दिवाळी अंक २०२१ : भूक
मावळत्या सूर्यानं फेसाळलेल्या ढगांवर आपला तांबूस रंग उधळला होता. पानगळ झालेल्या झाडांची उरलीसुरली पानं घेऊन, वारा ढगांना सैरभैर करू पाहत होता. वाळलेल्या झाडाच्या शेंड्यावर दिमाखात बसलेली कोकिळा मात्र वादळालाच कवेत घेऊ पाहत होती. अलकाची कुऱ्हाड अजूनही थांबायचं नाव घेत नव्हती. सपसप सपसप करत ती त्या वेड्या बाभळीच्या खांडोळ्या करत सुटली होती. उसाच्या गंडोऱ्या व्हाव्यात अगदी तितक्याच सहजतेने वेडीबाभळं छाटली जात होती. घामानं ओलेचिंब झालेल्या अलकाच्या अंगावर चिकटलेली माती घामातून निथळत होती. क्षितिजावरला सुर्य कुऱ्हाडीचा वेग वाढवत होता. आपलं पिल्लू आपली वाट पाहात असेल, भुकेनं ते व्याकूळ झालं असेल, या विचाराने अलका मनातल्या मनात तळमळत होती. लाकडावर एकेक घाव टाकत होती. शेवटी अलकानं सूर्यास्तापूर्वी मोळीभर लाकडांचा फडशा पाडला. जवळच असलेल्या वेलरबराच्या वेलीचा एक तुकडा काढला. मोळीला घट्ट पीळ मारला. मोळीला डोकं देत तिने दोन मणाची मोळी एका झटक्यासरशी डोक्यावर उचलली. झपाझप पावलं टाकत ती आता गावाच्या दिशेनं चालू लागली. मोळीच्या ओझ्याने तिची मान डुलत होती.
'गौरवला उगाचच यंदा शाळंत घाडलं'असं ती मनाशी पुटपुटत स्वत:लाच दोष देत होती. भुकेने व्याकूळ झालेला त्याचा चेहरा तिला दिसत होता. कितीदा तरी गौरव अलकाची वाट पाहात दारातच झोपी जायचा. आजही तो आपल्या आईची आतुरतेने वाट पाहात बसला होता. त्याने आज अलकाला गरम गरम बाजरीची भाकरी आणि कढी करायला सांगितली होती. अलकानंही सकाळीच पावसेबाईंकडून वाटीभर दही आणून ठेवलं होतं. तलाठीन बाईंकडून वीस रुपये मिळाल्यावर ती शेरभर बाजरी दळून आणणार होती.
अलका नदी ओलांडून गावात येईपर्यंत काळोख दाटला. काळ्याकुट्ट अंधारात गावातील विजेचे दिवे तेवढे झगमगत होते. उकाडा असह्य झाला होता. झाडं स्तब्ध होती. अंधारातून वाट काढत अलका गावात पोहोचली. गावात पोहोचताच मोकाट कुत्र्यांनी तिचं स्वागत केलं. कधी एकदा मान मोकळी होईल असं तिला झालं होतं. मागच्या दाराने जाऊन तिनं उभ्यानेच परसात धाडकन मोळी टाकली. मोळीचा आवाज एकताच तलाठीण बाईंनी आवाज दिला,
"अगं ये.... आलके.... .. हाळूच टाक जरा....मोडशील काही"
साडीच्या पदरानं आपल्या कपाळावरील घाम पुसत तिनं आपली मान दोन-चारदा फिरवून मोकळी केली आणि सावकाश खाली बसत म्हणाली,
"नई गं माय... पटांगणात टाकली, ताम्बर पाणी दि गं माय .... लय घसा कोरडा पडलाय."
"घर काय लई लांब होतं व्हय गं, तुझं आता,"
असं म्हणत बाईंनी पाण्याचा तांब्या अलकाच्या जवळ आणून मांडला. अलकानं मान वर करून घटाघट घटाघट करत अख्खा तांब्या रिता केला. पण अजूनही तिची तहान गेली नव्हती. पुन्हा पाणी मागण्याचं धाडस आता ती दाखवू शकली नाही. बाईंनी एकदा तिच्याकडे आणि एकदा ताब्यांवरून नजर फिरवली. अलकानं आपला तांब्या नेहमी प्रमाणे स्वच्छ करून हौदावर ठेवला. अलका आता पैशांची वाट पाहत बसली होती. बराच वेळ झाला, पण तलाठीनबाई अजूनही बाहेर आल्या नव्हत्या. अगोदरच उशीर झाल्याने अलकाला गौरवची काळजी वाटू लागली होती. आपलं बाळ आजही उपाशीच झोपेल, या भीतीने तिने न राहून पुन्हा एकदा बाईंना आवाज दिला आणि आधीच पैसे मिळत नसल्याने चिडलेल्या तलाठीनबाईंचा पारा चांगलाच चढला.
"काय गं, तुला एवढा दम निघत नाही का? आम्ही काय पळून जाणार आहोत का तुझे पैसे घेऊन?"
"नई, तसं नई "
"नाही, तू जाच आता .. ... उद्या ये ....आज पैसे नाही माझ्याकडं."
आता मात्र अलकाला दरदरून घाम फुटला आपण उगाचच घाई केली असं तिला वाटलं. त्यातून कसबसं तिनं स्वतःला सावरलं. आपले अनावर झालेले अश्रू आवरत ती म्हणाली.
"नई, थांबते मी , पण असं करू नका. म्हां गौऱ्या उपाशी हाई ओ"
"तुमच्यासारख्या लोकांना हीच भाषा समजते... आता पटकन ऊठ आणि निघ येथून.... आणि तुला लगेचच पैसे लागत असतील, तर उचल तुझी मोळी आणि चालती हो."
तलाठीनबाईंचे हे अतिटोकाचे शब्द अलकाच्या हृदयात बाणासारखे घुसले. असंख्य विंचवांनी डंख मारावा अशा वेदनांनी तिचं हृदय पिळवटून निघालं. अलकानं आलेला हुंदका दाबत केविलवाण्या नजरेनं एका भाकरीची मागणी केली. तलाठीनबाईंनी एक शिळी भाकरी आणून तिच्या हातावर टाकली. मिळालेली भाकरी घेऊन ती झोपडीकडे निघाली.
काळाकुट्ट किर्र अंधार तुडवत ती आपल्या झोपडीत पोहोचली. झोपडीच्या बाहेर पोटाला पाय बिलगून जमिनीवर झोपलेल्या गौरवला पाहून तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. आपल्या बाळाच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहत अलका मूकपणाने अश्रू ढाळत होती. थोड्या वेळानं स्वतःला सावरत तिनं त्याला उचलून झोपडीत नेलं. गाठोड्यातील दोन चिंचाची बोटकं पाण्यात भिजवून चिंचाचं आंबट पाणी बनवलं. सोबत आणलेली शिळी भाकरी तव्यावर गरम केली आणि गौरवला उठवू लागली...
"ये बाळा, ऊठ .... बघ, म्या काय आणलंय ... तुला गरमागरम बाजरीची भाकरी आणि कढी खायची ना ... ..."
"ये लेकरा, अरे, ऊठ ना लवकर...."
असं म्हणत अलकानं आपला दाटून आलेला हुंदका आवरला आणि चिंचेच्या पाण्यात चुरलेली शिळी भाकरी गौरवसमोर ताटात ठेवली. गौरव डोळे चोळत चोळत उठून बसला, पण त्याचे डोळे उघडेणासे झाले होते. अलका त्याला एकेक घास भरवत होती आणि भुकेलेला गौरव आपण गरम गरम बाजरीची भाकरी आणि कढी खातोय असं समजून ती चिंचेच्या पाण्यात चुरलेली शिळी भाकरी खात होता. शिळी भाकरी आणि चिंचेचं पाणी हे गौरवला गरम गरम बाजरीची भाकरी आणि कढी वाटत होते. अलका मनात पुटपुटली, "फकस्त समजायचं .. ... "
💬 प्रतिसाद
(15)
ॲ
ॲबसेंट माइंडेड…
Tue, 11/02/2021 - 08:02
नवीन
कथा आवडली.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Tue, 11/02/2021 - 10:44
नवीन
छान आहे कथा.
खेड्यात एकमेकांना धरून वागावे लागत असल्याने तलाठीण बाईचा ताठा वेगळाच दिसतो.
शक्यतो असे कुणी वागत नाही.
- Log in or register to post comments
र
राघवेंद्र
Tue, 11/02/2021 - 10:48
नवीन
कथा आवडली!!!
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Tue, 11/02/2021 - 10:49
नवीन
दाहक कथा
भुकेलेला गौरव आपण गरम गरम बाजरीची भाकरी आणि कढी खातोय असं समजून ती चिंचेच्या पाण्यात चुरलेली शिळी भाकरी खात होता
वाचून एकदम गलबलुन आले
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 11/12/2021 - 02:36
नवीन
दाहक कथा - सहमत
- Log in or register to post comments
स
सुखी
Sat, 11/20/2021 - 03:36
नवीन
+१
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Tue, 11/02/2021 - 12:44
नवीन
असलं वास्तव अंगावर येतं
- Log in or register to post comments
स
सुक्या
गुरुवार, 11/04/2021 - 00:04
नवीन
अगदी अंगावर येनारी कथा .. अशीच अंगावर येनारी कथा आठवली .. लेखक आठवत नाही .. परंतु त्यातही असेच दिवसभर वणवण करुन शेवटी अगदी "उद्याची भाकर तरी आज द्या. पोटात अन्नाचा कण नाही सकाळ्पासुन" अशी विनवणी करतो तेव्हाही असेच गलबलुन आले होते ..
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 11/05/2021 - 18:52
नवीन
दमामि यांची कथा आहे ती. नाव 'गवत'
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 11/13/2021 - 10:21
नवीन
हृदयद्रावक कथा. बिचारी अलका अन तिचा गौर्या.
समाजातील प्रस्थापित लोकांकडून अश्या सेवकांना किती नाडले जायचे !
कथा तर छानच लिहिली आहे, बोलीभाषा विशेष उल्लेखनीय !
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 11/20/2021 - 05:48
नवीन
वाचताना गलबलुन आले
लिहित रहा
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sat, 11/20/2021 - 06:02
नवीन
एकाच दिवाळी अंकात एकाच शीर्षकाच्या दोन कथा असू शकतात काय ? किंवा एकाच अंकात एकाच लेखकाच्या एकापेक्षा जास्त कथा असू शकतात काय ?
म्हणजे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे पण मग मी संजोप रावांची भूक वाचली आणी तुपेंची भूक वाचायची राहून गेली.
प्रत्येक वेळी वाचक लेखकाचे नाव, कथेचे नाव हे सगळे पॅरामीटर्स लावून वाचणे शक्य असेल काय ?
किंवा तुपेंची शाळा वाचली त्यामुळे तुपेंचे दुसरे लिखाण नजरचुकीने वाचायचे राहून गेले तर तो लेखकावर अन्याय असेल काय ?
बाजारात एकसारखे डिजाईन असणार्या वस्तूंपैकी दुसरी वस्तू पहिल्या वस्तूची नक्कल आहे असे समजतात.
दिवाळी अंकाच्या अशी मांडणी अजून कोणाला दोषपुर्ण वाटते की यह सिर्फ मेरी नजर का कसूर है ?
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 11/20/2021 - 09:03
नवीन
शक्यतो नसाव्यात. समान नावामुळे नक्कीच नजरचुकीने वाचण्याच्या राहून जाऊ शकतात. पण लेखक वेगळे असल्याने चोखंदळ वाचक अंक चाळताना त्याला ही गोष्ट लक्षात येईलच.
मला दोन्ही भुका आवडल्या !
का नसाव्यात ? असे काही कारण दिसत नाही. कागदांच्या संख्येचा काही प्रश्न नाही तेव्हा डिजिटल अंक कितीही मोठा असू शकतो.
किती लहान मोठा असावा या साठी संमं नेमलेलेच आहे.
खरे तर मिपाच्या एकाच लेखकाचा वेगळा दिवाळी function at() { [native code] }ह किंवा इतर नैमित्तिक अंक जरुर काढावा !
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sat, 11/20/2021 - 11:21
नवीन
ओके. मग माझ्याच समजूतीत गफलत झाली असावी असे मानण्यास वाव आहे. प्रवासात किंवा दुसरीकडे अर्धे लक्ष असताना चोखंदळपणा वाढविण्याचा अभ्यास करावा लागेल.
- Log in or register to post comments
N
nutanm
Sat, 08/27/2022 - 15:39
नवीन
कथा वाचून मन सुन्न झाले. काही लोकांना जगात एकवेळ सुद्धा खायला मिळत नाही त्यघबरोबर काहीकडे अन्नाची नासाडी फेकाफेक चालू असते तेआन्न जगातल्या लोकांना मिळालेतर सगळ्या जगातल्या लोकांची भूक भागते. पण कठीण असे होणे. मी स्वतः बघितले एक छोटेसे function वाढदिवस, छोट्या प्रमाणावर माणसे व. जेवणाचे कंत्राट दिलेले ,जेवणे झाल्यावर आवरताना सगळे खरकटे व अन्नही एकत्र करून कंत्राटाच्या लोकांनी कचर्यात फेकूल्यावर माझा जीव तळमळला मी यजमानीण बाईंना म्हटले किती वाया गेलेहो अन्न !व त्यावर त्यावर त्यांचे उत्तर कार्या मधे हेअसे वाया जाणारच बघायचे नाही , मलातर फारच वाईटवाटले निदान आलेल्यांना तरी ते सुग्रास गोडाधोडाचे खर्चिक तळणीचे अन्न् विचारून बांधून द्यायला काय हरकत आहे?ही प्रथा पडायला काय हरकत आहे? नाहीतरी कधीकधी बिन उपयोगाच्या ,घरात पडून राहणार्या महागड्या वस्तूच उलट आहेर म्हणून देण्यापेक्षा असे हवे त्यांना , दुसरे दिवशी खाणार्यांची ईच्छा असल्यास बांधून द्यावे. अन्नाचि नासाडी होणार नाही किंवा कोणीतरी घरातल्यांनी किंवा कंत्राटदारांनीच ते अन्न गरीबांना वाटण्याची व्यवस्था करावी यात काही त्रुटीही असतिल, कही कंत्राटदार ते विकून परत धंदाही करतात ,असे आहे. पण अन्न वाया जाण्रयावर काही इलाजही निघाला पाहिजे हे निश्र्चित.
- Log in or register to post comments