मरणावरती बोलू काही
तर मिपाकरांनो , आज आपण सर्व एका आगळ्यावेगळ्या , काही प्रमाणात नकोश्या वाटणाऱ्या या मरणावर बोलूयात . कदाचित हा विषय , मला माहित नाही पण याआधी इथे चर्चिला गेलाही असेल पण मी बोका साहेब गेल्यापासून ते आजपर्यंत तोच विचार मनात घोळवत आलोय ...
जगण्याचं कारण इथे प्रत्येकाकडे असतं किंबहुना ते असावंच लागतं, तेव्हा कुठे जगणं जीवन बनतं . पण मरणाबद्दल काय ? त्याच्या बद्दल कुणाकुणाला काय वाटतं ..
मला विचाराल तर मला मरणाकडून फार सुंदर अपेक्षा आहेत .. वयाची अठ्ठाविशी ओलांडण्यापूर्वी मला सीमेवर वीर मरण पाहिजे होतं पण आता ते शक्य नाही . कारण मी ती वयोमर्यादा ओलांडल्यामुळे कुठल्याही सैनिक/पोलीस भरतीसाठी पात्र ठरत नाही .
आता निदान कुढत कुढत अक्षरशः कुणावरतरी ओझं बनून मरायचं नाही आहे . मला मरण हे नैसर्गिक आलेलं आवडेल . कुठलातरी असाध्य आजार होऊन, औषधे खाऊन , मरणासन्न होऊन मरायचं नाही आहे .
मला मरण्यापूर्वी किमान पन्नास झाडं लावून त्यांचं यथासांग संगोपन करायच आहे . ती पूर्णपणे जोमात वाढलेली बघायची आहेत.
रक्तदान करायचं आहे . आतापर्यंत दहावेळा केलेलं आहे . त्यामध्ये सात वेळा मी माझ्या आईसाठी दिलेले आहे आणि तीन वेळा मित्रांसाठी . पण किमान शंभरी गाठायची आहे . आणि मेल्यानंतर माझ्या वापरण्यायोग्य अवयवांचे दान , कुणातरी गरजूला .
मागील गेले तीन वर्षे , आईच्या आजारपणापासून मी नित्यनेमाने वाशीखाडीपुलावर उभा राहून दोनशे रुपयांचा खाऊ समुद्रात अर्पण करतो . सुरुवातीला मी वीस रुपयांचा खाऊ द्यायचो , आता वाढत जाऊन ते दोनशे रुपये झालेले आहेत . आशा आहे कि ते असेच वाढत जाऊन लवकरच दोन हजार रुपये व्हावेत .
चिक्कार दानधर्म करायचा आहे आणि समाधानाने वर जायचे आहे .
तर पन्नास झाडे , रक्तदान , अवयव दान ( मरणोत्तर ) आणि दानधर्म आणि वाराच्याकडून बक्षीस म्हणून एक सुखासीन मरण पाहिजे . कसं ते त्याने ठरवावं पण त्याआधी निदान कर्णाच्या बाजूला नसलो तरी एक पाऊल मागे असावं .. हीच त्या विधात्याकडून अपेक्षा आहे ..
मला मिपाकरांच्या मरणाबद्दलच्या संकल्पना ऐकायला आवडतील .. जेणेकरून मीही ठरवेन कि मरण कसं असलं पाहिजे .. कृपया आपला अभिप्राय इथे नोंदवावा आणि हो उद्या मी नसणार आहे तेव्हा मी आपले अभिप्राय परवा वाचेन बरं का आणि त्यावर प्रतिसादेन . नाताळाच्या आगाऊ शुभेच्छा सर्वाना .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
मी जे पण सध्या जीवन जगात आहे त्याबद्दल माझ्या अर्धांगिनीला बिलकुल कल्पना नाही आहे .. तिला जर हे कळले कि आपला नवरोबा समुद्रात तीनशे रुपये सहज बुडवतो तर बिच्चारी अर्धी व्हायची .. पण तुम्हाला खरे सांगू , हे जेव्हापासून चालू केलंय ना , तेव्हापासून एक समाधान चेहऱ्यावर असतं . कुठेही मार्गावर अडकत नाही कि धडपड नाही .. सगळं काही एकदम सुरळीत .. धन्यवाद त्या विधात्याचे ज्याने हे सुंदर जीवन दिले आणि दान करण्यासाठी दोन हात दिले . दानातच सर्व आहे मित्रानो . दान करा आणि झोळीत जीवनाचे रहस्य पडून घ्या .इथे थोडा मतभेद आहे. जी वस्तू निर्माण करण्यासाठी मानवी संसाधन खर्च झाले आहे, ती निसर्गात कोणत्याही फायद्याविना केवळ नष्ट होण्यासाठी टाकून देणे, हे काही पटले नाही. त्या ऐवजी, तेवढीच रक्कम जित्याजागत्या माणसांच्या उपयोगी होईल अशी खर्च करणे माझ्या मते जास्त योग्य आणि जास्त समाधानकारक होईल. उदा: तितकीच रक्कम माहितीतल्या एखाद्या मुलाच्या शिक्षणाला मदत म्हणून देणे, एखाद्या विश्वासू अनाथालयाला भेट देणे, किंवा काही काळ ती रक्कम साठवून अनाथालयातील मुलांना त्यांच्या नेहमीच्या जेवणापेक्षा जरा जास्त चांगले जेवण देणे, इत्यादी... असे केल्यास त्या मुलांच्या चेहर्यावरील आनंद, तुमचे समाधान द्विगुणीत-त्रीगुणीत करेल. निसर्गासाठीच काही करायचे असेल तर, ती रक्कम वृक्षवर्धनासाठी खर्च करणे केव्हाही दीर्घकालीन उपयोगी व दीर्घकालीन समाधानकारक ठरू शकेल. बिस्किटे फेकण्यापेक्षा, तेवढ्याच किमतीचे खत तुमच्या घराशेजारील/सोसायटीतील झाडांना घातलेत तर त्यांच्याकडे पाहून तुमचे मन रोज समाधानाने भरून येईल.