संपादकीय
'सा मिपाया विमुक्तये'
नमस्कार.
मिसळपावचा चौथा दिवाळी अंक सादर करताना मनस्वी आनंद होत आहे. दिवाळी म्हटलं की एक उत्साह आणि आनंदाचा सण. दिवाळीचा सण केव्हा सुरू झाला हे सांगता येणार नाही. पण विद्येचा आणि बुद्धीचा दीप सतत प्रज्वलित करणारा सण म्हणजे दिवाळी. मिपावर असा दीपोत्सव अनेकविध उपक्रम आणि विविध विशेषांकांमुळे सतत दिसतच असतो. आनंदाने देहभान विसरून जावं अशी एक जागा म्हणजे मिसळपाव डॉट कॉम. मराठी भाषेत मराठी माणसांनी लिहिणं आणि वाचणं यासाठी आंतरजालावर प्रसिद्ध झालेलं आणि स्वत:चा एक खास असा ठसा उमटवलेलं मराठी संकेतस्थळ म्हणजे मिसळपाव डॉट कॉम. दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे केवळ शब्दातून व्यक्त होण्याचा नव्हे, तर रोजच्या जगण्यातही अशी दुर्दम्य इच्छा दिसली पाहिजे, असा आशावाद उभा करणारा सण म्हणजे दिवाळी.
निरनिराळ्या दिवाळी अंकांतील लेखनाची प्रत्येक दिवाळीत अगदी रेलचेल असते. कथा, कविता, वैचारिक लेखन, विनोदी लेखन, व्यंगचित्र अशा सर्व प्रकारचं लेखन मिसळपाववर नेहमीच दिसून येत असतं. मिपाच्या आभासी जगातील लोकमंचावर एकमेकांना दृक-श्राव्य स्वरूपात कधीही न भेटलेले अथवा क्वचितच भेटलेले लेखक-लेखिका दिवाळी अंकाच्या निमित्ताने एकोप्याने, सहकार्याने आणि सामंजस्याने एकत्र येऊन सलग चौथ्या वर्षी काही अक्षर साहित्यनिर्मिती करताहेत, ही मिपाकरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. समाजातील विविध घटना आणि त्यांचं चित्रण लेखनात मिपावर दमदारपणे दिसून येतं. समाजमनातील पारंपरिक ते आधुनिक विचारांचा संघर्षही लेखनात समर्थपणे जसा येऊ लागला आहे, त्याचबरोबर माणूसपणाची जाणीव अतिशय तरलतेने लेखनात दिसून येते. ज्ञानोबा-तुकारामांपासून ते डॉ. कलबर्गीपर्यंतचा वैचारिक संघर्ष आणि उत्तम समन्वयही लेखनात येत आहे. मिसळपाववर मराठी लेखनाची उत्तम पावलं शोधायची असतील, तर गाथासप्तशतीपासून ते कालपर्यंत प्रकाशित झालेल्या कोणा नवकवीची कविताही वाचायला मिळत आहे. लेखनात तितकी समृद्धी आली आहे का हा चिंतनाचा आणि वादाचा विषय होऊ शकेल; परंतु आंतरजालावरील लेखन आता मंदगतीनेही असेल पण ते समृद्ध होत आहे, असं म्हणावं लागेल. साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि त्याचं प्रतिबिंब लेखनात उमटलंच पाहिजे. अशी प्रतिबिंबं जालावरील विविध लेखनात उमटू लागली आहेत. मिपावरील लेखनाच्या बाबतीत आणि एकूणच जालावरील लेखनाबाबत बालपण, तरुणपण आणि प्रौढ अशी रूपकंही सुचू लागतात. लेखन आशयाच्या बाबतीत एक असा चढता आणि उतरता आलेख आणि क्रमवारीही लेखनात नाही. भाषा, अस्मिता, परंपरा, जीवनातील विविध संघर्ष आणि आधुनिकता याचा प्रचंड ताण लेखनात दिसून येतो. उद्देश मात्र उत्तम अभिव्यक्तीचा आणि आनंदाचा आहे. जालावरील लेखनाच्या बाबतीत सकसपणा येईलही, पण त्यासाठी समाजाचा हरतर्हेने विकास व्हायला हवा. जीवनसंघर्ष करणार्या वर्गाकडून अतिशय कसदार लेखनाची अपेक्षा करता येणार नाही, हे सत्य आहे. भरल्या पोटाने अगा जर आम्हीही चंद्र पाहतो, तर आम्हीही चांगलं लेखन करू शकलो असतो असंही कोणी म्हणू शकतो. कोणत्याही लेखनाचा मंच हा ललित आणि पारंपरिक लेखनाबरोबर आधुनिक विचारांचा मांडणी करणारा असला पाहिजे, असं वाटतं.
मिसळपाव या पदार्थाच्या नावातच अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. मिसळपाव मराठी संकेतस्थळही त्याला अपवाद नाही. मिसळपाव दिवाळी अंकात अशी मिसळ नक्की वाचायला मिळणार आहे. कविता, ललित-विनोदी लेखन, कथा, मुलाखती, मनोगतं, सत्यकथा, प्रवासवर्णनं, रसग्रहण, खेळ आणि पाककृती अशा विविध लेखांनी नटलेला हा दिवाळी अंक आहे. काही मैलाचे दगड कुठेतरी रोवलेले म्हणून सांगायचे, तर दिवाळीत श्रीमंती मिरवणार्यांची दिवाळी संपली की उरलंसुरलं ताटात पडेल अशांच्या आयुष्यातील एक 'उशिरा' आलेल्या दिवाळीचं चित्रण दिवाळी अंकात आहे. प्रचंड ताणतणावासहित आपले स्वत:चे 'हॅपी अवर्स’ शोधणारी स्त्री दिवाळी अंकात डोकावते. मध्यमवर्गीय माणसाची घराची शोधाशोध अतिशय मिश्कील शैलीत ’स्वारीची तयारी’ कुठे घेऊन जाते, हेही लेखनात वाचायला मिळेल. मिपावरच्या काही खास व्यक्ती आणि वल्लींची गाण्यांची फर्माईश काय असेल ते वाचतांनाही मजा येईल. असे विविध लेख, तशाच काही गंभीर कथाही वाचायला मिळतील. कवितांमध्ये जशा पारंपरिक कविता आहेत, तशा काही विनोदी, विद्रोही कविता आणि थोडा चावटपणाही कवितेत वाचायला मिळेल. मुलाखतीत सुरेखा पुणेकर आणि इतिहासाचार्यांशी मिपाकरांच्या गप्पा वाचायला मिळतील. समाजजीवनातील अनुभव आणि इतिहासातील थोर पुरुषांची ओळख अंकात असेल. खेळात बुद्धिबळाच्या पटावरचं आणि क्रिकेटच्या मैदानातलंही आपण दिवाळी अंकात काही वेगळं वाचाल. मराठी चित्रपटाबद्दल वाचायला मिळेल. या अंकात झकास पाककृतीही आहेत, त्याचबरोबर मार्मिक व्यंगचित्रंही आहेत. अशा अनेक प्रकारच्या उत्तम लेखनाची मिसळ म्हणजे मिपाचा दिवाळी अंक.
मंडळी, मिपा दिवाळी अंक संपादकपदाची जबाबदारी 'नको नको किती म्हणू' आणि 'नाही कसं म्हणू तुला म्हणते रे गीत' असं म्हणता म्हणता येऊनही पडली. "आम्ही सर्व मदत करतो, तुम्ही फक्त सांगत राहा" असा दिलेला शब्द सर्व मिपाकर, मिपासंवादातील सदस्य, साहित्य संपादक, मुख्य संपादक, सल्लागार यांनी पूर्णपणे पाळला. किती नावं घ्यावी आणि कोणाकोणाची घ्यावी आणि कोणाकोणाचं किती कौतुक करू? ते शक्य नाही, म्हणून नावं घेणं टाळतो. सर्वांचं काम एकापेक्षा एक सरस असंच होतं. अनेकांना दिवाळी अंकात काम करायचं होतं, पण त्यांची मदत घेता आली नाही. मिसळपाव ड्रुपलवर चालतं, त्यात विविध परवानग्या हा विषय किचकट असतो. अनेकांचे निरोप येत गेले, काही मिपाकर नाराज झाल्याचीही शक्यता आहे, त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मिपा व्यवस्थापन पाहणारे नीलकांत यांच्या मदतीने हा अंक पूर्णत्वास गेला, त्यांच्याबरोबर तांत्रिक काम करणारे प्रशांत, अभ्या, सुंदर सुलेखन करणारे एस, लेखनात चित्रांची सजावट करणार्या निलमोहर, प्रतिमा खडके, पियुशा यांचेही आभार मानतो. शेवटच्या क्षणापर्यंत लेख येत होते आणि न थकता, न कंटाळता ज्यांनी मुद्रितशोधनाचं काम केलं, त्या सुधांशुनूलकर यांचे आभार मानतो. रसिकहो, विद्येशिवाय कोणी राहू नये हे जसं बरोबर आहे, तसं मिपाशिवाय कोणीही अलिप्त राहू नये, म्हणून 'सा मिपाया विमुक्तये' असं म्हणावंसं वाटतं.
सर्व मिपाकरांना दिवाळी अंकासाठी जाहीर लेखनाबाबत हाक दिली आणि त्यांनी आपलं लेखन पाठवलं. खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आपले सर्वांचे मन:पूर्वक आभार. दिवाळी अंकातील लेखन निवडीसाठी दिवाळी अंक समितीने खूप मेहनत घेतली. काही कारणास्तव लेखन दिवाळी अंकात समाविष्ट झालं नसेल, त्यांनी आपलं लेखन मुख्य बोर्डावर दिवाळीनंतर प्रकाशित करावं. आपल्या सर्वांच्या मदतीबद्दल आपल्या ऋणात राहू इच्छितो. दिवाळी अंकात त्रुटी वा उणिवा असतील, त्या माझ्या आहेत, त्यासाठी उदार मनाने आपण मला क्षमा करावी.
फोडिले भांडार । धन्याचा हा मालमी तो हमाल । भारवाही
या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे शब्दधन तुमचंच आहे, मी केवळ शब्दवाहक आहे, ते भाग्यही आपल्यामुळेच मिळालं, म्हणून.
न्य़ून ते पुरते । अधिक ते सरते ।
करुनि घ्यावे तुमते । विनंती माझी ॥
सर्व मिपाकर रसिक, मिपाकर वाचक या दिवाळी अंकाचं स्वागत करतील, आपले रोखठोक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानतो. आपणास ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो, अशी शुभेच्छा देतो....!
मुख्य संपादक
(मिपा दिवाळी अंक २०१५)