Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कृष्णमयी मीरा !!!

व
विशाल कुलकर्णी
Fri, 01/30/2015 - 05:02
💬 52 प्रतिसाद
संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत आपल्याकडे अनेक संत महात्मे होवून गेले. या सगळ्यांनी मराठीतील भक्तीसाहित्य समृद्ध केलेले आहे. पण मराठी भाषेच्या पलिकडे जावुन जर पाहिले तर इतर भाषांतही त्या त्या प्रांतातील संत महात्म्यांनी प्रचंड साहित्य निर्मीती केलेली आहे. मग ते संत तुलसीदासांचे 'तुलसी रामायण' असो, सुरदासाचे काव्य असो, कबीर्-रहिमचे दोहे असोत वा मीरेची पदे असोत. या सगळ्यांनीच भारतीय भक्ती साहित्याला एका विलक्षण उंचीवर नेवुन ठेवलेले आहे. मला स्वतःला मात्र यापैकी संत कबीर आणि संत मीराबाई यांच्याबद्दल एक विलक्षण आकर्षण आहे. खरेतर या दोघांचे आयुष्य अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने व्यतित झालेले आहे. कबीर अतिशय सामान्य घरात वाढले, त्यांच्यासमोरच्या समस्या वेगळ्या होत्या, तर मीरा राज घराण्यात जन्माला आलेली, तिच्या समस्या पुर्णपणे निराळ्या... पण या दोघांमध्येही एक विलक्षण साम्य आढळते, ते म्हणजे अनन्यभक्ती ! इतर कुठल्याही शास्त्राला, धर्मकर्माला, कर्मकांडाच्या अवडंबराला गौणत्व देवुन स्वानुभुतीला पुजण्याची, स्वानुभुतीबद्दल असलेली अपार निष्ठेची भावना !! आज आपण मीराबाईबद्दल बोलणार आहोत... Meera (छायाचित्र आंतरजालावरून साभार) संत मीराबाई भज मन चरणकमल अविनासी जे ताई दीसे धरण-गगन बिच तेताई सब उठ जासी कहा भयो तीरथ व्रत कीन्हे कहा लिये करवत कासी इण देही का गरब न करणा माटी में मिल जासी यो संसार चहर की बाझी सांझ पड्या उठ जासी कहा भयो है भगवा पहर्‍यां घर तज भये संन्यासी जोगी होय जुगती नहिं जाणी उलटि जनम फिर आसी अरज करी अबला कर जोरे स्याम तुम्हारी दासी मीरा के प्रभु गिरिधर नागर काटो जम की फांसी भज मन चरणकमल अविनासी मराठी अनुवाद : विशाल कुलकर्णी भज मना रे तू, ते चरणकमळ अविनाशी धरा-अंबरामध्ये दिसे जे, ते सर्व असे विनाशी हवे कशाला व्रत-तीर्थाटन, मोक्षास हवी का काशी? अहंकार वृथा हा देहाचा, रे अखेर मातीस मिळशी दिन ढळतो रे हा हा म्हणता, संसार नसे अविनाशी हवी कशाला भगवी वस्त्रे, वृथा संन्यास का घेशी? योगी होवुन मंत्र न जाणे मोक्षाचा, भवचक्रात अडकशी विनवणी करतसे कर जोडुनि अबला, केशवा तव दासी गिरिधर प्रभो, गुंतवू नको मीरेला, भवसागरा तळाशी भज मना रे तू, ते चरणकमळ अविनाशी मीरेचा जन्म राजकुळात झालेला. माहेर असो वा सासर, सुख्-समृद्धी, सोयी सुविधा कायम दासासारख्या हात जोडून समोर उभ्या. पण मीरेच्या वृत्तीवर या कशाचाच परिणाम झालेला दिसत नाही. सदैव पाण्यात राहूनही कोरडे राहणार्‍या कमलदलासारखी निर्लेप वृत्ती घेवुनच ती जगली. एकच ध्यास आयुष्यभर होता.... "मेरे तो गिरधर गोपाल, दुसरा न कोय!" एकच आस कायम मनात होती. त्या गिरिधर गोपाळाच्या चरणकमळाची. वरील पदात ती 'मनाला' सांगते. "ही धरा आणि आकाश यांच्यामध्ये जे काही आहे ते सर्व नश्वर आहे. मग त्याचा मोह कशाला हवा? कशाला हवे फुकाचे कर्मकांड आणि व्यर्थ तिर्थयात्रा, कशाला हवेत ते संन्यास धर्माचे अट्टाहास आणि जप-तपे. या देहाबद्दल वृथा आसक्ती, अहंकार कशाला हवा? वेड्या, अरे मातीतून जन्माला आलास शेवटी मातीतच जायचास. अरे ...केवळ संन्यास घेवुन मोक्ष नाही मिळत. मोक्षासाठी आवश्यक असते ते परमात्म्याशी मिलन, ते समर्पण. हि साधी युक्ती जोपर्यंत तुला समजत नाही तोवर ही भगवी वस्त्रे, हे जपतपाचे कर्मकांड सगळे व्यर्थ आहे. म्हणून शेवटी ती हरिलाच विनंती करते की परमेश्वरा मला या भवचक्राच्या फेर्‍यात अडकवु नकोस, मला तुझ्या पायाशी जागा दे. अन्य काही नको!" मीरा... खरेतर या नावाचे आपल्या पुराणात, इतिहासात कुठेच आणि कसलेच संदर्भ सापडत नाहीत. बरेचसे लोकांच्या मते हे एक मुस्लीम नाव आहे. मीरासाहिब म्हणुन एक महान मुस्लिम फकीरही होवून गेलेले आहेत. पण तरीही हे नाव कधी कुणाला खटकलेले नाही. कारण मीरेने स्वतःच्या समर्पण वृत्तीने, तेजस्वी भक्तीने या नावालाच कृष्णपद प्राप्त करुन दिले आहे. लहानपणी आईने थट्टेने कृष्णाच्या मुर्तीकडे बोट दाखवून सांगितले.... "वो देख, वो है तेरा दुल्हा!" भाबड्या, निरागस मीरेने त्या क्षणी जगाशी नाते तोडले आणि ती कृष्णमय झाली...कृष्ण झाली. मुळातच समन्वयवृत्ती आणि समर्पण हाच स्वभाव असल्याने मीरेला कोणी कधीच कुठल्याच बंधनात, मोहात बांधू शकले नाही. तिला मोहात पाडू शकणारी एकच गोष्ट होती या जगात... "मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई जाके सिर मोरमुकुट मेरो पति सोई" मीरेची सगळी साधना कृष्णापाशी सुरू होते आणि कृष्णापाशी येवुन संपते. तिची प्रेमभक्ती हे तिच्या साधनेचे बलस्थान होते. पण तिने साधनेचे सर्व प्रकार अनुभवलेले दिसतात. ते तिच्या कवनांमधून प्रकर्षाने जाणवत राहते. योगसाधना, उपासना, ज्ञानसाधना अगदी टोकाची अशी वैराग्यसाधनादेखील तीने आपल्या प्रेमसाधनेच्या कसोटीवर, निकषांवर तपासून पाहीलेली असल्याचे जाणवत राहते. एक गोष्ट तिच्या लक्षात आलेली होती की आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ते गिरिधर नागर गोपाळाशी मिलन. मग त्यासाठी तिला काहीच वर्ज्य नव्हते. त्यासाठी मीरा आजन्म साधनारतच राहिली. घडी एक नहिं आवडे तुम दरसण बिन मोय तुम हो मेरे प्राण जी कासूं जीवण होय धान न भावै नींद न आवै बिरह सतावे मोय घायलसी घूमत फिरूं रे मेरो दरद न जाणै कोय ती म्हणते "हे हरि, तुला पाहिल्याशिवाय एक क्षणभरही चैन पडत नाही मला. तू माझे प्राण आहेस, तूच नसशील तर या जगण्यात काय अर्थ आहे. तहान्-भूक विसरली. निद्रेने साथ सोडली , त्यात हा नित्य तुझा विरह. वेड्यासारखी अवस्था झालेय पण कुणाला माझी व्यथा कळतच नाही." मीरेची कृष्णाशी असलेली सायुज्यता कधी कुणाला कळलीच नाही. तिची कृष्णाविषयीची निरलस वृत्ती, निरपेक्ष भक्ती, ते निरागस प्रेम, ती जगावेगळी निष्ठा कधी कुणाला कळलीच नाही. पुराणानुसार मुक्तीचे चार प्रकार सांगितले जातात. सलोकता, समीपता, सरुपता आणि सर्वात श्रेष्ठ अशी 'सायुज्यता'. उदाहरणच द्यायचे झाले तर कैलास लोकात अथवा वैकुंठात राहायला मिळणे ही झाली सलोकता. तिथे राहून शिवाच्या अथवा श्रीविष्णुंच्या सान्निद्ध्यात राहून त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे ही झाली समीपता. कायम ईश्वरा च्या जवळ राहिल्याने एक वेळ अशी येते की त्रयस्थ माणसाला हा देव आणि हा भक्त असे वेगवेगळे भेद कळतच नाहीत. दोघेही सारखेच वाटायला लागतात ही झाली सरुपता...... आणि खुप कमी भाग्यवंताना लाभते ते म्हणजे परमेश्वरातच मिसळून जाण्याची, त्याच्याशी एकरुप होण्याची क्षमता... ती सायुज्यता ! माझ्या माहितीनुसार हे भाग्य लाभलेले दोनच संतश्रेष्ठ होवून गेले एक मीराबाई आणि दुसरी कान्होपात्रा ! मीरेच्या कवनांमधून सर्व प्रकारचे रस डोकावतात. मुळातच प्रेमभक्ती हा तिच्या उपासनेचा, साधनेचा मुळ पाया असल्याने राग, मोह, विरह, वैराग्य आणि श्रुंगार असे बरेचसे रस तिच्या कवनांनधून ओसंडुन वाहताना दिसतात. तुम्हरे कारण सब सुख छांड्या अब मोहिं क्युं तरसावौ बिरहबिया लागी उर अंतर सो तुम आय बुझावौ (हे कृष्णप्रिया, तुझ्यासाठी सगळ्या सुखांचा त्याग केला तरी तू असा का त्रास देतोयस मला. विरह व्यथेने जळणारी या मीरेची ही अवस्था तडफड तुझ्या लक्षात येत नाही का? ही सगळी तळमळ, हा दाह शमवण्याची क्षमता फक्त तुझ्या स्पर्शातच आहे रे !) श्रुंगाररसातून देखील मीरेची भक्ती, तिची निष्ठाच जाणवत राहते. अब छोड्या नहिं बनै प्रभुजी हंसकर तुरत बुलावौ मीरा दासी जनम जनम की अंग सूं अंग लगावौ (अता क्षणाचाही दुरावा सहन नाही होत. बस्स तू एकदा हंसून तुझ्याजवळ बोलाव. ही मीरा जन्मो-जन्मीची तुझी दासी आहे.... अंगाला अंग भिडू दे आता!) राजघराण्यात वाढलेल्या मीराबाईचा काळ हा तत्कालिन मोघल आणि हिंदुंच्या संघर्षाचा काळ होता. कायम लढाया, हल्ले, कापाकाप्या यांचे ते दिवस होते. सतत होणार्‍या मोघलांच्या स्वार्‍या, राजस्थानातील स्थानिक राजसत्तांची होणारी परवड ती आपल्या डोळ्यांनी पाहात होती. पण एवढे हल्ले होवूनही राजस्थानातील हिंदू राजे मुघलांविरुद्ध कंबर कसण्याच्या ऐवजी आपली परस्पर वैर-वैमनस्ये विसरायला तयार नव्हते. एकेक राज्य उध्वस्त होत चाललं होतं पण एकत्र येवुन सगळी शक्ती मुघलांविरुद्ध एकवटण्याची राजस्थानातील विखुरलेल्या हिंदु राजांची तयारी नव्हती. हे सगळे भोगत, अनुभवत असलेल्या मीरेच्या संवेदनशील मनावर विलक्षण परिणाम होत होता. ऐहिक गोष्टींची नश्वरता आणि व्यर्थता तिला बरोबर कळली होती. म्हणून तिने स्वतःला बहुदा कृष्ण साधनेत, प्रेम साधनेत गुंतवून घेतले. प्रेमसाधना वाटते तशी आणि तेवढी सोपी नाही बरे. इथे भक्ताला आपल्या प्रिय ईश्वराच्या भेटीची आस असते. ईश्वरप्राप्तीसाठी तो तळमळतो. प्रभुचा तो दुरावा त्याला सहन होत नाही. परमेश्वर अगदी कसुन परीक्षा घेतल्याशिवाय कुणालाही आपली समीपता देत नाही. एखाद्या ज्योतीप्रमाणे, धुपाप्रमाणे प्रभुसाठी जळत राहण्याची तयारी ठेवावी लागते. त्या कोवळ्या वयात मीरेने कृष्णाला आपला पति मानले आणि त्यानंतरचं तिचं सगळं आयुष्यच कृष्णमय होवून गेलं. ऐसी लगन लगाई कहां तूं जासी तुम देखे बिन कल न परति है तलफि तलफि जिव जासी तेरे खातर जोगण हुंगी करवत लूंगी फासी मीरा के प्रभु गिरिधर नागर चरणकंवल की दासी "तुझ्या प्राप्तीसाठी जोगीण बनेन, वेळ पडल्यास मरण पत्करेन. गिरिधरा, ही मीरा तुझ्या चरणांची दासी आहे रे!" तिचा ठाम विश्वास होता की प्रभुचे नामस्मरण, त्याचे भजन किर्तन हीच त्याच्या प्राप्तीची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी मथुरा-काशीला जाण्याची गरज नाही. तीर्थयात्रांची आवश्यकता नाही. बस्स प्रभुंचे नामस्मरण यातच मोक्ष आहे. आणि हे सुत्र तीने आयुष्यभर अंगी भिनवले होते. भजन भरोसे अविनाशी मै तो भजन भरोसे अविनाशी जप तप तीर्थ कछुए ना जाणूं करत मै उदासी रे मंत्र ने जंत्र कछुए ना जाणूं वेद पढ्यों न गइ काशी मीरा के प्रभु गिरधर नागर चरणकमल की हूं दासी भजन भरोसे अविनाशी मै तो भजन भरोसे अविनाशी! हे झालं मीरेच्या स्वतःबद्दल, तिच्या कृष्णभक्तीबद्दल. पण स्वतः कृष्णाबद्दल सांगताना मात्र तिची काव्यप्रतिभा विलक्षण बहरते. श्रीकृष्णाबद्दल बोलताना तिला काय सांगु आणि काय नको असे होते. यदुवर लागत है मोहिं प्यारो मथुरा में हरि जन्म लियो है गोकुल में पग धारो जन्मत ही पुतना गति दीनी अधम उधारन हारी यमुना के नीरे तीरे धेनु चरावै ओढे कामरि कारो सुंदर बदन कमलदललोचन पीतांबर पट वारो मोर मुकुट मकराकृत कुंडल करमें मुरली धारो शंख चक्र गदा पद्म बिराजै संतन को रखवारों जल डुबत ब्रज राखि लियो है करपर गिरिवर धारो मीरा के प्रभु गिरिधर नागर जीवनप्राण हमारो 'मीरा' मुळात 'मीरा' राहिलीच नव्हती. ती पुर्णतः कृष्णमयी होवून गेलेली होती. त्यामुळे तिच्या कवनांमधुन जिथे तिथे कृष्ण ओथंबून भरलेला दिसतो. तिचा प्रत्येक क्षण हा हरिच्या मिलनासाठी आसुसलेला आहे. कुठलीही सुखे तिला तिच्या या साधनेपासुन परावृत्त करू शकत नाहीत किवा तिच्या मनातील प्रभुबद्दलची प्रिती कमी करु शकत नाहीत. हरि मेरे जीवन प्रान-अधार और आसरो नाही तुमबिन तीनूं लोक मंझार आप बिना मोहिं कछु न सुहावै निरख्यौं सब संसार मीरा कहै में दासि रावरी दीज्यौ मती बिसार हरि मेरे जीवन प्रान-अधार मोहि लागी लगन हरिचरनन की चरन बिना कछुवै नहिं भावे जग माया सब सपननकी भवसागर सब सुखि गयो है फिकर नही मोहिं तरनन की मीरा के प्रभु गिरिधर नागर आस वही गुरु सरनन की मोहि लागी लगन हरिचरननकी वर सांगितल्याप्रमाणे 'मीरा' हे सायुज्यतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ती कृष्णाशी एवढी एकरुप होवू गेली होती की स्थळ्-काळाचे देखिल भान विसरून बसे. कधी ती स्वतःला वृंदावनातील गोपी समजते तर कधी राधा. कृष्णाच्या लीलांना कंटाळलेल्या एखाद्या गोपिकेप्रमाणे ती लडिवाळ तक्रारही करते. हलकेच आपल्या प्रियाला लटका रागही दाखवते. छांडो लंगर मोरी बाहिया गहौ ना मै तो नार पराये घर की मेरे भरौसे गुपाल रहौ ना जो तुम मेरी बहियां धरत हो नयन जोर मेरे प्राण हरौ ना बृंदाबन की कुंजगली में रीति छोड अनरीति करौ ना मीर के प्रभु गिरिधर नागर चरणकमल चित टारे टरौ ना जावा दे गुमानी कृष्ण म्हांरे घर काम छे थें हो लंगर नंद महर के व्रजबरसाने म्हांरो गाम छे जानो नहीं तो पूंछ लीजो श्रीराधा म्हारो नाम छे मीर के प्रभु गिरिधर नागर नाम थांको बदनाम छे मीरेची सगळी कवने ही एक प्रकारची आर्त विनवणीच असल्याने ती खुप लवकर तोंडात रुळतात. मनाला भावतात. तिच्या कवनात त्या गोपालाचे वर्णन असते, त्याच्याविषयी लडिवाळ तक्रार असते. तिच्यासाठी तिचा कृष्ण सार्‍या आसमंतात सामावलेला आहे. पशु-पक्ष्यांच्या किलबिलीत तिला कृष्णाची मुरली ऐकु येते. ऋषीमुनींच्या मंत्रपाठात तिला कृष्ण जाणवतो. गोहनें गुपाल फिरूं ऐसी आवत मन में अवलोकत बारिज बदन बिबस भई तन मन में मुरली कर लकुट लेऊं पीर बसन धारुं काछी गोप भेष मुकुट गोधन संग चारूं हम भई गुलहामलता वृंदावनरैना पसु पंछी मर्कट मुनी श्रवन सुनत बैना गुरुजन कठिन कानि कासों री कहिए मीरा प्रभु गिरिधर मिली ऐसे ही रहिए ! तर कधी हिच मीरा विरहाने व्याकुळ होते. काय वाट्टेल ते करा पण आपल्या चरणी स्थान द्या अशी प्रभुचरणी विनंती करते. तुम सुनो दयाल म्हांरी अरजी भौसागर में बही जात हूं काढो तो थांरी मरजी यो संसार सगो नही कोइ सांचा रघुवरजी मातपिता और कुटुंबकबीला सब मतलब के गरजी मीरा के प्रभु अरजी सुन लो चरण लगाओ थांरी मरजी!! सखी रीं मोहिं लाज बैरन भई चलत लाल गोपाल के संग काहे नाहीं गई कठिन क्रूर अक्रूर आयो साजी रथ कहं नई रथ चढाय गोपाल लैगो हाथ मीजत रई कठिन छाती स्याम बिछुरत बिदरि क्युं ना गई दासी मीरा लाल गिरिधर बिरह तें तन तई !! मै बिरहणी बैठी जागूं जगत सब सोवै री आली बिरहणी बैठी रंगमहल में मोतीयन की लड पोवै इक बिरहिणी हम ऐसी देखी अंसुवन की माला पोवै तारा गिन गिन रैण बिहानी सुख की घडी कब आवै मीरा के प्रभु गिरिधर नागर मिलके बिछुड न जावै !! 'मीरा' हे खरोखर एक अजब रसायन आहे. त्याग, समर्पण, निष्ठा, प्रेम या गुणांचे आदर्श उदाहरण. मीरेचे जीवन अनेक अद्भुत घटनांनी भरलेले आहे. मीरेच्या आयुष्याला, तिच्या कहाणीला उठाव देण्यासाठी बहुतेक कथाकारांनी तिच्या कथेत अनेक चमत्कारही घुसडलेले दिसुन येतात. पण खरेतर मीरेचे जीवन इतके स्वच्छ आणि शुद्ध आहे की त्यात चमत्कारांना जागाच नाही. स्वच्छ पाण्याप्रमाणे तिचे जीवन पारदर्शक आहे. इथे लपवण्यासारखे काही नाही. प्रेम आणि निष्ठा हे तिच्या साधनेचे, तिच्या आयुष्याचे मुलभुत घटक आहे. मीरेची साधना प्रकट आहे. तिचा पदांमध्ये भक्तीरस ओथंबून वाहतो आहे. पदांमध्ये श्रुंगाराचा भावही आहे पण नटवेपणा नाही. मीरेचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे तिच्या पदांमध्ये काव्यत्मकता असली तरी प्रेमभक्तीच्या बारकाव्यांत ती शिरत नाही. तिची पदे भक्तिरसपुर्ण असली तरी त्यात कसलीही कृत्रिमता नाही. सच्ची भावना, त्यांचे पावित्र्य या दोन्ही गोष्टी मीरेमध्ये काठोकाठ भरलेल्या आहेत आणि त्या तिच्या काव्यातुन कायम भेटत राहतात. त्यामुळे आपोआपच एका सनातन राजघराण्यात जन्मलेली, वाढलेली ही राजकन्या तथाकथित रुढी परंपरांच्या चौकटीत न अडकता त्यापेक्षाही मोठी बनुन जाते. कृष्णमयि म्हणवता म्हणवता स्वत:च कृष्ण बनून जाते. मै तो राजी भई मेरे मन में मोहिं पिया मिले इक छन में पिया मिल्या मोहिं किरपा कीन्हिं दीदार दिखाया हरिने सतगुरू शब्द लखाया अंसरी ध्यान लगाया धुन में मीरा के प्रभु गिरिधर नागर मगन भई मेरें मनमें..... मगन भई मेरें मनमें.....!!! संदर्भ : काव्यसंग्रह - 'मीरा' - श्री. मंगेश पाडगावकर मी मराठी दिवाळी अंकात पुर्वप्रकाशित विशाल कुलकर्णी. पुणे. .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16267 views

💬 प्रतिसाद (52)
स
स्वामी संकेतानंद Fri, 01/30/2015 - 07:54 नवीन
वाह! मीरा छान हळुवार उकलली आहे. अनुवादसुद्धा सुरेख जमलाय.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 01/30/2015 - 12:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 01/30/2015 - 07:55 नवीन
सुंदर लेख. पण … मीरा भक्ती जगमान्य आहे , पण किरण नगरकरांचे पुस्तक वाचल्यानंतर मनात आलेले विचार. मीरेचा काळ हा मुस्लिम आक्रमणाचा काळ . मीरेचा नवरा भोजराज त्याविरुध्द लढत असताना मीरेने त्याला active साथ द्यायला नको होती का? राष्ट्रभक्ती ही देवभक्तीपेक्षा जास्त महत्त्वाची नव्हती का ? हाच विचार पेशवे (बाजीराव अपवाद) , अहिल्याबाई वा इतर नावाजलेल्या राज्यकर्त्यांबद्दलही येतो. देवळे, धर्मक्षेत्रे यांना मदत करण्या ऐवजी सैनिक प्रशिक्षण, शस्त्रास्त्र संशोधन या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या का ? (टिपू सुलतान, शिवाजी महाराज हे अपवाद !) माझे इतिहासाचे ज्ञान अगदी तोकडे आहे तेव्हा कृपया जाणकारांनी अधिक माहिती द्यावी .
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/30/2015 - 11:00 नवीन
माफ करा चुकलामाकलासाहेब, मला असे वाटतेय की तुम्ही लेख नीट वाचलाच नाहीये. नाहीतर मीरा कळाली असती तुम्हाला. :)
  • Log in or register to post comments
H
hitesh Fri, 01/30/2015 - 11:01 नवीन
मीरेच्या संसारात जोगत्याचे आयुस्ष्य तिचा नवरा जगला. मीराबै ऐषो आरामात राहिली.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/30/2015 - 11:44 नवीन
वाहवा ... नवीनच शोध अजून ! अभिनंदन हितेशराव.
  • Log in or register to post comments
H
hitesh Fri, 01/30/2015 - 14:05 नवीन
बेगम म्हणते... कृष्णाभोवती रासलीला खेळणार्‍या ज्या स्त्रीया होत्या त्यातल्या एकीची इच्छा अतृप्तच राहिली आणि ती पुढच्या जन्मात मीराबै झाली व देवाचा पूतळा भजु लागली. म्या म्हणतो... हाच हिंदुधर्माचा आदर्श असेल तर म्या पुढच्या जन्मी तुला वार्‍यावर सोडणार व घरात माधुरीबैचा पुतळा उभा करुन त्यावर गाणी लिवणार. ! बेगम म्हणते ... साधीभोळी मीरा तुला कळली नाही. म्या म्हणतो ... मला काहेच कळत नाही ! हिंदु पुरुष एक बै करो नै तर तीन करो नै तर आठ करो , बहुतांश हिंदु राजे बायकांच्यामुळे बर्बाद व अल्पायुषी झाले आहेत. आणि हिंदुच्या दहा पट बायका करुन हिंदुंच्या दहा पट मोठी राज्ये भोगुन बहुतांश मुसलमान राजे हिंदुंच्या दुप्पट तिप्पट आयुष्य जगले आहेत ! मृयुत्युसमयी मीराबैचा नवरा सुमारे पंचवीस वर्षांच होता.
  • Log in or register to post comments
H
hitesh Fri, 01/30/2015 - 14:09 नवीन
.... आणि मीराबैच्या नवर्‍याचा शत्रु अकबर सुमारे ऐंशी वर्षे जगला. माझा हा शोध कुणी खोटा ठरवला तर मला आनंदच होईल.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 01/31/2015 - 02:11 नवीन
उदाहणार्थ ??
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Wed, 09/16/2015 - 09:03 नवीन
या तर्काने बोलायचे, तर बालगंधर्वांनी चले जाव चळवळ उभारायला हवी होती, भीमसेन जोशींनी आणीबाणीचा विरोध म्हणून तुरुंगात जायला हवे होते, बाबा आमट्यांनी सैन्यात भर्ती होऊन चिनी आक्रमणाचा सामना करायला हवा होता आणि पुलंनी हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीला आणायला हवा होता. हे सर्व या लोकांनी जरी केले असते, तरी बोट दाखवण्यासाठी काही ना काही दुसरे कारण सापडलेच असते, काय? :-)
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 01/30/2015 - 12:05 नवीन
वाह!!! कसले लीलया मीरे च्या भजनांचा अनुवाद करायचे शिवधनुष्य पेलले आहेत देवा!!!, seems like u were stepping into Meera's shoes while writing!!!, दैवी देणगी आहे बॉस तुम्हांस अलगद अलवार लेखन खुलवायची!!! लगे रहो!! पुलेशु (अग्नोस्टिक तरीही कुतूहल बाळगणारा) बाप्या!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 01/30/2015 - 12:20 नवीन
*yes3*
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/30/2015 - 12:19 नवीन
सुरेख लेख आणि अनुवाद तर अतिशय चपखल. @ चुकलामाकला-एखाद्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास असू शकतो ना? जसा स्वातंत्र्यासाठी लढणार्याला स्वातंत्र्याची आस असते तशीच मीरेला तीच्या प्रभूमिलनकी आस होती.मान्य आहे तो काळ संघर्षाचा असेल पण मग त्याकाळात कोणी दुसरे काही जीवीतकार्य मानूच नये का? हाच क्रायटेरिया लावला तर सर्व संतांनी हुतात्मा व्हायला हवे होते.तुकारामाच्या काळात देखिल आदिलशाही (चुभुदेघे) होती.मग त्याने लढाया करायच्या सोडुन अभंग काय लिहिले म्हणावे का!!
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 01/30/2015 - 14:29 नवीन
अशी वडाची साल पिंपळाला कुठेही लावता येईल. उदा. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी रचन्यात वेळ न घालवता रामदेव रायाला अल्लाउद्दीन खिलजीच्या धोक्याची आगाऊ कल्पना द्यायला हवी होती. नामदेवांनी पंजाबात जाऊन लढाऊ शिखांची फौज उभारायला पायजे होती वगैरे....:-)
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 01/30/2015 - 16:20 नवीन
हम्म! @ अजयाताई, संत मीराबाई आणि संत तुकाराम यात फरक होता. शिवाय तुकाराम रामदास ई संतानी समाजजागृतीचे मोठ्ठे काम केले, ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या कार्याला योग्य अशी सुपिक जमीन तयार झाली . पण मीराबाई राणी होती, एका अशा राजाची की ज्याला सतत आप्तस्वकिय आणि परकियांशी लढावे लागत होते. मीराबाईची, राणी म्हणून त्याला moral support देण्याची मोठी जबाबदारी होती. ती तिने पार पाडली नाही असे मला वाटते. मी आधी लिहिल्याप्रमाणे ककोल्ड वाचल्यानंतरचे हे माझे मत, खरा इतिहास मला माहित नाही, @विशाल, तुमचा लेख नुसता समजलाच नाहीं तर भावला सुध्दा! पण माझा मुद्दा वेगळाच आहे,;)
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/30/2015 - 16:39 नवीन
मुळात मीराबाई ज्या प्रकारे भक्तिरसात एकरुप झाली होती,ती या बाकीच्या जगापासून अलिप्त होऊन कृष्णरंगात रंगलेली असणार.त्या काळात प्रत्येक राज्यकर्त्याला स्वकीय परकीयांशी लढाया करुनच सर्वाइव व्हावे लागत असणार.त्यामुळे हे चालतच असणार. पण मीरेने कृष्णभक्ती हेच आयुष्य बनवले होते.तोच तिचा प्रियकर ती समजते.त्यामुळे तीला मुळात तिच्या संसारात गृहित धरता नाही येणार ना?
  • Log in or register to post comments
H
hitesh Fri, 01/30/2015 - 18:42 नवीन
हो.. मग तिने संसारातुन बाहेर पडुन मीराबाईच्या नवर्‍याला दुसरी योग्य बायको मिळायची संधी द्यायला हवी होती. लाकडी पुतळा घेऊन ती झाडाखाली राहिली असती तरी चाललं असतं की. तिच्या प्रियकराने तिचं योगक्षेम पाहिलं असतं. नवर्‍यावर विनाकारण भार कशाला ? मिराबैचा संसार जेमतेम पाच वर्षे चालला. या पाच वर्षात नवर्‍याला कसलंही सुख मिळालं नाही. नवरा मेल्यावरही १६ वर्षे ती वैभव उपभोगत राहिली. अखेर तिच्या दीराबरोबर वाद झाल्याने ती संसार सोडुन बाहेर पडली. आठ हजार वर्षापुर्वी सोळा हजार बायकांचा उपभोग घेऊन जो गेला , मिराबैने त्याची चिंता करायची की जो हाडामासाचा मर्त्य मानव नवरा आहे त्याच्या वासनेची चिंता करायला हवी होती ? कळीचा मुद्दा हा आहे. मला तर मिराबै हा शब्द उच्चारला की घरोंदा षिनेमाची झरिना वहाब आठवते ! ........ ( .. बहिणीच्या नवर्‍याला संपुर्ण पगार देणार , त्याच्यावर सर्वस्व अर्पणार वगैरे बाता मारुन ,संसार सोडुन , मिरेची 'कृष्णभक्ती ' स्वीकारुन , नवरा सोडलेल्या व चार वर्षानी ' उंबरठा ' षिनेमाच्या निराश स्मिता पाटीलप्रमाणे पुन्हा संसारात परतलेल्या आधुनिक मिराबैचा दु:खी नवरा ..उर्फ.. हितेशभौ ! ). :)
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 01/31/2015 - 02:53 नवीन
काय बोलु हितेसभौ :(
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 09/16/2015 - 08:11 नवीन
हितेशभाऊ बहुतेक परित्यक्त असावेत. अशा लोकांना बरे व्हा असंच सांगू शकतो.
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Wed, 09/16/2015 - 13:39 नवीन
नवरा सोडलेल्या व चार वर्षानी ' उंबरठा ' षिनेमाच्या निराश स्मिता पाटीलप्रमाणे पुन्हा संसारात परतलेल्या आधुनिक मिराबैचा दु:खी नवरा . ... बायको परत आली. तिला अकबराच्या थाटात बाटगे हितेशराव बोल्ले ... मीराबाई नको , जोधाबाई व्हा !
  • Log in or register to post comments
क
किशोर७० Sat, 01/31/2015 - 06:57 नवीन
तवा पुरुषान एकच लग्न करन्याचा कायदा होता का भाउ ? तुमिच त म्हनलात - हिंदु पुरुष एक बै करो नै तर तीन करो नै तर आठ करो , (तिथ अजुन बरच काय म्ह्न्लात, पन ते जाउ द्या). उगा आपल ... तिच्या भ्रताराचि लैच कालजि तुमास्नि... अवान्तर - मस्त लेख!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 01/31/2015 - 08:30 नवीन
हितेशभौंच्या भावना पोचल्या. *sad* पण इथे त्या गैरलागू आहेत असे वाटते. कारण भक्ती आणि प्रेम यात फरक आहे. मीरेचे कृष्णावर प्रेम होते म्हणण्यापेक्षा भक्ती होती असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. इथे कृष्णाच्या बायका इ. मुद्दे गैरलागू. दुसरे, मीरेच्या पतीला दुसरा विवाह करण्यापासून कुणी अडवले होते असे वाचनात नाही. तसेच राजवाड्यातच राहीन असा मीरेचा अट्टाहास असल्याचेही कुठे वाचले नाही. तिला तर राजवाड्यात राहणे काय अन रानात राहणे काय, एकच. कारण सखा गिरीधर सदा सांगाती. उलट, तिने इतर ठिकाणी राहणे राजघराण्याला बट्टा लावणारे ठरेल म्हणून तिच्यावर संसारातच राहण्याची अन संसार करण्याची सक्ती करण्यात आली. हितेशभौंनापण एक हितेच्छू सल्ला. जी स्त्री संसारात रहात नाही, तिचा नाद करावा कशाला ? जी आपल्यापाशी रमेल अशी कुणी शोधावी. *smile*
  • Log in or register to post comments
H
hitesh Sat, 01/31/2015 - 19:40 नवीन
मीरेच्या नवर्‍याने एकच लग्न केले होते. त्ञाचा तरी काय दोश ! एक लग्न केल्यावर घरात एक पुतळा आला .. दुसरी आणली तर तीही अजुन एक पुतळा आणेल असे त्याला वाटले असेल. :)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 09/16/2015 - 08:19 नवीन
आठ हजार वर्षापुर्वी सोळा हजार बायकांचा उपभोग घेऊन जो गेला , मिराबैने त्याची चिंता करायची की जो हाडामासाचा मर्त्य मानव नवरा आहे त्याच्या वासनेची चिंता करायला हवी होती ? कळीचा मुद्दा हा आहे. >>> मीरेने फक्त स्वतःची चिंता करायला हवी होती. तिने ती केली. तिच्या स्वतःच्या चिंतेत तिच्या गिरिधर गोपालाची चिंताही सामील होती कारण ती स्वतःला त्याच्यापेक्षा वेगळं मानतच नव्हती. आजच्या परिभाषेप्रमाणे बोलायचं तर She was a liberated woman जिला स्वतःला काय हवं आहे आणि काय नको आहे याची नेमकी जाणीव होती. शिवाय त्या काळी तिचं लग्न हे ठरवूनच झालं असणार. म्हणजे एक प्रकारे नवरा तिच्यावर लादलाच गेला होता. मग त्याच्याबद्दल तिने विचार करावा हा अट्टाहास का म्हणून? शिवाय तिने केला असेल विचार. तेव्हाच्या काळी Facebook नव्हतं म्हणून relationship status update नसेल केलं. तुम्ही बोलणारे कोण?
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 09/16/2015 - 12:48 नवीन
कुठल्या शहाण्यांच्या (?) नादी लागताय देवा. अहो झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. असले नमुने इग्नोरास्त्रानेच मारायचे असतात.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 09/16/2015 - 20:04 नवीन
इथे इग्नोरास्त्रच कामाचे.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sat, 01/31/2015 - 03:13 नवीन
खरेय, ही व्यथा सर्व मोठ्या लोकांच्या घरच्या माणसांची असू शकते, उदाहरणार्थ संत तुकारामांची पत्नी, आवली .
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/31/2015 - 07:03 नवीन
सहमत आहे चुकलामाकलासाहेब ! पण शेवटी मनुष्यस्वभाव कुणाला कळलाय?बाक़ी माझ्या वरील प्रतिसादात तुमच्या वाचनाबद्दल शंका घेतली त्यासाठी क्षमस्व _/\_
  • Log in or register to post comments
त
ताल लय Fri, 01/30/2015 - 15:56 नवीन
सुरेख लेख "ओ म्हारा जुना जोशी , हरी से मिलन क्द होसी ... पाच मोहर की रे जोशी, दक्शणा दिराय देउय थोने और हिरे सु मडाय देउ थारी पोथी ओ म्हारा जुना जोशी , हरी से मिलन क्द होसी ... हरी हरी अनन्य भक्त मीराबाई
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 01/30/2015 - 17:04 नवीन
खरोखर सुंदर लेख ! लिखाणात मीराबाईंचा भक्तिरस पुर्णपणे उतरलाय ! अनुवादसुद्धा सुरेखच !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/31/2015 - 03:48 नवीन
धन्यवाद मंडळी ! हे चालायचंच, गुळाच्या ढेपेला मुंगळ्यांबरोबर धानातले कीड़े सुद्धा लागायचेच. त्याला इलाज नाही.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 04:07 नवीन
अप्रतिम धागा. वा.खु. साठवता येत नाहीये. :O
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/31/2015 - 04:31 नवीन
तुम्ही शांत आहात ते बरेच आहे विशाल! आजकाल एकंदरीतच रेड्यां ची क्वालिटी मार्किट मधे अवेलेबल नसता! आपण वेद न वदवू शकल्या चं वैषम्य पाळु नये हेच खरे!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/31/2015 - 07:00 नवीन
सहमत आहे सोन्याबापु ! अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करणेच उत्तम.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/31/2015 - 09:04 नवीन
आजकाल एकंदरीतच रेड्यां ची क्वालिटी मार्किट मधे अवेलेबल नसता! आपण वेद न वदवू शकल्या चं वैषम्य पाळु नये हेच खरे!! >>> :HAPPY: एकिच मार्‍या..पर क्या मार्‍या बाप! मान गए आपकू। :HAPPY:
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sat, 01/31/2015 - 05:53 नवीन
मिरेचं जजमेंट आपण काय म्हणून करतो यावर सगळ अवलंबून आहे, आपण राणी म्हणून जजमेंट करणार असू तर वेगळा अवकाश आणि निकष बघावे लागतील, कृष्णाची सखी म्हणून करणार असू तर वेगळे निकष बघावे लागतील, भारतीय स्त्री म्हणून कदाचित आणखी वेगळे निकष बघावे लागतील, प्रत्येक वेळेला समोर येणारी बाजू आधीच्या बाजूशी जुळणारी असेलच असं नाही, मीरा चांगली राणी होऊ शकली नाही असं काही क्षण गृहीत धरलं तरी त्यामुळे अभंग टाकावू ठरत नाहीत, आणि उत्तम राणी असेल म्हणून अभंग स्वयंसिद्ध अव्वल ठरत नाहीत. पण त्यापुढेही आपण कुठल्याच प्रकारचं जजमेंट करायला का जावं हा मला पडलेला प्रश्न आहे. कसलंही जजमेंट न करता केवळ उत्तम अभंगांचा, त्यातील समर्पणभावाचा, आर्ततेचा आनंद घेता येऊ शकतोच की.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/31/2015 - 06:58 नवीन
कसलंही जजमेंट न करता केवळ उत्तम अभंगांचा, त्यातील समर्पणभावाचा, आर्ततेचा आनंद घेता येऊ शकतोच की वा श्रेष्ठी , अगदी मुद्द्याचे बोललात. आवडलेच. मन:पूर्वक आभार _/\_
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 01/31/2015 - 08:19 नवीन
ह्येच बोलतो... :) प्रसन्न वाटले अभंग आणि अनुवाद वाचून ... जियो :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/31/2015 - 08:43 नवीन
+११११११
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 09/16/2015 - 08:06 नवीन
एकदम बरोबर!
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Sat, 01/31/2015 - 06:22 नवीन
लेख आणि अनुवाद सुंदर!
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 01/31/2015 - 09:03 नवीन
सुंदर लेख.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/31/2015 - 10:55 नवीन
सुंदर भावपूर्ण भजनांचा तितकाच भावपूर्ण धांडोळा घेतला आहे. बरीचशी चर्चा वाचली. हितेशभाईबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, मात्र आताचे निकष त्या काळाला लावता येणार नाहीत. एकतर मीराबाईबद्दल बर्‍याचशा दंतकथा आहेत आणि इतर काही गोष्टी तिच्या पदांमधून अंदाज लावलेल्या आहेत. त्यामुळे त्याला ऐतिहासिक पुरावे वगैरे फारसे नाहीत. सांगोवांगी कथा मूळ सत्यापेक्षा फार बदलत आपल्यापर्यंत पोचते. त्यामुळे जास्त खोलात न जाणे उत्तम. दुसरे म्हणजे राजपूत तेव्हा राजपूत बायकांनी नवर्‍याला साथ देणे म्हणजे जोहार करणे इतपतच महत्त्व दिले जात होते. त्या काळातल्या लढाऊ मराठा किंवा कानडी स्त्रियांची चरित्रे आहेत तसे एकही राजस्तानी स्त्रीचे चरित्र कधी वाचलेले आठवत नाही. पद्मिनीचे सौंदर्य आणि जोहार वगैरे अशाच कथा प्रसिद्ध आहेत. त्या मानाने मीराबाईला सती वगैरे जावे लागले नाही हे अहोभाग्यच. या धाग्यावर झालेली या विषयानुरूप चर्चा पूर्ण अनावश्यक वाटली.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/31/2015 - 11:49 नवीन
धन्यवाद ज्योताय _/\_
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/02/2015 - 14:26 नवीन
सुंदर लेख, इतिहासाकडे एक सिनेमा किंवा कादंबरी टाईप नजरेतून बघण्याचा काही लोकांचा दृष्टीकोन फारच हास्यास्पद. कोणताही काळ (लिखित वा अलिखित) हा खूप वेगवेगळ्या समांतर जगांचा सहप्रवास असतो. सोबत असणाऱ्या दोन व्यक्तींवर काळाचा तोच प्रभाव पडेल असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. आपल्याला इतिहास जेंव्हा (अत्यंत चुकीच्या पद्धतीने) शिकवल्या जातो तेंव्हा फक्त सनावळ्या आणि त्याही युद्धे, तह, राजपाट यांचाच शिकवला जातो. त्यामुळे अमुक एक काळात युद्ध सुरु होते म्हटले की म्हणजे अगदी ट्रॉय सिनेमासारखे नुसती मारामारी किंवा सेविंग प्रायवेट रायन सारखी धुमश्चक्री सुरु होती आणि त्यावेळेस जिवंत असलेला प्रत्येक स्त्री पुरुष फक्त लढाईच्या पवित्र्यात असेल असे वाटत राहते. समाजाचे बरेच घटक एकाच वेळेस वेगवेगळ्या पातळ्यांवर जगत असतात. तेंव्हा त्यांची प्राप्त परिस्थिती काय होती आणि त्यांनी काय करायला पाहिजे होते ह्याचा उहापोह आताच्या काळात करणे जरा विचित्रच आहे. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की २००० ते २०१५ या पंधरा वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा इतिहास २५५० या सालात कुणी वाचत असेल आणि त्याच वेळेस आंतरजालावरचे मिपावरचे लॉग्स त्याच्या हाती लागले तर तो म्हणेल. "अरे काय हे विशाल कुलकर्णी आणि मंडळी, तिकडे शेतकरी मरतायत आणि ह्यांना कुठल्या कोण मीरेच्या गाण्यांची चिरफाड करत बसायला लाज नाही वाटली?" त्यामुळे इतिहासातल्या कुणाही व्यक्तीबद्दल आपले मत बनवतांना आपण प्रत्यक्ष त्यांना पहिले नाही एवढे भान ठेवावे. आता प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तींबद्दलपण आपण कसलीच खात्री देऊ शकत नाही हा भाग निराळा…
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 02/03/2015 - 06:36 नवीन
सहमत आहे. :)
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Tue, 09/15/2015 - 18:25 नवीन
सुंदर रे विश्ल्या! आयला दिल जीत लिया तूने! आजकाल मीरा स्किझोफ्रेनिक वाटू लागली लोकांना. हा लेख चांगला उतारा ठरेल अशी आशा आहे. मस्तच! प्लस १
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 09/16/2015 - 12:51 नवीन
धन्यवाद मांत्रिक ! बादवे तुमचा आयडी मांत्रिक आहे, तर मला ओळखणारे आंतरजालावरचे बरेचसे लोक विकु मांत्रिक म्हणून ओळखतात ;)
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 09/16/2015 - 13:15 नवीन
विशाल कुलकर्णींना मीरे सारखी पत्नी लाभली तर ते किरण नगरकर च्या ककल्ड पेक्षा सुंदर कादंबरी लिहीतील मला पुर्ण विश्वास आहे. सुंदर एकांगी लेख
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Wed, 09/16/2015 - 13:37 नवीन
जरा स्पष्ट करून सांगाल?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 51 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 57 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा