माझी मदतनीस..
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात.
माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते. माझी नोकरी धावपळीची, धकाधकीची, शिफ्ट ड्यूटीवाली. अशा धकाधकीच्या आयुष्यात मदतनीस बाई ही किती आधार देणारी असते हे नोकरी करणारी स्त्रीच जाणे. मी माझ्या मदतनीस बाईला सांभाळून घ्यायची. तिला व्यवस्थित,इतर ठिकाणी तिला मिळणाऱ्या पगारापेक्षा थोडा जास्तच पगार द्यायची. दिवाळीला बोनस, मिठाई द्यायची. वर्षातून एकदा चांगली साडी घेऊन द्यायची. वेळोवेळी उसने पैसे द्यायची. त्यातल्या काहीजणी प्रामाणिकपणे ते पैसे स्वतःहून आणून परत करायच्या.
मी त्यांना महिन्यातून दोन दिवस सुट्टी देत असे. पाहुणे आले आणि त्यांना जास्त काम पडलं तर त्याचे जास्तीचे पैसे द्यायची. अधुनमधून त्यांची, त्यांच्या घरच्या मंडळींची,मुलाबाळांची चौकशी करायची. एवढं कशाला तर त्यांच्या वाढदिवशी लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा आणि लहानशी भेटवस्तू द्यायची.
अधुनमधून माझ्या घरची मागच्या पिढीतील माणसं,"तू तिला डोक्यावर बसवून ठेवलं आहेस", असं म्हणायची.
"जास्तीच्या कामाचे वेगळे पैसे कशाला देतेस? आमच्या मोलकरणी एक कप चहा आणि दोन शिळ्या पोळ्या खायला दिल्या की सगळे माळे साफ करून देतात.", असंही मला ऐकवलं जायचं. पण मला ते अन्यायकारक वाटायचं.
एकूण काय तर माझ्या मदतनीस माझ्याकडे वर्षांनुवर्षे टिकत असत.
आज आता मी ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. इतक्या वर्षांत मी अनेक मदतनीस अनुभवल्या. आणि माझ्या अनुभवावरून सांगते की या तथाकथित "कामवाल्या बायकां"मध्ये खूप बदल झालाय. आता माझ्याच मदतनीस तरुण मुलीचं एक प्रतिनिधी म्हणून मी उदाहरण देते. थोड्या फार फरकाने तशाच इतरही "कामवाल्या"आहेत असं आढळून येतं.
माझी मदतनीस अतिशय नीटनेटकी आहे. कामावर येताना ती कधीच गबाळ्यासारखी येत नाही.ती चांगल्या साड्या नेसते. पदर व्यवस्थित पिन अप करते.
गळ्यात मंगळसूत्र, त्यातल्या वाट्या तिनं पैसे साठवून सोन्याच्या करून घेतल्या आहेत. मंगळसूत्रासोबत गळ्यात एक बारीक मण्यांची ठसठशीत माळ ती घालते. कुंकू बारीक पण स्पष्ट दिसेलसं. हातांत नाजुक काचेच्या बांगड्या. त्या बांगड्यांच्या पुढे मागे सोनेरी वर्खाच्या बांगड्या. ब्लाऊज नीट,फिट बसणारा. उगीच गळा उतरलाय, उचलला गेलाय असं नाही. सडपातळ बांधा. तेजस्वी काळी कांती. दात शाबूत. शुभ्र पांढरे.
तिच्या घरात टीव्ही आहे, फ्रीज आहे.वाॅशिंग मशीन आहे. सर्व सेकंड हॅंड आणि हप्त्यावर घेतलेलं. ती हौशी आहे. गावात दर मंगळवारी बाजार भरतो. तिथं दमली भागलेली असूनही जाते. उत्साहानं बारीक सारीक खरेदी करते. मुलांसाठी स्वस्तातल्या वस्तू आणते. मीही तिला पूर्वी त्या बाजारातून नाडी बंडल, रुमाल असं काहीबाही आणायला सांगायची. आणि पैसे किती झाले विचारलं की म्हणायची "आई,राहू दे." मग मी तिला काही आणायला सांगेनाशी झाले.
ती सहसा आजारी पडत नाही. खूप ठिकाणी कामं करते. का तर तिला तिच्या मुलाला आणि मुलीलाही शिकवायचं आहे. तिचा मुलगा आणि मुलगी शाळेत जातात. तीही सातवीपर्यंत शिकलेली आहे. ती आपल्या मुलीला कुणाकडेही घरकामासाठी पाठवत नाही.
ती मला एकदा म्हणाली,"जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या वाट्याला नको. मी तिला शिकवणार. ती शिकेल तेवढं शिकवणार. ती चांगली नोकरी करु दे. पैसे मिळवू दे. म्हणजे तिच्या सासरी तिला किंमत राहील. तिच्या साठी चांगला नवरा बघेन. दारू पिणारा नवरा नको. मुलाला पण शिकवेन. त्या दोघांसाठी तर मी इतकी कामं करतेय. आई, तुमचं काम चांगलं आहे. माझं काय चुकलं तर मला समज द्या. पण मला कामावरून काढू नका. माझ्या प्रपंच्यात तुमच्या पगाराची मदत होते. मी आणखी पण दोन कामं जास्त धरेन. पण पोरांना नीट मोठं करीन."
आपल्या अपत्यांविषयी हीच भावना आज प्रत्येक "कामवाली"मध्ये दिसते. त्या आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षित आणि सुखी भविष्याचा तर्कशुद्ध विचार करतात.
आत्ताच्या कामवाल्या शिळं , उरलेलं अन्न घरी घेऊन जात नाहीत. आपले जुने, फाटके कपडे स्वीकारत नाहीत.
घरातल्या बाथरूम्स धुतात पण कमोड साफ करायला नकार देतात. कुठेतरी स्वाभिमानाची जाणीव वाढते आहे.
माझ्या मदतनीस बाईला मी शिळं अन्न कधीच दिलं नाही. घरात काही विशेष पदार्थ बनवला असेल तर तो मी तिला आवर्जून खायला देते. तिच्या डोकं दुखणं सारख्या साध्यासुध्या आजारांवर माझ्या फर्स्ट एड किट मधली औषधं देते. या माझ्या वागणुकीतून तिचं माझं एक प्रेमाचं नातं तयार झालं आहे.
हे सगळं पाहून वाटतं की हा तळागाळातील समाज बदलतोय. आपण या बदलाचं स्वागत करुया. आणि त्याला गती यावी म्हणून यथाशक्ती मदत करुया.
आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.खिक्क!