अंदाज तुमचा, आमचा, मिपाकरांचा.
आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा.
स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं?
बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद!
माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल.
शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा.
तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.
म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू आता' अशा स्टाइलमध्ये.या स्टाईलबद्दल फार काही बोलणार नाहीये. :) पण मतदानाचा टक्का जास्त घसरला तर काय होतं ते पहायला हरकत नाही. ३% पर्यंत अनुत्साह म्हणजे जे चाललंय ते बर चाललंय. पण ही टक्केवारी त्यापेक्षा जास्त व्हायला लागले तर समीकरणे बिघडायला लागू शकतात. जे चाललंय त्या बाजूची लोकं पण आता मतदान करत नाहीयेत असाही अर्थ निघायला लागतो. पण तरीही नापसंती व निरूत्साह ह्या दोन्ही वेगवेगळ्या प्रेरणा आहेत. निरूत्साह हा आळस आहे. तर नापसंती हा राग आहे. नापसंतीसाठी हल्ली मतदार नोटाचा वापर करू लागली आहेत. मला वाटते राजस्थान व मध्यप्रदेशमधे लोकांनी नोटा वापरला. ती नापसंती होती. जर ती सुविधा नसती तर ती लोकं घरीच बसली असती व टक्केवारी खाली आली असती. पण हा निरूत्साह होता की नापसंती ह्याबाबत मग ठामपणे बोलता आले नसते. शेवटी हे सारे तर्क असतात. कोट्यावधी लोकांना असं साचेबंद नियमात कोणीच बसवू शकत नाही. निरूत्साहामुळे ( म्हणजे आळसामुळे) टक्केवारी खूप कमी झाल्यावर काय होते? यासाठी योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यावर काय झाले ते पहायला मजा येते. गोरखपूरमधे २०१४ ला ५४.६६% मतदान झालेले होते. त्यावेळेस योगी आदित्यनाथ यांनी ३ लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती. पण २०१८ च्या मार्च मधे झालेल्या पोटनिवडणूकीत हेच मतदान अवघे ४३% झाले. ११.६६% मतदान निरूत्साहामुळे झाले नाही. परिणाम असा झाला की ३ लाखांची पिछाडी भरून काढून प्रविणकुमार निषाद २२००० मतांनी निवडून आले. याचा खूप मोठा गवगवा झाला. हा निरूत्साह नसून नापसंती असल्याचे भासवण्याचा खूप प्रयास झाला. त्यासाठी मायावतींनी पाठींबा दिल्यामुळे हे यश मिळाले वगैरे वगैरे बरेच काही म्हटले गेले. प्रत्यक्षात मायावती कधी पोटनिवडणूक लढवत नाहीत. :) पण आकडेवारी असं सांगते की भाजपाला मत देणारी दोन लाख सत्तावीस हजार लोकं घराबाहेरच पडली नाहीत. याच कारण फक्त आळस. लोकांचाही व नेते मंडळींचाही. योगी आदित्यनाथांनीही ते नंतर कबूल केले. योगी आदित्यनाथ फक्त देव देव करणारा, पूजा पाठ करणारा माणूस नाहीये. इंजिनीअर आहे तो. असो. एवढा आळस असूनही भाजप सपा+बसपा विरूध्द जिंकला असता. पण प्रविण कुमार निषाद हे समाजवादी पार्टीचे नाहीयेत. त्यांची निषाद पार्टी आहे व ती त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली आहे. उत्तरप्रदेशात यादवांच्या नंतर निषाद ही सर्वात मोठी जमात आहे. त्यामुळे त्यांची स्वत:ची अशी हक्काची मते आहेत. हे निषाद यावेळेस समाजवादी पार्टी तर्फे उभे राहिले त्यामुळे यादव + निषाद अशी मतांची बेरीज होऊन ते निवडून आले. पण श्रेय मात्र मिडियाने सपा+बसपा ला देऊन टाकले. प्रत्यक्षात निषाद हे आयात उमेदवार होते हे मिडियाने बाहेर येऊच दिले नाही. तर असे हे निषाद सपा बरोबर किती राहतील? :) असो.