सात वारांची भारतीय पद्धती
रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.)
तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.
पण हे वार त्यांनी म्हणजे रोमनांनी कसे शोधले किंवा स्थापीत केले यावर काही हे लोक सांगू शकत नाहीत. जास्त विचारले तर मग हे इतिहासकार सांगतात की ते रोमनांनी नाही शोधले. ते वार प्राचीन इटली मधील इत्रूस्कॅन लोकांनी शोधले होते ते रोमनांनी घेतले. या इटालियन इत्रूस्कॅन जनतेने ते कसे शोधले असे विचारले की ते म्हणतात, वार इत्रूस्कॅन लोकांनी मेसपोटामियन लोकांकडून उचलले. (ईटालियन लोकांना चौदाव्या शतका पर्यंत शून्य माहित नव्हते, ते कसले वार शोधणार!?)
म्हणजे पहा जे ज्ञानी रोमन म्हणून आपल्यावर फेकले जातात मुळात त्यांनीच उचलेगिरी केली हे मान्य केले जाते.
या शिवाय कोणतेही पुरावे न देता अजून एक भंपक नाव यात ठोकून जाते ते म्हणजे खाल्डियन लोक आणि त्यांचे ज्ञान. पण हे खाल्डियन लोक कुठे होते हे विचारले तर त्याचे काही उत्तर बहुदा नसते. असो, याचा संदर्भ त्यांना बहुदा उरार्तुशी लावायचा असतो कारण एका अनातोलिया नामक देशातील ग्रीक संस्कृतीशी संबंधीत हे लोक होते हे ही यांना माहित नसते. असो या भाषेतले सर्व ज्ञान आताच्या तुर्की/टर्की लोकांनी नष्ट केले आहे आणि अनतोलिया या मूळ देशाच्या भूभागावर आजचा नाचाचा देश आहे. त्यामुळे त्याचा सिद्ध करण्याची काहीही संबंधच रहात नाही.
तर आपण आता हे सिद्ध केले आहे की रोमनांनी वार वगैरे काही शोधले नाहीयेत आणि स्थापीत तर नक्कीच केलेले नाही. आता दुसरा भाग पाहू या -
वाराच्या दिवसाला तोच दिवस म्हणजे शनिवाराला शनिवारच का म्हणायचे बुधवार का नाही; याचे कोणतेही कारण मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर देऊ शकत नाहीत. कारण वार आणि त्याची काही पद्धती आहे, याची त्यांना माहितीच नाही.
वारांची नावे ही सूर्य उदयाची संबंधीत आहेत. आपण भारतीय कालगणने मध्ये दिवसाची संकल्पना ही सूर्योदयापासून सुरू करतो. (सद्य स्थितीत रात्री १२ वाजता दिवस संपला असे मानले आहे.) भारतीय काल गणनेमध्ये दिवसाचे २४ भाग मानले आहेत. याला होरा असे नाव आहे. (लगेच ग्रीक शब्द हॉरोस्कोप घेऊन पहा रोमन संबंध असे म्हणून माझ्या अंगावर धावू नका! कारण मग मी विचारणार की रोमनांनी दिवसाचे २४ भागच का केले आणि कसे केले हे हे सांगा.)
असे तर हे दिवसाचे २४ होरे प्रत्येक ग्रहास दिलेले आहेत. कसे ते आपण पाहू या. दिवस हा सूर्योदयापासून सुरू होतो हे आपण पाहिले. मग या उदयाच्या वेळी जो ज्या ग्रहाचा होरा असेल तो वार त्या दिवशी असतो. म्हणजे सूर्य उदयास शनीचा होरा असेल तर तो शनीवार. पण मग हे होरे कसे ठरवले? तर त्यासाठी प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट लिखित केलेले सूत्र आहे. (त्यांनी लिहिले म्हणजे त्या आधी ते वापरात होते. त्याने ते फक्त लिहिले - आणि हो नशीबच की ते सूत्र लिहून ठेवले) तर ते सूत्र म्हणजे - आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा:
म्हणजे जो सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यापासून ते सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे त्या क्रमाने एक एक होरा दिवसात येतोसासर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे शनि महाराज. आणि सर्वात वेगाने चालतो तो चंद्र. (आता लगेच चंद्र आहे ग्रह नाही उपग्रह आहे वगैरे बोलू नका, चंद्र हा ज्योतिषात ग्रह मानलेला आहे).
तर हे सर्व सात ग्रह उदयासमयी शनि महाराजांपासून सुरूवात करून एका मागे एक असे यातात. जसे की पहिला शनी, दुसरा बृहस्पति, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध आणि सातवा चंद्र. तर अशा रीतीने प्रत्येक ग्रहा पासून चौथ्या ग्रहाचा वार येतो. (जिज्ञासूंनी २१ होरे अधिक ३ होरे केले असता कुणाचा येतो हे गणित करून पाहिल्यास दिसेलच)
अशा रितीने प्राचीन भारतीय गणितज्ञानी आणि ज्योतिष गुरूंनी वार पद्धती विकसित केली. आणि जसे आकडे अरबां मार्फत प्रथम इटली आणि मग उर्वरीत युरोपात पसरले हे आपण पाहतो आले, तसेच वार ही भारतातून युरोपात गेले हे सहज सिद्ध होते.
संदर्भ:
१. कुण्डलीची भाषा खंड पहिला, पान क्र.७, आवृत्ती चौथी, लेखक वाईकर शुक्ल
--
मकरसंक्रांती एक जागतिक परंपरा? येथे गवि यांना उत्तर देण्याऐवजी प्रतिक्रिया जरा उद्धटपणे उमटली म्हणून एक वेगळा लेख केला आहे.
- अथर्व ज्योतिष श्लोक ९३,
- याज्ञवल्क्य स्मृती आराध्याय श्लोक २९५
- महाभारत आदि पर्व १६०/७ आणि
- कात्यायन गृहसूत्र, तिसरे कांड, पाचवे कांड, दुसरा श्लोक यामध्ये या सप्ताह-दिवसांचा उल्लेख आहे.
- महाभारत काव्यात आणि कात्यायन यांनी आठवड्याच्या दिवसांसाठी 'वरा आणि वासर' असे संबोधन दिले आहे.
- वाल्मिकी रामायणातही गुरुवारचा उल्लेख बृहस्पती दिवस असा आहे.
याशिवाय माझ्या ऐकीव माहितीनुसार शिवपुराणात भगवान शिवाने आठवड्याचे सात दिवस निर्माण केल्याचा आणि त्यांना देवता नियुक्त केल्याचा उल्लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की पहिल्या सृष्टीत सात दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी परमेश्वराने ठरवले होते. देवी भागवत पुराणातही वासरांचा उल्लेख आहे. येथे दिलेल्या प्रतिनुसार आठवड्याचे सात दिवस असा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे. माझ्या अल्पमतिनुसार लोकमान्य टिळकांनीही यावर उहापोह करून त्या काळी हा वाद निकाली काढला असावा असे वाटते. (माझ्याकडे काही संदर्भ नाहीत, वडिलांशी बोलतांना असे उल्लेख आल्याचे आठवते.) तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. आता मन मोकळेपणे वारांचे भारतीय मूळ मान्य करायला प्रत्यवाय नसावा. अर्थात भारतात जे काही ज्ञान आहे ते पाश्चात्यच आहे असे ठरवून टाकले असेल तर कोणतीही मदत करणे शक्य नाही.पारंपारिक ज्ञान हे भारतीय आहे हे दाखवून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे;)