हंपी: भाग ८ (अंतिम) - विठठ्ल मंदिर आणि राजतुला
हंपी: भाग १ - चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं
हंपी: भाग २ - राजवाडा परिसर
हंपी: भाग ३ - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार
हंपी: भाग ४ - दारोजी अस्वल अभयारण्य
हंपी: भाग ५ - विरुपाक्ष मंदिर आणि हेमकूट टेकडी
हंपी: भाग ६ - कृष्ण मंदिर, लक्ष्मीनृसिंह आणि बडवीलिंग मंदिर
हंपी: भाग ७ - अंतःपुर, पद्ममहाल आणि गजशाळा
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विठ्ठल मंदिर अर्थात विजय विठ्ठल मंदिर हे हंपीतले सर्वात महत्वाचे ठिकाण. हे प्रसिद्ध आहे ते इथल्या भव्य दगडी गरुडरथामुळे आणि इथल्या अद्भूत नादमय स्तंभांमुळे. याशिवाय इतरही अनेक आश्रर्ये ह्या मंदिरांच्या विविध अंगांवर आहेत. विठ्ठल मंदिरात जाण्यासाठी दोन प्रमुख रस्ते आहेत. एक आहे पायी जाण्याचा आणि दुसरा गाडीमार्ग.
पायी जाण्याचा रस्ता जातो तो विरुपाक्ष मंदिराच्या पुढ्यात असलेल्या हंपी बाजारातून. तुंगभद्रा नदीकाठावर असलेले अवशेष बघत मातंग टेकडीला वळसा मारत दुमजली प्रवेशद्वारातून विठ्ठल मंदिरात पोहोचता येते. हा मार्ग आहे सुमारे ३ किलोमीटरचा. ह्या मार्गाने विठ्ठल मंदिरात जायचे म्हणजे आपल्या हातात भरपूर वेळ हवा, कारण ह्या रस्त्यावर जागोजागी असंख्य अवशेष आहेत. दुपारचे कडक उन्ह टाळण्यासाठी सकाळी लवकर उठून ह्या मार्गाने जाणे सर्वात इष्ट . दुसरा मार्ग आहे तो गाडीरस्त्याचा. कमलापूर कांपिली रस्त्यावरुन जाऊन अंजनेय मंदिरावरुन विठ्ठल मंदिराला जाणारा फाटा घ्यायचा. आणि तलरीगट्ट प्रवेशद्वारातून विठ्ठल मंदिराच्या अलीकडे असणारा स्टॉप गाठायचा. हे अंतर सुमारे ६/७ किलोमीटर पडते. येथे गाडी लावायची, इथूनही विठ्ठल मंदिर सुमारे दिड किलोमीटर आहेच, पण मंदिरात जाण्यासाठी बॅटरीने कार्यान्वित अशा गोल्फ कार सारख्या गाड्या आहेत. एका गाडीत सहा ते आठ लोक बसू शकतात. आमच्याकडे वेळ कमी असल्याने आम्ही येथे गाडीमार्गानेच आलो आणि विठ्ठल मंदिराकडे जाण्यास निघालो. बग्गी स्टॅण्डवर जाऊन तिकिट काढून गाडीत बसलो. इथून सतत आपल्या उजवीकडे दिसत राहतो तो लांबच लांब पसरलेला विठ्ठल बाजार. ह्याच रस्त्याला रथ मार्ग असेही म्हणतात.
विठ्ठल बाजारातील पुष्करिणी
रथमार्गावरुन जाताना विठ्ठल बाजाराच्या विरुद्ध दिशेस एक मंदिरवजा मंडप दिसतो तो आहे कुदुरेगोम्बे मंडप, हेही बहुधा विश्रांतीचे ठिकाण असावे. कन्न्डमध्ये कुदुरे म्हणजे घोडा
कुदुरेगोम्बे मंडप
हे बघत बघतच विठ्ठल मंदिरापाशी पोहोचलो. मंदिराच्या पुढ्यातच मंडप असलेल्या बाजाराची रचना आहे.
गोपुरावरील शिल्पांकन
गोपुरावरील शिल्पांकन
विठ्ठल मंदिराच्या संकुलात प्रवेश करताच पहिली नजर जाते ती तिथल्या भव्य दगडी रथाकडे. डावीक्डे येतो तो कल्याण मंडप, त्याच्यापुढेच उत्सव मंडप आहे तर डावीकडे अजून एक मंडप आहे. सर्वच मंडप विविध शिल्पांनी नटलेले आहेत. तर मुख्य मंदिरात महामंडप अर्थात सभामंडप, अंंतराळ आणि गाभारा असे विविध विभाग आहेत.
दगडी गरुड रथ
विठ्ठल मंदिराचे हे सर्वात प्रमुख आकर्षण. प्रथमदर्शनी एकपाषाणी वाटणारा हा दगडी बनवला गेला आहे तो ग्रॅनाईटच्या मोठमोठ्या ठोकळ्यांनी, सांध्यांची जागा मोठ्या खुबीने विविध शिल्पे, नक्षीकामाने झाकलेली आहे. रथ एका चौथर्यावर उभारलेला असून रथाला चार दगडी चाके आहेत. ही चाके इतक्या हुबेहूब कोरली गेलेली आहेत की ती जणू आजही फिरतील असेच वाटते. चक्राच्या दांड्यात ही चाके बसवली आहेत. चाकांवर नाजूक नक्षीकाम आहे, चाकांच्याच बाजूला रथाच्या अधिष्ठानाखाली भारवाहक यक्षांनी रथ तोलून धरलेला आहे. रथ वाहण्यासाठी पूर्वी दगडी घोडे होते, जे आजमितीस पूर्णपणे नष्ट झालेले असून तिथे आता हत्ती बसवेलेले आहेत, मात्र मूळच्या घोड्यांच्या शेपट्या तिथे आजही बघता येतात. दोन घोड्यांच्या मध्यभागी रथात प्रवेश करायला दगडी शिडी आहे.
हे मंदिर विष्णूचे साहजिकच विष्णूचे वाहन गरुड ही ह्या रथाची देवता, ही मूर्ती पूर्वी रथात प्रतिष्ठापित होती, आजमितीस ती तेथे अस्तित्वात नाही.
दगडी रथ
रथाची चक्रे व बाजूला भारवाहक यक्ष
नंतर बसवलेले हत्ती आणि मूळच्या घोड्यांच्या शेपट्या
दगडी रथ
गोपुर आणि दगडी रथ
रथाच्या पुढ्यातच आहे विठ्ठल मंदिराचा महामंडप
महामंडप
ह्याच मंडपात विठ्ठल मंदिराचे अद्भूत नादमय स्तंभ आहेत. स्तंभ सतत वाजवून त्यांची हानी होत असल्याने सध्या तिथे वाजवून बघायला बंदी आहे इतकेच नव्हे तर दुरुस्तीच्या नावाखाली साधे महामंडपात देखील प्रवेश करायला बंदी आहे. गाभार्यात जायचे असल्यास डावीकडच्या लहानश्या दरवाजाने अंतराळात जाता येते. इथल्या वाजणार्या स्तंभांचे रहस्य समजून घेण्यासाठी ब्रिटिशांनी येथील एक दोन स्तंभ कापून एनेले असे म्हणतात, आश्चर्य म्हणजे ते पोकळ न निघता भरीव निघाले. महामंडपात जाता येत नसल्याने येथील बाहेरुन बघूनच समाधान मानावे लागते. मात्र आतमध्ये भरजरी स्तंभ आहेत, कित्येक शिल्पे ह्या स्तंभांवर कोरली गेली आहेत.
महामंडप आणि त्यातील नादमय स्तंभ
महामंडपाचा अंतर्भाग
महामंडप
महामंडपाच्या बाह्यभागांवर काही आगळीवेगळी शिल्पे आहेत, ज्यात पोर्तुगीज, अरबी, चिनी, मंगोलियन माणसांचे चित्रण आहे. ह्या परदेशी माणसांचे चित्रण महानवमी डिब्ब्यावर केलेलेही आपल्याला आढळून येते. विजयनगरच्या बाजारात घोड्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर चालत असे ह्या घोड्यांचे परीक्षण करताना हे परदेशी प्रवासी दिसतात.
दाढीवाला मंगोलियन मनुष्य
हे बहुधा पोर्तुगीज असावेत.
हे टोपीकर इंग्रज असावेत
हे देखील परदेशी सेवकच
येथील मूळची विठ्ठलमूर्ती कशी असावी ह्याची अल्पशी कल्पना आपल्याला महामंडपाच्या बाहेरच्या बाजूस असणार्या देवकोष्ठातील विठ्ठलमूर्तीवरुन येते.
देवकोष्ठातील विठ्ठलमूर्ती
इथेच अद्भूत मूर्ती कोरलेली आहे. या एकाच मूर्तीत खुबीने मकरतोरण, दोन किर्तीमुखे, प्रभावळ, दोन शरभ आणि शिवमुखरुपी शिवलिंग असे कोरलेले आहे.
महामंडपावर एका ठिकाणी राम लक्ष्मणाचे शिल्प कोरलेले आहे.
मुख्य मंदिराला फेरी मारताना हे डाव्या बाजूचे प्रवेशद्वार दिसते
तर विरुद्ध बाजूस दुसर्या बाजूचे प्रवेशद्वार नजरेस पडते.
महामंडप आणि मुख्य मंदिर बाहेरुन पाहून झाल्यावर आता आपण कल्याणमंडपाकडे येऊ.
कल्याणमंडप
कल्याणमंडप हा अनेक स्तंभ असणारा सर्व बाजूंनी खुला असलेला मंडप असून स्तंभावर भव्य व्याल, रामायण, महाभारतातील प्रसंग, विष्णूचे दशावतार, सुरसुंदरी अशा विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. कल्याणमंडपात लग्न लावली जात असत.
कल्याणमंडप
येथेही काही अद्भूत मूर्ती आहेत. एकाच मस्तकातून येथून बैल आणि हत्ती दोघांचाही आभास निर्माण केला गेलाय.
बैल आणि हत्तीचे जोडशिल्प
ऋषी, बैल हत्ती जोडशिल्प आणि झाडे उखडून हत्ती असणारी शिल्पपट्टीका
त्याचाच बाजूला एक रथारुढ वीर शुक, हंस आणि मयुरावरुन आलेल्या योद्ध्यांशी युद्ध करताना दाखवला आहे. शुक म्हणजे मदन, हंस म्हणजे ब्रह्मा आणि मयुर हे कार्तिकेयाचे वाहन, साहजिकच हा कुठलातरी पौराणिक प्रसंग असावा मात्र तो नेमका कुठला ते ध्यानात येत नाही, त्याच्या बाजूलाच नृत्य करणार्या नर्तिकांचे शिल्प आहे.
बाहेरील बाजूच्या स्तंभांवर भव्य व्याल आहेत. हे व्याल हत्तीची सोंड, सिंहाचा जबडा, हरणाचे कान, अश्वाची मान, वाघाचे शरीर, मोराचे शेपूट अशा विविध प्राण्यांच्या संकरातून बनवलेले असून ते मकरावर अधिष्ठित आहेत. एका ठिकाणी ह्या व्यालावर निमूळती टोपी घातलेला आणि आकडेबाज मिशा असलेला सैनिक आरुढ असून त्याच्या चेहर्यापट्टीवरुन तो परदेशी वाटतो.
स्तंभांवरील व्याल
मंडपांच्या आतील स्तंभांवर देखील असेच स्वारयुक्त व्याल आहेत. येथेच एक मूर्ती आहे ती खुद्द कृष्णदेवरायाची आहे असे मानली जाते.
कमलापूरच्या संग्रहालयात असणार्या कृष्णदेवरायाच्या मूर्तीचे ह्या मूर्तीशी साम्य आहे, मूर्तीला राजमुकुट आहे आणि कृष्णदेवराय बुटका होता असे म्हणतात त्याप्रमाणे येथील व्यालावरील स्वारमूर्ती बुटकी आहे.
कृष्णदेवरायाची मूर्ती
याखेरीज स्तंभांवर असलेल्या स्वारयुक्त व्यालमूर्ती
कल्याणमंडपातील दृश्य
आता आपण मंदिराच्या स्तंभांवर असलेल्या अवतारांपैकी काही मूर्ती पाहूयात.
विष्णू अवतारमूर्ती
मत्स्य अवतार
हा विष्णूचा पहिला अवतार. ही मूर्ती अर्धे शरीर मत्स्याचे आणि अर्धे विष्णूचे अशा स्वरुपात आहे.
कूर्म अवतार
हा विष्णूचा दुसरा अवतार. ही मूर्ती अर्धे शरीर कासवाचे आणि अर्धे विष्णूचे अशा स्वरुपात आहे.
नृसिंह अवतार
हा विष्णूचा चौथा अवतार
वामन अवतार
हा विष्णूचा पाचवा अवतार, वामनअवतार ओळखण्याची खूण म्हणजे बटु, त्याने धारण केलेली छत्री आणि हाती धरलेला कमंडलू
परशुराम अवतार
हा विष्णूचा सहावा अवतार, ह्याने हातात परशु धारण केलेला आहे.
राम अवतार
हा विष्णूचा सातवा अवतार, येथील शिल्पातला प्रसंग हा मारीचवधाचा आहे. सुवर्णमृगावर बाण चालवल्यावर मरणारा मारीच राक्षसरुप धारण करुन प्रकट होत आहे.
विठ्ठल अवतार
इथल्या स्तंभांवर विष्णू अवतारासंबंधित अजूनही कित्येक मूर्ती कोरलेल्या आहेत त्या पुढिलप्रमाणे
स्थौण नृसिंह
संस्कृत भाषेत स्थूण म्हणजे स्तंभ, स्थौण म्हणजे स्तंभातून प्रकटलेला. इथल्या मूर्तीत दुंभगलेला स्तंभ, त्यातून बाहेर पडलेला नृसिंह हिरण्यकश्यपूवर हल्ला करताना दिसत आहे. शेजारी प्रल्हाद हात जोडून उभा आहे.
इथेच नृसिंहाने हिरण्यकश्यपूला पकडलेले दिसत आहे तो तो नृसिंहाच्या तावडीतून सुटण्याची खटपट करतो आहे. याच्याच बाजूला पुढे विदारण नृसिंहाची मूर्ती देखील आहे.
एका ठिकाणी कृष्णाने गोपिकांची वस्त्रे पळवल्याचा प्रसंग कोरलेला आहे.
धनुष्य हाती धारण केलेल्या एका वीरांगनेच्या पायातील काटा एक सेवक टोकरुन काढत असल्याचे शिल्प मला फार आवडले.
कल्याणमंडपाच्या बाजूलाच अजून एक मंडप आहे, तिथेही पुष्कळ शिल्पे आहेत. हा बहुधा नाट्यमंडप असावा, येथे बहुतांशी वादकांच्या आणि नर्तकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, याशिवाय नृसिंहावतार, कृष्णावताराचे विविध प्रसंग देखील येते कोरलेले आहेत. विस्तारभयास्तव सर्वच येथे देणे शक्य नाही.
विठ्ठल मंदिराला वळसा घालत आल्यावर मंदिर संकुलाचे विविध कोनातून उत्तम दर्शन होते.
तटबंदीयुक्त भिंत, विविध मंडप आणि खडकाळ टेकड्या
कल्याणमंडपाच्या समोरील बाजूचा हा मंडप, येथे देखील वाजणारे स्तंभ आहेत आणि ते वाजवून बघता देखील येतात.
ह्या मंडपातही प्रत्येक स्तंभांवर पुष्कळ शिल्पे कोरलेली आहेत.
ह्या मंडपातून विठ्ठल मंदिर संकुलाचे सुरेख दर्शन होते.
विठ्ठल मंदिर अगदी व्यवस्थित बघायला किमान तीन तास तरी हवेत. आम्ही जवळपास अडीच तास ह्या मंदिरात होतो तरीही एकूण एक मूर्ती पाहून झाल्या नाहीत. संपूर्ण हंपीच अद्भुत असले तरी निर्विवादपणे विठ्ठल मंदिर हेच विजयनगरचा मेरुमणी होय. संंध्याकाळचे ६ वाजत आले होते, उन्हाळ्याचे दिवस असल्याने अजूनही भरपूर उजेड होता तेव्हा विठ्ठल मंदिराच्या मागेच असलेली राजतुला बघून येण्याचे ठरवले.
राज तुला
राज तुलेच्या एका स्तंभांच्या पायथ्याला कृष्णदेवरायाची त्याच्या दोन राण्यांसह असलेली मूर्ती कोरलेली आहे, हे ही एक अद्भुतच.
राज तुला, एक भग्न मंदिर आणि दुमजली प्रवेशद्वार
तिथे जवळच एक भग्न मंदिर आहे
दुमजली प्रवेशद्वार (Two Storied Gateway)
येथून जवळच एक देखणे विष्णूमंदिर आहे. त्याचे नाव उत्किर्णित विष्णू मंदिर, ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या भिंतीवर एक पालीचे शिल्प देखील कोरलेले आहे.
उत्किर्णित विष्णू मंदिर (Inscribed Vishnu Temple)
हे सर्व बघून होईतो साडेसहा पावणेसात वाजले होते, सूर्य मावळतीला झुकला होता, आता आम्ही परत निघालो आणि गोल्फ कार मधून आलेल्या रस्त्यानेच बग्गी पॉईंटला आलो. आणि तिथे पार्क केलेल्या आमच्या गाडीत बसून परत मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच कर्नाटक पर्यटन महामंडळाच्या मयुरा भुवनेश्वरी संकुलात आलो. हंपी पाहून संपले होते, आणि आता सकाळी उठून परत पुण्यात यायला निघायचे होते. सकाळी उठल्यावर तेथेच नाष्टा केला आणि साधारण नऊच्या सुमारास हंपी सोडले. आलेल्या मार्गानेच म्हणजे हंपी-होस्पेट-कोप्पळ-गदग-हुबळी-बेळगाव करत रात्री ८ च्या सुमारास पुण्यात परत आलो.
ही माझी दोन दिवसांची हंपी सफर, सर्वच हंपी ३/४ दिवसताही बघणे अशक्य आहे. हंपी हे काही एकच ठिकाण नाही तर ते एक प्राचीन वैभवशाली शहर आहे, ते बर्यापैकी बघण्यासाठी किमान पंधरा दिवस तरी हवेत. दोन दिवसात माझी विरुपाक्ष मंदिर, कृष्ण मंदिर, हजारराम मंदिर, विठ्ठल मंदिर ही मोठी मंदिरे, तर महानवमी डिब्बा, राणीवसा, राजवाड्यांचे अवषेश ही शाही केंद्रे बघून झाली, मात्र नदीकाठचे अवशेष, पट्टाभिराम मंदिर, मातंग टेकडी, अच्युतराय मंदिर, अनंतशयनगुढी मंदिर आदी कित्येक महत्वाची ठिकाणे राहिलीही आहेत. अर्थात हेच हंपीला परत येण्यासाठी निमित्त आहे. विजयनगरच्या ह्या भग्न शहरात आता अधिक दिवस काढूनच यावे लागणार. तोपर्यंत ह्या मालिकेला अर्धविराम.
समाप्त.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja💖
पुर्वार्ध चांगलाच जमलाय.