Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

द कश्मिर फाईल्स चित्रपटाच्या निमित्ताने

ध
धर्मराजमुटके
Fri, 03/18/2022 - 14:00
🗣 58 प्रतिसाद
नुकताच बहुचर्चित 'द कश्मिर फाईल्स' हा बहुचर्चित चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या अनुषंगाने माध्यमांमधे उलट सुलट बातम्या दोन्ही बाजूंनी दोषारोप आपण अनुभवले. उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यानंतर हा चित्रपट यांच्या चर्चेमुळे युक्रेन युद्धाला भारतीय माध्यमांत मिळणारे महत्त्व कमी झाले. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जे अस्वीकरण (डिस्क्लेमर) दाखविले त्यात हिंदी भाषांतराच्या अनेक चुका आढळल्याने पहिल्याच घासाला खडा लागावा असे झाले. चित्रपटाचा एकंदर कालावधी अंदाजे २ तास ५० मिनिटाचा आहे. मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला. कलाकारांबद्द्ल बोलायचे तर चिन्मय मांडलेकर आणि पल्लवी जोशींचे काम छान झाले आहे. पल्लवी जोशींनी डाव्या विचारसरणीची प्राध्यापिका सुरेख चितारली आहे मात्र याचा मुळ प्रश्नाशी थेट संबंध नाही. मात्र कशा पद्धतीने विचारपध्दती बदलायचे काम होते याचा धडा घेण्यासाठी याचा उपयोग होतो. दर्शन कुमारचा 'कृष्णा पंडीत' अनुपम खेर आणि मिथून चक्रवर्ती, पुनीत इस्सर यांचे काम ठीकठाक वाटले. का कोण जाणे पण अनुपम खेर ला आयुष्यभर विनोदी भुमिकांमधे बघीतल्यामुळे अशा प्रकारच्या भुमिकेत बघणे मला अवघड गेले. चित्रपटाच्या निमित्ताने जो गदारोळ उठत आहे त्याचे काहिही परिणाम मला चित्रपट गृहात आढळले नाहीत. दोन चार प्रेक्षक भ्रमणध्वनीवर संभाषण करण्यात मग्न होते. (चित्रपट गृहात जॅमर लावले पाहिजेत असे मला मनापासून वाटते. जर आपल्याकडे चित्रपट शांतपणे पाहण्यासाठी दोन तीन तास नसतील तर तिथे जाणेच अयोग्य.) तिथे कोणत्याही घोषणा झाल्या नाहित, कोणीही रडताना दिसले नाही. चित्रपटात एका दृष्यात पुनित इस्सर त्याच्या पत्रकार मित्राला ढकलून देतो तिथे तर पब्लिक चक्क हसलं. चित्रपटात एका ठिकाणी अनुपम खेर ३७० कलम हटवावे अशा मागणीचा फलक घेऊन उभा आहे त्या दृष्याला टाळ्या पडल्या. यास्मिन मलिक आणि फारुख अहमद दार (बिट्टा कराटे) यांच्या प्रसंगांची सरमिसळ झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात भारतीय वायुसेनेच्या चार जणांची हत्या केल्याच्या प्रकरणात यास्मिन मलिक कारागृहात आहे मात्र चित्रपटात बिट्टा त्यांच्यावर गोळ्या चालवताना दाखवतोय असे दाखविले आहे. माझी माहिती चुकीची असल्यास आणि ती दुरुस्त केल्यास मला आवडेल. चित्रपट राजकीय भुमिका, दहशतवाद्यांची मानसिकता उलगडून दाखविण्यात कमी पडतो. काश्मिरी पंडीत गपगुमान गोळ्या खातात पण अजिबात विरोध करत नाही हे मला काही केल्या गळी उतरत नाही. इथे मुंबईत १९९२ सालचे दंगे झाले होते तेव्हा भितीपोटी अगदी मच्छर न मारणार्‍या माणसांच्या हातात लाठ्या काठ्या पाहिलेल्या आहेत. भले समोरच्याला मारता येणार नाही पण आपण कोणताही मार्ग चोखाळला तरी मृत्यु अटळ आहे अशा परिस्थितीत माणूस कमीतकमी समोरच्या दोन चार शिव्या घालतो तो भितीपोटीचा आवेश देखील कोणत्याही प्रसंगात दिसत नाही. मी ज्या परिसरात चित्रपट पाहिला तो बर्‍यापैकी सुखवस्तू असल्यामुळे इथल्या प्रतिक्रिया वेगळ्या असू शकतील. चित्रपट पाहण्यासाठी येणार्‍यांत वयोवृद्धांचा टक्का लक्षणीय होता. टोपी, बुरखा अशा वेशातील व्यक्ती चित्रपट पाहायला आलेले दिसले नाही. कदाचित असा वेश धारण न केलेले मुस्लिम दर्शक चित्रपट पाहायला आलेले असूही शकतील मात्र बहुतांश माध्यमांतील गदारोळ पाहता त्यांनी हा चित्रपट पाहणे टाळले असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र मिपावर जर कोणी मुस्लिम वाचक असतील तर त्यांनी हा चित्रपट अवश्य पहावा. मुस्लिम विरोधी असे काहीही नाही. भारतातील बर्‍याच लोकांना कश्मिरी पंडीतांच्या १९९० मधील या प्रसंगाबद्दल माहिती नाही असे एकंदरीत मिडियात येणार्‍या वार्तांकनातून जाणवते. कदाचित अशा लोकांना चित्रपट पाहिल्यावर जास्त धक्का बसला असावा असा माझा अंदाज आहे. अवांतर वाचनाची नावड, व्हाटसअ‍ॅप, फेसबुकीय लेखांच्या व्यतिरिक्त कोठूनही माहिती मिळविण्याचा कंटाळा किंवा एकंदरीतच हिंदूच्या प्रश्नाला तेव्हाच्या माध्यमांमधे मिळालेले गौण अशी अनेक कारणे यामागे असू शकतील. मला चित्रपट फारसा भावला नाही याची काही कारणे देता येतील. १. सरहद संस्थेचे काश्मिरी विस्थापितांबद्द्लचे काम , त्या त्या वेळी वर्तमान पत्रांमधे येणार्‍या बातम्या यातून प्रश्नाची थोडीफार माहिती होती. पण माझ्या लहानपणी बातम्या मिळविण्याचा प्रमु़ख स्त्रोत नवाकाळ हे वर्तमानपत्र होते कारण त्यावेळच्या परिस्थीतीत तेच परवडायचे. लोकसत्ता, म.टा., नवभारत टाईम्स वाचायचा तर मोफत वाचनालयांचा आसरा घ्यावा लागायचा. त्यामुळे एकच बातमी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात कशा पद्धतीने छापून येते त्याचे विश्लेषण करणे यावर मर्यादा होत्या. त्या वयात ती कुवत देखील नव्हती. मात्र बर्‍याचशा बातम्या मुस्लिमांवर किती अत्याचार होताहेत, निरागस लहान मुले कशी रस्त्यावर आलीत हे सांगणार्‍या असत. त्यामुळे दुसरी बाजू माहित नव्हती. २. कामानिमित्त काही दिवस दिल्लीत राहणे झाले असता तिथे दोन कश्मिरी पंडित युवक भेटले होते. मिठ्ठास वाणी, सफरचंदांसारखे गोबरे गाल हे माझे त्यांच्याविषयीचे प्राथमिक मत झाले. मात्र काश्मिरबद्द्ल ते बोलायला जास्त उत्सुक नसायचे असे त्यांच्याशी बोलताना जाणवले. माझ्या आयुष्यात मी काश्मिरी माणूस तेव्हा प्रथम पाहिला. ३. या घटनांच्या दुसर्‍या बाजूबद्दल सुशील पंडीत, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या युट्युबवरील चित्रफिती पाहून साधारण ३-४ वर्षांपुर्वी माहिती झाली होती. त्यांच्या चित्रफिती माहितीपुर्ण आहेत. कदाचित तिथे जे मिळाले ते चित्रपट पाहताना गवसले नाही यामुळे चित्रपट जास्त भावला नसावा. मिसळपाव वरील 'द काश्मिर फाईल्स' या चर्चाप्रस्तावात श्री. तर्कवादी यांनी चित्रपट प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असते याचे काही पर्याय दिले होते. ते खालीलप्रमाणे आहेत. खरे तर तिथेच उत्तर दिले असते तर जास्त योग्य ठरले असते पण असो.
१) काश्मीरमध्ये १९९० साली काश्मीरपंडितांवर झालेले अत्याचार मला व्यथित करत आहेत २) क्र १ + त्यामुळे काश्मिरी अ तिरेक्यांबद्दल माझ्या मनात अतिशय राग निर्माण झाला आहे ३) क्र १ + क्र २ + असे घडण्यास प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कारणीभूत सर्व राजकारण्यांबद्दल मनात अतिशय राग निर्माण झाला आहे ४) क्र १+ क्र२ + क्र ३ + सर्वच मुस्लिम व्यक्तिंबद्दल माझ्या मनात राग व संशय निर्माण झाला आहे ५) क्र १+ क्र२ + क्र ३ + क्र ४ + या घटनेबद्दल मी व इतरांनी जमेल तेव्हा जमेल तसा सूड घ्यायला हवा असे मला वाटते.
पर्याय क्र. ४ - चित्रपट पाहताना कोणत्याही मुस्लिमांविरोधात राग निर्माण झाला नाही. चित्रपटाचा तो उद्देश नसावा. त्यामुळे पर्याय क्रमांक ५ बाद ठरतो. पर्याय क्रमांक २ चा विचार करण्यास हरकत नाही. एकंदरीत चुकीच्या पद्धतीचे राजकारण केल्यामुळे काट्याचा नायटा झाला हे मानण्यास वाव आहे. यात मी एक ६ वा पर्याय डकवू इच्छितो. कश्मिरी पंडित आणि जगभरातील ज्यू हे एकाच प्रकारच्या परिस्थितीतून गेले आहेत. मात्र ज्यूंवरील अन्यायाला ज्या प्रकारे वाचा फुटली / फोडली गेली ते भाग्य कश्मिरी पंडीतांच्या प्रश्नाच्या वाट्याला आले नाही. बहुतांश कश्मिरी पंडित समाज शिकलेला सवरलेला होता, सरकारी नोकर्‍यांमधे, क्षिक्षण क्ष्रेत्रात स्थिरस्थावर होता मात्र त्यांनी आपल्यावर होणारा अन्याय तेवढ्या तीव्रतेने जगासमोर आणला नाही असे वाटते. याउलट जगभरातील पिडीत मुस्लीम आणि ज्यूं नी आपल्या भळभळत्या जखमांच्या जाणिवा तेवत ठेवल्या आणि त्यायोगे आपले नंतरच्या आयुष्याला कलाटणी कशी देता येईल याचा विचार केल्याचे जाणवते. अर्थात ज्युंनी कितीही सवलती मिळविल्या, स्वतःचा देश मिळविला तरी युरोपियनांनी त्यांना फसवले आहे या मुद्यावर माझे मत ठाम आहे. युरोपियनांना ज्युंवरील अत्याचारांविषयी पापमार्जन करायचेच होते तर आपल्या देशातला एखादा हिस्सा तोडून देऊन तिथे त्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करु द्यायचे होते. याउलट देवाची भुमी या गोंडस नावाखाली त्यांना एक नापिक जमिन देऊन आणि अरब / मुसलमान नावाचा नविन आणि कायमस्वरुपी शत्रू देऊन आपली परस्पर सुटका करुन घेतली. आज आपल्या परिश्रमांच्या जोरावर इस्त्रायलने कितीही चांगली प्रगती केली असली तरी कायम युद्धाच्या छायेत राहून जगणे अवघड आहे. ज्यूंच्या संहार झालेल्या पिढीने आणि कश्मिरी पंडीतांनी देखील अत्याचारांचा पुरेसा प्रतिकार केलेला दिसत नाही. काही तुरळक अपवाद असतील देखील पण ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच. इथे मराठी, बंगाली, उत्तर भारतीय पंडीतांचे तेज उठून दिसते. गरज पडली तेव्हा त्यांनी शस्त्र हाती धरले, क्षत्रीयांच्या बरोबरीने क्षात्रतेज दाखविले, माध्यमे, राजकारण अशा अनेक ठिकाणी आपला प्रभाव दाखवला. कश्मिरी पंडीत या सगळ्यात कमी पडला हे सत्य नाकारुन चालणार नाही. आपल्या वाईट परिस्थितीला इतर बाह्य कारणे असतील हे नाकारण्याचा प्रश्न नाही पण आपण देखील कोठेतरी कमी पडत असू हे स्वीकारायला हवे. ५ लाख लोकांनी पळून जाण्याचा पर्याय निवडला त्यापैकी ५०० जणांनी जरी प्रतिकार केला असता तर या प्रश्नाला माध्यमांमधे वाचा फुटण्यास जास्त मदत झाली असती. चित्रपट १९०० साली झालेल्या प्रसंगांवर भाष्य करतो मात्र त्यांनतर देखील १९९८ मधे गंदरबाल, छपनारी,प्राणकोट मधे पंडितांची हत्याकांडे घडली. सन २००० साली छत्तीससिंगपुरा येथे शिखांचे हत्याकांड सन २००१ साली अमरनाथे यात्रेकरुंवरील हल्ला, किश्तवार हल्ला सन २००२ साली कासिम नगर हत्याकांड सन २००३ साली नदीमर्ग मधील हत्याकांड सन २००६ साली डोडा येथील हत्याकांड अशी अनेक प्रकरणे कश्मिर मधे सतत झालेली आहे. त्या विषयावरील लेख, चित्रफिती आंतरजालावर उपलब्ध आहेत मात्र आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक देखील नसते. आज माध्यमांमधे चर्चा होते की कश्मिरी पंडित विस्थापित झाले तेव्हा कॉंग्रेसचे सरकार नव्हते. मग विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार, भाजपाचा पाठींबा वगैरे गोष्टींवर चर्चा होतात. मात्र भाजपा ने ३७० वे कलम रद्द करुन त्यांच्या चु़कीचे / पापाचे काही प्रमाणात परिमार्जन केले आहे. बाकी पक्षांनी पण आपापला वाटा उचलावा. एका ठिकाणी कश्मिर मधे हिंदूंपेक्षा मुस्लिम जास्त मरण पावले असे माहितीच्य अधिकारात मिळालेले पत्र पाहिले. पण हे पत्र डकविणार्‍याने यात हिंदू पंडीतांचा यात काय दोष यावर काय भाष्य केलेले दिसत नाही. केवळ पिल्लू सोडून गंमत बघायची अशीच मानसिकता असावी. आता ३०-३२ वर्षांनंतर कश्मिरी पंडीतांची एक विस्थापित पिढी जवळपास संपत आलेली आहे. उरलेल्यांना जर आपल्या घरी परतायचे असेल तर त्यासाठी सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय विस्थापितांच्या पुढच्या पिढीला परत आपल्या मातृभुमीत परतायचे काही सबळ कारण मिळावयास हवे. तिथे जाऊन पुढील जीवनात प्रगतीचे मार्ग दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रयत्न सरकार आणि जनता दोघांकडून व्हायला हवे. तरच ही जखम काही प्रमाणात भरली जाईल. नाहितर चित्रपट सिनेमागृहातून पायउतार होईल, जनता उद्या नव्या प्रश्नाची चर्चा करेल आणि मुळ प्रश्न आहे तिथेच राहिल. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी जास्त सजग आणि सक्रिय होण्याची गरज आहे. आज तुमच्या दिमतीस विविध समाजमाध्यमे आहेत, देशातील बहुसंख्य जनतेत तुमच्याबद्ल कणव आहे, सरकारचा दृष्टीकोण तुम्हाला अनुकूल आहे. हीच ती योग्य वेळ आहे. तळटीप : चित्रपट आवडला नाही याचा अर्थ ज्यांनी हे भोगले आहे त्यांच्याबद्द्ल सहवेदना नाही असा अर्थ कोणी काढत असेल तर नाईलाज आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17159 views

🗣 चर्चा (58)
ह
हेमंतकुमार Fri, 03/18/2022 - 14:12 नवीन
रसग्रहण आवडले.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/18/2022 - 14:21 नवीन
आवडले सार्वजनिक ठिकाणी, तारतम्यता आणि संयमित भाषा, कशी असावी? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, हा लेख ... वाखूसा...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/18/2022 - 14:37 नवीन
धर्मराजमुटके, १९९० साली झालेली काश्मिरी हिंदू पंडितांची झालेली रक्तरंजित हकालपट्टी पहिली नाही. हाकलपट्ट्या यापूर्वीही अनेकदा झालेल्या आहेत. एका इंग्रजी लेखानुसार १९९० ची हाकलपट्टी ७ वी आहे. यापूर्वी ६ वेळा असा प्रसंग ओढवला आहे. लेखाचा दुवा : https://hindugenocide.com/islamic-jihad/seventh-exodus-of-kashmiri-hindus-4l-hindus-estranged-overnight/ काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात त्याविरोधात त्यांनी वेळोवेळी प्रतिकारही केलेला आहे. त्यासंबंधी विदा माझ्याकडे नाही. पण ज्याअर्थी इतके वेळा हाकलपट्टी झाली त्याअर्थी ते परत बस्तान बसवण्यात यशस्वी झाले, असं म्हणता येईल. मात्र ही सातवी व शेवटची हाकलपट्टी झाल्यावर त्यांना परत जाता आलेलं नाहीये. हे कशामुळे, असा प्रश्न पडतो. माझ्या मते इतर वेळेस स्थानिक मुस्लिमांशी असलेल्या मैत्रीपूर्ण नात्यामुळे पंडितांना पुनरागमन करणं शक्य झालं. मात्र अंतिम खेपेस स्थानिक मुस्लिमांनी हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला. अनेक दशकांच्या घरोब्याचे संबंध राखून असलेल्या मुस्लीम शेजाऱ्यांनी हिंदू पंडितांच्या लपायच्या जागा दहशतवाद्यांना उघड करून दिल्या. या विश्वासघातामुळे पंडित बावचळून गेले. त्यांनी प्रतिकार न करण्यामागे हे ही एक कारण असावं, असं मला वाटतं. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारत सरकार काय झोपा काढीत होतं का, हा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 03/19/2022 - 17:44 नवीन
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या विरोधात त्याविरोधात त्यांनी वेळोवेळी प्रतिकारही केलेला आहे. त्यासंबंधी विदा माझ्याकडे नाही.
तुमच्याकडेच विदा नाही असं नाही पण मी बरीच शोधाशोध करुन देखील मला जालावर काही पुरावे मिळाले नाहीत. किंबहुना चित्रपट दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन का होईना एखादा प्रसंग दाखवला असता तर सहज चालण्यासारखा होता असे मला वाटते. किंवा मी ९० च्या दशकात जे वाचन केले तिथेही काही आढळले नाहित. अशा प्रतिकाराच्या प्रसंगांची कुठे नोंद असेल तर ते वाचायला नक्कीच आवडेल.
पण ज्याअर्थी इतके वेळा हाकलपट्टी झाली त्याअर्थी ते परत बस्तान बसवण्यात यशस्वी झाले, असं म्हणता येईल.
मी याबदद्ल साशंक आहे. ज्यांची हाकलपट्टी ६ वेळा झाली तेच पुन्हा पुन्हा परत येत होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ? एवढा धीटपणा जर त्यांच्या अंगी असता तर नक्कीच प्रखर विरोध दिसला असता. त्यामुळे तुमचा मुद्दा मनास पटत नाही.
मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारत सरकार काय झोपा काढीत होतं का, हा आहे.
याच्याशी सहमत. भारत सरकार झोपा नक्कीच काढत नव्हतं कारण झोपलेल्याला जागं करता येतं. झोपेच सोंग घेतल्याची शक्यता जास्त आहे कारण असे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/18/2022 - 15:23 नवीन
>>>मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला. १०० टक्के सहमत. अतिशय संथ, रटाळ पद्धतीने सिनेमा सहन करावा लागतो. सिनेमा पाहता पाहता एखादा कविता संग्रह वाचून काढू की काय इतका तो सिनेमा कासव गतीने त पुढे सरकतो. या सिनेमाची कथा कुठून सुरु होते आणि कुठे संपते दुर्दैवाने ते नीट आकलन होत नाही. अर्थात माझं व्यक्तिगत मत. अनूपमखेर, मिथुन चक्रवती या कलाकारांऐवजी आणखी दूसरे कोणी असते तरी चालले असते असे वाटले. पल्लवी जोशीचं काम आवडलं. शेवटची पंधरा मिनिटे त्यातील जी दृश्य आहेत, ती अतिशय क्रूर आहेत. ते पाहवत नाही, तो आवाज सहन होत नाही. भयंकर पद्धतीने ती दृश्य अंगावर येतात. सिनेमा पाहिला नसता तरी चालले असते असे वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Fri, 03/18/2022 - 15:35 नवीन
विसाव्या शतकात आपल्याच देशात एका संपूर्ण समुदायाला अशा नृशंस हत्याकांडाला बळी पडावं लागलं आणि याची देशभरात कुठेही वाच्यता झाली नाही. हे भयाण वास्तव या चित्रपटाने समोर आणलं. या आधीच्या राजवटी असं काही घडलच नाही असेच शंख फुंकत होते. कलात्मक दृष्ट्या चित्रपट कसा आहे याची चर्चा मी तरी करू इच्छित नाही. चित्रपटात तपशिलात काही चुका झाल्या असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कदाचित चित्रपटीय स्वातंत्र्यामुळे तसे घडले असू शकेल. परंतु मस्तानी आणि काशीबाई यांची नृत्य जुगलबंदी दाखवण्यासारखा मुर्खपणा तरी या चित्रपटात कुठेही आढळला नाही. तथाकथित पुरोगाम्यांचा भोंगळ सेक्युलरवाद उघडकीस आणण्याचा प्रयत्न नक्की दिग्दर्शकाने केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जे नव्वद साली काश्मीरमध्ये घडले ते भारतात अन्यत्र नक्की घडू शकेल अशी धोक्याची घंटा या चित्रपटाने नक्की वाजवली आहे. सनातन धर्मियांनी, हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 03/19/2022 - 17:58 नवीन
सर्वात महत्वाचे म्हणजे जे नव्वद साली काश्मीरमध्ये घडले ते भारतात अन्यत्र नक्की घडू शकेल अशी धोक्याची घंटा या चित्रपटाने नक्की वाजवली आहे. सनातन धर्मियांनी, हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.
मी चहुबाजूने तर्क लावले तरी भविष्यात इतक्या भयंकर आणि मोठ्या प्रमाणावर गोष्टी घडतील अशी शक्यता मला तरी नगण्य वाटते. २०१४ नंतर भाजपा सत्तेत आल्यानंतर आणि ती सत्ता सलग दोन वेळा मिळविल्यानंतर हिंदूंना कमी लेखून चालणार नाही याची जाणिव सगळ्याच राजकिय पक्षांना झालेली आहे. त्यामुळे आता हिंदूंच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करेल तो पक्ष आत्मघाताकडे वळतो आहे हे नक्की.
हिंदू धर्मियांनी बुळबुळीत सहिष्णुता त्यागून कट्टरता अंगीकारण्याची वेळ आली आहे.
कट्टरता नको पण सजगता हवी आणि लोकशाहीच्या चौकटीत आपले प्रश्न सोडवायचे तर दबावगट बनविणे हे सगळ्यात महत्वाचे. कट्टरतेने शत्रुता वाढते मात्र दबाब ही गोष्ट अशी आहे की "सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही" अशी अवस्था होते. हिंदू अस्मितेचे प्रतिक म्हणून राम मंदिराचा प्रश्न हिंदू समाजाने तडीस लावला. मात्र आता केवळ मंदिरांचा अजेंडा घेऊन न बसता, शिक्षणक्षेत्रात लक्ष घालणे महत्वाचे आहे. मिपावरील साधना यांनी यावर विपूल लिखाण केले आहे. इच्छुकांनी त्यांचे जुने लेख वाचावेत.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 03/18/2022 - 16:12 नवीन
धर्मराजमुटके संतुलित रसग्रहण. तसेच मी मांडलेला प्रतिक्रियेचा मुद्दा तुम्ही आवर्जुन नमूद केलात त्याबद्दल धन्यवाद.
पर्याय क्र. ४ - चित्रपट पाहताना कोणत्याही मुस्लिमांविरोधात राग निर्माण झाला नाही. चित्रपटाचा तो उद्देश नसावा. त्यामुळे पर्याय क्रमांक ५ बाद ठरतो. पर्याय क्रमांक २ चा विचार करण्यास हरकत नाही. एकंदरीत चुकीच्या पद्धतीचे राजकारण केल्यामुळे काट्याचा नायटा झाला हे मानण्यास वाव आहे. यात मी एक ६ वा पर्याय डकवू इच्छितो.
वाचून बरे वाटले. कोणत्याही एका वा अधिक पक्षांचा राग येणे ही प्रतिक्रिया असेल तरी काहीच हरकत नाहि. काँग्रेसचा राग करा / भाजपला जवळ करा किंवा उलटे करा किंवा दोहोंचा राग धरा.. राजकीय प्राधान्य काहीही असू देत जनतेने आपसांत धर्म वा जातीच्या कारणाने मनात राग /द्वेष बाळगू नये हे महत्वाचे. सगळेच राजकारणी स्वतःला सावरण्यास समर्थ आहेत - त्यांची काळजी वहात बसायचं आपल्याला कारण नाहीच.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 03/18/2022 - 17:10 नवीन
सत्य आपण का स्वीकारत नाही .सत्य स्वीकारा . 1) भारताचे तुकडे ब्रिटिश लोकांच्या मुळे झाले.. .हे वाक्य साफ चुकीचे आहे . British पूर्व भारतात असंख्य राजे होते आणि असंख्य राज्य होती ती एकच होती असे म्हणता येणार नाही .मुघल ,मुस्लिम,मराठे ही आणि बाकी अनेक खूप राजे होते .ते एकमेकांचे पक्के शत्रू होते. भारत अफगाणिस्तान पर्यंत होता हा दावा मला कधीच सत्य वाटत नाही. अफगाणिस्तान पासून आताचा पूर्ण भारत एकच राज्य संस्थेच्या अधिकारात फक्त पुराणात च असेल real जगात कधीच नव्हता. २) ब्रिटिश आले आणि त्यांनी सर्व राजे महाराजे ,नवाब,बादशाह ह्यांना पराजित करून भारताच्या उपखंडात एक राज्य निर्माण केले भारताच्या उपखंडातील सर्व भूमीवर एकच शासक होते ते म्हणजे ब्रिटिश सर्व भू भाग एकत्र आणून केंद्रीय सत्तेच्या अधिकारात तो आणणे हे काम त्यांनी केले .ते आले नसते तर आज प्रतेक प्रांतात वेगळे राज्य आणि वेगळा राजा असतं ३), ब्रिटिश लोकांनी एकत्र करून दिलेला भू भाग . ब्रिटिश सोडून गेल्या नंतर भारतीय उपखंडातील लोकांस एक राखता आला नाही त्याला आम्ही सर्व जबाबदार आहोत कारण आम्ही नालायक आहोत.. हे सत्य स्वीकारणं ४) ब्रिटिश होते तो पर्यंत ना पाकिस्तान होता ,ना काश्मीर प्रश्न होता .ना हिंदू मुस्लिम संघर्ष होता. काश्मीर मध्ये हिंदू मुस्लिम आरामात जीवन जगत होते ५) जे काही प्रश्न निर्माण झाले ते ब्रिटिश गेल्या नंतर..ब्रिटिश आलेच नसते तर प्रतेक जिल्हा म्हणजे एक देश आज तरी झाला असतं .काश्मीर प्रश्न हा कधीच सुटणार नाही कारण . भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे ६) सामान्य लोकांनी ह्या बुध्दी भेद करणाऱ्या खेळात सहभागी होवू नये .दहा दिवसात काश्मीर प्रश्न सुटेल दुबई,सौदी , इंडनिशिया ,इराण ,इराक ह्या मुस्लिम देशात हिंदू सुखात राहत आहेत त्यांच्यावर मुस्लिम कट्टर वादी लोकांनी अन्याय केल्याची एक पण घटना ऐकण्यात नाही. त्या कश्मिर आणि मुस्लिम दहशत वाद हे भासमय कारण आहे खरे कारण. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशातील राजकीय स्वार्थ मध्ये आहे सत्य स्वीकारा नाही तर एक एक पॉइंट चा योग्य प्रतिवाद करा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/18/2022 - 18:50 नवीन
पूर्ण चुकीचा आहे. हिंदू मुस्लिम संघर्ष इतिहास वाचा
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 03/18/2022 - 18:56 नवीन
फक्त ब्रिटिश काळात हिंदू मुस्लिम संघर्ष झाला नाही . हे मी व्यक्त केले आहे .इतिहासात किंवा नंतर हा विषय नाहीं
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sat, 03/19/2022 - 16:05 नवीन
ते ही खरच आहे म्हणा कचरुबा , ब्रिटिशच एवढे दाबुन अत्याचार करत होते कि बुडाखालची आग बघायला वेळच नव्हती ,
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 03/19/2022 - 16:49 नवीन
ब्रिटिश आले नसते तर ना आता जो आहे तो भारत असता. ना लोकशाही असते. हे सत्य आहे . आताच्या भारताचे वर्णन.. फालतू लोकांनी फालतू लोकांसाठी निर्माण केलेले फालतू लोकांचे राज्य .. ही आताची भारताची राज्य व्यवस्था कशी आहे त्याचे वर्णन आहे. ब्रिटिश लोकांमुळे च लोकशाही भारताला मिळाली लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालावावलेले राज ही त्यांची व्याख्या आहे. आताची भारताची स्थिती काय आहे त्याची व्याख्या वर दिली आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 03/22/2022 - 04:09 नवीन
शशी थरुर यांचे भाषणा एकदा हेडफोन लावून ऐकून घ्या. https://youtu.be/f7CW7S0zxv4
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 03/22/2022 - 04:11 नवीन
पुरावा
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 03/22/2022 - 03:55 नवीन
खरे आहे. श्रद्धानंदानी आत्महत्या केली. केरलमधले हिंदू विष खाऊन मेले. टिळकांनी गणेशोत्सव हिंदू माउंट मेरीच्या निवडणुकीत नाचायचे म्हणून सुरू केला 1857 चे युद्ध लिहिताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते असलेले सावरकर उगाच वेळ जात नव्हता म्हणून हिंदू वादी झाले RSS तर मूर्खांची संघटना होती
  • Log in or register to post comments
स
सच्चा Fri, 03/18/2022 - 21:46 नवीन
प्रथम देश आणि राष्ट्र यांच्या संकल्पना स्पष्ट असतील तर असे प्रश्न पडत नाहीत. देश :- एखाद्या विशिष्ट प्रदेशात अथवा भूभागात राहणाऱ्या लोकांचा समूह. एका देशात अनेक राष्ट्र समाविष्ट असू शकतात. याचे अनेक उदाहरण देता येतील. युगोस्लाव्हिया - आताचे बाल्कन देश, झेकोस्लोवाकिया, सोव्हिएत रशिया, आशिया खंडातील भारत. राष्ट्र :- एकाच विचारसरणीने किंवा समान पारंपरिक संस्कृतीने एकत्र येणार नागरिकांचा समूह म्हणजे राष्ट्र. एकाच राष्ट्रात अनेक देश समाविष्ट असू शकतात किंवा एखाद्या राष्ट्राला त्यांचा देश नसणे. उदाहरण म्हणजे द्वितीय विश्वयुद्धापूर्वी पूर्ण जगभरात पसरलेले ज्यू लोक आणि त्यांनी त्यांच्या हृदयात तेवत ठेवलेली इस्राएल राष्ट्राची ज्योत. आणि भारतीय राष्ट्राचे इतिहासकालीन प्रकटीकरण म्हणजे, जेव्हा आक्रमक अलेक्सझांडर भारताच्या वायव्य भागापर्यंत आला त्यावेळी विष्णुगुप्त (आर्य चाणक्य) नंद राजाकडे मदत मागण्यासाठी गेले होते, त्यामागची प्रेरणा राष्ट्रवादच आहे. ज्यावेळी युरोप मध्यकालीन अंधारात चाचपडत होता त्यावेळी भारतीयांच्या राष्ट्र आणि देश या संकल्पना स्पष्ट होत्या. भारतात वेगवेगळे प्रदेश, देश, राज्य, जनपद (जिल्हा) समाविष्ट असले, किंवा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सम्राट, राजे यांच्या अधिपत्याखाली होता, तरी भारत हा अनादिकालापासून राष्ट्र आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/22/2022 - 04:27 नवीन
>>>भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे. 100 % सहमत. अस्मितेचे, भावनिक मुद्दे पुढे करून सत्ता मिळवायची किंवा सत्तेसाठी आपली वोट बॅंक मजबूत करायची त्यासाठी असे विषय चिघळत ठेवणे आवश्यक असते. सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष होते. लोकही आपले प्रश्न विसरुन जातात. -दिलीप बैरूत
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 03/22/2022 - 16:34 नवीन
प्राडॉ, हे विधान पाकिस्तानास लागू पडते. भारतास नाही. म्हणून मी केवळ ५० % सहमत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/23/2022 - 02:15 नवीन
मी केवळ ५० % सहमत आहे. मि पण पाकिस्तान चा अजेंडा " "सर्वश्रुत आहे, पण भारताचा तसाच आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल भारतीयांना जशी इतर राज्ये तशीच काश्मीर हवा आहे ण भारताचा अविभाज्य भाग असावं असेच वाटते .. याशिवाय ते सीमेवरसह राजय असल्याने त्यावर केंद्र सरकारचे / देशाचे जास्त बारकाईने लक्ष असावे लागते .. हि तर साधी पक्षाचा काय संबंध असे धोरण काँग्रेस ने राबवले असते तर प्रश्न कमी झाला असता.. . काँग्रेस व भाजप यांनी आता वेळ ना घालवता काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन कारण्यासाठी काही खास केले पाहिजे.. याचे अति विनाकारण राजकारण भाजपने करू नये आणि काँग्रेस ने आता तरी हा रडीचा खेळ बंद करावा लोक क्षमा करणार नाहीत
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/23/2022 - 05:05 नवीन
भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्ता हवी असेल तर राज्यकर्त्यांना काश्मीर प्रश्न दोघांना पण ज्वलंत च हवा आहे. हे विधान भारताच्या राजकीय स्थिती बद्दल संपूर्ण अज्ञान दाखवते इतके म्हणून मी खाली बसतो.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 03/23/2022 - 07:57 नवीन
लोकसभेच्या निवडणुकीत तर भारतात काश्मीर,मुस्लिम ,मंदिर,मशीद हेच विषय असतात.. . किती तरी पक्षांचे अस्तित्व च त्या विषयावर अवलंबून आहे. जास्त बुद्धीला ताण नको त्या मुळे जास्त पाठी जायला नको. मागची निवडणूक . झाली ती एकच पॉइंट वर खाली. Surgical strike, crpf च्या शुर जवानांवर झालेला हल्ला,राम मंदिर,बाबरी मशीद,मुस्लिम दहशतवाद . हेच तर विषय होते. CRPF वर जो हल्ला झाला आणि अनेक जवान मृत्यु मुखी पडले त्याचे गुन्हेगार कोण हे अजून पण लोकांस माहीत करून दिले नाही त्या गुन्हेगारांना शिक्षा तर खूप लांबची गोष्ट झाली. निवडणूक संपली की हे सर्व मुद्दे राजकीय पक्ष कचऱ्यात टाकतात . दुसरी निवडणूक येई पर्यंत भारतातील प्रचंड गरिबी, भारतात असलेले लो क्लास infrastructure, बेरोजगारी,विजेचा प्रश्न,महागाई,भ्रष्ट कारभार हे कधीच निवडणुकीत नसतात. काश्मीर,मुस्लिम,राम मंदिर, बाबरी मशीद हे पॉइंट मात्र निवडणुकीत असतात च असतात.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Fri, 03/25/2022 - 19:52 नवीन
ब्रिटिश काळात लोकशाही नव्हती. इंग्रज मतांसाठी लाचार नव्हते त्यामुळे मलातरी वोटेबँक लोकशाहीपेक्षा रामराज्य किंवा शिवशाहीत राहायला आवडेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/18/2022 - 17:18 नवीन
उद्या पाहणार आहोत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/18/2022 - 18:32 नवीन
रसग्रहण आवडले ! मात्र ज्यूंवरील अन्यायाला ज्या प्रकारे वाचा फुटली / फोडली गेली ते भाग्य कश्मिरी पंडीतांच्या प्रश्नाच्या वाट्याला आले नाही. इथे फक्त कश्मिरी पंडीतांच्या जागी मी हिंदू जनसमुदाय म्हणणे योग्य समजेन. हिंदुंच्या जितक्या कत्तली झाल्या आहेत आणि त्यांच्या स्त्रियांची जितकी विटंबना करण्यात आलेली आहे ती जगात इतर कोठेही पहावयास मिळत नाही, तसेच हा नरसंहार आणि स्त्रियांची विटंबना आज देखील केली जाते आणि त्या बद्धल माध्यमे मूग गिळुन बसतात. Image removed. या चित्रपटामुळे लिब्रांडु मंडळीच्या बुडास स्लोन्स बाम लागुन पार आग आग झाली ते पाहुन मला विशेष आनंद झाला ! :))) त्यांच्या बुडास आग लागण्याने अप्रत्यक्षपणे चित्रपटाची न भूतो न भविष्यति अशी प्रसिद्धी झाली आणि हिंदू जनसमुदायास चित्रपट पाहुन विषय जाणुन घेण्याची ओढ निर्माण झाली. आत्ताच एक व्हिडियो पाहिला तो इथे देऊन जातो :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "No nation has friends only interests." - Charles de Gaulle
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 03/19/2022 - 05:02 नवीन
>>इथे फक्त कश्मिरी पंडीतांच्या जागी मी हिंदू जनसमुदाय म्हणणे योग्य समजेन. हेच म्हणतोय.जसे महाराष्ट्रातल्या सर्वांना सरसकट मराठा असे संबोधण्यात येते तसे काश्मीर मधील हिंदुंना पंडीत म्हणतात असे वाचले होते.पण पंडीत ह्या शब्दामुळे केवळ ब्राह्मण असे सूचित होत असल्याने वा मुद्दामुन तसे बिंबवण्याचा प्रयत्न केले जात असल्याने ब्राह्मण विरोधी अपप्रवृत्ती मुद्दामुन ह्या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयन्त करतात. काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 03/19/2022 - 12:09 नवीन
कानडाऊ योगेशु, तुमच्याशी सहमत आहे. काश्मीर हे अध्ययनाचं केंद्र असल्याने तिथले सर्वसामान्य लोकंही बहुश्रुत असावेत. म्हणून उर्वरित भारत सरसकट सगळ्या काश्मिरींना पंडित म्हणंत असावा. असा माझा तर्क आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/23/2022 - 01:57 नवीन
काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल. १००% विवेक अग्निहोत्रि किवा सुशिल पन्डित य सर्खे हि हेच म्ह्न्तात ... येथे प्रशन कश्मिरि हिन्दु अनि कश्मिरि मुस्ल्मन्न ( जिहदि अनि जिहदि नसलेले!) यन्चा आहे पन कय आहे हा चित्र्पत मह्न्जे "प्रोपोगन्डा" आहे अशि टकळी चलवल्यन्न त्यन्च्या टूल किट मध्ये सन्देश आहे कि यात पन जात अनुन हिन्दुन्च अन्खिन बुधिभेद करा अनि मह्नुनच मग झुन्द कि कश्मिर असले वाद मुद्द्मुन निर्मन केले जातात
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/23/2022 - 01:57 नवीन
काश्मीर पंडीत ऐवजी काश्मीर हिंदु म्हणणे जास्त सयुक्तीक ठरेल. १००% विवेक अग्निहोत्रि किवा सुशिल पन्डित य सर्खे हि हेच म्ह्न्तात ... येथे प्रशन कश्मिरि हिन्दु अनि कश्मिरि मुस्ल्मन्न ( जिहदि अनि जिहदि नसलेले!) यन्चा आहे पन कय आहे हा चित्र्पत मह्न्जे "प्रोपोगन्डा" आहे अशि टकळी चलवल्यन्न त्यन्च्या टूल किट मध्ये सन्देश आहे कि यात पन जात अनुन हिन्दुन्च अन्खिन बुधिभेद करा अनि मह्नुनच मग झुन्द कि कश्मिर असले वाद मुद्द्मुन निर्मन केले जातात
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2022 - 15:53 नवीन
आताच हा चित्रपट पाहून आलो. अत्यंत भयानक व सुन्न करणारा अनुभव आहे हा. काही घटना दिग्दर्शकाने अतिरंजित स्वरूपात चित्रित केल्या असाव्या, पण अशा घटना घडल्या हा इतिहास आहे. चित्रपटात काही ऐतिहासिक चुका आहेत. जानेवारी १९९० मध्ये रेडिओवर भारत-पाकिस्तान सामन्याचे धावते प्रक्षेपण ऐकविण्यात येते. पण भारत-पाकिस्तान मालिका डिसेंबरमध्येच संपली होती व जानेवारीत एकही सामना झाला नव्हता. जानेवारी १९९० नंतरच्या काळात फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री असल्याचे दाखविले आहे. परंतु त्यांनी १९ जानेवारी १९९० या दिवशीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 03/21/2022 - 15:44 नवीन
काही घटना दिग्दर्शकाने अतिरंजित स्वरूपात चित्रित केल्या असाव्या, नाही यापेक्षा भयानक अत्याचार झालेले आहेत. माणसाचे क्रौर्य किती असू शकते हे अशा अनेक घटनांतून दिसून येते. निर्भया प्रकारांत त्या मुलीबद्दल कोणताही राग असूया द्वेष नसताना ज्या तर्हेने तिच्या वर नृशंसपाने अत्याचार केले गेले ते पहा. ज्या समाजात लहानपणापासून कुर्बानी साठी बकरा मान कापून तडफडताना मुलं पाहत राहतात आणि हेच हलाल आहे हे शिकवले जाते ते पाहून मुलांचे मन मरते नि आणि सहज रक्तपात करण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. याशिवाय आधुनिक शिक्षणाऐवजी मदरशात काफिरांचे शिरकाण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे असेच शिकवले जात असेल तर येणारी अख्खी पिढी काय मनोवृत्ती ठेवणार आहे. सर्व मदरसे सरकारने अधिग्रहित करून त्याजागी मुलांना फुकट आधुनिक शिक्षण देणे आवश्यक हे तरच भविष्यात असली सडकी पिढी निर्माण होणार नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/19/2022 - 16:16 नवीन
यातील पल्लवी जोशीची भूमिका ही बरखा दत्त, वृंदा कराट व राधिका रॉय यांचे एकत्रित चित्रण असावे.
  • Log in or register to post comments
स
सुखी Sun, 03/20/2022 - 17:31 नवीन
हे पहा
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 03/21/2022 - 16:05 नवीन
व अतिशय संतुलीत लेख. आवडला.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 03/22/2022 - 08:37 नवीन
मुस्लिम द्वेष निर्माण करणाऱ्या विचारा पेक्षा हिंदू हिताचा जो विचार करत असेल तर त्याला डोक्यावर घेवू १) हिंदू सर्व कोणत्या ही जाती चे .. ह्यांची आर्थिक स्थिती पाच वर्षाच्या आत आम्ही पूर्ण सुधारू अशी योजना आमच्या कडे आहे. २)एक पण हिंदू भीक मागताना दिसणार नाही,एक पण हिंदू बेघर असणार नाही..अशी योजना असणारा राजकीय पक्ष असेल तर त्याला डोक्यावर घेवू. ३)एका पण हिंदू चा मुलगा बेरोजगार नसेल,एका पण हिंदू चा मुलगा शिक्षण पासून वंचित नसेल असा भारत आम्ही निर्माण करू . असा राजकीय पक्ष हवा. ४)देशात न्याय लगेच मिळेल ,पोरी बाळी सुरक्षित असतील पण स्वैर नसतील. ह्याची हमी देणारा राजकीय पक्ष हवा.... भारतात असणारे हिंदू वादी राजकीय पक्ष. मुस्लिम आपले दुश्मन आहेत त्यांच्या शी लढा. हे ब्रीद घेवून आहेत.. बाकी हिंदू उपास Mari नी मेले तरी त्याचे ह्यांना देणेघेणे नाही.. सत्ताधारी पक्षाच्या लालची हिंदू नी बाकी सामान्य हिंदू चे आर्थिक शोषण केले तरी भारतातील हिंदू वादी राजकीय पक्षांना काही देणे घेणे नाही.. हिंदू भिकारी झाला तरी भारतातील हिंदू वादी राजकीय पक्षांना काही देणे घेणे नाही. Selected हिंदू मात्र जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आले की बाकी भूक मरी नी ग्रस्त हिंदू नी मात्र मुस्लिम लोकांशी लढायचे. आणि जन्म भर तुरुंगात राहायचे. डोळे उघडा .. खूप मोठे षडयंत्र आहे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/23/2022 - 02:03 नवीन
मग भौ कोन्त पक्श ? क तुम्हि काढ्ताय नविन?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 03/23/2022 - 10:29 नवीन
अमेरिका मध्ये कसे कोणत्या ही देशातील सक्षम व्यक्ती तेथील नागरिकत्व असेल तर निवडणूक जिंकून सरकार मध्ये सामील असतो. किंवा प्रशासनात पण असतो. तसे भारतात पण जगातील सक्षम लोकांस प्रशासन आणि सरकार मध्ये सामील होता आले पाहिजे. जागतिक talent भारतात पाहिजे. आपल्याच अती सामान्य बुद्धी च्या लोकांना फक्त ते इथे जन्म घेतला आहे म्हणून डोक्यावर बसवण्यात काही अर्थ नाही. अमेरिकेत आहे ना भारतीय वंशाची उप राष्ट्र अध्यक्ष
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 03/24/2022 - 03:40 नवीन
अमेरिका मध्ये कसे कोणत्या ही देशातील सक्षम व्यक्ती तेथील नागरिकत्व असेल तर निवडणूक जिंकून सरकार मध्ये सामील असतो.>>> पुरावा?
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/24/2022 - 04:11 नवीन
काहीही लिहितात १८८. ओबामाचा जन्म अमेरिकेत झाला नाही म्हणून त्याला राष्ट्राध्यक्ष होऊ देऊ नका म्हणून ट्रम्प कितीतरी दिवस ओरडत होता. No Person except a natural born Citizen, or a Citizen of the United States, at the time of the Adoption of this Constitution, shall be eligible to the Office of President
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 03/24/2022 - 03:58 नवीन
मायला ... कायपण लिवतात लोक .. शेंडा ना बुडखा ... जरा वाचत चला ... गृहपाठ करत जा .. .ज्ञान वाढते ...
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 03/24/2022 - 14:21 नवीन
समर्थ रामदासांनी म्हटले आहे:
अभ्यासोनी प्रकट व्हावे | नाहीतर झाकोनी असावे | प्रकटोनी नासावे | बरे नोहे ||
पण अर्थात, इथल्या टपलू, पपलू, इत्यादींना हे मान्य नाही, हे ते वारंवार दाखवून देतात.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 03/22/2022 - 08:56 नवीन
कट्टरता नको पण सजगता हवी आणि लोकशाहीच्या चौकटीत आपले प्रश्न सोडवायचे तर दबावगट बनविणे हे सगळ्यात महत्वाचे.
दंडवत , बाकी काही बोलत नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 03/24/2022 - 16:06 नवीन
चित्रपटाने २०० कोटीचा टप्पा पार केला ! समस्त हिंदू जनतेचे या बद्धल अभिनंदन! :) अनेक रिकाम्या डोक्यांनी अनेक वेगवेगळी वक्तव्य आत्ता पर्यंत केली आहेत... यातील एका वक्तव्याला सगळ्या भुक्कड प्रसार माध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिली. काश्मिर फाईल्स समाजात फूट पाडणारा चित्रपट आहे किंवा फूट पाडणारे चित्रपट टाळावेत. यावर एक सुंदर शेर वाचण्यात आला तो इथे देत आहे :- उन्होंने कत्लेआम किया नफरत न फैली... हमने फिल्म दिखाई तो नफरत फैलने लगी...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lalana... :- Me Vasantrao
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/24/2022 - 16:09 नवीन
शेर बद्दल धन्यवाद ...
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/24/2022 - 17:00 नवीन
फारच स्फुरण चढले असेल तर जा लाठ्या काठ्या घेऊन काश्मिरात बदला घ्यायला. कधी निघता?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/25/2022 - 14:27 नवीन
आग्या१९९०, तुमचा सल्ला उत्तम आहे. फक्त तो काश्मीर सोडून उर्वरित भारतातच अंमलात आणायला हवाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/25/2022 - 14:44 नवीन
उपहास होता हो तो. बाहेर कोण आलंय हे बघण्यासाठी घराचा दरवाजा उघडताना पाठीमागे लपवण्यापलिकडे लाठ्याकाठ्यांचा उपयोग झाला नसावा ह्या तोंडाळ आर्मीकडून.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/25/2022 - 15:32 नवीन
आग्या१९९०, आता आलं लक्षांत ! धन्यवाद. गफलतीबद्दल खेद आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/25/2022 - 15:19 नवीन
@आग्या१९९० आपण काश्मीरला न जाता इथे बसून उंटावरून शेळ्या हाकता आहातच ना? मागच्या प्रतिसादात मी लिहिलेले कशिमर साठी काय चालू आहे तेवढं तरी वाचून घेतलं का?
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 03/25/2022 - 16:01 नवीन
मोदि द्वेषी आणि भाजपा विरोधी प्रतिसाद लिहितात त्यान्चे खुप खुप आभार. कारण त्याना उत्तर लिहिणारे त्यामुळे माहीती पुरवतात. चर्चा केल्यामुळे सध्याचे केन्द्र सरकार काय आणि किती काम करते आहे त्याची माहीती मिळते.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा