इमेल च्या कथा
व्हीएसनेल चा जुना अनुभव
खूप वर्षां मागची गोष्ट आहे. मी शाळेंत होते पण काही विशेष कारणास्तव कम्प्युटर आणि इंटरनेट ह्या दोन्हीचे जुजबी ज्ञान होते. घरी कम्पुटर नसला तरी शेजारी एक ख्रिश्चन महिला राहत होती तिच्याकडे होता. सत्यम कि काय तरी डायल अप इंटरनेट होते. आधी तो कर्णकर्कश आवाज वगैरे ऐकू येतो तसले. अक्षरशः डझन वारी इमेल सर्व्हिस होत्या. एपत्र, रेडीफ, हॉटमेल इत्यादी. मोबाईल फोन फक्त टीव्ही वर पहिले होते.
आमच्या शेजारच्या एका मुलाने मेकॅनिकल डिप्लोमा केला होता. त्याची नोकरी साठी धडपड सुरु होती. फिरलोस्कर (पूर्ण नाव आठवत नाही पण इलेक्ट्रिक मोटर बनवणारी कंपनी नव्हती, दागिन्यांशी संबंधित मशीन बनवणारी कंपनी होती) कंपनीने नोकरी साठी जाहिरात दिली होती आणि आपला बायोडेटा इमेल करायला सांगितल होता. आपण मदत कराल का म्हणून तो मुलगा घरी आला. मी आनंदाने हो म्हणून सांगितले. मग मी वर्डपॅड मध्ये त्याचा बायोडेटा तयार केला आणि इतर माहिती सोबत (ज्यांत त्याच्या घरचा लँडलाईन नंबर होता) व्यवस्थित इमेल केला. आता कंपनीचा इमेल होता somethingkirloskar@something.vsnl.net. मी सर्व काही दोन वेळा तपासून वगैरे पहिले. त्यानेही पहिले.
दुसऱ्या दिवशी हा मुलगा धावत माझ्या घरी आला. "अग केलस तरी काय तू ? मला कुना तरी मोठ्या माणसाचा फोन आला आणि ती धमकी देत होती कि मी तिचा इमेल हॅक वगैरे केला आहे. तो जाम घाबरला होता. ती आता २ वाजता फोन करणार आहे. वडील प्रचंड रागावले आहेत. काही तर कर."
मग मी ह्याच्या घरी गेले. २ वाजता फोन येणार होता पण ४ वाजता आला. ह्यांच्या घराची मंडळी प्रचंड म्हणजे प्रचंड घाबरली होती. माझे रेप्युटेशन सुद्धा तसे चांगले नव्हते त्यामुळे मला बेनेफिट ऑफ डाऊट वगैरे काहीच नव्हते. ह्याचे वडील. कशाला पाहजे इमेल वगैरे नसती थेरं, पोस्टाची सर आहे काय ह्या इमेल ला वगैरे बडबडत होते.
फोन आला तेंव्हा समोरून एक महिला बोलत होती. "मी IAS (कि दुसरे काहीतरी, पण काही तरी हुद्दा होता हे नक्की) आहे आणि तू माझा इमेल हॅक केला आहेस. मी तुला पोलिसांत देईन." असा आरोप तिने केला.
मी म्हटले. "मॅडम, नक्की काय झाले आहे हे आधी सांगता का?"
मग प्रकार लक्षांत आला. मी योग्य पत्यावर इमेल पाठविला होता पण VSNL च्या काही बग मुळे इमेल हिच्या खात्यांत गेला. अर्थानं त्या काली असे काही बग असणे शक्य होते. मला सुद्धा इमेल विषयी प्रचंड ज्ञान नसल्याने नक्की काय झाले हे तेंव्हा लक्षांत आले नाही. पण इमेल हॅक झाला असे हिला का वाटले ? तिच्या मते तिच्या पासवर्ड शिवाय कुणीही तिला इमेल पाठवू शकत नव्हता. मग इमेल हा प्रकार तसा चालत नाही असे मी समजावण्याचा प्रयत्न केला पण "मी IAS उगाच झाले का? तू काय मला समजावणार, मी मोठ्ठी अधिकारी आहे" असा दम तिने मला दिला.
मग मी उदाहरण दिले. तुम्हाला मी पोस्टकार्ड पाठवले तर ते पाठवण्यासाठी मला तुमच्या घराच्या किल्ल्या लागतात का ? नुसता पत्ता असला तर पुरे ना ?
पण तिच्या मते, "मी घरी आले आणि टेबल वर दुसऱ्या भलत्या कुणाचे तरी पार्सल पाहिले ह्याचा अर्थ घरांत कुणी तरी विना परवानगी घुसला असा अर्थ होत नाही का ?"
हिच्या डोक्यांत प्रकाश पडत नसल्याने मूर्खाशी वाद घालू नये ह्या न्यायाने मी तिची माफी मागितली. (त्याशिवाय मी तिच्याकडे वाद घालतेय हे पाहून घरातील इतर मंडळींचे धाबे दणाणले होते). अहो आम्ही लहान मुले आहोत, जॉब साठी अप्लिकेशन पाठवले आहे. आमचीच काही तरी चूक होऊन तुम्हाला पोचले असेल. माझा नरमाईचा सूर आणि आर्जवे पाहून हिचा इगो सुखावला असे आवाजावरून वाटले. एकूण हिला ह्या गोष्टींची सवय असावी.
पण ह्या सर्वाचा एक मोठा पॉसिटीव्ह परिणाम झाला. हि महिला फारच दुष्ट आणि मठ्ठ असावी. तिने एकतर पोलिसांना कळवले. पण माझ्या घरच्यांची पोलिसांशी चांगली ओळख, त्यांना सर्व प्रकार समजला, त्याशिवाय हि महिला खूप लोकांना त्रास देत होती हे त्यांना ठाऊक होते त्यामुळे त्यांनी जुजबी माहिती घेऊन, मुलांना दम दिला आहे, ती भविष्यांत असे काही करणार नाहीत असे सांगून प्रकरण मिटवले. पण हि महिला तिथे थांबली नव्हती. तिने तो बायोडेटा आणि अप्लिकेशन वाचून फिरलोस्कर कंपनीत फोन केला. आता नक्की बोलणे काय झाले ठाऊक नाही पण एका सध्या जॉब साठी एका मोठ्या अधिकाऱ्याने फोन करून अमुक मुलाने अप्लाय केले आहे का वगैरे चौकशी केली आहे म्हटल्यावर कुजबुज सुरु झाली असावी. मग ह्याला कॉल गेला. ह्याला वेगळे केबिन मध्ये बोलावून साहेबानी चौकशी वगैरे केली. सर्व माहिती ऐकून घेतल्यावर साहेब खो खो करून हसले. ह्या व्यक्तीला जॉब सुद्धा मिळाला.
---
कथानक २
एक स्नेही विदेश सेवेंत होते. संपूर्ण आयुष्य जपान, ब्राझील, नामिबिया, अर्जेंटिना, मंगोलिया अश्या विविध प्रदेशांत गेले. पत्नी आणि त्यांचा सुपुत्र सुद्धा दर ३ वर्षांनी देश बदलत. सर्वानाच प्रवासाची भयंकर आवड आणि सुपुत्र फारच तल्लख बुद्धिमतेचे असल्याने शाळा वगैरेचा कधीच प्रॉब्लेम झाला नाही. सुपुत्र २० वर्षांचे झाले आणि शेवटी कुठे तरी स्थायिक व्हावे हा विचार आलं. थोडे भांडवल घेऊन पुण्यात एक कंपनी काढली. स्मार्ट मीटर वगैरे बनविण्याची. त्यासाठी सिम कार्ड्स हवी होती त्यामुळे त्याने १०-१५ सिम कार्ड घेतली. कुठलेही सिम हरवले वगैरे नाही.
एक दिवस अचानक फोन आला. "आपण अमुक आहात का ? आम्ही मुबईच्या गुन्हे विभागांतून मधून बोलत आहोत. तुम्हाला चौकशी साठी इथे यावे लागेल". ह्याला थट्टा वाटली म्हणून ह्याने काही सिरियसली घेतले नाही. (संपूर्ण आयुष्य विदेशांत गेल्याने इथे ओळखी, नातलग असे काहीच नव्हते).
शेवटी पुन्हा फोन आला आणि अटक वगैरे करायची धमकी दिल्यनानंतर ह्याने जास्त चौकशी केली आणि फोन खरा होता हे समजले. मग ह्याच्या मुबईच्या वाऱ्या सुरु झाल्या. बहुतेक वेळा मंडळी ह्याला बोलवत असत पण पोलीस अधिकारी मात्र आपण कुठे जात असत. त्याशिवाय चौकश्या नको त्या. आपली गिर्ल्फ्रेन्ड काय करते ? १५ सिम कशाला आहेत ? तुमचा धंदा चालेल कश्यावरुन ? इत्यादी.
शेवटी मामला हळू हळू उलगडत गेला. तर खाणकाम करणारी एक विदेशी कंपनीने मुंबईत ऑफिस उघडले होते आणि काही वैमनस्यातून कुणीतरी त्यांच्या मालकाला अश्लील आणि हिंसात्मक वगैरे इमेल पाठविले होते. कंपनीच्या मालकाने पोलिसांत तक्रार दिली आणि प्रकरण काही कारणास्तव पोलिसांकडे (कदाचित CBI) कडे पोचले. त्यांनी चौकशी म्हणून इमेल कंपनीकडून IP प्राप्त केला आणि इमेल पाठविण्याच्या वेळेला तो कुणाकडे होता हि विचारांनी ऐरटेल कडे केली. त्यांनी सदर IP अमुक व्यक्तीला त्या वेळी असाईन होता असे सांगितले. हि माहितीची फाईल मग सायबर क्राईम विभागाकडून अन्वेषण अधिकाऱ्याकडे आली. त्याने मागे पुढे न पाहता ह्या व्यक्तीला पाचारण केले.
कदाचित असे झाले असावे कि इमेल पाठविण्याची वेळ वेगळ्या टाईम झोन ची असावी आणि एरटेल ने योग्य ते गणित केले नसावे. माझ्या मित्राला हे लक्षांत येऊन त्याने अधिकाऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण त्याचे उत्तर "सायबर क्राईम ला आपले काम समजत नाही असे बोलायचे आहे का ? " म्हणून त्याला गप्प केले.
ह्याचे वडील चांगले अधिकारी होते पण अत्यंत प्रामाणिक असल्याने विनाकारण दिल्लीत फोन वगैरे त्यांनी केला नाही. तो उपाय शेवटचा होता. त्यांनी सुपुत्राला एक वकील कर असा सल्ला दिला. ह्याने ३००० रुपये मोजून एका प्रख्यात वकिलाची अपॉइंटमेंट घेतली. हा वकील दिल्लीचा होता आणि ५ मिनिटांच्या फोन साठी त्या काली ३००० रुपये घेत होता. त्याने केस समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. प्रकरण पूर्ण पणे मिटवतो कोर्टांत सुद्धा जायची गरज नाही. पण २ लाख रुपये रोख लागतील असे सांगितले. कोर्टांत जाऊन मिटवयाचे असेल तर एक मुंबईतील वकील पाठवू शकतो प्रति तास १८ हजार आणि त्याशिवाय इतर फी लागतील असे सांगितले.
ह्याने बराच विचार केला. २ लक्ष रुपये त्याच्यासाठी छोटी किंमत नव्हती. मग अत्यंत आणि प्रचंड धाडस करून ह्याने अधिकाऱ्याला "काही फी वगैरे देऊन हे प्रकरण बंद केले जाऊ शकत नाही का ?" असे विचारले. आणि हा प्रश्न विचारताच म्हणे त्या अधिकाऱ्याचा संपूर्ण आव बदलला. ACP प्रद्युमन वाटणारा हा अधिकारी अचानक फ्रेडी झाला. चला बाहेर चहा वगैरे पिऊ म्हणून बाहेर नेले. (अजून पर्यंत मुबंईत खेटा घालून आमच्या मित्राने सुमारे १५-२० हजार रुपये खर्च केले होते). आपल्या पैश्यांनी चहा पाजून ५० हजार रुपयांत प्रकरण डन करू असे ह्याला सांगितले. मला फक्त ५ हजारच हवेत, पण वरच्या साहेबाना जास्त हाव आहे.
ह्याने बरेच डोके खाजवून, आपले वडील विदेश सेवेंत असून अमुक दिल्लीमधील वकील त्यांचे चांगले मित्र आहेत, त्यांच्याशी बोललो असता १० हजारांत मामला सोडवता येत असे सांगितले आहे. पण वकील, कोर्टकचेरी नको, त्यांना १० हजार देण्याच्या आधी तुमच्याशी बोलून प्रकरण मिटवले तर जास्त चांगले असे मला वाटले. आणि वडिलांच्या नावावर जगण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची माझी धडपड आहे वगैरे वगैरे. शेवटी ५००० रुपयांत मामला संपला. ६ महिन्याच्या आंत माझ्या मित्राने भारतातील आपले बाडबिस्तर गुंडाळले आणि तो मेक्सिको मध्ये गेला. तिथे आज त्याची चांगली फॅक्टरी असून तो खूप यशस्वी झाला आहे.
🗣 चर्चा
(14)
उ
उपयोजक
Fri, 02/12/2021 - 04:52
नवीन
छान रोचक किस्से. :) आवडले!
"मी IAS उगाच झाले का? तू काय मला समजावणार, मी मोठ्ठी अधिकारी आहे" असा दम तिने मला दिला.
हे आजही होते. ;)
कदाचित एका क्षेत्रात उच्च स्तरावर गेल्यावर 'जगातल्या प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान शोषून घेण्याइतका सुपीक मेंदू आपल्याला दिला आहे' असा काही 'एका क्षेत्रात चांगली इंटेलेक्चुअल लेवल' असणार्या (अति)बुद्धिमान लोकांचा गैरसमज होत असावा. :)
- Log in or register to post comments
प
पिनाक
Fri, 02/12/2021 - 04:57
नवीन
म्हणून अशा लोकांची अकौंटस खरंच हॅक करून त्यांची धुणी पब्लिकली वाळत घालावीत असा गुरुमंत्र स्नोडेन साहेबांनी दिला आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 02/12/2021 - 06:15
नवीन
ट्विटर वर एक मराठी IAS अधिकारी अशीच भाषा वापरत होता ह्याची लोकांनी सार्वजनिक रित्या पूजा केली आहे. वाचावे : https://www.opindia.com/2019/03/suspended-officer-ashish-joshi-threatens-true-indology-after-being-exposed-for-his-lack-of-knowledge/
किती निर्ल्लज पणे हा अधिकारी धमकावत आहे पहा.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 02/12/2021 - 05:01
नवीन
अनुभव म्हणून वाचायला चांगलेच आहेत.
तुम्ही खूपच हलकेफुलके किंवा त्रोटक लिहिले आहे पण प्रत्यक्षात त्यातून जाणाऱ्या लोकांना खूपच मनस्ताप झाला असेल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 02/12/2021 - 06:56
नवीन
रिटायर्ड अधिकारी वगैरे त्यांनी एक सवय झालेली असते की लोक आपल्यालि मानतात, घाबरतात वगैरे. पण तो परिणाम खुर्चीचा असतो. अकरा ते पाच. नंतर कुणी भाव देत नाही। पण टिमक्या मारायची सवय. शिवाय अडाणी लोकांना वाटतं की हा काम करेल.। पण यांना कुणी नंतर विचारत नाही आणि त्यांची घमेंड उतरत नाही।
कित्येक वकील फिक्सिंगवाले असतात. जे काम पाच रुपयांत होते त्याचे अडिच हजार घेतात।
-------------
तुमचे अनुभव आवडले.
---------
फेसबुकनेही एकेकाळी डिंग मारली की इमेल इतिहासात जमा होणार. आठवतंय का?
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Fri, 02/12/2021 - 08:07
नवीन
काळ बदललाय.
हे असे 'एकाच विषयातले तज्ञ' प्रत्येक सोशल मिडियावर शिरुन आपण सर्व क्षेत्रातले तज्ञ आहोत असा अहंभाव दाखवत फिरतात.त्यासाठी त्यांच्या एकमेव तज्ञ असलेल्या क्षेत्राचा सतत दाखला देत राहतात.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 02/12/2021 - 09:01
नवीन
रोचक किस्से
बाकी सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे. स्वातंत्र्य मिळाले पण फक्त गोरे जाऊन काळे आले एवढाच तो काय फरक पडला. बाकी सगळ जैसे थे
अर्थात माझे वडील देखील सरकारी अधिकारी होते तरीही माझे हे मत कायम आहे...
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 02/12/2021 - 09:30
नवीन
यावरून मला एका किस्सा आठवला..
२००४ च्या आसपास ची गोष्ट आहे, त्याकाळी ईमेल, इंटरनेट वगेरे बऱ्यापैकी सुरू झाले होते.. घरात एकमेव मोबाईल फोन वडिलांकडे होता. एके दिवशी त्यावर एसएमएस आला की तुमचा नंबर लकी ड्रॉ मध्ये सिलेक्ट झाला आहे आणि आमुक अमुक पौंड इतकी रक्कम जिंकला आहात. रक्कम मिळवण्यासाठी आपले डिटेल्स ईमेल करा. त्यावेळी मी नुकतेच bsnl चे इंटरनेट कनेक्शन घेतले होते. Landline फोन ला जोडलेली वायर काढून कॉम्पुटर जोडली की नेट चालत असे. स्पीड जेमतेम ५-१० kbps. इमेज वगेरे लोड होत नसत . गूगल ओपन व्हायला १-२ मिनिटे लागायचे.
लॉटरी चा एसएमएस आल्यावर आमचे वडिल आणी आम्ही सगळेच खुश झालो होतो. कारण पौंड ते रुपये कन्व्हर्ट केल्यावर आकडा काही लाखाच्या घरात जात होता. त्याकाळी ती खूप मोठी रक्कम होती.
तेव्हा माझा देखील एक ईमेल आयडी होता पण कधीही कोणाला ईमेल केला नव्हता. आता पहिलाच ईमेल करायचा आणि तो देखिल इतक्या पैश्यासाठी.. मला थोडे दडपण आले. वडिलांच्या सांगण्यावरून मी त्या कंपनी ला ईमेल केला आणि त्यांच्याकडून रिप्लाय मध्ये पैसे जिंकल्याबद्दल अभिनंदन आणि त्यासोबत एक सर्टिफिकेट देखिल आले.
आम्ही सगळे खुश..!!
त्यानंर काही दिवसांनी त्यांचा पुन्हा ईमेल आला की आपली रक्कम घेऊन आमचा अधिकारी बेंगलोर ला आला आहे आणि त्यांना टॅक्स साठी अमुक अमुक एवढे पैसे पाठवा.
मग डोक्यात प्रकाश पडला की ही फसवाफसवी तर नसेल?? वडिल आणि मी देखिल बुचकळ्यात पडलो की काय करायचे.. आमच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाचा कॉम्पुटर मध्ये हार्डवेअर चा कोर्स झाला होता.. त्याला विचारले असता त्याने मला सांगितले की गूगल करून बघ.
त्यावेळी गूगल म्हणजे काय हे नुकतेच समजायला लागले होते. त्याच्या मदतीने गुगल वापरून माहिती शोधली तेव्हा समजले की ही काय स्टोरी आहे.. वडिलांना सगळा प्रकार समजावून सांगितला तेव्हा ते थोडा वेळ नाराज झाले होते..
नंतर काही दिवसांनी पुन्हा तसाच इमेल आला की तुमचे पैसे अजून मिळाले नाहीत. बक्षीस खूप मोठे असल्याने टॅक्स पण जास्त आहे पण तुम्ही xyz रक्कम पाठवली तरच तुम्हाला पैसै भेटतील. Etc etc..
माझे वडील मग मोबाईल कंपनी विरुद्ध (आयडिया) पोलिसात तक्रार करायला निघाले होते.. की असे फसवणुकीचे मेसेज तुम्ही कशाला पाठवता वगेरे.. पण आम्ही समजल्या नंतर त्यांनी तो नाद सोडून दिला.
त्यांच्या मते चूक आयडिया कंपनी ची होती की बेकायदेशीर आनी फसवणुकीचा मेसेज पाठवला म्हणून. आम्हीं त्यांना समजवाण्यासाठी पोस्टमन चे उदाहरण दिले. की आयडिया ही एक पोस्टमन सारखी व्यक्ती आहे. तुम्हाला (एसएमएस) पत्र पोचवणे एवढेच तिचे काम. त्या पत्रात काय लिहिले आहे. कोणाकडून आले आहे या गोष्टीचे त्यांनां काही देणेघेने नाही.. त्यामुळे आयडिया विरुद्ध तक्रार करून काही फायदा नाही. अश्या मेसेज ला दुर्लक्ष करणे हेच योग्य.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Fri, 02/12/2021 - 10:25
नवीन
फसवणुक होण्यापासुन वाचलात हे चांगले झाले.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 02/12/2021 - 12:57
नवीन
आणि मग धबाधब बक्षिसं येऊ लागली.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 02/13/2021 - 14:18
नवीन
मला तर दर महिना किमान, 10-12 कोटी रुपयांची लाॅटरी लागत होती ती पण 2000 साली ....
गेले ते दिन गेले
- Log in or register to post comments
स
सॅगी
Sat, 02/13/2021 - 17:04
नवीन
जीमेल वापरत असाल तर स्पॅम फोल्डर चेक करुन बघा एकदा, तुम्ही आतापर्यंत मुकेसभाईंपेक्षाही श्रीमंत झाला असाल...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 02/14/2021 - 03:20
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 02/13/2021 - 15:59
नवीन
फुकट कोणीच कोणाला काही देत नाही हे पक्क लक्षात असेल तर अशा लॉटरी च्या msg किंवा मेल ल फसन्याची शक्यता च नाही.
- Log in or register to post comments