घराची ऊब
प्रत्येक घराला एक प्रकारचा उबदारपणा असतो. आणि साधारणपणे माणूस आपल्या घरात एकदम समाधानी असतो. कितीही दिवस बाहेर गेलं तरी घरी आल्यावर एक प्रकारचं समाधान, मोकळेपणा मिळतो तो काही वेगळाच. ४ दिवस घर बंद करून जावं तर आल्या आल्या घरात एक प्रकारचा वास येतो. जणू घर सांगत असत कि असं दारं, खिडक्या बंद करून मला सोडून तुम्ही कसे जाता? आधी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या काय करायचं तर दारं खिडक्या मोकळ्या उघडून टाकायच्या. घराला स्वच्छ हवेचा श्वास घेऊ द्यायचा. मग घर पण कसं मोकळं होत. मनमोकळेपणाने तेही आपलं स्वागत करतं.
आपलं घर आपल्याला आपल्या सुख दुःखासह सामावून घेत. घरावरच आश्वासक छप्पर आपल्याला एक विश्वास देत. " हे माझं आहे " हि भावना त्यात असते आणि म्हणूनच प्रेमही असतं. my house, my rules प्रमाणे प्रत्येक घराचे अगदी लिखित नसले तरी नियम असतात. अगदी tv बघायचा तर कोणते कार्यक्रम कुणी बघायचे हेही ठरलेलं असत. जेवायचं कसं,कुठे, कधी, काय याचेही ठोकताळे असतात आणि साधारण त्यात बदल होत नाहीत. comfort level हा प्रकार आपल्याला आपल्या घरात मिळतो. त्यामुळे ४ दिवस बाहेर जाऊन आलो, अगदी कितीही निसर्ग रम्य ठिकाणी जा किंवा आणखी परदेशात जाऊन या, आपल्या घरात आपल्यावर जस मस्त वाटत तसं कुठेच वाटत नाही. घर माणसांना आणि घरातली माणसं त्या वास्तूला सरावलेली असतात. आताशा अगदी माहेरी जरी गेलं तरी आपल्या घरी परत कधी जातोय असं होतं. माहेरी जातोय ते थोडे दिवस राहायला याची जाणीव असतेच. त्यामुळे ते थोडे दिवस झाले कि घरी परतायची ओढ लागते. हि ओढ लागणं आणि ती टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे.
हॉटेल, व्हिला,कॉटेज वगैरे नावाने कितीही सोयी सुविधा असलेलं ठिकाण जरी असेल तरी ४ दिवस चेंज म्हणून बरं वाटत. पण थोडेच दिवसात त्याचा कंटाळा येऊन आपलं घर बोलावू लागत. गावाला स्थायिक झाल्यापासून मुंबई, पुणे शहरात ३/४ दिवसाच्या वर राहायचं म्हणजे जीवावर येत. कधीकाळी याच गर्दीचा आपण एक भाग होतो. मुंबईला जॉबला असताना त्याच लोकल मधून जायचं, इकडून तिकडे ब्रिज क्रॉसकरून जायचं असं सगळं आठवत. पुण्यात जॉबला असताना त्याच पुण्याच्या गर्दीचा एक भाग होऊन सिग्नल चुकवायला गल्ली बोळातून २ व्हिलर काढून कशी फिरवायचो हे आठवताना हसू येत. आता मात्र आपण हे तेव्हा कसं जमवलं याच आश्चर्य वाटत. शहरात असलेल्या नातेवाईकांचे फ्लॅट खर तर ऐसपैस मोठे आहेत. तरीही आताशा गावातल्या ऐसपैस घराची सवय झाल्याने जागा लहानच वाटतात. तरीही बाकीच्यांचा मानाने आमचं गावातलं घर असून कॉम्पॅक्ट असच आहे. पण आजूबाजूला असलेलं मोकळं आवार, त्यात करत असलेली छोटीशी शेती, चार दोन भाज्या, छोटंसं सारवलेलं अंगण, ताशा वाजवल्यासारखा पत्र्यावर आवाज करत यथेच्छ कोसळणारा पाऊस, आजूबाजूला असलेले छोटे छोटे ओढे, मनसोक्त पाऊस बघत घराच्या व्हरांड्यात गरम चहा पित बसण्याचं सुख काही औरच. ४ दिवसांच्या वर बाहेर राहिलं कि हे सगळं खुणावत, बोलवत राहतं आणि मग आपसूक पाय घराकडे ओढले जातात. घरी आल्याचा जसा आपल्याला आनंद होतो तसाच आपण आल्याचा घरालादेखील आनंद होतो हे जाणवत.
आणि मग परत रुटीन सुरु होत. शाळा, कॉलेजची गडबड, डबे करण्याची घाई, अभ्यास आणि असंच सगळं. जरा सगळे आपल्याआपल्या जागी स्थिरावले कि मग निवांतपणे घरी असलेली मी मस्त एक स्पेशल चहा स्वतःसाठी तयार करून घेते आणि हे सगळं लिहायला बसते.
--धनश्रीनिवास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou