Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

तुळजा भवानी - घाणीतले कमळ

व
विटेकर
Fri, 11/09/2018 - 03:28
🗣 67 प्रतिसाद
चंद्रपूर हे शहर जसे कोळश्याच्या निखाऱ्यावर आहे तसे तुळजापूर हे शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभे आहे ! आणि हा अनुभव मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेत आहे! प्रशासनापेक्षा मला तुळजापूरकरांचे आश्चर्य वाटते , याच घाणीत ते नांदतात, संसार होतात, लेकरं मोठी होतात ! कुणाला काही काही वाटत नाही ! ती जगज्जननी मात्र या साऱ्या कोलाहळापासून शेकडो मैल दूर आहे ! ती यात आहे पण आणि नाही पण ! तिच्या त्या दोन - अडीच क्षणांच्या दर्शनासाठी हे सारे सहन करायचे ! त्यातून आपली ऊर्जा साठवायची ! देवाचिया द्वारी उभा क्षणभरी । तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।। यावर्षी एक नवीन प्रकार ! प्रत्येक दर्शनार्थी ला तिकिटाची सक्ती आहे , विनाशुल्क आहे पण अनिवार्य आहे . पण त्यामुळे पूर्वी मंदिरात, केळाच्या साली , कागदाचे कपटे, तेलाच्या रिकाम्या बाटल्या या कचऱ्यामध्ये आता या तिकिटाच्या कपत्यांची भर पडली ! भाविक लोकांचा स्वच्छतेचा सेन्स अफाट आहे अगदी दर्शनाच्या बारीत देखील लोक पान खाऊन थुंकले आहेत ... केळाच्या साली , चॉकलेटचे रॅपर, प्लास्टिक च्या पिशव्या, आणि असंख्य कागदाचे कपटे त्या संपूर्ण दर्शन रांगेत पसरले आहेत, गेल्या २ आकटोबर नंतर तिथे झाडू फिरला नसावा ! दर्शनाच्या बारीची ही कथा तर अभिषेकाची वेगळीच ! रात्री पावणेबारा पासून अभिषेकाच्या पाससाठी उभा आहे , अभिषेक पास किती वाजता मिळणार याबाबत वाचमन आणि अन्य स्टॅफ यांच्यात प्रचंड मतमतांतरे आहेत, कोण म्हणतो १ वाजता , कोण म्हणतो ३ वाजता ! अभिषेक पहाटे ५ पासून सुरू होणार ! प्रशासनाने कोठेही कसलाही फलक लावलेला नाही , माहिती सांगण्यासाठी कोणीही अधिकारी व्यक्ती उपलब्ध नाही , आपल्या क्षेत्र पुजाऱ्याने जी माहिती दिली , त्याआधारे आम्ही रांगेत उभे आहोत ! आम्हाला आता तिकिट मिळाले , रात्री १ वाजून १० मिनिटानंतर ! आम्हां चौघांचे फोटो काढले आणि दोन पास दिले ! सिस्टीम चांगलीय पण रात्री १ वाजता ज्यांना अभिषेकाला यायचे आहे त्या सर्वांनी तिथे उपस्थित रहायचे ??? काय हा अन्याय ! ,आम्ही दिवसभर पुण्यातून गाडी हाणत पोचलोय , थकलोय, आता रात्री विश्रांती होणार नाही , उद्या सकाळी मंदिरात जायचे आहे अभिषेकासाठी ! आमचे जाऊदे, आबालवृद्ध या अभिषेकाच्या रांगेत आहेत .. त्या सगळ्यांची हीच स्थिती आहे ...मुकी बिचारी कुणीही हाका ! अभिषेक फक्त १००० होणार , आत्ताच रांगेत तितके लोक आहेत म्हणजे यानंतर येणाऱ्या कोणालाही आज पहाटे अभिषेक करता येणार नाही ! असले तुघलकी निर्णय कोण घेते ? पूर्वी पुजारी मंडळींचा खूप उपद्रव असे , अतिरिक्त पैसे घेऊन ते लोकांना अभिषेक रांगेत लोकांना घुसवत असत ! त्याला चाप बसावा म्हणून कदाचित हा उपाय योजला असावा ! पण हे तर व्याधीपेक्षा औषध जालीम झाले ! मला शंका आहे की मंदिर व्यवस्थापनाचा पुरेसा अभ्यास केलेले आणि अनुभव असणारे लोक निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात का? मंदिरातील आणि आसपासच्या गल्ल्यांच्या स्वच्छतेचे दायित्व कोणाचे आहे ? या सगळ्याची तक्रार कोणाकडे करावी ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23870 views

🗣 चर्चा (67)
त
तुषार काळभोर Fri, 11/09/2018 - 04:12 नवीन
हे महाराष्ट्रातील सगळ्यात घाणेरडं देवस्थान असल्याचं ऐकलंय!! बाकी बहुतांश देवस्थाने गलिच्छच असतात. आजकाल बऱ्याच ठिकाणी चांगलं व्यवस्थापन ठेवलं जातं. स्वच्छता बाळगली जाते. अस्वच्छता ही पर्यटक/भाविकांकडून केली जात असली तरी त्यांनी ती करू नये म्हणून काही व्यवस्थापन करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन + मंदिर प्रशासन यांची आहे. मूळच्या स्वच्छ असलेल्या आणि वेळोवेळी स्वच्छता राखलेल्या ठिकाणी नवीन घाण करण्याचं लोक टाळतात. तर आधीच घाणेरडं आणि गलिच्छ असलेल्या ठिकाणी 'माझ्या अजून थोड्या' घाणेरड्या वागण्याने काय फरक पडतो, अशा मनोवृत्तीतुन अजून जास्त घाण केली जाते. एक वैयक्तिक निरीक्षण असे आहे की सामान्यपणे 'देवी'च्या तीर्थक्षेत्री गलिच्छपण जास्त आढळतो. अगदी मोठे तिर्थस्थळेच नाही, गावोगावी असलेली मंदिरे पाहा. प्रत्येक गावात तुळजाभवानी, काळूबाई, महालक्ष्मी असे देवीचे मंदिर असतेच. शिवाय मारुतीचे/महादेवाचे मंदिर असतेच. तुलना करून पाहा. जी कारणे आहेत, उपाय सुद्धा तेच आहेत. स्वच्छता राखणे हे मंदिर व्यवस्थापन आणि भाविक यांची सामायिक जबाबदारी असली तरी व्यवस्थापनाने त्याची सुरुवात करणे व ते नियमित राखणे हे अत्यंत गरजेचे आहे. भाविकांना तेथे घाण करायची इच्छासुद्धा झाली नाही पाहिजे. पाच-दहा-वीस वर्षांत सर्वांच्या अंगवळणी पडेलच, पण तोपर्यंत मंदीर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यायला हवा.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 11/09/2018 - 05:34 नवीन
तुळजापूर हे देवस्थान अतिशयच गचाळ आणि गलिच्छ आहे यात काही दुमतच नाही. विटेकर जी, तुम्ही मला इतक्या मोठ्या मनस्तापातून वाचवलं आहे की काय सांगू.. आजच आम्ही तुळजापूर ला जाणार होतो. वर्षातून एकदा जातोच तर आजचा आजचा मुहूर्त लागला होता. पण हे असले प्रकार पाहिले की नवरोजींचं टेंपर जे कामातून जातं की बस्स. त्याला सावरता सावरता माझीच दमछाक होते. म्हणून म्हणाले असं. आपलं कुलदैवत म्हणून आपण जातो श्रद्धेने, पण तिकडचा प्रकार फार वैताग आणणारा आहे. डुक्कर हा तर ग्रामपशू आहे तिथला. तिथले लोकही या असल्या घाणीत सुखेनैव नांदतात. निदान गेले ६ वर्षे तरी नियमाने मी हेच पहातेय. हे देवस्थान उस्मानाबादच्या कलेक्टर यांच्या अंतर्गत येतं. त्यामुळे याबद्दलच्या तक्रारी तिथेच करायला लागतात. पण कलेक्टर जर अगदीच निष्प्रभ असेल तर मुख्यमंत्र्यंकडेच तक्रार नोंदवायला हवी. आमच्या नेहमीच्या गुरुजींकडे गेलो की दरवेळी नकाला रुमाल लावून तिथल्या गल्लीबोळांमधून फिरायला लागतं. त्यांना विचार्लं तर कसनुसे हसतात. पण ते तेवढ्यापुरतंच. तिथले लोक मज्जेत असतात आणि येणारे भक्तही जमेल तशी घाणीतच भर टाकतात. मागे एकदा आम्ही District Collector & D.M., Address: Collector Office, Osmanabad (Maharashtra) – 413 501 Office Ph. No: 02472 – 224501, Fax No: 02472-228018 Email: colosmanabad[at]gmail.com/ Collector.Osmanabad[at]maharashtra.gov.in इथे तक्रार केली होती. तेवढ्यापुरता बदल झाला होता म्हणे
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 11/09/2018 - 05:45 नवीन
अर्धाच प्रतिसाद झाला आणि काहीतरी चुकलं. प्रकाशितच झाला. तिथे पुजार्‍यांची दमदाटी, मध्ये आपल्या यजमानांना घुसवणे, त्या सांडलेल्या दही-दूध, केळे यांचा एक सडका वास, त्या हळदी-कुंकवाचे घसरायला लावणारे सडे, मधेच लोटांगण घालणारे भक्त आणि त्यांच्या अंगावरुन पुढे जाणारे इतर लोक. तिथे जाउन दर्शनाची सुंदर अनुभूती येण्याऐवजी मनस्तापच पदरी पडतो. अति अवांतरः मागच्या वर्षी तुळजापूर ला दर्शन रांगेत उभे होतो. एक बाईसाहेब कुणालाच न जुमानता पुढे घुसत होत्या. सुरक्षा रक्शक पाहून न पाहिल्यासारखे. आणि बाकीचे लोक ही तसेच बघे. मग नवरा नेहमीप्रमाणे ओरडायला लागला, मध्ये घुसु नका म्हणून. ती बाई आपली पुढेच. बाकीचे लोक पहतायत. मग नवरा जोरात ओरडला-" जय अंबे भवानी.. या बाई बघ, सगळ्यांना डावलून येतायत तुला भेटायला.. आमची भक्ती काय खरी नाही पहा. त्यामुळे ये गं बाहेर त्यांचं दर्शन घ्यायला.." मग सगळे हसायला लागले आणि त्या बाईला लाज वाटली. थांबली तिथेच. तो अंगात येण्याचा एक भीतीदायक प्रकार पण असतो त्याच रांगेत. ही कुलदेवता नसती तर मी गेलेच नसते तिथे कधीच. तुळजापूर चं नाव बदलून गलिछ नगरी केलं तरी चालेल. नाहीतरी त्या भवानीला पण काही पडलं नाहीये तुळजापुराचं.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sun, 11/11/2018 - 11:49 नवीन
महाराष्ट्र शासनाच्या " आपलं सरकार' या पोर्टलवर तक्रार केली आहे, त्याची पोच आली! तुमच्या सहवेदनेबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 11/12/2018 - 07:55 नवीन
Dear Sir/Madam, Your grievance has been successfully submitted on Grievance Redressal Portal. Details are as follows: Token No : Dist/CLOS/2018/1632 Date of Submission : 2018-11-11 06:02:08 ------------------------------ Name : vitekar Mobile Number : 9881476020 Email Id : vitekar@gmail.com District : Osmanabad Taluka : Osmanabad ------------------------------ Level of Administration : District Administration Type of Administration : Collector Nature of Grievance : Others Grievance (first 100 characters) : नमस्कार, मंदिरातील इन्फ्रास्ट्रक्चर... Thanks & Regards, Grievances Support Government of Maharashtra
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 11/10/2018 - 15:17 नवीन
गांडगापूरशी स्पर्धा करू शकते. आणि या अस्वच्छतेमुळे तिथं थोड्या वेळासाठी भक्त थांबू शकत नाहीत तर देवाला किती मोठी शिक्षा!!! देऊळ कसे ठेऊ नये यासाठी यात जेजुरीलाही जमेस धरता येईल. दक्षिणेतील नितांतसुंदर ,आणि कुठलेच (पूजा सामग्री नेमबाजी मुक्त) देवदर्शन अनुभवलेला आस्तिक नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Fri, 11/09/2018 - 05:30 नवीन
साधारण दहा वर्षापुर्वी मी तुळजापूर ला गेले असेन.तेव्हाच तिथली घाण पाहुन परत पाऊल न ठेवायचा निश्चय केला. अभिषेकाच्या रांगेत घुसुन पेप्सी कुल्फी विकणारा माणुस. बाथरूम मधला असह्य वास आणी मंदिरात इतस्ततः लागलेली मधमाशांची पोळी पाहून देवीचा श्वास कसा घुसमटत नाही याच नवल वाटल होत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/09/2018 - 06:52 नवीन
माझे (मर्यादित) निरीक्षण असे आहे की देशावरील देवळांमध्ये स्वच्छता नावालाच दिसते, काही देवळे तर गलिच्छ असतात की खुद्द देव तिथे राहायचा नाही. ह्याउलट, कोकणात साधेसे देऊळ असते, फारसे सधन नसते पण स्वच्छ असते, पवित्र वाटते. इतका फरक का असावा? दक्षिणेकडील देवळे तशीच सहसा स्वच्छ असतात. तुळजाभवानीचे देऊळ खरंच अस्वच्छ आहे. :(
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 11/09/2018 - 08:39 नवीन
सगळे सवयींवर असते. फूटपाथचा अभाव, पचापचा थुकणे ह्या गोष्टी दक्षिणेत सहसा दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 11/09/2018 - 07:23 नवीन
एकूण भयानक प्रकार वाटतो आहे. ज्यांचं कुलदैवत आहे त्यांना जावंच लागत असेल त्रास सहन करून. बळीची प्रथासुद्धा आहे का? आता सुट्ट्या लागल्याने गर्दी वाढते का? किती लाख लोक येत असतील? तुळजापुर यात्रा कधी असते? नदी कोणती आहे? पंढरपूर - संताचे माहेर नक्की कसे आहे ते एकदा दोनदा पाहिले आहे आषाढात एकादशीअगोदर पंधरा दिवस. जय्यत तयारी केलेली असते पण भाविक अजून मार्गावर असतात. नुकताच पाऊस झाल्याने गारवा आलेला होता. त्यामुळे छान वाटलं होतं. मुख्य गाभारा फक्त आठ फुटी आहे आणि प्रत्येकाने विटेवर डोकं ठेवायचं म्हटलं तर मिनिटाला दहा या हिशोबाने तासाल सहाशे, एका दिवसात वीस हजाराच्या आतच भाविक पाया पडतील. मुखदर्शनाचे तीस हजार धरून पन्नास हजारांपलीकडे आकडा जात नाही. मग सहा लाख लोक एका गावात एक दिवस आले तर गावाचं काय होत असेल? चंद्रभागा थकेल. त्र्यंबकेश्वर - मुद्दामहून गेलो नाही पण सापुतारा- नाशिक-त्र्यंबकेश्वर-जव्हार-कल्याण असा पर्यटन प्लानमुळे वाटेत पाहिलं. धर्मशाळेत फार वाइट वास येत होता मग तिथे न राहता जव्हारला जाऊन ( त्र्यंबकेश्वर -जव्हारला दोन तासांचा प्रवास आहे, दुपारी दोनला बस सुटते.) राहिलेलो. तर्पण करायचे स्थान असल्याने गलिच्छपणा वाढतो.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 11/09/2018 - 07:40 नवीन
गेलो तर असं काही दिसलं नाही बाबा. पण सर्वपित्री अमावस्येला तिला अजबली दिला जातो, त्याशिवाय कितीही लोक असले तरीही तिची मूर्ती उचलू शकत नाहीत असं आमच्या गुरुजींकडून कळालं. भवानी कालीचा अंश आहे त्यामुळे हा बळीचा मान तिला लागतोच असं ते सांगत होते. तुळजापूरची मूर्ती ही एकमेव चल मूर्ती आहे असं म्हणतात. सर्वपित्री नंतर नवरात्र चालू व्हायच्या आधी तिला जागे करायला मोठ्या ढोलताशाच्या गजरात हे पण केले जाते असे ऐकलं. खरं खोटं माहीत नाही
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 11/09/2018 - 07:42 नवीन
माझी तर लै इच्छा आहे अशी ना तशी तुळजाभवानी आई चल आहे (मूर्ती हलवता येते आणि छबिन्याला मिरवत जाते). अक्कलकोट तुळजापूरचे कौतुक फारच झाले आहे. तुळजापूरच्या जवळच अणदूरला आणि नळदुर्गाला एक प्रथा आहे. देव वर्षातले चार महिने नळदुर्गाला असतात, बाकीचे ८ महिने अणदूरला. दोन्ही ठिकाणची देवळे जवळ जवळ सेम आहेत. तशीच प्रथा खास पुण्यामुंबईच्या भाविकांसाठी चालू करावी. पुण्यामुंबईच्या मध्ये एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी एक पर्यटनस्थळ विकसित करावे, सेंटरला स्वामीनारायण स्टाईल फुल मार्बल तुळजाभवानी मंदिर बांधावे, देवी वर्षातले काहि महिने तेथे निवास करील, पुण्यामुंबईच्या भाविकांची सुट्ट्यांची सोय पाहून त्या तारखा अ‍ॅडजस्ट कराव्यात. तशी आई कनवाळू आहे, तुळजापूरचे लोकच ड्यांबिस आहेत, तेंव्हा त्याचे पुण्यातले मॅनेजमेंट एखाद्या रिलायन्स बिलायन्स ला द्यावे. फाईव्हस्टार सोयी असलेले (इन्क्लुडींग स्पा, जाकुझी आणि कॉन्टीनेण्टल वगैरे जे काही असते ते) भक्त निवास बांधावे. एखादे अ‍ॅम्युझमेंट पार्क गेलाबाजार तीन चार सुसज्ज मॉल्स उभे करावेत, मॅ़कडी, डामिनो, सीसीडी, बरिस्ता येतीलच. जवळपास एखादा तलाव नदी असेल तर मुळशी लवासा स्टाईल त्याला विकसित करावे. बोटीने मंदिरात जाता आले तर उत्तमच. तेवढाच व्हेनिस स्टाईल गंडोला बिंडोला चालू करता येईल. मुख्य म्हनजे देवीपाशी एक सेल्फी पॉइंट मस्ट हं. एंजॉयिंग सिंहासन पूजा अ‍ॅट न्यू तुलजा अ‍ॅट पूना बॉम्बे एक्स्प्रेस हायवे. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 11/09/2018 - 07:56 नवीन
मार्बल बिर्बल नाही हो. असह्य ते सुसह्य पण नाही. असह्य ते सह्य व्हावे एवढीच लेकरांची अपेक्षा आहे. गोड मानून घ्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/09/2018 - 08:27 नवीन
हो, हो कराच. तुम्हालाही गडगंज व्हायला वेळ लागायचा नाही.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 11/09/2018 - 11:48 नवीन
तुम्ही हाडाचे कलाकार असल्याने नेमकी नस पकडलीत. ;)
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sat, 11/10/2018 - 16:19 नवीन
तुमचा उपहास पोचला ! " तुम्हां पुण्या-मुंबई कडल्या लोकांनी" अशी सुरुवात करून अकारण हिणकस शेरा मारण्याची हल्ली एक फॅशन होऊन बसली आहे ! त्यातलाच हा एक प्रकार आहे. पुण्या- मुंबई कडे लोक हौसेने गेले नाहीत , चाकरमानी आहेत , पोट भरण्यासाठी तिकडे गेलेत.. शक्य तेवढे गावाकडची मुळं घट्ट धरून आहेत , गावात पोट भरण्याची सोय असती तर कशाला देशोधडीला लागलो असतो ? स्वच्छ असण्याची, राहण्याची इच्छा आणि हक्क फक्त पुण्या- मुंबईच्या लोकांना नाही सर्व जनतेला आहे,त्यात पुण्याला नाव ठेवण्याचा प्रश्न येतो कुठे ? मी वरती लिहिलंय त्याप्रमाणे तुळजा भवानीची ओढ आम्हांलाही आहे म्हणून तर मुलांना घेऊन तडफडत या असल्या गावंढया गावात येतो ! प्रशासन पुष्कळ काही करते पण स्थानिक लोकांना त्याची काडीमात्र बूज नाही , तुळजापूर-सोलापूर रस्ता अप्रतिम केलाय , तेल सांडले तर थेंब न थेंब पुसून घ्यावा इतका सुरेख ! पण स्थानिक लोक या असल्या रस्त्यावर उलट्या बाजूने येतात , आमच्यासारख्याची फाटते हो उलट्या बाजूने मोटारसायकलवाला आला की ! नागरिक म्हणून आपल्याला दिलेल्या हक्काची जाणीव आहे मग कर्तव्य कोणी पाळायची? फक्त पुण्या-मुंबईच्या लोकांनी ? टेंभुर्णी जवळ ऊसाच्या बैलगाड्या आडव्या आल्या ... एकामागोमाग एक एकूण १७ गाड्या होत्या ... अरे, आम्ही ७०- ७० रुपये टोल देतो आणि हताशपणे ते पहात बसतो .. सर्व्हिस रोड आहे , उड्डाणपूल आहेत ते शो साठी आहेत का? एक दुचाकीस्वार सर्विसरोड वापरेल तर शपथ ! इथे लक्सरी कोण मागतोय? स्वच्छता, शिस्त आणि अनुशासन , नागरी सुविधांचा सुयोग्य वापर म्हणजे लक्सरी?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 11/11/2018 - 10:20 नवीन
तुम्हां पुण्या-मुंबई कडल्या लोकांनी" अशी सुरुवात करून अकारण हिणकस शेरा मारण्याची हल्ली एक फॅशन होऊन बसली आहे ! त्यातलाच हा एक प्रकार आहे.
बळंच उगी.. हिणकस शेर्‍याविषयी इतकी लाज वाटत असेल तर आपण कुणाविषयी काय हिणकस बोलला आहात ते बघा आधी.
गावात पोट भरण्याची सोय असती तर कशाला देशोधडीला लागलो असतो
? रियली? खरंच काय त्रास होतोय पुण्यामुंबईत? म्हणजे अ‍ॅक्चुअली देशोधडी म्हणण्याइतपत..
तुळजा भवानीची ओढ आम्हांलाही आहे म्हणून तर मुलांना घेऊन तडफडत या असल्या गावंढया गावात येतो !
ह्यालाच माजुरडेपणा म्हणतात. तडफडत इकडे यायचेही आहे, देशोधडीलाही लागलात म्हणता, अंतिम डेस्टिनेशन काये तुमचे? कॅलिफोर्निया?
प्रशासन पुष्कळ काही करते पण स्थानिक लोकांना त्याची काडीमात्र बूज नाही , तुळजापूर-सोलापूर रस्ता अप्रतिम केलाय , तेल सांडले तर थेंब न थेंब पुसून घ्यावा इतका सुरेख ! पण स्थानिक लोक या असल्या रस्त्यावर उलट्या बाजूने येतात , आमच्यासारख्याची फाटते हो उलट्या बाजूने मोटारसायकलवाला आला की ! नागरिक म्हणून आपल्याला दिलेल्या हक्काची जाणीव आहे मग कर्तव्य कोणी पाळायची? फक्त पुण्या-मुंबईच्या लोकांनी ?
अगदी अगदी, प्रशासन खूप काही करते, पण ते पर्यटकांसाठी, स्पष्ट भाषेत पुणे मुंबईसाठी. फुल्ल एक्स्प्रेस हायवे केला. कुणासाठी? पर्यटक तुळजापुरात न थांबता सोलापुरात थांबतात. गावाला काय मिळाले? त्या तुळजापूर सोलापूरला एक काटकोनात रस्ता आहे. तुळजापूर बार्शी म्हणून. जरा जाऊन दाखवा अर्धा तास त्यावरुन. प्रशासन काय करते ते कळेल. आक्खे तुळजापूर गाव एका लेव्हलला नाही, त्यामुळे पाणी नाही, रस्ते नाहीत्,देवीचे मंदिर सोडून धंदे नाहीत. मग मूळ तुळजापूरकरांनी करायचे काय? वर्षभर पर्यटकांनी केलेला कचरा उचलत जगायचे? त्यांच्या सुखसोयीसाठी राबायचे? बरं मिळायचा पैसा काही मर्यादित लोकांना. त्यांनी घरे भरली. आता सरकारने तेही बंद केले. भोप्यांना दिवस वाटून दिले. पुढे काय? मंदीराचे व्यवस्थापन अमाप पैशाच्या मोहाने ज्या सरकारने ताब्यात घेतले त्याला जाब विचारायचा सोडून लोकांना का दोष लावता. बरं तुमची एक बाईकस्वार राँग साईडने आला तर फाटते, चूक आहेच तसे येणे पण इतकी फाटण्याएवढे तुम्ही कुठून आलात? अमेरिका का युरप? कारण पुण्यात असा एक विभाग, एक रस्ता, एक दिवस, एक मिनट दाखवा की जेथे रॉम्ग साईडने बाईकवाला येत नाही. सायकल ट्रॅक, फूटपाथ, ड्रेन लाईन कव्हर, बीआरटी रोड सोडले नाही हो पुणेकरांनी बाईक चालवण्यासाठी. इथे त्या एक्स्प्रेस हायवेसाठी गावे तोडली, डिव्हायडर टाकून लांब लांब सर्व्हिस रोड दिले, त्यांना नव्हती सवय इतक्या वर्षांची. तुम्ही तर पुण्यामुंबईत इतकी वर्षे सरावलात, तुम्हाला चार पदरी रोडवरुन कडेने एक बाईक वाला आला तर भीती वाटते. नवलच म्हणायचे.
अरे, आम्ही ७०- ७० रुपये टोल देतो आणि हताशपणे ते पहात बसतो .. सर्व्हिस रोड आहे , उड्डाणपूल आहेत ते शो साठी आहेत का? एक दुचाकीस्वार सर्विसरोड वापरेल तर शपथ ! इथे लक्सरी कोण मागतोय? स्वच्छता, शिस्त आणि अनुशासन , नागरी सुविधांचा सुयोग्य वापर म्हणजे लक्सरी?
तेच सांगतोय, आक्खे भारताचे सामाजिक रडगाणे तुळजापूरच्या नावाने रडू नकात. जमल्यास शनवार वाड्यासमोर थोडीशी रिकामी जागा बघून शनवार रैवार गाठून एखादे इंस्टंट उपोषण वगैरे आटोपुन घ्या, आई भवानी तुमच्या अभिसरणाला का काय म्हणता त्याला यश देवो.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sun, 11/11/2018 - 11:43 नवीन
तोल सुटलाय तुमचा, प्रतिवाद करायची इच्छा नाही .... पास !
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Mon, 11/12/2018 - 12:37 नवीन
घाणीत राहण्यार्याना वास येत नाही हेच खरं .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 11/09/2018 - 09:16 नवीन
कारंज्यात नाणं टाकलं की इच्छापुर्ती? ------ ते हाइटुक राहू द्या, स्वच्छता आणलीच पाहिजे. त्यासाठी एक शिष्टमंडळ बंगालच्या काली द्शनाला अभ्यासासाठी पाठवा. श्रमपरिहारासाठी दार्जीलिंग. आणि नेपाळमधली तुलज्जाभवानी.
  • Log in or register to post comments
झ
झेन Fri, 11/09/2018 - 13:16 नवीन
लागलीच तुमची आयडीयेच्या कल्पनेच पेटंट घ्या आणि योग्य व्यक्तीला संपर्क करा(पानमसाला वाले, चिकन बिफ एक्सपोर्टर, बाबा-बुवा). पैशाचं करायचं काय असा प्रश्न असणारे पण खूप लोक आहेत, बाकी लोकांना रोजगार मिळेल. बाकी देवळातल्या चकचकीच, झगमगाटाचं सोडा स्वच्छता आणि थोडी शिस्त जर स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी आपल्याला येत नसेल तर काय करेल भवानी आणि लक्ष्मी.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 11/09/2018 - 14:31 नवीन
तुळजाभवानी देवस्थानाच्या अस्वच्छतेबद्दल बरच ऐकल आहे. मी स्वतः कधीही तिथे गेलेलो नाही. तुळजाभवानी देवस्थानाच्या अस्वच्छते बद्दल काही करायच असेल तर तुळ्जाभवानी ज्यांची कुलदैवता आहे त्यांनीच व ईतर ग्रामस्थांनी एक ग्रूप बनवुन सुरुवात करायला पाहीजे. राजकारण्यांना यातुन बाहेर ठेवले तर पुढचा त्रास वाचेल. भारतातली सर्व हिंदु देवळे, मंदिरे, संस्थाने भारत सरकारच्या ट्रस्टच्या खाली येतात व त्या देवस्थानातली मिळकत ह्या ट्रस्टच्या आधिन असते. हा देवस्थानाचा ट्रस्टचा प्रमुख तिथला डीस्ट्रीक्ट कलेक्टर असतो. त्या कारणाने देवळातील अस्वच्छते बद्द्ल सुद्धा देवस्थानच्या ट्रस्टलाच जवाबदार धरायला पाहीजे. पुर्ण देवस्थानाची स्वच्छता करायला दोन ते तीन दिवस पुरतील . वर म्हंटल्या प्रमाणे ग्रुप बनवला व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने एकत्र डीस्ट्रीक्ट कलेक्टरला लिखीत निवेदन केले तर बदल होण्यासारखा आहे. स्वच्छता ग्रुपने प्रथम देवस्थानाचा आराखडा आखावा, कचरा होण्याची कारणे व त्याची स्थाने, कश्याचा कचरा होतो , देवस्थानात येणार्या भाविकांसाठी आधुनीक स्वच्छता ग्रूहाची व्यवस्था त्यासाठी पाण्याची व्यवस्था अश्या सर्व बाबींचा व्यवस्थीत विचार करावा. या सर्व बदलासाठी किती निधी लागेल याचा विचार करावा. तो निधी कसा उभा करता येईल याचाही विचार करायला पाहिजे. जर देवळाची सर्व मिळकत देवस्थानाच्या ट्रस्टला जात असेल तर ट्रस्टने हा सर्व खर्च करणे अपेक्षित आहे. पुर्ण देवस्थानाची व्यवस्था बदलुन नविन व्यवस्था ज्याने देवस्थानात होणार्या अस्वच्छतेचे कारणच मिटेल व कचर्याला योग्य वेळेला हटवता येईल अशी व्यवस्था, लोकांच्या सवई, थुंकण्यार्या लोकांना जबरदस्त फाईन व त्या लोकावर कॅमेराने लक्ष ठेवणे. कॅमेरा चालु आहेत हे लोकांच्या लक्षात आणुन देणे. बदललेली व्यवस्था रुजवण्याच्या काळात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अ शी व्यवस्था केली तर हे सर्व होण्यासारख आहे. "अस्वच्छता ही पर्यटक/भाविकांकडून केली जात असली तरी त्यांनी ती करू नये म्हणून काही व्यवस्थापन करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन + मंदिर प्रशासन यांची आहे. मूळच्या स्वच्छ असलेल्या आणि वेळोवेळी स्वच्छता राखलेल्या ठिकाणी नवीन घाण करण्याचं लोक टाळतात. तर आधीच घाणेरडं आणि गलिच्छ असलेल्या ठिकाणी 'माझ्या अजून थोड्या' घाणेरड्या वागण्याने काय फरक पडतो, अशा मनोवृत्तीतुन अजून जास्त घाण केली जाते". पैलवान यांच्या ह्या वाक्याला दुजोरा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 11/09/2018 - 17:00 नवीन
तुळजापूरचं कसं झालंय की की आई एकच पण लेकरं तितक्या मनोवृत्ती असं झालंय. बरं कुणाचंच सरळ एकच एक धोरण असंही नाही. अपेक्षाही प्रत्येकाच्या निरनिराळ्या. मुंबई पुणेकरांना वाटतं देऊळ चकाचक हवं, लॉजिंग हॉटेलं स्वच्छ हवं, मुबलक पार्किंग हवं, शिस्तीत पट्टकन दर्शन हवं तेही पाहिजे तेंव्हा. बाकी मराठवाडा, आंध्र आणि कर्नाटकातील गरीब बहुजनांची ती नुसती कुलदैवत नाही. दर नवरात्रीला येणे, लग्नाचे जागरण गोंधळ घालणे, परडी भरणे, जोगती होणे, मुराळी होणे, अंगात येणे, कुंकवाचा सडा घालत लोटांगण घालणे, कपड्यावर कूंकवाचे पंजे उमटवणे, मळवट भरणे, नवस फेडणे आदि गोष्टीतला विज्ञानाचा आणि लॉजिकचा भाग बाजूला ठेवला तरी हे देवीसाक्षीने, श्रध्देने केले जाते. ह्या गोष्टी मंदिर प्रांगणातच केल्या जातात. त्याने मंदिर परिसर अस्वच्छ राहतो. बरं इतका प्रचंड भाविकसमुदाय रेग्युलरली तुळजापुरात येत असेल तर त्या छोट्याश्या गावावर किती ताण पडत असेल. साधे आपल्या घरासमोर एखादा गणपतीचा मांडव असेल तर दहा दिवस त्रास होतो, इथे वर्षभर पूर्ण गावभर लोकांचा, गाड्यांचा राबता सदैव असतो. इथे निसर्गाने पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, पाणी बोरी धरणावरुन उचलले जाते, शेतीवाडी फारशी समृध्द नाही, भाविक आणि त्यांच्या सोयी ह्यातच गाव राबत असते, ह्या राबण्यासोबत बारा गावचे पाणी ओळखायचा गुण आणि मग्रुरी येतेच कुठल्याही देवस्थानाप्रमाणे लोकांत. पूरवी भोप्यांनी केलेली मनमानी प्रविण गेडामांनी मोडून जरी काढली तरी पूर्वपरंपरेने देवीचे नित्योपचार दुसरे कुणी करु शकत नाही. खजिन्यातला अचाट अलंकार साठा, दानपेटीतला अफाट पैसा सार्‍यांनाच खुणावतो. त्याला सरकारही अपवाद नाही. देवीचे नित्योपचार हा अवघड पार्ट आहे. देवी शाक्त आहे. तिचे पूजनविधी सर्वानाच माहीतीही नाहीत आणि आधुनिक प्रजेला कळतही नाहीत. त्यात तर्कदृष्ट्या सुधारणा कुणी केल्या नाहीत आणि त्या परंपरापसंद भाविकांना रुचणार नाहीत. उत्पन्नाचा विनियोग भाविकांसाठी करायच्या योजना पारदर्शकपणा नसतो, दूरदृस्।टी नसते. केवळ टेम्परररी बॅरिकेडस फिरवायच्या मलमपट्ट्या केल्या जातात. कुणी पुधाकार घ्यायचा अशा वेळी? आंध्र, कर्नाटक, गुजरात मधल्या नव्हेच तर नांदेड, परभणीसारख्या दूरच्या भाविक समाजांनी एकत्र येउन तुळजापूरला मठ/भक्त निवास स्थापन केले आहेत. त्यांच्यामुळे गावातल्या जागांचे भाव प्रचंड आहेत. महाद्वारासमोर लहानशी टपरी चालवायची भाडे लाखात असते. ह्या दूरच्या भाविकांनी स्थापन केलेल्या निवासात ते भाविक बरोब्बर येतात, राहतात, भोपी ठरलेले असतात त्यानुसार पूजा, विधी आटोपून निघून जातात. पुणेमुंबईकरांनी केलाय का स्थापन असा एखादा मठ? श्रीमंट भाविक सगळ्या गोष्टी नोटांवर मोजतात, कशाला हवी देवीसमोर असली मग्रुरी? यावे ना आईसमोर सर्वसामान्यासारखे. कुणी चालू केल्या असल्या पैसे फेकून पुढे घुसायच्या चालीरीती? लै लै बोलावेसे वाटते पण काय करणार? प्रत्येकाचे राग लोभ, प्रत्येकाच्या श्रध्दा तेवढ्या तेवढ्या वेळेपुरत्या. गर्दीत सगळे भाविक सारखे असावेत, सर्वांनीच चांगले वागावे, स्वच्छ राहावे, मंदीर आपल्या आईचेच आहे, तिच्यासमोर पैशाचा, अधिकारांचा, पदांचा, जातीधर्माचा आणि उच्चनीचतेचा कुठलाच तोरा न मिरवता कपाळ कुंकवाने माखून एका आवाजात आईराजा उदं उदं म्हनावे इतकीच मनापासून इच्छा. इत्यलम.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 11/09/2018 - 17:25 नवीन
लिहिलं आहेस रे... पटलं
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 11/09/2018 - 17:25 नवीन
लिहिलं आहेस रे... पटलं
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 11/09/2018 - 23:36 नवीन
तुळजापूर देवस्थान एक रुपक झालं म्हणायचं. ऑलमोस्ट सगळ्या मानवनिर्मीत समस्यांचं कारण आणि निर्मुलन रेखाटलस रे अभ्या.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 11/10/2018 - 08:04 नवीन
+11111 .... कचरा करणे आणि पाण्याचा अपव्यय करण्यात पुणे-मुंबई वाले सगळ्यात आघाडीवर आहेत. .....
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sat, 11/10/2018 - 15:36 नवीन
..चालू द्या !
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sat, 11/10/2018 - 16:34 नवीन
स्वच्छतेबाबत आग्रही असणे म्हणजे पैशाचा माज नाही ! मी स्वतः माझ्या कुटुंबीयांसाहित धर्म दर्शनाच्या रांगेतूनच दर्शन घेतले कोठलेही अतिरिक्त शुल्क न भरता ! तीर्थयात्रा करणे , सहकुटुंब प्रवास करणे, त्यानिमित्ताने समाजाचे दर्शन घेणे , लोकांशी संपर्क करणे .. या निमित्ताने एक सामाजिक अभिसरण होते , त्यात अगदी हळुवारपणे आर्थिक संबंधही विणले आहेत आणि म्हणूनच मी मुलांचा विरोध पत्करूनही सहकुटुंब जातो आग्रहपूर्वक जातो ! माझी मुंज झाल्यावर ( ४० वर्षांपूर्वी) माझे बाबा आम्हां सर्वांना घेऊन गेले होते, प्रवास एस टी ने आणि राहणे पुजाऱ्याच्या घरी ! त्यावेळी ते समाजमान्य होते , असे एखाद्याच्या घरी राहणे तेव्हा अवघड वाटत नव्हते ! आज आम्ही आज राहू शकू का तसे? पुजाऱ्याच्या घरच्यांना तरी चालेल का? काळानुसार काही बदल करायला हवेत ना ? त्यावेळी माझ्या बाबांची श्रद्धा होती आणि आज माझी श्रद्धा नाही ??? तुमची भक्ती ही भक्ती आहे आणि आमची भक्ती दांभिकपणा ???
  • Log in or register to post comments
व
विटेकर Sat, 11/10/2018 - 15:35 नवीन
मूळ जागा स्वच्छ असेल तर लोक शक्यता घाण करणे टाळतात असा अनुभव आहे . वास्तविक दर्शन मार्ग सुरेख बांधून काढला आहे , नक्कीच काही कोटी खर्च केला आहे प्रशासनाने, पण तो साफ ठेवणे ही संस्थानची जबाबदारी नव्हे का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/09/2018 - 17:36 नवीन
https://maps.google.com/?cid=10281651974750719216 आपटा येथील शिवमंदिर. पनवेल हुन पेणला जाताना हे एक अतिशय शांत स्वच्छ असे मंदिर बॉली वूड मधील श्री ओमप्रकाश यांनी बांधले आहे. मंदिर कसे असावे त्याचा नमुना आहे. अतिशय स्वच्छ शांत आणि अजिबात गर्दी नसलेले.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 11/09/2018 - 17:42 नवीन
एक उपाय करण्यासारखा आहे. शेगाव चे देवस्थान, महाराष्ट्रातील अतिशय स्वच्छ आणि वेल मॅनेज देवस्थान आहे. त्यांचा सल्ला, मदत घेउन तुळजापुरात बदल घडवता येइल. कमीतकमी तुळजापूर व्यवस्थापन समीतीने एकदा शेगावला भेट द्यावी...
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 11/10/2018 - 08:15 नवीन
शेगाव धार्मिक स्थळ कमी आणि पिकनिक स्पाॅट जास्त झाला आहे. महाराजांच्या दर्शनापेक्षा लोकांचा आनंद सागर कडेच ओढा जास्त असतो. .... तुळजापुरच्या विकास आराखड्याबाबत ही माहिती डोळ्यात अंजन घालणारी आहे. https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-divya-marathi-exclusive-about-development-in-usmanabad-5752411-NOR.html
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 11/10/2018 - 09:59 नवीन
माहिती वाचल्यास लोकांच्या डोळ्यात नक्की अंजन पडावे !! २००८ २००८ मध्ये मंजुरी मिळालेल्या आणि २०१० पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेल्या तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणच्या कामांचा अखेरच होताना दिसत नाही. ३१५ पैकी २८० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरीही तुळजापुरकरांना किंवा भक्तांना शहराचा विकास दिसत नाही. मुळात एवढी मोठी रक्कम खर्च करूनही भाविकांसाठी अजूनही निवास व्यवस्था, स्नान, स्वच्छतागृह, पिण्यासाठी पुरेसे पाणी, आरोग्य सेवा,अशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत.कुलस्वामिनी श्री.तुळजाभवानी मातेवर श्रध्दा असल्याने सर्वांगीण विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांनी २००८ मध्ये तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करून त्याद्वारे ३१५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्यातून २०१० मध्ये विकास कामांना प्रारंभही झाला. मुळात देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, त्यानंतर त्यांना थांबण्यासाठी निवास व्यवस्था व्हावी, तातडीची आरोग्यसेवा मिळावी, उद्याने,तलावातील बोटिंगच्या माध्यमातून करमणूक व्हावी, या हेतूने विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता. शिर्डी, शेगावच्या धर्तीवर तुळजापूरचा विकास प्राधिकरणच्या कामातून अभिप्रेत होता. त्यादृष्टीनेच मूळ आराखडा तयार करण्यात आला होता. तीन वर्षात कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ८ वर्षापासून कामे सुरूच आहेत.काही कामे वगळता विकास नजरेत दिसत नाही. त्यामुळे निधी कमी पडला की विकास गायब झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २००८ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्र राज्यात काँग्रेस सरकार होते !!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 11/10/2018 - 11:53 नवीन
ओ मोदी भक्त तुम्हाला सापट मिळाली की तुम्ही कुठे पण चालू होता राव . .!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/10/2018 - 18:02 नवीन
असेल असेही असेल, इंदिरा बाई म्हणाल्याच होत्य, "गरिबी हटाव"
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sat, 11/10/2018 - 14:04 नवीन
महाराजांच्या दर्शनापेक्षा लोकांचा आनंद सागर कडेच ओढा जास्त असतो. साफ चूक. एक फरक आहे. शेगाव संस्थान सरकार चालवत नाही. त्यांचे वेगळे मंडळ आहे. स्वयं स्फूर्ती ने बिनपगारी लोक तिथे काम करतात. तिथला पैसा बघून सरकार मागे ते खिशात घालायला बघत होते. तिथल्या लोकांनी ते होऊन दिले नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 11/10/2018 - 16:38 नवीन
बुवा कारण मी सेवकांना,आणि त्याच जिल्ह्यातील कंपनीकर्म चारी यांना विचारले असता सहा महिने अगोदर सेवा नोंदणी करावी लागते आणि ते उस्फूर्त आहे. पाच वर्षांपूर्वी शेगाव देवस्थानच्या श्री शिंदे यांच्या परीचय आणि अविरत प्रयत्नशील वृत्ती वर दिवाळी अंकात लेख आला होता. शोधून डकवतो खाजगी शेगाव व सरकारी शिर्डी अनुभवी नाखु
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/10/2018 - 18:10 नवीन
सेवेकर्‍यांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य, १५ दिवस सेवा केल्यास मिळते......असे ऐकून आहे...
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 11/10/2018 - 03:05 नवीन
You are not in traffic. You are the traffic..
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Sat, 11/10/2018 - 12:07 नवीन
वरील प्रतिसादात शेगवचे नाव घेतले आहे. मी तेथे सुमारे ५ वर्षापूर्वी गेलो होतो. तेथील देवस्थान स्वच्छ आहे परन्तु गाव म्हणजे उकिरडा आहे. सर्वत्र उघडि गटारे व घाण वास. आता काय आहे हे माहित नाही परन्तु तसेच असेल.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 11/10/2018 - 12:27 नवीन
जवळपास तसेच असावे. पुढील आठवड्यात जाणार आहे. आलो की आखोदेखी सांगतो.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sat, 11/10/2018 - 14:06 नवीन
गावातील गटारे साफ करणें देवस्थान चे काम नाही. ते नगरपालिका चे काम आहे. न.पा. ते काम करत नसेल तर तो संस्थान चा दोष नाही.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 11/10/2018 - 16:28 नवीन
काही अंशी मान्य पण गावाला केवळ देवस्थानामुळेच खूप लोक येत असतील (पंढरपूर , तिरूपती इत्यादी ) तर गावाची स्वच्छता ही कमीत कमी बसस्थानक , रेल्वे स्थानक स्वच्छता ही देवस्थानाची नैतिक जवाबदारी ठरते . अर्थात हे माझे वैयक्तिक मत !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/12/2018 - 05:06 नवीन
गावाची स्वच्छता ही कमीत कमी बसस्थानक , रेल्वे स्थानक स्वच्छता ही देवस्थानाची नैतिक जवाबदारी ठरते हे मान्य नाही. नगरपालिका येणाऱ्या भाविकांकडून कर गोळा करते( भाविक येत असल्यामुळे तेथे व्यापाराला मिळणाऱ्या चालनेमुळे नगरपालिकेला कर मिळतो) शिवाय रेल्वेला येणाऱ्या प्रवाशांमुळे उत्पन्न मिळते तेंव्हा त्याची स्वच्छता करणे हि त्यांचीच जवाबाबदारी आहे. (सी एस टी स्थानकाच्या स्वच्छतेची नैतिक जबाबदारी कुणाची? हा विचार मनात चमकून गेला) स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी देवस्थानावर टाकणे हे बरोबर नाही. बाकी नैतिक जबाबदारी म्हणजे हवेत बार आहे त्याबाबद्दल नक्की काहीच म्हणता येणार नाही. हीच नैतिक (आणि सामाजिक सुद्धा) जबाबदारी येणाऱ्या भाविकांची जास्त आहे. बाकी मी काय म्हणतो तुळजापुरात पान तंबाखू गुटखा मावा याना सरसकट बंदी का घालू नये? आणि पान खाऊन थुकला तर सज्जड असा १००० रुपये दंड का करू नये? देवस्थानचे पावित्र्य या नावाखाली ते खपवता येईल अन्यथा आपले नेहमीचे यशस्वी कलाकार अभिव्यक्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली येतीलच बोम्ब मारायला.
  • Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर Sat, 11/10/2018 - 17:28 नवीन
मला स्वतःला कोठल्याहि देवाची पूजा हा एक भातुकलीसारखा खेळ वाटतो. तो खेळायची इच्छा नसल्याने कोठल्याच देवळात कधीच जात नाही. अगदी असे नाही, प्राचीन, शिल्पकलायुक्त अशा देवळात शिल्पकला बघायला जातो. पण भक्तिभावाचा पूर्ण अभाव असल्याने रांगेत उभे राहून दोन सेकंदांसाठी दर्शन हा प्रकार नाही, त्यामुळे हा त्रास नाहीच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/10/2018 - 18:00 नवीन
"देव अथवा देवी जर तिन्ही त्रिकाळ जागी असेल आणि ते कुठेही येवू शकत असतील आणि माझी जर भक्ती खरी असेल तर, ह्या त्रिसुत्रीने मी असेन तिथून प्रार्थना केली तरी पण ती देवाला अथवा देवीला पोहोचली पाहिजे." आम्ही सध्या फक्त मानसपूजाच करतो. आमच्या वाल्याने पण मानसपूजाच केली आणि धृवाने पण मानसपूजाच केली. आणि कुठल्याही बाबा किंवा महाराजांच्या पाया पडायची आमची योग्यता नाही.सगळेच बाबा अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, आणि आम्ही आपले ७-८ फूटी सरपणाचे धनी.आपले सरपण स्वतः साठवून ठेवणे, इतपतच आमची पृथ्वीसेवा.... बाकी, समाजाला समजावता समजावता, गाडगेबाबा पण थकले आणि तुकडोजी पण थकले... माहीमचा समुद्र गोड झाला म्हणून ते खारट पाणी पण पिणारा आणि देव दूध प्यायला लागले, हे ऐकून देवाला दूध पाजणारा समाज, आपण बदलू शकत नाही....
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 11/10/2018 - 19:35 नवीन
विटुकाका, तुमी ज्या वेळेस गेलात तेंंव्हा नेमका सफाई कामगराचां संप चालु होता पगारवाढीसाठी. त्यामुळे लाख लोकांनी केलेली घाण हजार लोक कशी साफ करणार.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 11/11/2018 - 11:36 नवीन
आपल्या कडची बरीच शहरं (ती दोन सुध्दा , ज्यांचा सतत उल्लेख असतो) , ही जगातल्या इतर शहरांशी तुलना करता "गावंढी" च आहेत.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 11/11/2018 - 16:20 नवीन
राग मानू नका. वाचकांनी देवीबद्दल काहीच तक्रार, गैरसोय नमूद केलेली नाही,ती अगदी गरीबातल्या गरीबाचीही माय आहे,भक्ताकडून होणारी वेडीवाकडी यथाशक्ति यथामति पूजा उपासना गोड मानून घेते. मूळ प्रश्न तिच्या नावानेच चाललेल्या सरकारी (राजकीय सर्वपक्षीय) दरोडेखोराकडून सुविधांचा पैसा अपहार करण्यास आहे. पण पल्लेदार हमखास काळजाला हात घालणारी वाक्ये टाकून एकूणच ही गैरसोय निव्वळ भक्त मंडळीमुळेच झाली आहे असा केतकरी अग्रलेख वाचल्यानंतर जो विचार येतोय तोच इथे येतोय. आधिच बाण मारून त्याच्याभोवती वतृळ काढणं फार कठीण नाही.पण चांगलही नाही. धाग्यावर असलेले कुणीही श्री क्षेत्र गोंदवले येथे गेले असेल तर फरक कळेल (दोन्ही ठिकाणे पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेले आहेत) तरीही स्वच्छता,योग्य दर्शन व्यवस्था आणि माफक दरात निवासी सोय अनुभवून पहा. शिर्डी संस्थान किमान तीन दशकं एकाच घरातल्या राका आमदारांच्या ताब्यात घेतले गेले होते. जागेचे भाव तर सोडाच बाकीच्या ठिकाणी सुद्धा त्या आमदारांचा हिस्सा असे. (शिर्डी संस्थान मधील आश्चर्यकारक माहिती मला माझ्या मावस बहीणीच्या यजमानांकडून मिळाली होती,ते शिर्डी देवस्थानचे खातं असलेल्या बॅंकेत १५ पेक्षाही जास्त वर्षें होते) माझं कुलदैवत तुळजाभवानी आहे आणि गेल्या २५ वर्षांत फार काही लक्षणीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत असं वाटतं नाही.) ता क. गणपतीत आपण दंपत्ती घरी आला नाहीस, किमान दिवाळी फराळासाठी आता नक्की येणे, आपला पहिलाच दिवाळसण असल्यानं ऐन दिवाळीत बोलावलं नाही म्हणून क्षमस्व जेजुरी खंडेराया व तुळजाभवानी भक्त नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा