कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ३
आधीचे भाग :
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - २
सकाळी दहा-सव्वा दहाच्या सुमारास जाग आली ती गाईंच्या हंबरण्याने.
रात्री मेन गेट कडी लावून बंद करायचे राहून गेल्याने बंगल्याच्या आवारात काही गाई आणि वासरे शिरली होती.
मामाने मोठ्या हौशीने कंपाउंडच्या आतल्या बाजूने वाफे बनवून काही झाडांची रोपे लावली होती त्यांची वाट लागू नये म्हणुन लगबगीने बाहेर येऊन त्या गुरा-ढोरांना पिटाळून लावले.
भावाने ह्या कामासाठी बाहेर पडायला टंगळ-मंगळ केली असली तरी गुरांना हुसकावतानाचा माझा फोटो मात्र तत्परतेने टिपला 😀
उठायला चांगलाच उशीर झाला होता आणि दोघांच्याही अंगात प्रचंड आळस भरला असल्याने आज कुडाळला जाण्याचा बेत रद्द करण्यात आला. मग घरातच मिल्क पावडर वापरून बनवलेल्या चहा सोबत बाकरवडी-चिवडा अशी हलकीशी पोटपूजा उरकून घेतली.
ठाण्याला रहाणाऱ्या मामाने गावी आपले हक्काचे घर असावे अशा उद्देशाने बांधलेल्या ह्या बंगल्यात कायम स्वरूपी कोणी राहत नसले तरी घर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे.
जाता येतानाच्या प्रवासात पाचेक दिवस इथेच मुक्काम करायचा विचार असल्याने येताना भरणे नाक्यावरून आम्ही फ्रोझन पराठ्यांची पाकीटे आणलेली होती, फक्त भाजी घरी बनवावी किंवा हॉटेलमधून पार्सल आणावी लागणार होती.
एकच्या सुमारास भावाने कोळंबे फाट्यावर जाऊन शेव भाजी पार्सल आणल्यावर तव्यावर पराठे भाजून जेवण झाल्यावर तीन वाजेपर्यंत थोडी झोप काढली.
सकाळी अंघोळीला फाटा दिला होता त्यामुळे समुद्रावर जाऊन डुंबण्याच्या विचाराने साडेतीन वाजता तिथून पंधरा-सोळा की. मी. वर असलेल्या 'पूर्णगड' किल्ल्या जवळच्या गावखडी बीच वर जायला निघालो.
पूर्णगड गाव आणि गावखडी गावाला जोडणारा मुचकुंदी खाडिवरील पूल ओलांडला की लगेच उजव्या बाजूला सुरूच्या बनांमागे लपलेला हा बीच फारच छान आहे.
ह्या भागात पर्यटकांची वर्दळ नगण्य असल्याने इथे अजिबात गर्दी नसते, त्यामुळे हा समुद्रकिनारा पण एकदम स्वच्छ आहे.
उजवीकडे मुचकुंदी नदी समुद्राला येऊन मिळाल्याने तयार झालेली खाडी तर समोरच्या टेकडीवर गर्द झाडीत लपलेला पूर्णगड किल्ला.
गावखडी बिचचा 360 अंशांतला छोटासा व्हिडीओ.
पाच-सव्वा पाच पर्यंत येथेच्छ समुद्रस्नान झाल्यावर तिथून निघालो आणि हाताशी वेळ होता म्हणुन परतीच्या रस्त्यावर पावस बुद्ध विहाराच्या फाट्यावर उजवीकडे वळून मावळंगे गावात राहणाऱ्या आईच्या मावस भावाकडे एक धावती भेट द्यायला निघालो.
पावस, कोळंबे ह्या ठिकाणी आधीही येणे झाले असले तरी मी अद्याप मावळंग्याला ह्या मामाकडे कधीच आलो नव्हतो, पण बरोबर असलेल्या भावाचे इथे बऱ्याचदा येणे झाले असल्याने मुख्य रस्त्यावरच्या गोगटे स्टॉपवर बाईक उभी करून अधे मधे चिऱ्याच्या पायऱ्या असलेल्या उताराच्या रस्त्याने दोन अडीचशे मिटर चालत खाली येऊन मामाच्या घरी पोचण्यास काही अडचण आली नाही.
तिथे पोचल्यावर मात्र इतक्या वर्षांत इथे का नाही आलो ह्याचा पश्चाताप झाला.
मस्त मोठठे कौलारू घर, घराच्या मागे नारळ, सुपारी, आंबे, फणसांची बाग आणि बागेच्या मागे खाडी. दिलखुष नजारा एकदम!
चहा पाणी झाल्यावर मागे बागेत फेरफटका मारायला निघालो तेव्हा नुकताच सूर्यास्त झाला होता. खाडी किनाऱ्यावरची काही नारळाची झाडे मामाने एका 'माडी' विक्रेत्याला कराराने दिली आहेत त्याचा मनुष्य संध्याकाळची माडी झाडावरून उतरवायला आला होता.
त्याच्या कडून नुकत्याच उतरवलेल्या मडक्यातून एक तांब्याभर माडी घेऊन प्यायल्यावर अस्सल माडीची चव कशी असते ते समजले आणि आत्तापर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार पाच वेळा माडी विक्री केंद्रावर पांढऱ्या रंगाचा, गोडसर चवीचा जो पाणचट द्रवपदार्थ प्यायला होता ती खरी माडी नव्हतीच हा साक्षात्कारही झाला
मग थोडावेळ झोपाळ्यावर बसून गप्पा टप्पा झाल्यावर (कधी नाही ते) साडे आठ वाजताच कोकणस्थी पद्धतीचे साधेच पण रुचकर जेवण करून आम्ही मुक्कामी जायला निघालो.
साडे नऊ वाजता मुक्कामी परतल्यावर खाऱ्या पाण्यात डुंबणे झाले असल्याने शॉवर घेऊन कालच्या प्रमाणेच गच्चीत जाऊन बसलो आणि उद्याचा कार्यक्रम ठरवायला घेतला.
आज बाहेर पडायलाच उशीर झाल्याने पूर्णगड किल्ला पाहता आला नव्हता त्यामुळे उद्या किल्ला आणि पावसच्या मंदिरात जायचे ठरवले आणि थोडावेळ गच्चीत टाईमपास करून मग साडे अकराच्या सुमारास झोपायला खाली आलो.
सकाळी साडे नऊच्या आसपास आम्ही उठलो आणि चहा-पाणी झाल्यावर कोळंबे फाट्यावरच्या एका स्नॅक्स कॉर्नर मध्ये जाऊन ग्रील्ड सँडविच आणि कॉफी असा नाश्ता करून तिथूनच दुपारच्या जेवणात पराठ्यांबरोबर खायला एक मिसळ आणि एक्सट्रा उसळ घेऊन घरी परतलो. आरामात अंघोळी-पांघोळी आणि जेवण झाल्यावर दुपारी दोनच्या सुमारास पूर्णगड किल्ल्यावर जायला निघालो. पूर्णगडावर जाण्यासाठीचा रस्ता थोडा फसवा आहे. किल्ला रस्त्याच्या उजव्या बाजूच्या टेकडीवर असला तरी पावस - अडीवरे रस्त्यावर गावखडी पुलाच्या अलीकडे मुख्य रस्त्यावरून डावीकडे खाली उतरणाऱ्या उताराच्या रस्त्यावरून गेल्यावर पुलाच्या खालून उजवीकडे जाणाऱ्या खाडी किनाऱ्यावरच्या रस्त्याने आपण पूर्णगड गावात पोचतो. टेकडीच्या उतारांवर पूर्णगड गाव वसलेले आहे आणि गावातल्या बाईक जाऊ शकेल अशा अरुंद चढणीच्या रस्त्यावरची देवळे, घरे मागे टाकत काही मिनिटांत आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर येऊन उभे ठाकतो. गडाच्या वाटेवरची देवळे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी एक छोटेसे मारुती मंदीरही आहे पण ते बंद होते.
सरकारने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून किल्ल्याची डागडुजी करून तो पर्यटकांना भेटी साठी खुला केल्यावर लगेचच आम्ही तिथे पोचलो होतो.
महाराष्ट्रातल्या अनेक जलदुर्गांपैकी एक असलेल्या आणि अतिशय प्रेक्षणीय अशा ह्या पूर्णगड किल्ल्याचा दुर्दैवाने लिखित इतिहास उपलब्ध नाही त्यामुळे त्याचे निर्माण आणि नावा बद्दल ठोस माहिती मिळत नाही.
सर्वसामान्यपणे हा किल्ला शिलाहरांच्या काळात प्रथम बांधला गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची पुनरबांधणी केली. पुढे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी त्याचा विस्तार केला आणि पुढच्या काळात तो पेशव्यांकडून इंग्रजांकडे गेला असे मानले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले बांधले त्यातला हा शेवटचा किल्ला, त्यामुळे महाराजांचे किल्लेबांधणीचे काम हा किल्ला बांधून पूर्ण झाले म्हणुन ह्याचे नाव पूर्णगड.
खरे खोटे देव जाणे!
पूर्णगडाचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.
एका बाजूला रस्ता, एका बाजूला विशाळगडापाशी उगम पाऊन पूर्णगडाच्या पायथ्याशी सागरात विलीन होणारी मुचकुंदी नदी (अशाप्रकारे दोन गडांना जोडणारी ही एकमेव नदी असावी बहुतेक), एका बाजूला अथांग समुद्र तर मागे गर्द झाडी.
ह्या किल्ल्याचे आणखीन एक (विचित्र) वैशिष्ट्य म्हणजे आत विहीर किंवा पाण्याचा अन्य कुठलाही स्रोत नाही.
पण काहीही असले तरी चिऱ्याच्या दगडांनी बांधलेला हा किल्ला आहे मात्र प्रेक्षणीय! आणि नुकतेच केलेले डागडुजीचे कामही त्याच्या सौन्दर्याला बाधा न आणता सफाईदारपणे केले आहे.
पूर्णगड किल्ल्याचे काही फोटोज
किल्ल्याचा कानाकोपरा नीट बघत त्यावरून दिसणारी विलोभनीय दृष्ये डोळ्यात साठवून घेत बराच वेळ तिथे व्यतीत करून आम्ही साडेचारच्या सुमारास खाली उतरलो आणि तिथून अगदी जवळ असलेल्या गावखडी बीचवर आलो. कालच्या प्रमाणे आज पाण्यात न डुंबता थोडावेळ इथे वाळूवर बसून टाईमपास केल्यावर परतीच्या मार्गावरील पावस इथल्या स्वामी स्वरूपानंद मंदिराकडे जायला निघालो.
मंदिरात पोचलो तेव्हा सहा वाजत आले होते. कोविड परिस्थितीमुळे विश्वस्त मंडळातर्फे समाधी मंदिर आणि आसपासच्या वास्तू बंद ठेवण्यात आल्या होत्या पण विठ्ठल रखुमाई मंदिरात बाहेरून दर्शन घेता येत होते ते ही सहा वाजता बंद होणार होते त्यामुळे आधी तिथे जाऊन जाळीच्या बंद दारातून दर्शन घेतले.
ह्या मंदिरात आधीही येणे झाले होते आणि आम्ही दोघेही सश्रद्ध असलो तरी अध्यात्मिक वृत्तीचे नसल्याने बाकीची ठिकाणे बंद असली तरी काही गमावल्यासारखे वगैरे वाटले नाही.
मंदिर परिसरात असलेल्या बाकड्यांवर थोडावेळ बसलो. ह्या मंदिराचा परिसर खूप मोठा आणि निसर्गरम्य असून तिथे विलक्षण शांतता मात्र नक्कीच अनुभवता येते, प्रसन्न वाटतं एकदम.
सात वाजता तिथून निघून कोळंबे फाट्यावरचे एक बार अँड रेस्टोरंट गाठले. दोन दोन पेग झाल्यावर तिथेच जेवण करून साडे नऊला मुक्कामी परत आलो.
थोडावेळ गच्चीत बसून घरच्यांशी फोना फोनी झाल्यावर साडे दहा अकराच्या सुमारास झोपून गेलो.
क्रमश:
सकाळी साडे नऊच्या आसपास आम्ही उठलो आणि चहा-पाणी झाल्यावर कोळंबे फाट्यावरच्या एका स्नॅक्स कॉर्नर मध्ये जाऊन ग्रील्ड सँडविच आणि कॉफी असा नाश्ता करून तिथूनच दुपारच्या जेवणात पराठ्यांबरोबर खायला एक मिसळ आणि एक्सट्रा उसळ घेऊन घरी परतलो. आरामात अंघोळी-पांघोळी आणि जेवण झाल्यावर दुपारी दोनच्या सुमारास पूर्णगड किल्ल्यावर जायला निघालो. पूर्णगडावर जाण्यासाठीचा रस्ता थोडा फसवा आहे. किल्ला रस्त्याच्या उजव्या बाजूच्या टेकडीवर असला तरी पावस - अडीवरे रस्त्यावर गावखडी पुलाच्या अलीकडे मुख्य रस्त्यावरून डावीकडे खाली उतरणाऱ्या उताराच्या रस्त्यावरून गेल्यावर पुलाच्या खालून उजवीकडे जाणाऱ्या खाडी किनाऱ्यावरच्या रस्त्याने आपण पूर्णगड गावात पोचतो. टेकडीच्या उतारांवर पूर्णगड गाव वसलेले आहे आणि गावातल्या बाईक जाऊ शकेल अशा अरुंद चढणीच्या रस्त्यावरची देवळे, घरे मागे टाकत काही मिनिटांत आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर येऊन उभे ठाकतो. गडाच्या वाटेवरची देवळे.
+१
मला पण 😀