माझा होर्डिंग ओसीडी
पुस्तके आवरायल घेतल की नैराश्य येत. काय ठेवायच काय नाही हे ठरवताच येत नाही . ज्योतिषातील अनेक दुर्मिळ पुस्तके, अंधश्रद्धा, तत्वज्ञान, मानसशास्त्र समाजशास्स्त्र ,अध्यात्म, विज्ञान, अशा विषयांवरील विविध पुस्तके त्या त्यावेळी घेतली होती. कधी वाटत आता बास झाल घालून टाकाव रद्दीत पण धाडस होत नाही. किती भूतकाळ उराशी बाळगायचा? पत्रव्यवहार कात्रणॆ हस्तलिखिते लेख यांच्या फाईली किती कवटाळायच्या. दर वेळी आवरायला घेतो व धाडस होत नाही. याला कचरा म्हणवत नाही. तरी महत्वाचा भाग ई ग्रंथालायांवर अपलोड करुन ठेवला आहे आपण गचकलो तरी तो जालसागरात उपलब्ध असेलच. एकदा प.वि वर्तकांचा मंगळा संदर्भात जुना लेख मिळवला होता. अनेक वर्षे पडला होता फाईलीत. एकदा कुणीतरी चर्चेत त्याचा संदर्भ मागितला लगेच मी तो या गदारोळातून शोधून काढून जालावर अपलोड केला. कसल कृत कृत्य वाटल. अगदी नारायणाने ऐनवेळी पंचांग काढून द्यावे तसे. असे अनेकदा झाले. मग असा खजाना रद्दीत टाकावा का? असा विचार करुन परत जागेवर ठेवतो सगळे. तरी निग्रहाने एक दोनदा कचरा काढला होता. पण तो परत साचत राह्तो. प्रत्येक लिहिलेल्या महत्वाच्या खाजगी पत्राची सुद्धा माझ्याकडे कार्बन कॉपी असायची. कितीही फिकी झाली तरी ती ठेवली होती कधी कधी वाचली की जरा बरंही वाटायचे. त्यावेळी आपण कसे होतो नै! हा विचार येउन जायचा. कधी कधी मन कुशंकेने ग्रासले की तो पत्रव्यवहार पाहून हुश्श्य वाटायचं. अनेक पाठवलेल्या पत्रांची उत्तरे वा पोच सुद्धा यायची नाही. आपले पत्र पोहोचले की नाही याची खात्री करण्य़ाची सोय नसायची. पोस्टाने पाठवले म्हणजे पोहोचले या अंधश्रद्धेवर माझा विश्वास होता.काही पत्रोत्तरे मात्र हुरुप वाढवायची.
कधी कधी विरक्तीचा झटका आला की मी माझ्याकडची कागदपत्रे नष्ट करतो. किती काळ ओझ बाळगायचं? पत्रव्यवहार,टिप्पणे, नोटबुके जे जरुरी नाहीत , जुने आहेत पण आता कामाचे नाहीत, अशा कागदपत्रांना नष्ट करा. असे अधूनमधून वाचत असतो. पटत ही असतं.
हे जरुरी प्रकरण फार सापेक्ष आहे. कित्येक वर्षांचा जुना पत्रव्यवहार मी ठेवत आलेलो आहे. एखाद्याला पत्र पाठवले तर त्याची कार्बन प्रत माझ्याकडे ठेवतो.कधीतरी संदर्भ म्हणून उपयोगाला येतो. कधी कधी आयुष्यात आपणच आरोपी, आपणच फिर्यादी व आपणच न्यायाधीश असतो अशावेळी पुरावा म्हणुन ही कागदपत्रे उपयोगी पडतात. सामाजिक लेखनात तर कधी कधी आपल्याला निरोपयोगी असणारा कचरा इतरांसाठी संदर्भमूल्य असतो.अशी कागदपत्रे चिवडताना मी कधी कधी कालकुपीत जातो.अडकूनही बसतो.परत काळच बाहेर काढतो. वैराग्याचा झटका आला की 25-30 वर्षांपुर्वीची कागदपत्रे नष्ट करतो.त्या त्या काळाची ती अपत्ये असतात. आपण जीवापाड जपलेल्या गोष्टी इतरांसाठी कचरामूल्याच्या असतात हे माहित असूनही आपण त्या आपल्या अस्तित्वासाठी जपत राहतो.आताच्या डिजिटल युगात मी काही कागदपत्रांचे/ पुस्तकांचे डिजिटायझेशन केले आहे. पण मूळ फेकवत नाहीत. आता आवरायला हवं. तुम्ही मेलात की तुमच्यासाठी जग बुडाल.मग ते ओझे इतरांसाठी. संदर्भमूल्यावरुन आठवल की उपक्रमावर मी ज्योतिषाच्या माझ्या पुस्तकाची लेखमाला लिहित होतो. त्यात एक संदर्भ साप्ताहिक सकाळ 1989 चा होता. मी तो लिहून ठेवला होता. पुस्तक लिहिताना तो लिहिला होता. उपक्रमाचे वाचक चिकित्सक. किस पाडणारे. कुणी मागितलाच तर तयार ठेवा म्ह्णुन कागदपत्रे शोधू लागलो. मूळ तो लेख मला सापडलाच नाही. . त्यावेळी मी तो अंक उगीच सारखे पैसे का खर्च करा म्ह्णुन घेतला नव्हता असे लक्षात आले.मग अस्वस्थ झालो. लगेच सकाळ कार्यालय गाठले. तिथे तो त्यांच्या ग्रंथालयात मिळाला. त्यांच्या नियमानुसार प्रतिवर्षी असलेल्या संदर्भ फी नुसार काहीतरी 110 रुपये भरले व त्या लेखाची झेरॉक्स मिळवली. त्यावेळी वाचवलेले चार रुपये वसूल झाले.पण शांत झोप लागली. पुढे तो कोणी पुरावा म्हणून मागितलाच नाही ही गोष्ट वेगळी. आत्ता संगणक चाळताना मी वि.म.दांडेकरांच्या पत्नी कुमुदिनी दांडेकर यांच्याशी ईमेलद्वारा केलेला पत्रव्यवहाराचा स्क्रिन शॉट ठेवला होता. तो आपद्प्रसंगी मला जाब विचारणार्याला देता आला असता या विचारानेही जरा सुरक्षित वाटलं. नको सगळ नष्ट करायला. येत कधी कधी उपयोगाला. असा विचारही मनात येउन गेला. असो! आता मात्र आवरलच पाहिजे.नाहीतर अडकून बसायचो कलकुपीत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- SHOORVEER 3 - A Tribute to छत्रपति शिवाजी महाराज | Rapperiya Baalam Ft. Shambho I Meetu Solanki