मंत्रिमंडळ बदल : ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या
सुप्रीम लीडर नी भारताच्या इतिहासातील सर्वांत "तरुण" मंत्रिमंडळ म्हणून नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती काल केली. त्यामुळे सरासरी वय ६१ वरून आता कोवळ्या ५८ ह्या तरुण वयावर येऊन थांबले आहे. ह्या तारुण्याच्या जोशांत नवीन मंत्रिमंडळ भरपूर काम करेल अशी अशा करूया.
मंत्रीमंडळ म्हणे "परफॉर्मन्स" पाहून निर्माण करण्यात आले आहे. काँग्रेस ने ह्यावर प्रचंड आश्चर्य व्यक्त केले. परफॉर्मन्स पाहून मंत्रीपदे बदलणे ह्याचा अर्थ कुणी तरी मंत्री परफॉर्म करत नाही असे मान्य करणे आहे असे श्री शिडंबरम इत्यादींनी म्हटले. परफॉर्मन्स आणि मंत्रिपद ह्यांचा संबंद नक्की काय हे समजण्यास राहुल गांधी ह्यांनी आपल्या भाडोत्री विद्वानांची बैठक बोलावली आहे असे गुप्त सुत्रा कडून मला समजले आहे.
त्याशिवाय सुप्रीम लीडर नि एक नवीन मंत्रालय निर्माण केले आहे "सहकार मंत्रालय". आधीच देशाच्या मृतवत शरीरावर जी अनेक मंत्रीरुपी गिधाडे बसली होती त्यांत आणखीन एकाची भर पडली. कोळसा मंत्रालयाने कोळशाची वाट लावली, विमानवाहूतक मंत्रांनी विमानवाहतूक खड्ड्यांत घातली, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आपण बांगलादेश आणि व्हिएतनाम च्या हि खाली आलो. त्यामुळे सहकार मंत्रालय सुद्धा भारत सरकारच्या ह्या गौरवशाली परंपेरला कायम ठेवून सहकार क्षेत्र खड्ड्यांत घालील ह्यांत मला तरी शंका नाही. बारामतीश्रेष्ठिनी ह्या मंत्रिपदाचा धसका घ्यायला पाहिजे.
नवीन मंत्रीपदे कुणाला मिळाली आहेत ह्यापेक्षा कुणा कुणाला नारळ देण्यात आला आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेणे मजेशीर आहे.
- डॉक्टर हर्षवर्धन ह्यांना आरोग्यमंत्रालयातून नारळ देण्यात आला आहे.
हा निर्णय अत्यंत योग्य आहे. हर्षवर्धन हे "हात लावीन तिथे आग" ह्या प्रकारचे आहेत. ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा दिल्लीचे संपूर्ण पतन झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली द्वितीय कोविड ने भारतांत धुमाकूळ घातला. हर्षवर्धन ह्यांनी दुसरी वेव्ह येणार नाही अशी मोदी ह्यांना खात्री दिली होती म्हणूनच मोदी हे गाफील राहिले. आपली गच्छंती होणार हे हर्षवर्धन ह्यांना आधीच समजले असल्याने त्यांनी मागील महिनाभर सर्वत्र मोदी ह्यांच्या पायाखाली लोटांगण घालण्याचे सत्र आरंभले होते. त्यांनीच "हेल मोदी" हे "हेल हिटलर" छाप बिरुद ट्विटर वर वापरायला सुरुवात केली होती. ह्यांची जागा मनसुख मांडवीया ह्यांना देण्यांत आली आहे.
हर्षवर्धन हे गोठ्यात असलेल्या म्हाताऱ्या गायीप्रमाणे आहेत. दूध देणार नसली तरी आपुलकी म्हणून हिला गोठ्यांत जागा दिली जाते. हर्षवर्धन ह्यांच्याकडून काही लक्षवेधी काम भविष्यांत होणारे नाहीच.
- प्रकाश जावडेकर
ह्यांच्या जाण्याने मला प्रचंड दुःख झाले आहे. पूर्णपणे निष्क्रिय असा हा माणूस मोदी सरकारविषयी विनोदाची गंगाच होती. ह्यांची संपूर्ण कारकीर्द हि निष्क्रियतेने भरलेली आहे. MHRD म्हणून ह्यांनी शून्य काम केले आणि वर अभिमानाने "काँग्रेसचाच वारसा आपण चालवत आहोत" असे आम्हाला सांगितले. आपण काही करायचे नाही आणि दिवसभर ट्विटर वरून सुप्रीम लीडर ह्यांना visionary, historic असली विशेषणे लावत भरपूर चाटुकारिता करायची हे एकच काम ह्यांनी आरंभले होते. आता ह्यांची राजकीय कारकीर्द सॅम्पलयांत जमा आहे.
ह्यांच्या कडे नक्की कुठले मंत्रिपद होते हे सुद्धा लक्षांत राहत नव्हते कारण त्याविषयावर ह्यांचे ज्ञान आणि कार्य शून्य होते. त्यांच्या मुलाखती विनोदी बनल्या होत्या आणि मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेचा चेहेरा म्हणजे जावडेकर बनले होते. ट्विटर वर जावडेकर शोधले तर तुम्हाला जबरदस्त विनोद सापडतील.
- रवी शंकर प्रसाद
जावडेकरांना निष्क्रियतेच्या बाबतीत जर कोणी टक्कर देऊ शकत असेल तर ते हे महापुरुष. निष्क्रियता सोडून द्या उलट काँग्रेस मधील नेते मंडळींचा सल्ला घेऊनच कायदे निर्माण करण्याचे सत्र ह्यांनी आरंभले होते. ह्यांच्या नेतृत्वाखालील नवीन IT कायदे काँग्रेसी खेचरांनीच पुढे रेटले होते. काँग्रेस ची हार आणि सुप्रीम लीडर चा उदय ह्याला प्रमुख कारण म्हणजे सरकारी नियंत्रणापासून दूर असलेली आधुनिक मीडिया हे काँग्रेस च्या नेत्यांनी आतापर्यंत ओळखले आहे आणि आधुनिक मीडिया चे कंबरडे मोडणे आणि सरकारी दंडुक्याची भीती पुंन्हा सामान्य मतदाराच्या हृदयांत घालणे हे काँग्रेस सरकारचे आताचे नवीन ध्येय आहे. सुदैवाने प्रसाद ह्यांनी काँग्रेस चे काम जास्त सुकर केले आणि नवीन IT कायदे पुढे आणले.
ट्विटर ने ह्या कायद्यांचे पालन करण्यास नकार दिल्याने मात्र प्रसाद ह्यांची शोभा तर झालीच पण उलट प्रसाद ह्यांच्यामुळे सुप्रीम लीडर "वीक" वाटतात अशी कुजबुज सुरु झाली. त्याशिवाय भाजपचे IT सेल वाल्यानी सुद्धा म्हणे ह्या नवीन कायद्यावर सुप्रीम लीडर कडे तक्रार केली. पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे हे कायदे प्रसाद ह्यांनी नक्की पुढे का रेटले ह्यावरच शंका उत्पन्न झाली होती. बहुतेक वेळा असे दूरगामी कायदे हे सर्व कंपन्यांना विश्वासात घेऊनच केले जातात पण ह्यावेळी तसे घडले नाही आणि सुमारे $३००M च्या भारतीय गुंतवणुकी आता अमेरिकन आणि चिनी कंपन्यांनी पॉज केल्या आहेत. त्याशिवाय अमेरिकन दूतावास आणि विविध CEO ह्यांनी प्रसाद ह्यांच्या कारभारावर बऱ्याच तक्रारी केल्या होत्या म्हणे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अश्या अविर्भावांत प्रसाद ह्यांनी ट्विटर ला धमकी दिली पण ट्विटर ने अजून कायद्याचे पालन केले नाही तरी प्रसाद विनवणी सोडून आणखीन काहीही करू शकले नव्हते. भाजपच्या आतील वर्तुळाने ट्विटर वर बंदी आणणे भाजपच्या फायद्याचे नाही त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की तर होईलच पण अमित मालवेर च्या अर्ध्या टीम ला काहीही काम राहणार नाही असे चिंतन केले होते म्हणे. त्याशिवाय तामिळनाडू मधील उदाहरण पाहून ह्या कायद्याने भाजप कार्यकर्त्यांनाच जास्त त्रास होईल असे भाजप समर्थकांचे म्हणणे होते. थोडक्यांत प्रसाद ह्यांनी कुणा काँग्रेस धार्जिण्या माणसांचेच ऐकून हि गडबड केली होती.
प्रसाद ह्यांची राजकीय कार्यकीर्द आता संपल्यांत जमा आहे.
- पोखरीयल
MHRD च्या बाबतीत सुप्रीम लीडर नेहमीच अत्यंत दुर्दैवी ठरले आहेत. किंवा कदाचित बिनकामाच्या व्यक्ती त्यांनी जाणून बुजून इथे पार्क केल्या असाव्यात. आधी स्मृती इराणी MHRD होत्या ज्यांनी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत खोटे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यांना अचानक काढून त्यांच्या जागी जावडेकर ह्यांना आणले. ह्यांनी त्या पदावर विक्रमी स्तराची कामचुकारी दाखवली आणि वरून त्याचे समर्थन केले.
त्यानंतर ह्या पोखरीयल ह्या माणसाची नेमणूक झाली. ह्यांचे नाव सुद्धा लक्षांत ठेवणे कठीण होते आणि हि व्यक्ती कालपर्यंत आपण उर्दू भाषेच्या प्रसारासाठी किती मेहनत घेतली आहे ह्याची बतावणी करत होते. आता पोखरीयल ह्यांना दोष देऊन फायदा नाही कारण ह्या मंत्रिपदाचा सुप्रीम लीडर काहीही महत्व देत नाहीत हेच कदाचित त्याचे कारण असावे.
पोखरीयल ह्यांची राजकीय कार्यकीर्द तशी मोठी नाव घेण्यासारखी नव्हतीच.
****
स्म्रिती इराणी - ह्यांना वस्त्रोद्योग मधून काढून आता महिला कल्याणात टाकले आहे. ह्यांची उचलबांगडी वारंवार का होत आहे हे मला एक कोडे आहे. MHRD मध्ये ह्यांनी आधी भरपूर गोधळ घातला असला तरी उत्तरार्धांत त्यांना तेथील कामाची बऱ्यापैकी समज आली होती. RTE ह्या विषयावर गांभीर्याने विचार केलेली हि एकमेव भाजपाची मंत्री. आधी तिने काहीच ऐकून घेण्यास नकार दिला असला तरी शेवटी त्यांनी ह्या विषयांत लक्ष घातले. पण तेंव्हाच त्यांना काढून जावडेकर ह्यांना आणले. आता वस्त्रोद्योगात त्यांचा जम बसला असे वाटत होते तेंव्हाच त्यांना महिला कल्याणात टाकले आहे. हे प्रोमोशन आहे कि डिमोशन समजणे अशक्य आहे.
****
सुप्रीम लीडर ह्यांचे कॅबिनेट मधील टॅलेंट डेफिसिट अतिशय उघड दिसून येत आहे. स्वयंप्रकाशी असे एक दोनच नेते इथे आहेत. त्यांच्यांत सुद्धा विशेष कार्यक्षमता आहे असे दिसत नाही. जेटली, स्वराज, पर्रीकर ह्यांना परमेश्वराने अकाली नेले. त्यांच्यात जी नेतृत्व क्षमता होती ती धमेंद्र प्रधान, राजनाथ सिंग, सीतारामन किंवा पियुष गोयल ह्यांच्यात दिसत नाही. पप्पू च्या आजूबाजूला जो घोळका असतो तसाच हा घोळका वाटतो.
कदाचित सुप्रीम लीडर ना सुद्धा हे ठाऊक आहे. त्यांना कदाचित स्वयंप्रकाशी नेत्यांची भीती तरी वाटत असावी किंवा त्यांना आपली स्वतंत्र बुद्धी आहे हा त्यांच्या साठी अडथळा बनत असावा. त्यामुळे परराष्ट्र खाते सारख्या विभागांत ह्यांनी जुन्या बाबूंना मंत्री म्हणून नेमले आहे. आता सुद्धा विविध मंत्रिपदावर जुने बाबू लोक आहे. ह्यांना हुकूम ऐकून निर्बुद्ध पणे अंमलबजावणी करण्याची सवय असते आणि सुप्रीम लीडर च्या कार्यशैलीला हे कदाचित चांगले वाटत असावे.
काँग्रेस नी 60 ते 70 वर्ष सत्ता उपभोगली आहे. यादव फॅमिली नी पण खूप वर्ष सत्ता उपभोगली आहे. ठाकरे शिवाय महाराष्ट्र चे राजकारण पूर्ण होत नाही म्हणून तिथे घराणेशाही. Bjp मध्ये मोदी च दुसऱ्या टर्म मध्ये पंतप्रधान आहेत. किती तरी वर्ष सत्ता मिळाली म्हणून मोदी गुजरात चे मुख्य मंत्री होते.नेतृत्व आणी घराणेशाही यातला फरक समजाउन सांगाल का मज अजाण बालकाला? प्लीज. ते नसेल जमणार तर त्यांच्या व्याख्या तरी सांगा.पुढच्या निवडणुकीत पण bjp नी निवडणूक जिंकली तर मोदी च पंतप्रधान असतील.हम्म. हे खरे दुखणे आहे :-)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - I know that I am intelligent, because I know that I know nothing. :- Socrates