.पण अशा संस्थांनाही विद्यार्थी संख्येचे बंधन असतेच.सगळेच तिथे शिकायला जाऊ शकत नाहीत.शिवाय काही धनदांडगे लोक पैशाच्या जोरावर आपल्या 'सुमार बुद्धीच्या' पाल्यासाठी सीटस विकत घेण्याची शक्यताही आहेच.सर्वांना हे शक्यही नाही आणि समाजविघातकही आहेच. मग यातून बोध काय घ्यावा? खेड्यातल्या,छोट्या शहरातल्या लोकांनी,गरीबांनी अशा दर्जेदार,नामांकित संस्थामधून शिक्षण घेण्याचा विचार सोडून द्यावा का?पण महागाई मात्र सगळ्यांना समान आहे.त्याचं काय करणार?महागाईला तोंड देऊन चार पैसे खिशात शिल्लक राहणं गरजेचं आहे.समाजाच्या दृष्टीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब या कॅटॅगिरीत गेलात की लग्नाबिग्नाचा विचार मनातून काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.किंबहूना हेच वास्तव आहे. यावरुन नोकरी सरकारी असली तर चांगलीच पण खाजगी असली तरी ती भरपूर पगारवाली असणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय. लग्न होणं हीच आयुष्याची 'इतिकर्तव्यता' आहे का? तर हो! बर्‍याचजणांबाबत ती निदान गरज तरी आहे हे तरीे नाकारता येणार नाही.शिवाय यात गैर असं काहीच नाही. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ... तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे. हे वाचल्यावर केवळ कष्टाची मनापासून तयारी असणं हे सुद्धा तितकं पुरेसं नाहीये हे नीट ध्यानात येईल.बाजारात कामही हवं. तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी,पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड... शिक्षण घेणारे सगळे असेच होतात का स्वभावानं,वृत्तीनं? यात रमायला आहे मोबाईल डाटा. सध्या म्हणे युट्युब हा एक चांगला गुरु आहे.वापर कसा करायचा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे. देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय... मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही.... देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं... सध्या फक्त वाट बघायची... लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची.. यात लेखकानं आपला राजकीय द्वेष व्यक्त केलाय असं मला तरी वाटलं.सध्याच्या अवस्थेला केवळ ५ वर्षांपूर्वी आलेलं सरकारंच तेवढं जबाबदार कसं? हे काही समजलं नाही. शेवटचा राजकीय विद्वेष वगळला तरी परिस्थितीचं वर्णन बर्‍यापैकी वास्तव दर्शवणारं आहे.व्यसंनांचं समर्थन कदापि नाही.तो यातून बाहेर पडायचा मार्ग खचितच नव्हे. प्रत्येकाला पुणे-मुंबई-ठाणे गाठणं शक्य नाही.तिथल्या राहण्याच्या ठिकाणांची भाडी,घरांच्या किंमती पाहता ते कितपत 'परवडेल' हा प्रश्नच आहे.कारण मिळालेला सगळा पैसा घरावरच खर्च होणार असेल तर मुंपुठात येऊन फायदा काय? पण मग यातून मार्ग काय? तिढा सुटावा कसा? मांडा आपापले विचार,आपले अनुभव. _/\_

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55220 views

🗣 चर्चा (111)
च
चौकस२१२ Mon, 07/01/2019 - 05:04 नवीन
यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्या जातील किंवा अजिबात जाणार नाहीत हि दोन टोकं शक्य नाहीत अर्थात हे सर्व हे यांत्रिकीकरण कोणत्या समाजात ( देशात) आणि कोणत्या क्षेत्रात घडत आहे यावर अवलंबून नाही का? सर्वांसकट ( ब्लॅंकेट स्टेटमेनेट) करणे कितीपत योग्य आहे? कोणता देश / समाज असा जर विचार केला तर : सर्वसाधारण ढोबळ मानाने असे म्हणता येईल कि जिथे अति लोकसंख्या आणि गरीबी असे दोन्ही आहे तिथे यांत्रिकीकरणाचा त्रास जास्त होणार, कितीतरी उदाहरणार्थ : इमारतीकचे स्लॅब करण्यासाठी घमेलं आणि बांबू च्या शिड्या ( SCAFOLDING ) वापरून शेकडोंनी रोजगार कि काँक्रिट पंप वापरून थोड्यांना रोजगार? विटा भट्टीतून विटा पॅलेट वरून वाहतूक करून न्यायाच्या कि अख्खा ट्रक मजुरांनी नि डॉक्व्यावरून वाहवायच्या? काही ठिकाणी यांत्रिकरण हा उत्तम पर्याय असतो पण काही ठिकाणी नाही प्रगत देशात बहू उत्पादन क्षेत्रात ( मास प्रोडूकशन ) एखाद्या गोष्टीला चकचकीत पणा आणण्यासाठी ते हाताने घासावे लागते त्याला ताशी मनुष्यबळ दराने करायचे तर परवडणार नाही पण असे पोलिश करायचे मात्र स्थानिक च मग करणार कसे? [अर्देशातून अख्खा सुटत बग आणणे काही कारणाने शक्य नाहीये असे असेल तर? उदाहरण : - दरवाजाचे हॅण्डल; ( मूठ) झिंक ओतणे ( डाय कास्टिंग )> त्याचे मशीनिंग करणे > त्याला पॉलिशिंग करणे आणि त्याला मुलामा ( प्लेटिंग ) प्लांट च्या रॅक वर लावणे हे सर्व विविध रोबो वापरून केले जाते, - परंतु या डाय कास्टिंग चा जो साचा असतो त्याला आतून जो ठराविक दर्जाचा चकचकीत पणा लागतो तिथे विविध प्रकारच्या पोलिश कागद आणि फाईल वापरवाय लागतो त्याचे यांत्रिकरण अजून अवघड आहे तिथे टूल मेकरच लागतो. यांत्रिकीकरण अर्थात हे काही फक्त उत्पादन क्षेत्रात च आहे असे नाही , वैद्यकीय , रचना ( DESIGN ) क्षेत्रात हि होत आहे एक मित्र यूरोपात अति उच्च ( फेरारी, एरबस, मर्सिडिस ) वगैरे लोकांबरोबर काम करतो, मेकॅनिकल DESIGN मध्ये , गाडीच्या वायपर कुठे असावा याचे नियम हे गोळा करून त्या "निर्णयाचे" यांत्रिकरण केले आहे, अशी अनेक उदाहरणे आहेत आधी लोकांनी यावर केलेली सर्व चर्चा रोचक आहे ,
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 07/02/2019 - 05:48 नवीन
एका अंदाजानुसार ( आत्ता नक्की संदर्भ देता येत नाही ) २१३० पर्यंत जगातील ४० टकके लॊकांना आपला जॉब गमवावा लागेल ! माझ्या मते अमेरिका फर्स्ट ही त्याची एक सुरुवात आहे . ब्रिटन ला बाहेर पडायचे आहे याचा संबंध सर्व्हायव्हल शी असू शकेल . १९४० ते २०१० या काळात अनेक लोक हे फक्त कारकुनी स्वरूपाची कामे करीत होते. त्या पैकी अनेक जागा आता भरल्या जाणारच नाहीत . अर्थात संगणक आल्यावर स्टेशनरी , प्रिंटर यांचा व्यवसाय निर्माण झाला असे प्रत्येक क्षेत्रात होऊन काही प्रमाणात रोजगाराची शक्यता चालू राहिलच यात शंका नाही . त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्या जातील किंवा अजिबात जाणार नाहीत हि दोन टोकं शक्य नाहीत या तुमच्या विधानाला मी दाद देतो. धान्य महाग झाले तर मासेमारी जोरात येईल व अन्नास पर्याय उत्पन्न होईल असेही काहीतरी घडेल . आपण म्हणता त्यानुसार बेकारीची कुऱ्हाड ही कोणत्या देशावर पडेल हे ही महत्वाचे आहेच . जिथे लोकसंख्या बेसुमार आहे तिथे लोकांना कमी मुले निर्माण करणे किंवा परदेशी स्थलांतर करणे एवढेच उपाय राहातील . पैकी परदेशी नागरिकत्व मिळविणे म्हणजे काही मेथीची भाजी आणणे नव्हे . आता विकसनशील देशानाही यांत्रिक प्रगती पासून फारकत घेऊन मुद्धामहोऊन रोजगार टिकविणे सर्रास शक्य होणार नाही . वाढत्या लोकसंख्या च्या हिशेबाने जरी भारतात ए टी एम आली असली तरी त्यात काही आर्थिक फायदा आहे की नाही हे बँकेचे कॉस्टिंग तपासून पाहिले जाईलच . एकूणात कॉस्ट अकौंटन्सीचा जोर सर्व ठिकाणी राहाणार . त्याचा परिमाण रोजगारावर होणार .
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 07/02/2019 - 05:49 नवीन
वर २१३० ऐवजी २०३० असे वाचावे !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/01/2019 - 07:13 नवीन
एक माणूस फॅक्टरी असू नाही तर ऑफिस विविध प्रकारची कामे करू शकतो . तो साफसफाई करू शकतो ,ड्रायव्हिंग सुधा करू शकतो,computer var kam sudha Karu शकतो. पण ही सर्व काम करायला विविध प्रकारची यंत्रे लागतील. माणूस हा विविध काम करण्या बाबत रोबोट chya खूप पुढे आहे . हे माणसाचे बलस्थान च आहे
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 07/01/2019 - 15:24 नवीन
बर्याच दिवसांनी एक सकस चर्चा झाली. सर्वांनी खूप चांगले मुद्दे मांडले अाहेत. हा विषय युवाल हरारीच्या होमो ड्युअाॅस या पुस्तकात अतिशय सर्वंकषपणे मांडलेला अाहे. त्यात त्याने एक ‘यूसलेस’ क्लास तयार होईल अशी शक्यता वर्तवली अाहे. अायुष्याचा अर्थ काय? हे नव्या पिढीला सतत शोधत रहावे लागेल. तत्वज्ञान हा विषय अात्तापर्यंत खूप लोकांनी अाॅप्शनला टाकला होता, तो महत्वाचा ठरू शकेल असे तो म्हणतो. अत्यंत वाचनीय पुस्तक.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 07/02/2019 - 15:10 नवीन
यांत्रिकी करण हे मानवी सुखासाठी आहे . पण त्या मुळे यंत्र माणसालाच replace Karu लागली तर मानव जातीचा फायदा न होता खूप मोठा तोटा होईल . ही अस्वस्थ लोक बाकी संपन्न लोकांना सुखाने जगू देणार नाहीत . त्या साठी गरीब हटाव ही मोहीम हाती घ्यावी लागेल आणि त्यात बेरोजगार गरीब जिंकेल की यांत्रिकारण चे समर्धक जिंकतील हे काळच ठरवेल. यांत्रिकी कारण पर्यावरणाची नक्कीच हानी करेल. निसर्ग ग्रीन हाऊस gas chya दुष्परिणाम मुळे मानव वर संकटाची अनेक प्रसंग आणेल . आणि त्या पुढे मानव कधीच जिंकू शकणार नाही. किती ही प्रगत झाले तरी ऑक्सिजन,पाणी, अन्न हैच मूलभूत गरजा असतील . आणि त्या गरजा पूर्ण होण्यासाठी निसर्ग शिवाय कोणताच मार्ग नसेल . दलदली मध्ये माणूस जेवढं बाहेर निघायचं प्रयत्न करतो तेवढं जास्त तो दलदली त फसतो अशी अवस्था माणसाची होईल . विविध रोग, व्हायरस चे आक्रमण,असे विविध अडचणी येतील . त्या मुळे enough is enough ase समजून वाटचाल करायला हवी
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 07/03/2019 - 10:53 नवीन
ज्या संस्थेतून शिकला ती निकृष्ट दर्जाची आहे की याच्या अपेक्षाच जास्त होत्या? https://www.loksatta.com/desh-videsh-news/iit-hyderabads-student-suicide-due-to-not-getting-good-job-aau-85-1923866/
  • Log in or register to post comments
झ
झेन Wed, 07/03/2019 - 16:07 नवीन
संस्था निकृष्ट म्हणणे जनरलायझेशन होईल. “Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference.” हे शिकवल पाहिजे, कुणाचाही असा जिव जाणं.....
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/03/2019 - 16:20 नवीन
इतक्या मोठ्या संस्थेत पोहोचू शकलास, लाखात एक संधी मिळाली, आईबापांनी खूप खस्ता खाल्ल्यात, आता सर्व आशा तुझ्यावर आहेत... परतीचे दोर कापलेत, ... ऊर्फ इथून पुढे हरण्याचा , कमी पडण्याचा ऑप्शन तुला शिल्लकच नाही.. अशा परिस्थितीची इतकी खात्री मनोमन पटली असावी की पूर्ण एकटा पडून हाराकीरी केली असावी. इंग्रजी बातमीत दिलेल्या मजकुरानुसार हेच जाणवतं. इतकी भारी संस्था, इतके भारी लोक इ इ. म्हणजे असं सर्व असूनही मी घरच्यांना यश देऊ शकलो नाही अशी अपराधी भावना जाणवते. इतर साध्या कॉलेजपेक्षा आय आय टी वगैरे संस्थेत त्या संस्थेच्या नावाच्या दबदब्यामुळे हे ओझं "पॉईंट ऑफ नो रिटर्न"ला पोचत असावं. अनेक मेडिकल स्टुडंट्सबाबतही असं जाणवतं बातम्या वाचून.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 07/04/2019 - 15:24 नवीन
https://www.moneycontrol.com/news/technology/auto/job-loss-series-part-1-situation-dire-for-auto-industry-especially-dealers-4155351.html https://www.moneycontrol.com/news/business/economy/job-series-part-2-no-generalists-please-say-insurers-4158921.html https://www.google.com/amp/s/www.moneycontrol.com/news/business/job-series-part-3-more-engineers-with-no-skills-4161591.html/amp https://www.moneycontrol.com/news/business/companies/job-series-part-4-how-indian-pharma-companies-are-helping-aspirants-get-jobs-4147371.html
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Fri, 02/14/2020 - 09:32 नवीन
मुळात कोणतीही activity न करता, काय करू, सांगाल ते करतो असे म्हणणारे बरेच आहेत, पण प्रत्यक्षात काम करतांना मनलावुन किंवा चिकाटीचा खुप अभाव असतो.... असो आश्या तरूणांना एकच सल्ला देतो, जे काम त्यांना आवडतं त्या कामाची सखोलं माहिती घ्यावी त्याच मास्टर की मिळवावी (pg degree नव्हे ......निपुनता) , मग त्यासाठी जेथे जावे लागेल तेथे जावे, then after money will start following him सध्या इतकचं
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा