Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अल्पवयीन मातृत्वाची गंभीर समस्या

ह
हेमंतकुमार
Mon, 01/29/2024 - 06:09
💬 10 प्रतिसाद
११ वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाली होती. परंतु आता गर्भ ३१ आठवड्यांचा असल्यामुळे तिला गर्भपाताची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली
नुकतीच ही जयपूरची बातमी वाचली आणि सुन्न व्हायला झाले. इतक्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेतून जे मातृत्व लादले जाते ते अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या निमित्ताने या विषयाचा घेतलेला हा शास्त्रीय कानोसा. 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या युनिसेफच्या अहवालानुसार सुमारे 13 टक्के मुलींवर अशा प्रकारचे मातृत्व लादले जाते. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाखालील देशांमध्ये तर हे प्रमाण 25% आहे; दक्षिण आशियात ते १०% आहे. अशा घटनांमध्ये सुमारे 20% घटना बाललैंगिक अत्याचार या सदरात मोडतात. त्या वरील वयोगटांमध्ये 33% प्रकरणांमध्ये बलात्कार हे मातृत्वाचे कारण असते. ok अल्पवयीन मातृत्वाची सामाजिक कारणे १. दैनंदिन पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण या मूलभूत सुविधा घरांपासून लांब अंतरावर असणे. २. शाळा घरापासून खूप दूर असणे आणि तिकडे जाण्याचा मार्ग असुरक्षित असणे. खुद्द शाळेच्या वर्गातील मुलग्यांकडून आणि शिक्षकांकडून देखील भय संभवते. ३. प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा दूरच्या अंतरावर असणे आणि तिथली अपुरी वैद्यकीय सुविधा ४. गरिबी हे तर अत्यंत महत्त्वाचे कारण. दारिद्र्यरेषेखालील पालकांकडून आपल्या मुलांच्या मूलभूत गरजा देखील पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांमधील काही मुली नाईलाजाने परिचयातील सधन पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवून त्या बदल्यात पैसे आणि इच्छित वस्तू मिळवतात. ५. विवाहवय कायदा अस्तित्वात असूनही अजूनही कित्येक प्रदेशांमध्ये बालविवाह सर्रास होताना दिसतात. युनिसेफच्या 2021च्या माहितीनुसार जगभरात मिळून आजपर्यंत झालेल्या बालिकाविवाहांपैकी (किंवा प्रथम लैंगिक संबंधातून गरोदर) सुमारे 65 कोटी महिला जिवंत आहेत. त्याची जागतिक टक्केवारी खालील चित्रात पाहता येईल : ok (चित्रसौजन्य : युनिसेफ) अशा प्रकारच्या मातृत्वातून संबंधित मुलींना काही गंभीर शारीरिक आणि सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. ते आता थोडक्यात पाहू : शारीरिक दुष्परिणाम १. गरोदरपणात उच्च रक्तदाब आणि फीट्सचा विकार होण्याची शक्यता २. प्रसूतीपूर्व डॉक्टरी सल्लामसलतीकडे दुर्लक्ष आणि हेळसांड ३. मुदतपूर्व प्रसूती ४. प्रसूती दरम्यान गंभीर अडथळा, सिझेरियन किंवा अन्य शास्त्रक्रियांची गरज ५. प्रसूतीनंतर होणारा fistula, अतिरिक्त रक्तस्त्राव, गर्भाशय अस्तराचा दाह. तसेच क्षयरोग आणि अन्य जंतुसंसर्ग ६. आधीच कुपोषणग्रस्त असल्यास तीव्र ऍनिमिया सुद्धा असतो ७. खूप कमी वजनाच्या बालकाचा जन्म आणि/ किंवा जन्मानंतर लवकरच त्याचा मृत्यू. सामाजिक दुष्परिणाम १. शालेय शिक्षण थांबवावे लागणे २. कुटुंब आणि आजूबाजूच्या समाजाकडून सतत दूषणे मिळणे; वेळप्रसंगी जवळच्या कुटुंबीयांकडून मारहाण ३. कुमारी माता हा आयुष्यभरासाठीचा कलंक लागतो. ४. गरोदरपणी योग्य वेळेत हस्तक्षेप न केल्यास जन्माला येणाऱ्या मुलांच्या पोषणाचा प्रश्न; अनाथालयांवरील बोजा वाढणे. अशा प्रकारच्या शोषित मुलींच्या मुलाखती घेण्यात आल्या असून त्यांत त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. अशा समूहाकडून आलेल्या काही मागण्या अशा आहेत : १. बलात्कारी पुरुषांना कठोर शासन करणे २. पीडित मुलींना शाळेत पुन्हा घेऊन शैक्षणिक संधी देणे ३. या वयोगटातील मुलामुलींचे लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधन या विषयावर प्रबोधन व्हावे ४. शाळांमधील वातावरण सुरक्षित होणे आवश्यक असून त्याची हमी देण्यात यावी. या संदर्भात पालक व शिक्षकांचे समुपदेशन व्हावे ५. पीडीत मुलींकडे बघण्याच्या सामाजिक दृष्टिकोनातही बदल झाला पाहिजे ६. विवाहवय कायद्याची कठोर अंमलबजावणी अल्पवयीन मातृत्वाचे जागतिक पातळीवर नोंदलेले न्यूनतम वय किती असेल याचा शोध घेतल्यावर खालील धक्कादायक माहिती मिळाली : सन 1939मध्ये पेरू देशातील ही घटना. पाच वर्षे सात महिने वयाची मुलगी (Lina Medina) माता बनली. त्या बालकाला सिझेरियनने काढावे लागले. या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मासिक पाळी येत होती (? Precocious puberty). या बातमीची वैद्यकीय तसेच पत्रकारीय प्रांतात बरीच शहानिशा झालेली दिसते. त्यानंतर ही बातमी खरी असल्याचे दिसते आहे. अर्थात मातृत्वाचे इतके लहान वय हे अपवादात्मक मानावे लागेल. या दुःखद विषयाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित देशांतील सामाजिक आणि आरोग्य यंत्रणांनी या संदर्भात योग्य ती पावले प्राधान्याने उचलणे महत्त्वाचे आहे. ******************************************************************************

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4023 views

💬 प्रतिसाद (10)
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 01/29/2024 - 07:50 नवीन
एक वेगळाच विषय वाचायला /चर्चेला आणल्याबद्दल अभिनंदन. एका लेखात वाचल्याप्रमाणे उसतोड मजुरांमध्ये बाल विवाहाचे प्रमाण खुप आहे, त्यालाही हेच कारण. मुलीला एकटी घरात ठेवुन आईबाप शेतावर जाउ शकत नाहीत. मग आली वयात की द्या लग्न लावुन आणि संपवा जबाबदारी. चाईल्ड ट्रॅफिकींग, बालमजुरी वगैरे फार सौम्य असे म्हणण्यासारखी परीस्थिती
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/29/2024 - 11:45 नवीन
उसतोड मजुरांमध्ये बाल विवाहाचे प्रमाण खूप आहे
हे माहीत नव्हते.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 01/29/2024 - 12:49 नवीन
बालमजुरी वगैरे फार सौम्य असे म्हणण्यासारखी परीस्थिती
सहमत. हे प्रकार पाहून, "बालमजुरी हा तर गैरप्रकार नाहीच" असे म्हणावे म्हणावे लागेल. बाकी धाग्यातील विषयाशी सहमत. बालमाता हा अनेक देशांतील प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 01/29/2024 - 11:51 नवीन
पाच वर्षे सात महिने वयाची मुलगी (Lina Medina) माता बनली. त्या बालकाला सिझेरियनने काढावे लागले. या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मासिक पाळी येत होती (? Precocious puberty).
बापरे... ऐकावे ते नवलच! एकंदरीत विषय गंभीर आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/30/2024 - 00:48 नवीन
या मुली कुटुंबात असूनही खरेतर निराधार आणि दुर्लक्षितच असतात आणि त्याचं कारण गरीबी. आजुबाजुच्या समाजही उद्योग आणि ध्येयहीनही असतो. लोकसंख्या वाढ हे गरीबीची कारण सांगतात,पण साडेचार हजार वर्षांपूर्वीचे इजिप्तमधील ऐतिहासिक पुरावे सांगतात की गरीबी होतीच. म्हणजे काय तर आर्थिक विषमता हे कारण. धनवान, सत्तावान बांधीव दगडी घरांत आणि जनता, गुलामीत मातीच्या खोपटांत. कुमारी मातेने मोझेसला पेटीत घालून सोडून दिलं. इकडे पौराणिक कथेतला कर्ण. समाजातल्या तरुणांना काही ध्येय निर्माण करून ठेवणे कठीण काम.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 01/30/2024 - 01:05 नवीन
आपण सर्वांनी व्यक्त केलेले विचार मननीय आहेत. सहमत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/30/2024 - 02:20 नवीन
विचित्र प्रकार आहे पाचव्या वर्षी मूल होणे म्हणजे. आणि त्यामागील व्यक्ती कायम अज्ञात राहिली हे वाईट. वरील तुम्ही दिलेली केस वाचताना बरोबर उलट बाजूची केस विकिपीडियाने दाखवली. सर्वात जास्त वयात अपत्य प्राप्ती. वयाच्या ७२ आणि ७३ व्या वर्षी मूल झालेल्या दोन्ही स्त्रिया भारतीय आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 01/30/2024 - 03:14 नवीन
विचित्र आहे खरे ! म्हातारपणीच्या मातृत्वाचा विक्रम बघायला गेल्यास त्यात दोन प्रकार पडतील : १. नैसर्गिक मार्गाने गरोदर झालेली स्त्री : याचा 2017 च्या ‘गिनेस’ नोंदणीनुसार विक्रम, वय 59 असा दिसतो आहे. २. कृत्रिम गर्भधारणेने गरोदर झालेली स्त्री : हे वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे वय 73.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 01/30/2024 - 04:30 नवीन
धन्यवाद. बाकी कृत्रिम का असेना, पण ते गर्भाशयात रोपण करून मग डिलिव्हरी झाली असे वाटते आहे. साठ, सत्तर या वयातही गर्भाशय आदि अवयव काम करत असतात असे माहीत नव्हते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/25/2025 - 09:17 नवीन
अल्पवयीन मातृत्वाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुलींचे बालविवाह. राजस्थानमध्ये ही समस्या मोठी आहे. असे विवाह रोखण्यासाठी तिथे अनेक संस्थांनी एकत्र येऊन जागतिक स्तरावरील 'girls not brides' या नेटवर्कची स्थापना राजस्थानात केली आहे. सध्या या नेटवर्कमध्ये 28 संस्था आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून तिथले बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे. . . . बालविवाह : हेरंब कुलकर्णी यांचे नवे पुस्तक त्या लेखातून :
". . . बालविवाह हे माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. बालविवाह ही महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर समस्या आहे. दुर्दैवाने अजूनही अनेकांना बालविवाह मागच्या शतकातला विषय होता असे वाटते व आता कुठे आहेत बालविवाह? असा उलटा प्रश्न विचारतात. त्यामुळे या विषयावर उपाययोजना तर सोडाच, पण फारशी चर्चाही होत नाही. राजस्थानात हे प्रमाण जास्त असल्याने, राजस्थानची किमान चर्चा तरी होते. महाराष्ट्र हे ‘पुरोगामी’ राज्य असल्याने जणू इथे बालविवाह नसतीलच, असाच सार्वत्रिक समज आहे. या समजामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण किती? बालविवाहाच्या प्रश्नाची दाहकता किती? याची चर्चा कोणीच करत नाही. यामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचा प्रश्न जणू संपला आहे, असे सर्वसाधारण समजले जाते. पण भारतात आजही २३ टक्के, तर महाराष्ट्रात हे प्रमाण २२ टक्के इतके आहे, हे लक्षात घेतल्यावर धक्काच बसतो. . ."
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा