पहिलेवहिले मराठी चावटसाहित्य संमेलन पुण्यात संपन्न
पहिले अखिल वैश्विक मराठी चावटसाहित्य संमेलन कालच पुणे येथे संपन्न झाले त्याचा वृत्तांत...
मराठी साहित्यविश्वात संमेलनांची वानवा नाही. नेहमीच्या साध्या साहित्यसंमेलनाबरोबरच कुठे विद्रोही साहित्य संमेलन, कुठे स्त्रीसाहित्य संमेलन, कुठे विद्रोही स्त्रीसाहित्य संमेलन, मुस्लिम साहित्यिक संमेलन, कविसंमेलन, नाट्यसंमेलन, झालंच तर वैदर्भी, कोकणी, खानदेशी अशा प्रादेशिक फ्लेवरची संमेलने, खेरिजकरून विविध साहित्यजत्रा, उरूस, यांचा रतीब सर्वकाळ चालू असतो. मात्र सध्या बहराला येत असलेला परंतु आजवर दुर्लक्षित असलेला एक नव-साहित्यप्रकार, जो की चावटसाहित्य, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक चावटसाहित्य संमेलन भरवावे, असा विचार या क्षेत्रातील काही अग्रणींच्या मनात आला, आणि मग मराठी सारस्वताच्या प्रथेप्रमाणे चावटसाहित्य संमेलन कमिटीची स्थापना, निधिसंकलन, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुका, प्रचार, वादविवाद, आरोप-प्रत्यारोपांची राळ या सर्व पायर्या पार करत एकदाचे हे संमेलन मराठी संस्कृतीचे आणि अस्मितेचे केंद्रस्थान आणि महाराष्ट्रातील सर्व नव-चळवळींचे उगमस्थान, जे की पुण्यग्राम, येथे घेण्याचे ठरले.
संमेलनाची सुरुवात हिंदी चित्रपटसॄष्टीच्या आजच्या आघाडीच्या तारका सनी लिओनी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर संमेलनाचे शीर्षकगीत 'फू बाई फू, फुगडी फू, चला चावटसाक्षर बनू' या गीताचे समूहगान करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली.
'चावटपणाः एक इतिहास' या भाषणात श्री. अभ्या अभ्यंकर ('वहिनी, ऑर्किड आणि मी' या आत्मचरित्रवजा इ-कादंबरीचे लेखक) यांनी चावटसाहित्याचा आजवरचा इतिहास उलगडून दाखवला. 'स्थूलमानाने चावटसाहित्याचा इतिहास हा तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे' ते म्हणाले. 'पहिला टप्पा म्हणजे प्रागैतिहास. या टप्प्यात चावटसाहित्य बाल्यावस्थेत होते. या काळातील बहुतांश साहित्यनिर्मिती ही सार्वजनिक स्वच्छतालयांच्या भिंती, पुलांखालच्या जागा, इत्यादि ठिकाणी झाली. ही सर्व साहित्यनिर्मिती करणारे लेखक अनामिक होते. तसेच या टप्प्यातले बरेचसे लिखाण हे चित्रमय स्वरुपात केले जात असे. जरी या टप्प्यातले साहित्य फारसे दखल घेण्याजोगे नसले, तरी चावटसाहित्यनिर्मितीचा पाया या कालखंडाने रचला, हे आपण विसरता कामा नये'
यानंतर आला तो कागदी टप्पा. काही अभ्यासक याला 'पिवळ्या वेष्टनाचा टप्पा' असेही म्हणतात. या काळातील साहित्यनिर्मिती ही कागदी पुस्तकांवर होत असे. मात्र, तत्कालीन समाजाचे मत या साहित्याबद्दल प्रतिकूल असल्यामुळे या काळातले साहित्य फार उंची गाठू शकले नाही. तसेच या साहित्याची आवड जोपासणे या काळात वाचकांनाही कठीण होते. प्रतिकूल वातावरणामुळे असे साहित्य हे त्या काळात लपून-छपून साठवावे व वाचावे लागे. यामुळे साहजिकच सामान्य वाचकाच्या व्यासंगावर मर्यादा येत.
गेल्या शतकाअखेर मात्र चावटसाहित्यात क्रांतिकारक बदल घडून आला. महाजालाची निर्मिती, माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि ज्ञानविस्फोटामुळे जीवनाच्या सर्व अंगाप्रमाणे या क्षेत्रातही उलथापालथ झाली. चावटसाहित्याची निर्मिती, विपणन, साठवण आणि वाचन या सर्व प्रक्रिया अतिसुलभ आणि व्यक्तिगत झाल्या. केवळ या साहित्याला वाहिलेल्या संस्थळांची निर्मिती या काळात झाली. परिणामी चावटसाहित्यानेही सांधे बदलले आणि उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होऊ लागली. ताज्या दमाचे अनेक युवा-लेखक या क्षेत्रात उतरले. आज या बदलाची गोड फळे आपण सर्व चाखत असून चावटसाहित्याचा भविष्यकाल निश्चितच उज्ज्वल आहे' असे म्हणून त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भाषण संपवले.
यानंतर लोकप्रिय चावटकथाकथनकार श्री. पप्पू गोळे यांनी आपली लेटेस्ट कथा 'बंद लिफ्टमध्ये एक रात्र' चे अभिवाचन केले. रसिकांकडून या कथेला उत्कॄष्ट प्रतिसाद लाभला. कथेतील अनेक रोमांचकारक प्रसंगांच्या वेळी श्रोत्यांनी शिट्ट्या वाजवून दाद दिली. टाळ्यांच्या गजरात श्री. गोळे यांनी कथा संपवली.
चावटलेखक आणि चावटवाचक यांच्या प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम यानंतर झाला. यामध्ये श्रोत्यांनी चावटसाहित्याकडून त्यांना असलेल्या अपेक्षा लेखकांपर्यंत पोहोचविल्या. चावटसाहित्याच्या एक पुणेस्थित गाढ्या अभ्यासक सौ. वनिता पिसाळ-लेले यांनी स्त्रियांसाठी उत्तम प्रकारचे साहित्य निर्माण होत नसल्याची खंत मांडली. 'आपल्यासारख्या अनेक स्त्रियांना नवरा आणि मुलांना अनुक्रमे कामावर आणि शाळेत पाठवून दिल्यावर दुपारच्या शांत वेळी चावटसाहित्याचा आनंद घ्यावयास आवडते, परंतु बहुतेक साहित्य हे पुरुषांनी पुरुषांच्या नजरेतून पुरुषांसाठी लिहिलेले असते, स्त्रियांना आवडेल अशा साहित्याची आंतरजालावरही वानवाच आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली. तोच धागा पुढे खेचून श्री. संज्या गावडे ('लेलेबाईंची ट्युशन' या गाजलेल्या कथेचे लेखक) यांनी स्त्रियांनी या क्षेत्रात येण्याची आवश्यकता विषद केली. आजमितीस चावटसाहित्य पुरुषप्रधान आहे हे खरेच, परंतु त्यावर तोड म्हणजे स्त्रीलेखिकांनी चावटसाहित्यनिर्मितीत उतरून अधिकाधिक चांगल्या दर्जाचे स्त्रियाभिमुख साहित्य निर्माण करणे, हीच आहे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर बेंद्रे नावाचे एक गृहस्थ लाजत लाजत उठले व 'आजचे चावटसाहित्य केवळ स्त्रीपुरुषांमधल्या नातेसंबंधांभोवती फिरते आहे' अशी लाडिक तक्रार त्यांनी शर्टाच्या टोकाशी बोटांनी चाळा करत करत मांडली. उदाहरणार्थ म्हणजे केवळ पुरुष पात्रे असलेल्या चावटकथा देखिल काही वाचकांना वाचायला आवडतील, असे म्हणून ते मुरका मारून खाली बसले.
सरतेशेवटी अध्यक्षीय भाषणात श्री. बंटी दातार यांनी 'नव्या लाटा नि नव्या वाटा' या भाषणात चावटलेखकांना नवनवी क्षितिजे धुंडाळायला उद्युक्त केले.
'आज चावटसाहित्य चाकोरीबद्द झाले आहे की काय, अशी शंका येते. त्याच त्याच वहिनी, त्याच त्या इंग्लिशच्या मॅडम, त्याच त्या कामवाल्या काकू यातच आज चावटकथा अडकली आहे. चावटसाहित्यिकांनी त्याच त्या साच्यात अडकून न पडता आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचे वारू मोकळे सोडावेत. इतिहासलेखन, नाट्यलेखन, प्रवासवर्णन, विज्ञानकथा अशा अनेक वाङ्मयप्रकारांचे चावटीकरण करण्यासाठी मैदान मोकळे असताना चावटलेखकांनी आपल्या लेखनाचा परीघ इतका मर्यादित का ठेवला आहे, याचे मला आश्चर्य वाटते' असे ते म्हणाले. यापुढेही ते बरेच काही बोलणार होते. मात्र त्याचवेळी सभागॄहात काही गलबला झाला व साधारण पन्नाशीचे, बुटकेले कुणी गृहस्थ अचानक स्टेजवर आले आणि 'बंड्या, भडव्या, इथे हे धंदे करत बसला आहेस? गाढवा, दहावीचे वर्ष आहे ना यंदा?' असे म्हणून अध्यक्षांचा कान धरून त्यांना खेचत घेऊन गेले. या प्रकारामुळे गांगरलेल्या आयोजकांनी घाईघाईनेच संमेलन आवरते घेतले. अजूनही चावटसाहित्यिकांना खुद्द त्यांच्या निकटवर्तियांमध्येही प्रतिष्ठा कशी नाही, याची दबक्या आवाजात चर्चा करत श्रोते पांगले.
आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचे वारू मोकळे सोडावेत.खच्चून अणुमोदण. :))