गाणे कसे बनते?
केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो.
-------------
कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय?
कायद्याची भाषा, सरकारची भाषा, मानवी व्यवहार करणारांची भाषा, सामान्य लोकांची भाषा, आपल्या सुहृदांची भाषा आणि आत्मसंवादाची भाषा हे सुलभीकरण पुढे नेत नेत शेवटी गाणे आणि अंततः कविता बनत असावी. जे लिहिलं आहे, जे म्हणायचं आहे आणि जो अर्थ निघू शकतो हे सगळं कायद्याच्या भाषेत जवळजवळ एकच असतं. कवितेत जे लिहिलं आहे, जे म्हणायचं आहे आणि जो अर्थ निघू शकतो हे पूर्णतः मित्यांच्या तीन अक्षांसोबत काटकोनात असू शकतं. गाणं कवितेच्या मानानं लोकभाषेशी जवळचं असावं, अर्थातच बर्याच कविता स्वतः गाणी असतात हे आलेच. कविता त्यामानाने आशयघन असतात. कवितेत कधीही सविस्तर वर्णन नसतं. अगदी अलंकारांनी दिलेली शक्ती जरी दोन मिनिटं बाजूला काढून पाहिली तरी कवितेतले शब्द आशयाच्या दृष्टीनं फार विस्तारलेले दिसतात. कवितेत अनेकदा न लिहिलेले शब्द दिसू लागतात. अनेक कवी अशा कविता लिहितात ज्या वाचून अज्ञान प्रांतात घोड्यावर बसवून एकटेच सोडून दिले आहे असे वाटते. जो आशय पाहायचा आहे तो पाहा, ज्या गावाला जायचं आहे त्या गावाला जा. म्हणून माझ्यासारख्या माणसाला अशा अॅडव्हेंचर टुरिझम पेक्षा गाण्यांचा नॅचरल टुरिझम भावतो.
-----------------
गाणी त्यामानानं सोपी असतात. जे एरवी गद्यात लिहिता आलं असतं ते मिठ-मिर्चू-लोणी लावून पद्यात सांगीतलं जातं. गाण्याचं एकमात्र आवश्यक नि पुरेसं लक्षण म्हणजे चाल असावं. चाल नसली तर त्याला थेट गद्य म्हणावं. गाण्यात बाकी बर्याच गोष्टी नसतील तर चालतील. चालीत बसणार्या वारंवार उधृत होणार्या ओळींपासून आदिवासी लोकांनी पहिलं मुखडा-गाणं बनवलं असावं. मग ते लांबत जाऊन मोठं गाणं बनलं असावं. आज एक विकसित कला म्हणून कवी लोक कथानकात दिलेल्या परिस्थितीच्या अवतीभोवती रेटून गाणी बसवताहेत. पण कधी काळी कोण्या मोठ्या बृह्त्कथेचा भाग नसलेली सुटी सुटी गाणी लोकांना सुचत असावीत.
==========================================================
आता गाणं कसं बनतं? (हा प्रश्न आहे. उत्तराचा उपोद्घात नाही.). माझ्यासारख्या लेमॅनला वाटतं ते असं:
एखाद्या चित्रपटात, नाटकात, अल्बममधे वा थीममधे एखाद्या परिस्थितीमधे एखादा आशय मांडायचा असं दिग्दर्शक कविस (लिरिसिस्टास मराठीत काय म्हणतात?) सांगेल. मग कवी काही ओळी लिहिल. याला कोणीतरी चाल देईल. (या चाल देणाराला म्हणतात काय?). कोणी संगीत देईल. कोणी गाईल. काय मॅच होतं काय नाही यानुसार एक इटरेटीव प्रोसेस चालेल. गाण्याचे बोल ते चाल ते वाद्ये ते गायक ते सुर बरंच काही मागे पुढे होत शेवटी एक सुसंगत गाणं बनेल. ज्या गीतांना आज आपण अजरामर इ म्हणतो त्यांची कच्ची रुपं त्यांच्या निर्मात्यांनी पाहिली असणार. गाण्यांची ही बाळंतपणं आपल्यापैकी कुणी पाहिली आहेत काय? हे कुतुहल आहे म्हणून धागा काढला आहे.
=============================================================
लेखकाला (म्हणजे मला) या क्षेत्रातलं अजिबात काही कळत नाही. सहज वाटलं ते लिहिलं आहे.
- एखाद्या चित्रपटात, नाटकात, अल्बममधे वा थीममधे एखाद्या परिस्थितीमधे एखादा आशय मांडायचा असं दिग्दर्शक कविस (लिरिसिस्टास मराठीत काय म्हणतात?) सांगेल. मग कवी काही ओळी लिहिल. याला कोणीतरी चाल देईल. (या चाल देणाराला म्हणतात काय?). कोणी संगीत देईल. कोणी गाईल. काय मॅच होतं काय नाही यानुसार एक इटरेटीव प्रोसेस चालेल. गाण्याचे बोल ते चाल ते वाद्ये ते गायक ते सुर बरंच काही मागे पुढे होत शेवटी एक सुसंगत गाणं बनेल. ज्या गीतांना आज आपण अजरामर इ म्हणतो त्यांची कच्ची रुपं त्यांच्या निर्मात्यांनी पाहिली असणार. गाण्यांची ही बाळंतपणं आपल्यापैकी कुणी पाहिली आहेत काय? हे कुतुहल आहे म्हणून धागा काढला आहे.
ह्यात 'गाणे' म्हणजे चित्रपटातील गाणे असा अर्थ अभिप्रेत आहे, तेव्हा त्यापुरतेच इथे लिहीतो. मी हे जे लिहीतोय, ते मुख्यतः डिजिटलच्या अगोदरच्या जमान्यातील, म्हणजे १९४५ पासून सुमारे १९९० पर्यंतच्या जमान्याबद्दल आहे, कारण मला त्याविषयी थोडीफार माहिती आहे. तर तेव्हा(तरी), गाणे नेहमीच तुम्ही लिहीले आहे ह्या लिनीयर पद्धतीने बनत नसे. किंबहुना तसे ते बनत नसेच असे म्हटल्यास फारशी अतिशयोक्ती ठरू नये. तेव्हा चित्रपटांचा, गाणी हा प्रमुख 'सेलिंग पॉईंट' होता, त्यामु़ळे संगीतकारास अतिशय महत्व असे.त्यामुळे, नौशादांसारखा एकाद दुसरा अपवाद सोडल्यास, सर्व टॉपचे संगीतकार प्रथम चाल सुचवत व त्यानुसार गीतकार ('लिरीसिस्ट'चा मराठी/हिंदी प्रतिशब्द) मग चपखल शब्द बसवत. अर्थात ह्या प्रक्रियेत ह्या दोघांचे ट्यूनिंग असणे अतिशय जरूरी असे. त्यामुळे आपणांस, शंकर-जयकिशन| हसरत व शैलेंद्र, एस. डी. बर्मन | शैलेंद्र किंवा मजरूह सुलतानपुरी, सी. रामचंद्र| राजेंद्रकृष्ण, ओ.पी.|एस.एच. बिहारी, लक्ष्मी-प्यारे|आनंद बक्षी, मदन मोहन्|राजेंद्रकृष्ण... अशा जोड्या दिसतील. 'दुय्यम' दर्जाच्या (कमर्शियली, [निदान मला जाणवलेल्या] गुणवत्तेनुसार नव्हे]) चित्रगुप्त, रोशन, जयदेव, सलील चौधरी ह्यांच्याही, अनुक्रमे राजेंद्र कृष्ण, साहीर, साहीर व शैलेंद्र ह्यांच्याशी अशा जोड्या होत्या. माझ्या मते ह्या वर दिलेल्या प्रक्रियेत काहीच चुकीचे नाही. प्रत्येक गाणे हे एक प्रोजेक्टच असते, ते शेवटी आपल्यासमोर कसे येते, हे महत्वाचे. आणि तेव्हाच्या- वर निर्देशिलेल्या सर्वच, तसेच इतरही काही- संगीतकारांची व त्यांच्यासमवेत काम करणार्या गीतकारांची प्रतिभा इतकी उच्च प्रतिची होती, की त्यातून अनेकानेक सुंदर गीते तयार झाली. आता, ह्या प्रथम ग्रेडच्या संगीतकारांच्या चालींना धरून गीत करायचे म्हणजे त्यासाठी तशी सिच्युएशन चित्रपटात असायला व्हावी. अनेकदा चाली तयार असत, पण चित्रपटांत व्यवस्थित सिच्युएशन मिळत नसल्याने त्या तशाच पडून राहत. पुढेमागे कुठल्यातरी चित्रपटात यथानुरूप त्यांचा वापर केला जाई. शक्य असल्यास, व प्रोड्युसरला एकादी चाल आवडल्यास चित्रपटात योग्य अशी सिच्युएशन निर्माणही केली जाई. वरील प्रक्रियेस सर्वच संगीतकारांच्या व गीतकारांच्या बाबतीत अपवादही होतेच. म्हणजे गीताचे शब्द प्रथम लिहीले गेले व चाल त्यावर लावली गेली असेही होई. काही गीतकारांच्या संदर्भात हे विशेष होई-- उदा. साहीर. गीताची सर्वसाधारण चाल व शब्द हे झाले की अॅरेंजमेंटचे काम सुरू होई. हे जिकीरीचे पण अत्यावश्यक काम करणारे अॅरेंजर्स, विशेषतः गोवन कॅथॉलीक्स होते, ह्याचे कारण त्यांना पाश्चिमात्य क्लासिकल संगीताची चांगली जाण असे, व वेस्टर्न नोटेशन्स त्यांना येत. सॅबेस्टियन, 'चिक चॉ़कोलेट', जॉनी गोम्स, ईनॉक डॅनियल ही ह्यातील काही प्रमुख नावे. ह्याव्यतिरीक्त बासू, मनोहारी, कर्सी लॉर्ड ह्यांचेही कार्य वाखाणण्याससरखे आहे. अॅरेंजर्स प्रथम गीताचे वेस्टर्न नोटेशन बनवत. मग ते त्या गीतासाठी, प्रील्युड, इंटरल्युड्स, व असल्यास शेवटचे कोडा हे पीसेस काँपोज करत. तसेच गीताच्या 'मेलडीनुसार' गायनाच्या मागे,स्ट्रिंग, विंड, ब्रास इत्यादी 'सेक्शन्ससाठी' सविस्तर म्युझिक बनवत व त्यांची नोटेशन्स वादकांना देत.दोन वाक्यांच्या मधे काही छोटे सोलोज असावे, ते काय व कुठल्या वाद्याचे असावेत, हे ते ठरवत. ह्या सर्वांसाठी कुठली वाद्ये हवीत, व ती कुठले वादक वाजवतील, हेही अॅरेंजर्स ठरवत. मग त्यांच्या रिहर्सल्स करणे, गायकांसमवेत रिहर्सल्स करणे व शेवटी टेक करणे ह्या क्रमाने गीत तयार होई. र्हिदम अॅरेंजर्स वेगळे असत. दत्ताराम, मारूतीराव कीर, कर्सी लॉर्ड, बुर्जी लॉर्ड, गुलाम महमद ही ह्या क्षेत्रातील काही ठळक नावे. संपूर्ण गीताच्या र्हिदमची जोखीम ह्यांच्यावर असे. गायक- गायिकांचा सहभाग अर्थात अतिशय महत्वाचा. गीताची चाल आत्मसात करून घ्यायची, तिच्यावर स्वतःचा विचार करून त्यातील जागा निश्चीत करावयाच्या, कुठला शब्द कसा उच्चारला पाहिजे, कुठला 'मागे ठेवला' पाहिजे, हे स्वतः ठरवायचे व त्याप्रमाणे ते गायचे, ही अतिशय महत्वाची कामगिरी गायक- गायिका बजावत. आणि अतिशय महत्वाचे, म्हणजे, गीताच्या वादकांच्या रिहर्सल्स, मग संपूर्ण रिहर्सल्स, व शेवटी टेक्स, हे सर्व अर्ध्या शिफ्टमधे (४ तासांत) आटोपले जाई. आणि त्याकाळी संपूर्ण गाणे, सलग, सुरूवातीपासून, शेवटापर्यंत एकाच झपाट्यात करायची प्रथा होती, म्हणजे एडिट्स नसत. तसेच वर उल्लेखिलेले सर्वच पार्टिसिपंट्स एकाच वेळी वाजवत, गात. हे किती जिकीरीचे होते, ह्याची कल्पनाच केलेली बरी. नव्वदीच्या दशकापासून हे सर्व अनेक कारणांमुळे बदलले. गीताच्या "ऑडिटरी" भागावरील भर बराच कमी झाला, त्यांच्या व्हिडीयो प्रेझेंटेशनचा भाग महत्वाचा झाला. त्याचबरोबर, डीजिटलच्या जमान्यात मल्टिट्रॅ़क्स, व लॉसलेस जनरेशन्सची सुविधा चुटकीसरशी उपलब्ध झाली. त्यामुळे वरील सर्वच पात्रे एकाच वेळी हजर असण्याची गरज संपली. तसेच प्रत्यक्ष वाद्ये व वाजवता ('अॅकॉस्टिक'), सिंथेटिकचा जमाना सुरू झाला. ह्यात अर्थात गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या खर्चात, प्रचंड सेव्हिंग होऊ लागले. अजून बरेच काही लिहीण्यासारखे आहे. ते नंतर लिहीतो.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धूप में निकला न करो रूप की रानी गोरा रंग काला ना पड़ जाए (२) मस्त मस्त आँखों से छलकाओ न मदिरा मधुशाला में ताला न पड़ जाए... :- गिरफ्तार