Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चित्पावन ब्राह्मणांचा इतिहास

उ
उपयोजक
Tue, 08/03/2021 - 12:56
🗣 114 प्रतिसाद
मागे इथे चित्पावनांबद्दल एक लेख आला होता. त्यासंदर्भाने थोडा अजून प्रकाश टाकणारा एक लेख कालनिर्णय २००४ च्या दिवाळी अंकात पत्रकार 'दिलीप चावरे' यांनी लिहिला होता. तो लेख आणि त्यांनी मांडलेली मते. मिपाकरांनीही प्रतिसाद द्यावेत. याच लेखातले शेवटी ठळकमधे दिलेले चित्पावनांबद्दचे काही उल्लेख हे काही चित्पावन मिपाकरांना न पटणारे असू शकतात. पण लेखकाने त्यांचे संदर्भ दिले आहेत. ते तटस्थपणे वाचले जावेत ही अपेक्षा ------------------------------------------------- चित्पावन ब्राह्मण ही पोेटजात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचा उपलब्ध इतिहास जेमतेम चारशे वर्षांचा आहे . आम्ही अस्सल भारतीय आहोत असे एकीकडे सांगणारे चित्पावन त्याच वेळी आपले मूळ शोधण्याची खटपट करताना आढळतात. ते कशासाठी ? चित्पावन आणि इतर यांच्यात ठळक फरक आढळतात. ते कसे ? अल्पसंख्य असूनही चित्पावनांचे योगदान प्रचंड आहे . बौद्धिक पराक्रमाबरोबरच अभिजात कलाविष्कार , क्रीडा , लष्कर , राष्ट्रभक्ती आणि परदेशातील यशप्राप्ती आदी विविध क्षेत्रांवर त्यांचा ठसा आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा चित्पावनच होता. तर त्यांचे गुरु आणि शिष्यही अनुक्रमे रानडे , भावे हे चित्पावनच होते . एकंदरीत असे म्हणता येईल की , चार लोकांत चित्पावन उठून दिसतो. मराठी जरीपटका पार अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत फडकावणाऱ्या पेशवाईच्या अमलाखाली आजचा बहुतांश भारत आलेला होता. युनियन जॅक १८१८ साली शनिवारवाड्यावर फडकावणारा एक चित्पावन ब्राह्मणच होता. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक , आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवत फडके , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , एका मागोमाग एक फासावर चढणारे तिघे चापेकर बंधू , ' सुधारक ' गोपाळ गणेश आगरकर , स्त्री - शिक्षणाचे प्रणेते धोंडो केशव कर्वे , पहिले भारतीय रँग्लर रघुनाथराव परांजपे अथवा भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे अशी शेकडो नररत्ने या पोटजातीत निपजली. परंतु चित्पावनांच्या योगदानाला महाराष्ट्राने पुरेसा न्याय दिलेला नाही. पेशव्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांच्या जेवणावळी अधिक लोकांना माहीत आहेत . गेल्या काही वर्षात या पोटजातीवर बरेच शास्त्रीय संशोधन होत आहे . एवढी देैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या या पोटजातीबद्दल अधिक चर्चा आणि संशोधन व्हावे असा या लेखाचा उद्देश आहे . लेखातील शास्त्रीय संशोधनाचा तपशील इंटरनेटवरून घेतलेला आहे . ' कोकणस्थ ' , ' चित्पावन ' किंवा ' दीक्षित ' असे शब्द दिल्यास ही माहिती इंटरनेटवर सापडेल . चिपळूण आणि त्याचा परिसर म्हणजे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांचे मूळ वसतिस्थान असल्याची समजूत आहे. तेथेच परशुरामाचे मंदिर असल्याने कोकणस्थ आणि परशुराम यांचा संबंध सहजपणे जोडला जातो . एके काळी चित्पावनांना चिपळोणे म्हटले जाई . मात्र वारली , आगरी , कुणबी , मराठे किंवा देशस्थ ब्राह्मण यांच्याबद्दल इतिहासात जसे वारंवार उल्लेख आढळतात तसे चित्पावनांचे दिसत नाहीत . ही पोटजात चारशे वर्षांपेक्षा फार जुनी असल्याचा निर्णायक पुरावा अद्याप तरी उपलब्ध झालेला नाही. चित्पावनांचे वर्णवैशिष्ट्य आणि स्वभाववैशिष्ट्य लक्षात घेता भारतात तरी त्यांचे कोणत्याच लोकसमूहाबरोबर साधर्म्य आढळत नाही . पोर्तुगीज राष्ट्रातील प्रजा किंवा ज्यू धर्माचे लोक यांच्याबरोबर मात्र ते साम्य कमालीचे आहे. एकांडेपण , सातासमुद्रापलीकडे जाण्याची मानसिकता आणि पराक्रम ही गुणवैशिष्ट्ये पोर्तुगीज आणि चित्पावन यांच्यात समान आहेत. वंशशुद्धी राखण्याचा प्रयत्न , कृपणपणा , व्यवहारचातुर्य किंवा कर्ज देणे हे ज्यू लोकांचे गुण चित्पावनांत सर्वसाधारणपणे आढळतात. युरोपच्या मुख्य प्रवाहापासून पोर्तुगीज नेहमीच फटकून राहिले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा अपवाद वगळता कोकणस्थ ही पोटजात महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून काहीशी अलिप्त राहिली. एखादी संस्था स्थापन करून ती नमुनेदार पद्धतीने चालवण्यावर चित्पावनांचा भर राहिला. मात्र समाजाबरोबर चालणे त्यांना रुचले नाही. एकेकाळी अटकेपार मराठी जरीपटका नेणारे कोकणस्थ असे विरक्त होण्याचे कारण तरी काय असेल , हा प्रश्न मला नेहमीच सतावत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन मराठेशाहीची पायाभरणी केली . ज्या परिस्थितीत आपली कामगिरी त्यांनी पार पाडली तिला जगाच्या इतिहासात तोड सापडणार नाही , देव , देश आणि धर्म या त्रयीचे अमृत पाजून त्यांनी मराठी तेज जागे केले . उत्तरेतील शहेनशाही आणि दक्षिणेतील आदिलशाही छत्रपतींच्या साध्या नामोल्लेखाने चळाचळा कापू लागल्या. मराठेशाही नेस्तनाबूत करण्यासाठी आलेला औरंगजेब अखेर मराठी मातीतच इतिहासजमा झाला. मात्र मराठेशाहीचा उत्कर्ष होतच गेला. छत्रपतींचे स्वप्न साकार होऊ लागले. दिल्लीचे तख्त फोडून वीर मराठा अटकेपार गेला. महाराष्ट्र आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात मराठी अंमल स्थापन झाला. जाट , शीख , रजपूत आणि इतर जमातींनी मुगलांसमोर पत्करलेल्या शरणागतीच्या पार्श्वभूमीवर मराठेशाहीने ही अचाट कामगिरी जेमतेम शंभर वर्षांच्या काळात करून दाखविली. ' मराठा गडी यशाचा धनी ' असे कवन सर्वतोमुखी झाले. परंतु या कामगिरीचे नेतृत्व करणारे पेशवे जनमानसावर अधिराज्य करू शकले नाहीत. त्यांचा पराक्रम विस्मृतीत गेला आणि तथाकथित लढवय्या घराणी ब्रिटिशांच्या चरणी लीन होण्यात धन्यता मानू लागली. यास महाराष्ट्राचा इतिहास साक्षीदार आहे. प्रस्तुत लेखाचा विषय कोकणस्थांची गेल्या चारशे वर्षांमधील कामगिरी आणि त्यांना सतत सहन करावा लागलेला दुस्वास. इतिहास कोणाला न्याय नाकारत नाही आणि कोणाला क्षमाही करत नाही. शिवाजीराजांना दरोडेखोर म्हणणारे पंडित जवाहरलाल नेहरू अखेर सत्यासमोर नतमस्तक झाले आणि प्रतापगडावर त्यांनी महाराजांना मानाचा मुजरा केला. ' मुंबई महाराष्ट्राला कदापि मिळणार नाही ' , अशी दर्पोक्ती करणारे स . का . पाटील अपमानित अवस्थेत राजकारणाबाहेर फेकले गेले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. कोकणस्थांबाबत निर्माण होणारा प्रश्न म्हणजे प्रवेदी दैदीप्यमान कामगिरी करूनही समाज आणि ही पोटजात यांच्यात एक सुप्त दुरावा कायम राहिला. महात्मा जोतिराव फुले यांची ब्राह्मणविरोधी चळवळ ही चित्पावनविरोधी होती असे मानणारेही अनेक आहेत. पेशवाईतील जेवणावळीवर टीका करणारे असंख्य तथाकथित विद्वान आढळतात. पण पेशव्यांनी परप्रांतात गाजवलेल्या पराक्रमाबद्दल चकार शब्द ते काढत नाहीत. मुगलांबद्दल प्रेमाचा उमाळा येणारे पेशव्यांबाबत एवढे कठोर का होतात किंवा एकूणच समाजात पेशवाईबद्दल अढी का आढळते , आदी प्रश्नांचा खोलवर विचार करता असे जाणवते की , कोकणस्थ ही पोटजात महाराष्ट्रात अचानक उदयास आली. याबाबतचे संक्षिप्त वैज्ञानिक विवेचन या लेखाच्या पुढील भागात आहे. या विषयाच्या मर्यादेत तपशीलवार विश्लेषण करणे शक्य नसले तरी समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी आणि इतिहास संशोधकांनी अधिक प्रकाश टाकण्यासारखा हा विषय आहे. एवढा असामान्य पराक्रम गाजवणारी पेशवाई उपहासाचा विषय का बनली , हा विस्तृत संशोधनाचा विषय आहे. काही गुण आणि काही अवगुण प्रत्येक व्यक्तीत तसेच प्रत्येक राजवटीत आढळतात. याला अपवाद म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा कारभार. देव , देश आणि धर्म अशा त्रयीला नमन करून त्यांनी राज्य केले. त्यामुळे अत्याचार , अन्याय आणि अधर्म यांना त्यांच्या काळात स्थान नव्हते. चैन , विलास , संपत्ती यांना राजांनी महत्त्व दिले नाही. पेशवाईच्या काळात विशेषतः अखेरच्या ५० वर्षात या गोष्टींचा अतिरेक झाला . अटकेपार झेंडे नेणारा राघो भरारी सिंहासनाच्या मोहाला बळी पडला आणि सारी पेशवाई बदनाम झाली. आधीचे पराक्रम पुसले गेले. बाकीचा भारत पादाक्रांत करून ब्रिटिशांनी पेशवाईचा घास घेतला आणि संपूर्ण भारतावर गोरा अंमल प्रस्थापित झाला. उत्तरेतील शहेनशाही किंवा दक्षिणेतील आदिलशाही संपुष्टात आल्याबद्दल व्यक्तिगतरित्या कोणालाही जबाबदार ठरवण्यात आले नाही. पेशवाई गेल्यानंतर मात्र ' पळपुटा ' बाजीराव अपयशाचा धनी ठरला. नाना फडणवीस खलनायक ठरला. भाऊबंदकीने साक्षात छत्रपतींच्या पुत्रांना सोडले नाही. मुगलांचा तर प्रत्येक सत्तापालट रक्तलांच्छित होता . महत्त्वाकांक्षी माणूस सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो हा मानवी इतिहास विसरून पेशवाईवर टीकेची झोड उठवण्यात आली. जेवणावळी वादग्रस्त ठरल्या. जणू जेवणांमुळेच राज्य गेले असा समज निर्माण करण्यात आला. पेशवे म्हणजे पर्यायाने चित्पावन ब्राह्मण गुन्हेगार ठरले. पेशवे एखादे देशस्थ ब्राह्मण घराणे असते तर टीका एवढी टोकदार राहिली असती काय , हा प्रश्न नेहमीच पडतो. महाराष्ट्रातील पारंपरिक गावगाडा पाहिल्यास ब्राह्मणांपैकी देशस्थ स्थानिक लोकांबरोबर मिळून - मिसळून राहिल्याचे आढळते. पाटील आणि कुलकर्णी म्हणजे महाराष्ट्रातील महसूल आणि कायदा सुव्यवस्था यंत्रणेचे प्रमुख. याखेरीज उपाध्ये आणि भिक्षुकी वृत्ती करणारे देशस्थ जन्मापासून मृत्यूपर्यंत बहुजन समाजाच्या सतत संपर्कात होते . कोकणस्थ जमात उदयाला आली पेशव्यांबरोबर. तोपर्यंत तिचे अस्तित्व नगण्य होते . पेशवाईत कोकणस्थांचे स्थान शासक म्हणून प्रस्थापित झाले. छोटे संस्थानिक ठिकठिकाणी नेमण्यात आले . म्हणजे पुन्हा प्रजेपासून अंतर दुसरे कारण असे की , आपल्या भूमीत फारसे हे करणे त्यांना शक्य नसल्याने अन्यत्र जाऊन कर्तबगारी साकारण्याची संधी शोधणे त्यांना क्रमप्राप्त झाले. पुण्यात वाव नव्हता म्हणून परमुलखात जाऊन त्यांनी पराक्रम केले . राघोबादादा अगदी अटकेपार गेले. स्वदेशाबाहेर जाऊन आक्रमण करण्याचे हे ऐतिहासिक पाऊल म्हणावे लागेल . आपल्या तलवारीचे पाणी शत्रूच्या मुलखात जाऊन त्याला पाजण्याचे सर्वप्रथम धाडस शिवाजी महाराजांनी दाखवले . तत्कालीन स्थितीमुळे त्यांना अधिकांश काळ महाराष्ट्रात खर्च करावा लागला . अन्यथा त्यांची दूरदृष्टी आणि मुत्सद्दी वृत्ती पाहता मराठी अंमल उत्तरेत स्थापन करण्याची सुवर्णसंधी ते सोडणे शक्यच नव्हते . महाराजांचे ईप्सित पेशवाईत साध्य झाले आणि ग्वाल्हेर किंवा इंदूरसारखी महत्त्वाची शहरे मराठा राज्याची केंद्रे बनली . शिवशाही ते पेशवाई या दरम्यानच्या काळात अंतर्गत कलहामुळे जर्जर बनलेल्या मराठेशाहीचा डंका पुन्हा भारतभर दुमदुमला. तथापि या उज्ज्वल भूतकाळाकडे दुर्लक्ष करून पेशवाईला फक्त दूषणे देणारे अनेक आढळतात . महाराष्ट्रात चित्पावनांबद्दल एक प्रकारची अढी दिसून येते . ती प्रथमपासून होती की ब्रिटिशांनी रुजवली , याचेही संशोधन झाले पाहिजे . आपल्याला त्रास होणार तो चित्पावनांकडूनच याचा इशारा धोरणी ब्रिटिशांना सहज समजण्यासारखा असणार . नानासाहेब पेशव्यांच्या रूपाने तो खरा ठरला . उत्तर भारत १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धात होरपळत असताना महाराष्ट्र मात्र शांत होता , कारण ही लढाई आणि सत्तास्पर्धा पेशवे अन् ब्रिटिश यांच्यापुरतीच मर्यादित असल्याची भावना निर्माण झालेली होती . वासुदेव बळवंत फडक्यांनी सशस्त्र क्रांती उभी करण्याचा प्रयत्न केला . प्रस्थापित हिंदू बहुजनसमाज त्यापासून दूर राहिला . जनमानसाची ही नाडी समजणारे लोकमान्य टिळक स्वत:स तेल्यातांबोळ्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागले , याचे इंगित सर्वसामान्यांच्या लक्षात फार उशिरा आले . तोपर्यंत ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब करून ब्राह्मण आणि मराठा या दोन प्रमुख जातींमध्ये कमालीची तेढ निर्माण करून ठेवली होती. चापेकर बंधू किंवा वीर सावरकर यांचा त्याग केवळ अतुलनीय होता . परंतु नथुराम गोडसे याच्या आततायी कृतीमुळे स्वतंत्र भारतात त्यांना मानसन्मान प्राप्त झाला नाही . एवढेच नव्हे तर ग्रामीण भागांतला चित्पावन ( कोकण वगळता ) शहरांकडे वळला . राजकारणातही स्थान नसल्याने त्याने परदेशी जाण्याचा पर्याय स्वीकारला . आज अमेरिकेतील मराठी माणसांपैकी बहुसंख्य कोकणस्थ यशस्वी आहेत ते विनाकारण नव्हे . चित्पावन , कोकणस्थ ब्राह्मण किंवा एकूणच ब्राह्मण जातीचे प्रमाण महाराष्ट्राच्या लोकसंख्येत जेमतेम पाच टक्के आहे . ' साडेतीन टक्के ' असा उल्लेख प्रामुख्याने ब्राह्मणांना हिणवण्यासाठी करण्यात येतो . चित्पावन वगळता अन्य मराठी लोकांनी आपले मूळ शोधण्याचा खटाटोप केलेला नाही . आपणच इथले मालक अशी भावना त्यांच्यात उपजत आढळते . पण चित्पावन मात्र आपले अस्तित्व शोधण्यासाठी धडपडत असतात . कुलवृत्तांत ग्रथित करणारी महाराष्ट्रातील एकमेव जमात म्हणजे चित्पावन , अर्थातच त्यांची व्याप्ती चारशे वर्षांपेक्षा कमी कालखंडाची . महाराष्ट्रातील मराठे , कुणबी , आगरी , कोळी , बारा बलुतेदार आदींच्या डीएनए चाचण्या होतील तेव्हा आणखी बराच तपशील उपलब्ध होईल आणि महाराष्ट्राचा मानववंशशास्त्र इतिहास स्पष्ट होत जाईल. सोबत एक चौकट आहे . विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या लेखसंग्रहातून ती घेतलेली आहे . महाराष्ट्राचा अंदाजे १००० वर्षांचा लोक - इतिहास शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. Maharashtra ancient people परशुरामाने चित्पावन जमात निर्माण केली असे म्हणणारे अनेक आहेत. असे गृहीत धरल्यास मधली हजारो वर्षे ही जमात कोठे लुप्त झाली होती , याचे स्पष्टीकरण कोणालाच देता येत नाही . चित्पावनांची स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेता त्यांच्यावर ब्रिटिशांची वक्रदृष्टी कायम का राहिली याचे रहस्य उलगडता येते. विशेषतः पुणेरी चित्पावनांवर त्यांचा दात होता. त्याची चर्चा थोडक्यात पुढे आहे . या मुद्याची दुसरी बाजू म्हणजे चित्पावनांची गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षामधील कामगिरी . याबाबतचा इतिहास उपलब्ध आहे . त्यामुळे प्रश्न आहे याबाबत महाराष्ट्राने योग्य दखल घेतली की नाही एवढाच . एखादी व्यक्ती किंवा एखादी जमात यांच्यावर सतत अन्यायच होताना दिसतो . दैववादी असणारे लोक याला दुर्दैव किंवा परमेश्वरी अवकृपा म्हणून मोकळे होतात. इतरेजन त्याबाबतची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण जगाचा विचार करताना ज्यू धर्माचे उदाहरण सम्मेर येते . सुमारे २००० वर्षांच्या संघर्षानंतर इस्त्रायलच्या रूपाने या धर्माच्या लोकांना स्वत : ची भूमी प्राप्त झाली . त्यानंतरही त्यांच्याविरुद्धची मोहीम आणि कारस्थाने चालूच राहिली . कोकणस्थांबाबत १ ९ ४८ चा अपवाद वगळता असे घडले नसले तरी त्यांचे महत्त्व कमी लेखण्याच्या प्रवृत्तीला सतत उत्तेजन देण्यात आले . शक्य त्या सर्व आयुधांचा वापर करण्यात आला . जातीयवादाचा आश्रय प्रच्छन्नपणे घेण्यात आला . चित्पावनांनी केलेला त्याग बिनमहत्त्वाचा ठरला . वास्तविक स्वातंत्र्यसंग्रामातील या जमातीचे योगदान असामान्य आहे . महाराष्ट्राचे राजकारण , अर्थकारण आणि समाजकारण यांच्यात चित्पावन नेहमीच आघाडीवर होते. मात्र राजकारण हा प्रांत त्यांच्यासाठी निषिद्ध ठरू लागला . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आरंभीचा काळ सोडता चित्पावनही काँग्रेसच्या राजकारणापासून दूर गेले . इतर पक्षांचा पर्याय त्यांनी स्वीकारला . परंतु प्रथमपासून काँग्रेसच्या प्रभावाखाली असलेल्या महाराष्ट्रात त्यांचे राजकीय अस्तित्व नगण्य राहिले . कोकणस्थ हा शब्दप्रयोग आधी म्हटल्याप्रमाणे सर्वसमावेशक आहे . चित्पावन म्हणजे त्यापैकी एक अल्पसंख्य गट , मात्र या गटाचे बौद्धिक वर्चस्व महाराष्ट्रावर राहिले हे निर्विवाद . शिक्षण आणि वर्तमानपत्रे ही मोक्याची क्षेत्रे चित्पावनांच्या ताब्यात आरंभापासून राहिली . पेशवे पुण्यास आल्यानंतर चित्पावनांचा उल्लेख तत्कालीन लेखनात होऊ लागला . त्यामुळे या लेखाच्या कालखंडाची व्याप्ती स्थूलपणे १७०० ते २००० अशी तीनशे वर्षांची मानता येईल . त्या मर्यादेतच प्रत्येक विधानाचा अर्थ ठरणार आहे . तेव्हाच्या परिस्थितीनुसार एकंदरीतच शिक्षण क्षेत्र ब्राह्मणांसाठी राखीव होते असे म्हणणे गैर ठरणार नाही . पेशवाईच्या उदयानंतर त्यावर चित्पावनांनी आपली मक्तेदारी स्थापन केली . त्या काळातील विद्वान देशस्थ म्हणजे घनपाठी ब्राह्मण , वेदविद्या आणि संस्कृत भाषेचा अभ्यास चालू ठेवण्यात त्यांनी समाधान मानले . आधुनिक शिक्षण त्यांच्यापासून दूर राहिले . तेथे चित्पावन स्थिरावले . त्यांनी येणारी संधी अचूक हेरून तयारी सुरू केली . एकीकडे बहुजनसमाज पारंपरिक बंधनात जखडला आहे तर दुसरीकडे एक अल्पसंख्य गट वेगाने प्रगती करत आहे , असे चित्र निर्माण होऊ लागले . वर्ण आणि शिक्षण यांच्यामुळे आत्मप्रौढीची भावना अगदी आजही सहजपणे निर्माण होताना दिसते . त्या काळात तर यांच्या जोडीस राजकीय सचाही होती . त्यापुढे चित्पावन अत्यंत थोडक्या काळात इतरांच्या पुढे गेले सत्ता आणि दुर्गुण यांची जोडी अभिन्न आहे . जसजशी सत्ता वाढत गेली तसतसे तिच्या गैरवापराचे प्रमाणही वाढत गेले . या गैरवापसचे चटके बहुजनसमाजाला बसले आणि सत्ताधीशांबद्दल अधिकाधिक नाराजी वाढली . कारभार करताना त्रास होऊ नये म्हणून नेता नेहमीच समाजातील प्रमुख वर्ग वश करण्याचा प्रयत्न करतो . महाराष्ट्रात इंग्रजांनी हेच केले . अगदी ब्राह्मणांच्या दक्षिणाही कायम ठेवल्या . त्यांना इंग्रजी भाषा शिकण्यास प्रवृत्त केले . सरकारी नोकऱ्या दिल्या. आधीच गरीब असलेले बहुसंख्य चित्पावन असल्या प्रलोभनांना बळी पडले आणि पुन्हा एकदा शिक्षण किंवा प्रशासन अशा ठिकाणी प्रस्थापित झाले . पांढरपेशा नावाची नवी जमात महाराष्ट्रात वाढू लागली. पोस्ट , रेल्वे , मामलेदार कचेरी अशा जनसंपर्काच्या जागांवर त्या काळी प्रामुख्याने चित्पावन होते याची प्रचीती तेव्हाच्या कोणत्याही संदर्भावरून सहजपणे येते . शिक्षकही प्रामुख्याने याच वर्गातील होते. फटकळपणा , बेदरकार स्वभाव , हिशेबी वृत्ती आणि आढ्यता ही वैशिष्ट्ये चित्पावनांत आजही काही प्रमाणात सापडतात . त्या काळात तर त्यांचा कहर झालेला असणार . त्याचा अपेक्षित परिणाम झाला. बहुसंख्य समाज आणि चित्पावन यांच्यातील दरी वाढत गेली . याचे दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजे गणेशपूजा . पेशवाई आली , गणेशपूजनाची परंपरा सुरू झाली . तोपर्यंत महाराष्ट्राची दैवते होती विठोबा आणि खंडोबा . प्रथम वंदनाचा मान असलेला गणपती हे ग्रामदैवत होते . लोकमान्यांच्या दूरदृष्टीचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी गणेशोत्सवास सामाजिक रूप दिले . पेशव्यांच्या आणि चित्पावनांच्या देव्हाऱ्यातील गणेशाला त्यांनी राष्ट्रीय अस्मितेची देवता म्हणून समाजप्रिय केले. देव म्हणजे गणपती आणि आदर्श पुरुष म्हणजे शिवाजी महाराज अशी दोन दैवते समोर ठेवून त्यांनी राजकारण केल्याने बहुजनसमाज त्यांच्यामागे गेला . म्हणूनच त्यांना लोकमान्य हे असामान्य बिरुद जनतेने अर्पण केले. मराठी वर्तमानपत्रसृष्टीची शक्ती वापरून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तर टिळकांनी या दोहोंचा अवलंब करून ' राष्ट्रीय असंतोषाचे जनक ' म्हणून समाजमनावर अधिराज्य केले . वासुदेव बळवत फडके यांनी सशस्त्र क्रांतीचा पहिला उठाव केला . देशातील पहिली प्रमुख राजकीय हत्या चापेकर बंधूंनी केली , तर सावरकरांनी ब्रिटिश सत्तेलाच आव्हान दिले . या प्रत्येकाचे कार्य आणि त्याग अतुलनीय होते. तरीही एक टिळक वगळता इतर कोणीही समाजनेते होऊ शकले नाहीत . त्यांच्या बाबतीत हे का घडू शकले नाही ( स्वतंत्र भारतात तर निवडणुकीच्या राजकारणातून चित्पावन हहपोरच झाले . काकासाहेब गाडगीळ किंवा बाबासाहेब परांजपे , एस . एम . जोशी किंवा ना . ग . गोरे , विठ्ठलराव गाडगीळ अथवा हरिभाऊ गोखले अशा नावांवरून सर्वसामान्य निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल . त्याची कारणे स्पष्ट आहेत . नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केली . चित्पावन अधिकच बदनाम झाले . याचीही पार्थभूमी निवडणुकीच्या राजकारणास लाभली . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनसंप आणि भारतीय जनता पक्ष यांचा प्रत्येक कार्यकर्ता अथवा समर्थक म्हणजे नथुरामचा चाहता असा गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला. आजही अधूनमधून त्याचा प्रत्यय येत असतो . महात्माजींची अवज्ञा करून काँग्रेस पक्षाने फाळणी स्वीकारली या कटु सत्याकडे डोळेझाक करण्यात येते . डीएनए चाचणी म्हणजे सध्या निर्णायक पुरावा मानण्यात येतो. या मार्गाने कोकणस्थ ब्राह्मणांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही चित्पावनांच्या तोंडातील कातडीचे सूक्ष्म नमुने गोळा करून ऑक्सफर्ड येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यानुसार निघालेला प्राथमिक निष्कर्ष असा आहे की , सर्व चित्पावनांचा जन्म एकाच आईपासून झाल्याचे दिसत नाही . ऑक्सफर्ड येथील तज्ञांच्या मते बहुसंख्य नमुन्यांची जातकुळी ' झेनिया ' नामक मानवगटाच्या डीएनएबरोबर मिळतीजुळती आहे . डीएनएची ही रचना ब्लॅक सी परिसरात आढळते. झेनिया मानवगटाची संतती संपूर्ण युरोपात आढळते. पूर्वज शोधण्याच्या कामात गढून गेलेल्या संशोधकांच्या मते ही संतती आणि चित्पावन यांचे मूळ काही अंशी समान आहे . मात्र काही चित्पावन ब्राह्मणांची जातकुळी ' उना ' या मानवगटाबरोबर साम्य दाखवते. अशा नमुन्यांचे प्रमाण अगदी अल्प असले तरी त्यांना जन्म देणाऱ्या पूर्वज स्त्रियांचे वास्तव्य आर्मेनिया , तुर्कस्तान , सीरिया आणि इराक या पट्ट्यात असल्याचा पुरावा उपलब्ध आहे . ऑक्सफर्ड प्रयोगशाळेच्या अभ्यासानुसार ' उना ' ही डीएनए रचना अत्यंत दुर्मिळ आहे. नवीन संशोधनानुसार भारतातील २० ते ३० टक्के उच्चवर्णीय हिंदूंचे मूळ पश्चिम युरेशिया भागात होते . त्यामुळे चित्पावनांचे पूर्वजही ब्लॅक सी परिसर आणि आर्मेनिया - तुर्कस्तान - सीरिया - इराक अशा दुहेरी पट्ट्यातून भारतात आले असल्याच्या तर्काला सध्यातरी पुष्टी मिळत आहे. अशा संशोधनावरील भरपूर तपशील अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे . नवा तपशील मिळत जाणार आहे. ह्युस्टन येथील डीएनए प्रयोगशाळेने पुरविलेल्या तपशिलाबरोबर ' य ' पेशी ( वाय क्रोमोझोम ) नमुने ताडून पाहण्यात आहे. ब्लॅक सी परिसरातील ' अश्केनाझी ' नामक ज्यू जमातीच्या डीएनए गुणधर्माबरोबर या नमुन्यांचे कमालीचे साम्य आढळून आले. यावरून होणारा एक तर्क म्हणजे ज्यू आणि चित्पावन १५०० ते ३००० वर्षापूर्वी एकाच पूर्वजगटापासून निर्माण झाले . संपूर्ण जगात चित्पावनांचे वंशशास्त्रीय साम्य या ज्यू जमातीबरोबर सर्वाधिक आढळून येते. अश्केनाझी जमात बहुतांश पूर्व युरोपची रहिवासी असून इस्रायलच्या स्थापनेत तिचा पुढाकार आहे . याच जमातीची प्रजा अमेरिकेत प्रबळ आहे . ज्यू धर्माचे आणखी दोन प्रमुख वंश आहेत . त्यापैकी सेफार्डिक वंशाचे लोक स्पेनमध्ये तर मिझराची वंशाचे लोक इराण - इराकचे रहिवासी होते . त्यांच्या तुलनेत अश्केनाझी जमातीच्या लोकसंख्यावाढीचा वेग फार जास्त आहे. ज्यू आणि चित्पावन यांची अनेक समान वैशिष्ट्ये आहेत . धूर्तपणा , बुद्धिमत्ता , कृपणता , कष्टाळू वृत्ती , खस्ता खाण्याची तयारी , मुलांच्या शिक्षणाची कळकळ आणि आपला भूतकाळ तसेच संस्कृतीबाबत कमालीची जागरूकता अशा काही गुणांचा उल्लेख या संदर्भात करता येतो. त्यामुळे विस्थापित झालेला ज्यूधर्मीय एखादा समूह भारतात आला असण्याची शक्यताही नजरेआड करता येत नाही . अगदी आजही अलिबाग परिसरातील ज्यू स्वच्छ मराठी बोलतात , चित्पावनांसारखेच गोरेगोमटे दिसतात. रायगड आणि रत्नागिरी अशी स्थाननामे नंतर प्रचारात आली. त्या काळात हे अंतर ( म्हणजे अलिबाग - गुहागर ) फारसे नव्हते . या संदर्भात उल्लेखनीय मुद्दा म्हणजे सर्व मानवप्राण्यांची जन्मदात्री एकच होती असा डीएनए शास्त्रज्ञांचा सिद्धांत. काळा , पिवळा , तांबडा किंवा गोरा असा कातडीचा रंग कोणताही असला तरी मानवाचा वंश एकच आहे असे त्यांचे म्हणणे आहे . मानवास सर्वात जवळचा प्राणी म्हणजे चिंपांझी . त्याचे तीन वंश आहेत . तथापि मानवाच्या बाबतीत जगभर एकच वंश आहे . मानवी डीएनए सर्वप्रथम आफ्रिकेत उपजला आणि त्यानंतर जगभर पसरला , असे आता स्पष्ट झाले आहे. स्थलानुसार आणि हवामानानुसार विविध वर्ण विकसित झाले आणि त्यानुसार मानवगट स्थिरावले . मात्र त्यांची डीएनए रचना समान राहिलेली आहे . त्याबाबतच्या संशोधनामधून नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. चित्पावनांच्या संदर्भात असे दिसून आले की , अपवादात्मक का होईना पण त्यांच्यात ' लताशा ' ही आफ्रिकेतील जमात धारण करत असलेली डीएनए वैशिष्टो सापडली. हे साम्य कसे दिसले याचा समाधानकारक खुलासा अद्याप शास्त्रज्ञांना सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे . विशेष म्हणजे ' लताशा ' डीएनए आफ्रिकेबाहेर अद्याप सापडलेला नाही . चित्पावन हा आजवरचा याबाबतचा जागतिक अपवाद. सूर्य , अग्नी , ज्ञानदेवता , गोमाता यांच्या प्रतिमांचे पूजन प्राचीन काळात ज्यूधर्मीयांचा एक समूह करीत असे . मात्र त्याचे प्रमाण अल्प होते . अखेर मूर्तिपूजक एकीकडे आणि बाकीचे त्यांच्याविरुद्ध अशी विभागणी होऊन इ. स. पूर्व ८१६-८०० या काळातील जीहोवा राजाच्या अमदानीत मूर्तिपूजकांना हाकलून लावण्यात आले. मूर्तिपूजक आर्य आणि ज्यू मूर्तिपूजक एकत्र येणे अशक्य कोटीतील बिलकूल नव्हते. कारण त्यापूर्वीच सिकंदराने भारतापर्यंतचा रस्ता खुला करून ठेवलेला होता. चित्पावन आणि ज्यू यांच्या इतिहासातील आणखी एक साम्य म्हणजे १४ मृतांना पुन्हा प्राणदान करून परशुरामाने संजीवनी दिली अशी चित्पावनांची समजूत आहे , तर ज्यू पुराणानुसार सात पुरुष आणि सात स्त्रिया असे फक्त चौदा लोक भारतात जिवंत अवस्थेत पोहोचले . असा आणखी बराच तपशील आहे . विज्ञान जसजशी प्रगती करत जाईल तसतशी त्याची संगती लागत जाईल एवढीच अपेक्षा करणे आज तरी हाती आहे . मात्र एकीकडे पोर्तुगीजांची लढाऊ वृत्ती तर दुसरीकडे ज्यूधर्माची उपासना करणाऱ्यांबरोबर साम्य असे मिश्रण स्पष्टपणे जाणवून देणारे चित्पावन यशस्वी भारतीयांच्या यादीत अत्यंत ठळकपणे आढळून येतात. देशात आणि परदेशात कर्तबगारी गाजवणारे चित्पावन अनेक आहेत . त्यांचा तपशील सहजपणे उपलब्ध आहे. प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे या अंगाने अधिक संशोधन व्हावे अशी प्रेरणा निर्माण करण्याचा. हा लेख लिहीत असतानाच चित्पावनांवर प्रसिद्ध झालेले एक पुस्तक पाहण्यात आले . त्यात या लेखाच्या विषयाला स्पर्शही झालेला नाही . राजवाडे , भारताचार्य चिंतामणराव वैद्य आदींचे निबंध असले तरी वैज्ञानिक अंगाने या विषयावर झालेल्या प्रगतीची दखल कोठेही घेतल्याचे दिसत नाही. इ.स. १६०० पूर्वी कोकणस्थ नावाची संघटित पोटजात न सापडणे हे एक रहस्य ठरत असून त्याचा उलगडा झाल्यास अनेक मुद्यांवर प्रकाश पडेल. डीएनए चाचण्यांमुळे आपले पूर्वज शोधणे शक्य झाले आहे . त्यांचा वापर करून महाराष्ट्राच्या इतिहासाचे पुनर्लेखन करता येण्यासारखे आहे . कदाचित तसे घडल्यास कोकणस्थ पोटजातीस अधिक न्याय मिळू शकेल. ------------------------------------------------------- कोकणस्थ लबाड आहेत ! " कोकणस्थ हे लबाड आहेत. ते वाटेल तेव्हा राष्ट्रीय ( जहाल ) बनतात व वाटेल तेव्हा मॉडरेट ( मवाळ ) बनतात . " " पण आपल्या पक्षात कोकणस्थ आहेत ना ? तुम्ही कोकणस्थांवर विश्वास ठेवू नये , असे कसे बोलता ? " 'आपल्या पक्षात कोकणस्थ आहेत , त्यांना मी म्हणतो ते सांगायचे नाही. कारण त्यांना आपण आपले खरे विचार कधीच कळू देऊ नयेत. त्यांना आपण झुलवतच ठेवले पाहिजे . ते आपल्या पक्षाला मिळाले तरी त्यांना पुढे येऊ देता कामा नये . नाहीतर हे लेकाचे आहेत हुशार . आपण कोणताही पक्ष काढला तरी त्याला हे कोकणस्थ येऊन मिळतील आणि त्या पक्षाचे पुढारी होतील . म्हणजे आयता तयार झालेला पक्ष ते वापरतात . ते दुसऱ्या पक्षांतील कोकणस्थांविरुद्ध व्याख्याने देतील व त्यामुळे दोन्ही पक्षांतील कोकणस्थांचाच डंका होतो . हे लेकाचे देशस्थाला शिव्यादेखील देणार नाहीत . कारण ज्या देशस्थाला शिव्या मिळतील , त्या देशस्थाला महत्त्व येईल.( श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या आशावादी ' या कादंबरीमधून ) राजकीय ध्येयबुद्धी कोकणस्थ ब्राह्मणांस स्वाभाविक आहे . त्यांना राजकारण कोणी शिकवावयास नको . देशाच्या बरेवाईटपणाची जबाबदारी कोकणस्थ ब्राह्मणांवर असून देशातील इतर लोक आहारनिद्राभयमैथुन या पाशवी पातळीवर जगणारे आहेत . ( ' गोंडवनातील प्रियंवदा ' या श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या कादंबरीमधून ) कोकणातील ब्राह्मण समाजात पूर्वी चित्पावन हे हीन मानले जात होते. त्यांना हेर किंवा हरकारे समजत . देशस्थ ब्राह्मण त्यांना आपल्या पंक्तीला घेत नसत . म्हणून आपण देशस्थ असून अंबेजोगाईहून कोकणात आलो असे काही चित्पावन सांगू लागले. पण ही समजूत भ्रामक आहे. ( ' भारतीय संस्कृती कोश ' ) आमची कोठेही शाखा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूर येथे झाली . आज ही देशातील सर्वात मोठी अराजकीय संघटना आहे . ही स्थापना झाली तेव्हा पुणे हे राजकीय चळवळींचे केंद्र असल्याने संघस्थापनेची घोषणा पुण्यात व्हावी म्हणून प्रयत्न झाले. ते का सफल झाले नाहीत याचा तपशील उपलब्ध नाही. परंतु संघाची स्थापना नागपुरात झाल्यानंतर त्याचा सतत विस्तार झाला . संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार म्हणजे तेलंगी ( म्हणजे देशस्थ ब्राह्मण) संघ पुण्यात स्थापन झाला असता तर काय घडले असते ? पुण्यातील तत्कालीन काँग्रेसविरोधी ब्राह्मणी नेतृत्व चित्पावनांच्या प्रभावाखाली होते . त्यामुळे एखादा चित्पावन संघाचा संस्थापक झाला असता आणि कोणत्यातरी बोळात त्याने संघ कार्यालयावर ' आमची कोठेही शाखा नाही ' असा फलक लावून अखिल भारतीय म्हणून मिरवणाऱ्या हजारो संस्थांच्या यादीत एकाची भर घालून विषय संपवला असता , अशी उपहासपूर्ण चर्चा आजही ऐकू येते. असल्या चर्चेतून कोकणस्थ ब्राह्मण आणि पुणे यांच्याबद्दलची हेटाळणीची भावनाच स्पष्ट होते. ' सोबत'चे संपादक ग. वा. बेहेरे म्हणजे अगदी चित्पावनांचा अर्क. गोरेपान , निळे डोळे , पिंगट केस असे बेहेरे पहिल्या भेटीतच इतरांवर छाप टाकत असत . पुण्याचा त्यांना विलक्षण अभिमान असे . एकदा मुंबई - पुणे प्रवासात त्यांना गुप्ता नावाचे अस्खलित मराठी बोलणारे गृहस्थ भेटले . दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि रंगत गेल्या . गुप्तांचा पुण्यात कसलासा व्यापार होता. गप्पांच्या ओघात बेहेऱ्यांनी विचारले , " गुप्ता , तुम्ही मूळचे कुठले ? " " आम्ही पुणेकरच " असे उत्तर गुप्तांनी दिले. ते बेहेऱ्यांना पचले नाही . " तुम्ही मूळचे पुण्याचे असणे शक्यच नाही. व्यापारानिमित्त उत्तरेतून फिरत आलेले तुमचे पूर्वज पुण्यात स्थायिक झाले असणार , " असे बेहेऱ्यांनी त्यांना सुनावले. आता गुप्तांमधील पुणेकर जागा झाला. “ आमचे राहू द्या. बेहेरे साहेब , तुम्ही मूळचे भारतीय आहात याला तरी काय पुरावा आहे ? " असा प्रतिप्रश्न गुप्तांनी केला. या संभाषणाची अखेर काय झाली हे महत्त्वाचे नाही . मात्र चित्पावनांबद्दलची इतरांची भावना त्यातून स्पष्ट होते . ( जयराज साळगावकर यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमधून )

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 41263 views

🗣 चर्चा (114)
आ
आंद्रे वडापाव Sun, 08/08/2021 - 12:37 नवीन
याचरोबरीने/ अश्याच तर्काने राहुल गांधीचा पदावरील क्लेम काही लोकांना मान्य वाटतो की काय ? अशी शंका मनात येत आहे. (चौ को तुम्ही वैयकतिकरित्या नाही, इन जनरल)
च
चौथा कोनाडा Sun, 08/08/2021 - 14:01 नवीन
पॉईन्टात मुद्दा आहे .....

😂

आणि ली क्वान यू यांच्या या क्वोटवरून लै दंगा झालेला. बर्‍याच लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती, पण हा हुकुमशहा बधला नाही
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/04/2021 - 16:00 नवीन
वाईमधुन कोकणात गेले, तिकडेच वसती करुन राहिले असा घराण्यातला किस्सा सांगण्यात येतो. बाकी जोगेश्वरीबद्दलचा किस्सा म्हणजे, ती देवी मुळची कोकणातलीच. पण काही कामानिमीत्त (कि कोण्या एका लग्नाच्या निमित्ताने) आंबेजोगाईकडे गेली, अन तिकडेच स्थान करुन राहिली अस तिथल्या पुजारी लोकांनी सांगीतले. हव्या तितक्या कथा. ह्या धाग्यात रुपकुंडाचा उल्लेख कसा नाही? इसवी सन ८५० मधे काही कोकणस्थ यात्रेच्या निमित्ताने तिकडे गेले असतांना बिचारे कुंडात बुडाले. जवळ्पास दोनेकशे सापळे आहेत तिकडे.
उ
उपयोजक Wed, 08/04/2021 - 20:30 नवीन
इथे जी संशोधन झाली त्यांचे अधिकृत अहवाल सर्वांसाठी उपलब्ध आहेत का? रुपकुंडाच्या संशोधनात ते सापळे चित्पावन समाजाच्या लोकांचेच होते असे स्पष्टपणे लिहिलेय का? की ती शक्यता वर्तवलीय?
म
मनो गुरुवार, 08/05/2021 - 09:45 नवीन
चित्पावन आणि रुपकुंड येथील हाडांचा काहीही संबंध नाही. हा मूळ लेख वाचा. https://www.nature.com/articles/s41467-019-11357-9
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/06/2021 - 07:50 नवीन
मेडिटेरियन म्हणताय, इंडिया टुडेवाले चित्पावन म्हनताय म्हन्जे चित्पावन मेडिटेरियन होते, युरेशियन नै असा निश्कर्श काडायला आपण मोकळे (क्रुप्या हलके घेने)
म
मदनबाण गुरुवार, 08/05/2021 - 07:05 नवीन
बाकी जोगेश्वरीबद्दलचा किस्सा म्हणजे, ती देवी मुळची कोकणातलीच. पण काही कामानिमीत्त (कि कोण्या एका लग्नाच्या निमित्ताने) आंबेजोगाईकडे गेली, अन तिकडेच स्थान करुन राहिली अस तिथल्या पुजारी लोकांनी सांगीतले. हव्या तितक्या कथा. आम्हा कोकणातल्या बापट लोकांची कुलदेवता घाटावरची जोगेश्वरी (म्हणजे अंबेजोगाई) कशी काय याबद्दल कोणी सांगू शकेल का? योगेश्वरीचे मूळ स्थान म्हणजे गुहागर निवासीनी दुर्गा ! काही लोकांच्या मते योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरी (अप्रभ्रंशीत झालेले). कोकणातल्या कोणाचेही "कुलदैवत" कोकण सोडुन आढळत नाही,त्यावरुन हे अनुमान काढले गेले असेल. (डॉ.आनंद खरे) संदर्भ :---|| दुर्गाश्री|| लेखन व संकलन :--- कविता मेहेंदळे या एका धाग्यावरुन अनेक धागे आठवले ! लग्नाच्या "बाजार'गप्पा! आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!! गोत्रांची संपूर्ण यादी जाता जाता :- जाहिरात... :- चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी [ कब्रा ] मदनबाण..... आजची स्वाक्षरी : - “Astrology is one of the oldest and most accurate tools known to mankind.” :- Chris Flisher
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/05/2021 - 08:11 नवीन
लेख बर्‍यापैकी माहितीपूर्ण वाटला. पण पुन्हा पुन्हा पेशवाईतील जेवणावळी आणि नथुराम गोडसेंचा उल्लेख करुन लेखकाला काय साधायचे आहे ते समजले नाही. बाकी कोकणस्थांनी दिलेल्या सामाजिक/आर्थिक योगदानाकडे दुर्लक्ष करणे, आरक्षण नसणे, मनोहर जोशी किंवा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर "बहुजन समाजाचा नेता हवा होता" असे गळे काढणे या बद्दल न बोललेलेच बरे. एखाद्या जातीबद्दल एव्हढा द्वेष फारच विरळा पहायला मिळतो. कदाचित तो पद्धतशीर राजकारणाचा भाग असावा. जसे की पाकिस्तानात कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत द्वेषाचा अजेंडा त्याला राबवावाच लागतो तसेच. "दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम" असा श्लोक आहे, म्हणजे कुठल्या कुळात जन्म मिळेल हे नशीबावर अवलंबुन आहे, परंतु यश खेचुन आणणे तुमच्यात किती धमक आहे त्यावर असते. याच न्यायाने ब्राम्हण्,मराठा,जैन्,गुजराथी,मुसलमान्,मारवाडी कोणीही नोकरी करु शकतो, धंदा करु शकतो किवा ईतर कोणत्याही मार्गाने यशस्वी होऊ शकतोच की. तरीही पिढ्यान पिढ्यांची सवय म्हणा, परंपरा म्हणा किवा गुणसुत्रे म्हणा बहुसंख्य ब्राम्हण शिक्षण किवा नोकरी करणार, गुजराती/मारवाडी कोणतातरी धंदा करणार असे कल दिसुन येतात. योगेश्वरी आंबेजोगाई बद्दल--कोकणातील काही मुलांना (त्या परशुरामाच्या १४ जणांना/ वाहुन आलेल्या आणि जिवंत केलेल्या प्रेतांना) मराठवाड्यातील मुली केल्या आणि तिथल्या ग्रामस्थांनी वर्षातुन एकदा मुलींना माहेरी पाठवायची गळ घातली. म्हणुन कोकणस्थांनी योगेश्वरीला कुलदेवी मानली आणि वार्षिक भेट/दर्शनाची प्रथा ठेवली असे म्हणतात.(जाहीरात) http://misalpav.com/node/32373 आपले मूळ शोधायची उत्सुकता सगळ्यांमध्ये उपजतच असते/असावी. त्याच उत्सुकते पोटी लिहिलेला लेख(जाहीरात) http://misalpav.com/node/42524
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 08/05/2021 - 08:17 नवीन
ही उत्पत्ती जास्त लॉजीकल वाटते.
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/05/2021 - 17:53 नवीन
बाकी काही असो पण "ब्राह्मण" विषय आला की एकंदरीत पब्लीकला भलताच चेव चढतो हे पाहून अंमळ मौज वाटते. माझ्या ब्राह्मण मित्रांना गंमतीने मी म्हणतो देखील की बाबांनो तुम्ही कार्याचे (मंगल कार्य वगैरे) पैसे नाही कमवत तर शिव्या खायचे पैसे कमावता. ते देखील हसून सहमती दर्शवितात.
च
चौकस२१२ Fri, 08/06/2021 - 02:05 नवीन
ते देखील हसून सहमती दर्शवितात. आता हि साता उत्तराची कि काय म्हणतात ती कहाणी येथेच थांबवूयात का सगळे जण,,, मूळ लेख एक अ भ्यास म्हणून वाचा आणि सोडून द्या... त्यात लेखाचा हेतू वाईट नसावा फक्त थोडी मिसल झाली आहे मेहंदळे यांनी सुचवल्याप्रमाणे असे वाटते लेखाचा मूळ मुद्दा वर्णन करायाच झालं तर ते माझ्य मते असा असावा कि " हा "रिव्हर्स रेसिसम" चा हा प्रकार ... कोणत्याही समाजाने आपल्या संस्था चालवल्या, जातीचं झेंडयाखाली आले ( मराठा महासंघ, सारस्वत सभा, सीकेपी मंडळ ) तर ते चालते मग या एकाच जातीवर निशाण का ? २०२१ वर्षी मधेय सुद्धा सावरकर आणि त्यांची जात यावर बोलले जाते म्हणजे ती जात You can hate them but can't ignore them "या सदरात मोडते असे म्हणू शकतो .. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो
र
राघव Fri, 08/06/2021 - 15:07 नवीन
मला वाटतं चातुर्वर्ण्य हा प्रकार, मुळात माणसाच्या वृत्तीशी निगडीत असावा. त्याची जात कधी बनली असेल हा प्रश्न अनेकदा पडतो. जे जाती व्यवस्था नको म्हणून सांगतात, त्यातील अनेकांना स्वतःच्या पोरीबाळींसाठी रोटी-बेटी व्यवहार जातीतूनच लागतात हे प्रत्यक्ष पाहण्यात आहे. त्यामुळे त्यात काही विशेष तथ्य उरत नाही. अर्थात् जाती व्यवस्था नको म्हणून ती काही संपणारी नाही. कितीही आगपाखड केली तरीही. आणि खरं सांगायचं तर त्याची तशी गरजही नाही. त्यापेक्षा या जातीव्यवस्थेच्या उत्क्रांतीबद्दल विचार व्हायला हवा, जेणेकरून समाजव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. कोकणस्थ आणि इतर असा वाद निर्माण होण्याचं कारणच मुळात "श्रेष्ठ कोण" या चुकीच्या विचारात आहे. हे म्हणजे सैन्यातल्या विविध रेजिमेंट मधे "कोणती रेजिमेंट श्रेष्ठ?", असा प्रश्न विचारण्यासारखे झाले. अरे ते योग्य आहे का? देश प्रथम ही भावना तिथे महत्त्वाची असते की नाही? रेजिमेंट बद्दल आदर असतोच आणि असायलाच हवा. पण देशासाठी सगळे एका ध्वजाखाली एकत्र येतातच ना? मग तसेच समाजव्यवस्थेचे का नसावे? आपल्या जातीबद्दल आदर असण्यात काहीच गैर नसावं. पण कोणतीही एक जात दुसर्‍या जातीपेक्षा श्रेष्ठ कशी होऊ शकेल? तो विचारच मुळात योग्य नाही. समाजातील तेढ विनाकारण वाढण्याशिवाय त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. श्रेष्ठत्त्वाचा विचार करायचा झाल्यास, व्यक्तीचं कर्तुत्व श्रेष्ठ असू शकेल. शिवरायांमुळे मराठा श्रेष्ठ होत नाही आणि बाजीरावांमुळे ब्राह्मण श्रेष्ठ होत नाही. ज्याचं त्याचं आपापलं कर्तुत्व श्रेष्ठ ठरतं. त्या व्यक्तींची किंवा त्यांच्या कर्तुत्वाची तुलना देखील चुकीची आहे. "कोणाचं परमवीरचक्र श्रेष्ठ?" असा प्रश्न चुकीचा होईल ना? तस्सं. ते केवळ अतुल्य असतं! त्यातून फक्त प्रेरणा घ्यायची असते. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या शिकायच्या असतात, आचरणात आणायच्या असतात. बाकी आरक्षण वगैरे बद्दल काही बोलून वेळ दवडण्यात अर्थच नाही. सर्व जाती-धर्म मिळून, केवळ आर्थिक स्थितीवर आरक्षण असायला हवं हे बहुदा आता सगळ्यांनाच पटतं. लोकांना वेगवेगळ्या स्वार्थप्रेरीत कारणांसाठी हेतूपुरस्सरपणे ते मान्य करायचं नाही हा भाग निराळा. इत्यलम्
ट
टर्मीनेटर Sun, 08/08/2021 - 15:14 नवीन
उत्तम प्रतिसाद राघवजी! प्रत्येक वाक्याशी सहमत आहे 👍
R
Rajesh188 Sat, 08/07/2021 - 16:08 नवीन
बुद्धिमान माणूस कोणाला म्हणायचे,फक्त बुध्दी वान असेल की यश मिळते का? आपले मनमोहन सिंग जी बुद्धिमान होते पण बेफिकीर,बेधडक नव्हते.त्या मुळे स्वतःचे वलय ते निर्माण करू शकले नाहीत. जिद्द,धडाडी,बेफिकीर पना,निर्णय घेण्याची क्षमता, हे सर्व गुण असेल तर च यश मिळते. मग ते युद्धात,प्रेमात,धंद्यात,सवर ठिकाणी . फक्त बुध्दी आहे आणि वरील कोणतेच गुण नाहीत तर तो व्यक्ती यशस्वी होत नाही. त्या मुळे फक्त बुध्दी चा गर्व नको. वरील चर्चे चा निष्कर्ष असा काढला पाहिजे की जसे म्हसी मध्ये . जाफराबादी,पंढरपुरी,गावठी. जसे गायी मध्ये . जर्सी,देशी,खिल्लारी,हॉस्टेल,गिर. अशा जाती आहेत आणि प्रतेक जाती ची शारीरिक क्षमता वेगळी आहे,दूध देण्याची क्षमता वेगळी आहे.रोग प्रतिकार शक्ती वेगळी आहे.उंची,लांबी वेगळी आहे. गुण वेगळे आहेत. तसेच प्रकार माणसात पण आहेत . ह्या वर काही सभासद ठाम आहेत असे दिसते.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा