भावातीत ध्यान आणि तुम्ही आम्ही
एका वेगळ्या धाग्यावर प्रतिसाद देत देत तो इतका मोठा झाला की वेगळा विषय काढावयास वाटला.. हे विचार बरेचसे विस्कळीत असल्यामुळे लेख न लिहिता काथ्याकूट काढत आहे, चर्चा करूया आणि समजून घेऊया..
भावातीत ध्यान हा पुर्वापार चालत आलेला आणि प्रचंड पब्लिक इंटरेस्ट असलेला विषय आहे. त्याचा मुख्य हेतू मनःशांती हा असला तरी देखील भावातीत ध्यानाच्या कोणत्यातरी टप्प्यावर अतींद्रिय शक्तींचा त्यात प्रवेश झाला.
लक्ष्यात घ्या,
अतींद्रिय शक्ती म्हणजे केवळ शिळा तरंगवणे नव्हे, ते कदाचित एखादे दृश्यमान स्वरूप असेल, पण तसले चमत्कार झाले होते की नाही याबाबत स्वतः देखील मी साशंक आहे, पण मला त्याची चिकित्सा करण्याची गरज वाटत नाही, कारण सामान्यपणे कोणताही सिद्ध "मी चमत्कार करतो" असे सांगत नाही. किंबहुना चमत्कार हे सिद्धीचे लक्षण नव्हेच.
ज्या विवेकानंदांना संपूर्ण भारत मानतो त्यांनी आपल्या आयुष्यात एकही चमत्कार केलेला ऐकिवात नाही.
पण,
त्याचबरोबर काहीवेळा असे लोक, की ज्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो, ते लोक काही चमत्कार घडल्याचे सांगतात, ज्यावर आपल्याला विश्वास ठेवणे भाग असते, जसे की मी पूर्वी मिपावर मंत्राने नाग बोलावण्याची गोष्ट सांगितली आहे, जी माझ्या वडिलांनी सांगितली मला.. वडील कधीच आजपर्यंत खोटे बोललेले मला माहित नाही, त्यामुळे ती गोष्ट खरी आहे असे मानणे मला भाग आहे. जरी त्यांना नजरबंदी केली असे म्हटले तरी संमोहन हे देखील छद्मविज्ञानच आहे.
या गोष्टी कुठेतरी धूर निघतोय हे सूचित करतात.
आता धाग्याचा मूळ विषय - भावातीत ध्यान किंवा विदेहत्व.
विदेहत्व म्हणजे काय, तर एक प्रकारे सविकल्प किंवा निर्विकल्प समाधी, योगशास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे.. (दोघांमधला फरक मला माहित नाही) समाधी म्हणजे तरी शेवटी काय, तर स्थळ काळाचे भान विसरून जाणे, याला सामान्यपणे आपण स्वरूपाशी एकरूप होणे म्हणतो.
हे केव्हा होते, तर मेंदू मध्ये काही रासायनिक अभिक्रिया होतात तेव्हा. (संभव असंभव वाचा, त्यात भावातीत ध्यानासाठी एक मोठा लेख आहे).
मग योगशास्त्र म्हणजे काय? तर जी प्रोसेस या मेंदूमधल्या रासायनिक क्रिया घडवून आणते ती प्रोसेस कृत्रिमरीत्या आणि हुकुमी पद्धतीने ट्रिगर करणे. मग प्रत्येक जण हे करू शकतो का? आपल्या मेंदूच्या क्षमतेप्रमाणे प्रत्येक जण हे करू शकेल, पण त्यासाठी अभ्यास हा हवाच.
पण तरीही यात एक मेख असते, ती म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला मेंदू शांत करायला एक ट्रिगर लागतो, म्हणजे तुम्ही कितीही अभ्यास केलात तरी मेंदू उभ्या उभ्या झोपत नाही, तर त्याला सूचना द्यावी लागते की आता तू झोपायचे आहेस..
ही सूचना कशी जाते?
अनेक प्रकार आहेत, काही लोक मंत्रशास्त्र वापरतात, काही लोक नामस्मरणात करतात, काही लोक नसते बसून ध्यान करतात, काही लोक हठयोग किंवा अष्टांग योग्य आदींच्या माध्यमातून शेवटी हे साध्य करायचा प्रयत्न करतात. काही सिद्धी पावतात, काही नाही पावत.
याव्यतिरिक्त अघोर संप्रदायात काही ठिकाणी संभोगाचा परमोच्च क्षण, किंवा काही अन्य पदार्थ जसे को भांग, गांजा वगैरे वापरतात. अन्य काही संप्रदायात अधिकारी व्यक्तींकडून दीक्षा मिळणे वगैरे.. पण हा केवळ ट्रिगर आहे. मुळात वीज नसेल तर बटन दाबून काही उपयोग नाही.
म्हणजेच तुम्ही किती काही केले तरी ही सगळी माध्यमे हा ट्रिगर असतो हे महत्वाचे आहे. म्हणजे साधन. मुळात तुमचा मेंदू जर त्या सूचना स्वीकारतच नसेल तर त्या ट्रिगर चा काही उपयोग नाही. त्या सूचना स्वीकारायला शेवटी लागतो तो अभ्यास.
मग इतके करून भावातीत अवस्था मिळवायची कशाला? कारण त्या अवस्थेत शरीरात काहीतरी वेगळे होते, अशी थिअरी आहे. भावातीत ध्यान करणाऱ्यांचा हृदयविकाराचा धोका बऱ्यापैकी कमी होतो असे संशोधन आहे. त्यासाठी ही सगळी धडपड असते (म्हणजे शांतीसाठी आणि आनंदासाठी). मृत्यूची भीती, अतींद्रिय शक्ती, समाधी वगैरे पुढच्या टप्प्यावर येतात.
आता इथे गंमत काय असते की, (यातले माझे आकलन सांगतो) लोकांना काही कारणाने भावातीत अवस्था प्राप्त होते, आणि त्याचा ट्रिगर कुठेतरी असतो, ज्याने काही विशिष्ट बिंदू उद्दीपित होतात आणि मेंदूला सूचना मिळते, आणि भावातीत ध्यान सहजसाध्य होते.
एकदा समाधीसुखाची गोडी लागली की माणूस कशाला बाहेर बघतोय? सर्वसामान्यपणे ज्याला समधीसुख प्राप्त होते त्याच्यादृष्टीने ते जीवनाचे अंतिम साध्य असते, आणि त्याने केलेली साधना हे नक्कीच परिपूर्ण साधना असते.. पण सगळे लोक सारखे नसतात, त्यामुळे ज्या मार्गाने तो सिद्ध झाला तोच मार्ग सगळ्यांना जमेल असे नाही.. पण आपल्या अवस्थेला पोचल्यावर पुन्हा बाहेर बघितले जात नाही.. तसे जर लोक बाहेर बघत असते तर जगात इतके संप्रदाय निर्माण झालेच नसते, वैष्णव आणि शैव लोकांच्यात इतकी टोकाची मतभिन्नता आलीच नसती की शंकराचार्यांना समन्वय घडवून आणावा लागावा.
अर्थात पूर्वी काही आचार्यांनी या सगळ्या ध्यानपद्धतींचा साकल्याने अभ्यास करून त्यातले एकत्व विदित करून ठेवले आहे, ज्यामुळे एकेकाळी भारतात होणारी सांप्रदायिक युद्धे थांबली.. अर्थात हे भारताच्या बाहेर ना झाल्यामुळे तिथे अजून हा एककल्लीपणा आहे. (विवेकानंद या विषयावर खूप बोलले आहेत, त्यांचे साहित्य वाचले असता याची माहिती मिळेल)
(पुढचा परिच्छेद विस्कळीत आहे, कारण याला अजून म्हणावा तसा शास्त्रीय आधार मिळालेला नाही)
आता गम्मत अशी आहे की हे सगळे आपण मन बुद्धी अहंकार वगैरेंच्या पातळीवर मोजत असलो तरी त्यात शेवटी असतात काही रासायनिक अभिक्रिया, ज्या मेंदूमध्ये होतात. भावातीत ध्यानात मेंदूचे काही विशिष्ट भाग बहुधा frontal लोब, शांत होतो असे वाचल्याचे स्मरते.. काही लोकांनी नाडी बंद करून दाखवल्याचे देखील वाचल्याचे आठवते. परंतु याचा एकत्रित अभ्यास करताना असे लक्षात येतेय की शेवटी या मेंदूलहरी आहेत काही प्रमाणात. त्यालाच काही लोक ऑरा म्हणतात.. तुमची frequency एखाद्याशी जुळली तर तुम्हाला त्रास होत नाही, एखाद्याशी नाही जुळली तर काही वेळा डोके दुखण्यापर्यंत तरी त्रास होतोच होतो..
यात नेमके काय विज्ञान आहे मला देखील माहीत नाही.. पण मेंदूच्या आतले आपल्याला खूप कमी माहीत आहे.. एखाद्याच्या सुप्त मेंदूला त्याच्या नकळत सूचना देता येते का? तुमचा ऑरा वापरून तुम्ही दुसऱ्या एखाद्याचा ऑरा influence करू शकता का असे अनेक प्रश्न आहेत.
भौतिक चमत्कार काही काळासाठी सोडून देऊ.. अजून संमोहनाचे तरी शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण कोण देऊ शकले आहे? ते पण छद्मविज्ञानच आहे ना, पण तरीही संमोहनाचे प्रयोग सर्रास होतात..
सगळा मोठा घोळ आहे. कधीकधी वाटते , कशाला घालायची विज्ञान आणि अध्यात्माची सांगड? अध्यात्माचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा प्रत्यक्षात मेंदू काम करतच नसतो, म्हणजे जेव्हा बुद्धी झोपलेली असते तेव्हा येणाऱ्या अनुभवांची मीमांसा बुद्धीने कशाला करायची? पण शेवटी ऐकेल तर बुद्धी कसली?
तुमच्या दृष्टीने भावातीत ध्यान म्हणजे काय आहे? तत्वज्ञान वगैरे सध्या बाजूला ठेवू, पहिले ध्यान म्हणजे काय याची व्याख्या करू मग पुढे जाऊ.. कसे?
पण
हे mott and bailey प्रकारचे आर्ग्युमेन्ट वाटले, ज्या context मध्ये तुम्ही मांडले आहे. एखाद्या गोष्टीची एखादी कमतरता दाखवणे, म्हणजे त्याच्या पर्यायांची उपयुक्तता सिद्ध करणे नसते. विज्ञानाच्या मर्यादा मान्य करणे आणि विज्ञान/तर्क यांच्या आधाराची अपेक्षा न करणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. सहमत.