Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Mon, 11/23/2020 - 08:38
शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका सुख-समृद्धीच्या देतो शुभेच्छा की तू करतो मस्करी? कुठून येईन रे भाऊ धन आम्हा शेतकऱ्याच्या घरी? सायबीन सवंगाचं काम बिलकुल नाही पडलं चकरभुंग्यापायी पीक खुमसूखुमसू रडलं घरी धन आणासाठी करु का रे गांजा-तस्करी? कुठून येईन रे भाऊ धन आम्हा शेतकऱ्याच्या घरी? औंदाच्या पावसापायी भलतंच ईपरीत घडलं कापसाचं अख्खं बोंड बुडापासून सडलं आता काय तुह्याच घरी म्या करावी का चोरी? कुठून येईन रे भाऊ धन आम्हा शेतकऱ्याच्या घरी? साल पह्यलेच नापिकीचं पुन्हा बोंडअळी वरून बोंडअळ्याच विकाव्या का आता पोत्यामधी भरून? खाणार काय आमटी करून सांग इतकं तरी! कुठून येईन रे भाऊ धन आम्हा शेतकऱ्याच्या घरी? तुह्यं "धन-लाभ भवतु" सांग फलन कसं? शेतीत कुठं हाय बापू तुले वाटते तसं? जरी तुले रुचत नाय पण गंमत हाये खरी कुठून येईन रे भाऊ धन आम्हा शेतकऱ्याच्या घरी? तुले जसं देते अभय, तसं मले कोण देते? सरकार फक्त शेतीलेच, पार नोचू नोचू खाते कांदा मारला, कापूस मारला उद्या मारणार तुरी कुठून येईन रे भाऊ धन आम्हा शेतकऱ्याच्या घरी? - गंगाधर मुटे "अभय" ============ २०/११/२०२० ============ कविता

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14672 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 11/23/2020 - 09:29 नवीन
कारण वरील कविता सर्वसामान्य लोकांची मस्करी करण्यासाठीच लिहिली आहे, मग आपण का नाही करायची? कांदा १०० रुपये किलो..... https://www.esakal.com/mumbai/onion-100-rs-kg-apmc-navi-mumbai-361602 दुध ५८ रुपये लिटर तुरडाळ रु १०३ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/tur-arhar-dal-2-kg/491417390?source=shoppingads&city=Pune&pin=411006&gclid=CjwKCAiA2O39BRBjEiwApB2IkoBnNe4B-o30kLojc4hlyiyxgAgBhVzA64QLZFoJVyiU12FKGOr7dRoC7DoQAvD_BwE सोयाबीन रु ५८ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/pick-n-cook-soyabeans-500-g/490356539 अजूनही काही देता येतील. महागाईने आणि लॉकडाउन ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अशी कविता लिहिणे म्हणजे गोरगरीब जनतेच्या भळभळत्या जखमांवर मीठ लावण्याचा प्रकार वाटला. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 09:46 नवीन
आपले मत शिरोधार्य
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/23/2020 - 10:00 नवीन
अखंड रडरड सप्ताहाच्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा ! फक्त रडत रहा =)))) इतकेवर्षे तुमच्या रडक्या कविता वाचतोय, येवढ्या वेळेत एखाद्याने कृषी उत्पन्ना आधारित काहीतरी व्यवसाय , जसे की बांबु प्रोसेसिंग, बांबु-कापुस धागा उद्योग, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, फलवाटिका, प्रोसेसिंग आणि एक्स्पोर्ट उद्योग , सेंद्रिय भाजीपला उद्योग असले काहीतरी सुरु करुन शेतकर्‍यांना समृधीचा मार्ग दाखवला अस्सता ! पण ते करण्या ऐवजी नुसत्या रडक्या कविता लिहुन फक्त राजकारणची शेती जोमाने चालेल , दुसरी कोणतीही नाही ! हे सोशॅलिस्ट रुदाली लोकं शेतकर्यांना कायमच बुडवत रहाणार ! त्या श्री. ज्ञानेश्वर बोडकेंकडुन काहीतरी शिका राव .
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 11:24 नवीन
देवाने जेवढी अक्कल तुम्हाला दिली आहे... तितकीच अक्कल मलाही दिलेली आहे... असे तुम्ही जे समजताय ना.... तोच खरा केमिकल लोच्या आहे. असं नसतं हो! :D
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/23/2020 - 11:04 नवीन
रोजचे मढे त्याला कोण रडे. वीट आलाय त्याच त्याच कविता आणि शेतकऱ्यांच्या रडगाण्याचा. जमत नसेल तर शेती सोडून दया पण आता बास करा तुमचे रडगाणे. कालच एकाचा व्हाट्सअप स्टेट्स पाहिला. त्यात एक शेतकरी (दुःखी चेहऱ्याचा, काळवंडलेला, दीनदुबळा ) धमकी देत होता कि आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता जास्त माजू नका .. ज्यादिवशी शेतकरी संपावर जाईल तेव्हा तुम्हाला एका एका दाण्याची किंमत कळेल. पिझ्झा 300चा खाता, पिक्चर 200 रुपये देऊन बघता , सामोसा शंभर रु चा खाता आणि बाजारात बटाटे घ्यायला गेले 4-5 रुपयांसाठी शेतकऱ्याला नाडता.. आणि पुढे असे बरेच तत्वज्ञान होते. च्यायला.. किती भोकाड पसरणार ही लोक आणि कधीपर्यंत हेच चालणार देव जाणे...
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 11:28 नवीन
तुमच्या इच्छेचा तथास्तु होतच आहे हो साहेब. लोकं शेतीचं काय.... तुमच्या मालकीची पृथ्वीच सोडून जात आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/23/2020 - 14:41 नवीन
चांगलेच आहे कि शेती सोडून जात आहेत. दुसरं काहीतरी काम करतील तर हाताला आणि डोक्याला नवीन काम भेटेल. नव्या आयडिया आणि रोजगार तयार होतील. उगाच तोट्याची शेती करून नंतर इतर उपकार केल्याचा आव आणण्यापेक्षा बरे आहे. आणि जग सोडून देण्याबद्दल म्हणत असताल तर - जगात आत्महत्या कोण करत नाही?? कामगार, रस्त्यावर फुटपाथ वर हातविक्री करणारे ते फिरत्या खुर्च्यांवर बसून आपल्या उद्योगाचा डोलारा सांभाळणारे उद्योजक सर्वच क्षेत्रातील लोक आत्महत्या करत असतात. पण शेतकर्यांसारखे पॅकेज आणि कोट्यवधींची मदत कोणाला मिळतेय का?? पाऊस पडल्यावर फक्त शेतकऱ्याचे नुकसान होते का?? एखाद्या नैसर्गिक आपत्ती मुळे फक्त शेतकरीच अडचणीत येतो का?? आणि सर्वात शेवटी - सर्व शेतकरी जे आत्महत्या करतात त्यामागे फक्त शेतीतील नुकसान हाच फॅक्टर असतो का?? असो गाढवासमोर गीता वाचून काय उपयोग.. इथून पुढे पण हे असच चालत राहणार. शेतकरी शेती करत राहणार.. तुम्ही आणि तुमच्यासारखे शेतकऱयांवर दर्दभऱ्या कविता करत राहणार..
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 15:30 नवीन
शेतकरी शेती सोडून आहे हे चांगले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असे तुमचे मत मान्य आहे. आणि शेतकरी इहलोक सोडून गेले तर तुम्हाला ऐसपैस मोकळी जागा उपलब्ध होईल, तुमचे अनेक बाबतीतले स्पर्धकही कमी होतील ... हाही एक फायदाच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 15:36 नवीन
आणि तुम्ही मयतांच्या मढ्यावरचे लोणी खात खात बांडगुळ म्हणून ऐश करत राहणार. (तुमची लेखनशैली सिद्ध करून जात आहे कि तुम्ही बांडगुळ आहात. बांडगुळ नसलेला मनुष्य असा विचार करत नाही. जो काही तरी करतो त्याला समस्यांची जाण होते. त्याला स्वतःसमोरील समस्या कळतात आणि इतरांच्याही समस्या कळतात. )
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/23/2020 - 17:24 नवीन
वा आलात वैयक्तिक टीका टिप्पणीवर?? असो. तुमची लायकी दाखवलीत. थोडेसे स्पष्टीकरण देतो. बांडगुळ = झाडावर वाढलेली वनस्पती जी मूळ झाडाकडून मिळालेली पोषकतत्वे विना कष्ट शोषून घेते. आमच्याकडे ही एक शिवी म्हणून वापरली जाते जो व्यक्ती आयते किंवा फुकट चे खाऊन जगते. मी कोणत्याही शेतकऱयांकडून कोणतीही वस्तु फुकट घेतलेली नाही. बाजारभावाप्रमाणे रोख पैसे मोजतो. कांदे 5 रुपये किलो असले तरी घेतो आणि 100 रुपये असले तरी घेतो. माझ्या उत्पन्नावर नियमानुसार टॅक्स भरतो. माझा व्यवसाय बुडाला किंवा नैसर्गिक कारणामुळे काही नुकसान झाले तर सरकारकडून अनुदान/ भरपाई घेत नाही.. किंबहुना ती मिळत पण नाही. पण याउलट शेतकरी कित्येक गोष्टींवर अनुदान घेतो , टॅक्स भरत नाही, नुकसान झाले कि लगेच सरकारकडे पैसा मागतो. आणि इतके सगळे होऊन सुद्धा पुन्हा तोच तोच व्यवसाय, तीच स्ट्रॅटर्जी, तीच पिके, तीच बाजारपेठ try करून वेगळ्या रिझल्ट ची अपेक्षा करतो. मग खरा बांडगुळ कोण?? तुम्हाला सहानुभूती मिळवण्याची सवय झालीये. एखाद्याने थोडीशी विरोधी किंवा प्रॅक्टिकल वाटणारी भूमिका घेतली कि लगेच आपली गँग करून त्याच्यावर तुटून पडायचे.. आपली नुसेन्स व्हॅल्यू दाखवून द्यायची.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 11/23/2020 - 12:52 नवीन
दोन प्रश्न, सिरिअसली विचारतोय - १. शुभेच्छा कोण कुणाला दिल्या, कोणत्या संदर्भात आणि त्याचा कवितेच्या अपेक्षित अर्थाशी काय संबंध आहे? २. कवितेच्या मजकुराच्या खाली दोन बातम्यांची कात्रणे आहेत, त्यांचा कवितेशी काय संबंध आहे?
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 13:33 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 13:33 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 13:34 नवीन
हा प्रतिसाद रद्द समजावा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/23/2020 - 15:34 नवीन
लिहिते राहा, येत राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 11/23/2020 - 15:41 नवीन
मी साहित्य विषयक विशेषतः कविता लेखन केले तर मायबोली आणि मिसळपाववर ती रचना नक्कीच न चुकता घेऊन येत असतो. आज मी जे काही असेल ती मायबोली आणि मिसळपावचीच देण आहे. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच Mon, 11/23/2020 - 16:03 नवीन
पहिली गोष्टा भारत अजुनही शेती प्रधान देश आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण जी तुलना शेतकरी आणि दुसरे उद्योग करणारे लोक यांचे प्रमाण बघायला हवे. त्यामुळे दुसर्या कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांनी आत्माहत्या केली तरी प्रमाण नगण्य आहे. दुसरी गोष्ट सगळ्याच शेतकर्यांनी शेती सोडुन देवुन दुसरे काही करायला आधी त्यांना ते काम यायला तर हवे? उतारवयाच्या कोणत्या शेतकर्याला कोणी दुसरा माणुस /उद्योगपती नोकरी देवु शकेल? तुमची कं जर स्वतः बंद पडली तर तुम्ही लगेचच दुसरा जॉब शोधु शकता पण म्हणुन तुम्ही दुसर्या क्षेत्रात नाही ना जावु शकत तर आहे त्याच क्षेत्रात नोकरी करायला बघणार कारण तुम्ही त्या त्या क्षेत्रातले अनुभवी लोक आहात बरोबर? म्हणजे एखादा शिक्षक लगेच बँकेत नोकरी नाही करु शकत तो घरी शिकवणी घेईल, एखादा सुतार रंगारी आपापले क्षेत्र सोडुन दुसरे काही करु शकणार नाही त्याला संधी साठी थोडे थांबावे लागेल. पणा शेती हा व्यवसाय अनेक घटाकांवर अवलंबुन आहे त्यातले एक कारण म्हणजे निसर्गाचा लहरी पणा त्याला कोणी काही करु शकत नाही. चांगली अधुनिक अवजारे, खुप मजुर असुन सुध्दा शेतात राबल्यावर जर वेळेत पाऊस नाही पडला किंवा खुप झाला तरीही नुकसान होतेच आहे. यावर सरकार काय कोणीच काही करु शकत नाही. फक्त आर्थिक मदत दिली तर ती दुसर्या दिवशी संपुनही जाईल. यावर दोन्ही बाजुने विचार करुन योग्य तो मार्ग काढायला हवा पण कोणी मंत्री कधीच लक्ष देत नाही. इवलाशा इराण मध्ये ४ वर्शातुन एकदा पाऊस पडतो पण असे काही पाणी नियोजन केले गेलेकी आता त्या वाळवंटातही गुलाब आणि ट्युलिप फुलांची शेती होते. तेव्हा नियोजन महत्वाचे. आणि जात जात तुम्ही म्हणता तसे जर एक वर्ष सराव करुन असे सगळे शेतकरी खरेच दुसरे काही करु लागले तर जो अन्नाचा तुटवडा भविष्यात जाणवणार आहे त्याचे काय मग खरोखरच टोमॅटो २०० रुपये किलोने आपण घ्यायला (आयात) तयार आहोत का?
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 11/23/2020 - 17:11 नवीन
भारत हा कृषी प्रधान देश आहे.. लहानपानापासून हे गौरवास्पद वाक्य वाटायचे. पण बारीक विचार केला तेव्हा ही गौरवाची किंवा अभिमानाची बाब नसुन चिंतेची बाब आहे हे लक्षात आले. शेती करणारा शेतकरी नेहमीच दीनदुबळा, हतबल, आणि तरीही इतरांवर उपकार करणारा असा प्रोपेगेंडा चालवून काय मिळते तुम्हा लोकांना? आणि शेती हा व्यवसाय खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. 5-10 वर्षात डेव्हलोप झालेला नाहीये. त्यामुळे त्यात असणारे फायदे तोटे (रिस्क ) ही सर्व शेतकऱ्यांना ( ते कितीही अडाणी असले तरी ) माहिती आहे तरीही ते आपल्या पुढच्या पिढीला तोच व्यवसाय त्याच पद्धतीने ( व्यवसाय हाच शब्द बरोबर आहे ) करायला लावत असतील तर नक्कीच कुठेतरी चुकतेय. टोमॅटो 200 रुपये किलो होतील आणि ते इतरांना परवडणार नाहीत त्यामुळे मी खड्ड्यात गेलो तरी चालेल पण शेतीच करणार असा दैवी विचार करून कोणताही शेतकरी शेती करत नाही. म्हणून शेती व्यवसायाला उपकाराची भावना जोडून तुम्ही त्यांना पंगू बनवताय. त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होतेय. तेच तेच प्रतिसाद टंकून आता कंटाळा यायला लागला आहे. आणि प्रत्युत्तरात तीच तीच रडारड वाचून पण वीट आलाय. मिपावर कृषिजगत कि असेच काहीतरी एक विभाग आहे /होता तिथे महिनोंमहिने कोणताही इनोव्हेटिव्ह किंवा प्रोडक्टीव्ह लेख येत नाही पण दर 15 दिवसाला रडगाणेरूपी कविता किंवा तश्याच लेखाची जिलेबी कोण ना कोणतरी पाडून जाते. सगळ्या प्रॉब्लेम चे मूळ इथे आहे...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा