Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

CPT IPCC CA Final ह्यांचे गौड बंगाल !

अ
अत्रन्गि पाउस
Mon, 07/30/2018 - 12:26
🗣 76 प्रतिसाद
सी ए होण्यातल्या cpt / IPCC / CA फायनल ह्या परीक्षा सध्याच्या कॉमर्स शाखेतील एक मोठा विद्यार्थ्यांचा गट ह्या दुष्ट चक्रात अडकलेला आहे ... काही दिवसांपूर्वी सी ए झालात असे सांगून काही तासात तुम्ही सी ए झालेले नाही आहात असा निर्णय दिला : शेकडो विद्यार्थी भ्रमिष्ट व्हायचे बाकी होते काल सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२० (फक्त १ टक्का) विद्यार्थी IPCC चे दोन्ही ग्रुप पास झाले ..झाले नाही केले ह्या संस्थे वर कुणाचाही कंट्रोल नाही कायद्याने, ह्यांच्या निर्णयाला म्हणे कोर्टात सुद्धा अपील करता येत नाही ! ह्यांचे पेपर तपासणारे अधिकृत सी ए तपासनीस आपले पेपर्स अन्य कुणाकडून तपासून घेतात अशी वदंता आहे सी ए आर्टिकल शिप करणारे बहुतेक तरुण मुळे मुली त्यांच्या सिए फर्म्स कडून अत्यंत अल्प दरात पिळून घेतले जात आहेत आणि ह्यावर कुणाचेहि अपील नाही .. हे सगळे काय चालू आहे ? अजून किती दिवस ? आणि का हि मनमानी चालू आहे ? ह्याच्यावर उपाय काय ? फेसबुक वार ह्या वेळच्या सिए टोपर चा इंटरव्यू बघितला (तो खरा टोपर असेल तर) त्याचे एकंदर अवतार आणि भाष्य बघून हसावे कि रडावे कळत नव्हते भारतीय सिए लोकांच्या सही ला आंतरराष्ट्रीय स्तरावर "फक्त सिए" म्हणून कितपत किंमत आहे ? मुळात किती सिए हवे आहेत, एकूण उत्तरांमध्ये नेमके काय अपेक्षित आहे ? मार्क मिळाले तर का मिळाले आणि कापले तर नक्की का कापले ह्याचे कुठलेहि उत्तर कुणीही कधीही देत नाहीत माकेंझी सारख्या लोकांनी सिए ह्या क़्वलिफ़िकेश्न्ल मान्यता देणे बंद केले आहे हे खरे का ?? ह्या सगळ्यात काही पारदर्शकता का येऊ शकत नाही ? तज्ञांचे काय मत आहे ?? शेकडो हजारो तरुण उत्साही विद्यार्थ्यांच्या मनस्थिती शी हा अक्षम्य खेळ कुणीतरी आवरलाच पाहिजे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21374 views

🗣 चर्चा (76)
ब
बरखा Tue, 07/31/2018 - 14:21 नवीन
सी ए आर्टिकल शिप करणारे बहुतेक तरुण मुळे मुली त्यांच्या सिए फर्म्स कडून अत्यंत अल्प दरात पिळून घेतले जात आहेत आणि ह्यावर कुणाचेहि अपील नाही .. हे अगदी खरे आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/31/2018 - 16:07 नवीन
एके दिवशी ICAI या संस्थेचे एक उच्च पदाधिकारी ज्यांना एकंदर अर्थ क्षेत्रात बराच मान आहे. यांनी माझ्या वडिलांविषयी अतिशय अनुदार उद्गार काढले. त्यावेळेस मी रागाने सर्वांसमोर त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली. त्यांना मी स्पष्ट शब्दात म्हणालो तुमची संस्था चोर आहे. हजारोलाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी केवळ पैशासाठी तुम्ही खेळत आहात. भारंभार मुलांना सी ए च्या सि पी टी मध्ये पास करता आणि मग त्यांच्या कडून परत परत परीक्षेचे पैसे वसूल करत राहता. एकदा सी पी टी पास झाली कि मुलांना आशा लागून राहते कि आपण सी ए होऊ. आणि शेवटी फक्त एक टक्का मुले सी ए होऊन बाहेर पडतात. बाकी ९९ टक्के भ्रमनिरास होऊन आयुष्याची मौल्यवान अशी तारुण्याची वर्षे फुकट घालवून दुसरी कडे जातात. सी पी टी मध्ये दर सहा महिन्याला दीड एक लाख मुले बसतात त्यातील ३५ ते ४० % मुलांना तुम्ही पास करता म्हणजे ५०००० मुलांना दर सहा महिन्याला म्हणजेच वर्षाला १ लाख मुलांना पास करता. यातील जेमतेम २५ % मुले आय पी सी सी पास होतात म्हणजेच २५००० मुले एक किंवा दोन ग्रुप पास होतात. बाकी ७५००० मुलांची फी तुम्ही खाऊन बसता आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करता. या २५००० मुलांपैकी अनेक मुले एक ग्रुप पास करून दोन तीन वर्षे आर्टिकल शिप करून सोडून देतात आणि शेवटी उरलेल्या १५-१६००० विद्यार्थ्यांपैकी ३-४००० मुले शेवटी सी ए होतात. हि २५००० मुले मग आय पी सी सी चा एक ग्रुप पास झाला तरी आर्टिकल शिप चालू करतो या आर्टिकल शिपच्या नावाखाली तीन वर्षे हि मुले विद्यावेतनाच्या नावाखाली ३-४००० रुपयावर १२ तास राबतात. हे विद्यावेतन त्याच कार्यालयात काम करणाऱ्या B COM कारकुनाच्या एक तृतीयांशा पेक्षाही कमी असते. या पैशात ती मुले दोन वेळेस धड आपले पोटहि भरू शकत नाहीत. DIGNITY OF LABOUR नावाची कोणतीही गोष्ट आपल्या संस्थेला मान्य नाही असेच दिसते. सर्वच्या सर्व सी ए कडे अशी मुलेच व्यावसायिकांचे आयकर भरण्याचे काम करीत असतात. त्यांनी आम्ही त्यांना काम करत असताना प्रशिक्षण देतो असे गुळमुळीत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या वर भडीमार चालूच ठेवला होता त्यांना "काम करत असताना शिक्षण" या नावाखाली अक्षरशः पिळून घेता आणि त्यांना शिकवतं कोण तर त्यांचेच वरिष्ठ विद्यार्थी. कोणत्याही सी ए कडे व्यवस्थित असे शिकवण्याचे वर्ग होत नाहीत. कोणतेही पुस्तकी शिक्षण त्यांना दिले जात नाही. म्हणून मग हि बिचारी मुले वेगवेगळ्या क्लासेस मध्ये IPCC किंवा FINAL मध्ये पैसे भरून शिकत राहतात. तेथे त्यांना केवळ परीक्षा कशी पास व्हायची याचे प्रशिक्षण दिले जाते. यातून मग बाहेर पडणारी मुले उद्योगधंद्यात सुरुवातीला फार दिशाहीन स्थितीत असतात. केवळ अंगच्या हुशारीने आणि मेहनतीने ती वर येतात. अर्थात हि स्थिती दर वर्षी पास होणाऱ्या ३-४००० विद्यार्थ्यांची आहे. बाकी सव्वा ते दीड लाख मुले स्वप्नांचा चुराडा होताना पाहून नाउमेद होऊन दुसऱ्या मार्गाला वळतात. ते म्हणाले कि जर आम्ही भारंभार मुले पास केली तर सी ए ची बाजारात किंमत कमी होईल. मी त्यांना म्हणालो आता बाजारात गरज आहे म्हणून तुम्ही ८% लोकांना पास करायचे मग जास्त सी ए झाले म्हणून पुढच्या वर्षी तेच प्रमाण २ % आणायचे हे पोरखेळ बंद करा. मागच्या वर्षी सब घोडे बारा टक्के म्हणून भरपूर सामान्य मुलांना पास केलं आणि आता अतिशय हुशार मुलेही नापास केलीत. तुमच्या संस्थेला कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध नाही असेच दिसून येत आहे. मी त्यांना परत म्हणालो कि एवढ्या भारंभार मुलांना सी पी टी मध्ये पास करण्यापेक्षा जर मला १० % मुलांनाच पास केले तर इतकी तरुण मुले नाउमेद आणि स्वप्नभंग झालेली दिसणार नाहीत. परंतु तुमच्या संस्थेला पैसा पाहिजे.तुम्ही लोक चोर आहात. आणि म्हणून तुम्ही सी ए फायनल पास झाल्यावर आर्टिकलशिप करू देत नाही. जसे कंपनी सेक्रेटरीची संस्था करते. कारण मग तुमच्या सी ए लोकांना स्वस्तात मिळणारे २५-३०००० वेठबिगार कसे मिळतील? संस्थेने विद्यावेतन पण ४००० ठरवले आहे म्हणजे रोजचे १२५ रुपये हे किमान वेतन मिळणाऱ्या मजुरापेक्षाही कमी आहे.यात मुंबईत बहुसंख्य मुलांचा प्रवास खर्चही निघत नाही. हे विद्या वेतन तुम्ही कमीत कमी १०००० का करू शकत नाही कि ज्यात त्या मुलाचे दोन वेळचे जेवण तरी निघू शकेल.असे करण्यासाठी तुमच्या संस्थेच्या खिशातून काहीही जात नाही. यावर त्यांचे काहीही उत्तर नव्हते. त्यांनी माझ्या वैद्यकीय व्यवसायात कुठे प्रशिक्षण असते म्हणून आडवे जाण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना स्पष्टपणे म्हणालो वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी आठ ते पाच असे प्रत्यक्ष वर्ग होतात जेथे रोज ३ तास प्रेताचे डिसेक्शन पासून ४ तास प्रत्यक्ष वर्गात तास असतात. कार्यशाळा प्रयोग शाळा, क्लिनिक अशा विविध ठिकाणी शिकवले जाते. वैद्यकीय प्रवेश परीक्षा कठीण आहे हे मान्य पण एकदा विद्यार्थी प्रवेश घेतला कि शेवटी पदवी मिळण्याची शक्यता ९० % पेक्षा जास्त असते नि नीट अभ्यास केला तर १००%. प्रवेश मिळालाच नाही तर विद्यार्थी सुरुवातीलाच वयाच्या १८ व्या वर्षीच दुसरा मार्ग निवडतो. तुमची संस्था यातील काय करते? उगाचच तुलना करायचा प्रयत्न करू नका. विद्यावेतन म्हणून साडे चार वर्षे शिक्षण झाल्यावर इंटर्नशिप मध्ये १६००० रुपये विद्यावेतन मिळते ज्यात तो विद्यार्थी वयाच्या २३ व्या वर्षी निदान स्वतःचे पोट भरू शकतो. तुम्ही तीन वर्षे ४००० रुपयावर राबवून घेता आणि जर तो शेवटी परीक्षा पास झाला नाही तर हातात काहीही राहत नाही. आणि हि स्थिती १० % नव्हे तर ९५ % टक्के विद्यार्थ्यांची आहे. तुम्ही एक पिढीच्या पिढी बरबाद करता आहात. तुमच्या कडे मुलगी २३ वर्षापर्यंत वाऱ्या करत राहते आणि मग शेवटी लग्नाचे वय झाल्यामुळे सी ए नापास असा शिक्का घेऊन आयुष्यभर राहते. वस्तुतः कॉमर्स कॉलेज मधील प्रत्येक मुलगी हि लग्न होईपर्यंत सी ए करत असते असा भीषण विनोद ही ऐकायला मिळतो. आणि तुमची संस्था काय करते आहे ते २०१७ च्या १ जुलै रोजी ICAI संस्थेच्या श्री मोदींच्या भाषणात स्पष्ट झालेले आहे. गेल्या ३० वर्षात फक्त १४ सी ए विरुद्ध कारवाई झालेली आहे. सी ए चे नियमन करणारी हि संस्था साफ अपयशी ठरली आहे. किंवा इतके सगळे घोटाळे झाले त्याबद्दल संस्था काहीही करू शकली नाही. राष्ट्रीयीकृत बँकांचे तिमाही लेखापरीक्षण होते त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही याउलट खाजगी बँका दोन वर्षात एकदा लेखा परीक्षण करतात पण त्यांची स्थिती राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा कितीतरी चांगली आहे असे रिझर्व्ह बँकेचा अहवाल सांगतो आणि त्यामुळे हे लेखा परीक्षण बंद करा असे रिझर्व्ह बँकेने सरकारला सुचवले तर आपल्या लोकांच्या पोटावर पाय येतो म्हणून तुमच्या संस्थेने सरकार दरबारी वजन वापरून ती शिफारस बासनात गुंडाळून ठेवली. एवढा भडीमार ऐकून हे गृहस्थ सर्द झाले आणि मला विचारू लागले कि मग तुमचं म्हणणं तरी काय आहे? मी त्यांना स्पष्टपणे म्हणालो कि सुरुवातीलाच जर तुम्ही भारंभार विद्यार्थ्यांना आशेला लावून सी पी टी मध्ये पास करता ते बंद करा. १०% विद्यार्थ्यांनाच पास करा म्हणजे मग एक किंवा दोन प्रयत्नांनी बहुसंख्य विद्यार्थी तो नाद सोडून दुसरीकडे जातील. निदान आयुष्यातील उमेदीची तीन चार वर्षे अक्षरशः पाण्यात जाणार नाही. म्हणजे मग उगाच आमचा दर्जा पातळ होतो हि हाकाटी करायची गरज राहणार नाही. एवढा भडीमार केल्यावर ते सर्द झाले आणि माझ्या गोष्टी त्यांना मान्य कराव्याच लागल्या. परंतु यामुळे संस्थेच्या कारभारात काही बदल होईल याची सुतराम शक्यता नाही किंवा मला तशी आशा पण नाही. एक अजून मुद्दा जो मि त्यांच्याशी बोललो नाही -- या सगळ्या व्यवहारात सी ए (सी पी टी, आय पी सी सी, फायनल) चे क्लास चालवणारे चालक यांचे मोठे हितसंबंध आहेत आणि त्यांचे ICAI बरोबर साटेलोटे आहेत हि उघड गोष्ट आहे आणि काही चालक हे या संस्थेचे मानद पदाधिकारी हि आहेत असे ऐकतो. लिहिण्यासारखे अजून बरेच काही आहे. परंतु येथेच थांबतो. जाता जाता -- माझी मुले सी ए च्या अभ्यासक्रमाकडे गेलेली नाहीत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 07/31/2018 - 20:18 नवीन
+१०० भारतात शिक्षणाची दुकाने मांडण्यात कोणत्याही विषयामध्ये अपवाद सापडणे कठीण आहे :(
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 08/01/2018 - 04:03 नवीन
आणखीन एक म्हणजे सीए फायनल साठी झिजणारे माझ्या माहितीतली ९०% मुले "झक मारली आणि इथे आलो, करायचे काय आहे आणि काय करतो आहोत ह्यात काही ताळमेळ नाहीये पण आता ह्या स्टेजला परतीचे दोर कापले आहेत म्हणून पुढे जायचे" अशा मनस्थितीत दिवस ढकलत आहेत. म्हणजे तुमच्या यातून मग बाहेर पडणारी मुले उद्योगधंद्यात सुरुवातीला फार दिशाहीन स्थितीत असतात. केवळ अंगच्या हुशारीने आणि मेहनतीने ती वर येतात. ह्या वाक्याची भयानकता अजूनच अधोरेखित होते
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 08/02/2018 - 04:10 नवीन
बाकी सगळं पटतंय, पण IIT entrance पास होणारे सगळे engineer होत नाहीत.. त्यातले अर्धा टक्का (किंवा कमी) IIT मध्ये जातात, उरलेले काही टॉप स्कूल मध्ये, आणि बाकीचे सगळे कुठेतरी कसातरी ढकलत असतात.. सगळीकडे हीच परिस्थिती आहे हो. आपल्याला / पालकांना समजले पाहिजे त्यांना काय जमेल आणि काय नाही ते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 05:44 नवीन
आपली तुलना साफ चुकली आहे. सी पी टी पास झाल्यावर मुले आय पी सी सी देतात यात पास होण्याचे प्रमाण २५% आहे. त्याचा एक ग्रुप पास झाला कि तीन वर्षाची वेठबिगारी आहे या तीन वर्षात ३-४००० या विद्यावेतनावर सी ए च्या फर्म मध्ये सकाळी ९ ते रात्री ९ असे काम केले जाते. एकंदर हा प्रवास किमान ४ वर्षाचा आहे आणि यातून शेवटी ३-४ % लोक सी ए होऊन बाहेर पडतात आणि बाकी ९६ % आयुष्याची महत्त्वाची वर्षे फुकट घालवून निराश मनाने वेगळ्या मार्गाला लागतात. माझा मुद्दा एवढाच आहे कि इतक्या लोकांची इतकी वर्षे केवळ संस्थेला परीक्षा फी मिळवण्यासाठी वाया घालवणे हि शुद्ध हरामखोरी आहे. साधा सरळ सी पी टी मध्ये १० % लोकांनाच पास केलं तर बॉ कॉम ची पदवी करत असताना विद्यार्थी दोन किंवा तीन वेळेस सी पी टी देईल उत्तीर्ण झाला तर ठीक अन्यथा बी कॉम होऊन दुसऱ्या मार्गाला लागेल ज्यात त्याची उमेदीची ३-४ वर्षे फुकट जाणार नाहीत. आणि सी ए ला चांगले पॅकेज मिळते हा एक मोठा गैरसमज आहे. साधारण महिना २५०००/- पासूनच ते सुरुवात करतात. कारण केवळ पुस्तकी ज्ञान. उद्योगाला हवे असलेले ज्ञान त्यांना दिलेच जात नाही. अभियांत्रिकीच्या परीक्षेत आपण कोणत्यातरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवता. मग आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आय आय टी एन आय टी किंवा इतर सरकारी अथवा खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळवता. यात बहुसंख्य विद्यार्थी ४ वर्षात ( ८ अर्ध वर्षात) अभियंते म्हणून बाहेर पडतात. मग नोकरी मिळेल कि न मिळेल हा भाग अलाहिदा परंतू एक सन्मान्य पदवी तर हातात पडतेच त्यानंतर बरेच मार्ग खुले होतात. मन लावून अभ्यास केला तर ९६ % लोक अभियंते म्हणून बाहेर पडतात ३-४% नाही
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 07/31/2018 - 16:51 नवीन
सडेतोड प्रतिसाद, अजुन येऊ द्या.
  • Log in or register to post comments
ट
टीकोजीराव Tue, 07/31/2018 - 17:18 नवीन
डॉक्टर साहेब जबरदस्त प्रतिसाद, CA Institute चे कपडे उतरवले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/31/2018 - 17:41 नवीन
साहेब "कपडे उतरवले' हा काही हेतू नव्हता. आपल्या आजूबाजूला किती तरुण मुले उज्ज्वल आयुष्याची स्वप्ने उराशी धरून उरी फुटताना पाहिली कि फार दुःख होते आणि त्याकडे मुर्दाड मनाने पाहणारे लोक पाहिले कि संताप होतो. त्यातून स्वतःच्या स्वार्थासाठी हजारो तरुणांना आशेला लावून त्यांच्या दोन तीन वर्षांचा नाश होताना पाहुन फार वाईट वाटते फार मोठे नसले तरी प्रत्येकाचे आयुष्याबद्दल एक छोटेसे तरी स्वप्न असते. असा स्वप्नांचा चक्काचूर होऊन निराश झालेले तरुण पाहून फार त्रास होतो. तो राग किंवा दुःख कदाचित बाहेर पडले सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/31/2018 - 18:04 नवीन
बोटीच्या नेविगेशनच्या (वरच्या ग्रेडच्या) तोंडी परीक्षेत चुकीचं उत्तर दिल्यास " पुढच्या वेळी तयारी करून या सांगतात." ती मुलं खलाशी म्हणून नोकरी करत असतात त्या कामाचा त्याला पूर्ण पगार मिळत असतो. मुलांनी बी कॅाम होऊन सरळ नोकरी धरावी आणि फावल्या वेळेत घरीच सीएचा अभ्यास करावा. अशा सीए करू इच्छिणाऱ्या मुलांना सीए फर्मने नोकरीला ठेवावे. बाबा रे तू सीए झालास तर उत्तमच अन्यथा तुला अकाउंटंट - असिस्टंट पगार+ नोकरी चालूच आहे. २०१६ ला एक रोटरी साहित्य संमेलन होतं त्यात एकदा दृष्टिहीनांचे कवितावाचन होते. चिंचवडहून आलेला पंचवीस वयाचा भूषण तोष्णीवाल सीए होता. मी त्याला विचारलं अभ्यास कसा केलास. " काही नाना, आईबाबा रोज पुस्तकं वाचून दाखवायचे, परीक्षेत राइटरला उत्तरे सांगायचो."
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Tue, 07/31/2018 - 18:04 नवीन
डॉ खरे यांचा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/01/2018 - 04:25 नवीन
कंपनी लॅा, निरनिराळे अकाउंटिंग नियम वगैरे क्लासला जाऊन शिकतात पण नंतर त्यांना स्वत:चे स्वत:च वाचून अर्थ काढायचा असतो. इंम्पॅार्ट, एक्सपॅार्ट, टॅक्सेशन इथले आणि मल्टिनॅशनल संस्थांचेही कितीतरी आर्थिक गुंतागुंतीचे नवीन पास झालेले नियम वाचून समजण्याची क्षमता नसलेल्यांनी एकूण सिएरचनेला दोष देणे पटण्यासारखे नाही. सिएफर्ममध्ये वीस वर्षे खर्डेघाशी केली म्हणजे झाला का सिए? अप्रामाणिकपणे दोनचार सिएंनी काम केले म्हणजे सर्व संस्थाच भंगारात कशी काढता? माझे विरोधी मत नोंदवत आहे. जे विद्यार्थी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात सिए पास होत नाहीत त्यांनी तो अभ्यासक्रम सोडून दुसरा धरावा. उगाच वेळ अन पैसा वाया दवडू नये. उगाच मला तीनचार हजारात साताठ वर्षं राबता कशाला?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 08/01/2018 - 12:30 नवीन
प्रतिसाद आणि तो हि विरोधी नोंद्व्ल्याबाद्द्ल मनापासून धन्यवाद ... मूळ विषय सीए लोकांविषयी नसून एकूण institute आणि परीक्षा पद्धती बद्दल आहे. १. पेपर तपासणारे किमान सिए असावेत हि अपेक्षा: प्रत्यक्षात हे असे होत नाहीये: पेपर् तपासणे सर्रास औट सोर्स केल जातंय. (त्यामुळे उत्तरांना ७/५ मार्क्स मिळाल्याची उदाहरणे आहेत; पेपर न तपासताच उत्तरांना शून्य मार्क दिल्याची उदाहरणे आहेत, वाईट भाग हा कि ह्यावर कुणीच काही करून शकत नाही आणि हे चुकीचे आहे) २. एखाद्या उत्तरात नेमके काय अपेक्षित आहे, किंवा मार्क गेले ते कशाने, नक्की काय केले असते म्हणजे अजून मार्क मिळाले असते हे त्या विद्यार्थ्याला कधीच समजू शकत नाही. विषयाची स्ब्जेक्तीव्हीटी लक्षात घेता अशा वेळी विद्यार्थ्याला विषय समजला आहे कि नाही ह्याचा अंदाज घेऊन मार्क्स दिले गेले पाहिजेत न ? ३. मुळात नक्की किती सिए तयार करायचे आहेत हे दर वर्षी बदलायचं का ? आणि जर बदलले तर तो आकडा जाहीर का नाही करायचा ? आय आय टी मध्ये सुद्धा एकूण सीट्स किती असतील वर्षानुवर्षे परीक्षेच्या पुरेसे आधी माहित असते तर सिए बाबत ते का गुलदस्त्यात आहे ? ४. भारंभार सीपीटी मध्ये पास करून त्यातील ९०% मुलांना सिए फायनल ला ठरवून नापास करायची, ते हि भरपूर फी घेऊन ? वर्षातून २ दा ? हि कुठली स्ट्रेटेजी ??? ५. ४-५ हजार रुपये इतका कमी स्टायपेंड देण्या मागची मानसिकता (सिइंची नव्हे इंस्तीत्युत ची) काय आहे ? cpt पास झाल्यानंतर यच्चयावत जनते पैकी बहुतांश मुले कमालीची वैतागलेली आहेत हे सत्य तुम्ही नाकारताय ? बाकी अभ्यासक्रमाच्या गुंतागुंतीविषयी: उच्च दर्जाचा कुठलाही अभ्यासक्रम हा व्यमिश्र असतोच आणि बहुतांश मुले तो पूर्ण करतातच, पासही होतात. इथे १ / २ % पासिंग करणे हे अमानुष नाही ? ह्यात वरती डॉक्टर साहेब म्हणले तसे गुणवत्ता / ज्ञान / संशोधन आणि विद्यार्थ्यांचा कस लाऊन त्यांना पुढे आणा ह्या पेक्षा ह्यातील प्रचंड पैसा ढापणे हि वृत्ती आणि आम्हाला कुणी विचारू शकत नाही हा प्रचंड माज दिसतोय !!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/01/2018 - 15:06 नवीन
तोंडी परीक्षेला दोनतीन अकाउंटन्सी संबंधी नसेलेले लोक बाजुला बसवा म्हणजे नक्की कळेल की त्या मुलांना त्यात गती आहे की नाही. मग उगाचच साताठ अटेम्प्ट करणे हे त्यांनी ठरवावं. कित्येक मुलं साइडबाइसाइड बी कॅाम,एम कॅाम करत पहिल्या फटक्यात पास होतात आणि मोठ्या कंपनीत लगेच घेतलेही जातात. त्या कंपन्या कशाला देतील साताठ लाखाचे प्याकेज? तिथेही उगाचच फेल करत असतील? किती मुले चांगली दर्जेदार अकाउंटन्सीची पुस्तके, त्यातले चाप्टर्स इन्ट्रडक्टरी पेजिजसह ( वीसपंचवीस पाने) वाचतात? किती एक्स्ट्रा रीडिंग करतात?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 08/01/2018 - 17:33 नवीन
.
Kityek mule करत पहिल्या फटक्यात पास होतात आणि मोठ्या कंपनीत लगेच घेतलेही जात
किती??? 2 3 % एकूण पास होतात ह्यात तुम्हाला काही गैर वाटतं का? 7 8 लाखाच्या पॅकेज च कौतुक नाहीये 95% लोक सातत्याने नापास करतात, कसलाही हिशोब नाहीये त्यावर बोलाल का? जितुक्या लोकांना सिपीटी पस करतात ते सीए होऊ शकतील असे म्हणून मग त्यातले जेमतेम 2-5 टक्के पास होऊ द्यायचे तेही वर्षानुवर्षे, दरवर्षी 2 दा
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 08/01/2018 - 15:28 नवीन
मला ca प्रकरण झेपतच नाही.. एक जरी पेपर राहिला तरी परत सगळा ग्रुप द्यावा लागतो, का?? त्यातही पास होणारे लोक 1%. क्लासेस पण हेक्टिक. फिस पुष्कळ. इतकं करून समजा नाहीच झालात CA तर पर्याय काय असतात? इतर काही कोर्स करता येतो का? माझ्या चुलत भावाने 2 दा cpt ट्राय केली. नापास झाला. आम्ही त्याला उगाच नसत्या गोष्टीमागे लागू नको म्हणून पटवलं. त्यालाही नशिबानी पटलं की इतक्यात आपली दमछाक झाली तर पुढे काय? नाद सोडून इतर चांगल्या गोष्टी शोधल्या.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 09:02 नवीन
एक जरी पेपर राहिला तरी परत सगळा ग्रुप द्यावा लागतो, का?? ] हा पण एक आचरटपणाचा बाजार आहे. बरीच मुले एक विषय राहिला म्हणून बाकी तीन किंवा चार विषयात परत परत बसत राहतात. हा शुद्ध मूर्खपणा आहे. ४० गुणांना पास पण सरासरी गुण ५० % हवेत. आणि एका विषयातून सुटका(EXEMPTION) हवी असेल तर त्यात ६० गुण मिळाले पाहिजेत. त्यातुन हि परीक्षा SUBJECTIVE आहे. त्यामुळे ६० % गुण दिलेच जात नाहीत. अभियांत्रिकीच्या लोकांना जर सांगितले कि तुमचा M ३,M ४,किंवा M ५ हा एक विषय एक गुणाने राहील तर सगळेच्या सगळे विषय परत द्यायला लागतील तर आजमितीला ५० % तरी मुलांनी अभियांत्रिकी सोडून दिली असती. त्या वरिष्ठ सी ए याना मी हा पण मुद्दा विचारला कि हा भंपकपणा कशासाठी. त्यांनि याचे लंगडे समर्थन करायचा प्रयत्न केला पण त्यांना स्वतःला पण त्यात भंपकपणा दिसत असावा. तुम्हाला जर मुळात दर्जा सांभाळायचा असेल तर पास करण्याचे गुणच ५० % करा कि पण तीन विषयात ५९ गुण मिळाले आणि एकात ३९ मिळाले तरी त्या चारही विषयांचा परत अभ्यास करून परत अख्खी परीक्षा द्यायची? इतका भंपकपणा कोणत्याही परीक्षेत नसेल. तीन विषयात त्या मुलाला ५९ गुण आहेत ना मग त्याला ३९ गुण असलेला एकच विषय परत देउ दे कि. तुम्हाला एका विषयात ७० गुण मिळाले आणि बाकी तीन विषयात ४४ ४३ ४३ असे मिळाले तरी तुम्ही पास आणि हुशार पण ५९,५९,५९ आणि ३९ मिळाले तरी चारही विषय परत. किंवा ४९ ,४९ ,४९ ,४९ मिळाले तरी चारही विषय(अख्खा ग्रुप) परत कारण एकूण गुण ५०% नाहीत . एकंदर परीक्षा पद्धती केवळ मुलांना नापास करण्याच्या दृष्टीने चालवली आहे असेच दिसून येते. परीक्षेचा मूळ हेतू काय तर विद्यार्थ्याला विषयाचे किमान ज्ञान आहे कि नाही हे तपासणे हा हेतू तीन विषयात ५९ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला परत परत परीक्षा द्यायला लावण्यात कसा साध्य होतो हे समजत नाही. गम्मत म्हणजे जोवर मी इतकी भयाण त्रुटी दाखवून दिली नव्हती तोवर मी बोललो त्यापैकी एकही सी ए माणसाला यात काही वावगे वाटले नव्हते. मी एम डी ची परीक्षा घेत असताना एक बाह्य परीक्षक एका विद्यार्थ्यांबद्दल बोलताना म्हणाला कि त्याला अमुक तमुक माहित नाही ( या गोष्टीचा आमच्या विषयाशी दुरान्वये थोडासा संबंध होता). मी त्यांना शांतपणे म्हणालो कि सर आपण येथे विद्यार्थ्याला किती येते हे पाहण्यासाठी आलो आहोत, किती येत नाही ते पाहण्यासाठी नाही. आज तुम्ही माझी परीक्षा घ्यायचे ठरवले तर मीही सहज नापास होईन. मुळात आपला विद्यार्थी बाहेरच्या जगात एम डी डॉक्टर म्हणून व्यवसाय करताना त्याला रास्त असे ज्ञान आहे कि नाही हे समजून घेणे हा आपला हेतू आहे. यावर ते निरुत्तर झाले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/01/2018 - 18:31 नवीन
एकदोन झटक्यात पास होता येत नाहीातर द्या सोडून. हेच म्हणतो. नुसते पास नव्हे तर स्पर्धात्मक ठेवून थोडेच वरचे पास केलेल्यांत नंबर लागत नसेल तर तीनचार हजार रुपये महिना घेऊन आयुष्याची आठदहा वर्षे वाया घालवू नका हेच म्हणतो. आणखी काही मुद्दा सांगण्यासारखा माझ्याकडे नाही.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 08/02/2018 - 06:58 नवीन
<वात्रट मोड ऑन> इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेली मुले अनेक वर्षे मी ए एम आय ई करतोय असे सांगतात. बी कॉम झालेली मुले मी सीए/सीडब्ल्यूए करतोय असं सांगतात. आणि बी ए झालेली मुले मी एल एल बी करतोय असे सांगतात. बहुतांश मुले हे पूर्ण करत नाहीत. <वात्रट मोड ऑफ>
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 07:28 नवीन
हा भाग वेगळा आहे. आपण आहोत त्यापेक्षा आपली क्षमता जास्त आहे हे समाजाला सांगायची गरज सर्वच माणसांची असते. यामुळेच होंडा अकॉर्ड घेणारा माणूस सुद्धा मी मर्सिडीझ घेणार होतो पण मर्सिडीझमध्ये पूर्वीसारखी क्वालिटी राहिली नाही हे सांगतो. आपण बड्या लोकांना कसे ओळखतो किंवा युरोप अमेरिकेत सहज जाऊन येता येते किंवा मोठ्या कंपन्यात मला कसे बोलावले होते इ इ. परंतु सी ए च्या वाऱ्या करणाऱ्या मुलांना खरंच सी ए व्हायचं असतं आणि सी पी टी मध्ये मिळणारे ८० % गुण त्यांच्या या आशावादाला खतपाणी घालत असते. हाच तर ICAI संस्थेचा डाम्बरटपणा आहे. तरुण मुलांना आशेला लावून त्यांच्याकडून परीक्षेचे पैसे उकळायचे. एखाद्या लबाड ज्योतिषासारखे किंवा हलकट बिल्डर सारखे काम एखाद्या सरकारी स्वायत्त संस्थेने करून अक्षरशः हजारो तरुणांना स्वप्ने दाखवणे आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणे इतकी वाईट गोष्ट दुसरी नसेल.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 08/02/2018 - 10:53 नवीन
>>परंतु सी ए च्या वाऱ्या करणाऱ्या मुलांना खरंच सी ए व्हायचं असतं डिप्लोमा वाल्याला पण खरंच ए एम आय ई व्हायचं असतं हो
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 15:52 नवीन
हाच फरक आहे (IE) इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स मध्ये आणि ICAI मध्ये IE मध्ये ३ टक्केच पास करायचे असे ठरवून बाकीच्यांना नापास केले जात नाहीत. विद्यार्थ्याला ४० गुण मिळाले कि तो विषय सुटला. उगाच अख्खा ग्रुप एकत्र पास करा किंवा एकंदर ५० टक्के आणा असला भम्पकपणा नाही. जे विद्यार्थी एका पातळी पर्यंत येतात ते पास विषय संपला. यावर्षी इंजिनियर जास्त झाले मग चांगल्याला पण ठरवून नापास करा असला हलकट पणा नाहीये.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/02/2018 - 07:36 नवीन
नमस्कार अत्रन्गी पाऊस. तुमचा (आणि डॉ खर्‍यांचा) आयसीएआय आणि सीए कम्युनिटीवर काही वैयक्तिक राग असावा. तरी तुमच्या शक्य तितक्या प्रश्नांची शांतपणे उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो.
सी ए आर्टिकल शिप करणारे बहुतेक तरुण मुळे मुली त्यांच्या सिए फर्म्स कडून अत्यंत अल्प दरात पिळून घेतले जात आहेत आणि ह्यावर कुणाचेहि अपील नाही ..
आर्टिकलशिप ही नोकरी नसून विद्याभ्यास आहे. आणि या सांगोवांगीच्या गोष्टी नसून तसं खरंच आहे. माझ्या आर्टिकलशिपमध्ये मिळवलेले कित्येक अनुभव, कौशल्यं मी आजही रोज वापरतो. (आर्टिकलशिप संपवून जवळजवळ तप झालं.) भावी चार्टर्ड अकाऊंटंटला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी असते. पैसे मिळवणे हे आर्टिकलशिपचं ध्येय नाही. माझ्या नशिबाने मला पैसे कमवून आणण्याचं बंधन त्या काळी नव्हतं. (तरी मला लायकीपेक्षा जास्तच विद्यावेतन मिळत असे असं माझं मत होतं.) पण माझ्या एका मित्राला घरातल्या काही अजब कारणांमुळे तसं होतं, आणि त्याला त्याचे 'मास्तर' महिना सात हजार रुपये पगार देत. (इन्स्टिट्यूटची तत्कालीन नियमावली बाराशे रुपयांची होती.)
भारतीय सिए लोकांच्या सही ला आंतरराष्ट्रीय स्तरावर "फक्त सिए" म्हणून कितपत किंमत आहे ?
मी भारतीय सीए आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतो. पण मी 'फक्त सीए' नाही, अन्यही काही शिकलेला आहे. मी ज्या कंपनीच्या इमारतीत काम करतो तिथे किमान २० तरी भारतीय सीए आहेत, ते मात्र 'फक्त सीए' आहेत. हा थोडा 'सिलेक्शन बायस'चा प्रकार असला, तरी मुद्दा असा आहे, की भारतीय सीएंना जगभरात खूप किंमत आहे. इतकी, की अनेक देशांच्या सीए इन्स्टिट्यूट्सनी भारतीय सीएंसाठी 'एक पेपर द्या आणि आमचे सीए व्हा' ही स्कीम काढली आहे.
माकेंझी सारख्या लोकांनी सिए ह्या क़्वलिफ़िकेश्न्ल मान्यता देणे बंद केले आहे हे खरे का ??
हा इसम कोण आहे मला माहीत नाही. तुम्ही 'मॅकेंझी अ‍ॅण्ड कंपनी' हे कन्सल्टंट म्हणत असाल तर तसं काही नाही हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. डॉ खर्‍यांच्या प्रतिसादातून
यांनी माझ्या वडिलांविषयी अतिशय अनुदार उद्गार काढले. त्यावेळेस मी रागाने सर्वांसमोर त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली
यावर फारसं काही बोलण्यासारखं नाही. प्रोव्होकेशन, राग, त्यावरची आपली रिअ‍ॅक्शन कशी असावी हे डॉ खर्‍यांसारख्या सिनियर माणसाला मी सांगणं योग्य नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 08:22 नवीन
आयसीएआय आणि सीए कम्युनिटीवर काही वैयक्तिक राग असावा. पहिलं बरोबर दुसरं नाही. माझ्या मित्रांची मुलं सी ए करत आहेत किंवा झाली आहेत. माझा पुतण्या पण सी ए झाला आहे. माझे कर सल्लागार जे शाळेपासून मला एक वर्ष मागे होते ते दोघे हि सी ए आहेत. त्यामुळे सी ए कम्युनिटी वर राग नाहीच. बाकी मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आपले काय म्हणणे आहे? उदा १) १०,००० रुपये विद्यावेतन किंवा तत्सम सन्मान्य रक्कम ज्यात हि मुले आपले किमान खर्च भागवू शकतील? २) फक्त १० % (किंवा त्यासमान कमी टक्के) लोकांना सी पी टी मध्ये पास करणे ३) सी ए फायनल झाल्यावर आर्टिकलशिप करणे. ४) आर्टिकलशिप तीन वर्षापेक्षा दोन वर्षे इतकी करणे. आपली संस्था यातील एकही गोष्ट करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. संस्थेबद्दल नक्कीच राग आहे कारण संस्थेने फक्त आपल्या पोळीवर तूप ओढण्याचे काम केले आहे यात शंका नाही आणि हा प्रतिसाद सुद्धा मी काही काळ थांबून शांत डोक्याने दिला आहे. अजून काही मुद्दे आहेत जे मी पिरा ताईंच्या प्रतिसादात मांडतो आहे हे मुद्दे पण त्या हुशार सी ए व्यक्तीला मी सर्वांसमोरच विचारले होते त्याच्यावर त्यांच्या कडे कोणतेही उत्तर नाही. हि व्यक्ती अतिशय हुशार आहे. परंतु आपल्या कडे सी ए ची आर्टिकल करणाऱ्या मुलांना अतिशय कस्पटासमान वागवते हे नंतर माझ्या मित्राच्या मुलीने सांगितले. त्या व्यक्तीचा मी जाहीरपणे उद्धार केला याचा मला राग नाहीच. परंतु ते धुणे मला इथे धुवायचे नाही त्यामुळे येथेच थांबतो. बाकी बहुसंख्य वरिष्ठ सी ए लोकांना मी मांडलेले मुद्दे खोडता आलेले नव्हते /नाहीत. (हि चर्चा मिपाच्या बाहेरची आहे)पण बऱ्याच जणांची एकच प्रतिक्रिया होती ती म्हणजे आमच्या काळात आम्ही कष्ट काढले होते तसेच आताच्या तरुण मुलांना काढू द्या. मी त्यांना शांत शब्दात म्हणालो तुम्ही आयुष्यभर बैलगाडीत गेलात म्हणून मुलाने पण बैलगाडीनेच जावे या तर्हेचा हा आग्रह आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 08/02/2018 - 08:34 नवीन
पहिलं बरोबर दुसरं नाही. +1 माझेही अनेक मित्र, कुटुंबीयसिए आहेत तसेच आजूबाजूच्या नेटवर्क मधील विद्यार्थी सिए होताहेत. आणि पुन्हा सांगतो कि "सिए" करण्याच्या प्रोसेस मध्ये प्रोब्लेम आहे आणि अय्सिएअय प्रचंड झोल कर्ते आहे. बाकी डॉक्टर साहेबांनी माझे अध्यहृत मुद्दे जास्त स्पष्ट केले आहेत.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/02/2018 - 10:37 नवीन
बाकी मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आपले काय म्हणणे आहे?
मुद्दे बरोबर आहेत. लेबर इकॉनॉमिक्समध्ये 'गिल्ड्स' या विषयावर बरंच लेखन सापडेल.* एकंदर मुद्दा असा आहे, की कोणत्याही वस्तूची किंमत त्या वस्तूच्या स्केअर्सिटीवर अवलंबून असते. त्यात व्यावसायिक एम्प्लॉयमेंट स्किल्सही आली. गिल्ड्स म्हणजे त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यावसायिकांच्या संघटना. आपलं बाजारमूल्य कायम राखायचं असेल तर ही स्केअर्सिटी टिकवून ठेवणं (प्रसंगी अन्यायकारक मार्गांनी) हे त्यांना करावंसं वाटतं. ते करण्याचा मार्ग म्हणजे 'प्रवेश प्रतिबंध' करणे (एंट्री बॅरियर्स). आयसीएआय हे असं गिल्ड आहे. गिल्डचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे त्या विशिष्ट भागापुरते नियमही त्यांनीच करायचे, ते अमलातही त्यांनीच आणायचे, नव्या गिल्ड मेंबर्सना प्रवेशही त्यांनीच द्यायचा आणि प्रसंगी कारवाईही त्यांनीच करायची. आयसीएआयने हे १९४९ पासून जमवलं आहे. तुम्ही म्हणताय ते मुद्दे : - अन्यायकारक आहेत का? हो. - निर्बुद्ध आहेत का? नाही. - नियम बदलायला हवेत का? हो. - बदलले जातील का? नाही. वेलकम टू कॅपिटलिझम. - अशा स्थितीत आपण काय करावं? व्यवस्थेचा शक्य तितका उपयोग आपल्या फायद्यासाठी करून घ्यावा. वेलकम अगेन टू कॅपिटलिझम. ________________ *या प्रकारात रस असणार्‍यांसाठी : केंब्रिज विद्यापिठातल्या इकॉनॉमिक हिस्ट्रीच्या प्राध्यापिका शीला ओगिल्वी यांचा हा पेपर चांगला आढावा घेणारा आहे : https://pubs.aeaweb.org/doi/pdfplus/10.1257/jep.28.4.169
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 08/02/2018 - 10:59 नवीन
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले पाहिजे, बंदीस्त करून त्या त्या व्यावसायिकांचा (म्हणजे जो अात घुसू शकलेला कंपू अाहे) फायदा होत असला तरी कृत्रिम टंचाई करण्यामुळे एकूण त्या क्षेत्राचा मात्र तोटा होतो. त्या क्षेत्रात प्रयोगशील माणसे कमी येतात कारण एकूण संख्याच कमी ‘अात’ येते, कालांतराने पठडीबध्द व्यवस्था तयार होते. हे एक प्रकारचे लायसन्स राज निर्माण केल्यासारखेच झाले. खर्या कॅपिटलिझममध्ये मात्र या उलट घडते. जास्तीत जास्त लोक अात घेतले जातात, स्पर्धा वाढते, त्यामुळे दर्जाही वाढतो. त्यामुळे हा कॅपिटलिझमचा दोष अाहे, या मताशी मी सहमत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/02/2018 - 12:34 नवीन
बंदीस्त करून त्या त्या व्यावसायिकांचा (म्हणजे जो अात घुसू शकलेला कंपू अाहे) फायदा होत असला तरी कृत्रिम टंचाई करण्यामुळे एकूण त्या क्षेत्राचा मात्र तोटा होतो.
सहमत. याला 'प्रिन्सिपल-एजंट प्रॉब्लेम' म्हणतात. प्रिन्सिपल म्हणजे एकूण अर्थव्यवस्था ज्यांना सीए पाहिजेत, आणि त्यासाठी त्यांनी गिल्डकडे हे काम सोपवलं आहे. एजंट म्हणजे गिल्डमधले सीए. प्रिन्सिपल-एजंट प्रॉब्लेममध्ये एजंट प्रिन्सिपलच्या भल्यासाठी काम न करता स्वतःच्या भल्यासाठी करतो.
खर्या कॅपिटलिझममध्ये मात्र या उलट घडते. जास्तीत जास्त लोक अात घेतले जातात, स्पर्धा वाढते, त्यामुळे दर्जाही वाढतो. त्यामुळे हा कॅपिटलिझमचा दोष अाहे, या मताशी मी सहमत नाही.
ही एक कविकल्पनाच नाही का? 'खरं कॅपिटलिझम' कुठे असतं? जास्तीत जास्त लोक आत घेणे म्हणजे 'पर्फेक्ट काँपिटिशन'कडे वाटचाल.
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले पाहिजे
गिल्डमधले लोक अस्संच म्हणतात. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण पाहिजे तितकं करा, पण आमच्या गिल्डच्या सभासदत्त्वाचं सार्वत्रिकीकरण झालं नाय पाहिजे. एमकॉम आणि सीएचा सिलॅबस (कागदावर) सारखाच दिसतो. हेच ते शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण!
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 08/03/2018 - 07:49 नवीन
अादूबाळ, तुंम्ही वरती असं म्हणता, की खरे व अपा यांचा सीए कम्युनिटीवर काही वैयक्तिक राग असावा. म्हणजे खरं तर सीए लोकांचा काही दोष नाही. असलाच हा व्यवस्थेचा दोष अाहे. पण पुढे अापण म्हणता: >> … एजंट म्हणजे गिल्डमधले सीए. प्रिन्सिपल-एजंट प्रॉब्लेममध्ये एजंट प्रिन्सिपलच्या भल्यासाठी काम न करता स्वतःच्या भल्यासाठी करतो. तर हा सीए लोकांचाच संकुचितपणा अाहे, अाणि तो तुंम्हीच उघडून सांगितला अाहे. शेवटी सीए लोकच हे गिल्ड चालवतात ना? मग सगळा दोष व्यवस्थेवरच का टाकायचा? >> … खर्या कॅपिटलिझममध्ये …ही एक कविकल्पनाच नाही का? 'खरं कॅपिटलिझम' कुठे असतं?  का? असतं की. इकडे नाही का कुणालाही सामिल होऊ दिलं व्यवसायात? अोला, उबरने टॅक्सीचालकांची मक्तेदारी संपुष्टात अाणली. तसंच, कोपर्यावरच्या दुकानदारांची मक्तेदारी माॅलवाल्यांनी संपुष्टात अाणली अाणि अॉनलाईन दुकानांनी मॉलवाल्यांची. दोन्ही उदाहरणांत, शासनाने, कोर्टानेही खरं कॅपिटलिझम उचलून धरलं अाणि ग्राहकांचा व त्या क्षेत्राचा फायदाच झाला की. इंजिनिअरिंग कॉलेजेस शेकड्याने निघाली, म्हणून इंजिनिअरिंग क्षेत्राचे नुकसान न होता, फायदाच झाला. ना अाय अाय टी इंजिनिअर्सचा पगार कमी झाला, ना त्यासारख्या संस्थांचं महत्व कमी झालं. ज्यांना ज्या दर्जाचे इंजिनिअर्स हवेत, त्यांनी ते तिकडून घ्यावेत. सीए संस्थेची ही मक्तेदारीच अाहे, अाणि ती संपुष्टात अाणायला सीए लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. तुमची शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावरची टिप्पणी कळली नाही.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/03/2018 - 08:21 नवीन
ज्याप्रकारची लाएबिलिटी इंजिनिअरना फेस करावी लागते त्याच्याशी सीए ला फेस कराव्या लागणार्‍या लाएबिलिटीची तुलना करून पहा म्हणजे शिक्षणाच्या / पास करण्याच्या सार्वत्रिकीकरणाचे धोके लक्षात येतील. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजेसची तुलना केली आहे ती चुकीची आहे. खूप इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाल्याने शिक्षण मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. तसे शि़क्षण सीए च्या बाबतही मुबलक उपलब्ध आहेच. उलट शिक्षण मुबलक उपलब्ध आहे हीच खरे आणि धागालेखक यांची तक्रार आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/03/2018 - 08:33 नवीन
उलट शिक्षण मुबलक उपलब्ध आहे हीच खरे आणि धागालेखक यांची तक्रार आहे. उगाच काहीच्या काही? असा कोणताही हेतू किंवा विचार माझा किंवा धागा लेखकाचा नाही. आम्ही केंव्हा असे लिहिले आहे कि सी ए च्या सीट्स वाढवा? आमचा हेतू साधा सरळ आहे. जे काही आहे ते साधे सरळ आणि खुले असले पाहिजे आणि यासाठी ICAI या संस्थेने काहीही केलेले नाही. केवळ स्वतःच्या पोळीवर तूप ओढण्यापलीकडे.भारंभार पोरांना आशा लावून फी उकळायची आणि त्यातील ९७ टक्क्याना वाऱ्यावर सोडायचं कशाला उगाच

मीच बरोबर

म्हणून फाटे फोडताय आणि आम्ही म्हणत नाहीये त्या गोष्टी आमच्या तोंडी घालताय?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/03/2018 - 08:53 नवीन
माझा प्रतिसाद नीट वाचा हो खरे साहेब .......
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 16:04 नवीन
अन्यायकारक आहेत का? हो. - निर्बुद्ध आहेत का? नाही. हलकट पणा आहे का? हो नक्की. - नियम बदलायला हवेत का? हो. - बदलले जातील का? नाही.कारण --हलकट पणा स्वतःच्या आणि स्वतःच्या सदस्यांच्या पोळीवर तूप ओढण्यासाठी तरुण मुलांना वेठबिगारी अभियांत्रिकीच्या परीक्षेत १५ लाख मुले बसतात. आय आय टी मध्ये खुल्या वर्गात सीट किती १०,०००. तुम्ही पहिल्या १०, ००० मध्ये आलात तर आय आय टी मध्ये प्रवेश मिळेल. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी परत बसा. नाही जमलं तर सोडून द्या. मेडिकल ला महाराष्ट्रात सीट किती १२०० तुम्ही त्यात आलात तर प्रवेश अन्यथा दुसरा मार्ग मोकळा आहे. हे असं का करता येत नाही? गेल्या पाच वर्षाचं वेटेड ऍव्हरेज काढा. किती सी ए पास झाले आता तुम्हाला किती सी ए हवेत ते ठरवा. पुढच्या ५ वर्षात किती सी ए हवेत ते हि अंदाज घ्या. अंदाजे पाच हजार हवेत. ठीक, पहिल्या १०,००० मुलांना सीपीटी मध्ये पास करा आणि यानंतर त्यांना त्या त्या विषयात ४० किंवा ५० गुण जितके तुम्ही ठरवाल तितके पास होण्यासाठी ठेवा. नंतर ग्रुप पासिंग सारखा भंपक पणा कशाला? उगाच आमची व्यावसायिक मक्तेदारी कमी होऊ नये म्हणून लाखानी मुलांना पैशासाठी वेठीस धरणे हा शुद्ध हलकट पणा आहे. परीक्षेच्या मूळ हेतूला स्वार्थासाठी काळं फासणं हा हलकटपणा नाही तर काय आहे? माझा संताप नपुंसक आहे हे मला माहिती आहे तरी लोकांना वस्तुस्थिती ची जाणीव असावी या हेतूने मी लिहीत आहे. डिस्क्लेमर -- माझ्या जवळच्या नातेवाईकांत कोणीही सी ए करत नाहीये. एक पुतण्या करत होता तो सी ए पास होऊन नोकरीला हि लागला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/02/2018 - 16:17 नवीन
"त्यापेक्षा असं असं का करत नाहीत?" याला अंत नाही. "यू कॅन ड्रॉ एनीथिंग इफ यू हॅव ए क्लीन व्हाईटबोर्ड" असं माझा एक बॉस म्हणतो. पण सगळेच व्हाईटबोर्ड क्लीन नसतात हे त्यातलं अध्यहृत आहे. नियम का बदलले जाणार नाहीत याची ऑब्जेक्टिव्ह कारणमीमांसा मी वर दिलीच आहे. त्याला हलकटपणा तुम्ही म्हणताय, दुसर्‍यांचा नजरिया कदाचित वेगळा असू शकतो. अवांतर : "आँखो देखी" हा सिनेमा अद्याप बघितला नसल्यास जरूर बघा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 16:37 नवीन
तोच

नजरिया

नक्की काय आहे हेच जाणून घ्यायचे आहे. आपण मुलांच्या भविष्याशी खेळतो आहोत याची कुणालाच खंत नाही? मी अनेक सी ए लोकांशी बोललो. परंतु त्यातील एकालाही याचे नक्की समर्थन देता आलेले नाही. दोन विषयात ४९ गुण आणि दोन विषयात ५० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही नापास करता (सरासरी ५० नाही म्हणून) म्हणजे विद्यार्थ्याचे ज्ञान किती आहे हे समजून घेण्यापेक्षा किती लोकांना नापास करता येईल याचाच विचार होतो आहे हे सुस्पष्ट आहे. सी ए चे विशिष्ट पातळीचे ज्ञान असलेच पाहिजे यात शंकाच नाही. परंतु संस्था घेत असलेली परीक्षा पद्धती अत्यंत चुकीची आणि एकांगी आहे हे समजून उमजून कुणालाच काही करावेसे वाटत नाही उलट त्याचे समर्थन होते आहे याचेच आश्चर्य वाटते. माझी समजूत संपूर्ण चुकीची असेल किंवा मला सांख्यिकीचे तेवढे ज्ञान नाही हे समजून कुणी सी ए मला यात काय बरोबर आहे आणि माझे काय चुकते आहे हे समजावून सांगेल का? माझ्या दोन मित्रांची हुशार मुले असे सी ए अर्धवट सोडून दिशाहीन फिरताना पहिले आणि त्यातील एकाने मला कळकळीने मुलाला सीए सोडू नको हे समजावण्यास सांगितले तेंव्हा मला हा सर्व प्रकार लक्षात आला.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/02/2018 - 16:52 नवीन
तोच नजरिया नक्की काय आहे हेच जाणून घ्यायचे आहे.
https://www.misalpav.com/comment/1006048#comment-1006048 गिल्ड - एंट्री बॅरियर्स हा भाग वाचावा. विशेषतः "आपलं बाजारमूल्य कायम राखायचं असेल तर ही स्केअर्सिटी टिकवून ठेवणं (प्रसंगी अन्यायकारक मार्गांनी) हे त्यांना करावंसं वाटतं." ______________
माझ्या दोन मित्रांची हुशार मुले असे सी ए अर्धवट सोडून दिशाहीन फिरताना पहिले आणि त्यातील एकाने मला कळकळीने मुलाला सीए सोडू नको हे समजावण्यास सांगितले तेंव्हा मला हा सर्व प्रकार लक्षात आला.
सीए करायला घेतानाच ते सोडायची तयारी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. सीए असो किंवा आयुष्यातला कोणताही मोठा / महत्त्वाचा निर्णय - प्लॅन बी असणं हे महत्त्वाचंच असतं. परीक्षापद्धती आपण बदलू शकत नाही. संताप नपुंसक आहे. अपयश येत असेल तर "नॉट माय कप ऑफ टी" म्हणून सोडून देण्यात लाज कशाला वाटायला हवी? [माझ्यापुरतं बोलायचं झालं तर सीए झाल्यानंतर दहा वर्षांच्या प्रोफेशनल आयुष्यात ११ नवीन गोष्टी करायला घेतल्या. त्यातल्या २ यशस्वी झाल्या. म्हणजे अपयशाचं प्रमाण ८२% आहे. मी करियरचं मूल्यमापन करताना २ गोष्टींसाठी बरं वाटून घेतो, ९ गोष्टींची खंत वाटतेच. बट दॅट्स नॉट द एंड.]
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 17:04 नवीन
स्केअर्सिटी टिकवून ठेवणं ती ठेवा हो. पण मुलांच्या आयुष्याशी खेळून का? मी कधी म्हणालो कि पन्नास हजार मुलांना (इंजिनियरिंग सारखं) पास करा. पाचच हजार मुलांना सी ए पास करा पण ती चाळणी सुरुवातीलाच लावा उगाच तरूणांकडून पैसे उकळून आपले उखळ पांढरे करणे हे साफ चूक आहे. असो, आपल्याकडे सुद्धा कोणतेही नक्की समर्थन नाही असेच दिसून येत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 08/02/2018 - 18:31 नवीन
समर्थन देणं हा माझा उद्देश नव्हता. असं का घडतं हे अर्थशास्त्राचे नियम वापरून सांगायचा प्रयत्न करत होतो.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 08/02/2018 - 10:42 नवीन
>> तुमचा (आणि डॉ खर्‍यांचा) आयसीएआय आणि सीए कम्युनिटीवर काही वैयक्तिक राग असावा. नसावा.... पण सध्या मोदीशेटचा सीए कम्युनिटीवर राग आहे. त्यामुळे कदाचित असेल.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 08/02/2018 - 10:52 नवीन
पण सध्या मोदीशेटचा सीए कम्युनिटीवर राग आहे. त्यामुळे कदाचित असेल.
हा हा हा , चाचांच्या डोक्यातुन मोदी काय जात नाहीत!
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 08/02/2018 - 10:55 नवीन
उलट मी तर म्हटलं की खर्‍यांचा राग वैयक्तिक नसून राष्ट्रहिताच्या भूमिकेतून आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 17:30 नवीन
चाचांच्या डोक्यातुन मोदी काय जात नाहीत! ते पुरोगामी आहेत असे ऐकले होते
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 08/02/2018 - 17:16 नवीन
अरे व्वा, मज्जाच. लाजायचे काय परत परत पेपर द्यायला? येतेय ना ते? मग लिहायचे ना. ;) बाकी चेष्टा अपार्ट पण अ‍ॅप्लाईड आर्ट च्या चार वर्षाच्या एक्झाममध्ये पहिले तीन वर्ष भरपूर सब्जेक्ट असतात (पहिले आणि तिसरे वर्ष कॉलेज एक्झाम, दुसर्‍या आणि शेवटच्या वर्षी युनिव्हरसिटी एक्झाम.) शेवटच्या वर्षी एक थिअरी (अ‍ॅडव्हर्टायझिंग आर्ट अन आयडीयाज) आणि एक प्रॅक्टीकल पेपर असतो. सोबत डिझर्टेशन. ह्यामध्ये एकाही सब्जेक्टला फेल झालात तर (थिअरी अन डिझर्टेशन ला शक्यतो नापास करत नाहीत, मेन प्रॅक्टीकल हेच) परत सगळे पुढच्या वर्षी द्यावे लागते. त्यात काही वावगे वाटत नाही आम्हाला. इव्हन मला तर त्याचा फटका बसलेला. डिझर्टेशन हे शेवटी देताना (त्याला टोटल मार्काच्या १० टक्के मार्क्स असतात फक्त) त्यातील डीटीपी मटेरिअल अ‍ॅज ईट इज एका दुसर्‍या स्टुडन्टने कॉपी करुन फक्त पेस्टिंगचे आर्ट सॅम्पल्स वेगळे लावले, हे गुपचुप केले आणि सबमिट केला थिसिस. युनिव्हरसिटीने दोघांनाही डायरेक्ट मालप्रॅक्टीस इन डिझर्टेशन ठरवत परत पुढच्या वर्षी सगळे (म्हणजे दोन थिअरी आणि एक प्रॅक्टीकल) पेपर द्यायला लावले. ह्याला बरेच प्रयत्न करुन दाद तर मागता आलीच नाही फक्त एक वर्ष उशीरा रिझल्ट मिळाला. ;) मार्क्सही पहिल्या अटेम्प्टपेक्षा जास्त मिळाल्यासारखे वाटले हे माझ्यासाठी विशेष वाटले. त्यापुढे अन्यायकारक शिक्षणपध्दती, पेपर तपासणीतले दोष , स्टायपेंड, मार्कॅटातल्या डिमांडनुसार पास केला जाणारा लॉट वगैरे वगैरे गोष्टींचा विचार डोक्यातच येत नव्हता हो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/02/2018 - 17:33 नवीन
प्रतिसाद अस्थानी आहे एक दोन कॉपी केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न याची गल्लत करू नाक इतकीच विनंती आहे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 08/02/2018 - 18:48 नवीन
असे डॉ. अस्थाना सारखे काय करताय? ;) ह घ्या. अस्थाणी वरून आठवले. एका विषयात नापास झाले की सगळे पेपर पुन्हा देण्याबद्दल बोलतोय. ते सर्व कॉपी केलेल्या नाहीतर एका विषयात तोही फालतू विशयात नापास झालेल्यानाही लागू असते. ह्या मेथडमध्ये वावगे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मिसळ गुरुवार, 08/02/2018 - 17:44 नवीन
खरे यांचे मुद्दे पटतात. राजरोसपणे लुबाडणुक चालु आहे पण त्याविरुद्ध आवाज उठवणे तर सोडा पण त्याचे समर्थन करणारे पाहून धन्य वाटते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/02/2018 - 19:04 नवीन
ही सगळी चर्चा पाहून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की... कॅपिटॅलिस्ट व्यवस्थेतही काही विशिष्ट व्यवसायांच्या बंदिष्ट (क्लोज्ड) संघांमध्ये (उदा : व्यावसायिकांचे गिल्ड्स, इन्स्टिट्युट्स, इ) एंट्री बॅरियरला कोणाचाही अजिबात विरोध नाही... तेव्हा तो प्रश्न चर्चेत नसावा असे मला वाटते. पण... १. कोणत्याही (कॅपिटॅलिस्ट किंवा इतर) व्यवस्थेत लावलेली निवड चाळणी (एंट्री बॅरियर), प्रवेशासाठी निवड करण्याच्या पहिल्या पायरीवर लावली जावी, हे जास्त न्याय्य आणि व्यावसयिक नीतिमत्तेत बसणारे आहे. सीए पेक्षा जास्त विद्यार्थी भाग घेणार्‍या आयआयटी, वैद्यकिय व मोठी स्पर्धा असलेल्या इतर अनेक परिक्षांत, भारतात व आंतरराष्ट्रिय संस्थांत जगभर, असे केले जाते. २. पहिली निवड चाळणी सोपी ठेवून त्यात उमेदवाराला पास करणे आणि एकदा जाळ्यात सापडल्यावर उमेदवाराला जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवता येईल अशी नंतरची परिक्षाप्रणाली बनवणे, त्यांच्याकडून भरपूर (शिक्षण व परिक्षा) फी वसूल करणे, परिक्षेसाठी पात्रता म्हणून अत्यंत कमी मुल्य देऊन काम करून घेणे आणि शेवटी फार मोजके उमेदवार पात्रता परिक्षेत पास होतील अशी व्यवस्था असणे, हे केवळ माणूसकीच्याच नव्हे तर व्यावसायिक नीतिमत्तेच्या आधुनिक मूलभूत तत्वांमध्ये बसत नाही. अश्या प्रणालीच्या जन्मदात्यांनी व पाठीराख्यांनी, आपली मुले, आपल्या मदतीविना, या प्रणालीतून जात आहेत, असा विचार करून पाहिल्यास तिच्यातील दोषांचे गांभिर्य त्यांच्याही लक्षात यायला हरकत नाही... पण, व्यावसायिकतेच्या शिखरावर असलेल्या त्या मंडळींना, आपल्या मुलांना विचारात न घेता, केवळ नीतिमत्ता विचारात घेऊनही, ते समजायला हरकत नसावी. ३. सर्व आधुनिक व्यावसायिक शिक्षणांत आणि कामकाजात, केवळ संबंधीत वैधानिक कायदेच नव्हे तर त्यापुढे एक पाऊल जाऊन पाळायची व्यावसायिक नीतिमत्ता (प्रोफेशनल एथिक्स अँड मोरॅलिटी), हा एक महत्वाचा विषय असतो व तो पास होणे आणि त्यातील तत्वे व्यवहारात पाळणे आवश्यक असते. हे बहुतेक बंदिष्ट संघांच्या (उदा : व्यावसायिकांचे गिल्ड्स, इन्स्टिट्युट्स, इ) बाबतीतही खरे आहे. मात्र, त्या विषयाच्या निकषांवर, "सीए परिक्षेची प्रणाली आणि तिचे व्यवहारातले स्वरूप", पास होणे शक्य दिसत नाही. टीप : "खूप काळ एखादी प्रणाली तशीच यशस्वीपणे चालू ठेवलेली आहे", हे कारण इथे (किंबहुना, इतर कुठेही) अयोग्य असते... कारण, हेच कारण वसाहतवाद शतकानुशतके चालू ठेवण्यासाठीही दिले जात होते !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/03/2018 - 06:24 नवीन
बाडीस "खूप काळ एखादी प्रणाली तशीच यशस्वीपणे चालू ठेवलेली आहे", बैलगाडी सुद्धा शतकानुशतके चालूच होती. तार (पोस्ट खात्याची) सुद्धा शंभर वर्षापेक्षा जास्त चालू होती. म्हणून ती आजही चालूच ठेवायची हा केवळ मूर्खपणा आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 08/02/2018 - 19:51 नवीन
मला वाटते एके काळी मॅट्रिकच्या परीक्षेत (एसएससी चं ठाऊक नाही) असेच सरासरी अमूक टक्के मार्क मिळाले पाहिजेत; एक विषय राहिला तरी सर्व विषयांना परत बसायचं असे नियम होते. साहजिकच त्या काळी मॅट्रिक होणार्‍यांची संख्या कमी होती. धाग्यात आणि प्रतिसादात असा सूर दिसतो आहे की निकाल कमी लागतो हा संस्थेचा दोष आहे. आपल्याला हे झेपतंय की नाही हे न कळणार्‍या विद्यार्थ्यांचा दोष नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/03/2018 - 06:22 नवीन
निकाल कमी लागतो हा संस्थेचा दोष आहे.अर्थातच निकाल कमी लागतो नव्हे कमी लावला जातो कारण स्केअर्सिटी ठेवली पाहिजे असेच त्या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. मग जर ३ % च मुलांना पास करायचं आहे तर भारंभार मुलांना आशेला लावायचं आणि त्यांच्या आयुष्याची बहुमूल्य वर्षे केवळ आपल्या आर्थिक फायद्यासाठी फुकट घालवायची हा कोणता न्याय? तुम्ही १ लाख मुलांना सीपी टी मध्ये पास करायचं आणि शेवटी ३००० सी ए बाहेर काढायचे मधल्या मध्ये ९७००० मुलांची ३-४-५ वर्षे फुकट जातात. सुरुवातीला ५००० मुलांनाच आत घ्या कि. जसे मेडिकल अभियांत्रिकी मध्ये आहे. निदान वेळेत मुले दुसरीकडे करियर शोधतील. हि स्थिती सरकारी वैधानिक संस्थेची आहे कि एखाद्या खाजगी नफेखोर कंपनीची आहे?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा