गाणे कसे बनते?
केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो.
-------------
कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय?
कायद्याची भाषा, सरकारची भाषा, मानवी व्यवहार करणारांची भाषा, सामान्य लोकांची भाषा, आपल्या सुहृदांची भाषा आणि आत्मसंवादाची भाषा हे सुलभीकरण पुढे नेत नेत शेवटी गाणे आणि अंततः कविता बनत असावी. जे लिहिलं आहे, जे म्हणायचं आहे आणि जो अर्थ निघू शकतो हे सगळं कायद्याच्या भाषेत जवळजवळ एकच असतं. कवितेत जे लिहिलं आहे, जे म्हणायचं आहे आणि जो अर्थ निघू शकतो हे पूर्णतः मित्यांच्या तीन अक्षांसोबत काटकोनात असू शकतं. गाणं कवितेच्या मानानं लोकभाषेशी जवळचं असावं, अर्थातच बर्याच कविता स्वतः गाणी असतात हे आलेच. कविता त्यामानाने आशयघन असतात. कवितेत कधीही सविस्तर वर्णन नसतं. अगदी अलंकारांनी दिलेली शक्ती जरी दोन मिनिटं बाजूला काढून पाहिली तरी कवितेतले शब्द आशयाच्या दृष्टीनं फार विस्तारलेले दिसतात. कवितेत अनेकदा न लिहिलेले शब्द दिसू लागतात. अनेक कवी अशा कविता लिहितात ज्या वाचून अज्ञान प्रांतात घोड्यावर बसवून एकटेच सोडून दिले आहे असे वाटते. जो आशय पाहायचा आहे तो पाहा, ज्या गावाला जायचं आहे त्या गावाला जा. म्हणून माझ्यासारख्या माणसाला अशा अॅडव्हेंचर टुरिझम पेक्षा गाण्यांचा नॅचरल टुरिझम भावतो.
-----------------
गाणी त्यामानानं सोपी असतात. जे एरवी गद्यात लिहिता आलं असतं ते मिठ-मिर्चू-लोणी लावून पद्यात सांगीतलं जातं. गाण्याचं एकमात्र आवश्यक नि पुरेसं लक्षण म्हणजे चाल असावं. चाल नसली तर त्याला थेट गद्य म्हणावं. गाण्यात बाकी बर्याच गोष्टी नसतील तर चालतील. चालीत बसणार्या वारंवार उधृत होणार्या ओळींपासून आदिवासी लोकांनी पहिलं मुखडा-गाणं बनवलं असावं. मग ते लांबत जाऊन मोठं गाणं बनलं असावं. आज एक विकसित कला म्हणून कवी लोक कथानकात दिलेल्या परिस्थितीच्या अवतीभोवती रेटून गाणी बसवताहेत. पण कधी काळी कोण्या मोठ्या बृह्त्कथेचा भाग नसलेली सुटी सुटी गाणी लोकांना सुचत असावीत.
==========================================================
आता गाणं कसं बनतं? (हा प्रश्न आहे. उत्तराचा उपोद्घात नाही.). माझ्यासारख्या लेमॅनला वाटतं ते असं:
एखाद्या चित्रपटात, नाटकात, अल्बममधे वा थीममधे एखाद्या परिस्थितीमधे एखादा आशय मांडायचा असं दिग्दर्शक कविस (लिरिसिस्टास मराठीत काय म्हणतात?) सांगेल. मग कवी काही ओळी लिहिल. याला कोणीतरी चाल देईल. (या चाल देणाराला म्हणतात काय?). कोणी संगीत देईल. कोणी गाईल. काय मॅच होतं काय नाही यानुसार एक इटरेटीव प्रोसेस चालेल. गाण्याचे बोल ते चाल ते वाद्ये ते गायक ते सुर बरंच काही मागे पुढे होत शेवटी एक सुसंगत गाणं बनेल. ज्या गीतांना आज आपण अजरामर इ म्हणतो त्यांची कच्ची रुपं त्यांच्या निर्मात्यांनी पाहिली असणार. गाण्यांची ही बाळंतपणं आपल्यापैकी कुणी पाहिली आहेत काय? हे कुतुहल आहे म्हणून धागा काढला आहे.
=============================================================
लेखकाला (म्हणजे मला) या क्षेत्रातलं अजिबात काही कळत नाही. सहज वाटलं ते लिहिलं आहे.
- गाणे बनताना आधी काव्य बनत असे . काही वेळेस मात्र संगीतकार त्याच्या सोयीनुसार बदला सुचवीत असे
चित्रपट संगीत बहुतांशी मी, व इतरांनी लिहील्याप्रमाणे, प्रथम चाल व नंतर शब्द असा प्रवास असावयाचा. तुम्ही लिहील्याप्रमाणे ओ. पी. तसे करत नव्हते, हा एक अपवाद समजावा. तसेच मला वाटते, साहीर फारसा चालींवर शब्द बांधण्यास राजी नसावा. ह्याविषयी नक्की काही सांगता येत नाही. कारण त्याने सरसकट अशी भूमिका घेतली असती, तर तो चित्रपटसृष्टीत फारसा टिकला नसता. पण तो तसा टिकून होता, तो काही निव्वळ त्याच्या शायरीच्या जोरावर होता, असे मानने कठीण जाते. त्याच्या ईगोईस्टिक वागण्यामुळे रोशन सोडल्यास, प्रथम दर्जाच्या संगीतकारांनी त्याच्यासमवेत काम फारसे केले नाही. मग त्याची गीते, खैय्याम, चित्रगुप्त व जयदेव ह्यांजबरोबर आहेत. त्यातील काही गीतांवर 'इथे गीत प्रथम झाले आहे, व चाल नंतर' असा स्पष्ट ठसा दिसतो. उदा. 'तेरे बचपन को जवानी की दुवा देती हूं' हे आर्त गाणे. मराठी भावगीतांच्या बाबतीत मात्र बहुतांश, गीत प्रथम व चाल नंतर असे होते. (मराठी चित्रपट संगीतात असे होतेच असे वाटत नाही). वसंत प्रभू, खळे व हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी अनेकानेक उत्तम कवितांना चाली लावून त्या अजरामर केलेल्या आहेत.गाण्याची चोरी याबद्दल पूर्वी बरेचदा चर्चा झाल्या आहेत तरी तेच तेच मुद्दे येताना बघून मजा वाटली.-- या चर्चांचा एकादा दुवा मिळू शकेल काय ? ---- लेख व काही प्रतिसाद दोन्ही आवडले आहेत.