Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पुन्हा सगुणोपासना

र
राही
Tue, 12/31/2013 - 21:23
🗣 128 प्रतिसाद
प्रथम सर्व मिपाकरांना मिपावर हे वर्ष वाद-संवादाचे आणि बौद्धिक आनंदाचे जावो ही शुभेच्छा. मिपालाही शुभेच्छा. या वर्षी सुद्धा अनेक शतकी-द्विशतकी धागे निघोत, साद-प्रतिसादांनी मिपा समृद्ध होवो. तर पुन्हा सगुणोपासना. ही सगुणोपासना आम्हांला इतकी आवश्यक का वाटते? आत्मभान हा सोपा मार्ग आम्हांला का नको? आत्मज्ञान ह्या शब्दाच्या अर्थाविषयी पारमार्थिक आणि ऐहिक अशा दोन्ही पातळ्यांवर विवेचन करता येइल. सगुणोपासनेच्या आवश्यकतेचीसुद्धा दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे भोळ्याभाबड्या जनतेला निर्गुण असे काही कल्पिणे कठिण जाते आणि दुसरे म्हणजे सगुणोपासना हे एक साधन आहे, पायऱ्या आहेत, आणखी कुठेतरी पोचण्यासाठीच्या. भोळीभाबडी जनता म्हणजे तरी कोण? आपण आंतरजालावर वादविवाद करू शकणारे प्रज्ञावंत खरोखरच भोळेभाबडे आहोत का? की तिसऱ्याच कोणाच्यातरी वतीने त्यांना गृहीत धरून आम्ही बोलतो आहोत? सगुणोपासना हे साधन मानता मानता साध्यच होऊन बसले आहे हे आमच्या लक्षात का येत नाही आहे? अमुक वेळा पारायणाचा, अमुक हजार नामजपाचा, वेगवेगळ्या नेमांचा संकल्प सोडायचा, आणि तो सिद्ध करायचा, असेच चालते ना? आणि ह्याचेच अवडंबर माजते ना? गणेशचतुर्थीसाठी एकच दिवस रजा असते. उत्सवाच्या उरलेल्या दिवसांत घाईघाईने पूजा आटपायची, मंत्रोच्चार, अथर्वशीर्ष, आरती, नैवेद्य सारे उरकायचे आणि 'हुश्श! झाले एकदाचे' म्हणून बाकीच्या कामाला लागायचे असेच बहुतेक सर्वत्र असते ना? म्हणजे पूजा-उपचार हेच साध्य. अष्टसात्त्विक भाव जागृत होतच नाहीत. कारण ते साध्य नसतेच. विपश्यनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावयास सांगतात. दर क्षणीचा श्वास ही किती साधी गोष्ट. पण आपल्याला तिची जाणीव नसते. आपल्या देहव्यवहाराची, आपली स्वतःची जाणीव नसते. श्वासाचा कोहं-सोहं नित्य चाललेला असतो. हृदयाचा अनाहत नादही सदैव चालू असतो. हा आघाताविना होणारा नाद आम्ही ऐकतो का? सगळे सांगतात,' दिलकी सुनो'. आम्ही ऐकतो का? "नादबिंदू के पीछे जमया पानी..."(य.कु.ची आठवण येतेय) नादाचा केंद्रबिंदू म्हणजे हृदय बाष्पगद्गद झालेय‌. सद्गदित झालेय. अगदी सहज अवस्था. हे 'स्व'चे 'स्व'शी अनुसंधान कायम राखायचे, 'स्व'च्या आनंदात, निजानंदात तल्लीन व्हायचे. त्यासाठी कोणत्याच पायऱ्यांची आवश्यकता नाही. निज म्हणजे तरी काय? आत्म, स्व, निज सारे एकच. अध्यात्म म्हणजे आधी आत्म असे विनोदाने म्हणतात. पण अधि आत्म तर आहे? "आत्मा वा अरे द्रष्टव्यः, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः| आत्मनो वा अरे दर्शनेन, श्रवणेन, मत्या विज्ञानेन इदं सर्वं विदितम।" अरे, हा आत्मा पाहावा, ऐकावा, त्याचे मनन करावे. त्याच्या दर्शनाने, श्रवणाने आणि बुद्धीने जाणण्याने बाकी सर्व जाणले जाते. आत्मज्ञान हेच अंतिम ज्ञान होय. आपण हा स्व पाहत नाही. त्याला अनेक अवगुंठनांआड, मुखवट्यांआड लपवतो. सर्व मुखवटे, पटले, आवरणे दूर केली की स्व-रूप कळते. 'घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे'. निखळ स्व-रूप हेच पिया आणि प्रेयसीही तीच. अद्वैतच आहे. आपण कशासाठी बाहेर शोधतो? एकदा का स्व-रूपाची ही जाणीव स्थिर झाली की सगळे लख्ख दिसू लागते असे संत सांगतात. 'कुणाचे हे घर? हा देह कवणाचा? आत्मा राम त्याचा, तोचि जाणे'. रम चा प्रधान अर्थ आनंदी असणे असा आहे. राम म्हणजे आनंददायक, रम्य, सुंदर. जिथे स्वतःच्या ठायी नित्य आनंद आहे, (तिथे) त्याने हे सर्व जाणले. आता या सर्व प्रक्रियेमध्ये मूर्तिपूजा, स्तोत्र, आरती यांचे स्थान कोणते? माणसामधला विवेक जागवणे हे साध्य या उपायांनी कधी तरी साध्य होईल का? उलट ती जनता एका गुंगीत राहील. आपण पूजाअर्चा करतो आहोत, यात्रा, व्रतेवैकल्ये करतो आहोत, काहीही करायचे बाकी ठेवीत नाही आहोत, ही ती गुंगी. ही भोळीभाबडी जनता साध्या आजारावरच्या औषधासाठी डॉक्टरकडे गेल्यावर साध्या,स्वस्त गोळ्यांनी समाधान पावत नाही . तिला महागडे इंजेक्शन हवे असते. जरूर नसताही लोकाग्रहास्तव इंजेक्शन देणारा डॉक्टर मोठा. साध्या गोळ्या देणारे छोटे आणि खोटे. ही जनता एका डॉक्टरचे ऐकत नाही, मग अनेक डॉक्टरांनी 'इंजेक्शनची जरूरी नाही' असे पुन्हा पुन्हा सांगायला नको का? (हे एक उदाहरण) भोळ्याभाबड्या जनतेला उच्चज्ञानप्राप्तीचा मार्ग सोपा व्हावा म्हणून सगुणोपासना चालू राहावी असे आपण म्हणतो तेव्हा सगुणोपासना ही अडाणी जनतेला दिलेली मुभा, सूट, सवलत आहे हे मान्य करतो. एके काळी अशी सवलत असेलही, पण आज दीडदोन हजार वर्षांनंतरही ती चालू राहावी का? शिवाय या सवलतीचा आज दुरुपयोग होऊ लागलाय. पाठ, सप्ताह, यज्ञ, तीर्थयात्रा यासाठी आज प्रायोजक मिळू लागलेत. हे आयते चालून आलेले प्रायोजकत्व राजकीय पक्षांनी न स्वीकारले तर नवल. सध्या मोफत किंवा अत्यल्प खर्चात (उदाहरणार्थ) शिरडी यात्रा घडवण्याची टूम आहे. मोफत बसगाड्या, मोफत निवास, मोफत जेवण. नंतर त्या बदल्यात काहीतरी मिळायचे/मिळवायचे असतेच. लोकांना गुंगीत ठेवण्याचा, मिंधे राखण्याचा, 'जैसे थे' राखण्याचा हा एक डाव आहे. इतरही अनेक क्षेत्रात असे होते पण तिथे बदलासाठी निवडणुका, पोलिस, कायदे इ. अनेक प्रकार उपलब्ध असतात. इथे मात्र विवेकाने मतपरिवर्तन हा एकच मार्ग. जनता गुंगीत राहणे हे काही जणांच्या फायद्याचे ठरू शकते हा एक लहानसा आणि गौण मुद्दा आहे. मुख्य मुद्दा हा आहे की जनतेने सदैव भोळे-भाबडे का राहावे? भोळेभाबडे असणे/रहाणे ही सगुणोपासनेसाठी पळवाट बनते आहे का? 'आम्ही बुवा अडाणी माणसे. आम्हाला आत्मज्ञान वगैरे काही समजत नाही' असा आम्ही सुशिक्षित लोक आव आणतो आहोत का? की वेड पांघरतो आहोत? विवेकाने येणारी प्रेम, त्याग आणि विश्वास ही त्रयी आम्हाला रोजच्या जीवनात नको आहे का? व्यावहारिक पातळीवरही हे आत्मभान आपल्याला कितीतरी मदत करू शकते. सवयीमुळे घडणाऱ्या क्षुल्लक अशा वाईट गोष्टी आपण टाळू शकतो. आपण काय करतो आहोत त्याची जाणीव असली तर रस्त्यात थुंकणे, कचरा टाकणे, विनातिकीट प्रवास करणे, भेसळ करणे, लाच देणे/घेणे, काम न करणे या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे आत्मभान जागृत होऊन एक 'राष्ट्रभान' बनू शकते. एक कल्याणकारी व्यवस्था निर्माण होऊ शकते. हा अखंड सावधानतेचा सोपा मार्ग आपणां प्रज्ञावंतांना का नको? ता. क. : या विषयावर सध्यातरी आणखी धागे काढणार नाही. मिपाकरांनी आश्वस्त राहावे.!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 20936 views

🗣 चर्चा (128)
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/02/2014 - 11:59 नवीन
आणि दुसरं म्हणजे सत्य एकच असल्यानं त्याची गरजही नाही. ज्या प्रतिसादाला मी उत्तर दिलंय त्यात तो श्लोक आहे. एनी वे, आता तुम्ही म्हणतायं :
ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान ||१|
याविषयी वरच्या प्रतिसादात चर्चा झाली आहे. तुम्हाला निरिक्षणानं आत्मज्ञान होईल असं वाटत असेल तर जरुर चालू ठेवा.
कृपया चुकीची माहीती इतक्या आत्मविश्वासाने लिहून दिशाभूल करु नये ही विनंती !
जर निरिक्षणासारख्या सोप्या प्रक्रियेनं स्व गवसतो अशी तुमची माहिती असेल तर परिक्रमा कशासाठी असा प्रश्न येतो. यावर तुम्ही पुढच्या प्रतिसादात म्हटलंय :
परिक्रमा म्हणजे तीर्थयात्रा नव्हे , ती एक अंतर्यात्रा आहे.
मग स्व-निरिक्षणाचं प्रयोजन काय? ती अंतर्यात्रा नव्हे काय? जाणिवेचा रोख अंतर्मुख करण्यापलिकडे त्या प्रक्रियेचं प्रयोजन काय? माझ्याकडे माहिती नसली तरी अनुभव आहे आणि माझ्या विधानांच्या समर्थनार्थ तो पुरेसा आहे. पुढे जे काही ज्ञानाबद्दलचे श्लोक तुम्ही उधृत केलेत त्यावर तुम्हीच निरुपण करुन त्यातून "स्व" ही सनातन स्थिर अवस्था कशी प्राप्त होईल ते (वेळ झाल्यावर आणि इच्छा असल्यास) लिहावे. बाकी यानिमित्तानं ओशोंचं एक सुरेख वाक्य आठवलं, ते असं : "ग्यानी क्या बोलता है उसे सुनो और अज्ञानी क्या करता है उसे देखो! असो,... करा शांतपणे परिक्रमा!
व
विटेकर गुरुवार, 01/02/2014 - 13:48 नवीन
(वेळ झाल्यावर आणि इच्छा असल्यास) वेळ ही नाही आणि इच्छा तर अजिबात नाही,तस्मात आमचा पास ! आम्ही आमच्या अज्ञानात अत्यंत सुखी आहोत आपण आपले " देखो" चालू ठेवावे. आमचे काहीही म्हणणे नाही! एक शंका: "ग्यानी क्या टंकता है उसे पढो" असे ओशो नी म्हंटले आहे का ? तसे असल्यास जरुर सांगावे आम्ही आपले टंकन अतिशय लक्षपूर्वक वाचू. जमल्यास दोन्ही हात जोडून स्व-कडे बघत बघत अतिशय भक्तिभावाने .. पण वाचायचे असल्याने डोळे मिट्ता येणार नाहीत, ते चालेल का ?
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/02/2014 - 10:17 नवीन
हे निर्गुण म्हणजे इतर काहि नसुन शरणागती आहे. निर्गुण, निराकाला जाणण्याची शक्यताच नाहि. 'इथे माझी गुण जाणण्याची शक्ती संपली. आय सरेण्डर, आय क्वीट. नेती नेती.' निर्गुण म्हणजे गुणरहितता नाहि, निराकार म्हणजे आकाररहितता नाहि. तर ते आकाराबाधित गुणाच्या शक्यतेची समाप्ती आहे. त्यापुढे केवळ प्रेमाची शक्यता उरते...भक्ती.
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/02/2014 - 08:17 नवीन
थँक्स फॉर द क्लीनप.
प
प्यारे१ गुरुवार, 01/02/2014 - 08:30 नवीन
सगळे सं. भलतेच जागृत 'आहेत' ;)
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/02/2014 - 08:53 नवीन
पण त्यामुळे कंपूची पंचाईत आहे *pleasantry*
व
विटेकर गुरुवार, 01/02/2014 - 08:35 नवीन
सध्या सगुणात आनंद आहे .. तो टिकावा हीच इच्छा आहे . त्यामुळे पास ! उपासनेला दृढ चालवीन, भूदेव संतासी सदा नमीन सत्कर्म योगे वय घालवीन सर्वा-मुखी मंगल बोलवीन
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/02/2014 - 09:07 नवीन
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला ! मत्त हत्ती मारला !!
आणि प्रतिसाद तर अजिबात वाचू नका कारण
उत्तमा सहजावस्था| मध्यमा ध्यानधारणा| तृतीया प्रतिमापूजा| तीर्थयात्रा अधमाधम|| - तुकाराम महाराज!
व
विटेकर गुरुवार, 01/02/2014 - 10:13 नवीन
१. माझ्या सहीचा अर्थ आपण लक्षात घ्यावा , श्री शिवाजीमहाराजांनी प्रतापगडावर खानाची आतडी बाहेर काढली असा तो अर्थ आहे.. त्याचा लक्ष्यांक्ष असाही आहे की .. आत्मज्ञान झालेल्या केसरीने म्हणजे सिंहाने काम-क्रोधादी मत्त हत्ती मारला.. आता तुम्हाला " अभ्यास वाढ्वा " म्हणणे म्हणजे पिंडिला पाय लावल्यासारखे होईल तेव्हा तसे म्हणत नाही ! २. परिक्रमा म्हणजे तीर्थयात्रा नव्हे , ती एक अंतर्यात्रा आहे.. जाऊ दे , साखरेची गोडी सांगून कळत नाही !ती अनुभवावी लागते ! ३. अधमाधम तीर्थयात्रा ही अतिअधमाधम अशा शाब्दिक अवडंबरापेक्षा बरी असे माझे वैयक्तिक मत आहे ! बाकी चालू द्या !
क
कवितानागेश गुरुवार, 01/02/2014 - 08:43 नवीन
वाचतेय.. :)
म
मारकुटे गुरुवार, 01/02/2014 - 09:30 नवीन
हा हा हा
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/02/2014 - 09:33 नवीन
दुर्गुणॉपासने पेक्षा सगुणोपासना चांगलीच. निर्गुणोपासना करता आली तर उत्तम. बाकी चालू द्यात.
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/02/2014 - 10:06 नवीन
=))
व
विटेकर गुरुवार, 01/02/2014 - 10:22 नवीन
दासबोध दशक ६ समास ७ सगुणोपासना हा मूळातून वाचावा असे सुचवीन. तुमच्याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर समर्थांनी दिले आहे . शिष्य प्रश्न विचारतो आहे : ज्ञानें दृश्य मिथ्या झालें| तरी कां पाहिजे भजन केलें |तेणें काय प्राप्त झालें| हें मज निरूपावें ||१|| ज्ञानाहून श्रेष्ठ असेना| तरी कां पाहिजे उपासना |उपासनेनें जनां| काय प्राप्त ||२|| मुख्य सार तें निर्गुण| तेथें दिसेचिना सगुण |भजन केलियाचा गुण| मज निरूपावा ||३|| जें समस्त नाशवंत| त्यासि भजावें किंनिमित्त |सत्य सांडून असत्य| कोणें भजावें ||४|| असत्याचा प्रत्ययो आला| तरी मग नेम कां लागला |सत्य सांडून गलबला| कासया करावा ||५|| निर्गुणानें मोक्ष होतो| प्रत्यक्ष प्रत्यय येतो |सगुण काय देऊं पाहतो| सांगा स्वामी ||६|| सगुण नाशवंत ऐसें सांगतां| पुनः भजन करावेंम्हणतां |तरी कासयासाठीं आतां| भजन करूं ||७|| उत्तर आपण मूळ समासात वाचावे. इथे चिकटव्ल्यास अकारण धाग्याची लांबी वाढेल ! फक्त एक ओवी लिहण्याचा मोह आवरत नाही .. रघुनाथभजनें ज्ञान झालें| रघुनाथभजनें महत्ववाढलें |म्हणोनि तुवां केलें| पाहिजे आधीं ||३१||
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 01/02/2014 - 10:34 नवीन
हा दुवा बघा.सगुण, निर्गुण यातला फरक छान सांगितला आहे. बाकी आपल्याला स्व गवसला आहे, कळाला आहे हे कसे ओळखवे? स्व गवसण्यासाठी काय करावे?
स
स्पा गुरुवार, 01/02/2014 - 10:41 नवीन
कृपया आमच्या कंपनीशी संपर्क साधावा
म
म्हैस गुरुवार, 01/02/2014 - 10:47 नवीन
संजय क्षीरसागर च्या पहिल्या २ प्रतिसादांशी सहमत . माझ्या मताप्रमाणे आत्मभान म्हणजे विवेकाने काय चांगले आणि काय वाईट हे समजणे आणि त्याप्रमाणे वागणे . 'स्व' समजणे म्हणजे आत्मानुभूती . मी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्व गवसणे . प्यारे१ ने ४ हि वचनांचे चुकीचे अर्थ लावलेत . त्यातला मुख्य शब्दच विचारात घेतला नाहीये.
सह-ज : बरोबर जन्मलेलं. आपल्याबरोबर जन्मते ती (अवस्था).
सहजावस्था म्हणजे कुठल्याही प्रयत्नाची गरज नसते . डोळे बंद केले कि किवा एका ठिकाणी चित्त एकाग्र झाला कि आपोआप समाधी लागणे .(समाधी लागण्याचा अर्थ काही लोक झोप लागणे वगेरे असं घेतात. समाधी अत्यंत उच्च आणि वेगळ्या प्रकारची स्थिती आहे. परंतु हा इथे विषय नसल्यामुळे टाळते )
सगुणाचेनि 'आधारे'| 'निर्गुण' पाविजे निर्धारे| सारासारविचारे| संतसंगे
सगुण आणि निर्गुणातला फरक संत संगामुळे लक्षात येतो असं अर्थ आहे.
पहावे आपणासि आपण| या नाव ज्ञान||
आपणिया आपणपै देखे
ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ आपणच आपल्याला जेव्हा दिसतो त्याला ज्ञान म्हणतात . आता काही जन म्हणतील आपण आपल्याला आरशात सुधा दिसतो. पण आरसा हा इथे माध्यम असतो. आणि त्यात फक्त बाह्यरंग दिसत . अंतरंग नाही. ह्या कुठल्याही माध्यमाशिवाय आपलं स्वरूप आपल्याला जेव्हा दिसत त्या स्थितीला ज्ञान म्हणलाय. सागुनोपास्नेचा इथ काहीही संबंध नाही
प
प्यारे१ गुरुवार, 01/02/2014 - 11:30 नवीन
अजून वाचतोय, शिकतोय. सांभाळून घ्या! आत्मज्ञान मिळालेल्या तरीही सगुणोपासक संतांचे दाखले देण्याचा प्रयत्न वरील चारी उदाहरणांमध्ये होता. त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती अवलंबिली आहे. १. सहज चा अर्थ सह-ज असाही होतो. नवजात बालकाच्या स्थितीचा विचार आहे. ते वर लिहीलेलं आहे. २. निर्गुण पाविजे ही भाषा व्यवहार म्हणून वापरावी लागते. 'जुने ठेवणे मीपणे आकळेना' ह्या समर्थउक्तीप्रमाणं आपलंच आहे आपल्याला कळत नाही अशी स्थिती. नित्यप्राप्ताची प्राप्ती असंही म्हणतात. ३. 'संतसंगे' हा विचार घेतला नव्हता कारण सगुण निर्गुणाचा विचार हा लेखाचा विषय आहे. सगुणभक्ती मध्ये किंवा ध्यानप्रक्रियेच्या विचारामध्ये देखील (विश्वास ठेवा अन्यथा ठेवू नका) अशी व्यवस्था असते की ज्याद्वारे योग्य मार्गदर्शन मिळतं. घरबसल्या सुद्धा ते मिळू शकतं. 'अचानक' वाटू शकेल असा संतसंग होतो.
स
स्पा गुरुवार, 01/02/2014 - 11:36 नवीन
का प्यारे काका का ? किती चुकीचे ज्ञान आहे तुम्हास , तरी वाद घालटाय कधी शहाणे होणार तुम्ही , कधी येणार तुम्हाला आत्मभान - स्पाही
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/02/2014 - 11:42 नवीन
किती चुकीचे ज्ञान आहे तुम्हास , तरी वाद घालटाय कधी शहाणे होणार तुम्ही , कधी येणार तुम्हाला आत्मभान
कवितेतलं मीटर अन यमक हुकलेलं आहे. आधी ते सुधारा अन मग करा स्व-च्या गोष्टी!! -धृतराष्ट्र हस्तिनापूरकर.
स
स्पा गुरुवार, 01/02/2014 - 11:53 नवीन
इथे
कवितेतलं मीटर अन यमक हुकलेलं आहे.
आणि मग, पूर्ण प्रकरण हाताबहेरच गेलं
आधी ते सुधारा अन मग करा स्व-च्या गोष्टी!!
मन जेंव्हा जाणीवेच्या पलीकडे जाते, तेंव्हा त्यात स्व हरवून जातो, तिथेच आत्मभानाचा प्रवेश होतो, आत्मभान हे सत्व असते, सत्व हे नाचणी चेही असते, रोज एक चमचा दुधातून घेतले कि, तब्येत मस्त राहते, पण हा सुद्धा एक भास असतो सेल्फ अवेरनेस . मुळात तब्येत नसतेच , काहीच नसत , सत्व असत , ते बटाट्याच्या किसापासुनही करतात, ते दुर्मिळ असत , सहजासहजी मिळत नाही, तसेच मन सहज तावडीत सापडत नाही , मग मूर्तीपूजा आली. सगुण मूर्तीपूजा आणि निर्गुण मूर्तीपूजा . पूजा भट्ट सगुण आहे कि निर्गुण ठाऊक नाही पण तेही भासच , निरीक्षण करत राहायचे. जाली स्थळी काष्टी पाषाणी मग निर्गुणच , संस्थळी पण मग भास होतात, मग मोठे जड जड शब्द पुस्तकातून वाचायचे , इथेच लादायचे, वाद घालायचा , मग मन सुक्ष्मकार होते , फक्त आपण सत्य भासू लागतो. मग भास खरे होतात , सत्वाची गरज उरत नाही , नाचणी च्या सुद्धा , हवतर बटाट्याचे चालेल पण नसले तरी हरकत नाही.हवतर माझ्या भयकथा वाच मागच्या लिंक देणार नाही ,पिशाच्च जाणवतील, तीही निर्गुणच
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/02/2014 - 11:59 नवीन
हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) हेहे =)) अरे काय चालवलंय्स हराम्या =)) आणि या धृतराष्ट्राच्या बलीवर्दाला तर संपादित.
प
प्यारे१ गुरुवार, 01/02/2014 - 12:21 नवीन
स्पावड्या, बरा आहेस ना? स्वाक्षरीसाठी एक मिसळ, दोन पाव नि पेश्शल चाय. दिलखुश!
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/02/2014 - 14:05 नवीन
@आमचे येथे श्रीक्रुपेकरुन किरकोळ तसेच घाउक दरात स्व, स्वत्व, विवेक, जाणिव,नेणिव, आत्मभान, आत्मन्यान जाग्रुत करुन मिळेल.>>> > Image removed. बेक्कार! पांडुब्बा की जय हो! Image removed.
क
कवितानागेश Fri, 01/03/2014 - 12:15 नवीन
दुर्गुणी स्पांडू!! =)) कुठे फेड्शील ही पापं??? - आत्मभानामतीदेवी माउ
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/02/2014 - 12:14 नवीन
इथेच वर दिलेल्या प्रतिसादात मी म्हटलं होतं :
..त्यात काही जण तर विषयाचा सुतराम गंध नसतांना इतके निम्न दर्जाचे प्रतिसाद देतात की विषय भरकटतो (ते तुम्ही पाहिलं असेलच) आणि ते इथल्या धोरणांच्या (बहुदा) आड येत नसल्यानं या विषयावर न लिहीण्याचा निर्णय मी (सध्या तरी) घेतला आहे.
म्हणजे नक्की काय होतं याची प्रचिती वरचे प्रतिसाद पाहून येईल.
स
स्पा गुरुवार, 01/02/2014 - 12:21 नवीन
उत्तम निर्णय
म
मारकुटे गुरुवार, 01/02/2014 - 14:14 नवीन
+१ असेच म्हणतो
र
रामपुरी Fri, 01/03/2014 - 18:24 नवीन
काही आयड्यांनी लेखनसंन्यास घेऊन मानवजातीवर असंख्य उपकार करून ठेवले आहेत...
ह
होकाका Fri, 01/03/2014 - 13:27 नवीन
याला म्हणतात उदाहरणासहीत स्पष्टीकरण.
ध
धन्या गुरुवार, 01/02/2014 - 14:13 नवीन
सगुणोपासनेच्या नावाखाली मच्छिंद्र कांबळींच्या संचाला लाजवेल असा वस्त्रहरणाचा खेळ चालू आहे.
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/02/2014 - 14:43 नवीन
आणि दिव्यदृष्टी असल्याचा दावा करणारे धृतराष्ट्र इतरांना सांगताहेत- "तो वाघ नसून मांजर आहे."
ह
होकाका Fri, 01/03/2014 - 13:21 नवीन
च्या आनंदी प्रसंगी असं मार्मिक वाक्य आल्यावर ... वाह वा!
रम चा प्रधान अर्थ आनंदी असणे असा आहे.
Heppy New Year to all Mippaakars...
ह
होकाका Fri, 01/03/2014 - 13:22 नवीन
Oops! "New Year" हे शब्द लिहिले गेले नाहीत...
र
राही Fri, 01/03/2014 - 19:21 नवीन
काही वर्षांपूर्वी एका अनियतकालिक कवीने केलेला कल्पनाविस्तार वाचला होता. तो काहीसा असा होता : (शब्द नीट आठवत नाहीत, पण काहीसे असे) रिमझिम रिमझिम झिमझिम झिमझिम रुमझुम रुमझुम झुमझुम झुमझूम रमझिम रमझिम झुमझिम् झूमझिम रमझूम रमझूम रम रम झूम झूम
र
राही Fri, 01/03/2014 - 19:33 नवीन
@विटेकर, आपल्या सूचनेचा आदर आहे. 'पहावे आपणासी आपण' हे वचन माझेही आवडते आहे आणि त्यामुळे जिथेतिथे ते माझ्याकडून उद्धृत केले जाते. दासबोध काही वर्षे नित्य पाठात होता.
प
पैसा Fri, 01/03/2014 - 19:51 नवीन
तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥ तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे । स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥ तुज आकारू म्हणों कीं निराकारू रे । आकारूनिराकारू एकु गोविंदु रे ॥४॥ तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे । दृश्याअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥ तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे । व्यक्त अव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥ निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले । बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥ ज्ञानियांच्या राजाला सगुण आणि निर्गुण यात फरक दिसतच नव्हता नाही का? तरी अवघा महाराष्ट्र त्यांच्यामागून चालत राहिला! आपणही त्यांच्या पाऊलखुणा शोधत चालत रहावे.
अ
अर्धवटराव Fri, 01/03/2014 - 20:28 नवीन
सगळ्या साधना, परिक्षणं, ज्ञान, प्रचिती, अनुभव, स्व/इतर काहि गवसणे... त्याची परमोच्च अवस्था म्हणजे हा अभंग.
स
संजय क्षीरसागर Sat, 01/04/2014 - 06:41 नवीन
ही वस्तुस्थिती आहे. पण अभंग निर्गुणाचा अनुभव आलेल्यानं लिहीलायं. ज्याला निर्गुणाचा अनुभव नाही त्यानं अभंग जन्मभर म्हटला तरी उपयोग नाही. अर्थात हे समजायची शक्यता प्रत्येकात असेल असं वाटलं होतं कारण निर्गुण मूळ आहे. पण परिस्थिती अशीये आहे की विषयाचा गंध नाही, फक्त निर्बुद्ध आणि असंगत प्रतिसाद देण्यात किंवा अक्कलशून्य सह्या ठोकण्यात मात्र ठराविक लोकांचा हातखंडा आहे. असे विषय भरकटवण्यातच बहुदा हयात जाणार. तर असो, म्हणा अभंग आणि जाणा निर्गुणाला.
प
प्यारे१ Sat, 01/04/2014 - 07:50 नवीन
अरे, हम निर्बुद्ध हुए तो क्या हुआ, दिमाग से हम हुश्शार हय हुश्शार. चल... हवा आन दे! - राहीतै नि संजयबाबांची शपथ. (कशाच्याही चालीवर हलकं घेऊन वाचा.)
स
संजय क्षीरसागर Sat, 01/04/2014 - 10:02 नवीन
बाकी जुन्या धारणांचे दळण नव्या गिरणीतून काढण्यापलिकडे त्यातून काही निष्पन्न होत नाही. तुम्ही काढलेले अर्थ चुकीचे आहेत हे वरच्या प्रतिसाद दाखवून दिल्यावर स्वतःला अनुभव नाही हे तुम्हाला कबूल आहे :
बरोबर आहे. बाकी अनुभव नाही हे आम्हास ठाऊक आहेच. आठवण करुन दिल्याबद्दल आभार.
पण दळण इतकं भरपूर दळून ठेवलंय की त्याचं काय करायचं हा प्रश्न उरतोच आणि एखाद्या (किंवा त्याच दर्जाच्या) तद्दन प्रतिसादानं पुन्हा स्फुरण येतं. एनी वे, पुन्हा वात पेटवण्याची मला इच्छा नाही कारण कंपूच्या आकलनाचा आणि कार्यप्रणालीचा एकूण रागरंग लक्षात आला आहे. तरी या प्रतिसादात इतकंच नमूद करतो की कितीही सारवासारव केली तरी अनुभवशून्यता पुन्हापुन्हा दिसत राहणार.
सहज म्हणजे आपली जन्मावेळची स्थिती/ अवस्था. (सह म्हणजे बरोबर घेऊन जन्मलेला असा भाव) नवजात बालकाला द्वेष, मत्सर, राग, लोभ, स्पर्धा इ.इ.इ. काहीही नसतं. आप पर भाव नसतो. आत्यंतिक नैसर्गिक प्रेरणा तेवढ्या असतात. ही सहजावस्था उत्तम.
१) स्व ही कुणाच्या जन्मवेळची स्थिती नाही आणि तो भाव देखिल नाही. ती जन्म-मृत्यूनं अनाबाधित कायम स्थिती आहे २) जाणीवेची जाणीव झाल्यावर तिच्या नित्यनूतनतेमुळे ज्ञानी व्यक्तीला नवजात बालकाचा ओपननेस प्राप्त होतो. तस्मात नवजात बालकाच्या वृत्तीचा उल्लेख केवळ रुपकात्मक म्हणून केला जातो; पण पूर्वीचं दळण काढत असल्यामुळे केवळ तसल्या उदाहरणांशिवाय वेगळं काहीही सांगता येणार नाही. ३)"अत्यंत नैसर्गिक प्रेरणा तेवढ्या असतात?" हा तर कॉपी-पेस्टचा क्लायमॅक्स आहे. अर्थात इतकं कळणारा कंपूच्या टाळ्यांवर आरती करणार नाही हे नक्की.
प
प्यारे१ Sat, 01/04/2014 - 10:38 नवीन
माझ्या बाबतीतलं आपलं बरोबर आहे. इतर मिपाकरांचा उपमर्द का? :) बाकी हलकं घेणं म्हणजे टेक इट लाईटली. ते जमणं नाही हेही मान्य आहेच.
स
संजय क्षीरसागर Sat, 01/04/2014 - 11:22 नवीन
तुम्ही म्हटलंय :
माझ्या बाबतीतलं आपलं बरोबर आहे.
सत्यात ग्रे एरिया नाही. Either you have got it or Not. That is all. तुमच्या बाबतीत माझं म्हणणं बरोबर आहे याचा अर्थ तुम्हाला फोर्थ डायमेंशन गवसलेलं नाही तरी तुम्ही बिनधास्तपणे `त्रिगुणात्मक त्रैमूर्ती' वगैरे पोस्ट लिहून, दत्त म्हणजे त्रिगुणाच्या पलिकडे अशी बेधडक विधानं केली आहेत. शिवाय वेळ मिळेल तिथे माझ्या कोणत्याही (अध्यात्मिक नसलेल्या सुद्धा) प्रतिसादावर बाष्कळ कमेंटसची संधी सोडत नाही याला उपमर्द म्हणतात. ज्याला स्वतःला स्व गवसलेला नाही त्याचं लेखन इतरांची दिशाभूल करण्याशिवाय काही करत नाही. असं लेखन प्रकाशित होतं याला मी अक्षेप घेऊ शकत नाही कारण तो संकेतस्थळ चालवणार्‍यांचा निर्णय आहे. पण किमान लेखनातल्या तृटी दर्शवण्याचं काम मी करु शकतो ज्यावर निव्वळ व्यक्तिगत आणि उथळ प्रतिसाद देऊन (काही) सुमारबुद्धी लोक सतत चर्चा भरकटवतात. अश्या प्रकारामुळे ज्यांना काही समजण्याची शक्यता असते त्यांच नुकसान होतं आणि त्याला माझा अक्षेप आहे. इतर सदस्यांचा उपमर्द होतो असा कांगावा करुन पुन्हा त्यांची सहानुभूती मिळवणं गैर आहे कारण तो माझा उद्देश नाही. ती इथल्या ठराविक लोकांनी इतरांची पद्धतशीरपणे केलेली दिशाभूल आहे. कुणी काय करावं आणि इथे काय प्रकाशित व्हावं यावर माझं नियंत्रण नाही, मी फक्त माझी पोझिशन क्लिअर केली.
प
प्यारे१ Sat, 01/04/2014 - 11:59 नवीन
संजयजी आपण कोण आहात? काय आहात? मागे माझ्या धाग्यावर विचारलेला प्रश्न पुन्हा विचारतो. तेव्हा तो तुम्हाला व्यक्तिगत वाटला होता. पुन्हा विचारतो. हू आर यु? संजय हे नाव आहे, सी ए व्यवसाय... ज्या बुद्धीच्या बळावर स्व गवसलाय असं वाटतंय नि लिहीताय ते तुमचं विचाराचं साधन आहे. असं वेगळं उकलत जा! स्व गवसण्याचा मार्ग गवसेल कदाचित. मला स्व गवसलाय असं म्हणणाराला तो अजिबात गवसलेला नसतो, ज्याला खरा गवसलेला आहे तो अकारण जाहिरातबाजी, दुसर्‍याला कमी लेखणं, दुसर्‍याच्या उद्धारासाठीच जणू माझा जन्म आहे अशी टिमकी वाजवणं हे प्रकार करीत नाही. त्याला त्याची गरज नसते. माझ्यासाठी अनुभव येईपर्यंत साधना करणं हे नि हेच माझ्या स्वतःच्या हातात आहे. अनुभव आल्यावर अमुक शब्दात असा आला, तसा आला वगैरे सांगण्याची गरज उरणार नाही असा विश्वास आहे. बाकी लोक कल्याणाची पोटतिडीक 'अनलर्निंग' करण्यासाठी वापरा. जास्त उपयोग होईल. (शेवटचा प्रतिसाद तुमचाच असेल अशी तजवीज करुन ठेवलेला) प्यारे :)
अ
अवतार Sat, 01/04/2014 - 12:06 नवीन
कोणाचाही कॉपीराईट नाही. प्रत्येकाला त्या सत्याची जाणीव होणारच आहे. जगाला अंतिम सत्याचे धडे देणाऱ्या कोणत्याही महापुरुषांची कधीच गरज नव्हती आणि आजही नाही. नदीच्या वाटेत कितीही अडथळे आले तरी खाच-खळग्यातून आणि डोंगर-दऱ्यातून स्वत:च्या शक्तीप्रमाणे प्रवाह निर्माण करून नदी वाहतच राहते. जीवनाचेही असेच आहे. प्रत्येक नदी ज्या दिशेने जात असेल तीच तिची खरी वाट. सर्व नद्यांना एकच वाट दाखवायच्या फंदात कोणी पडू नये.
क
कवितानागेश Sat, 01/04/2014 - 13:19 नवीन
अनलर्निंग!!!! यु सेड इट. हुश्शार झालास की प्यारे. :) ---- स्लो अन-लर्नर माउ ;)
स
संजय क्षीरसागर Sat, 01/04/2014 - 18:54 नवीन
तुमच्या प्रतिसादाचा अर्थ तुम्हाला तरी कळावा इतपत अपेक्षा होती. त्यावर तुम्ही मला तोच प्रश्न पुन्हा विचारतायं ज्याचं उत्तर ऑलरेडी देऊन झालंय. अनलर्निंगची गरज तुम्हाला आहे कारण तेच दळण तुम्ही पुन्हापुन्हा काढतायं. तुमचे समर्थक तर इतके विद्वान आहेत की त्यांना आपला मार्गदर्शक अनुनभवी आहे हे त्यानं स्वतः कबूल करुन देखिल नक्की काय झालंय ते कळत नाही. तस्मात जाऊं द्या हे बेस्ट!
प
प्यारे१ Sat, 01/04/2014 - 19:28 नवीन
समर्थक? कोण? ती लीमाऊ? अहो पक्की भांदकुदळ आहे ती. काय सांगायचं सर तुम्हाला? नखानं अक्षरशः बोचकारते म्हायत्ये. माझंच ऐकत जा म्हणे. बघा वर कशी हुश्शार झालास म्हणते मला! चिडवतेय. ती समर्थक असूच शकत नाही माझी. बाकी बॅटमॅन तर माझ्याशी परवा परवाच भांडला. प्या म्हणताना 'प्या' आलं तरी लाल होतो रागानं. तोही समर्थक असणं शक्य नाही. अर्धवटराव काय, तुम्हाला अनुभव आहेच. धन्या, स्पा, मोदक, अतृप्त आत्मा, सूड, वल्ली आणि जनता म्हणताय का? अहो पक्के लबाड हो ते! बारीक बारीक पोरं हो ती. त्यांचं समर्थन घेऊन आपल्याला काय फरक पडणार? एलिट क्लास वगैरे काही नाही त्यांचा! -समर्थकांच्या शोधात काव आलेला प्यारे! :( @ राही, प्यारे नि प्यारे१ हे दोन वेगळे असू शकतात किंवा नसूही शकतात किंवा कसंही! ;)
म
मोदक Sat, 01/04/2014 - 22:20 नवीन
अहो पक्के लबाड हो ते! प्यार्‍या.. सांभाळून हां.. भारतात परत येणार हैस ना..?? लीमाऊ? अहो पक्की भांदकुदळ आहे ती. चेष्टेत म्हणाला असलास तरी लै लै वेळा सहमत!!!! +९९९९९९९^९९९९९९९९९९९
प
प्रचेतस Sun, 01/05/2014 - 02:12 नवीन
आमचे नाव उगाच घुसडल्याबद्दल निषेध.आम्हास तुमच्या निरर्थक चिखलफ़ेकीत काडीचाही रस नाही.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा