थोडासा रुह-ओमानी हो जाय...
थोडासा रुह-ओमानी हो जाय...
"मरू"स्थळ हे नाव सार्थ ठरवणारे "वाळ"वंटी प्रदेश अजिबात आवडत नसल्यामुळे प्रत्यक्षात तर दूरच पण नकाशात देखील त्या प्रदेशात मी कधी फिरकत नाही. मनुष्य "जगू" शकेल अश्या सर्व साधनांचा अभाव असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या "मरु"भूमीला कसल्या आधारावर "सहारा" नाव दिले असावे याचा विचार करताना गम्मत वाटते. शाळेत असताना भूगोलाचे शिक्षक आणि त्यांची शैली इतकी रुक्ष होती की त्यापुढे अशी मरुस्थळेदेखील हिरवी-गार वाटावीत. अहीमही असुरांप्रमाणे भूगोलाच्या जोडीला इतिहासही होताच. त्या इतिहासाच्या पुस्तकात घुसवलेल्या कितीतरी अनावश्यक संदर्भातून एक संदर्भ मला भूगोलाशी जोडता येत असे. खिलजी असो, नादिरशहा असो अथवा दुर्राणी. हे सगळे इतिहासातले खलनायक वाळवंटातल्या उकाड्याने हैराण होऊन फक्त लुटीसाठी नाही तर उन्हाळ्याच्या सुटीसाठी हिंदुस्थानात येत असावेत अशी माझी समजूत होती. तेव्हा पदरच्या चार मोहरा उधळून मी कुठल्या वाळवंटी प्रदेशात "फिरायला" जाईन हा विचार कधी स्वप्नातही मनाला शिवला नाही.
पण हा योग एकदा यायचाच होता. देवाने हातावरची कुठलीतरी रेषा वाळूने काढून ठेवली असावी. आपले मिपावरील सरनौबत आणि मी जुने जानी दोस्त. गेली बरीच वर्षं ते ओमानमध्ये तळ ठोकून आहेत. पूर्वी आलमगीर बादशहाने सरनौबत नेताजी पालकरांना मुहम्मद कुलीखान बनवून सक्तीने अफगाणिस्तानच्या मोहिमेवर पाठवून दिले होते. इथे पोटाने सरनौबतांवर धर्मांतराची नाही, तरी स्थलांतराची सक्ती नक्कीच केली होती.
दर वर्षी पुण्यात सुट्टीवर आल्यावर आमची भेट व्हायची. सरनौबतांच्या आग्रहाखातर मस्कत मोहीम मुक्करर करण्यात आली. सरनौबतांची भेट आणि गप्पा हेच मुख्य उद्दिष्ट्य असल्यामुळे वाळवंटात काय का आणखी कुठे काय या गोष्टीला फारसे महत्व नव्हते. म्हंटलं चला मस्कत तर मस्कत. लहानपणी मस्कती डाळिंब असा माफक उल्लेख भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात वाचल्यासारखा आठवायचा. तोही डाळिंब या फळाबद्दल विशेष आपुलकी असल्यामुळे. तेव्हा त्यापलीकडे काही या शहराबद्दल फारशी माहिती नव्हती आणि जाणून घेण्यात रसही नव्हता. आखाती देशांत भयाण उन्हाळा असल्याने तिकडे हिवाळ्यात जावे म्हणजे त्यातल्या त्यात सुसह्य वाटेल असा विचार होता. परंतु एकत्र सुट्ट्यांचे गणित जमत नव्हते. मोहीम पुढे ढकलण्यापेक्षा दोन विकांताचे चार दिवस लांबची ठिकाणे आणि बाकीचे दिवस जमेल तसं जवळपास हिंडू असं ठरवलं.
फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील अष्टमीला अर्थात गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी, २०१८ ला पुण्याहून मोहिमेचे "रण"शिंग फुंकले. मुंबई ते मस्कत अंतरच ते काय. एक डुलकी काढून झाली आणि खाली मस्कत मधले दिवे लुकलुकताना दिसू लागले. पूर्वग्रह-दूषित मनात विचार आला की रात्रीचा आलो हे एका अर्थी बरेच झाले. डोळ्यांच्या सर्व कडा व्यापून टाकणाऱ्या वैराण पिवळ्या रंगापेक्षा काळा रंग बरा. पण हा पूर्वग्रह लवकरच बदलणार होता.
सरनौबत जातीने विमानतळावर घ्यायला आले होते. त्यांच्या तळावर पोचायला रात्रीचे बारा वाजले. ताजेतवाने होऊन आधी साग्रसंगीत जेवणावर ताव मारला आणि ओमानमध्ये शुक्रवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे नंतर आरामात गप्पा मारत बसलो. घरात बसून फक्त मसलत करणे हे सरनौबत आणि किल्लेदार दोघांच्याही नावलौकिकास साजेसे नव्हते. त्यामुळे सकाळची न्याहारी करून एका समुद्री किल्ल्याची पाहणी करण्यास सौ. सरनौबतांनी दिलेली शिदोरी घेऊन "अल् सवादीला" निघालो. प्रशस्त रस्ते आणि इमारतींच्या गर्दीतून शहराच्या बाहेर पडलो. वाटले होते तसे सर्वदूर करड्या, पिवळ्या रंगाचेच साम्राज्य होते. महंमदाने हिरवा रंग का निवडावा ते अशा ठिकाणी आले की लगेच कळते.
मस्कतपासून ९० किलोमीटरवर "अल सवादी किल्ला" आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बोटीने जाता येतील अशी बेटे हि त्याची खासियत. फेब्रुवारीचा गारवा, भरतीमुळे उचंबळणाऱ्या लाटा आणि दूरवर दिसणारी बेटे! छोट्या बोटीतून किल्ला असलेल्या बेटावर गेलो. सुमारे अर्धा तास पायऱ्या चढल्यानंतर किल्ल्यावर पोचलो. किल्ल्यावरून भोवतालचा परिसर फार सुंदर दिसत होता. चहू बाजूला निळाशार समुद्र, आणि त्यावर पांढरी नक्षी काढणाऱ्या बोटी. भरपूर भटकंती झाल्यावर घरून आणलेले मेथी पराठे खाऊन दुपारी किल्ला उतरून दुपारच्या चहाला घरी पोचलोसुद्धा.
अल सवादी किल्ला
हिंडण्याफिरण्या खेरीज "खाणे" ही देखील दोघांची समान आवड. एखाद्याकडे दुपारी चारच्या सुमारास गेल्यास "काय घेणार" हा प्रश्न हमखास असतो. ह्याचे उत्तर "चहा, कॉफी का सरबत" असे अपेक्षित असते. आम्ही दुपारी भेटतो तेव्हा मात्र ह्या प्रश्नाचे उत्तर "रेड लेबल, सोसायटी किंवा वाघ बकरी" ह्यापैकी एक असते. मूड नुसार लाईट किंवा स्ट्रॉंग चहा, त्याला साजेशी क्रोकरी, कपात चहा ओतताना एक थेंब देखील बशीत सांडणार नाही ह्याची घेतलेली दक्षता आणि स्पेशल सूरी ने सफाईदार कापलेला हिंदुस्थान बेकरीचा प्लेन केक. आमच्या खव्वयेगिरीचे असे ३६ गुण जुळत असल्याने साध्या गोष्टींचा सुद्धा सोहळा होतो.
सरनौबतांनी माझ्या आवडी-निवडी लक्षात घेऊन पुढच्या आठ दिवसांचा साधारण मेन्यू ठरवला होता. बाहेर जेवायला गेल्यावर अरेबिक क्युझिन चा आस्वाद घेतला. मस्कतला फलाफील आणि शावर्मा दोन्ही अतिशय उत्तम मिळतात. घरी फ्लॉवर-बटाटा रस्सा, साबुदाणा खिचडी पासून ते अगदी सुरमई फ्राय, स्पेशल फिश करी पर्यंत सर्व गोष्टी बनवल्या.
खाण्यापिण्याची आवड असावी पण वेळ-काळ बघून हौस पुरवावी हे दोघांचे मत. त्यामुळे फिरायला मर्यादित वेळ असल्यास जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा हिंडण्यास प्राधान्य. त्यामुळे बहला फोर्ट, जबल अखदर सारख्या थोड्या लांबच्या ठिकाणी जाताना घरूनच पराठे, उकडलेली अंडी, संत्री, केक वगैरे पदार्थ घेऊन बाहेर पडायचो. नाहीतर बऱ्याचदा असं होतं कि हॉटेल शोधण्यात आणि जेवणात इतका वेळ जातो कि हिंडायला फारसा वेळ उरत नाही.
गोवा म्हणलं कि समुद्रकिनारे आणि बिअर ची चित्रे चटकन डोळ्यासमोर येतात. ओमानमध्ये त्याच तोडीचे अतिशय सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. असा सुंदर समुद्र आणि दुपारचे ऊन असताना बिअर न पिणे फाऊल समजले जाते. परंतु ओमानमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई असल्याने "बीचवर बसल्यास नंतर सहा महिने जेलमध्ये बसावे लागते". अशा प्रकारे नॉन-अल्कोहोलिक बिअर नेऊन दुधाची तहान ताकावर भागवली. सरनौबताबरोबर गप्पांच्या नशेत ती नेहेमीच्या बिअरसारखीच रुचकर लागली.
दोन विकांत हाताशी असल्याने तेव्हा "जबल अखदर" आणि पायथ्याशी असलेलं "बरकत अल मौझ" हे अतिशय पुरातन गाव बघता आले. तसेच बहला फोर्ट वगैरे ठिकाणे सुद्धा बघून झाली. आखाती देश (गल्फ) म्हणलं कि नुसती वाळवंटे आणि तेल विहिरी डोळ्यांसमोर यायच्या. ओमान मधील सुंदर समुद्रकिनारे, जागोजागी जपलेली हिरवाई, अतिशय साधी ओमानी अरब माणसं ह्यामुळे माझा पूर्वग्रह संपूर्णपणे बदलला.
बहला फोर्ट
जबल अखदरच्या पायथ्याशी असलेलं बरकत अल मौझ हे अतिशय पुरातन गाव
आठ दिवसांत भरपूर हिंडता-फिरता आलं. घरी आणि कारमध्ये गप्पा झाल्या. लॉन्ग ड्राइव्ह मध्ये ऐकण्यासाठी आवडीच्या गाण्यांची स्पेशल प्ले-लीस्ट बनवली होती ती अजूनही दोघांकडे आहे. पुल "गणगोत" पुस्तकात लिहितात कि "वाढत्या वयाबरोबर पुढे जाण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते". असा नॉस्टॅल्जिया ह्या आठ दिवसांत अनेकदा अनुभवला. रात्री बीचवर कॉफी पिताना रुपालीतल्या कॉफीची आठवण. “जबल अखदर” पर्वतावर जाताना आमच्या राजगड ट्रेक ची आठवण आली. कारमधून फिरत असताना सीए आर्टिकलशिप च्या वेळी बाईकवरून भोसरी ला जायचो ते दिवस आठवले. तैमूर मशिदीच्या रम्य हिरवळीवरून चालताना पुणे युनिव्हर्सिटी चा परिसर डोळ्यांसमोर यायचा.
तैमूर मशिद
मथरा कॉर्निशवरील भटकंती
ग्रँड मॉस्क
ते आठ दिवस कापराप्रमाणे भर्रकन उडून गेले. ठरवल्यानुसार अनेक गोष्टी घडून आल्या तर काही राहून गेल्या. पुढच्या मस्कत भेटीत उरलेल्या गोष्टी कव्हर करू असे म्हणत मस्कतचा निरोप घेतला. मुंबईला जाणाऱ्या विमानात बसल्यावर विचार आला कि पुढच्या वेळी “दोघांनाही सुट्टी” एवढाच निकष ठेवायचा. तिकडे हिवाळा आहे का उन्हाळा असले विचार करायचे नाहीत. कारण मित्राबरोबर हास्यविनोदाचे तुषार उडत असताना मे महिन्याची टळटळीत दुपार देखील चंद्राप्रमाणे शीतल वाटते.
अब तो तमन्ना-ए-दिल-ए नादाँ है के
यह दोस्ती ला-फ़ानी* हो जाए
जिस्म-ओ-जान गुलज़ार और रूह ओमानी हो जाए...
किल्लेदार
*ला-फ़ानी - अमर
सरनौबत जातीने विमानतळावर घ्यायला आले होते. त्यांच्या तळावर पोचायला रात्रीचे बारा वाजले. ताजेतवाने होऊन आधी साग्रसंगीत जेवणावर ताव मारला आणि ओमानमध्ये शुक्रवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे नंतर आरामात गप्पा मारत बसलो. घरात बसून फक्त मसलत करणे हे सरनौबत आणि किल्लेदार दोघांच्याही नावलौकिकास साजेसे नव्हते. त्यामुळे सकाळची न्याहारी करून एका समुद्री किल्ल्याची पाहणी करण्यास सौ. सरनौबतांनी दिलेली शिदोरी घेऊन "अल् सवादीला" निघालो. प्रशस्त रस्ते आणि इमारतींच्या गर्दीतून शहराच्या बाहेर पडलो. वाटले होते तसे सर्वदूर करड्या, पिवळ्या रंगाचेच साम्राज्य होते. महंमदाने हिरवा रंग का निवडावा ते अशा ठिकाणी आले की लगेच कळते.
मस्कतपासून ९० किलोमीटरवर "अल सवादी किल्ला" आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बोटीने जाता येतील अशी बेटे हि त्याची खासियत. फेब्रुवारीचा गारवा, भरतीमुळे उचंबळणाऱ्या लाटा आणि दूरवर दिसणारी बेटे! छोट्या बोटीतून किल्ला असलेल्या बेटावर गेलो. सुमारे अर्धा तास पायऱ्या चढल्यानंतर किल्ल्यावर पोचलो. किल्ल्यावरून भोवतालचा परिसर फार सुंदर दिसत होता. चहू बाजूला निळाशार समुद्र, आणि त्यावर पांढरी नक्षी काढणाऱ्या बोटी. भरपूर भटकंती झाल्यावर घरून आणलेले मेथी पराठे खाऊन दुपारी किल्ला उतरून दुपारच्या चहाला घरी पोचलोसुद्धा.
अल सवादी किल्ला
हिंडण्याफिरण्या खेरीज "खाणे" ही देखील दोघांची समान आवड. एखाद्याकडे दुपारी चारच्या सुमारास गेल्यास "काय घेणार" हा प्रश्न हमखास असतो. ह्याचे उत्तर "चहा, कॉफी का सरबत" असे अपेक्षित असते. आम्ही दुपारी भेटतो तेव्हा मात्र ह्या प्रश्नाचे उत्तर "रेड लेबल, सोसायटी किंवा वाघ बकरी" ह्यापैकी एक असते. मूड नुसार लाईट किंवा स्ट्रॉंग चहा, त्याला साजेशी क्रोकरी, कपात चहा ओतताना एक थेंब देखील बशीत सांडणार नाही ह्याची घेतलेली दक्षता आणि स्पेशल सूरी ने सफाईदार कापलेला हिंदुस्थान बेकरीचा प्लेन केक. आमच्या खव्वयेगिरीचे असे ३६ गुण जुळत असल्याने साध्या गोष्टींचा सुद्धा सोहळा होतो.
सरनौबतांनी माझ्या आवडी-निवडी लक्षात घेऊन पुढच्या आठ दिवसांचा साधारण मेन्यू ठरवला होता. बाहेर जेवायला गेल्यावर अरेबिक क्युझिन चा आस्वाद घेतला. मस्कतला फलाफील आणि शावर्मा दोन्ही अतिशय उत्तम मिळतात. घरी फ्लॉवर-बटाटा रस्सा, साबुदाणा खिचडी पासून ते अगदी सुरमई फ्राय, स्पेशल फिश करी पर्यंत सर्व गोष्टी बनवल्या.
खाण्यापिण्याची आवड असावी पण वेळ-काळ बघून हौस पुरवावी हे दोघांचे मत. त्यामुळे फिरायला मर्यादित वेळ असल्यास जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा हिंडण्यास प्राधान्य. त्यामुळे बहला फोर्ट, जबल अखदर सारख्या थोड्या लांबच्या ठिकाणी जाताना घरूनच पराठे, उकडलेली अंडी, संत्री, केक वगैरे पदार्थ घेऊन बाहेर पडायचो. नाहीतर बऱ्याचदा असं होतं कि हॉटेल शोधण्यात आणि जेवणात इतका वेळ जातो कि हिंडायला फारसा वेळ उरत नाही.
गोवा म्हणलं कि समुद्रकिनारे आणि बिअर ची चित्रे चटकन डोळ्यासमोर येतात. ओमानमध्ये त्याच तोडीचे अतिशय सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. असा सुंदर समुद्र आणि दुपारचे ऊन असताना बिअर न पिणे फाऊल समजले जाते. परंतु ओमानमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई असल्याने "बीचवर बसल्यास नंतर सहा महिने जेलमध्ये बसावे लागते". अशा प्रकारे नॉन-अल्कोहोलिक बिअर नेऊन दुधाची तहान ताकावर भागवली. सरनौबताबरोबर गप्पांच्या नशेत ती नेहेमीच्या बिअरसारखीच रुचकर लागली.
दोन विकांत हाताशी असल्याने तेव्हा "जबल अखदर" आणि पायथ्याशी असलेलं "बरकत अल मौझ" हे अतिशय पुरातन गाव बघता आले. तसेच बहला फोर्ट वगैरे ठिकाणे सुद्धा बघून झाली. आखाती देश (गल्फ) म्हणलं कि नुसती वाळवंटे आणि तेल विहिरी डोळ्यांसमोर यायच्या. ओमान मधील सुंदर समुद्रकिनारे, जागोजागी जपलेली हिरवाई, अतिशय साधी ओमानी अरब माणसं ह्यामुळे माझा पूर्वग्रह संपूर्णपणे बदलला.
बहला फोर्ट
जबल अखदरच्या पायथ्याशी असलेलं बरकत अल मौझ हे अतिशय पुरातन गाव
आठ दिवसांत भरपूर हिंडता-फिरता आलं. घरी आणि कारमध्ये गप्पा झाल्या. लॉन्ग ड्राइव्ह मध्ये ऐकण्यासाठी आवडीच्या गाण्यांची स्पेशल प्ले-लीस्ट बनवली होती ती अजूनही दोघांकडे आहे. पुल "गणगोत" पुस्तकात लिहितात कि "वाढत्या वयाबरोबर पुढे जाण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते". असा नॉस्टॅल्जिया ह्या आठ दिवसांत अनेकदा अनुभवला. रात्री बीचवर कॉफी पिताना रुपालीतल्या कॉफीची आठवण. “जबल अखदर” पर्वतावर जाताना आमच्या राजगड ट्रेक ची आठवण आली. कारमधून फिरत असताना सीए आर्टिकलशिप च्या वेळी बाईकवरून भोसरी ला जायचो ते दिवस आठवले. तैमूर मशिदीच्या रम्य हिरवळीवरून चालताना पुणे युनिव्हर्सिटी चा परिसर डोळ्यांसमोर यायचा.
तैमूर मशिद
मथरा कॉर्निशवरील भटकंती
ग्रँड मॉस्क
ते आठ दिवस कापराप्रमाणे भर्रकन उडून गेले. ठरवल्यानुसार अनेक गोष्टी घडून आल्या तर काही राहून गेल्या. पुढच्या मस्कत भेटीत उरलेल्या गोष्टी कव्हर करू असे म्हणत मस्कतचा निरोप घेतला. मुंबईला जाणाऱ्या विमानात बसल्यावर विचार आला कि पुढच्या वेळी “दोघांनाही सुट्टी” एवढाच निकष ठेवायचा. तिकडे हिवाळा आहे का उन्हाळा असले विचार करायचे नाहीत. कारण मित्राबरोबर हास्यविनोदाचे तुषार उडत असताना मे महिन्याची टळटळीत दुपार देखील चंद्राप्रमाणे शीतल वाटते.
अब तो तमन्ना-ए-दिल-ए नादाँ है के
यह दोस्ती ला-फ़ानी* हो जाए
जिस्म-ओ-जान गुलज़ार और रूह ओमानी हो जाए...
किल्लेदार
*ला-फ़ानी - अमर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pagal Nahi Hona (Official Video) Sunanda Sharma | Sonu Sood | Jaani | Avvy Sra | B2gether | Sky