भाषिक , धार्मिक अस्मिता आणि तुम्ही
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत. जोडीला सावरकरप्रेमींची भाषाशुद्धी आहेच.
तर याच्या अगदी उलट हिंदी ही सगळ्या देशाला व्यवस्थित बोलता आलीच पाहिजे, पूर्ण देशाची स्वत:ची अशी एक भाषा हवीच यापासून ते हिंदीला विरोध म्हणजे देशद्रोह समजण्यापर्यंत काही लोक जातात. दक्षिण भारतीय लोक हिंदीला फारसे महत्व देत नसल्याने तिथल्या महानगरांमधे राहणारे लोक विशेषत: उत्तरभारतीय लोक चिडून असतात. नवीन भाषा ती सुद्धा जी पैसे मिळवायला मदत करत नाही ती 'शिकणे' हे अर्थातच त्यांच्यासाठी 'डोकेदुखी' असते. गायपट्ट्यातले बहुतांश लोक पैसे मिळवणे या एकाच दृष्टीकोनातून महाराष्ट्र ,द.भारतातील महानगरे गाठतात. साहजिकच स्थानिक भाषा, संस्कृती याला बाधा आणण्याला कारणीभूत ठरतात. काही स्थानिक नागरीक मानतात की यामुळे दुसर्या भाषेतले शब्द आपल्या भाषेत आल्याने आपली भाषा समृद्ध होते. भाषा पाण्यासारखी असते, हिंदीचा द्वेष करु नका वगैरे वगैरे.
अशाचप्रकारे RSS, भाजप आणि मोदी समर्थकांमुळे हिंदू धर्मविषयक समूहांतही वाढ झाली आहे,होते आहे. पैसे घेऊन केली जाणारी धर्मांतरे, मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी, जुनी,वापरात नसलेली मंदिरे चर्चमधे रुपांतरीत करणे किंवा चर्चची बाह्यरचना हिंदू मंदिराप्रमाणे करणे, ख्रिश्चन धर्मात नसूनही हिंदू पद्धतीने येशु किंवा मेरीच्या मुर्तीवर उपचार करणे , हिंदू पुजाविधीसदृश्य पद्धतीने येशुची मुर्ती सजवणे हे प्रकार त्यांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहेत. अल्पसंख्यक लोकांची दादागिरी किंवा आक्रमकपणा, विशिष्ट पद्धतीनेच बनवलेला पदार्थ विकत घेईन अशी काही धर्मियांची मागणी किंवा अमुक पदार्थ विशिष्ट धर्मात निषिद्ध असूनही त्याच धर्मातल्या काही लोकांकडून तो खाल्ला जाणे हे काही लोकांच्या दृष्टीने चुकीचे,अस्मिताभंग करणारे,संस्कृतीला हानिकारक मानले जाते.
याउलट "संविधानाने आम्हाला हवी ती भाषा बोलण्याचा,हवं ते खाण्याचा अधिकार दिला अाहे,हवा तो धर्म अवलंबण्याचा अधिकार दिला आहे.आमच्यावर दादागिरी करणारे तुम्ही कोण" असा प्रतिरोधही दुसर्या बाजूने होत असतो.
मातृभाषा, स्वधर्म, मातृभाषेची शुद्धी, भाषेवरील किंवा धर्मावरील आक्रमण,धर्मांतर या अस्मिताविषयक गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता? यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत? का आहेत? तुमच्या धर्मावर,भाषेवर होणारा अन्याय हा तुमच्यासाठी कितपत दखलपात्र आहे? काही लोक भाषा, उपभाषा,बोली, प्रांत, उपप्रांत, धर्म, भौगोलिक विभाग, स्थानिक संस्कृती हे सगळे बाजूला सारुन 'पैसे कमवणे' या एकाच ध्येयाने प्रेरित असतात. 'पैशाने जितके श्रीमंत असाल तितकी तुमची जगात किंमत जास्त.कुठे या मर्यादा घालणार्या भाषिक,धार्मिक अस्मितांमधे अडकून वेळ वाया घालवता?' या विचारांचा अवलंब करणारे असतात. ते तुम्हाला योग्य वाटतात का?
भाषिक,धार्मिक अस्मितांना तुम्ही किती महत्त्व देता? का देता?
सुटसुटीत म्हणून भारतीयांनी विजार घालायला सुरवात केलीनाही. स्मार्ट म्हणुन केली. सुट्सूटित तर लुंगी अस्ते पण स्मार्ट म्हणुन पोरं घरात ट्रॅक पॅंट घालतात. ज्या दिवशी पिठलं खाणारे लोक स्मार्ट, यशस्वी, जगावर प्रभुत्व गाजवणारे, यशस्वी आंत्रप्रिन्योर, गो गेटर वगैरे वगैरे मानसिकता बनेल त्या दिवशी पिझ्झा डाउनमार्केट फुकाच वाटेल