Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पुन्हा सगुणोपासना

र
राही
Tue, 12/31/2013 - 21:23
🗣 128 प्रतिसाद
प्रथम सर्व मिपाकरांना मिपावर हे वर्ष वाद-संवादाचे आणि बौद्धिक आनंदाचे जावो ही शुभेच्छा. मिपालाही शुभेच्छा. या वर्षी सुद्धा अनेक शतकी-द्विशतकी धागे निघोत, साद-प्रतिसादांनी मिपा समृद्ध होवो. तर पुन्हा सगुणोपासना. ही सगुणोपासना आम्हांला इतकी आवश्यक का वाटते? आत्मभान हा सोपा मार्ग आम्हांला का नको? आत्मज्ञान ह्या शब्दाच्या अर्थाविषयी पारमार्थिक आणि ऐहिक अशा दोन्ही पातळ्यांवर विवेचन करता येइल. सगुणोपासनेच्या आवश्यकतेचीसुद्धा दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे भोळ्याभाबड्या जनतेला निर्गुण असे काही कल्पिणे कठिण जाते आणि दुसरे म्हणजे सगुणोपासना हे एक साधन आहे, पायऱ्या आहेत, आणखी कुठेतरी पोचण्यासाठीच्या. भोळीभाबडी जनता म्हणजे तरी कोण? आपण आंतरजालावर वादविवाद करू शकणारे प्रज्ञावंत खरोखरच भोळेभाबडे आहोत का? की तिसऱ्याच कोणाच्यातरी वतीने त्यांना गृहीत धरून आम्ही बोलतो आहोत? सगुणोपासना हे साधन मानता मानता साध्यच होऊन बसले आहे हे आमच्या लक्षात का येत नाही आहे? अमुक वेळा पारायणाचा, अमुक हजार नामजपाचा, वेगवेगळ्या नेमांचा संकल्प सोडायचा, आणि तो सिद्ध करायचा, असेच चालते ना? आणि ह्याचेच अवडंबर माजते ना? गणेशचतुर्थीसाठी एकच दिवस रजा असते. उत्सवाच्या उरलेल्या दिवसांत घाईघाईने पूजा आटपायची, मंत्रोच्चार, अथर्वशीर्ष, आरती, नैवेद्य सारे उरकायचे आणि 'हुश्श! झाले एकदाचे' म्हणून बाकीच्या कामाला लागायचे असेच बहुतेक सर्वत्र असते ना? म्हणजे पूजा-उपचार हेच साध्य. अष्टसात्त्विक भाव जागृत होतच नाहीत. कारण ते साध्य नसतेच. विपश्यनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावयास सांगतात. दर क्षणीचा श्वास ही किती साधी गोष्ट. पण आपल्याला तिची जाणीव नसते. आपल्या देहव्यवहाराची, आपली स्वतःची जाणीव नसते. श्वासाचा कोहं-सोहं नित्य चाललेला असतो. हृदयाचा अनाहत नादही सदैव चालू असतो. हा आघाताविना होणारा नाद आम्ही ऐकतो का? सगळे सांगतात,' दिलकी सुनो'. आम्ही ऐकतो का? "नादबिंदू के पीछे जमया पानी..."(य.कु.ची आठवण येतेय) नादाचा केंद्रबिंदू म्हणजे हृदय बाष्पगद्गद झालेय‌. सद्गदित झालेय. अगदी सहज अवस्था. हे 'स्व'चे 'स्व'शी अनुसंधान कायम राखायचे, 'स्व'च्या आनंदात, निजानंदात तल्लीन व्हायचे. त्यासाठी कोणत्याच पायऱ्यांची आवश्यकता नाही. निज म्हणजे तरी काय? आत्म, स्व, निज सारे एकच. अध्यात्म म्हणजे आधी आत्म असे विनोदाने म्हणतात. पण अधि आत्म तर आहे? "आत्मा वा अरे द्रष्टव्यः, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः| आत्मनो वा अरे दर्शनेन, श्रवणेन, मत्या विज्ञानेन इदं सर्वं विदितम।" अरे, हा आत्मा पाहावा, ऐकावा, त्याचे मनन करावे. त्याच्या दर्शनाने, श्रवणाने आणि बुद्धीने जाणण्याने बाकी सर्व जाणले जाते. आत्मज्ञान हेच अंतिम ज्ञान होय. आपण हा स्व पाहत नाही. त्याला अनेक अवगुंठनांआड, मुखवट्यांआड लपवतो. सर्व मुखवटे, पटले, आवरणे दूर केली की स्व-रूप कळते. 'घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे'. निखळ स्व-रूप हेच पिया आणि प्रेयसीही तीच. अद्वैतच आहे. आपण कशासाठी बाहेर शोधतो? एकदा का स्व-रूपाची ही जाणीव स्थिर झाली की सगळे लख्ख दिसू लागते असे संत सांगतात. 'कुणाचे हे घर? हा देह कवणाचा? आत्मा राम त्याचा, तोचि जाणे'. रम चा प्रधान अर्थ आनंदी असणे असा आहे. राम म्हणजे आनंददायक, रम्य, सुंदर. जिथे स्वतःच्या ठायी नित्य आनंद आहे, (तिथे) त्याने हे सर्व जाणले. आता या सर्व प्रक्रियेमध्ये मूर्तिपूजा, स्तोत्र, आरती यांचे स्थान कोणते? माणसामधला विवेक जागवणे हे साध्य या उपायांनी कधी तरी साध्य होईल का? उलट ती जनता एका गुंगीत राहील. आपण पूजाअर्चा करतो आहोत, यात्रा, व्रतेवैकल्ये करतो आहोत, काहीही करायचे बाकी ठेवीत नाही आहोत, ही ती गुंगी. ही भोळीभाबडी जनता साध्या आजारावरच्या औषधासाठी डॉक्टरकडे गेल्यावर साध्या,स्वस्त गोळ्यांनी समाधान पावत नाही . तिला महागडे इंजेक्शन हवे असते. जरूर नसताही लोकाग्रहास्तव इंजेक्शन देणारा डॉक्टर मोठा. साध्या गोळ्या देणारे छोटे आणि खोटे. ही जनता एका डॉक्टरचे ऐकत नाही, मग अनेक डॉक्टरांनी 'इंजेक्शनची जरूरी नाही' असे पुन्हा पुन्हा सांगायला नको का? (हे एक उदाहरण) भोळ्याभाबड्या जनतेला उच्चज्ञानप्राप्तीचा मार्ग सोपा व्हावा म्हणून सगुणोपासना चालू राहावी असे आपण म्हणतो तेव्हा सगुणोपासना ही अडाणी जनतेला दिलेली मुभा, सूट, सवलत आहे हे मान्य करतो. एके काळी अशी सवलत असेलही, पण आज दीडदोन हजार वर्षांनंतरही ती चालू राहावी का? शिवाय या सवलतीचा आज दुरुपयोग होऊ लागलाय. पाठ, सप्ताह, यज्ञ, तीर्थयात्रा यासाठी आज प्रायोजक मिळू लागलेत. हे आयते चालून आलेले प्रायोजकत्व राजकीय पक्षांनी न स्वीकारले तर नवल. सध्या मोफत किंवा अत्यल्प खर्चात (उदाहरणार्थ) शिरडी यात्रा घडवण्याची टूम आहे. मोफत बसगाड्या, मोफत निवास, मोफत जेवण. नंतर त्या बदल्यात काहीतरी मिळायचे/मिळवायचे असतेच. लोकांना गुंगीत ठेवण्याचा, मिंधे राखण्याचा, 'जैसे थे' राखण्याचा हा एक डाव आहे. इतरही अनेक क्षेत्रात असे होते पण तिथे बदलासाठी निवडणुका, पोलिस, कायदे इ. अनेक प्रकार उपलब्ध असतात. इथे मात्र विवेकाने मतपरिवर्तन हा एकच मार्ग. जनता गुंगीत राहणे हे काही जणांच्या फायद्याचे ठरू शकते हा एक लहानसा आणि गौण मुद्दा आहे. मुख्य मुद्दा हा आहे की जनतेने सदैव भोळे-भाबडे का राहावे? भोळेभाबडे असणे/रहाणे ही सगुणोपासनेसाठी पळवाट बनते आहे का? 'आम्ही बुवा अडाणी माणसे. आम्हाला आत्मज्ञान वगैरे काही समजत नाही' असा आम्ही सुशिक्षित लोक आव आणतो आहोत का? की वेड पांघरतो आहोत? विवेकाने येणारी प्रेम, त्याग आणि विश्वास ही त्रयी आम्हाला रोजच्या जीवनात नको आहे का? व्यावहारिक पातळीवरही हे आत्मभान आपल्याला कितीतरी मदत करू शकते. सवयीमुळे घडणाऱ्या क्षुल्लक अशा वाईट गोष्टी आपण टाळू शकतो. आपण काय करतो आहोत त्याची जाणीव असली तर रस्त्यात थुंकणे, कचरा टाकणे, विनातिकीट प्रवास करणे, भेसळ करणे, लाच देणे/घेणे, काम न करणे या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे आत्मभान जागृत होऊन एक 'राष्ट्रभान' बनू शकते. एक कल्याणकारी व्यवस्था निर्माण होऊ शकते. हा अखंड सावधानतेचा सोपा मार्ग आपणां प्रज्ञावंतांना का नको? ता. क. : या विषयावर सध्यातरी आणखी धागे काढणार नाही. मिपाकरांनी आश्वस्त राहावे.!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 20936 views

🗣 चर्चा (128)
स
स्पा Sun, 01/05/2014 - 03:26 नवीन
त्यांच्या कडच्या काड्या संपतच नाही, मग चिखलफेक कधी नी कशी करणार
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/05/2014 - 04:40 नवीन
वल्लींशी सहमत! +१ पांडुशी अतिसहमत! :-D
स
सूड Sun, 01/05/2014 - 05:20 नवीन
आम्ही लबाड आहोत की आणि ते उघडपणे मान्य करण्याचे गट्स आहेत आमच्यात !! आता उल्लेख केलाच आहात म्हणून सांगतो, तुमची ती सगुणोपासना आणि त्यावर चाललेला उतमात यात आम्हाला ( पक्षी मला) शष्प घेणंदेणं नाही. यु आर फ्री टू पुट युअर डर्टी नोज़ आपलं ज्यात-त्यात !! :)
प
प्यारे१ Sun, 01/05/2014 - 08:02 नवीन
गुड. पुराव्याने शाबित झालं. @संजय क्षीरसागर, सांगायचा मुद्दा हाच होता. प्रत्येकाची प्रार्थनापद्धती, प्रत्येकाचं जग वेगवेगळं असतं. घरात एक जण दुसर्‍याचं ऐकत नाही, बाकीच्यांचं काय घेऊन बसलात? समर्थक वगैरे काही नाहीये कुणी. ते तसं होणार नाही, त्याची गरज देखील नाही. ग्रुप करुन तुम्हाला टारगेट वगैरे काहीच नाही. दहा मधल्या एक दोन गोष्टी पटतात लोकांना त्याबाबत होकार दर्शवतात. @ राही, वरीलप्रमाणेच. ह्या उप्पर आपण म्हणताय तशी पद्धत सामाजिक पातळीवर कशी आणावी, वापरावी, चळवळ कशी उभारावी ह्याबाबत काही अ‍ॅक्शन प्लॅन आहे का? सगुणाला नाकारा. मान्य. आपण पर्याय कसा उभारणार आहोत?
स
सूड Sun, 01/05/2014 - 08:43 नवीन
हेही पुराव्याने शाबित झालं की आपल्या सोयीचे अर्थ लावण्यात तुमचा हात कोणी धरु शकत नाही !!
क
कवितानागेश Sat, 01/04/2014 - 19:33 नवीन
मार्गदर्शक?????!!!! =)) =)) =)) =)) ए प्यार्‍या, तुला शिवी घातलिये रे इकडे!!! =)) =))
ह
होकाका Sun, 01/05/2014 - 08:22 नवीन
हे अजून एक उदाहरणासहीत स्पष्टीकरण.
स
स्पा Sat, 01/04/2014 - 07:06 नवीन
ओके सर, तुमचेच " निर्गुण" , आमचे "सगुण" खुश?
म
मारकुटे Sat, 01/04/2014 - 10:28 नवीन
अरे, हम नास्तिक हुए तो क्या हुआ, आरतीपे टाऴ्या बजाने को पयला नंबर हय पयला अं आम्ही नास्तिक असलो तरी आरतीला टाळ्या वाजवायला आमचा पहिला नंबर आहे चला हवा येऊ द्या - संस्थापक, संचालक आणि संपादकांची शपथ.
स
स्पा Sat, 01/04/2014 - 12:15 नवीन
थोडक्यात काय तर स्व गवसणे म्हणजे माज करणे, माझीच लाल असे बोंबलत फिरणे, स्वताची बॊद्धिक सुमार लेवल अख्ख्या जगाला दिसत असतानाही, समोरच्याला कशी अक्कल नाही ते मेगाबायटी अर्थहीन प्रतीसाद देउन दाखवणे. याला स्व नाही ग चि बाधा म्हटले जाते. - जे खातो तेच.. .
र
राही Sat, 01/04/2014 - 13:22 नवीन
मला वाटते वेगळी वाट चोखाळणारे आणि इतरांपे़क्षा थोडा वेगळा विचार (बरा-वाईट कसाही) करणारे हे नेहेमीच अल्पमतात आणि बहुधा एकाकी असतात. मूळ प्रस्तावात उद्धृतलेला तो ऋषिसुदधा असेच म्हणतोय की 'अरे बाबांनो, मी एवढा हात उंचावून उंचावून सांगतोय, पण कोणीच माझे ऐकत नाहीय'. एकाकी वाटचाल करण्याचे धैर्य असेल तर ती तशीच चालू ठेवावी. कधी कधी समविचारी लोक येऊन मिळतात आणि कारवाँ बनत जातो, तर कधी कधी एकट्यानेच वाळवंट तुडवावे लागते. उपदेशाने लोक फारसे प्रभावित होत नाहीत, आचरणाने थोडेसे होतात. जोदि तोर डाक शुने केऊ ना आशे, तोबे अ‍ॅक्ला चॉलो रे. आपली तत्त्वे ठाम (पटली) असतील तर ही एकल यात्रासुद्धा आनंदमय होते, वाळवंटसुद्धा ओअ‍ॅसिस बनून जाते...
स
साती Sat, 01/04/2014 - 13:26 नवीन
राहींच्या इतक्या सुंदर विवेचनानंतर धागा इतका भरकटणे ही अगदीच लाजिरवाणी गोष्टं आहे.
ब
बॅटमॅन Sat, 01/04/2014 - 13:48 नवीन
आंधळे असूनही माझीच दृष्टी सर्वांत तेज असा दावा करणार्‍या धृतराष्ट्रांची गर्दी झाली की असेच होणार.
प
पिशी अबोली Sat, 01/04/2014 - 15:10 नवीन
:( वाईट वाटलं..
ब
बॅटमॅन Sat, 01/04/2014 - 15:03 नवीन
काही लोक इतके फ्रस्ट्रेटेड का आहेत मला अजून कळालं नाहीये.
स
स्पा Sat, 01/04/2014 - 15:16 नवीन
त्याला स्व गवसलाय ना , स्वरुप भयाण आहे हे समजले असेल
ब
बॅटमॅन Sat, 01/04/2014 - 15:20 नवीन
आरशात बघितल्यावरच हे ज्ञान झालं असेल. तरीच त्याचा स्व जागृत झालाय. बाकी स्वाक्षरीतील "श्रीक्रुपेकरुन" च्या जागी "स्वक्रुपेकरून" असे लिहिल्यास मशारनिल्हे धृतराष्ट्राचे वर्णन जास्ती लागू पडेल असे सुचवावेसे वाटते.
र
राही Sat, 01/04/2014 - 15:26 नवीन
@प्यारे१, मी नवीन काही सांगत नाही हे खरेच आहे. कोणीच तसे काही सांगू शकणार नाही. पूर्वसूरींनी वेगवेगळ्या कालखंडांत वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सारेच सांगून ठेवले आहे. उपलब्ध सर्व टीका, मल्लीनाथ्या, एका जन्मात वाचून देखील व्हायच्या नाहीत. त्या त्या कालखंडात म्हणण्याचे कारण असे की देशकालानुसार माणसाचे सर्वसाधारण वर्तन, कर्म, कर्तव्य बदलते. गीतारहस्याचा धागा मिपावर समांतर चालू आहे. त्यातही हा ऊहापोह आहे. सद्यव्यवहारस्थितीशी जुळणारा अर्थ नव्याने लोकांपुढे आणावा (नवा अर्थ सांगावा असे नाही) असे वाटले. ग्रंथांमध्ये इतके काही (आणि प्रसंगी परस्परविरोधीसुद्धा) सांगून ठेवले आहे की नेमके निवडता निवडता दमछाक व्हावी. हे (आपल्याला हवे ते) निवडणे प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार सदैव चालूच रहाणार. सद्यस्थितीत माहितीचा इतका अजस्र लोंढा अंगावर येऊन आदळतो आहे की हे निवडणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. शिवाय लोक रोजच्या साध्या स्वरूपातल्या मातृभाषेपासूनही दूर जात आहेत. मग ही सगुण-निर्गुणाची गहन परिभाषा त्यांना काय कळणार? सगुणोपासना म्हणजे वाडवडील म्हणत आले, करत आले, तीच पूजा, आरती, स्तोत्रपठण, उपासतापास इतकीच माहिती त्यांच्यापर्यंत पोचत रहाणार आणि त्यांच्याकडून निरर्थक यांत्रिकपणे हे सर्व घडत रहाणार. ह्या सगळ्याचा रोख कुठे असायला हवा हे त्यांना कधीच कळणार नाही. आपल्याला (तुम्हांला) जे अनुभव ध्यानातून येतात ते आम जनतेला या सगुणोपासनेच्या पद्धतीने कधीच येणार नाहीत. त्यांची विवेकबुद्धी या पद्धतीने जागृत होणार नाही. मग जर या पद्धतीचा काहीच उपयोग नाही, (आपल्यासारखी एखादी विरळा व्यक्ती सोडून) तर क्षणिक भ्रामक समाधान आणि आनंदासाठी (जो आनंद चित्रपट पहाणे, उत्तम भोजन करणे या प्रकारानेही मिळू शकतो) जनतेने एव्हढा आटापिटा का करावा? या पुढची पिढी दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी वाचणारी नसेल. संस्कृत दूरच राहिले. त्यांच्यापुढे आपण कोणती टँजिबल तत्त्वे/मूल्ये ठेवणार आहोत? केवळ आरत्या, भजने, नैवेद्य, पंचोपचार, मंदिरांसमोर मैलभर लांबीच्या रांगा लावणे आणि भोज्या करून ताबडतोब मागे पळत सुटणे हीच धर्मलक्षणे बनणार आहेत का? हे न केले तर पाप घडले, अरिष्ट कोसळेल, या भ्रमात त्यांनी रहावे का? मूर्तिपूजा आणि सगुणोपासना हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत आणि एकातून दुसर्‍याला बळ मिळत रहाते, एकातून दुसरी गोष्ट निघत रहाते. हिंदूधर्मातली उपासनापद्धती (हळूहळू) बदलून स्वकर्तव्ये आणि स्व-उन्नती याबाबत धर्मधुरीणांकडून सद्यस्थितीनुसार मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा बाळगणार्‍यांपैकी मी एक आहे. आळशी, मंद, कर्तव्यविन्मुख अशी जी समूहस्थिती (डीस्पाइट सगुणोपासना,) सध्या दिसते आहे, ती जाऊन तरतरीत, सावधचित्त, उद्योगी, चपळ समाज तयार व्हावा हे समष्टीचे साध्य अथवा ध्येय रहावे. व्यक्तीचे आत्मभान जागृत असेल तर हे सुलभपणे साध्य होऊ शकेल असे वाटते. हा मार्ग कठीण नाही, उलट सगुणोपासनेपेक्षा कमी वेळखाऊ, कमी पैसेखाऊ, कमी श्रमखाऊ आणि थेट आहे, कुठल्याही मध्यस्थाशिवायचा, हे विशेष.
प
प्यारे१ Sat, 01/04/2014 - 17:10 नवीन
परिस्थिती एवढी वाईट आहे असं का वाटतंय? मी एवढा निराश नाही. (लोक काका म्हणत असले तरी ३३ म्हणजे तरुण गटात मी सुद्धा मोडतो बरं. ;) ) तुम्ही समष्टीबद्दल (समाज अ‍ॅज अ व्होल) बोलताय, मी व्यष्टीबद्दल (व्यक्तीगत मार्ग) बोलतोय. समाजरचनाच अशी आहे की कुठलीच गोष्ट समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणार नाही. तुमची तळमळ कधीच समजलीये. क्रिकेटमध्ये जाणारे हजारो तास नि देवळाच्या रांगांमध्ये मोडणारे हजारो तास तसे सारखेच आहेत. पण ह्यात भक्ती येते कुठे मुळात? देव, देऊळ, ट्रस्ट, धंदा, व्यवसाय, मार्केटींग एकाच माळेत आलेत. समाजरचना (मुद्दाम परत म्हणतोय) अशी झालीये की कुटुंबं एकेकटी झालीत माझा विचार शेअर करुन घ्यायला अहंकार आड येतो. भाऊ बहिण मामा काका ही नाती ठाऊक नाहीत अशी काही कुटुंबं आहेत. ह्यांना कोलमडल्यावर सावरणारं कोणी नाहीत. त्यांच्यासाठी ही देवळं पुन्हा उभी राहत आहेत. ही 'नशा' आहे, झिंग आहे मान्य आहे. पण ही दुसर्‍याला त्रास न देणारी नशा आहे. त्यातूनच एखादा आपल्याला अभिप्रेत असलेला उभा राहील. एखादा तरुण तालीम सुरु करतो. त्याला पहिले पंधरा दिवस तू नुसता ये. पुढचं पुढं बघू म्हणणारा उस्ताद नि वरचं कर्मकांड ह्यात तसा फरक नाही. हळूहळू मर्यादा लक्षात घेऊन त्याला पुढचं काम देण्यात यावं. शाळेत जायला सुरुवात करताना आधी डबा नि चड्ड्या घेऊन जाव्या लागतात. १००० लाखांत एखादा १०-१२ व्या वर्षी मॅट्रिक होतो. तरीही काळागणिक साधना करत वरच्या पायर्‍या गाठल्या जायलाच हव्यात. एक उदाहरण देतो. घर सोडल्याशिवाय रिक्षात बसता येणार नाही, रिक्षा सोडल्याशिवाय बस, बस सोड्ल्याशिवाय ट्रेन, ट्रेन सोडल्याशिवाय विमान पकडता यायचं नाही. आज मी विमानाचं तिकीट अफॉर्ड करु शकतो म्हणून बसला का नावं ठेवू? किंवा बसनं जाणारांबद्दल करुणा, दया का बाळगू? भौगोलिक अडचणी निपटवता आल्या तर बसनं अमेरिका गाठता येईलच की! विमान आहेच. बावीस तासात अमेरिका, पण एखादा म्हणतो जाऊ रमत गमत सायकलनं पण. चुकीचं नाही ना ? बाकी एक गोष्ट. पुराण, कीर्तन, प्रवचन आणि पाठ असे प्रकार आहेत. पुराण कथांना, कीर्तनाला प्रचंड गर्दी असते. (असं मानू) त्यात अनेक अभिव्यक्ती असतात. नवरसांचा समावेश असतो. प्रवचन कमी गर्दीचं नि पाठ तर मोजक्या लोकांसाठीच. प्रत्येका च्या गरजा नि प्राथमिकता वेगवेगळ्या असतात. त्या मान्य कराव्यात असं मला वाटतं. बाकी 'कुमुदिनी काय जाणे तो परिमळ' ही 'अमृतानुभव' लिहीणार्‍या ज्ञानेश्वर महाराजांचीच एक अतिशय चांगली रचना आहे. :)
स
संजय क्षीरसागर Sat, 01/04/2014 - 20:08 नवीन
मूर्तिपूजा आणि सगुणोपासना हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत ....उलट सगुणोपासनेपेक्षा कमी वेळखाऊ, कमी पैसेखाऊ, कमी श्रमखाऊ आणि थेट आहे, कुठल्याही मध्यस्थाशिवायचा, हे विशेष.
दॅट्स द पॉइंट! पण उपयोग काय? कारण वाचता येतंय पण अर्थ कळत नाही अशी धृतराष्ट्राच्या बाळाची परिस्थिती! इतकी निर्बुद्ध व्यक्ती अत्यंत दुर्मिळ. काय चाललंय याचा पत्ताच नाही! स्वतःची गोंधळलेली मानसिकता आणि दुसर्‍याला फ्रस्ट्रेशन आलंय असं वाटणं म्हणजे त्याहून कहर! एकेक नमुनेदार प्रतिसाद आहेत!
ब
बॅटमॅन Sun, 01/05/2014 - 08:04 नवीन
कारण वाचता येतंय पण अर्थ कळत नाही अशी धृतराष्ट्राच्या बाळाची परिस्थिती! इतकी निर्बुद्ध व्यक्ती अत्यंत दुर्मिळ. काय चाललंय याचा पत्ताच नाही! स्वतःची गोंधळलेली मानसिकता आणि दुसर्‍याला फ्रस्ट्रेशन आलंय असं वाटणं म्हणजे त्याहून कहर!
ये आया और एक फ्रस्ट्रेटेड प्रतिसाद =))
ह
होकाका Sun, 01/05/2014 - 08:24 नवीन
नमुनेदार उदाहरण.
अ
अर्धवटराव Sat, 01/04/2014 - 21:59 नवीन
फक्त एक लोचा आहे... तिकीट दिल्लीचं काढलं तर मुंबईला गाडी पोचली नाहि म्हणुन कम्प्लेण्ट करु नये. अर्थात, कम्प्लेण्ट करण्यात देखील सुख आहे. त्याकरताच अट्टहास असेल तर एंजोय माडी :) अवांतरः >>हा मार्ग कठीण नाही, उलट सगुणोपासनेपेक्षा कमी वेळखाऊ, कमी पैसेखाऊ, कमी श्रमखाऊ आणि थेट आहे, कुठल्याही मध्यस्थाशिवायचा, हे विशेष. -- मोहोब्ब्तको अंजाम देनेका रास्ता कमी/जास्त वेळ-पैसा-श्रम छुकर नहि जाता चिनॉय सेठ. दिलके सौदेमे मुनाफा और घाटा एक हि होता है जानी (आयला... कसला भारी डॉयलॉग...फ्फ्फ्फू)
क
कवितानागेश Sun, 01/05/2014 - 06:57 नवीन
तुम्ही अवांतर म्हणून जे काही लिहिलंय तोच मूळ विषय आहे बरं का. :)
म
मोदक Sun, 01/05/2014 - 07:06 नवीन
एका वाक्यात जीवनसार सांगीतलेंत!! जाताजाता , तुम्हाला स्व गवसला आहे काय हो?
अ
अर्धवटराव Sat, 01/04/2014 - 19:27 नवीन
काहि वर्षांनी मिपोपनिशद् जनसामान्यांना सर्वप्रकारच्या अवस्थाप्राप्तीचं अमोघ मार्गदर्शन देणारं संदर्भस्थळ म्हणुन मान्यता पावेल. या पौरुषेय(स्त्रैय सुद्धा) ग्रंथाच्या अवतरणीकेत आपलं नाव कुठल्या कॅटॅगिरीत, कुठल्या नंबरवर असावं याबद्दल आतापासुन बुकींग करुन ठेवणे गरजेचे आहे. संमं यात लक्ष्य घालतील काय? अवांतरः स्त्रैय शब्द बरोबर आहे का गं माऊ???
क
कवितानागेश Sat, 01/04/2014 - 20:05 नवीन
असणारंच बरोबर! काही शंकाच नाही. ;) - अर्धवटरावांची खंदी समर्थक माउ =))
ब
बॅटमॅन Sun, 01/05/2014 - 08:25 नवीन
आपलं फ्रस्ट्रेशन सगुण रूपात मांडणार्‍या अन इतरांना उपदेश करून ते लपवू पाहणार्‍या लघळ दांभिकांमुळेही तितकंच प्रसिद्ध होईल.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 15 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 17 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा