समास
समासातल्या रेषेला सुद्धा ओढ असते शाईची. तिथल्या मोकळ्या जागेला वाटतं आपल्यावरही उमटावी अक्षरांची काळी-निळी नक्षी. ती वाचतांना फिरावा कुणाचातरी हात आपल्यावरून आणि स्पर्श व्हावा थेट वाचकाच्या मनाला. अनुभवावीत ती भावनांची वादळे नि:शब्द होवून. पण समासाला कुणी सांगावं, तुझं रितेपणच कागदाच्या तुकड्याला त्या शब्दमुद्रा झेलण्यास योग्य बनवतं. ओळींत न सापडणारे अर्थ त्या समासाच्या पटलावरच लिहिले जातील. काही लिहायचे राहून गेले तर लेखकाला समासाचा किती आधार असतो. स्वतः सोबत घालवलेले एकांतातले क्षण म्हणजे आपल्या आयुष्याचा समास! जे राहून गेलं ते भरणारा मोकळा समास!
लहानपणी गृहपाठाच्या वहीत समासात अनुक्रमणिका आखली जायची.ती अनुक्रमणिका होती की स्वप्नांची पाखर ?पाखरू एक पाखरू दोन अशी असंख्य पाखर पंख लावायची आणि भुर्रर स्वप्नाच्याच आकाशात उडायची.हळू हळू लेखणीतली शाई गुलाबी झाली त्याच्याबरोबराच्या स्वप्नांची यादीने समास आकड्यांऐवजी चांदण्यांनी भरून जायचे...कधी ते पान सामासाला घेऊन भरकटलं आणि शाई जराशी हट्टी झाली कर्मयोगाच्या बाता मारत पुन्हा आकड्यांशी हातमिळवणी झाली....आतातर समास नाहीसाच झालाय ...आपल्यालाच आखावा लागतो कधी ओळींना अर्थ देण्यासाठी ,कवितेतील मात्रा मोजण्यासाठी,प्रेमाच फुलं चितारण्यासाठी!!समास आहे म्हणून तर आयुष्य सुटसुटीत आणि सोप्प झालाय नाहीतर नुसताच पसारा शब्दांचाच ! --भक्ती