गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १८
Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १८
मागिल भाग- १७
फक्त मंगलाष्टकांचा लाइव्ह शो...........ऐका!
आणि आवडला तर या आत्मूभटाला द्या एक...
.
मंङ्गलाष्टक....वन्स मोअर!!!
पुढे चालू...
=================
पर्वा दुपारी (नेहमी सारखाच) थकून,या पूजेच्या कामाहून आलो. जेवणंही टेचुन झालवतं अगदी. म्हणून जरा एक कडक पान लावलं आणि खोलीत पंखा सोडून सतरंजीवर कलंडलो जरा...! तेव्हढ्यात दाराची कडी वाजली जोरजोरात.. कोण मेलं आलं या इश्रांतिच्या टायमाला मधे...म्हणून चिडचिडून उठलो..आणि दार उघडलं..तर समोर उभा हा आमचा काका.. निथळणार्या तेलाचं डोकं ,त्या खाली मानेवर शर्टाच्या कालरला लावलेला रुमाल्,त्याच्या आतून बाहेर आलेली मान..आणि चेहेरा(वरं नाक करून पहाणारा..) त्याच चेहेर्यावर डोळ्याला खजुरीतांबड्या फ्रेमचा जुनाट श्टैलचा चष्मा, पिशवितनं डोकावणारी (खास कोकणी) बॅट्री..आणि मॅनेल्या सारख्या शर्टाखाली ती खास जुनी हाफ पँट (उच्चारी- प्याण! ;) )..म्हणजे आपण ज्याला बर्मुडा कि कायसं म्हणतो ती! आणि क्षणभर जातो न जातो तोच मला.."अरे आत्म्या... घरात तरी घे मला..आणि मग-पहा!" असा वेंट्रीलाच दगड हाणून काका आत शिरला देखिल!
मी:- काका अरे तू इकडे येताना तरी फुलपँटीत यायचस की रे!
काका:- का??? तुमच्या पुण्यात हापपँटीतल्या माणसांना (आपल्यात) घेत नाहित का?
मी:- ह्म्म्म्म्म...झाली का तुझी सुरवात!?
काका:- हॅ हॅ हॅ हॅ हॅ.. सुरवात!?(????)
ह्या प्रश्नाच्या रोख पाहिल्यावर,मग मात्र पुढे मी जे समजायचं ते समजलो.एकतर कोकणी माणूस म्हणजे..अगदी रायगड पासून ते त्या सिंधुदुर्गापर्यंत जो काय बदलतो,तो अंब्यांच्या जातिं इतकाच! पण बाकि मूळ सर्वत्र सारखेच आणि तेच. त्यामुळे खोचकपणा तिरकसपणा हे मधुनच केंव्हातरी सुरु होणारे घटक नसून्,ते त्या (लाल)मातित आणि मतीतं(ही) श्वासोछ्वासा इतके सततचे आणि कायम! म्हणुनच आमच्या या काकाशी बोलताना पहिले काहि क्षण गेले की मला "मी चुकतो का?" यापेक्षाही "काकचं तर काहि बरोबर-येत नाहीये ना!?" याकडेच अधिक लक्ष ठेवावं लागतं. कारण तो आपली विकेट काढतो कमी,आणि जाते जास्त!
मी:- हंम्म्म आता कुणाचं लग्न? की आणखि काही?
काका:- छ्छे..अरे आषाढात कसली आल्येत लग्न? साल्या,भटजी ना तू..? तरी तूच हे विचारतोस? कमाल आहे बा मोठी!
मी:- अरे आता काय लोक मुहुर्तांवर अडून रहातात का? मी कित्येक वेळा गुरु/शुक्र अस्तात काढीव मुहुर्तांवर लग्नं लावली आहेत! आणि काका..,तू ही तिकडे कोकणात कित्येकदा...
(माझं बोलणं मधेच तोडत)
काका:- हो............. ते तेव्हढच मिळालं होय रे तुला?आणि मी काय तुझ्या सारखा शिकलेला प्रोफेशनल भटजी नव्हे! काय समजलास? .आंम्ही आपले सत्यनारायणाच्या नि गणपतिच्या पूजा सांगणारे आणि आडल्या नडलेल्याला अंतरपाटात-घेणारे! तेंव्हा मला तसल्या प्रसंगांचं कारण करुन अडकवण्यापेक्षा हे समज..की आडलं नडलेलं कार्य हे काढिव मुहुर्तांवर आणि केंव्हाही होणं..हाच त्याचा खरा अस्सल मुहुर्त असतो! कारण..जर का नाही साधला तो,तर त्यांचच एकतर अडतं तरी,नायतर नडतं तरी! कायमच!!! बरोबर की चूक? सांग बरं?
पुढे मी गप्प...
काका:- हम्म्म जाउ दे ते .. अता मी ही जरा पडतो,आणि तु ही तुझी झोप आवर.मग संध्याकाळी जाऊ जरा तुमच्या त्या मंडईच्या गर्दित्,आणि नंतर पुढे त्या भोरे आळीत..मला जरा ४/५ जाड ताडपत्री पिशव्या घ्यायच्यात,आणि आपल्या त्या म्हादू केटररासाठी काहि मोठी उलथनी/झारे वगैरे.. येशील ना माझ्या बरोबर? तसाही आषाढच आहे ना? नाही गेलास तुझ्या भटजी मंडळाच्या अड्ड्यावर एक दिवस तर चालेल ना? की जाऊ मी एकटा?
मी:- अरे काका ..हो हो हो हो! मी नाही कधी तरी म्हणतो का तुला? येणार आहेच तुझ्या बरोबर.
काका:- हां..आता मला शांत झोप लागेल..नायतर तुमच्या पुण्याच्या त्या &$#^@ रिक्षावाल्यांच्या फेर्यात अडकायच्या नुसत्या चिंतेनीच जाण्या आधी थकायला होतं. त्यांच्या पेक्षा त्या यमाचा रेडा बरा..एकदा उचल्लन तर शेवटा'परेन्त नेइल तरी! चला...पडू या जरा आता.. आणि हो.. नंतर त्या वडेवाल्याकडे जाऊ हं तुझ्या...तो मेला..वड्याबरोबर ती किसलेल्या मुळ्याची चटणी कि कायशी देतो ना, ती एकदम टॉ.......प असतें हां.. हॅ हॅ हॅ.. विसरलेला नाही मी!
मी:- हुश्श्श्श... किती बोलतोस रे काका? झोप अता..
बाकि..,काका झोपला खरा. पण मी मात्र जागा झालो. आणि मनानी गेलो ते लहानपणीच्या स्मृतीत.. अगदी पहिली फ्रेम डोळ्यासमोर आली, ती आमच्या गावच्या रस्त्यावरची. मी इयत्ता पाचवीच्या त्या महान अवतारात रस्तावरून पळताना फताक फताक आवाज काढणार्या निळ्या स्लिपरी घालून चाक फिरवत पळतो आहे..मध्यभागी गाठ बांधलेला दप्तराचा पट्टा डोक्यावरुन मानेत येतो आहे..आणि तो परत फिरुन डिक्यावर घेण्याचा नादात आसतानाच, मागुन माझा हाच सखाराम काका..हातातली गुरं बडवायची काठी उगारून "आत्मू.......लवकर घरी हो... मी साडेसहा परेंत घरी येतोय,तेंव्हा आंगण्यात जरी दिसलास ना तरी.......मी आहे,तू आहेस,आणि तुला वाचवणारी तुझी ती आईस आहे..लक्षात ठेव! " असा दम भरतो आहे.. हा डायलॉग आठवला.
हा काका मला आठवला की नुसता तोच मला आठवत नाही.मला त्या बरोबर ते लाल मातीत रमलेलं माझं सगळंच्या सगळं बालपण अठवतं. माझा तो काका ,हा त्या बालपणाचा,त्या लाल माती इतकाच अविभाज्य घटक आहे.ह्यानी लहानपणी जितकं मला मारलन्,तितकाच माझ्यावर त्याचा प्रचंड जीवंही होता.. एकदा मी आयशीचा डोळा चुकवून भुगोलाचं पुस्तक चुकुन ,नेमकं काका काठी ठेवायचा तिथेच लपवलं आणि मित्रांबरोबर (आयशीच्या भाषेत) उनाडक्या करायला गेलो. आई दुपारची बाजुच्या बायांकडे गेलेली असताना ती परत यायच्या आत पुन्हा पुस्तका समोर बसायच..असा माझा प्लॅन! पण काका दुपारचा बाहेरून आला.आणि काठी टेकवताच ते पुस्तक त्याच्या नजरेला पडलं.आणि पुस्तकाच्या एकंदर अवतारावरून ते माझच आहे. हे ही त्याच्या लक्षात आलं. मग चपला पायर्यां जवळ आहेत.दप्तरंही झोपाळ्या मागे पसरलेलं आहे.आणि मी मात्र जागेवर नाही. एव्हढ्या प्राथमिक लक्षणांवरून त्यानी जे हेरायचं, ते हेरलन..आणि मागे मागे शोध काढत येऊन मी भर उन्हात बंदरावर मित्रांबरोबर क्रिकेट खेळतोय हे पाहून त्यानी त्याची पहिली फेवरीट शिवी हसडली..
"आत्मू...चुतमारीच्या...घरी हो..घरी हो आधी.." "इथे उन्हं आल्येत डोक्यावर नी क्रिकेटी खेळतायत लेकाचे!!!" "त्या ब्याटी आधी जाळून टाकल्या पायजेत" असं म्हणून नंतर काठी घेऊन जो माझ्या मागे लागला की ,कुठे जाऊ आणि लपू? कि गुंगारा देऊ याला.असं माझं झालं.. कारण काकाच्या तावडीतनं त्यावेळी सुटलं,तर तो मारंही सुटत असे. पण जर का सापडलं, तर पोरं आणि गुरं यातला दोन पायाचा भेद वगळता, काका.. अंगावर सापडेल तिथे हाणायचा. आंम्हीही कातडी निबर जाहलेले शिताफिनी फटके चुकवायचो. पण जास्ती फटके चुकवायचे नाही हे ही गणित होतं. नायतर मग संध्याकाळी ह्या दिलेल्या माराचे परिमार्जन म्हणून काकाकडनं त्या शाळेखालच्या हाटिलातला मिळणारा शेवचिवडा आणि पापडीही चुकायची.( :D )
अर्थात आमची ही सगळी बदमाषी काकाला चांगली ज्ञात होती. पण तरिही वर्षानुवर्ष ह्या कार्यक्रमात फारसा बदल झाला नाही..याला कारण असं की आमच्या काकाचा "माणूस चुकतो" ह्या घटनेवर जबरदस्त विश्वास होता. वास्तविक कोकणातल्या एका छोट्या खेड्यात कुठल्याच प्रकारचं फारसं शिक्षण न झालेला हा माणूस. पण त्याचा स्वतःचा एक असा काहि कार्यक्रम त्याच्या जीवनक्रमात लागलेला आणि बहरत गेलेला होता,की हल्लीच्या व्यक्तिमत्व विकास वाल्यांनी ह्या असल्याच लोकांच्या जिवनपटांवरून स्वतःचे कार्यक्रम बेतलेले आहेत की काय? अशी दाट शंका यावी!
क्रमशः....
त्यांच्या पेक्षा त्या यमाचा रेडा बरा..एकदा उचल्लन तर शेवटा'परेन्त नेइल तरी!आणि तेही बिल वाढवायला पूर्ण पुणेदर्शन न करता ! त्यामुळे याला ठणकावून सहमती ! *i-m_so_happy*आंम्हीही कातडी निबर जाहलेले शिताफिनी फटके चुकवायचो. पण जास्ती फटके चुकवायचे नाही हे ही गणित होतं. नायतर मग संध्याकाळी ह्या दिलेल्या माराचे परिमार्जन म्हणून काकाकडनं त्या शाळेखालच्या हाटिलातला मिळणारा शेवचिवडा आणि पापडीही चुकायची.अच्छा हे धडे तेव्हापासून गिरवलेले आहेत तर !? ;)